Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उपोषणाद्वारे ‘कमको’च्या कारभारावर ताशेरे

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण मर्चंट बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभाराबाबत ताशेरे ओढत, सभासदांच्या भल्यासाठी माजी संचालक कैलास जाधव यांनी १५ ऑगस्टला उपोषणाचे हत्यार उपसले. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणीच चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

'कमको' बँकेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच उपोषणाच्या प्रसंगाला संचालक मंडळाला सामोरे जावे लागले. संस्थापक संचालक स्व. एकनाथ जाधव यांचे पुत्र व 'कमको'चे माजी संचालक कैलास जाधव उपोषणात विविध विषयांवर आक्षेत घेतला आहे. १३० कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेचे जिल्हाभरात कार्यक्षेत्र असूनही नाशिक येथे शाखा नाही. तेव्हा महाराष्ट्र कार्यक्षेत्र करण्याचा घाट घातला जात आहे. बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सन २०१५-१८ या कालावधीत केलेले सभासद रद्द करावेत. अभोणा शाखेची वास्तू भाडेतत्त्वावर असताना कळवणच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्याचे काम संचालक मंडळाने का हाती घेतले. शिवाय काम अंतिम टप्प्यात असूनही नूतनीकरणाचे कोटेशन व निविदा का प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विद्यमान चेअरमन प्रवीण संचेती, संचालक प्रा. निंबा कोठावदे, प्रभाकर विसावे, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे आदींनी कैलास जाधव यांची समजूत काढत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सायंकाळी ५ वाजता जिल्हा उपनिबंधकांनी १५ दिवसात याप्रकरणी चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेमुळे व्यवसाय करता येतो

0
0

कलेमुळे व्यवसाय करता येतो

कामिनी पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच एखादी कला अवगत असावी. कलेमुळे व्यवसाय देखील करता येतो असे प्रतिपादन नाशिकरोड संकुल नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या निमंत्रक कामिनी पवार यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात पर्यावरण मंडळांतर्गत आयोजित कार्यशाळेत कामिनी पवार यांनी विद्यार्थिनींना कागदी गुलाबाची फुले बनवायला शिकविले. रंगीत कागदांची फुले बनवताना काय काळजी घ्यावी, त्याचे कटिंग कसे असावे, पाकळ्यांना आकार कसा द्यावा अशा गोष्टी विद्यार्थिनींना समजावून सांगितल्या. विद्यार्थिनींनी अतिशय मनापासून हे प्रशिक्षण घेतले व आनंदाने फुले बनवून इतर विद्यार्थिनींनाही त्याचे प्रशिक्षण दिले जाईल याचे आश्वासन दिले. या कार्यशाळेत पर्यावरण प्रमुख डॉ. मीनल बर्वे यांनी परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. लीना पांढरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेपार्ह व्हिडीओ अंगाशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक भावना भडकतील असा स्वत:च्या आवाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या परप्रांतीय संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नाभो मोहन बेरा (वय ३८, सध्या रा. सराफ बाजार, मूळ रा. हुबळी, पश्चिम बंगाल) असे या संशयिताचे नाव आहे. तो शहरातील एका सराफी पेढीमध्ये काम करतो. या संशयिताने एका धर्माविषयीचा भावना भडकावणारा व्हिडीओ बंगाली भाषेत रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इब्राहिम शेख यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करण्याबाबत वेळोवेळी जनजागृती करूनदेखील अधूनमधून सोशल मीडियाचा अशा प्रकारे गैरवापर सुरूच असल्याचे चित्र असून, असे प्रकार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांसह विविध समाजघटकांच्या सहकार्याने सर्वंकष धोरण आखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

--

बनावट नोटरीद्वारे चुना

नाशिक : बनावट नोटरीच्या माध्यमातून परस्पर तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर पीक पाहणी लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद वसंतराव दाभाडे (रा. वाई, जि. सातारा) आणि दिगंबर विश्वनाथ गोरे (रा. खिरेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी या संशयितांची नावे आहेत. रविवार पेठेतील रहिवासी काशीनाथ खंडूशेठ सोनार यांची गंगापूर तालुक्यातील हरसूल येथे पाच एकर जमीन आहे. ही जमीन दिगंबर गोरे यास भाडेतत्त्वावर दिल्याचा बनाव करून संशयितांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. दि. २१ नोव्हेंबर २०१४ ते २०१५ यादरम्यान एक वर्षासाठी सोनार यांच्याकडून प्रतिएकर पाच हजार रुपये याप्रमाणे भाडेतत्त्वावर घेतल्याचा इंग्रजी भाषेतील करार नोटरी करून घेतला. या बनावट कराराची नोंद तलाठ्याच्या माध्यमातून परस्पर सातबारा उताऱ्यावर लावून घेत पीक पाहणीत स्वत:च्या नावाची नोंद केली. हा प्रकार सोनार यांच्या लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

--

वृद्धेची पोत खेचली

नाशिक : घराच्या अंगणात थांबलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरट्याने पोबारा केला. दिंडोरीरोड भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जवाहरप्रसाद चौरसिया (वय ६४, रा. श्रीकृष्ण रो-हाऊस, समृद्धी कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही वृद्ध महिला शुक्रवारी सायंकाळी अंगणात उभी असताना ही घटना घडली. रस्त्याने जाणारी ४० ते ४५ वयोगटातील व्यक्ती तुमचे पत्र आले आहे का अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आली. त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून संबंधित संशयिताने पोबारा केला.

