जैन पर्युषणपर्व! जैन पर्युषण पर्व दरवर्षी १० दिवस पाळला जाते. आत्म्याच्या १० धर्मांना या १० दिवसांत प्रकट करून 'आत्मशुद्धी' करण्याची ही संधी असते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असते. आजपासून पुढील दहा दिवस हा पर्वकाळ सुरू राहील. भरत जैन कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होवून त्याची वैचारिक बैठक चांगली रहाते. शिवाय, यामुळे पुण्यार्जन होवून मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे १० दिवस गणेशोत्सव, ९ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा १० दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्वजण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. पर्युषण म्हणजे उपासना, जी स्व:कल्याणासाठी केली जाते. आत्मकल्याण म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जिवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रिय, द्विइंद्रिय त्रीइंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याक्षयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने 'मोक्ष' मिळवता येते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू. उत्तमक्षमा पहिल्या दिवसाचा धर्मास 'उत्तमक्षमा' म्हटले आहे. या दिवशी 'क्षमा' धर्माची पूजा चिंतन, सामायिक (रोजच होते) व ती पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले नाही तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांगून त्याला क्षमा करणे मग तो लहान असो वा मोठा. हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, 'क्षमा विरस्य भूषणम्' उत्तम मार्दव दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. मार्दव म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे. नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरपर्यंत सर्व अती मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपणा तर देतेच; शिवाय पुण्यही लाभते. उत्तम आर्जव तिसरा दिवस आर्जवचा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, मनात कुठलेही कपट नसणे, मायाचार न करणे. उत्तम शौच 'शौच' म्हणजे निलोभता. अनाठायी भाव सोडून समाधानी राहाणे. यामुळे दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे पाहून आपल्याला दु:ख होत नाही. कारण ज्याला त्याला आपल्याच मागच्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळे हे सर्व मिळत असते. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार हा धर्म न अंगीकारण्यानेच आहे. उत्तम सत्य सत्य बोलणे वागणे, खोटे-लबाड न बोलणे, सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात 'सत्यमेव जयते'. उत्तम सयंम मनाविरूद्ध घडणाऱ्या घटनांनी मन विचलीत न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. थोडक्यात इंद्रियांना जिंकणे होय. उत्तम तप तप म्हणजे एक चित्ती ध्यान साधना, पूजापाठ, उपवास, सामाजिक स्वाध्याय. यामुळे आत्मशुद्धी होऊन पुण्यार्जन होते. उत्तम त्याग मिळाले त्यात समाधान, न मिळाल्याचे दु:ख न करणे, जास्तीचे आहे त्याचे दान गरजूंना मदत करणे, त्यागने हे होय. उत्तम आकिंचन २२/०९/२०१८ 'न किंचन' अपेक्षा मोह, म्हणजे अकिंचन. आलो रिकाम्या हाताने जाणार रिकाम्या हाताने मग जास्त हव्यास कशाला? जीवन जगण्यापुरते मिळविण्यात समाधान मानने म्हणजे अकिंचन धर्म! बह्मचर्य या पर्वात दहावा धर्म ब्रह्मचर्य म्हणजे 'अती कामवासना' न ठेवणे हा सांगितला आहे. आजचे स्त्री अत्याचार हा धर्म न पाळल्यामुळेच बोकाळला आहे. वासना अती नको. अतिप्राचीनकाळी माणूस जंगलात राहायचा. पेरण्या झाल्यावर पावसामुळे इतर कामे बंद असायची. मग या दहा दिवसांत तर भगवंताची पूजाअर्चा करून पुण्य कमवणे, यातून आत्मशुद्धीने पाप कमी करून पुण्य कमवणे व 'मोक्ष' मार्ग प्रशस्त करून घेणे हे या पर्युषण काळात होते. या पर्वाचा शेवट १० दिवसानंतर सर्वांनी लहान-मोठे एकमेकांची क्षमा मागून सांगता होते. वर्षभरात काही चुकले असल्यास लहानमोठे सर्व एकमेकांची क्षमा मागतात. 'क्षमावणी'ने या पर्वाची सांगता होते. असा हा पर्युषण पर्व आत्मशुद्धी करवतो, माणसाला माणूस घडवतो. जीवन सुखमय तर करतो पण 'मोक्षगामी'ही बनवतो. कारण यात आत्मचिंतन स्वाध्याय पूजापाठ, गुरुउपदेश, सामायिक हे सर्व येते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट