Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

देवळाली कॅम्प परिसरात जनावरे ‘मोकाट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील प्रमुख मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून परिसरातील मोकाट जनावरे थेट रस्त्यावरच ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

देवळालीतील विविध मैदानांवर चारा सहज उपलब्ध होतो, त्यामुळे असंख्य जनावरे चाऱ्याच्या आशेने देवळालीकडे येतात आणि देवळालीच्या रेस्ट कॅम्परोड, संसरी नाका, आनंदरोड आदी रस्त्यांवरच ठिय्या मांडतात. अनेकदा त्यांच्यावर वाहनचालक आदळत असल्याने जनावरांना तर इजा होतेच, मात्र वाहनचालकही जखमी होत आहेत. शिवाय आठवडेबाजाराच्या दिवशी ही जनावरे शेतकरी व बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या हातातील पिशव्या ओढत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट कार्यालयात चौकशी केली असता संबंधित जनावरांचे मालक येऊन दंड भरून ती पुन्हा चरण्यासाठी रस्त्यावर सोडून देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कारवाई नियमित हवी

मोकाट जनावरांनी परिसरात उच्छाद मांडला असून, कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने अशी मोकाट जनावरे पकडून पुन्हा कोंडवाड्यात घेऊन जाण्याबाबत निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्याप्रमाणे कारवाई सुरू केली. मात्र, कारवाई होत असताना पुन्हा ही जनावरे रस्त्यावर कशी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून, नियमित कारवाई करण्याचा आग्रह नागरिक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकप्रतिनिधींसह कार्यालयाकडे करीत आहेत.

००००००००००००००००००००००००००००००

आयुक्तालय रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी

---

डांबरीकरणाऐवजी माती टाकून बुजविले खड्डे

---

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पाच जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाकडे जाणारा रस्ता जागोजागी खराब झालेला असून, या रस्त्यावर माती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

महसूल कार्यालयासह फॅमिली कोर्ट, शिक्षण उपसंचालक, अन्नपुरवठा, कृषी, माहिती व जनसंपर्क आदी कार्यालये आणि प्रेसदेखील या रस्त्यावरच आहे. त्यामुळे त्यावर कायमच वर्दळ असते. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यापासून महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. जेलरोड, गोरेवाडीकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्याचे नूतनीकरण नाही, तर किमान डांबरीकरण करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न करता प्रशासनाने या रस्त्यावरचे खड्डे माती टाकून बुजविले. जोरदार पाऊस आल्यावर हे खड्डे पुन्हा उघडे पडणार आहेत. त्यामुळे डांबर व खडी टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि पावसाळा संपल्यावर रस्ता नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

००००००००००००००००००००००००००००००००००००

वीजचोरांविरोधात महावितरणची मोहीम

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरण शनिवार (दि. १ सप्टेंबर)पासून विशेष मोहीम हाती घेणार आहे.

अशा प्रकारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांबरोबरच रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महावितरणतर्फे वीजचोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वीजचोरी रोखण्यासाठी यापूर्वीही राज्यभर विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु, अलीकडच्या काही वर्षांत रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मुंबईत बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीजचोरी करणारे ग्राहक, तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते, तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते, असे आवाहनही करण्यात आले आहे.

(सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकटी

$
0
0

भाडेकरूंना दुप्पट दर

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश क्र. ५२२ मध्ये निवासी आणि अनिवासी व व्यावसायिक मालमत्तांचे करयोग्य मूल्य तिप्पट केले होते. संबंधित घरात वा दुकानात भाडेकरू आढळल्यास त्यांना सध्या आकारण्यात येत असलेल्या घरपट्टीत तीनपट वाढ करण्यात होती. त्यामुळे भाडेकरूंवर आर्थिक संकट आले होते. पंरतु, यातही दिलासा देण्यात आला असून, आता करयोग्य मूल्य दुपटीवर आणण्यात आले आहे. तसेच, जे मिळकतधारक भाडेकरूंची माहिती देणार नाहीत, त्यांना अतिरिक्त एकपट दंड म्हणून आकारला जाणार आहे.

शैक्षणिक मिळकतींना निवासी दर

शैक्षणिक मिळकती व वसतीगृहांना यापूर्वी अनिवासी करयोग्य मूल्य लावण्यात आले होते. आता यातही फेरबदल करण्यात आले असून, नवीन करयोग्य मूल्य निश्चित करताना बांधकाम प्रकारानुसार त्या-त्या भागातील निवासी मूल्यांकनाचे दर विचारात घेवून करयोग्य मूल्य निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी शैक्षणिक संस्थांना घरपट्टीच्या ५० टक्के सवलत दिली जात होती. परंतु, आता ती मिळणार नाही.

पार्किंग, तळघरांवर २० टक्के दर

खुल्या जागेवर पार्किंगसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्या-त्या भागात निश्चित केलेल्या आरसीसी बांधकामाच्या अनिवासी दराच्या ४० टक्के मूल्यांकनाचे दर विचारात घेवून करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आले होते. त्यातही आता बदल झाला असून, हा दर आता २० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तळघरांवर मूल्यांकनाच्या २० टक्के कर आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरपर्यंत स्वाइन फ्लूचा प्रकोप

$
0
0

आरोग्य मंत्र्याचे भाकीत; काळजी घेण्याच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूबाबत प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक आहे. डिसेंबरपर्यंत या रोगाचा प्रकोप कायम राहणार आहे. स्वाइन फ्लूचे २०१८ मध्ये एकूण ९ रुग्ण दगावले असल्याने नाशिककरांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात साथरोगाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. डॉ. सावंत यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लूसाठी लागणाऱ्या औषधांचा व नाशिक शहर व ग्रामीण भागातील डेंग्यू परिस्थितीची माहिती घेतली. डेंग्यू व स्वाइन फ्लू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

आढावा बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सावंत यांनी साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरी भागातील संवेदनशील तसेच ग्रामीण भागातील डासांचे निमूर्लन करण्यासाठी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, उघड्यावर पाणी असू नये आणि पाण्याची सर्व भांडी कोरडी असावीत, अशा सूचनाही केल्या.

सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत. तसेच खासगी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांनी तात्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे सांगत त्यांनी साथरोगाबाबत विविध टिप्स दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्याचा आरोग्याचा आढावा घेत राज्य सरकारकडून सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. डेंग्यूला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी व फवारणी करण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

मध्यवर्ती ठिकाणी सोय

पेठ सुरगाणा या भागात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत असून तेथील बालकांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालयाची सोय करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. नाशिक येथील महापालिकेच्या चार पैकी एका रुग्णालयात एनआयसीयू सुरु करण्यात येईल असे ते म्हणाले. बैठकीत रुग्णांचे सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी बाबीकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाच खाटांचे शिशु कक्ष उभारणार

मंत्री डॉ. सावंत यांनी पेठ येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. पाहणी प्रसंगी बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पाच खाटांचे नवजात अर्भक शिशु कक्ष उभारणार असल्याचे सांगितले. तसेच रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका सुरु करणार व रुग्णालयाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता रोज कारवाई; 'हेल्मेट ड्राइव्ह' मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचालकांना शिस्त लागावी, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावेच, या हेतूने वाहतूक शाखेच्या वतीने 'हेल्मेट ड्राइव्ह' मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसह हेल्मेट न वापरणाऱ्या सर्व वाहनचालकांवर आता दररोज कारवाई होणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरक्षेसाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे. वाहतूक सुरक्षा ही वाहनधारकांच्याच हितासाठी आहे. मात्र, वाहनचालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. म्हणून वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका उचलण्यास सुरुवात केली आहे. शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी गंगापूररोड, कॉलेजरोड यासह शहरातील विविध भागात नाकाबंदी करण्यात आली. वाहतूक शाखेच्या प्रत्येक युनिटच्या हद्दीत रोज नाकाबंदी केली जाणार आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांच्या कारवाईची ठिकाणे ठरलेली असतात. त्यामुळे हेल्मेट न वापरणारे वाहनचालक त्या रस्त्यावरून जाणे टाळतात. पळवाट शोधणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईचा बगडा उगारला जावा. म्हणून, 'हेम्लेट ड्राइव्ह'च्या कारवाईसाठी पॉईंट ठरविण्यात आलेले नाही. दररोज हद्दीतील कोणत्याही ठिकाणी वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे यांनी सांगितले की, शहरातील विविध भागात वाहतूक सुरक्षेसाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन ते तीन दिवसांपूर्वीही हेम्लेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक सुरक्षेसाठी वाहनचालकांना शिस्त लागेपर्यंत रोजच नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. वाहतूक शाखेच्या सर्व युनिटला नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

...तर थेट टोईंग

वाहतूक शाखेच्या कारवाई दंड भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत असेल तर त्याचे वाहन थेट टोईंग केले जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा कोणताही वाहनचालक दंडात्मक कारवाईतून सुटता कामा नये. म्हणून, दंड भरण्यास तयार नसणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्यांची दुचाकी थेट टोईंग केली जात आहे. त्यानंतर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन हेल्मेट न वापरल्याचा दंड आणि टोईंग फी वाहनचालकांना भरावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Tukaram Mundhe: मुंढेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव बारगळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी । नाशिक

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्य दरात ५० टक्के कपात केल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. मुख्यमंत्र्यानी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले असून उद्या होणाऱ्या महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेतला जाईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे. अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यानी स्थानिक भाजप नेत्यांना तोंडघशी पाडल्याची चर्चा आहे.

मुंढेंनी नाशिककरांवर भरमसाठ करवाढ केल्यामुळे भाजपच्या वतीने येत्या १ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर मुंढेंनी मुख्यमंत्र्याना भेटून करवाढीत ५० टक्के कपात केली. परंतु तरीही स्थानिक नेते अविश्वास प्रस्तावावर ठाम होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीच यात हस्तक्षेप करत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांमार्फत स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळं भाजप पदाधिकाऱ्यांचा नाइलाज झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Tukaram Mundhe: नो गुंडे, ओन्ली मुंढे... नाशिककर रस्त्यावर

$
0
0

नाशिक:

सत्ताधारी भाजपनं अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून कोंडीत पकडलेल्या तुकाराम मुंढे यांना नाशिककरांकडून मात्र जोरदार पाठिंबा मिळतो आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात आला. 'नो गुंडे, ओन्ली मुंढे' अशा आशयाचे फलक झळकावत लोकांनी मुंढे यांना पाठिंबा दर्शवला. तसंच, जोरदार घोषणाबाजीही केली.

करवाढीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपनं मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी केली होती. मात्र, मुंढे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिककरांनी आज 'वॉक फॉर कमिशनर'चं आयोजन केलं होतं. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येनं नागरिक आज रस्त्यावर उतरले. वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेत नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या दिशेनं मोर्चा काढला. 'नाशिककरांचा विजय होणारच...' अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरही मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मोर्चेकऱ्यांना भेटण्यासाठी मुंढे स्वत: प्रवेशद्वारावर आले. पाठिंब्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. 'आपल्याला पारदर्शक कामं करायची आहेत. तुमच्या सर्वांच्या साथीनं नाशिकचा विकास होणारच आहे. आपण सर्वांनी मिळून नियमांनुसार कामं करायची आहेत,' असं ते यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत चौफुल्यांवर अपघातांना मिळतेय आमंत्रण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील बहुतांश चौफुल्या अपघातांचे केंद्र बनल्या आहेत. बहुसंख्य चौफुल्यांवर रोजच अपघात होत असल्याने महापालिका व वाहतूक पोलिसांनी पाहणी करून किमान गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी कामगारांसह अन्य वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

एमआयडीसीतील चौफुल्यांवर सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी सायंकाळी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. सातपूर एमआयडीसीत कार्बन नाका येथे रोजच सायंकाळी कोंडी होत असते. त्यातच महापालिका व एमआयडीसीच्या वादात साइडपट्या अडकल्याने असल्याने त्यांच्या दुरुस्तीकडे दोन्ही विभाग लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कार्बन नाका चौफुलीवरील अपघातात काहींना प्राण गमवावे लागले आहेत. अंबड एमआयडीसीतदेखील अंबड गावाकडे जाणाऱ्या व डीजीपीनगर-२ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. या ठिकाणच्या वळणावर रोजच अपघात होत आहेत. अशा चौफुल्यांवर कायमच अपघात होत असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीत असलेल्या चौफुल्यांच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. महापालिका, एमआय़डीसी व वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करीत गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, जेणेकरून अपघातांवर नियंत्रण मिळू शकेल.

-योगेश महाजन, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदरसे विकासासाठी प्रस्ताव सादर करा

$
0
0

आमदार फरांदे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मदरशांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी आमदार फरांदे यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, शहर-ए-खतिब हाफिस हिसामुद्दीन खतिब, मौलाना शमशौद्दीन, सलीम पटेल, मीर मुख्तार अशरफी, हाजी नियाज शेख आदी उपस्थित होते. यावेळी फरांदे म्हणाल्या, की नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सरकार राबवित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव येणे आवश्यक असून ते प्राप्त होत नसल्याने मदरशांच्या विकासाला अडचणी येत आहेत. ज्या मदरशांनी वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेली नाही अशा मदरशांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

दोन लाखापर्यंत अनुदान

मदरसे इमारतीच्या नुतनीकरण व डागडुजी, शुद्ध पाणी, प्रसाधन गृह, प्रयोगशाळा, इनर्व्हर्टर यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजन कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तावडेंकडे बैठक घ्या

वक्फ बोर्डावर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसून संचालक मंडळही बरखास्त झाले आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे मंजुरीच्या प्रतिक्षेत असून वक्फ बोर्डासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बैठक घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी मौलाना शमशौद्दीन यांनी केली. पुढील महिन्यात ही बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन फरांदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोकड पळविणारे दोघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाइनशॉपीमध्ये येऊन गल्ल्यातील रोकड बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक चंद्रकांत कसबे (रा. चिंचोली, ता. जि. नाशिक) आणि अजय निवृत्ती दोंदे (रा. उपनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चिंटू सामदेव सिंग (रा. शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अंबड एमआयडीसीत परकेज नावाचे वाइन शॉप आहे. सिंग बुधवारी (दि. २९)सायंकाळी दुकानात एकटे बसलेले असतांना ही घटना घडली. परिचित असलेले संशयित थेट दुकानात आले. त्यांनी दमदाटी करीत गल्ल्यातील सुमारे साडे चार हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याबाबत सिंग यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

उपचारादरम्यान जखमी युवतीचा मृत्यू

केमिकलयुक्त प्लास्टिकचा ड्रम कापताना लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. युवती गेल्या शुक्रवारी (दि. २४) रात्री सातपूर एमआयडीसीतील शिवाजीनगर जखमी झाली होती. यात तिची आई व भाऊ देखील भाजला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

प्रतिक्षा गंगेश्वर पांडे (१६, रा. हाजी चिकन सेंटर जवळ, कार्बननाका) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पांडे कुटुंबीयांनी घरगुती वापरासाठी एमआयडीसीतून प्लास्टिकचा ड्रम खरेदी केला होता. हा ड्रम चाकू गरम करून कापताना दुर्घटना घडली होती. केमिकलयुक्त ड्रममध्ये तापलेला चाकू पडला आणि अचानक आगीचा भडका उडाला होता. यात प्रतिक्षासह तिचा भाऊ आणि आई गंभीर भाजली. तिघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठवडाभरापासून मृत्युशी झुंज देणाऱ्या प्रतिक्षाचा मृत्यू झाला असून दोघा मायलेकांचीही परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

जुगार खेळविणाऱ्या तीन जणांना अटक

जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.

बाळू यमाजी मनकुनाईक (रा. सुंदरनगर, देवळालीगाव), कैलास छगन दोडके (रा. विराट संकुल, अंबड लिंकरोड) आणि नासीर मेहबूब पठाण (रा. खडकाळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते उघड्यावर जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याने पोलिसांची कारवाई केली. वास्को चौकातील सार्वजनिक शौचालय भागात एक व्यक्ती नागरिकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, बुधवारी (दि. २९) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता बाळू मनकुनाईक हा स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून अंक आकड्यावर पैसे घेऊन जुगार खेळवितांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ४१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्र्यंबकरोड परिसरात गुरुवारी (दि. ३०) दुसरा छापा टाकण्यात आला. इएसआय हॉस्पिटल मागे पोलिसांनी छापा टाकला असता कैलास दोडके हा जुगार खेळवितांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी नासीर पठाण हा पोलिसांच्या हाती लागला आहे. तो अन्य साथीदारासमवेत जॉगिंग ट्रॅकवरील नीलगिरीच्या झाडाखाली मटका खेळवित होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याचा साथीदार फरार झाला. संशयितांच्या ताब्यातून ९४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

व्हिडीओ पार्लरवर छापा

भद्रकाली परिसरातील व्हिडीओ गल्लीत पोलिसांनी छापा मारून अश्लिल चलचित्र दाखविणाऱ्या एका व्हिडीओचालकास अटक करून त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ गल्लीतील साईराज व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लिल चित्रपट दाखविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ३०) दुपारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी व्हिडीओ हॉलमध्ये बेकायदेशीर अश्लिल चित्रपट सुरू होता. या प्रकरणी व्हिडीओचालक निहाल गुलाब सय्यद (रा. काझीगडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

..

नांदूरनाका भागात एकाची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूरनाका भागातील दिलीप शिवराम गायकवाड (४५ रा. गणपतनगर, कापसे गल्ली) यांनी गुरुवारी (दि. ३०) आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांनी खिशात चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार ठरवू नये, असे नमूद केले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.

शेतमजुराने घेतला गळफास

मनमाड : नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील ५० वर्षीय शेतमजुराने शुक्रवारी (दि. ३०) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भास्कर निंभोरे असे त्याचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून दारुच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदुरे फेोटो

रविवारी ‘अर्थ’पूर्ण कार्यक्रमाची मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील एकता रिटेल किरणा मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे जळगावकरांसाठी रविवारी (दि.२) 'अर्थपूर्ण' कार्यक्रमाचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे. यात आर्थिक नियोजनासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. एकता रिटेल किराणा पतसंस्थेतर्फे २ सप्टेंबर रोजी 'अर्थपूर्ण' कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी दुपारी ३.३० ते ६ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. आनंदी आणि समाधानी आयुष्याचे गुपित उलगडणारा कार्यक्रम कुटुंबासह अनुभव घेण्यासारखा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. आपल्याला आर्थिक नियोजनात उत्तम करण्यासाठी 'गुंतवणुकीची बाराखडी' व स्वतःसाठी कधी? या दोन विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 'लव्ह यू जिंदगी' या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते मनोज गोविंदवार हे संवाद साधणार आहेत.

