म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प येथील प्रमुख मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून परिसरातील मोकाट जनावरे थेट रस्त्यावरच ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. देवळालीतील विविध मैदानांवर चारा सहज उपलब्ध होतो, त्यामुळे असंख्य जनावरे चाऱ्याच्या आशेने देवळालीकडे येतात आणि देवळालीच्या रेस्ट कॅम्परोड, संसरी नाका, आनंदरोड आदी रस्त्यांवरच ठिय्या मांडतात. अनेकदा त्यांच्यावर वाहनचालक आदळत असल्याने जनावरांना तर इजा होतेच, मात्र वाहनचालकही जखमी होत आहेत. शिवाय आठवडेबाजाराच्या दिवशी ही जनावरे शेतकरी व बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या हातातील पिशव्या ओढत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट कार्यालयात चौकशी केली असता संबंधित जनावरांचे मालक येऊन दंड भरून ती पुन्हा चरण्यासाठी रस्त्यावर सोडून देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कारवाई नियमित हवी मोकाट जनावरांनी परिसरात उच्छाद मांडला असून, कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने अशी मोकाट जनावरे पकडून पुन्हा कोंडवाड्यात घेऊन जाण्याबाबत निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्याप्रमाणे कारवाई सुरू केली. मात्र, कारवाई होत असताना पुन्हा ही जनावरे रस्त्यावर कशी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून, नियमित कारवाई करण्याचा आग्रह नागरिक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकप्रतिनिधींसह कार्यालयाकडे करीत आहेत. ०००००००००००००००००००००००००००००० आयुक्तालय रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी --- डांबरीकरणाऐवजी माती टाकून बुजविले खड्डे --- म. टा. वृत्तसेवा, जेलरोड पाच जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाकडे जाणारा रस्ता जागोजागी खराब झालेला असून, या रस्त्यावर माती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे. महसूल कार्यालयासह फॅमिली कोर्ट, शिक्षण उपसंचालक, अन्नपुरवठा, कृषी, माहिती व जनसंपर्क आदी कार्यालये आणि प्रेसदेखील या रस्त्यावरच आहे. त्यामुळे त्यावर कायमच वर्दळ असते. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यापासून महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. जेलरोड, गोरेवाडीकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्याचे नूतनीकरण नाही, तर किमान डांबरीकरण करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न करता प्रशासनाने या रस्त्यावरचे खड्डे माती टाकून बुजविले. जोरदार पाऊस आल्यावर हे खड्डे पुन्हा उघडे पडणार आहेत. त्यामुळे डांबर व खडी टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि पावसाळा संपल्यावर रस्ता नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. ०००००००००००००००००००००००००००००००००००० वीजचोरांविरोधात महावितरणची मोहीम म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरण शनिवार (दि. १ सप्टेंबर)पासून विशेष मोहीम हाती घेणार आहे. अशा प्रकारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांबरोबरच रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महावितरणतर्फे वीजचोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वीजचोरी रोखण्यासाठी यापूर्वीही राज्यभर विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु, अलीकडच्या काही वर्षांत रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मुंबईत बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीजचोरी करणारे ग्राहक, तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते, तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते, असे आवाहनही करण्यात आले आहे. (सिंगल)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट