Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शंभर कोटीतून चकाकणार जळगावचे रस्ते

0
0

अभियंत्यांना कामांचे प्रस्ताव करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतंर्गत जळगाव महापालिकेला शहर विकासासाठी १०० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांची कामे केली जाणार असून, सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेसह शासनाकडे लवकरच याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, या निधीतून विकासकामांचा प्रकल्प अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश देखील मनपा प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बांधकाम विभाग, नगररचना विभाग विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून तत्काळ विकासकामांचा अहवाल सादर करण्याची सूचना दिली.

रस्त्यांच्या कामांना प्राधान्य

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते, गटारी, खुल्या जागांवर तारांचे संरक्षण आणि नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले जाणार आहे. तसेच मुख्य रस्त्यांची कामे फुटपाथसह तयार केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेचा ३० टक्के वाटा

महापालिकेला विकास कामांसाठी शासनाने नगरोथ्थान योजनेतून १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नगरोथ्थान निधीच्या नियमाप्रमाणे यात महापालिकेचा देखील ३० टक्के वाटा राहणार आहे. कामांचा मोबदला अदा करतांना पालिकेला हिस्स्याची रक्कम द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केरळ मदत फोटो

भूमिपूजनामुळे डॉ. भामरेंवर टीका

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. असे असतानाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी तालुक्यातील एका गावात रस्त्यांचे भूमिपूजन केल्याने त्यांच्यावर काँग्रेससह स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांच्याकडून टीका होत आहे. या कार्यक्रमामुळे डॉ. भामरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ज्या रस्त्याचे त्यांनी भूमिपूजन केले तो रस्ता धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मंजूर करून आणला आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. सगळे शासकीय कार्यक्रम, उद‌्घाटन रद्द झालेले असताना डॉ. भामरे यांनी केवळ राजकीय वर्चस्व साधण्यासाठी हे भूमिपूजन केले असल्याची चर्चा आता जिल्हाभरात सुरू आहे. डॉ. भामरे यांनी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या नगाव-धमाणे या रस्त्याचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार अनिल गोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर टीका केली. तशी पोस्टही सर्वत्र व्हायरलही झाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉ. भामरे यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे २१ ऑगस्ट रोजी हिरे भवन येथील तालुका काँग्रेसचा मेळावा तसेच मतदारसंघातील सावळीतांड्यासह इतर गावांचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार कुणाल पाटील यांनी रद्द केले. मात्र दुसरीकडे भाजपच्याच नेत्यांनी उद‌्घाटन सत्र सुरू केल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकही काढले आहे. त्यावर तालुक्यातील सुभाष बोरसे, रवींद्र बोरसे, मुरलीधर मोरे, सोपान मोरे, सुनील वाघ, सिंधुबाई शिरसाठ, वासुदेव बोरसे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजा मेहेरबान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संततधार पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून, मंगळवारी सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात २४७ मिलीमीटर तर सोमवारी सकाळपासून मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनापासून मेहेरबान झालेल्या पावसाने नाशिकककरांवर कृपावर्षाव सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पूर्व आणि उत्तर भागातील तालुक्यांमध्येही पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. चालू सप्ताहाच्या सुरूवातीपासून पावसाने शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३१३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये पेठमध्ये ५८, सुरगाण्यात ४५, इगतपुरीत ३५, दिंडोरीत २६ मिलीमीटर पाऊस झाला. अन्य सर्वच तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. पावसाचा हाच जोर दिवसभरही कायम राहिला. सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात २४७.४ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. यामध्ये इगतपुरीत सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेठमध्ये ३९, सुरगाण्यात २८, त्र्यंबकेश्वरमध्ये २१ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

बागलाण, चांदवडमध्ये तुरळक सरी

सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी काही तालुक्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. बागलाणमध्ये अवघ्या एक तर चांदवडमध्ये अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मालेगावात ३, दिंडोरीत ६, निफाडमध्ये ७.९, देवळ्यात ८ तर नांदगावात ९ मिमी पावसाची नोंद झाली. येवला आणि कळवणमध्ये प्रत्येकी १२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.

शहरात जनजीवन विस्कळीत

शहरातही पावसाने मुक्काम ठोकला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली असून, त्यामधून वाट काढणेही वाहनचालकांना मुश्किल होऊ लागले आहे. पावसामुळे बाजारपेठांमधील गर्दीदेखील ओसरली असून पथारीवाल्यांच्या व्यवसायावरही पाणी फिरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरवासियांना सूर्यदर्शनही होऊ शकलेले नाही. शहरात मंगळवारी दिवसभरात २२ मिलीमीटर पाऊस झाला.

