म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संततधार पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून, मंगळवारी सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात २४७ मिलीमीटर तर सोमवारी सकाळपासून मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनापासून मेहेरबान झालेल्या पावसाने नाशिकककरांवर कृपावर्षाव सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पूर्व आणि उत्तर भागातील तालुक्यांमध्येही पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. चालू सप्ताहाच्या सुरूवातीपासून पावसाने शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३१३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये पेठमध्ये ५८, सुरगाण्यात ४५, इगतपुरीत ३५, दिंडोरीत २६ मिलीमीटर पाऊस झाला. अन्य सर्वच तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. पावसाचा हाच जोर दिवसभरही कायम राहिला. सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात २४७.४ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. यामध्ये इगतपुरीत सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेठमध्ये ३९, सुरगाण्यात २८, त्र्यंबकेश्वरमध्ये २१ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.
बागलाण, चांदवडमध्ये तुरळक सरी
सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी काही तालुक्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. बागलाणमध्ये अवघ्या एक तर चांदवडमध्ये अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मालेगावात ३, दिंडोरीत ६, निफाडमध्ये ७.९, देवळ्यात ८ तर नांदगावात ९ मिमी पावसाची नोंद झाली. येवला आणि कळवणमध्ये प्रत्येकी १२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.
शहरात जनजीवन विस्कळीत
शहरातही पावसाने मुक्काम ठोकला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली असून, त्यामधून वाट काढणेही वाहनचालकांना मुश्किल होऊ लागले आहे. पावसामुळे बाजारपेठांमधील गर्दीदेखील ओसरली असून पथारीवाल्यांच्या व्यवसायावरही पाणी फिरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरवासियांना सूर्यदर्शनही होऊ शकलेले नाही. शहरात मंगळवारी दिवसभरात २२ मिलीमीटर पाऊस झाला.
नद्या वाहताहेत भरभरून
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे या धरण समूहातील गंगापूर आणि काश्यपी धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून २०८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर काश्यपीमधून ४२६ क्युसकने विसर्ग करण्यात येत होता. परंतु, दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने दुपारनंतर विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी दोन वाजता गंगापूरमधून २६०० क्युसकने विसर्ग सुरू होता. चार वाजता तो ३१२० क्युसेक करण्यात आला. सायंकाळी सहा नंतर ३६४० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठच्या रहिवाशांनी आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून त्यामुळे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता धरणातून ४१७२ क्युसकने विसर्ग सुरू होता. दुपारी तीन वाजता तो ५६४२ क्युसेक करण्यात आला. सायंकाळी पाचनंतर ७१७८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
धरण विसर्ग (क्युसेक)
चणकापूर ९२७६
दारणा ७१७८
ठेंगोडा ५७०३
गंगापूर ३६४०
करंजवण ३१००
हरणबारी १२२२
पुनद ८४७
काश्यपी ४२६
केळझर ३८८
तालुकानिहाय पाऊस (सकाळी आठ ते सायंकाळी पाच)
तालुका पाऊस (मिमी)
नाशिक २२.५
इगतपुरी ६२.०
त्र्यंबकेश्वर २१.०
दिंडोरी ६.०
पेठ ३९.०
निफाड ७.९
सिन्नर १४.०
चांदवड २.०
देवळा ८.०
येवला १२.०
नांदगाव ९.०
मालेगाव ३.०
बागलाण १.०
कळवण १२.०
सुरगाणा २८.०
एकूण २४७.४