--

शॉक लागून एकाचा मृत्यू

नाशिक : विद्यूत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पिंपळगाव खांब शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. रामदास बाळू फनेडे (रा. कौलपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामदास फनेडे शुक्रवारी सायंकाळी पिंपळगाव खांब शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तेथील विद्युत मोटार सुरू करीत असताना रोहित्रातील मोकळ्या वायरचा शॉक त्यांना बसला. दूरवर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुंडलिक जाधव यांनी त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

--

(लोगो : \Bक्राईम डायरी\B)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो कुटुंबे उघड्यावर...

0
0

जिल्हा प्रशासनाकडून माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात गुरुवारी रात्रीतून १४४ मिमी. पाऊस बरसल्याने रंगावली नदीला महापूर येऊन २०० घरे, अनेक वाहने वाहून गेली. या महापुरात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत तातडीने महावितरण कंपनीकडून नवीन तारा टाकण्याचे काम सुरू असून, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकारी माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याने अनेकांचे प्राण वाचले. अद्यापही परिसरातील जवळपास ५०० घरात पाणी घुसल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेकडो पशूधन पुरात वाहून गेले आहे.

सन १९७६ नंतर प्रथमच आलेल्या या महापुरामुळे नवापूर परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहे. तसेच नवापूर तालुक्यातील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर-सुरत महामार्गावरील वाहतूक गुरुवारी मध्यरात्रीपासूनच बंद केली होती. त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून वाहतूक वळविण्यात आली.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही नुकसानग्रस्तांना मदतकार्य करण्याचे काम सुरू असून, महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. लवकरच याबाबत सविस्तर आकडेवारी समोर येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पोलिस अधीक्षक व अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपासून नवापूर ठाण मांडून परिस्थिती नियंत्रणात आण्ण्यात यश मिळविले आहे.

नवापूर शहरात दाखल झालो असून, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत आपत्तीमध्ये मृत झालेल्या पाचपैकी चार जणांची ओळख पटली आहे. शासनाकडून त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. तर मृत पावलेल्या जनावंराच्या मालकांनादेखील भरपाई देण्यात येणार आहे. येत्या काही तासांत परिस्थिती पूर्वपदावर येऊन जनजीवन सुरळीत होणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

- मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जज प्रतिक्रिया

0
0

परीक्षक म्हणतात...

'महाराष्ट्र टाइम्स'ने श्रावणक्वीनद्वारे मुलींना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध केले आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुली खूप तयारीनिशी स्पर्धेत उतरल्या आहेत. आपले ध्येय आणि आवड यांचा भविष्यात उत्तमरितीने समतोल साधू शकतील. सर्व मुली मुंबई पुण्याच्या मुलींसोबत उत्तमरितीने स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहेत. 'श्रावणक्वीन'मुळे नक्कीच त्यांना अभिनय क्षेत्रात, नृत्य क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.

- गौरी किरण, अभिनेत्री

----

श्रावणक्वीन या स्पर्धेद्वारे आम्हाला खूप सुंदर चेहरे, उत्तम वक्ते, उत्तम व्यक्तिमत्व मिळाले. आजच्या मुली सौंदर्याबरोबर गुणवत्ता, विद्वत्ता याला पण तितकंच महत्त्व देत आहेत याचं कौतुक वाटतं. नाशिकमधून यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि महाराष्ट्र पातळीवरसुद्धा त्या स्वतःला उत्कृष्ट पद्धतीने सादर करतील याची खात्री वाटते.

- नवीन तोलानी, डान्स एक्सपर्ट

---

श्रावणक्वीन हा खप मोठा प्लॅटफॉर्म आहे. सिनेक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात किंवा फॅशनच्या दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी मुलींना ही खप मोठी संधी आहे. आपल्या नाशिकला कलेचा वारसा मिळाला आहे. नाशिकच्या मुलींमध्ये विविध कलागुण आहेत ते त्या आज सिद्ध करताय. ही एक फक्त सौंदर्य स्पर्धा नसून व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारे आपल्या व्यक्तिमत्वाला मुली नक्कीच अजून उभारी देतील.

- किरण भालेराव, अभिनेता

---

आज खूप आनंद वाटतोय की नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली सहभाग नोंदवतात. त्यांचे कलागुण खूप सुंदररित्या सादर करत आहे. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी मुलींनी अतोनात मेहनत घेतली आहे. इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या स्पर्धेत त्या आपला स्थान निर्माण करताय याचा खूप अभिमान वाटतो.

- तनु भाटिया,

०००००००००००००

संकलन - हर्षल भट, लखन सावंत, अक्षय सराफ, कल्पेश उघडे, स्नेहल अमृतकर, प्रथमेश चांदवडकर, भाग्यश्री मोरे, देवेंद्र पाटील, किशोर नागरे, विवेक कोळी, अमित पवार, सौरभ अमृतकर, राहुल गायकवाड, सुहास परदेशी, अश्विनी भालेराव, अश्विनी हाडपे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक क्षेत्रातील बदल आत्मसात करा

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

नोकरीच्या मोजक्याच संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीत अडकण्यापेक्षा उद्योजकतेच्या प्रवाहात सामील व्हावे. शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे औद्योगिक क्षेत्रात होणारे बदलही आत्मसात करावेत, असे आवाहन डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.

कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी समाज मित्रमंडळाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित 'शिक्षणविश्व' कार्यक्रमात ते बोलत होते. वाणी समाजातर्फे दर वर्षी शिक्षणविश्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, बडोद्याचे अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) उन्मेश वाघ व लाइफ कोच दिलीपकुमार औटी उपस्थित होते. आदर्श व्यक्ती आपल्यातच ओळखावा. जिद्द व चिकटीच्या बळावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, असे मत उन्मेश वाघ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास वाणी समाज मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडीचे क्षेत्र निवडा!

विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा काळजीपूर्वक निवडावी. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या आवडीचे शिक्षण घेतल्यास काम करण्याचे समाधान मिळते. आवड, कल ओळखून विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी, असा आग्रही सल्ला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

--

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तिघांवर ठपका

0
0

सावाना नूतनीकरणातील संशयास्पद खर्चाबाबत अहवाल सादर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) नूतनीकरण कामात १६ लाख रुपये संशयास्पदरित्या खर्च केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी संस्थेचे तत्कालीन तीन पदाधिकाऱ्यांवर ठेवला आहे. या तिघांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती जबाबदार आहेत की नाही, हे ठरविण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून फेरलेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

'सावाना'च्या नूतनीकरण कामाबाबत समित्यांकडून संशय व्यक्त झाल्याने 'सावाना'चे तत्कालीन प्रमुख कार्यवाह मिलिंद जहागिरदार, कार्याध्यक्षा प्रा. विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे आजीव सभासदत्त्व रद्द करण्याच निर्णय विशेष सर्वसाधारण सभेने घेतला होता. त्याबाबत पुष्टी देणारा आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात १६ लाख रूपये संशयास्पद रित्या खर्च हा मुद्दा उपस्थित करून या तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी 'सावाना'चे परशुराम साईखेडकर नाट्यगृह, औरंगाबादकर सभागृह व अन्य काही बाबींचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यातील व्यवहारांत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 'सावाना'च्या ५ मार्च २०१७ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. मात्र, सभासदांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार चौकशी अधिकारी म्हणून वास्तुविशारद अनिल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नूतनीकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. सर्व कंत्राटदार, साहित्य पुरवठादार, सावानाचा सेवकवर्ग, आजी व माजी कार्यकारी मंडळ सदस्य व निर्णयप्रमुख यांचा त्यात समावेश होता. त्यांपैकी काहींनी प्रतिसाद दिला; तर काहींनी म्हणणे सादर केले नाही. त्याचा अभ्यास करून चोरडिया यांनी अंतिम अहवाल तयार केला. तो 'सावाना'चे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रमुख सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार फॅब्रिकेशन, रंगकाम, सुतारकामात एकूण १५ लाख ७९ हजार ५०२ रुपयांचा संशयास्पद खर्च झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या सर्व कामाची जबाबदारी तत्कालीन पदाधिकारी मिलिंद जहागिरदार, प्रा. विनया केळकर व स्वानंद बेदरकर यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे.

विशेष सभेच्या आदेशानुसार संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. प्राथमिक चौकशी अहवालातील नोंदीही त्यांना पाठविण्यात आल्या. मात्र, संबंधित तिघा माजी पदाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांपुढे म्हणणे मांडले नाही. त्यामुळे त्यांना आरोप मान्य आहेत, असे म्हणता येऊ शकते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या फेरलेखापरीक्षणानंतर फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना

'सावाना'त सात लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबद्दल सरकारी केस, एका बाईच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याबद्दल अटक आणि वसंत व्याख्यानमालेतील भ्रष्टाचार अशा केसेस ज्यांच्यावर सुरू आहेत अशा बेणींनी आमची चौकशी मनमाडहून आयात केलेल्या एका आर्किटेक्टकडून करावी यामागील गौडबंगाल आणि राजकारण लगेचच समजते. या सर्व बनावाविरुद्ध आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत. लवकरच दूध का दूध-पानी का पानी होईल. तोपर्यंत बाजारात विकत मिळणारे असे कितीही अहवाल त्यांनी आणावेत.

- मिलिंद जहागिरदार, माजी प्रमुख कार्यवाह, 'सावाना'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाला पर्याय ‘स्किल’च!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाची वर्तमानस्थिती ही आव्हानात्मक आहे. आरक्षणासारख्या आधारांची गरज आज समाजातील अनेक घटकांना नक्कीच आहे, यात दुमत नाही. पण सरकारदरबारी मिळणारे आरक्षण हे रोजगारासारखी समस्या शंभर टक्के सोडवू शकणार नाही. यासाठी कौशल्यांचे विकसन हाच आरक्षणास समांतर पर्याय होऊ शकतो. याचा अर्थ आरक्षणास विरोध असा नाही, पण विकासाची स्वप्न पाहताना कौशल्य विकास त्यासाठी तितकाच पूरक ठरू शकतो, असे प्रतिपादन नामवंत उद्योजक हणमंतराव गायकवाड यांनी केले. \B

\Bमराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित समाजदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी दुपारी हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाभरातून संस्थापरिवारातील सदस्य व हितचिंतक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ते म्हणाले, 'सद्य:स्थितीत सामाजिक तराजू दोलायमान आहे. सातत्याने मोर्चे, आंदोलने काढण्याची वेळ देशातील अनेक घटकांवर येत आहे. या सामाजिक आव्हानांचा विचार करताना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मला बोलावून घेत अशा मुद्द्यांवर चर्चाही केली. ही स्थिती बघता केवळ आरक्षण युवकांच्या विकासासाठी पूरक ठरू शकेल, असे मला वाटत नाही. या जोडीला कौशल्य विकसनाची कास धरा. जगाच्या बाजारपेठेची दिशा ओळखा. त्या बाजारपेठेला जे हवे, नेमके तेच दर्जेदारपणे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य देऊन पुरविण्याचा प्रयत्न करा' , असा सल्लाही त्यांनी यावेळी युवकांना केला.