नद्या वाहताहेत भरभरून

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे या धरण समूहातील गंगापूर आणि काश्यपी धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून २०८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर काश्यपीमधून ४२६ क्युसकने विसर्ग करण्यात येत होता. परंतु, दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने दुपारनंतर विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी दोन वाजता गंगापूरमधून २६०० क्युसकने विसर्ग सुरू होता. चार वाजता तो ३१२० क्युसेक करण्यात आला. सायंकाळी सहा नंतर ३६४० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठच्या रहिवाशांनी आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून त्यामुळे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता धरणातून ४१७२ क्युसकने विसर्ग सुरू होता. दुपारी तीन वाजता तो ५६४२ क्युसेक करण्यात आला. सायंकाळी पाचनंतर ७१७८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

धरण विसर्ग (क्युसेक)

चणकापूर ९२७६

दारणा ७१७८

ठेंगोडा ५७०३

गंगापूर ३६४०

करंजवण ३१००

हरणबारी १२२२

पुनद ८४७

काश्यपी ४२६

केळझर ३८८

तालुकानिहाय पाऊस (सकाळी आठ ते सायंकाळी पाच)

तालुका पाऊस (मिमी)

नाशिक २२.५

इगतपुरी ६२.०

त्र्यंबकेश्वर २१.०

दिंडोरी ६.०

पेठ ३९.०

निफाड ७.९

सिन्नर १४.०

चांदवड २.०

देवळा ८.०

येवला १२.०

नांदगाव ९.०

मालेगाव ३.०

बागलाण १.०

कळवण १२.०

सुरगाणा २८.०

एकूण २४७.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात - -

0
0

केंद्रीय राज्यमंत्री

सुभाष भामरेंचा दौरा

नाशिक : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी व शनिवारी (दि. २४ व २५ ऑगस्ट) रोजी मालेगांव येथील स्थानिक कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

रोजगार व उद्योजकता मेळावा

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार व स्वंयरोजगार उपलब्ध होण्यासाठी मंगळवारी (दि.२८ ऑगस्ट) रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा मेळावा होईल. यासाठी नामांकीत कंपन्या उपस्थित राहणार आहेत. स्वयंरोजगारसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या सरकारी विभागांचे स्टॉलही असतील. इच्छुक उमेदवारांनी रिझ्युम, फोटो, आधारकार्ड, सेवायोजनेच्या नोंदणीसह उपस्थित रहावे. तसेच ज्यांनी सेवायोजन नोंदणी केली नसेल त्यांनी www.mahaswayam.gov.in वेबसाइटवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

पुरस्काराचे अर्ज मागवले

नाशिक : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे माजी सैनिक, सैनिकांची पत्नी व पाल्य यांची विशेष गौरव पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. यासाठीचे अर्ज १५ सप्टेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करायचे आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२५७७२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक

कल्याण अधिकारी यांनी केले.

जानकर शुक्रवारी नाशिमध्ये

नाशिक : पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर शुक्रवारी (दि.२४ ऑगस्ट) रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल सुरेश प्लाझा, त्रिमूर्ती चौक येथे राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल महाजन हाजीर हो...

0
0

कामकाजात हलगर्जीपणा केल्याने लोकलेखा समितीचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन हे सेवानिवृत्तीमुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईतून सुटले असले तरी लोकलेखा समितीने घेतलेल्या आक्षेपामुळे त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा कायम आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार २०१० पासून शहराच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, कामामधील अनियमिततेप्रकरणी त्यांना २८ ऑगस्ट रोजी लोकलेखा समितीने हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.

