Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धरणं तहानलेलीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणं तहानलेली आहेत. जिल्ह्यात आठ धरणं निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात २४ धरणे असून, ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. आजमितीस धरणांमध्ये ४१ हजार १९२ मिलीमीटर म्हणजेच ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने येथील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आळंदी धरणातील पाणी साठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून, परतीचाही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गही करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती पालखेड धरण समूहामधील देखील आहे. इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने दारणा, भावली या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरण समूहात ७६ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. भावली, नांदुर मध्यमेश्वर ही धरणे १०० टक्के भरली असली तरी पालखेड, तिसगाव, मुकणे ही धरणे निम्मी देखील भरू शकलेली नाहीत. गिरणा खोऱ्याकडेही पावसाने पाठ फिरविली आहे. गिरणा, पुनद, माणिकपुंज आणि नागासाक्या या धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

धरण उपलब्ध पाणीसाठा (टक्के)

गंगापूर ८२

काश्यपी ९१

गौतमी गोदावरी ८१

आळंदी १००

पालखेड २०

करंजवण ८९

वाघाड ९४

ओझरखेड ५३

पुणेगाव ७४

तिसगाव २२

दारणा ९२

भावली १००

मुकणे ५०

वालदेवी १००

कडवा ७८

नांदूर मध्यमेश्वर १००

भोजापूर ३३

चणकापूर ६६

हरणबारी १००

केळझर ८१

नागासाक्या ०

गिरणा २९

पूनद ४७

माणिकपुंज ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य टेबल टेनिसमध्ये तनिषाला विजेतेपद

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्युनीयर, सबज्युनीयर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये सब ज्युनीयर मुलींच्या गटात नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि तीया वाघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात तनिषाने ४-२ असा फरकाने विजेतेपद पटकावले.

मिडजेट मुलांच्या गटात चौथा मानांकित परभणीचा वरद लोहट आणि पुण्याच्या चवथा मानांकित अभिराज सकपाळ यांच्यातील सामन्यात वरद लोहाटने विजेतेपद पटकावले. मिडजेट मुलींमध्ये दुसरे मानांकित नभा किरकोले (पुणे) आणि प्रथम मानांकित अकोल्याच्या रिया कोठारी यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेल्या निर्णायक गेममध्ये नभा किरकोलेने संयमाने खेळ करून विजेतेपदावर आपले नाव पक्के केले.

कॅडेट मुलांच्या गटात अक्षत जैन (मुंबई उपनगर) आणि नील मुळे (पुणे) यांच्यात सामना रंगला. अक्षतने ४-२ अशी लढत जिंकून विजेतेपद मिळविले.

मुलीमध्ये केईशा झवेरी (मुंबई शहर) आणि सना डिसुझा (मुंबई उपनगर ) यांच्यात झालेल्या सामन्यात सनाने विजय मिळविला.

सबज्युनियर मुलांच्या गटात मुंबय उपनगरच्या हार्वेश असराणी, मनुश्री पाटील, रेगन अल्बुकर्क विजय पटकावला.

स्पर्धेच्या पारितोषिक समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आमदार हेमंत टकले, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल प्रकाश तुळपुळे, मानद सचिव यतीन टिपणीस, राधेश्याम मुंदडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील शिवमंदिरे सजली

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील सोमेश्वर, कपालेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांप्रमाणेच गोदापात्रातील अनेक दुर्लक्षित शिवमंदिरांतही सजावट करण्यात आली आहे.

रामकुंड परिसरात लहान-मोठी अनेक सुंदर मंदिरे जुन्या दगडी बांधकामातील आहेत. त्यात उघड्यावरील शिवलिंगांची संख्याही खूप आहे. रामकुंडाच्या उत्तरेला तांब्यापासून बनविलेले बाणेश्वर शिवलिंग आहे. रामकुंड आणि लक्ष्मण कुंडाच्या मधल्या प्रवाहाजवळ कर्पूरेश्वर महादेव हे मोठे तर त्यागेश्वर महादेव हे छोटे मंदिर आहे. गांधीच्या दक्षिणेला आणि रामकुंडाच्या पुर्वेला दोन छोटी शिवमंदिरे आहेत. गांधी तलावाच्या पूर्वेला सिद्धपाताळेश्वर महादेव मंदिर आहे. यशवंतराव महाराज पटांगणाच्या दक्षिणेला नीलकंठेश्वर हे मोठे मंदिर दगडी बांधकामातील आहे. या मंदिराच्या उत्तरेला दोन छोटी पण आकर्षक अशी मंदिरे असून त्यात दगडी शिवलिंग आहेत. तर दक्षिणेला उघड्यावर मोठे शिवलिंग आहेत.

रामसेतूपूलालगत तारकेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या उत्तरेला उंच चबुतऱ्यावर शिवलिंग स्थापित करण्यात आलेले आहेत. रोकडोबा मैदानालगतच्या गोदापात्रात मुक्तेश्वर महादेवाचे शिवलिंग उघड्यावर आहे. गोदावरीच्या पात्राच्या पूर्वेला प्रसिद्ध नारोशंकर महादेव मंदिर आहे. अहिल्यादेवी मैदानावर विश्वेश्वर महादेव मंदिर हे दगडी बांधकामातील मोठे मंदिर आहे. रामकुंडाच्या पूर्वेला अर्धनारी नटेश्वराची सुबक मूर्ती असलेले मंदिर आहे. टाळकुटेश्वर पुलाजवळील टाळकुटेश्वर महादेव आणि रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर महादेव ही मंदिरे गोदापात्रातील आहेत.

भाविकांची मांदियाळी

पंचवटी : श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस हा रविवार असल्याने पंचवटी परिसरात पहिल्याच दिवस भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. रामकुंडात स्नान आणि परिसरातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने भक्तीमय वातावरण तयार झाले. रामकुंड पार्किंग, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण आणि भाजीबाजार पटांगण भाविकांच्या वाहनांनी भरून गेले होते. ऑगस्ट महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार या सलग दोन सुट्या आल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी पंचवटी परिसरात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक, रुद्रा, रचना व शिवशक्ती अंतिम फेरीत

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर-किशोरी आमदार चषक अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या किशोर गटात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ व रुद्रा क्रीडा मंडळ, ब्राह्मणवाडे तर किशोरी गटात रचना स्पोर्ट्स क्लब, नाशिक व शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ ऑगस्ट दरम्यान मनमाड नगरपालिकेच्या महर्षि वाल्मिकी क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत किशोरांच्या ५४ संघांनी तर किशोरींच्या १४ संघांनी सहभाग घेतला. किशोरांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाने सोनू निकम, हरिष केकान व दर्शन बारे यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर कै. उत्तमराव ढिकले संघाचा ३६ विरुद्ध ३१ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रुद्र क्रीडा मंडळ ब्राह्मणवाडे या संघाने जय बजरंग, शिंगवे या संघाचा ५२ विरूध ४४ गुणांनी पराभव करून पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. किशोरी गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे शिवशक्ती आडगाव या संघाने राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा लभडे, अंकिता जाधव यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर श्री साई स्पोर्ट्स क्लब नवीन नाशिकचा २७ विरुद्ध ५ असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रचना स्पोर्ट्स क्लब नाशिकने क्रीडा प्रबोधिनी नाशिकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षांची पालवी औट घटकेची

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची विद्यमान कार्यकारिणी २०१९ पर्यंत कार्यरत असून, नवीन घटनेनुसार त्यानंतर काम होणार आहे. नवीन सदस्य नेमण्याचा अधिकार कार्यकारिणीला असून, सर्वसंमतीने ते नेमण्यात येतील असे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत चार जणांची नेमणूक होणार या मुख्य आकर्षणाच्या विषयाला कलाटणी मिळाली आणि अनेकांच्या पल्लवीत झालेल्या आशा क्षणार्धात मावळल्या.

कालिदास कलामंदिरात नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास नकार देण्यात आल्याने शनिवारी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये ही सभा झाली. यावेळी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सचिन शिंदे, सुरेश गायधनी, प्रकाश साळवे, रवींद्र ढवळे, आदिती मोराणकर, मुकुंद गायधनी यांची उपस्थिती होती.

सायंकाळी ५ वाजता नाट्य परिषदेची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, पुरेशा गणसंख्येअभावी ही सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर प्रारंभी ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर तसेच इतर दिवंगतांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 'देवबाभळी', 'मून विदाऊट स्काय' नाटकांना पारितोषिके तसेच डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी, दत्ता पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मागील इतिवृत्ताचे वाचन मुकुंद गायधनी यांनी केले. तसेच वार्षिक अहवाल वाचन अदिती मोराणकर यांनी केले. वार्षिक हिशेब तसेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. सुयोग कदम यांची सनदी लेखापाल म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १५ जणांची कार्यकारिणी कार्यरत राहणार असून कार्यकारिणीवर चारजण घेण्याबाबत अध्यक्ष कदम यांनी काही निकष सांगितले. कार्यकारिणीतील सदस्यांच्या संमतीने सर्वानुमते ही चार जण घेण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. नाट्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खडाजंगी होणार, अशा आशयाची चर्चा सांस्कृतिक वर्तुळात असल्याने सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावणमासानिमित्त पंचवटीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील काही रस्ते दर सोमवारी तसेच शनिवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतुकीला व्यत्यय येऊ नये म्हणून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या श्रावण मासाची सुरुवात रविवारपासून (दि.१२) झाली आहे. श्रावण मासादरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंचवटीत भाविकांची झुंबड उडते. कपालेश्वर, काळाराम मंदिर, रामकुंडासह गंगाघाटावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या भागात गर्दी वाढली की त्याचा थेट परिणाम कपालेश्वर तसेच रामकुंड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर होतो. वाहतूक कोंडीमुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने सदर ठिकाणी दर शनिवारी आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन आखले आहे. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता, खांदवे सभागृहाकडून कपालेश्वराकडे येणारा रस्ता आणि सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर ही बंदी घालण्यात येणार आहे. श्रावणातील सर्व सोमवारी आणि शनिवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. वाहनांची संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळासाठी धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता

0
0

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचा सल्ला

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुद्धिबळ खेळात प्रगती करायची असेल तर जीव तोडून मेहनत करणे आवश्यक असते. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्या खेळाडूंना खेळात करियर करायचे आहे, अशा खेळाडूंनी धाडसी निर्णय घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे पहिले ग्रॅँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी केले.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या क्रीडा प्रशिक्षकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. गंगपूर रोडवरील अर्थव मंगल कार्यालयात रविवारी हा सोहळा झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, माजी अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते. प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक शहरातील विविध खेळांच्या ११ प्रशिक्षकांचा सत्कार ठिपसे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठिपसे पुढे म्हणाले, जिंकण्यापेक्षा खेळाडूला पराभवातून जास्त शिकायला मिळते. पराभवातून खचून न जाता जास्तीत जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. आमच्या काळात मार्गदर्शन नव्हते. तुम्हाला चांगले प्रशिक्षक लाभले आहेत. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. पालकांना उद्देशून ते म्हणाले, पालकांनी आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज आहे. पालकांनी मुलगा प्रशिक्षकाच्या ताब्यात दिल्यानंतर कामात हस्तक्षेप करायला नको. मुलांना स्वतंत्र विचार करण्याची सवय लावली पाहिजे.