प्रथम येणाऱ्याला प्राधान्य

जळगावकरांसाठी असलेल्या या कार्यक्रमाला मोजक्या २७० प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडिया व उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनिर्वाचित ११ सदस्यांवर अपात्रातेची टांगती तलावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका निवडणुकीत राखीव २९ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, ११ नगरसेवकांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही. येत्या सहा महिन्याच्या मुदतीत सादर न केल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेत १९ प्रभागातील ७५ जागांसाठी निवडणूक झाली. २९ जागा राखीव होत्या. राखीव उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे, बंधनकारक असते. त्यासाठी सहा महिन्यांची मुदतदेखील घेण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी नवनियुक्त नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचा आढावा घेतला. राखीव २९ नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

भाजपच्या राखीव २२ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, ८ नगरसेवकांनी सादर केलेले नाही. शिवसेनेच्या राखीव ५ नगरसेवकांपैकी ३ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, २ नगरसेवकांनी सादर केलेले नाही. तसेच १ अपक्ष उमेदवार असे एकूण ११ नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते सहा महिन्याच्या मुदतीत नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

निवडणूक खर्च; अखेरचे दोन दिवस

प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी २ सप्टेंबर मुदत दिली आहे. ३७ उमेदवारांनी निकालापर्यंत खर्च सादर केले नाही. ४६ उमेदवारांनी शपथ पत्र सादर केले नाही. तसेच ७७ उमेदवारांनी निधी व तपशिल सादर केलेले नाही. दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तीन बातम्या एकत्र

$
0
0

धुळे, नंदुरबार जि. प. आरक्षण जैसे थे

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या गण आणि गट आरक्षण आणि त्याची रचना हे अन्यायकारक असल्याच्या मुद्यांवर करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. मंगेश पाटील यांनी 'जैसे थे'चा आदेश दिला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोंडू भदाणे आणि प्रभाकर बाधा पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात गट आणि गण आरक्षण हे अन्यायकारक असल्याने ते रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीचे घटनात्मक आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे निर्देश दिले होते. राज्य शासनाचे या संदर्भात काही कायदे असतील तर त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभाही देण्यात आली होती. धुळे जिल्हा परिषदेसाठीचे सध्याचे आरक्षण हे ७३ टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे ५६ जागांपैकी ४१ जागा या आरक्षित होतात.

नागपूर खंडपीठासमोर वाशीम आणि अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणूक आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत राज्य शासनाने, या संदर्भात कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने म्हणणे मांडण्याकरिता वेळ मागून घेतला. त्यावर खंडपीठाने 'जैसे थे'चे आदेश दिले होते. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य शासनाकडे विचारणा केली असता, त्यांनी नागपूर खंडपीठापुढे मांडलेले म्हणणेच मांडले. यावर खंडपीठाने धुळे आणि नंदुरबार येथील गट आणि गण आरक्षणाबाबत जैसे थेचे आदेश दिले. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे वकील प्रवीण एम. शहा, राज्य निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके तर राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.या याचिकेची सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.

000

ऑक्टोबरमध्ये धुळ्यात आचारसंहिता!

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अजून वाजलेला नाही. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध मंजुऱ्या मिळवून घेण्यासाठी सध्या महापालिकेत नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मंजूर झालेली विकासकामे अदयाप पूर्ण झालेली नाहीत. पूर्वीची विकासकामे पूर्ण करा आणि मग नवीन कामांना सुरुवात करा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतदेखील काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीनंतर एकीकडे इच्छुकांनी आपल्या प्रभागात कामाला सुरवात केली आहे, तर दुसरीकडे नगरसेवकांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

0000

रांगोळी काढून खड्ड्यांचे पूजन

धुळ्यात शिवसेनेचे अनोखे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा,धुळे

शहरातील ८० फुटी रोडची गेल्या काही दिवसांपासून दूरवस्था झाली आहे. तसेच या ठिकाणी गटारीच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजलेला नाही. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांतच पूजन करून मनपा प्रशासनाचा निषेध केला. विशेष म्हणजे हा रास्ता खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाजवळील आहे.

खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी रांगोळी काढून पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या भागात खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या भागातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर शहरातील अन्य रस्त्याची काय दुर्दशा असेल असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. धुळे शहरातील विविध भागांत रस्त्यांची प्रचंड दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या ८० फुटी रोड भागात गटारीच्या कामासाठी एक खड्डा खोदण्यात आला आहे. हा खड्डा धोकादायक असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या बसेस जात असतात. तसेच ज्या कामासाठी हा खड्डा खोदण्यात आला आहे. ते काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव पान एक तापमान

सोशल कनेक्ट

$
0
0

नाशिककरांनी अनुभवली

अरणची 'नारळ हंडी'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोविंदा पथकांना दहीहंडीचे वेध लागले असताना सोलापुरात आगळीवेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली. सोलापुरातल्या अरण गावात अनोखी नारळ हंडी फोडण्यात आली. पांडुरंगाची पालखी अरणमध्ये आल्यानंतर नारळ हंडीचा सोहळा रंगला. या वेळी नाशिककरांनी ही दहिहंडी अनुभवली.

एका मोठ्या दोरीला उंचावर शेकडो नारळ बांधले जातात आणि मग ती दोरी हलवली जाते. या वेळी पडणारे नारळ घेण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागते. नाशिकमधील हजारो भाविक दरवर्षी हा सोहळा अनुभवतात. अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला असून, ते कधीही पंढरीला गेले नाहीत. त्यांच्या भेटीसाठी देवच अरण येथे येत असल्याची परंपरा आजही पाळली जाते. आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत देवाला भेटायला पंढरीला येतात, तर वद्य पक्षात देव सावता महाराजांना भेटायला अरण येथे जातात.

आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधीदिन, तर अमावास्या हा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी पंढरपूरवरून निघालेली देवाची पालखी अरण येथे येत असून, पालखीचे स्वागत नाशिकचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती खैरे, माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोद, कृषी उपविभागीय अधिकारी रमेश शिंदे, सचिन दप्तरे, पंढरी खैरे, जिजाबाई गिते आदी उपस्थित होते.

नाशिककरांचे आणि अरणचे सामाजिक बांधिलकीचे नाते आहे. नाशिकमधील माळी समाजातील पांडुरंग गायकवाड, शंकराव जेजूरकर, बाबूराव जेजूरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती खैरे यांनी १९८८ मध्ये समाजातील दानशूर व्यक्तींकडून देणगीरूपाने लाखो रुपयांचा निधी उभारून अरण येथे सभामंडप उभारला व देणगीदारांची 'सोन्यासारखी माणसे' ही स्मरणिका प्रकाशित केली. त्यावेळपासून जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते नित्यनेमाने संत सावता महाराज पुण्यातिथीच्या निमित्ताने अरण समाधिस्थळाला भेट देत असतात. नाशिककरांनी नुकतीच अरणला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाम, नाईंटी आणि बरंच काही

$
0
0

राजेंद्र मलोसे - छेद

महारुबाबा जाधव नेहमीच माझ्याकडे येतात. वय वर्षे पंचाहत्तर, रापलेला गोरा रंग, पायजमा, सदरा, डोक्यावर पांढरी टोपी. तोंडात नेहमीच काहीतरी पदार्थ म्हणजे सुपारीचं खांड, पान, तंबाखू किंवा आताआताशी गुटखा. व्यवसाय बाजार करण्याचा. म्हणजे आठवडे बाजारात किराणा दुकान लावणे. आज चांदवड, तर उद्या उमराणे, परवा देवळा, तर तेरवा कळवण. मग एक दिवस नाशिकला जाऊन खरेदी. दोन दिवस आराम. तेजतर्रार स्वभाव आणि करारी नजर. बायकोची फार काळजी.

'कायमची आजारी ऱ्हाती हो'

'घरात लागंल ती वस्तू हाय, पण हिला काही जिरतच नाही'

'आपलं बगा, कसं मस्त काम हाय! रोज रात्री नाईंटी (९०) मारायची, जेवायचं, झोपायचं. सकाळी उठून कामाला लागायचं. येव्हढे बाजार करतो पन नखात दुखणं नाही. पह्यले तर बैलगाडीनं बाजार करायचो. तवा उमराण्याला मुक्काम. हातानेच भाकरी थापायच्या. कुटंबी जेवायचं, कुटंबी पानी प्यायचं. जुपली सकाळी बैलगाडी की चालले पुढे देवळ्याला. चौथ्या दिवशी कळवण आन मग पाचव्या दिशी चांदवडला मुक्कामी. लई तरास काढला. आन आत्ताचे पोट्टे मोटरसायकली हानत्या आन सिक्स्टीमध्ये आऊट होत्या.'

'महारुबाबा, तुम्हाला ही नाईंटी आणून कोण देतं?'

'आमचे जावई लई भारी मानूस! मिल्ट्रीत हायेत. आले की दोन खंबे घेवूनच येत्या. पन आपला नियम कडक नाईंटी मारायची पुढं थेंब नाही. ती संपली की पोरालाच सांगतो. घेवून ये रे तो बी आनतो. माह्यावाला पोरगा बी लई चांगला समदं ऐकतो माह्यावालं. मस्त चाललंय बगा. फक्त बायकूची त्येवढी काळजी. काही जिरतच नाही हो तिला लगेच डब्याला पळती. तिला बगा, दोन चार सलाईनी लावूनच टाका.'

********

एक दिवस आले.

'दादा, खांडकं खात्या का?'

'कधी कधी'

'आणू वले डबा, त्याच्याबरोबर नाईंटी पन आनून देतो. चांगला मिल्ट्रीचा माल हाये.'

'महारुबाबा, मी पीत नाही.'

'म्हनून तर अशे वाळकुटे ऱ्हायले तुम्ही आन चेहराबी नेहमी पडेल!' त्यांनी माझ्या अंगावर गुटख्याचे तुषार उडवले. ते उडाले हे त्यांनाही कळलं.

'सॉरी मागतो दादा, ते उडालं बगा' ते बाहेर जाऊन पिचकारी मारून आले.

'कोण आजारी पडलंय?' मी आपला चौकशी केल्यासारखा.

'बायकूच हो. तिचं पोट बिघडलं. आता बगा, सून म्हनली, लई चांगले मेथीचे लाडू करत्या तुम्ही आत्याबाई. तुम्हीच करा वले. ही बसली की बया लाडू वळाया. पाचपन्नास, शंभर लाडू वळून टाकले. आता केलेच स्वतःचे स्वतः, तर चवीला म्हनून एक अर्धा खाल्ला असेल. रातीपासून पोट दुखू ऱ्हायलं चालली डब्याला हे घ्या, तुम्हाला वानोळा आनला बघा लाडवाचा, चांगल्या तुपातले हायती. याला त्याला देऊ नका. रोज अर्धा, अर्धा तरी खा. संपले की सांगा वले. परत देतो. आता तुम्हाला तर म्हनलं, नाईंटी आनतो, तर तुम्ही'

'बरं, बरं, महारुबाबा, बघतो त्यांना मी.'

*********

काही दिवसांनी आले.

'दादा, लई आग होऊन राहिली हो पायाची. पहिल्यांदा असं वाटू ऱ्हायलं की सुई मारावी.'

मी तपासलं. मला वाटलं की हा न्युरिटीस आहे. मज्जातंतूदाह. त्यांना औषधे लिहून दिली.

'महारुबाबा, उद्या परत या. काही तपासण्या करून घेऊ.'

'मला काही रोग नाही. एक सुई मारा वले. बरं वाटाया पाहिजे. उद्या बाजार आहे.' दुसऱ्या दिवशी त्यांना मुलांनी धरूनच आणलं. महारुबाबा चांगले जोरात रडत गागत होते.

'लई आग होऊ ऱ्हायली दादा. लई आग पेटली.'

'आता होणार नाही तर काय सर? ह्या म्हाताऱ्याने आग होत होती पायांची म्हणून तिथे बाम लावला. त्यानंही थांबेना म्हणून त्या बामवर व्हिस्की ओतली. आता बघा भाजून हे फोड फोड आले' त्यांचा मुलगा चिरडून बोलला.

पायजमा वर करून बघितलं तर दोन्ही पाय बाम आणि व्हिस्कीने चांगलेच जळाले होते. बामवर व्हिस्की टाकल्यावर अजून काय होणार?

'महारुबाबा, हे काय करून घेतलं? त्याच्यावर बाम कशाला लावला? लावला तर लावला, वरून व्हिस्की कशाला ओतली?'

'माझा आपला समज हो दादा, काहीही झालं तरी नाईंटीनं बरं होतं'

'नशीब त्याच्यावर काडी नाही ओढली, नाही तर सगळ पेटलं असतं' पोरगा वैतागून म्हणाला.

महारुबाबाची नाडी जलद आणि क्षीण होत चाललेली. श्वास वाढू लागला. ते शॉकमध्ये गेले.

आता या नाईंटीमुळे महारुबाबांचं काय होईल?

पाय बरा होईल की?

(लेखक सुप्रसिध्द साहित्यिक आहेत.)

प्रतिक्रियेसाठी nashik.letters@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅटर्डे क्लबतर्फे आज राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय 'उद्योगकुंभ २०१८' चे शनिवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन, मुंबई आग्रा रोड येथे आयोजन करण्यात आले आहे.

'उद्योगकुंभ' मध्ये सहभागी होणाऱ्या राज्यभरातील नामवंत आणि यशस्वी उद्योजकांकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यात उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर सर्व माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे आठशे उद्योजक हजेरी लावणार आहेत.

परिषदेसाठी राज्यमंत्री सुरेश हावरे, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आयटी तज्ज्ञ तथा लेखक अच्युत गोडबोले, प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार, आंतरराष्ट्रीय सौंदर्यतज्ज्ञ रेखा चौधरी, मेक इंडिया उपक्रमातील राज्य सरकारचे भागीदार कॅप्टन अमोल यादव, उद्योजक सनराईज मोल्डचे संस्थापक भावेश भाटिया हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन

क्लाउड सर्व्हिसेसचे पियुष सोमाणी, ऑईल आणि एनर्जी तज्ज्ञ सुधीर मुतालिक, करार पद्धतीने कुक्कुटपालन निर्माते श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्योगवाढ सल्लागार श्रीरंग तांबे, विक्रांत पोतनीस, आर्थिक सल्लागार पॅनल बाळकृष्ण चांडक आदी मान्यवर मागदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरित डोंगर’ अंतर्गत एक लाख बीजारोपण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराजवळील डोंगर, टेकड्या, गड, किल्ले हिरवे झाल्यास शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, सिमेंटच्या जंगलात शहरात हिरवाई टिकून राहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी हरित डोंगर हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे हे विसावे वर्ष आहे. गेल्या वीस वर्षांत संस्थेने नाशिकजवळील डोंगर, टेकड्या, घाट, गडकोट आदी परिसरात दहा लाखांपेक्षा अधिक बियांचे रोपण केले आहे.

उन्हाळ्यात रानमेवा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया गोळा केल्या जातात. आंब्याची कोय, जांभूळ, चाफा, आवळा, चिंच, बहावा, चंदन, रामफळ, फणस, बदाम, हरडा, बेहडा, निंब, सावर, साग, शिसम, बकुळ आदींसह वीस जातीच्या देशी वृक्षांच्या बिया गोळा करण्यात आल्या होत्या. नाशिकचे डॉ. विजया सुळे यांनी तीस हजार बिया दिल्या, तसेच ज्येष्ठ नागरिक पोपटराव रावते यांनीदेखील विविध जातीच्या वृक्षांच्या बिया आणून दिल्या, तसेच नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात रानमेवा आणून दिल्याने हा उपक्रम यशस्वी करता आला. गेल्या तीन महिन्यांत हरसूल घाट, रामशेज, रतनगड, कळसूबाई, मुल्हेर, रावळ्या, पिसोळगड, वाघेरा, त्रंबक, पांडवलेणी, चामरलेणी, कसारा, पेठमधील घाट, खरपडी घाट आदी भागांत बियांचे रोपण करण्यात आले. त्र्यंबकजवळील कळमुस्टे घाटात विविध महाविद्यालयातील शंभर मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेत एक लाख बियांचे रोपण करण्यात आले. येथील घाटामध्ये नेचर वॉक काढून संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी फुलपाखरे, वनफुले, कीटक, पक्षी आदींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, आशिष बनकर, आकाश जाधव, दर्शन घुगे, रोषण पेलमहाले, मंगेश कापसे, अपूर्व नेरकर, नितेश पिंगळे, प्रेम क्षत्रिय, अश्विनी वाकरे, कांचन कापसे, प्राची पाखळे, गौरी पाटील, मोनिका पालवे, रविना दळवी, ज्योती कोरी, वैष्णवी सांगळे, निकिता सहाणे, मनीष ओटे, प्रज्वल डहाळे, मुकुल बाविस्कर, गणेश भामरे, हेमंत सोनवणे, भैरव गाजरे, स्वप्नील सूर्यवंशी, अतिश राजपूत आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पट्टा व इतर सिंगल

$
0
0

शेतमजुराची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील ५० वर्षीय शेत मजुराने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भास्कर निंभोरे असे त्याचे नाव असून, कौटुंबिक कलहातून दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

000

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मेंढी शिवारात भास्कर गिते यांच्या वस्तीवर शुक्रवारी (दि. ३१) पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना घडली. परिसरात बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी घराबाहेर पडण्यास धजावत नाही. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

भास्कर विठोबा गिते यांचे कुटुंब गुरुवारी रात्री झोपले असताना त्यांच्या वस्तीवर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने हे कालवड शेतात फरफटत नेले. जनावरांच्या हंबरण्याच्या आवाजाने भास्कर गिते व त्यांच्या घरातील नागरिक बाहेर आले असता तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मेंढी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐश्वर्या गोवर्धनेला पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने दिला जाणारा क्रीडाक्षेत्रातील मानाचा सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नाशिकमधील केटीएचएम कॉलेजची विद्यार्थी राष्ट्रीय रोलबॉल खेळाडू ऐश्वर्या महेश गोवर्धने हिला प्रदान करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील कराड येथे वेणूताई चव्हाण स्मारकात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, राष्ट्रीय क्रीडा अधिवेशनाचे सभापती डॉ. डी आर. जाधव, जिल्हा समादेशक पै. अमोल साठे, कराड शहराच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल देण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images