महापालिकेत नगरसेवकांसह बिल्डरांच्या रडारवर असलेले अनिल महाजन आणि वाद हे ठरलेले होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच आयु्क्त मुंढे यांनी त्यांना झटका देत त्यांची खातेनिहाय चौकशी लावून त्यांना एक लाखाचा दंड केला होता. शासनाचा आदेश दीड वर्ष दडवून ठेवण्यासाठी अग्निशमन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या परवानग्यांतून अडवणूक करणे, प्रलंबित प्रकरणे आदी प्रकरणे महाजन या प्रकरणे महाजनांच्या अंगलट आली होती. गेल्या महिन्यात महाजन हे सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्यावरील आपत्ती टळली अशी चर्चा होती. परंतु महाजनांच्या कामातील अनियमितता प्रकरण थेट लोकलेखा समितीसमोर त्यांची साक्ष होणार आहे. लोकसंख्येचा विचार करता अग्निशमन केंद्रांची संख्या शहरात १२ असणे आवश्यक असताना सध्या केवळ सहा केंद्रे अस्तित्वात आहेत. त्यामुळे या कामात हलगर्जीपणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, तर आग सुरक्षा निधीच्या वसुलीतही त्यांनी हलगर्जीपणा केला आहे. शहरातील सहापैकी तीन अग्निशमन केंद्रांवर पाणी भरणारे आग नळ (फायर हायट्रन्ट) न बसविल्याने बंबांमध्ये पाणी लवकर भरले जात नाही. सदर बाब अग्निशमन विभागप्रमुख म्हणून लक्षात आणून देवूनही सन २०१० पासून त्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही. शहरातील ६८ पेट्रोल पंपांना बांधकाम करण्यापूर्वी अग्निशमन विभागाचा दाखला बंधनकारक असताना तरतूद केली नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आक्षेप घेण्यात आले असून, महाजनांना त्यासाठी हजर राहण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.

मॉल्स, मल्टिप्लेक्सकडे दुर्लक्ष

अग्निशमन विभागाकडून शहरातील मॉल्स, मल्टिप्लेक्‍स तसेच हॉस्पिटल्समधील सुरक्षेची तसेच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी होणे आवश्यक असते. परंतु, लोकलेखा समितीसमोर सादर झालेल्या कागदपत्रांवरून अशी तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समितीने महाजनांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. त्यांची नित्यनियमाने तपासणी केली नसल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

उत्राणे येथील घटना

- कर्ज मिळत नसल्याने उचचले पाऊल

- मराठा आरक्षण मिळत नसल्याचीही चिठ्ठीत खंत

..

म. टा. वृत्तसेवा, सटाणा.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या म्हसदी शाखेने उद्योग व्यवसायासाठी कर्ज नाकारल्याने उत्राणे (ता. बागलाण) गावातील प्रवीण कडू पगार (वय ३०) या युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्याग्रस्त प्रवीण हा अविवाहीत व दिव्यांग असल्याचे समजते.

मूळ उत्राणे येथील रहिवाशी असलेला व सध्या म्हसदी (ता. साक्री) येथे शेती घेऊन वास्तव्यास असलेला प्रवीण पगार हा गेल्या अनेक महिन्यांपासून नापिकीमुळे त्रस्त झाला होता. यामुळे काहीतरी उद्योग व्यवसाय करून आईला मदत करावी या भावनेतून म्हसदी येथील सेंट्रल बँक ऑप इंडिया शाखेकडे कर्जाची मागणी करीत होता. आपण दिव्यांग असून, आपणास कर्ज मिळावे, यासाठी त्याने बँकेकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. मात्र बँकेने त्याला वारंवार त्रस्त केले. आपण मराठा समाजाचे असल्या कारणाने बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याची खंत प्रवीणने चिठ्ठीत व्यक्त केली आहे. प्रवीणच्या आईच्या नावावर शेती असून, त्या अल्पभूधारक आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपण त्रस्त असल्याचे देखील प्रवीणने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

...

मंत्र्यांचेही दुर्लक्ष

कर्ज मिळत नसल्याची बाब प्रवीणने निवेदनाद्वारे सहकारमंत्री सुभाष देशमुख, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशनास आणून दिली होती. मात्र वरिष्ठांनी देखील दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सायंकाळी प्रवीण याने उत्राणे येथील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव-निधनवार्ता -डॉ.स्वरुपचंद ओसवाल( आवश्यक)

0
0

निधनवार्ता

0000

डॉ. स्वरुपचंद ओसवाल

जळगाव : येथील डॉ. स्वरुपचंद प्रेमराज ओसवाल यांचे मंगळवारी (दि. २१) गणपती हॉस्पिटल येथील राहत्या घरी संथारा व्रतात निधन झाले. सायंकाळी नेरीनाका येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. स्वरुपचंद ओसवाल मूळ शेंदुर्णी येथील रहिवासी होते. ते संदीप व डॉ. शितल ओसवाल यांचे वडील तसेच शांतीलाल व पोपटलाल ओसवाल यांचे मोठे बंधू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार तबला अकादमीतर्फे आज गुरुपौर्णिमा उत्सव

