Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वीजचोरीत एक वर्षाची शिक्षा अन् ३२ लाखांचा दंड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आइस्क्रीम फॅक्टरीसाठी असलेल्या वीजमीटरमध्ये काही तरी केमिकल टाकून त्याचा ९९ टक्के वेग कमी करणाऱ्यास जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत एक वर्षाची कैद, तर तब्बल ३२ लाखांचा दंड ठोठावला आहे. २०१५ मध्ये उघडकीस आलेल्या या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. टी. पांडे यांच्या कोर्टात सुरू होता.

श्यामलाल जगदीशचंद्र शर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शर्माची पंचवटीत सावरिया आइस्क्रीम नावाची फॅक्टरी होती. यासाठी घेतलेल्या वीज मीटरमध्ये काही तरी केमिकल टाकून फेरफार करण्यात आला. यामुळे वीजमीटरची गती ९९ टक्के कमी झाली होती. २०१५ मध्ये वीज महामंडळाच्या भरारी पथकाने शर्माच्या फॅक्टरीवर छापा मारला असता, ही बाब उघडकीस झाली. शर्माविरोधात नाशिकरोड येथील वीज महामंडळासाठी असलेल्या विशेष पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश पांडे यांच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली. बचाव पक्षाने याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा मुद्दा मांडला. मात्र, भरारी पथकातील दोन इंजिनीअर, तसेच फिर्यादी आणि तपासाधिकारी अशा चार जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे अॅड. योगेश कापसे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी-पुरावे ग्राह्य धरत कोर्टाने शर्माला दोषी ठरवले व एक वर्षाची कैद आणि तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. काही महिन्यांपूर्वी गृह विभागाने राज्यातील असे १४ पोलिस स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नाशिकरोड येथील पोलिस स्टेशनचा समावेश होता. हे पोलिस स्टेशन बंद झाल्यानंतर एक मोठा निकाल आल्याची भावना व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनी बाजारात केली जनजागृती

0
0

सिन्नर : धुळे येथील घटनेनंतर सिन्नर पोलिसांनी पत्रके वाटून जनजागृती केली. मुले पळविणारी टोळी समजून काही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी रविवारी बाजारात पत्रके वाटण्यात आली. या प्रसंगी सिन्नर पोलिस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संगीता गिरी, सहाय्यक निरीक्षक मोकळ, सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार सचिन गवळी, राहुल निरगुडे आदींनी जनजागृती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बहुतांची अंतरे

0
0

बहुतांची अंतरे नाशिक

००००००००००

अन्यथा 'ब्रेन ड्रेन' अटळ!

'संशोधकांना ब्रिटनकडून पायघड्या' (मटा - ८ जुलै) ही बातमी वाचली. देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्याची व प्रगती आलेख उंचावण्याची क्षमता केवळ संशोधनात आहे. म्हणूनच योग्य सोयीसुविधा व संधी देत पोषक वातावरण निर्माण करून देत जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाचा आपल्यासाठी फायदा करून घेणे प्रगत देशांना महत्त्वाचे वाटते. प्रगत देश व अप्रगत किंवा प्रगतीशील देश यामध्ये हाच फरक आहे. प्रगतीशील देशात याविषयीचे दिलासादायक चित्र नाही. मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्राचे खच्चीकरण, निधीकपात यासारख्या मुद्द्यांमुळे संशोधकांना हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते, तर दुसरीकडे उच्चपदस्थ राजकारणी दुराभिमान, छद्मविज्ञानाला बळ देत भूतकाळातील आपल्या तथाकथित कर्तृत्वाचे व गतवैभवाचे सातत्याने अवास्तव गोडवे गात असतात. समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टीकोन व शोधकतेचा अभाव, परंपरांचा दुराभिमान व त्यातून निर्माण होणाऱ्या वाढत्या अंधश्रद्धा ही या परिस्थितीस बळ देणारी कारणे ठरतात. भारतीय वैज्ञानिक परदेशात जाऊन कर्तृत्व गाजवतात हे खरेच; मात्र त्यांच्यासाठी आपल्याकडेही संशोधनात्मक पोषक वातावरण निर्माण होईल की नाही, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा 'ब्रेन ड्रेन' होणे अटळ आहे.

- राजेंद्र फेगडे, नाशिकरोड

उदत्तीकरण कशासाठी?

देशद्रोहाचे आरोप असलेला, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवारी करून आलेल्या, कधी काळी आकंठ व्यसनात बुडालेल्या, ज्या विविध उद्योगांमुळे आई, वडील, पत्नी, बहीण अशा सगळ्यांना प्रचंड यातना देणाऱ्या परंतु, सिनेसृष्टीत दबदबा असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे व्यवसाय करीत आहे. यात अभिनेता रणबीर कपूरने संजूबाबाची भूमिका छान केली. परेश रावल यांनी सुनील दत्त तर मनीषा कोईरालाने नर्गिस दत्त यांच्या भूमिकेला न्याय दिला, अशा कौतुकाच्या बातम्याही झळकत आहे. मुळात आजच्या तरुणाईपुढे असा कोणता मोठा आदर्श या चित्रपटाने ठेवला आहे? आपला जीवनपट आहे तसा प्रेक्षकांसमोर मांडल्याचा ढोल बडविला तरी त्यातील भंपकपणा लपून राहणार नाही. चित्रपटात फक्त रायफलचा उल्लेख करणारा संजूबाबा सहा हॅण्डग्रेनेडबाबत सोयिस्कर मौन का बाळगतो? जोशमध्ये आणि चुकीच्या लोकांना साथ देत मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटातील कटाचा आपणही भाग होतो, हे लपविण्यामागील उद्देश काय? संजय दत्त यातून बाहेर काढण्यासाठी बड्या बड्यांनी मदत केल्याचेही कोणीही नाकारू शकत नाही. आश्चर्य तर भारतीय प्रेक्षकांचे वाटते. कोणतेही समाजभान न जपणारा, व्यसनाधीन व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या या चित्रपटासाठी त्यांनी केलेली गर्दी व्यथित करणारी आहे.

- सुदर्शन गांगुर्डे, सिडको, नाशिक

गरज स्वयंशिस्तीची

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत आहे तसेच जग जवळ येऊ लागले आहे. पण यात माणूस एकमेकांपासून वेगाने दूर होत आहे. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसे सोशल मीडियाच्या (व्हॉट्सअॅप / फेसबुक) रोगाने झपाटली गेली आहेत. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या खासगी आयुष्यात कोणीही डोकवणं असमर्थनीय आहे. शेवटी तंत्रज्ञान आपल्यासाठी विकसित केले आहे, याचा वापर आपण काळजीपूर्वक करायचा, की तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपले जीवनातील सर्व पत्ते उघडे करायचे, हे आपणच ठरवायला हवे. कुठे तरी बंधन, स्वयं शिस्त घालणे आवश्यक आहे.

- अमित मानवी, इंदिरानगर, नाशिक

निरर्थकतेसाठी वापर नको

शासकीय पातळीवर उपाय म्हणजे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील अनेक वादग्रस्त मेसेज, बनावट व्हिडिओ, बदनामीकारक मजकुराचे प्रमाण व्हायरल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोशल मीडियाचा वापर नेमका कशासाठी करावा याचा विसर पडून राजकरण व निरर्थक वादविवादासाठी ही माध्यमे वापरली जात आहेत. त्यात सातत्याने वाढही होत आहे. आता तरी याचा उपयोग सद्विचारांचा प्रसार, कालसुसंगत विचार व चांगल्या उपक्रमांना बळ देण्यासाठी व्हावा, एवढीच अपेक्षा!

- उमा काळे, सातपूर कॉलनी, नाशिक

कट प्रॉक्टिसला हवा लगाम

आपल्याकडे देवानंतर डॉक्टरवर विश्वास ठेवला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकतेचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. पेशंटच्या भीतीचा फायदा घेऊन गरज नसलेल्या वेगवेगळ्या टेस्ट करून अक्षरशः लूट केली जाते. यात पेशंटच्या आर्थिक परिस्थिती, मनाची स्थिती याचाही विचार केला जात नाही. पूर्वी 'फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना होती; ती आता संपुष्टातच आली आहे. अगदी साध्या दुखण्यासाठी जरी दवाखान्यात गेले तरी आर्थिक पिळवणूक केली जाते. सर्व रिपोर्ट 'नॉर्मल' आले या आनंदात पेशंट हॉस्पिटलबाहेर पडतो. पण एवढ्या टेस्टची खरोखरच गरज होती का? याचे उत्तर कोणी देत नाही. अर्थात, यात काही अपवादही आहेच. तसेच अनेक डॉक्टर्स जनरिक औषधे लिहून देण्याबाबत रस दाखवितात का? विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याचा आग्रह कशासाठी? म्हणून या कट प्रॉक्टिसला लगाम घालणे आवश्यक आहे.

- प्रशांत कुलकर्णी, मनमाड

दिसू द्या कायदाचा धाक!

सोशल मीडियांवरील एक संदेश समाजमनाची माथी भडकाविण्यासाठी किती घातक ठरू शकतो, हे धुळे, नागपूरमधील ताज्या घटनांवरून दिसून आले आहे. 'वरातीमागून घोडे', या उक्तीप्रमाणे पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हेगारांचा जलद शोध घ्यावा, त्याच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर तपास कार्यात राजकारणाचा शिरकाव होऊ नये. नागरिकांनीही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. जमावाने या पाच जणांना मरेपर्यंत मरून टाकले आणि कायदा हातात घेऊन काय मिळवले? खरे तर नागरिकांनी सोशल मीडियावर असा मजकूर टाकू नये. मजकुरांच्या विश्वासार्हतेबाबत खातरजमा करावी. या प्रकरणी सखोल चौकशी करून प्रत्येक दोषींवर कारवाई करण्यात यावी. या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदारांना पोलिस संरक्षण द्यावे. शहरातील विविध भागातील भिक्षेकऱ्यांनी धसका घेऊन वस्त्या हलविल्या आहे. वासुदेव व्यवसाय करणाऱ्यांनी करायचे काय? भटक्या कुटुंबांनी कशाचा आधार शोधावा? यावर कायद्याने आपल्या कृतीतून दोषींना जलद कठोर शिक्षा करावी.

- नानासाहेब मंडलिक, ओझर, निफाड

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोहल्यावर चढण्यापूर्वी काळाने घातली झडप

0
0

रेल्वेगाडीच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील संसरी गावातील तरुणाचा रुळ ओलांडत असताना अदांज न आल्याने रेल्वेगाडीचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याचा पुढच्या रविवारी (दि. १५) विवाह होणार होता. मात्र, विवाहापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नीलेश अशोक गिते (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे तो भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवलाली कॅम्पकडे येत होता. परंतु रुळ ओलांडत असताना त्याला गाडीचा अदांज आला नाही. रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झला. नीलेशचा येत्या रविवारी (दि. १५) विवाह होणार होता. घरात एकीकडे त्याच्या विवाहाची लगबग सुरू होती; मात्र काळाने बोहल्यावर चढण्याआधीच हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभावाचा नीलेश हा ज्येष्ठ शिवसैनिक रमेश गिते यांचा पुतण्या होता. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिस डायरीमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ टक्केच कर्जवाटप!

0
0

खरीप कर्जवाटपासाठी बँकांपुढे अडचणी

- जुलैपर्यंत लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न

- पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव अल्प प्रमाणात

- पीककर्जासाठी बँकांचे २६२५ कोटी ७० लाखांचे लक्षांक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी पीक कर्जवाटप संथगतीने सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारी पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. खरीप पिकाच्या लक्षांकाच्या जवळपास कर्जवाटप व्हावे, यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे जुलैपर्यंत खरीप हंगामाचे पीक कर्जवाटप व्हावे, यासाठी बँक अधिकारी कामाला लागले आहेत. पण, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव अल्प प्रमाणात आल्यामुळे बँकांची अडचण वाढली आहे.

पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्षांक ठेवले असतांना प्रत्यक्षात २७ टक्केच वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक याअगोदर सर्वाधिक पीककर्ज देत होती. पण, बँक अडचणीत असल्यामुळे या बँकेकडून कर्जवाटपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँक व खासगी बँकेकडे कर्जवाटपाची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी या बँकांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवणे अपेक्षित आहे. पण, या सोसायटींनी याद्याच न पाठवल्यामुळे बँकेला कर्जदार शोधणे अवघड झाले आहे. त्यात संपर्क नंबर व पत्ता नसल्यामुळे बँक या शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकत नाही. त्याचप्रमाणे काही बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले आहे.

या खासगी व राष्ट्रीयीकृत बँकेत शेतकरी खातेदार नसणे ही सुध्दा अडचण झाली आहे. प्रस्ताव आल्यानंतर खाते उघडणे व त्यानंतर कर्जाच्या प्रस्ताव मंजूर होत असल्यामुळे यातही वेळ जात असल्याचे बोलले जाते. एकीकडे कर्ज नाही, तर दुसरीकडे पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ७६ हजार ९२८ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी २७.११ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही पावसामुळे निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे कपात बँकेला महागात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्यूआयएसनुसार स्टॉक स्टेटमेंट न दिल्यामुळे खात्यातून ८ लाख ८१ हजार रुपये कापून घेणे बँक ऑफ बडोदाला महागात पडले आहे. ग्राहक न्यायमंचाने हे पैसे खातेदाराला परत करण्याबरोबरच ९ टक्के व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक श्रम व मानसिक त्रासापोटी ७ हजार व अर्जाचा खर्च तीन हजार असा १० हजारांचा दंडही ठोठावला आहे.

नाशिकरोड येथील जमुना इन्फ्रा. प्रोजेक्टतर्फे राजेश मावजी पटेल यांनी पिंपळगाव बहुला येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेविरूद्ध तक्रार दिल्यानंतर हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. पटेल यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बँकेकडून कॅश क्रेडिट फॅसिलिटी घेतली होती. त्यामुळे खात्याच्या नियमांचे नेहमी पालन केले. दर महिन्याला मुदतीत स्टॉक स्टेटमेंट दिले. पण, २७ जून २०१६ ला बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता व विना परवानगी त्यांच्या खात्यातून ८ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम क्यूआयएस स्टेटमेंट न दिल्यामुळे बेकायदेशीररीत्या कापून घेतली. बँकेकडे याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी अगोदर मेल पाठवल्याचे म्हटले आहे. पण, या मेलमध्ये स्टेटमेंट किती दिवसांत दाखल करायचे हे कळविले नव्हते. अटी व शर्तीत स्टेटमेंट देणे ही बाब नसतानाही पैसे कापून घेतले. त्यानंतर मागणी करूनदेखील ते परत जमा केले नाहीत.

या तक्रारीवर बँक ऑफ बडोदाने आपली बाजू मांडताना सांगितले की, जमुना इन्फ्रा प्रोजेक्टला २०१० साली कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा वेगळे कर्ज २०१५ मध्ये देण्यात आले. कर्ज मंजुरीच्या अटींमध्ये दर तिमाही व सहामाही क्यूआयएसनुसार स्टॉक स्टेटमेंट देणे बंधनकारक आहे. ते न दिल्यास दोन टक्के पीनल इंटरेस्ट देण्याची अट आहे. पण, अट न पाळल्यामुळे रक्कम योग्य रीत्या कापण्यात आली.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने कर्ज करारनाम्यात पीनल इंटरेस्टची अट खरोखर होती, असे गृहीत धरले तरी त्यांचे उल्लंघन झाले आहे. याची सूचना व तसे स्टेटमेंट तक्रारदारांनी पहिल्या तिमाहीत दिले नाही. याबाबतची नोटीस बँकेने द्यायला हवी होती. केवळ एक दिवस अगोदर ई-मेलवर नोटीस पाठवून घाईघाईने पैसे वजा करून घेणे ही सेवेतील कमतरता नव्हे तर अनिष्ठ व्यापारी प्रथादेखील आहे. त्यामुळे बँकेने खात्यातून वजावट केलेली ८ लाख ८१ हजार रक्कम परत करावी, असे आदेश दिले. त्याचबरोबर १० हजारांचा दंडही ठोठावला. हा निर्णय न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्य सचिन शिंपी यांनी दिला. तक्रारदाराकडून अॅड. एस. एम. दायमा यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात यश

