विजयाची आनंद अन् पराभवाची सल
इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन गेममध्ये कबड्डीत इराणच्या मुलींच्या संघाने भारतीय मुलींच्या संघाला हरवून सुवर्णपदक पटकावले. इराणसारख्या संघाला कबड्डी हा खेळ नवखा असला तरीही या विजयामागे नाशिकच्या शैलजा जैन यांचा मोलाचा वाटा होता. त्या या संघाच्या प्रशिक्षिका आहेत. इराणच्या संघाला प्रशिक्षण देताना त्यांचा काय अनुभव होता त्यांच्याशी केलेली बातचीत...
इराणमध्ये प्रशिक्षकपदी जाण्याचा निर्णय कसा झाला
महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी म्हणून मी नोकरी करीत होते. पूर्वीपासूनच कबड्डी माझा आवडता खेळ. क्रीडा अधिकारी असताना शहरातील शिवाजी स्टेडियम, यशवंत व्यायाम शाळा, गर्ल्स हायस्कूल, पुष्पावती कन्या शाळा, रचना विद्यालय येथे मी प्रशिक्षक म्हणून काम केले. दिल्ली येथे २००८ मध्ये इराणमधील मुलींच्या कबड्डी संघाच्यासाठी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती झाल्या ती मी दिली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. माझ्या निवृतीनंतरचा वेळ मला कबड्डीच्या कोचिंगसाठी द्यायचा होता, मला एखाद्या शाळेने कोचिंगसाठी बोलावले असते तरी मी गेले असते. सुदैवाने मला इराणकडून बोलावणे आले. क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना हो सांगितले. जाताना एकच अट होती माझ्या कामात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही. ते त्यांनी मान्य केले. तेथील फेडरेशनने मला मोकळीक दिली आणि मग मी कामाला सुरुवात केली. २०१७ च्या जानेवारी मध्ये मी इराणला गेले.
प्रशिक्षणचे शेड्युल्ड कसे होते
इराणला गेल्यानंतर दीड वर्षांत तुमची टीम तयार करुन देईन असे सांगितले. त्यासाठी ८ महिने मी तीथे वास्तव्य करून होते. या काळात भाषेची, जेवणाची अडचण होती. त्यांचे काही शब्द समजायचे, काही समजत नव्हते हातवारे करुनच कम्युनिकेशन करावे लागत होते. काही कालावधीनंतर मी थोडीफार इराणी भाषा शिकले. या संघात एक मुलगी अतिशय अस्खलित हिंदी बोलायची, तिला विचारले तुला इतके चांगेल हिंदी कसे येते. ती म्हणाली, 'मी शहारुख खानचे चित्रपट पाहते.' तिच्या संवाद साधता येत असल्यामुळे भाषेचा प्रश्न मिटला होता. रोज सकाळी सात वाजता प्रशिक्षणाला सुरुवात व्हायची सकाळी ७ ते ८ फिटनेस, १० ते १२ कबड्डीचा सराव, १२ ते १ स्विमिंग संधायाकाळी पुन्हा ५ ते ७ कबड्डीचा सराव त्यानंतर विविध प्रकारचे मोटीव्हेशनल व्हिडीओ बघणे. सामन्यांचे शूट केलेले व्हिडीओ पाहून काय चुका होतायेत याचा अभ्यास करणे असा दिनक्रम होता. काही वेळा समुद्राच्या पाण्यात देखील सराव करून घेतला.
इतर देश कबड्डीत प्रगती करतायेत का?
कबड्डीत आपल्याला कुणी हरवू शकणार नाही असा भारतीय संघाचा समज होता, मात्र आता तो फोल ठरतोय. कोरिया, थायलंड, तैवान या देशानेही कबड्डीत प्रगती केली आहे. आपल्याकडे सामन्याच्या दोन महिने अगोदर तयारी केली जाते. इतर देशांमध्ये मात्र संपूर्ण वर्षभर तयारी होते. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचे फिजीकल फिटनेस ट्रेनर आहेत. इराणच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या मुलींकडे प्रचंड फिटनेस आहे. फक्त त्यांना टेक्निक समजावून सांगणे गरजेचे होते. ते मी प्रामुख्याने केले. इराणने मला ४५ मुली दिल्या होत्या. त्यातील १८ मुली या शेवटपर्यंत खेळविल्या.
भारतीय कबड्डी बद्दल काय सांगाल
आपल्याकडे एकंदरीतच सर्वच खेळांबद्दल अनास्था आहे. आपला सर्व भर हा शिक्षणावर आहे. खेळाला दुय्यम स्थान दिले जाते ते कुठे तरी हे बदलायला हवे, असे मला वाटते. प्रशिक्षकांनाही हवे तसे काम करू दिले जात नाही . त्याच्यावर दबाव असतो त्यामुळे रिझल्ट येऊ शकत नाही. बाहेर तुम्ही यश मिळवल्यानंतर आपल्या देशात आपण मोठे होतो. कबड्डीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकवेळ अशी येईल की बाहेरच्या देशाकडून तुम्हाला प्रशिक्षक बोलवावा लागेल. हॉकीसारखा खेळ आपण गमवून बसलोय. वेळीच सावध झालो नाही तर कबड्डी देखील आपल्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
शेवटी सामन्याच्या वेळी परिस्थिती कशी होती
भारतीय संघाची कमतरता काय आहे हे मला माहीत होते. त्या तुलनेत इराणचा संघ काय करू शकतो हे देखील माहीत होते. इराणी मुली या ब्लाइंड गेम खेळत होत्या. आदल्या दिवशी कोरीया, बांग्लादेश बरोबर सामना झाला तो जिंकला होता. त्यानंतर एक सामना हरला. हाच हरलेला सामना आम्हाला विजयाकडे घेऊन गेला. शेवटच्या वेळी कव्हर कुठे आहे, आपल्याला कोणत्या डावाने खेळायचे आहे. हे त्यांच्या मनावर बिंबवले. मेडल आपलेच आहे हे त्यांना ठासून सांगितले. ज्यावेळी विजय मिळाला त्यावेळी एकीकडे माझा संघ विजयी झाल्याचा आनंद होता तर मी ज्या देशातून आले त्या देशाला हार पत्करावी लागते याचे दु:ख मनात होते.