रवींद्र नाईक म्हणाले, नाशिक शहरात खेळाला चांगले वातावरण आहे. पूर्वी ठराविक खेळांकडे लक्ष केंद्रीत केले जात होते. आता तसे राहिले नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असल्याचे सांगितले.

संघटनेच्यावतीने ५० विद्यार्थी दत्तक

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने शहरातील शाळांचे ५० विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. त्यांना तीन वर्ष बुद्धिबळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कृतीबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

यांचा झाला गौरव

मोनाली गोऱ्हे, मंदार देशमुख, यशवंत जाधव, संदीप शिंदे, प्रबोधन डोणगावकर, राजीव जोशी, मकरंद देव, प्रकाश फडके, मकरंद ओक, प्रवीण व्यवहारे, राजेद्र निंबाळते.

या शाळांचाही सन्मान

माध्यमिक विद्यालय उंटवाडी, फ्रावशी अकॅडमी, विस्डम हाय स्कूल, जेम्स इंग्लिश मीडियम, इस्पॅलियर स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, सीडीओ मेरी हायस्कूल, सिम्बॉयसिस हायस्कूल, वाय. डी. बिटको हायस्कूल, डी. डी. बिटको हायस्कूल, के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूल, अशोका स्कूल चांदसी, काकासाहेब, किशोर सूर्यवंशी स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर, रचना हायस्कूल, मॉडर्न स्कूल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राँगसाईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील समृद्धी हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी सागर तुकाराम चंदनशिव (रा. उगले सदन, दत्तनगर, पेठरोड) यांनी तक्रार दिली आहे.

चंदनशीव हे गुरूवारी (दि. ९) रात्री आपल्या बहीण व पुतणीसह दुचाकीवरून (एमएच १५ एफझेड ६००४) जात असताना, त्यांना समोरून राँगसाईडने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात तिघे जखमी झाले असून, संशयित दुचाकीस्वार फरार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन दुचाकी लंपास

शहरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या प्रकरणी मुंबई नाका तसेच पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. हेमंत रघुनाथ चव्हाण (रा. कालिकानगर, अमृतधाम, पंचवटी) यांची ३० हजार रुपयांची दुचाकी (एमएच ४१ एसी ९६२१) शनिवारी, ४ ऑगस्ट रोजी चोरी झाली. चव्हाण राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संजय गुलाब पाटील (रा. शताब्दी हॉस्पिटल) यांची २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १८ एएफ ४८०४) कमोद कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री चोरीला गेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकू बाळगणारे दोघे गजाआड

मोठा चाकू बाळगून दहशत निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी म्हसोबा पटांगणावर अटक केली. प्रशांत अनिल लोंढे (२१, रा. सहाचाळी, देवळाली कॅम्प) आणि संतोष पोपट वलकर (१९, रा. मोरे मळा, पंचवटी) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. दोघे संशयित म्हसोबा पटांगणावर असताना पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यात त्यांच्याकडून एक चॉपर सापडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल हिसकावला

पानटपरीवर थांबलेल्या तरुणाचा मोबाइल अज्ञात चोरट्याने हिसकावून धूम ठोकली. ही घटना अंबड एमआयडीसीत घडली. या प्रकरणी ज्ञानेश्‍वर राजेंद्र पाटील (रा. लक्ष्मीनगर, जीडीपीनगर, नाशिक) या तरुणाने तक्रार दिली आहे. एमआयडीसीतील शिंपी मळ्यातील पानटपरीवर ज्ञानेश्वर बिस्किटे खाण्यासाठी शुक्रवारी (दि.१०) थांबला. यावेळी एका अज्ञात २५ वर्षांच्या चोरट्याने त्याची नजर चुकवून १० हजार ९९० रुपयांचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रारी अन् अपेक्षांचा भडिमार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठाणातील रस्ते छोटे असल्याने तेथे अग्निशमनच्या छोट्या वाहनांची व्यवस्था करा, वाडा पडल्याने बळी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना शहरातील प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्याचे मानधन द्यावे, जुन्या नाशिकातील नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. भाजप सरकारने कमी केलेला एफएसआय पुन्हा वाढवून द्यावा, अशा एक ना अनेक तक्रारी आणि सूचनांचा पाऊसच रविवारी जुन्या तांबट लेनमधील कासार समाज कालिका माता मंदिर सभामंडपात पडला.

नागरिकांच्या रास्त अपेक्षांची दखल घेऊ, असे आश्वासन देतानाच क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे नाशिक गावठाणचे रुपडे पालटणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. शहराचा चहुबाजूने विकास होत असताना नाशिकची मुख्य ओळख असलेला गावठाण भाग मात्र विकासापासून वंचित आहे. कुठल्याही मूलभूत आणि पायाभूत सूविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनाही जगणे कठीण झाले आहे. शहराच्या उपनगरांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून येथील रहिवाशांना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी नाशिक गावठाणातील रहिवाशांची बैठक बोलावली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरविकासच्या अधिकारी प्रतिभा भदाणे, विजय साने, सुहास फरांदे, हरिभाऊ लोणारी आदी उपस्थित होते.

क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे जुन्या नाशकातील रहिवाशांच्या अशा पल्लवीत झाल्याची भावना प्रास्ताविकातून व्यक्त करण्यात आली. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना नागरिक धोकादायक अवस्थेतील वाड्यांमध्ये रहात आहेत. त्यांना स्वमालकीच्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरीत करणे आणि शाळा, उद्याने, मैदान, वाचनालये, प्रशस्त रस्ते यासारख्या सुविधा याच परिसरात उपलब्ध करून देऊन रहिवाशांचा रहाणीमानाचा दर्जा सुधारणे म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट असल्याचे आमदार फरांदे यांनी दिली. भदाणे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष सांगितले. त्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना ऐकण्यात आल्या.

इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट तीन महिन्यांत मिळावा

पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिकमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाणार असून चार ते साडेचार टक्के एफएसआय मिळविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. गावठाणाच्या धाटणीचा विचार करून आपण क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करीत असल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी एक एजन्सी नेमावी लागणार असून महापालिकेने तीन महिन्यांत हा रिपोर्ट सादर केला तर त्यावर त्यापुढील महिनाभरात नागरिकांना सूचना आणि हरकती मांडता येतील. त्यामुळे याबाबत महापौर आणि सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आठ फेब्रुवारी रोजीच दिल्याची माहितीही फरांदे यांनी यावेळी दिली.

आमच्या भावनांशी खेळू नका

आम्ही २० वर्षांपासून क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत ऐकत आहोत. नाशिक गावठाणातील नागरिक गरीब आणि भोळसर आहेत. त्यांना क्लस्टर डेव्हलपेंटची आश्वासने दिली जातात. परंतु, ते प्रत्यक्षात होणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे मत नंदन भास्कर या तरुणाने मांडले आणि बैठकीचा नूर पालटला. तुम्ही चार टक्के एफएसआय मिळेल, असे सांगत आहात. याच सरकारने नाशिक गावठाणचा एफएसआय दोनवरून दीडवर आणला असल्याकडेही त्यांनी लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांचे लक्ष वेधले. त्यानंतर सुरू झालेला सूचना आणि अपेक्षांचा सिलसिला सुरूच राहिला.

नाईलाजाने वाड्यात राहतो

वाडा कोसळल्याने ज्या दोन तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी शंकर बर्वे यांनी केली. पूररेषेमध्ये असल्याचे कारण सांगत वाड्यांच्या डागडुजीकरीता बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव धोकेदायक वाड्यांमध्ये रहावे लागते. बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी काही करा अशी अपेक्षा स्वाती कुलकर्णी यांनी व्यक्त केली. जुन्या नाशकातील रहिवाशांना टुकार समजून बँका कर्ज प्रकरणे फेटाळून लावतात, याकडे दिनेश चव्हाण यांनी लक्ष वेधले. सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून पुन्हा प्रशस्त ठिकाणी बैठक बोलवा, अशी मागणी काही नागरिकांनी केली. तर काहींनी गावठाणाचा कमी केलेला एफएसआय पूर्ववत करावा अशी मागणी केली.

क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष

किमान ३० वर्षे जुन्या इमारती, घरांचा यामध्ये समावेश

वाडेमालक, इमारतमालक क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतात

अनधिकृत परंतु इमारतींची मालकी असलेल्या रहिवाशांनाही सहभागाची संधी

परिसरातील २५ टक्के स्लम एरियाचाही यात समावेश

१२ वर्षांहून अधिक वास्तव्य असलेले भाडेकरूही लाभार्थी

भाडेकरूंना किमान ३० चौरस मीटरचे घर देणे बंधनकारक

घरमालकाला स्वत:ला इमारत बांधून एफएसआय विकणे शक्य

घरमालकांना घर आणि दुकानमालकांना दुकानच मिळणार

को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापून किंवा विकसकावर जबाबदारी सोपवून विकास शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एकलहरे’ला लागणार टाळे!

0
0

उत्तर महाराष्ट्रातील वीज प्रकल्प दोन वर्षांत होणार बंद

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे येथील प्रस्तावित ६५० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प भुसावळला पळविल्यानंतर आता आहे त्या वीज निर्मिती प्रकल्पाला देखील येत्या दोन वर्षांत टाळे लागण्याची शक्यता आहे. खुद्द महानिर्मिती कंपनीनेच राज्य विद्युत नियामक आयोगाकडे लेखी स्वरुपात तसे कळविले असल्याने एकलहरे येथील वीज निर्मितीची ओळख कायमची पुसली जाणार आहे. महानिर्मितीच्या मुंबईतील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकलहरेसोबतच भुसावळचाही वीज निर्मिती प्रकल्प कायमचा बंद करून विदर्भातील उमरेडला नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

एकलहरे आणि भुसावळ या दोन्ही वीजनिर्मिती प्रकल्पांना २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने टाळे लावण्याचा निर्णय महानिर्मिती कंपनीने घेतला आहे. तसे लेखी पत्रच कंपनीने राज्य विद्युत नियामक आयोगाला दिले आहे. या दोन्हीही ठिकाणचे वीज निर्मिती प्रकल्प बंद करून विदर्भातील उमरेड येथे नव्याने ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. एकलहरे वीज निर्मिती प्रकल्पाची मुदत २०१९ मध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यात नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारावयाचा झाल्यास त्यासाठी एकलहरेलाच प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन विद्यमान ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच भुसावळ येथे नवीन वीजनिर्मिती प्रकल्पाचे अनावरण झाले. त्यामुळे एकलहरेच्या नवीन वीज निर्मिती प्रकल्पाचे आश्वासन केरात गेले आहे.

