रेल्वे स्टेशनचा देशात ४१ वा; महाराष्ट्रातील ३६ स्टेशनचा समावेश
म. टा. वृत्तसेवा, जेलरोड
रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशनचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. महाराष्ट्रातील ३६ रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. श्रेणी 'अ १' मध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाने सातवा क्रमांक पटकावत देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. अ श्रेणीत नाशिकरोड ४१ व्या स्थानी आले आहे. गेल्यावेळी नाशिकरोडचा क्रमांक १६९ वा होता. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड या तीन रेल्वे स्टेशनचाही ३६ स्टेशनमध्ये समावेश आहे.
नाशिकरोडचे स्टेशन मास्तर आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट तपासणीस जे. एस. जैन, वरिष्ठ अभियंता (कार्य) एस. जी. सैय्यद, मुख्य आरोग्य निरीक्षक के. जी. गुप्ता, मुख्य मंडल आरोग्याधिकारी बावीस्कर यांनी स्वच्छता कामगार प्रमुख गोपाल फथरोड आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
कामगिरीत सुधारणा
स्वच्छतेबाबत नाशिकरोडरोड स्टेशनला २०१५ ला सहावा आणि २०१६ ला सातवा क्रमांक मिळाला होता. मात्र, नंतर कामगिरीत आश्चर्यकारक घसरण झाली. २०१७ ला रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे स्टेशन स्वच्छतेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट प्रकाशित केल्यावर नाशिकरोडची १६९ व्या स्थानी घसरण झाली. प्रशासन खडबडून जागे झाले आणि नाशिकरोड स्टेशन स्वच्छतेसाठी सहा महिन्यांपूर्वी साडेपाच कोटींचे कंत्राट देण्यात आले. आता सकाळी सात ते दुपारी तीन, तीन ते रात्री अकरा, अकरा ते सात असे २४ तास तीन शिफ्टमध्ये सफाई कर्मचारी काम करतात. दुप्पट केलेली कर्मचारी संख्या, १४ आधुनिक मशिन्स आणि महिला कर्मचाऱ्यांची वाढवलेली संख्या यामुळे यंदा नाशिकरोडला ४१ वा क्रमांक गाठता आला आहे.
असे मिळाले गुण
रेल्वे मंत्रालयातर्फे २०१६ पासून 'स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्टेशनचे विविध मानकांवर नामांकित संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्टेशनचे दोन श्रेणींमध्ये सर्वेक्षण झाले. वर्षाकाठी ५० कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात त्या स्थानकांना 'अ १' तर ६ ते ५० कोटी प्रवाशी प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकांना 'अ' श्रेणीमध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्टेशनशेजारील खुल्या परिसरात स्वच्छतागृह, मुख्य प्रवेशद्वाराशेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्टेशनवर खुल्या ठिकाणी आसन व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी आदी बाबींचे सर्वेक्षण होऊन स्टेशनचे मानांकन ठरले. या सर्वांसाठी हजार गुण ठरविण्यात आले होते.
महाराष्ट्राची आघाडी
२०१८ च्या अहवालात देशातील एकूण ७५ रेल्वे स्थानकांची अ-१ श्रेणी मध्ये निवड करण्यात आली. यात पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्टेशनने सातवा क्रमांक मिळविला. मुंबई सीएसटी, पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. देशातील एकूण ३३२ रेल्वे स्टेशनची निवड 'अ' श्रेणीमध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रातील २६ रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिकरोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज-सांगली, लातूर, शिर्डी,चंद्रूपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
..
कर्मचारी संख्या वाढविली
नाशिकरोड स्टेशनवर सहा महिन्यापूर्वी कंत्राटी स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने २६ आणि रेल्वेचे आठ कर्मचारी होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना अन्य विभागात सामावून घेण्यात आले. कंत्राटी सफाई कर्मचारी संख्या ६५ झाली. तीन शिफ्टमध्ये हे ६५ कर्मचारी काम करतात. स्टेशनवरील प्लॅटफार्म एकपासून चारपर्यंत तसेच स्टेशनची प्रवेशद्वारे, आवार आदींची स्वच्छता हे कर्मचारी करतात.