या भाषणात गायकवाड यांनी उद्योजकता आणि शेती या विषयांच्या विविध अंगांना सोदाहरण स्पर्श केला. यशस्वी शेती आणि यशस्वी उद्योजकतेसाठी त्यांनी काही कानमंत्रही उपस्थितांना दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, उत्तमबाबा भालेराव, प्रल्हाद गडाख, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, रायभान काळे, हेमंत वाजे, डॉ. शोभा बच्छाव, दत्तात्रय पाटील, श्रीराम शेटे, विश्वास मोरे, डॉ. जयंत पवार, मुरलीधर पाटील, अॅड. पंडितराव पिंगळे, अशोक पवार, शिरीष कोतवाल, जयदीप निकम, डॉ. तानाजी वाघ, सेवक सदस्य नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार शेवाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी करून दिला.

स्वत्वाची जाणीव हरवू नका!

यावेळी युवकांविषयी बोलताना ते म्हणाले, 'स्वत्वाची जाणीव वर्तमानातला युवक हरवत चालला आहे. आपण एखादी गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो, या बद्दलचा आत्मविश्वास म्हणजे स्वत्वाची जाणीव. आजही हजारो युवकांशी संबंध येतो. करिअर, व्यवसाय, नोकरी, शिक्षण या मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद साधताना स्वत:बद्दलचा त्यांच्यातील आत्मविश्वास वजा होत असल्याचे मला स्पष्टपणे जाणवते. जीवनात प्रगतीच्या पायऱ्या गाठायच्या असतील तर स्वत्वाची जाणीव हरवू नका', असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला.

शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा\B

\Bगायकवाड म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून शेती केली. आजही आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो. मात्र, थोडासा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये काही युक्त्या वापरल्यास उत्पादन अनेक पटींनी वाढू शकते, याची उदाहरणे त्यांनी मांडली. नोकरी आणि उद्योगांप्रमाणेच शेतीमध्येही आव्हाने आहेतच. याकडे सकारात्मकपणे बघा. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा. निरोगी भारत घडविण्यासाठी रसायनमुक्त शेतीस प्राधान्य द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श

0
0

सूर्योदय संमेलनात प्रा. डॉ. कोतापल्ले यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

ज्याप्रमाणे चिंतनशील कविता समाजाला अंतर्मुख करीत असते. त्याचप्रमाणे कथा व कादंबरीदेखील अंतर्मुख करण्याचे काम करीत असते. मात्र, त्यासाठी साहित्याला प्रतिभेचा स्पर्श व्हावा लागतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.

सूर्योदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. १९) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले होते. संमेलनाचे उद्घाटन २१ व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा नामवंत लेखिका डॉ. विजया वाड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवादास दलुभाऊ जैन, नामवंत कथा कादंबरीकार भारत सासणे, तेरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय अध्यक्ष खान्देशातील डॉ. संजीवकुमार सोनवणे, कवी प्रा. वा. ना. आंधळे उपस्थित होते. १९४५ नंतरचा कालखंड तर मराठी कथेच्या दृष्टीने अतिशय भरभराटीचा होता, त्यामुळेच हा काळ कथेच्या नावाने ओळखला जात होता. मात्र, आताच्या कालखंडात एकूणच साहित्याचीच चर्चा होत नसल्याची खंत या वेळी प्रा. डॉ. कोतापल्ले यांनी व्यक्त केली.

भाषा टिकविण्यासाठी वाचनसंस्कृती गरजेची
सध्याच्या काळात मराठी भाषा टिकवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. साहित्यिक साहित्य लिहित असले तरी ते वाचणारे कोणी राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.

परिसंवाद, कविसंमेलनाने रंगत
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात लेखक सुबोध जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सुबोध जावडेकर, नीलम माणगावे, प्रा. डॉ. संजीव गिराशे, प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांनी ‘कथा कशी स्फुरते’ यावर आपले मनोगत व्यक्त केले. तिसरे कथाकथन सत्र लेखिका विनीता ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये विलास मोरे, गोपीचंद धनगर, भास्कराव चव्हाण यांनी कथांचे सादरीकरण केले. यानंतर कविसंमेलन हे खान्देशकवी पांडूरंग सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये सहभागी झालेल्या कवींनी शब्द झंकार याविषयावर कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.

यांना दिले पुरस्कार...
डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना तर दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार भारत सासणे यांना देण्यात आला. तसेच लेखिका डॉ. विजया वाड, विनीता ऐनापुरे, लेखक सुबोध जावडेकर, गझलकार प्रदीप निफाडकर, लेखिका नीलम माणगावे, लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनाही यावेळी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच सूर्योदय साहित्य पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर, जगदीश पाटील, पौर्णिमा हुंडीवाले, ल. सि. जाधव, किरण सोनार, माया धुप्पड, रावसाहेब कुंवर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात पुन्हा सर्रास वाहनधुलाई

0
0

गोदापात्रात पुन्हा सर्रास वाहनधुलाई (फोटो)

पंचवटी : सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात आल्याने गोदापात्रात वाहने धुण्यासाठी रविवारी म्हसोबा पटांगणावर गर्दी झाली झाली होती. येथे वाहने धुणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे हे चित्र नित्याचे झाले आहे. गोदावरीच्या पाण्यात कपडे, वाहने, जनावरे धुण्यासाठी मनाई असतानाही येथे सर्रास वाहने धुण्यात येत आहेत. म्हसोबा पटांगणाच्या भागात वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण वाढत असून, येथे त्वरित कारवाई करण्याची मागणी गोदाप्रेमींकडून होत आहे.