..

एकलहरे व्हेंटीलेटरवर

एकलहरे वीज निर्मिती केंद्र सध्याच व्हेंटीलेटरवर आहे. या वीज निर्मिती केंद्राला गेल्या काही महिन्यांपासून कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेशा कोळशाचा साठा नसल्याने या वीज निर्मिती केंद्राची स्थिती सुपर क्रिटीकल झाली आहे. त्या कोळशापैकी काही कोळसा विदर्भातील खासगी कंपनीला विकण्याचा व त्या कंपनीकडून वीज खरेदीचा करारही यापूर्वीच झालेला आहे. सध्या केवळ एकाच संचातून वीजनिर्मिती सुरू आहे. दोन संच काही वर्षांपूर्वीच कायमस्वरुपी बंद करण्यात आलेले आहेत. एक संच देखभाल दुरुस्तीसाठी कायमच बंद असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून मद्यतस्करी; पाच लाखांचा माल जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आषाढी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधमार्गाने होणाऱ्या मद्यतस्करीवर कारवाई करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी क्रमांक तीनच्या भरारी पथकाने तब्बल ४ लाख ९० हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण-सुरगाणा रोडवर ही कारवाई केल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

दिनेश महाले आणि माणिराम पवार या दोघा मद्य तस्करांना वाहनांसह अटक करण्यात आली आहे. ओम्नी कार (एमच १५ डीएस ९३८६) आणि मारुती कार (जीजे ०५ एफएफ ५०६५) या दोन वाहनांमधून मद्यतस्करी केली जात होती. या वाहनांमधून जॉन मार्टिन व्हिस्किच्या ७२० बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ५४ बाटल्या, मॅकडोल एक व्हिस्किच्या ९६ बाटल्या, बॅकपाईपर व्हिस्किच्या ९६ बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्किच्या ९६ बाटल्या, हायवर्डस स्टॉग बियरच्या ४८० बाटल्या, नॉकआऊट स्टॉग बियरच्या १४० बाटल्या, टुबर्ग स्टॉग बियरच्या १२० बाटल्या असा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग दिंडोरी भरारी पथक क्रमांक तीनचे दुय्यम निरिक्षक एस. बी. शिंदे, महेश सातपुते, लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, सुनिता महाजन या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी ऊंबरठाण येथे कारवाई केली. यावेळी केवळ दमण या ठिकाणी विक्रीसाठी परवानगी असलेली व महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेल्या मद्याचा साठा या पथकाने हस्तगत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्टिलरी स्कूलमध्ये ‘वेपन इंजिनीअरिंग’

0
0

युजीसाठी ४००, तर पीजीकरिता १०० जागांना मंजुरी

..

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

..

- या शैक्षणिक वर्षापासूनच अभ्यासक्रला सुरुवात

- विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकणार

- इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा बंधनकारक

नाशिक : देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर 'वेपन इंजिनीअरिंग' अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे या संस्थेत यंदापासून 'वेपन इंजिनीअरिंग'चा अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे.

'वेपन इंजिनीअरिंग' या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी 'एआयसीटीई' आणि 'डीटीई' या संस्थांनी आर्टिलरी स्कूलला अगोदरच मान्यता दिली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी देवळाली आर्टिलरी स्कूलमध्ये पदवीस्तरावर (युजी) ४०० जागा, तर पदव्युत्तर स्तरावर (पीजी) १०० जागांना मान्यता देण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) या संस्थांच्या मान्यतेनंतर केवळ राज्य शासनाच्या परवानगीची या अभ्यासक्रमाकरिता प्रतीक्षा होती. तो अडसरही आता दूर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून या अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत संलग्न असणार आहे. सद्यस्थितीत देवळाली आर्टिलरी स्कूलमध्ये 'वेपन सिस्टीम' संदर्भात प्रमाणपत्र आणि पदविका हे पुणे विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

..

संस्थास्तरावरच प्रवेश प्रकिया

या अभ्यासक्रमासाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे शासनाकडून शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना होऊ शकणार नसल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याशिवाय हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा आदी सुविधा अभ्यासक्रम सुरू करण्याअगोदरच उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या अविष्कार, वेदांतची आघाडी

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या सलग्नतेने 'द अमॅच्युअर चेस असोसिएशन नाशिक' यांच्यातर्फे आयोजित २५ वयोगटाखालील बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या अविष्कार वानखेडे व वेदांत पिंपळखरे यांनी आठव्या फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील एकूण ९ फेऱ्यांपैकी ७ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, अविष्कार वानखेडे (६. ५ गुण, नाशिक), रोहन जोशी (६.५ गुण, पुणे), इंद्रजीत महेंद्रकर (६ गुण, औरंगाबाद), हिमांशू छाब्रा (६ गुण, अमरावती), वेदांत पिंपळखरे (५.५ गुण, नाशिक) या खेळाडूंनी आठव्या फेरीत प्रवेश केला आहे.