0
0

आज गुरुपौर्णिमा उत्सव

नाशिक : पवार तबला अकादमी आणि एस. एम. आर. के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयाचा संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव आज, बुधवार, दि. २२ ऑगस्ट रोजी संध्या ५ वाजता महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृह येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे आहेत. या उत्सवात पवार तबला अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी तबला सहवादन सदर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर पोलिसास अडीच वर्षांची शिक्षा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदारास जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत दोन वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

राजेंद्र यादवराव भामरे असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे. २०१० मध्ये वाडिवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये लाच घेताना भामरेला अॅण्टी करप्शन ब्यूरोने अटक केली होती. एसीबीकडे तक्रार देणाऱ्या संतोष नारायण किरवे (रा. शेणित, ता. इगतपुरी) यांनी त्यांच्या ओळखीतील रमेश जाधव यास एका ठिकाणी कामाला लावले होते. जाधव यास मद्याचे व्यसन असल्याने मालकाने त्यास कामावरून कमी केले. त्यामुळे संतापलेल्या रमेश जाधव याने तक्रारदार किरवे यास मारहाण केली, तसेच त्यांच्या आईलाही शिवीगाळ केली होती. हा वाद वाडिवऱ्हे पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचे काम हवालदार भामरेकडे होते. संशयित आरोपी रमेश जाधव याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किरवे यांनी केली. मात्र, कारवाई करण्यासाठी भामरेने किरवे यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. किरवे यांनी लागलीच एसीबीचे कार्यालय गाठून फिर्याद दिली. या तक्रारीनुसार, एसीबीच्या पथकाने १८ मे २०१० रोजी वाडिवऱ्हे पोलिस स्टेशन आवारात सापळा रचला होता. भामरेने विश्रांतिगृहात लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यास अटक केली. एसीबीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायधीश एस. सी. खटी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. कल्पक निंबाळकर यांनी काम पाहिले. साक्षीदार व इतर महत्त्वाचे पुरावे समोर आल्याने त्या आधारे कोर्टाने हवालदार भामरेला दोषी ठरवत दोन वर्षे सहा महिन्यांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकचा वापर अंगाशी...

0
0

प्लास्टिकचा वापर अंगाशी...

नाशिकरोड येथील महापालिका विभागीय कार्यालयाच्या पथकाकडून मंगळवारी सायंकाळी नाशिकरोडसह जेलरोड, लामरोड भागातील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यावरून, तसेच कचरा विलगीकरण न केल्याने २६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली. आठ किलोंहून अधिक प्लास्टिकही जप्त करण्यात आले. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, निरीक्षक विजय जाधव, व्यवस्थापक जनार्दन घंटे आदींनी ही कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे या पथकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलसह शेतकऱ्यांचीही मदत

0
0

केरळपूरग्रस्तांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून, महसूलमधील तब्बल १६०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देत दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हाभरातील तलाठ्यांनीही एक दिवसाचे वेतन देऊन या मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे.

महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे केरळमधील लाखो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून, जगभरातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महसूलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. केरळ मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधी नावाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आले असून, ६७३१९९४८२३२ या बँक खात्यावर नागरिकांनी यथाशक्ती मदत पाठवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. तिरुअनंतपुरम येथील शहर शाखेमध्ये हे बँक खाते असून, त्याचा आयएफसी कोड SBIN0070028 असा आहे. मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने एक लाखांची, तर मालेगाव मर्चंट जनकल्याण ट्रस्टने २५ हजार रूपयांची मदत केली आहे. नाशिक जिल्हा ओनियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केरळसाठी २० टन कांदा पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी अळ्या आढळल्यास दंड

0
0

डेंगी अळी आढळल्यास

पाचशे रुपयांचा दंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. डेंगी डासांच्या उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासंदर्भात महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही अनेक घरांमध्ये डेंगी डासांच्या अळ्या आढळत आहे. त्यामुळे डेंगी आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळतील अशा घरमालकांना पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. स्थायीच्या मान्यतेनंतर थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. घराच्या आतील भाग, घर परिसरातील पाणीसाठ्याची योग्य काळजी न घेणाऱ्या व त्यामध्ये डेंग्यू डासाची उत्पत्ती आढळल्यास अशा नागरिक व संस्थांना प्रती उत्पत्ती स्थानासाठी पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्या भवन’प्रश्नी कारवाईची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडी रस्त्यावरील महापालिकेची विद्या भवन ही अनधिकृत इमारत ताब्यात घेण्याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. मात्र, तशी कारवाई झालेली नसून, या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन दप्तरे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि मिळकत व परवाने उपायुक्त यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी विद्या भवन ही इमारत २८ जून २०१८ रोजी ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. हे आदेश देण्यात आल्यानंतर आतापर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी असलेले पंचवटी विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्र नागरी सेवा व महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कर्तव्यात हयगय आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई केली जावी, अशी मागणी दप्तरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - २२ ऑगस्ट