--

विकासकामांचा प्रारंभ

गंगापूररोड : प्रभाग क्रमांक ८ मध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते झाला. गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, सुवर्णकार सोसायटी व सूर्यकांता सोसायटी येथे येथे जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. गंगापूर गावातील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले. नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे, अजय गाडे, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील, तसेच नागरिक उपस्थित होते. या कामांसाठी एक कोटी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

--

चौकीसमोर बेशिस्त पार्किंग (फोटो)

सातपूर : कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम पोलिस करीत असतात. परंतू, त्यांच्या चौकीबाहेरच बेशिस्तपणा दिसत असेल, तर अनेकांना आश्चर्य वाटेल. सातपूरच्या अशोकनगर पोलिस चौकीबाहेर सध्या असेच चित्र दिसून येत आहे. येथे रोजच दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहवित-शिंदे गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लहवित येथील ग्रामपंचायतीस नाशिक तालुक्यासाठीचा यंदाचा तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तब्बल दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार जलसंपदा व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायतीस गौरविण्यात आले.

नाशिक तालुक्यातून लहवित व शिंदे या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण प्राप्त झाल्याने दोघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लहवित ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विमल मुठाळ, उपसरपंच प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड व ग्रामविकास अधिकारी जयवंत भामरे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच गोष्टी विचारात घेऊन प्रत्येक घटकास गुण देण्यात येतात. सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतीस 'स्मार्ट ग्राम' पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सीईओ नरेश गिते, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिंदे गावच्या सरपंच माधुरी तुंगार, ग्रामविकास अधिकारी विजय जाधव आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक ग्रामपंचायतींची वैयक्तिक-सार्वजनिक शौचालयाची सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, क्रीडांगण, बाजारपेठ व व्यायामशाळा या पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधांची तपासणी करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, महिला बचतगट कार्य, प्लास्टिकबंदी, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, नियमित वीजबील भरणा, अपंग-मागासवर्गीय-महिला बालकल्याण खर्च, लेखा परीक्षण पूर्तता कशी केली जाते याची माहिती घेण्यात आली. याशिवाय मासिक ग्रामसभांचे आयोजन, मादकद्रव्य बंदी, सामाजिक दायित्व म्हणून सामूहिक-आंतरजातीय विवाह सोहळे, बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक, एलइडी बल्ब-पथदीप व सौरदिव्यांचा वापर, बायोगॅस, वृक्ष लागवडी प्रमाण, जलसंधारण कामे, अभिलेखाचे संगणकीकरण असे निकष निश्चित करण्यात आले होते.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदिनी’पात्रात कचराफेक

0
0

अंबड लिंकरोड

'नंदिनी'पात्रात कचराफेक

मालवाहतूक करणाऱ्या वाहनातील कचरा सातपूर-अंबड लिंकरोडवर नंदिनी (नासर्डी) नदीत टाकताना टिपलेला हा फोटो. अशा गलिच्छ लोकांपासून शहरातील नद्यांचे संरक्षण कसे करता येईल यासाठी महापालिकेने योग्य ते उपाय करावेत. दक्ष नागरिकांच्या मदतीने अशांवर कडक कारवाई करावी.

-चंद्रकांत महाले

शहर परिसर

हे थांबणार केव्हा?

शहरात अनेक ठिकाणी नदीकिनारी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने इशारेवाज सूचनाफलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, बांधकामातील कचरा नदीपात्रात टाकला जात आहे. वाळू उपसाही जोरात सुरू आहे. हे थांबणार केव्हा?

-हेमंत साळी

मेरी

मोकाट जनावरांना आवरा

मेरी परिसरातील कलानगर येथे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. जनावरे वाहनांना अचानक आडवी येतात आणि त्यामुळे अपघात होतात. पादचाऱ्यांनादेखील येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेने याप्रश्नी लक्ष घालावे.

-सतीश दाभाडे

मखमलाबादरोड

रस्त्याची सात वर्षांपासून प्रतीक्षा

मखमलाबादरोडवरील गॅस गोडाऊनच्या मागे मातोश्रीनगरमधील व्यंकटेश दर्शन रो-हाऊससमोर गेल्या सात वर्षांपासून रस्ता बनविण्याकरिता अर्ज केलेला असूनदेखील अद्यापही प्रशासन, नगरसेवकांकडून कार्यवाही झालेली नाही. परिसरातील रहिवाशांची गैरसोय दूर करावी, ही संबंधितांना विनंती!

-अलोक पाठक

घोटी-अकोले रस्ता

खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

घोटी ते अकोले रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठा अपघातदेखील होऊ शकतो. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य दुर्घटना टाळावी. नाही तर नाहक कुणाचा तरी बळी जाऊ शकेल.

-पुष्पा मडागे

द्वारका

शहर बसथांब्याची दुरवस्था

द्वारका येथील शहर बसथांब्यावरील सुरक्षा बारला वाहनाने धडक दिल्याने त्याची अवस्था अशी धोकादायक झाली आहे. याबाबतचे वृत्त या अगोदरही दिलेले आहे. पण, याप्रश्नी काहीच कार्यवाही झालेली नाही. निदान प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहता यावे यासाठी तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

-एस. दाभाडे

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी हत्याकांडातील संशयितास कोठडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधातून एका बालिकेसह दोन महिलांना जिवंत जाळणाऱ्या जलालउद्दीन खान (५५, मूळ राहणार, कन्होठिया गाव, अलिगढ, उत्तर प्रदेश) या संशयितास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. रेल्वे प्रवासात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या जलालउद्दीनला क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने उत्तर प्रदेशातील अलिगढ येथून शिताफीने अटक केली.