शहरातील व्ही.एन. नाईक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथजी मुंढे कॉलेज येथे ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी यातून संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन के. व्ही. एन. शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक शरद बोडके, अॅड. तानाजी जायभावे, प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे तसेच बुद्धिबळ संघटनेचे सचिव संदीप नागरे, अध्यक्ष भरत वानखेडे, उपाध्यक्ष ओंकार जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेसाठी राज्यातून ३१ जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले असून, १८५ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावीत आहेत. स्पर्धेत ११५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू खेळत असून, या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांचे चेहरे फुलले स्मितहास्याने

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

''माझ्याकडे वह्या नाहीत. तीन विषयांसाठी मी एकच वही वापरते. मिशन एज्युकेशन उपक्रमात आम्हाला वह्या आणि अन्य शालेयोपयोगी साहित्य मिळाले. आता मी अधिक मन लावून अभ्यास करेन'', ही प्रातिनिधिक भावना आहे सातवीत शिकणाऱ्या पुष्पा बेंडकोळी या विद्यार्थिनीची. नव्हे गाळोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २५० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही हीच भावना झळकत होती. निमित्त होते मिशन एज्युकेशन उपक्रमांतर्गत आयोजित शालेय साहित्य वाटपाचे.

सद्गुरू देव श्री सतपालजी महाराज प्रणित मानव उत्थान सेवा समितीतर्फे आणि विभुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर मिशन एज्युकेशन उपक्रम राबविला जात आहे. नाशिक तालुक्यातील गाळोशी इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेतही हा उप्रकम राबविण्यात आला. पहिली ते आठवीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री हंस कल्याण धाम आश्रमाच्या प्रमुख साध्वी हिराजी, साध्वी मुक्तिकाजी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

मिशन एज्युकेशन या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये रिकामे बॉक्स ठेवण्यात आले. त्यामध्ये जमा झालेले शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. गाळोशी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी काश्यपी धरणात गेल्या असून मोलमजुरी करून हे धरणग्रस्त चरितार्थ चालवितात. त्यांच्या मुलांना वह्या, पाटी, पेन्सिल, पेन यासारख्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने आमचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याची भावना आठवीतील गौतम धोंडे याने व्यक्त केली. श्रीनिवास बुद्धलवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी मानवधर्म प्रेमी, मिशन एज्युकेशनचे युवा पथक आणि शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अभ्यासासह योगाही शिकवा

यावेळी मार्गदर्शन करताना साध्वी हिराजी म्हणाल्या, की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत योगाही शिकवावा. सत्याच्या मार्गावर चालण्याचा आग्रह धरायला हवा. विद्यार्थ्यानी दररोज आई-वडिलांना नमस्कार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटचे चारच दिवस शिल्लक

0
0

शेवटचे चारच दिवस शिल्लक

लवकरच रंगणार प्राथमिक फेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलागुणांसह, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या साथीने 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेतून तरुणींना चंदेरी दुनियेतल्या करिअरचा मार्ग निवडता येतो. या स्पर्धेची प्राथमिक फेरी लवकरच रंगणार आहे. त्यासाठीच्या रजिस्ट्रेशनसाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्यापही स्पर्धेचे रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी आजच रजिस्ट्रेशन करा आणि सज्ज व्हा झळाळता मुकूट परिधान करण्यासाठी.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरि पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी लवकरच होणार आहे. मॉडेलिंग, अभिनय तसेच इतरही ग्लॅमरस करिअरची संधी आजमावण्याची इच्छा असणाऱ्या शेकडो तरुणींनी श्रावणक्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक तरुणींनी सिनेमा, नाट्य, मालिका, मॉडेलिंग या क्षेत्रात पदार्पण केले आहे. सेलिब्रेटी दुनियेत पाऊल टाकण्यासाठी ही स्पर्धा तरुणींना हक्काचे व्यासपीठ देते. तुम्हालाही ग्लॅमरस करिअर आणि सेलिब्रेटी आयुष्य जगायचे असेल तर आजच श्रावणक्वीन स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करा. प्राथमिक फेरीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाणून घेण्यासाठी वाचत राहा, महाराष्ट्र टाइम्स.

..

असे करा रजिस्ट्रेशन

रजिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये नोंदणी करायची आहे. पोस्टकार्ड साइज दोन फोटो आणि आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स सोबत आणावी. एक फॉर्म भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशनची मुदत १६ ऑगस्टपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधू शकतात.

..

यंदा 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'

श्रावणक्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून सिटी फिनालेसाठी स्पर्धकांची निवड होईल. या स्पर्धकांना सिटी फिनालेच्या ग्रुमिंग सेशनमध्ये सहभागी व्हायचे आहे. यामधून अंतिम तीन श्रावणक्वीन निवडल्या जातील. या श्रावणक्वीनना मुंबईत होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी जावे लागेल. ग्रँड फिनालेसाठीचे ग्रुमिंग सेशन मुंबईत होईल. ही ग्रँड फिनाले नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे या विभागाच्या श्रावणक्वीन विजेत्यांमध्ये होईल. यातून 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' निवडण्यात येईल. या सोहळ्याचे प्रक्षेपण झी युवा वाहिनीवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संविधानाची प्रत जाळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा‘श्रीनिवास पांडे विरोधात गुन्हे दाखल करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे व त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मुक्तिभूमी व्याख्यानमालेचे पदाधिकाऱ्यातर्फे शहर पोलिसांकडे करण्यात आली. दिल्ली येथे जंतरमंतर मैदानात भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या. हे कृत्य असंविधानिक असून, याची माहिती असूनही समाजकंटकांनी वातावरण दूषित करण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचे व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. देशातील वातावरण दूषित करण्याचा व जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. यामुळे या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कडक शासन करावे. या समाजकंटकांवर कडक कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संतोष घोडेराव, शरद शेजवळ, सुनील खरे, गोरख घुसळे, सुभाष गांगुर्डे, रविराज गोतीस, बापूसाहेब वाघ, जितेश पगारे, कैलास बनसोडे, सिद्धार्थ आहेर व स्वाभिमानी रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकमधील मदरशांना फंडिंग अधिक!