0
0

वाढदिवस - २२ ऑगस्ट

--

देवेंद्र बापट........ उद्योजक

सुमित बोरा...... संचालक, बोरा टायर्स

अमित बोरा.....व्यावसायिक

उदय शेवतेकर..... माजी प्राचार्य

डी. बी. बंगाळ...... प्राचार्य, केव्हीएन पॉलिटेक्निक

मेधा उपासनी.......डॉक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रह्मगिरी फेरीदरम्यान दाम्पत्यास लुटले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालणाऱ्या दाम्पत्यास मध्यरात्रीच्या सुमारास गाठून तिघांनी लुटले. कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी दाम्पत्याकडील दागिने आणि रोकड असा ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसऱ्या फेरीनिमित्त परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येते आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालण्यासाठी जातात. त्र्यंबकेश्वरमधून सुरू होणारी फेरी रात्रभरात पार पडते. याच फेरीसाठी फिर्यादी तानाजी काशीनाथ मुसळे (वय ३४, रा. शिवाजीनगर, कसारा, ता. शहापूर) आणि त्यांची पत्नी नंदिनी असे दोघे रविवारी दुपारी एका मित्राकडे दुचाकी लावून रिक्षाने त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले. कुशावर्तात स्नान करून सायंकाळच्या सुमारास दोघे पेगलवाडी-पहिनेमार्गे निघाले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने परतत असताना या दाम्पत्यास तिघा चोरट्यांनी सापगाव शिवारात गंगाद्वाराकडे जाणारा डांबरी रस्ता व सापगावकडे येणारा सिमेंटचा रस्ता या तीनफुलीच्या ठिकाणी अडविले. चोरट्यांनी मुसळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच एकाने कोयता दाखवून गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर मुसळे दाम्पत्याकडील २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, जोडवे, एक मोबाइल, दोन हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल काढून चोरट्यांनी धूम ठोकली. यावेळी आजूबाजूस एकही वस्ती नसल्याने घाबरलेले मुसळे दाम्पत्य चालतच त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

बंदोबस्त वाढविण्याची मागणी

दर वर्षी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना असे प्रकार घडतात. श्रावणातील फेरीला भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात पोलिस बंदोबस्तात वाढ करून चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी फेरीसाठी सर्वाधिक संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने तिसऱ्या फेरीसाठी या परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणक्वीन ग्रुमिंग बातमी - जोड चौकट

0
0

फोटो - सतीश काळे

..

हम फिट तो...

..

संध्याकाळी तरुणींनी स्पर्धेचे फिटनेस पार्टनर असलेल्या 'एबीएस जीम'मध्ये झुम्बा आणि वर्कआउट केला. वेस्टर्न आणि हिंदी गाण्यांवर झुम्बाच्या स्टेप्स तरुणींना शिकविण्यात आल्या. 'मॉडेलिंग विश्वात पदार्पण करताना ब्युटी सोबतच फिटनेस जपावा. तुमची बॉडी टोन होणे गरजेचे आहे. त्यासाठी रोज वर्कआउट आणि डाएट केलेच पाहिजे. स्मार्ट दिसण्यासाठी परफेक्ट शेप असलेली बॉडी इम्पॅक्ट करते. तुम्ही श्रावणक्वीनच्या प्लॅटफॉर्मवरून आता ग्लॅमरस दुनियेत जाणार आहात. त्यासाठी फिट राहा, रोज व्यायाम आणि डाएट फॉलो करा. तसेच फिटनेससाठी रोप स्किपींग, स्टेप्स, अॅब्ज घरीदेखील तुम्ही करू शकतात. व्यायामासोबतच योगा आणि प्राणायम देखील करा' असा सल्ला जीमचे संचालक वैभव नेरकर यांनी तरुणींना दिला. झुम्बा सोबतच तरुणींकडून वेट लिफ्टिंग, कार्डिओ व्यायाम करून घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरमच्या लाचेपायी हाती बेड्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बालसुधारगृहातील विधिसंघर्षित बालकास बाल न्याय मंडळातून जामीन करून घेण्यासाठी, तसेच पीओ लेटर देण्याकरिता कॅरम बोर्डची मागणी करून तो स्वीकारणाऱ्या उंटवाडीरोडवरील बालसुधारगृहाच्या अधीक्षिका नलिनी काशीनाथ पाटील आणि लिपिक प्रशांत उत्तम देसले या दोघांना अॅण्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

एसीबीच्या या कारवाईमुळे महिला व बालकल्याण विभागात खळबळ उडाली असून, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलास एका गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी विधिसंघर्षित बालकाचे वडील प्रयत्न करीत होते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या तक्रारदाराची भेट अधीक्षिका पाटील आणि क्लार्क देसले यांच्याशी झाली. बाल न्याय मंडळ कोर्टातून जामीन करून घेणे, बालगृह अधीक्षकांचे पीओ लेटर देणे आणि जामीन मिळाल्यानंतर पुढील काळात सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी या दोघांनी कॅरम बोर्डची मागणी केली. हा कॅरम बोर्ड बालसुधारगृहातील मुलांसाठीच वापरण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क साधला. एसीबीने मागणीची पडताळणी करून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उंटवाडीरोडवरील बालसुधारगृहाच्या अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. या ठिकाणी पाटील आणि देसले यांनी कॅरम बोर्ड घेतला असता एसीबीच्या पथकाने दोघांना लागलीच अटक केली.

कॅरम, की पैशाची मागणी?

अधीक्षिकेने घेतलेल्या कॅरम बोर्डचा उपयोग बालसुधारगृहातील मुलांना होणार होता. त्यामुळे हा लाचेचा प्रकार ठरतो का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. संशयित आरोपी पैशांची मागणी करीत असल्याचे, तसेच तसा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारदाराने सापळा यशस्वी झाल्यानंतर काही व्यक्तींकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाच्या मुळाशी दुसरीच शक्यता असल्याची चर्चा सुरू असून, महिला व बालकल्याण विभागाचे लक्ष एसीबीच्या तपासाकडे लागले आहे.

घराची घेतली झडती

बालगृह अधीक्षिका नलिनी पाटील या दर्जा दोनच्या अधिकारी असल्याने एसीबीने सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घराची झडती सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या झडतीत नक्की काय हाती लागले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. या झडतीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एसीबीचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेच्या वापरासाठी आता ‘दप्तर तपासणी’

0
0

भाषा समिती २७ पासून जिल्हा दौऱ्यावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी राज्य सरकारने तयार केलेली विधीमंडळाची मराठी भाषा समिती २७ ऑगस्टपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहे. मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय दौऱ्यात ही समिती महापालिकेसह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावून भेटी देणार आहे. या दौऱ्यात समिती ही शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या वापराचा आढावा घेवून सरकारला याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे महापालिकेसह शासकीय कार्यालयांनी समितीच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर वापर सक्तीचा केला असला तरी बऱ्याच ठिकाणी इंग्रजीचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत कायदा मंजूर करीत मराठी भाषेची सक्ती केली आहे. या आदेशाची अंमलबाजवणी व्हावी यासाठी तसेच मराठी वापराची स्थिती तपासण्यासाठी विधीमंडळाच्या आमदारांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी या समितीच्या अध्यक्षा असून, १५ आमदारांचा या समितीत समावेश आहे. समिती राज्यातील सर्व जिल्ह्यांत ठिकठिकाणी भेटी देवून मराठी भाषेचा वापराचा अहवाल शासनाला सादर करते. आता ही समिती दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. येत्या २७ व १८ ऑगस्ट रोजी ही समिती नाशिकमध्ये असून, २७ तारखेस जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे, तर २८ तारखेला ही समिती महापालिकेत येवून पालिकेतील मराठी भाषेच्या कामकाजातील वापराचा आढावा घेणार आहे. कार्यालयात वापरले जाणारे स्टॅम्प, नोंदवही, हजेरीपटावरील सह्या, शेरा, कायद्याची मराठीतील भाषांतरे, संगणकावरील मराठी भाषेचा वापर आदींबाबतचा आढावा घेणार आहे. त्यामुळे महापालिकेने या समितीसमोर सादर करावयाच्या कागदपत्रांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील दरोडे

0
0

नाशिक : सावतानगर (सिडको) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुरलीधर दरोडे (वय ५३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images