अनैतिक संबंधातून झालेल्या किरकोळ भांडणानंतर संतप्त झालेल्या जलालउद्दीनने प्रेयसी संगीता देवरे, देवरे यांची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (२०) व नऊ महिन्यांची नात श्रद्धा यांच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. ६ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. बालिकेसह दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर संशयित आरोपीने उत्तरप्रदेशकडे धूम ठोकली होती. पोलिसांनी लागलीच विमानाने प्रवास करीत त्यास अलीगढ येथून अटक केली. परतीच्या रेल्वे प्रवासात मात्र मथुरा येथे पोलिसांना चकवा देत जलालउद्दीन फरार झाला होता. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर होती. जवळपास एक आठवडा पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयिताचा माग युनिट एकच्या पथकाने काढला. दोन दिवसांपूर्वी युनिटचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस हवालदार प्रवीण कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार, राहुल पालखेडे, विशाल देवरे यांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आले होते. त्यांनी अलिगढ जिल्ह्यातील बिनिपूर येथून खान यास ताब्यात घेतले. आज, रविवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यास २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपसिद्धीतून व्हावे सर्व घटकांचे कल्याण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सौख्य बाजूला सारत तपाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तप केल्याने अनेक समस्यांचे निराकरण होते. परंतु, तप स्वार्थासाठी नव्हे, तर सर्वांच्या हितासाठी असावे. आपल्या तपसिद्धीतून सर्वांचे कल्याण होणे गरजेचे आहे, असे निरूपण सुशीलकुवरंजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त रविवार कारंजा जैन स्थानक येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त रविवार (दि. १९ ऑगस्ट) रोजी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्यावेळी त्यांनी तप आत्मशुद्धीसाठीच असावे. तप करीत असताना दुसऱ्या गोष्टींचा मोह करणे चुकीचे आहे. अध्यात्म आणि तपसिद्धी एकाग्रतेनेच साध्य करता येते. असे निरूपण त्यांनी केले. यावेळी अध्यात्मातील काही प्रासंगिक उदाहरणांनी तपाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. या प्रवचन सोहळ्यासाठी जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

लोगो : चातुर्मास प्रवचन

रविवार कारंजा

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिव्यक्ती जपणारा ‘ठेवा संस्कृतीचा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांना आपले मत व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप असणे ही अभिनव कल्पना आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर फक्त मेसेजेस फॉरवर्ड न करता. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविणे ही अभिमानास्पद बाब आहे. महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणारा 'ठेवा संस्कृतीचा' या ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी व्यक्त केले.

ठेवा संस्कृतीचा या व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे रविवारी सकाळी ११ वाजता राका कॉलनीतील ज्योती कलश सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी सदानंद जोशी बोलत होते. कार्यक्रमस्थळी मंचावर कवी किशोर पाठक आणि रंगकर्मी पल्लवी पटवर्धन होते. अभिनय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल रेखा केतकर यांना ठेवा संस्कृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पाणी फाउंडेशनसोबत सामाजिक उपक्रमात विशेष कामगिरी केल्याबद्दल गितांजली आव्हाड यांना सामाजिक क्षेत्राचा ठेवा संस्कृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तीन वर्षांपासून व्हॉट्सअॅपवर 'ठेवा संस्कृतीचा' हा ग्रुप आहे. यामध्ये शहरातील सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, सामाजिक यांसह सर्व क्षेत्रातील महिला सहभागी आहेत. काम करणाऱ्या महिलांना आपले मन मोकळे करण्यासाठी हा ग्रुप महत्त्वाचा ठरत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातून ठेवा संस्कृतीचा हा पुरस्कार प्रदान केला जातो, अशी माहिती ग्रुप अॅडमिन पल्लवी पटवर्धन यांनी दिली. मनाली गर्गे, सोहा लाळे, वैशाली साठे, वैशाली शुक्ल, भाग्यश्री बेळगे आणि इतर सदस्यांनी सोहळ्याचे संयोजन केले.

लोगो : कल्चर वार्ता ......... फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगाच्या तक्रारींचा आलेख उंचावला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या तक्रारींची संख्या गतवर्षीपेक्षा यंदा वाढते आहे. तक्रारी दाखल करून घेतल्या जात असल्याचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शहरात मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत विनयभंगाच्या ६९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यंदा हा आकडा जुलै महिन्याअखेरीस १२० इतका झाला आहे. विशेषत: शाळकरी मुली किंवा अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की १२० गुन्ह्यांपैकी ११७ गुन्ह्यांमध्ये तपास करून संशयितांना अटक करण्यात यश मिळाले आहे. तक्रारदाराची तक्रार दाखल होत असून, त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या विचार उपयोगी पडणार नाही. मोबाइल, इंटरनेट यामुळे तसेच सोशल साईड्सच्या माध्यमातून देखील विनयभंगाचे प्रकार घडतात. मागील दोन वर्षांपासून शाळा कॉलेजमध्ये पोहचून पोलिस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. दोन कुटुंबातील वादांमध्ये महिला विनयभंगाची तक्रार करतात. बऱ्याचदा एकमेकांची जिरवण्यासाठी तक्रारी येतात.

--

वाढदिवसाच्या बहाण्याने अपहरण अन् विनयभंग

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने इंदिरानगर परिसरातील युवतीला पळवून डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रवी बेंडकुळे (रा. आनंदवल्ली) असे संशयिताचे नाव आहे. ओळखीचा फायदा घेत १३ ऑगस्ट रोजी संशयित युवतीला इंदिरानगर येथील सुखदेव शाळेजवळ भेटला. तेथून वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवरून मांजरमाळ (हरसूल) येथे त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवून मावशीला लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर गेल्या बुधवारी (ता.१५) रात्री दोन वाजता संशयित आला आणि त्याने तिला, तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरडाओरडा केला तर डोंगरावरून फेकून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात अपहरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

....