0
0

दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तानात इस्लामची शिकवण देण्यासाठी मदरसे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. तेथील काही नागरिक आणि संस्थांकडून या मदरशांना फंडिंग केले जाते. यातूनच मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवारा, अन्न व वस्त्र उपलब्ध करून दिले जातात. पाक सरकारची जेवढी करवसुली होत नाही त्यापेक्षा अधिक फंडिंग तेथील मदरशांना मिळते. पाक सरकारच्या राजकीय प्रश्नांमध्ये मदरसे हा कायम चर्चेचा विषय ठरतो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांनी केले.

एस. एम. रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन, आयाम आणि कुर्तकोटी शंकराचार्य न्यास यांच्यातर्फे ऑस्कर आणि एमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात झाला. यावेळी मंचावर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, शंकाराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ.आशिष कुलकर्णी, फाउंडेशनचे सचिव शशांक मणेरीकर होते.

फाउंडेशनच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी दिग्दर्शक त्रिवेदी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्रिवेदी म्हणाल्या की, चित्रपटाच्या शुटिंगवेळी मी स्वत:ची ओळख लपवली होती. दुबईतील हेना खान असल्याचे सांगत मी मदरसामध्ये जाऊन शुटिंग करत होती. तेव्हा, मला पाकमधील नागरिकांमध्ये भारतीयांबाबत कोणताही रोष असल्याचे जाणवले नाही. किंबहुना तेथील रेड मॉस्कच्या नावाखाली मरणोत्तर जन्नत लाभेल यासाठी विद्यार्थ्यांना कायम धार्मिक गोष्टींत अडकवून ठेवणे. हे मदरशांमध्ये सुरू आहे. हा प्रकार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासाठी तेथील काही नागरिक झगडत आहेत. हेच प्रश्न त्यांच्या समोर महत्त्वाचे आहेत. दरम्यान, उपस्थितांनी त्रिवेदी यांच्या धाडसाची स्तुती करत प्रश्न विचारत चित्रपटातील प्रवास जाणून घेतला.

असा होता चित्रपटाचा प्रवास

मुंबईतील '२६/११'च्या हल्ल्यात जवळची मैत्रिण गमावल्यानंतर पाकमधील दहशतवादी कारवायांबाबत त्रिवेदी यांनी माहिती संकलन सुरू केले. पाकच्या रेड मॉक्सच्या नावाखाली मदरशांमध्येच धार्मिकता आणि जिहादचे शिक्षण मिळत असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी तेथील मदरशांमध्ये गुप्तपणे जाऊन शुटिंगची करण्यास सुरुवात केली. हळूहळू तेथील ओळखी वाढायला लागल्या आणि त्यांना हवी ती मदत मिळत गेली, असा 'अमंग द बिलिव्हर्स' चित्रपट साकारला. यामध्ये, पाकमधील मदरसे आणि शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणातील तफावत दाखविण्यात आली आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफर्सचा ‘मुहूर्त’ तुडुंब

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे मागील काही वर्षांपासून ऑगस्ट महिन्याचा पूर्वाध ग्राहकांच्या उत्साहाने ओसंडून वाहतो. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ व्यावसायिकांमध्ये लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे. व्रतवैकल्यांचा श्रावण, त्यात रविवारची सुटी. यामुळे ग्राहकांच्या उत्साहाला भरते आले. विक्रेत्यांनीही गर्दी 'एनकॅश' करण्यासाठी विविध ऑफर्सची बरसात केलेली आहे. शहरातील मॉल्स, मोठी दुकाने यासह मेनरोडवर ग्राहकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, लक्ष्मीपूजन या साडेतीन मुहूर्तांवेळी मोठ्या व्यावसायिकांकडून आणि मॉल्सकडून आकर्षक ऑफर्स जाहीर होतात. गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरही या ऑफर्स दिल्या जाऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाला लागूनच श्रावणातील व्रतवैकल्ये, पारशी नववर्ष दिन आणि बकरी ईद साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या ऑफर्सचा नवा मुहूर्त ग्राहकांनी साधला. वीकेंडला या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शहरातील बाजारपेठ व मॉल्समध्ये ग्राहकांनी तुफान गर्दी केली. सण-उत्सवांच्या मुहुर्तावर विविध व्हरायटीजचे कपडे बाजारात उपलब्ध झाले आहेत. या कपड्यांवर २० ते ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. मॉल्समध्ये कॅशबॅक, डिस्काउंट, गेट वन बाय वन फ्री अशा अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शनिवारी आणि रविवारी ग्राहकांचे पाय मॉल्सकडे वळत होते. मॉल्समध्ये कपड्यांवर १० ते ५० टक्के डिस्काउंटच्या ऑफर दिल्या जात होत्या. लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल, फ्रीज, ओव्हन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ४० ते ६० टक्के डिस्काउंट दिला जात. मॉल्समध्ये काही वस्तूंवर कॅशबॅक देण्यात येत आहे. फूड, कोल्ड्रिंक, शॅम्पू, साबण यांवर ४० टक्के कॅशबॅक व फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. मॉल्समध्येही कपड्यांवर कॉम्बो ऑफर्स मिळत आहे. या सर्व ऑफर्सचा फायदा घेत खरेदीची लयलूट करण्यासाठी ग्राहकांनी वीकेंडला मॉल्स व दुकानांत गर्दी केली होती.