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दुचाकीवरून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयितांविरोधात पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास युवती एबीबी सर्कलकडून पवननगरकडे येत असताना संशयित कुणाल (पूर्ण नाव नाही) याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तसेच, तिच्याकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली. युवतीने त्यास नकार दिला असता संशयिताने तिचा हात धरून दुचाकीवरून ओढत अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

--

वर्ष - गुन्हा दाखल - गुन्हा उघड

२०१७- ६९ - ६५

२०१८- १२० - ११७

(आकडेवारी जुलै महिन्यापर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैं दिवानी हो गई...

0
0

हवाहवाई...

एकाहून एक सरस परफॉर्मन्सनी जिंकले परीक्ष​​कांचे मन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुणाची सेल्फीसाठी लगबग तर कुणाची परफॉर्मन्सची प्रॅक्टिस. कुणी परीक्षकांच्या प्रश्नांना चोखंदळपणे सामोरे जाण्याची तयारी करतेय तर काही रॅम्पवॉकची तयारी. हा माहोल होता श्रावणक्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतला. रविवारी रंगलेल्या प्राथमिक फेरीत एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस सादर करत तरुणींनी परीक्षकांची मने जिंकली. श्रावणक्वीन स्पर्धेसाची 'दिवानी' असल्याचे मत स्पर्धक व्यक्त करत होत्या. मी श्रावणक्वीन होणारच असा आत्मविश्वास अनेकींच्या चेहऱ्यावर दिसून आला.

'कैसी पहेली हैं ये जिंदगानी', 'नाचे झिंग झिंग झिंगाट', 'जो हैं अलबेला' या हिंदी गाण्यांसह 'नवराई माझी लाडाची गं','तुम्हावर केली मर्जी बहाल', 'अप्सरा आली', मला 'जाऊ द्या ना घरी' या मराठी गाण्यांवर तरुणींचे एकाहून एक तडफदार परफॉर्मन्सेस सादर होत होते. नृत्यासोबतच अभिनय सादरीकरणाकडेही यंदा तरुणींनी विशेष लक्ष दिले. स्त्री भ्रूण हत्या, महिला अत्याचार यांवर भाष्य करणाऱ्या नाट्यछटा स्पर्धेत सादर केल्या गेल्या. फक्त सौंदर्यच नव्हे तर उत्तम कलागुण अन् स्मार्टनेसची भुरळ स्पर्धकांनी परीक्षकांना घातली. स्पर्धेत सहभागी लावण्यवतींच्या अदांची मोहिनी परीक्षकांवर कमालीची भाळली होती. परफॉर्मन्सेससोबत टॅलेंट राउंडमध्येही वैविध्य असल्याने चुरस अधिक वाढली. परीक्षकांच्या प्रश्नांना तरुणी अतिशय प्रभावशाली पद्धतीने सामोरे जात होत्या. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सिटी फिनालेसाठी नेमकी कोणाची निवड होईल याची कुजबूजही दिसून आली. स्पर्धकांनी सादर केलेले रॅम्पवॉक पाहून परीक्षकांनाही रॅम्पवॉकचा मोह आवरला नाही. स्पर्धेच्या अखेरीस परीक्षकांनी स्पर्धकांसोबत रॅम्पवॉक करत सिटी फिनालेसाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

0
0

लोगो : सांस्कृतिकी

व्याख्यान २० ऑगस्ट सोमवार

--

कार्यक्रम : विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारचे व्याख्यान

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळक पथ

दिनांक : २० ऑगस्ट

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : वादग्रस्त विधानांनी गाजत असलेल्या कन्हैयाकुमारचा शहरात कार्यक्रम

प्रवचनमाला

कार्यक्रम : गुरुपौर्णिमा उत्सवांतर्गत प्रवचनमाला

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळक पथ

दिनांक : २० ऑगस्ट

वेळ : सकाळी ७.३० ते ९.३०

ठळक विशेष : दासबोध अभ्यासार्थी मंडळातर्फे मंदाताई गंधे यांची प्रवचनमाला

चित्रपट

कार्यक्रम : चित्रपट कलाअंतर्गत 'लाखाची गोष्ट' चित्रपट

स्थळ : विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड

दिनांक : २० ऑगस्ट

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

ठळक विशेष : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीचा उपक्रम

व्याख्यान

कार्यक्रम : ज्ञानेश्वरी विषयावर व्याख्यान

स्थळ : श्री कालिकादेवी मंदिर सभागृह, जुना मुंबई-आग्रारोड

दिनांक : ९ सप्टेंबरपर्यंत

वेळ : सायंकाळी ५ ते ६

ठळक विशेष : श्री कालिकादेवी मंदिर संस्थान व श्री कालिकादेवी मंदिर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

----

संगीत रामायण २१ ऑगस्ट मंगळवार

कार्यक्रम : संगीत रामायण कथा

स्थळ : काळाराम मंदिर, पंचवटी

दिनांक : २१ ऑगस्टपर्यंत

वेळ : दुपारी ३ ते ६ वाजता

ठळक विशेष : संगीतमय रामायण कथेत रामायणाचे रसाळ प्रवचन

सांस्कृतिक

कार्यक्रम : नीरज की याद में

स्थळ : कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड

दिनांक : २१ ऑगस्ट

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : पाच पिढ्यांना समृद्ध करणारे कवी नीरज यांच्या जीवनावरील गीतांचा कार्यक्रम

-----

महोत्सव २२ ऑगस्ट बुधवार

कार्यक्रम : पं. गोपीकृष्ण महोत्सव

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळक पथ

दिनांक : २२ ते २४ ऑगस्टपर्यंत

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : प्रसिद्ध नृत्यांगना रेखा नाडगौडा आयोजित महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष, वर्षभराच्या उपक्रमाची सांगता

-----

व्याख्यान २३ ऑगस्ट गुरुवार

कार्यक्रम : स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान

स्थळ : शंकराचार्य न्यास, डॉ. कुर्तकोटी सभागृह, गंगापूररोड

दिनांक : २३ ऑगस्ट

वेळ : सायंकाळी ५.३०

ठळक विशेष : चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी यांचे स्पर्धा परीक्षा विषयावर व्याख्यान.

---

प्रकाशन २५ ऑगस्ट शनिवार

कार्यक्रम : 'पोलादी माणसं' पुस्तकाचे प्रकाशन

स्थळ : चोपडा लॉन्स, गंगापूररोड

दिनांक : २५ ऑगस्ट

वेळ : सकाळी ११

ठळक विशेष : मुक्त पत्रकार दत्ता जोशी यांचे 'पोलादी माणसं नाशिक जिल्हा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

व्याख्यान

कार्यक्रम : लेखक तुमच्या भेटीला उपक्रमांतर्गत व्याख्यान

स्थळ : शंकराचार्य न्यास, डॉ. कुर्तकोटी सभागृह, गंगापूररोड

दिनांक : २५ ऑगस्ट

वेळ : सायंकाळी ६.३०

ठळक विशेष : आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांचे 'भारतीय लोकशाहीतील विरोधाभास' या विषयावर व्याख्यान

----

तुम्हीही झळकू शकता सांस्कृतिकीमध्ये!

आठवडाभरात शहरात सांस्कृतिक क्षेत्रात कोणते कार्यक्रम आहेत यासाठी 'मटा'चा सांस्कृतिकी हा कॉलम सुरू आहे. हे कार्यक्रम पाहून वाचकांना आठवडाभराचे नियोजन करणे सहजसोपे व्हावे हा हेतू आहे. कलावंतांनो, तुमच्या कार्यक्रमाची माहिती तुम्ही सांस्कृतिकी या कॉलममध्ये देऊ शकता. त्यासाठी ९५०३६७७७४० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या कार्यक्रमाची माहिती पाठवावी अथवा कळवावी. आम्ही ती प्रसिद्ध करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचे खड्ड्यांवर लक्ष

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीला आता खड्डे दुरुस्तीचा त्रैमासिक अहवाल राज्य शासनाला द्यावा लागणार असून, त्यानंतर तो एकत्रित उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, अगोदर हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर तो एकत्रितरित्या उच्च न्यायलयात सादर केला जाणार आहे. नगरपालिका व नगरपंचायतीला हा अहवाल आधी नगरपरिषद प्रशासन संचालनालयात तर महानगरपालिकेला तो राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे.

मुंबईसह राज्यातील काही महानगरपालिकांतील रस्त्यांच्या निकृष्टतेसंदर्भात उच्च न्यायालयाने सु मोटो जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान फेब्रुवारी महिन्यात रस्त्यांतील खड्ड्यांसंदर्भात आदेश पारित केले होते. त्यानंतर नगरविकास विभागाने आता परिपत्रक काढत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी उच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांमध्ये खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्यास बजावले आहे. त्याचप्रमाणे खड्डे खोदताना तेथे त्याबाबत सूचना लावण्याचेही निर्देश दिले असून, त्यात काम करणाऱ्याचे नाव, पत्ता, संपर्काचा तपशील, खोदकामाला दिलेली परवानगी, काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामानंतर कोठून-कोठपर्यंत रस्ते पूर्ववत होतील, याबाबत तपशीलही द्यावा लागणार आहे.

तक्रार निवारण केंद्र

खड्ड्यांबाबत आता या संस्थांना तक्रार निवारण केंद्रही उघडावे लागणार आहे. त्याचप्रमाणे तक्रारीसाठी टोल फ्री नंबर, संकेतस्थळ, फोन व एसएमएसद्वारे तक्रारींची सोय उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. ही व्यवस्था वर्षभरासाठी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ट्रॅकिंगची सुविधाही करावी लागणार आहे. तक्रार केल्यानंतर तीन आठवड्यांत तक्रारदाराला त्याची माहिती छायाचित्रासह संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय या तक्रार निवारण यंत्रणेस प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. प्रभाग कार्यालये, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमे यामधून वेळोवेळी प्रसिद्धी द्यावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मॅनहोल निदर्शनास यावेत

मलनि:स्सारण वाहिन्यांवरील मॅनहोल पुरेशा संरक्षणाशिवाय उघडे ठेऊ नयेत. उघडे मॅनहोल नागरिकांच्या निदर्शनास येण्यासाठी आवश्यक उपाययोजना या स्थानिक स्वराज्य संस्थांना कराव्या लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी प्रकरणी दोघांना बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यांनी तीन घरफोड्यांची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संशयितांकडून रोकडसह सोन्या- चांदीचे दागिने आणि मोबाइल असा सुमारे चार लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. गणेश बाजीराव केदारे व शंकर नागेश पुजारी अशी अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

केदारे हा अकोला जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती हवालदार येवाजी महाले यांना मिळाली होती. निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक अकोला येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शंकर पुजारी याच्या मदतीने घरफोड्या केल्याची माहिती त्याने दिली. मालेगाव स्टँड येथील इंद्रकुंड भागात पुजारीला ताब्यात घेण्यात आले. गंगापूर, उपनगर आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी २० हजारांची रोकड, तीन मोबाइल आणि १४० ग्रॅमच्या सोन्याच्या लगडी असा चार लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर, जमादार जाकीर शेख, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, हवालदार रवींद्र बागूल, प्रवीण कोकाटे, वसंत पांडव आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images