मॉल्समध्ये रांगा

शहरातील विविध मॉल्समधल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी रविवारी गर्दी केली होती. काही मॉल्सनी १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सवलतीच्या ऑफर्स दिल्याने त्या साधण्यासाठी दुपारच्या सुमारास ग्राहकांची गर्दी वाढली होती. यावेळी ग्राहकांना रांगा लावून मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. खरेदीनंतर बिल करण्यासाठीदेखील ग्राहकांना तासभर रांग लावावी लागली.

सोने, चांदी अन् वाहन खरेदीला पसंती

ऑफर्सच्या नव्या मुहुर्तानिमित्त सोने, चांदी आणि वाहन यांच्यावरही ऑफर्स देण्यात येत आहेत. सोने, चांदीच्या घडणावळीवर २० ते ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच वाहन खरेदीवरही आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे सोने, चांदी आणि वाहन खरेदीकडेही रविवारी ग्राहकांची पसंती दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्र. के. अत्रे म्हणजे विद्यापीठच!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आचार्य प्र. के. अत्रे म्हणजे केवळ हसवणारा माणूस नव्हता; तर त्यांच्या विद्वत्तेलाही तोड नव्हती. एक माणूस आपल्या एका आयुष्यात इतक्या विविध भूमिका पार पाडू शकतो. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. जेथे हात टाकणार तेथे यशच मिळवणार, असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्यापीठच होते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

मराठी साहित्य क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये सर्वोच्च योगदान देणारे जेष्ठ पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२० व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये अत्रे कट्ट्याचा शुभारंभ करण्यात आला. सावाना आवारातील स्व. मु. शं औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. 'कुटुंब रंगलाय काव्यात' हा विख्यात कार्यक्रम सादर करणारे विसुभाऊ बापट व सावाना सभासद अनिरुद्ध जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. मुंबई, ठाणे व पुणे परिसरात अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आता नाशिकमध्येही असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

भावे पुढे म्हणाले की, अत्रेंना आचार्य ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली. तर लतादिदींना गानकोकिळा, सावरकरांना स्वातंत्र्यवीर या पदव्या अत्रेंनी दिल्या. 'देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर' हा अभंग अत्रेंनी लिहिलेला आहे केवळ त्यांनी शेवटच्या ओळीत 'तुका सांगे मूढ जना' ही ओवी लिहिली, आपण सांगतोय म्हणून लोक का ऐकतील. तुकाराम महाराजांनी सांगितले तर मात्र लगेच ऐकतील या आशावादामुळे अत्रेंनी ते लिहिलेय. आयुष्यभर तुकारामांची गाथा उशाशी घेऊन हा माणूस झोपला. ठसठशीत टपोरे अक्षर ही अत्रेंची ओळख. आयुष्यात एकदाही या माणसाने अशुध्द लेखन केले नाही. दिनुचे बील ही कथा अत्रेंनी लिहिली, अत्रे कवी होते, विडंबनकार होते, प्रस्तावनाकार होते. कवी बी यांनी आयुष्यात केवळ ७४ कविता लिहिल्या या कवितेच्या पुस्तकाला ६४ पानांची प्रस्तावना अत्रेंनी लिहिली आहे. या प्रस्तावनेला त्याकाळी मुंबई विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. अशा प्रचंड उंचीचा हा माणूस होता, असेही भावे म्हणाले.

यावेळी संपादक अत्रे या विषयावर नरेंद्र कोठेकर यांनी विचार मांडले. अत्रे कट्ट्याच्या उद्घाटनानंतर विडंबन, संगीत एकच प्याला याबाबत उमेश घळसासी, माधुरी गोडबोले, शिबानी जोशी, उमा बापट आणि विसुभाऊ बापट या कलाकारांनी अभिवाचन केले. या उपक्रमासाठी सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेचे सहाय लाभले. याप्रसंगी सावानाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची उतरली झिंग!

0
0

चाळीस जणांवर पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आषाढ महिन्यातील शेवटचा दिस गोड व्हावा' म्हणून झटणाऱ्या तळीरामांच्या आनंदावर पोलिसांनी विरजण पाडत कारवाई हाती घेतली. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसात मद्य पिऊन भरधाव वेगात वाहन हाकणाऱ्या ४० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी काह टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

श्रावण महिन्यास धार्मिक महत्त्व असल्याने या काळात मांसाहार आणि मद्याची मागणी कमी होते. मात्र, श्रावण सुरू होणार म्हणून आषाढ मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गटार अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मद्य रिचवण्याची स्पर्धा तळीरामांमध्ये सुरू असते. हॉटेलमध्ये हाणामाऱ्यांपासून गंभीर अपघातापर्यंतच्या घटना सर्रास घडतात. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गटारी अमावस्येची ही बाजू लक्षात घेत शहर वाहतूक शाखेने शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस तळीरामांना रडारवर घेतले. मद्यप्राशन करून भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्या ४० जणांवर पोलिसांनी मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या दरम्यान, काही टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आली.

- अजय देवरे,

सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images