0
0

महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात राज्य सरकारला थोडे यश मिळाले आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे महाराष्ट्राचा क्रमांक चौथ्यावरून तिसऱ्यावर आला आहे. यामुळे प्रसूत होणाऱ्या मातांसह नवजात शिशूंची सुरक्षा वाढली असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने २०१२ मध्ये राज्य सरकारला नवजात शिशूंच्या मृत्यूबाबत कडक उपाययोजना कराव्यात असे आदेशित केले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलली असून, २०१७-१८ च्या केलेल्या पाहणीत नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. बालकांच्या वाढत्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने नवजात कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार राज्य सरकाराला मृत्यू रोखण्याचे आदेश देण्यात आले. सर्वात जास्त नवजात शिशूंचे मृत्यू इशान्य भारतात होत असून, त्या खालोखाल मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. शंभरपैकी ३० नवजात शिशू या ठिकाणी मृत्युमुखी पडत असल्याचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजराथ, हरियाणा, हिमाचल, जम्मू काश्मीर, झारखंड या राज्यांमध्ये शंभर पैकी २६ नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण आहे. कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये २१ इतके, तर महाराष्ट्रात हाच आकडा खाली आला असून, शंभरपैकी १६ बालकांचे मृत्यू होत असल्याचे अहवालात प्रसिध्द करण्यात आले आहे. पंजाब आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याची स्थिती सारखीच आहे. त्या खालोखाल तामिळनाडू राज्याची स्थिती आहे. या राज्यात शंभरपैकी ११ बालके दगावत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र केरळमध्ये सर्वात कमी शंभरपैकी १० नवजात शिशूंचे मृत्यू होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्राने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राने नवजात शिशूंच्या अॅक्शनप्लॅनची कडक अंमलबजावणी केली आहे. यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या वयाच्या एक हजार दिवसांपर्यंत ट्रॅकिंग करण्यात येत आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गंत गर्भवती मातांना पोषण आहार व वैद्यकीय मार्गदर्शन दिले जात आहे.

आशांचे कार्य मोलाचे

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था नव्हती. त्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आशासेविकांना गृहभेटी सक्तीचे करून माता आणि बालक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. आजही काही गावांमध्ये घरातच प्रसूती करण्याची प्रथा आहे. यावेळी प्रसूती करताना घरातील साधने वापरल्याने जंतुसंसर्ग होऊन बाळ दगावण्याचे प्रमाण जास्त होत. अशा गावांमधील नागरिकांचे परिवर्तन करून सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे. युनिसेफने प्रसिध्द केलेल्या अहवालात ही माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात लहान मुलींच्या विवाहाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे येथे जन्माला येणारी बाळं ही कमी वजनाची भरत होती. आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असलो तरीही येत्या काही दिवसांत पहिल्या क्रमांकावर पोहचू यात शंका नाही. सरकारी पातळीवरदेखील चांगले प्रयत्न होत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.

- अलका गाडगीळ, प्रोजेक्ट लिडर, चरखा-युनिसेफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लोजिम इंडियाची साडेपंचवीस लाखांना फसवणूक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कॅनडा कॉर्नर येथील ग्लोजिम इंडिया प्रा. लि. कंपनीची तब्बल २५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत राजेश शंकरराव गिरमे (वय ५९, रा. गुरुव्हिला डाइन, दातेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

गिरमे यांच्या फिर्यादीनुसार, कॅनडा कॉर्नरवरील ग्लोजिम इंडिया या कंपनीसाठी जिमचे साहित्य खरेदी करायचे होते. त्यानुसार संबंधित कंपनीने संजय राव (रा. १०९ बी, साथीबाई कॉटेज, वरळी, मुंबई) याच्याशी संपर्क साधला होता. ग्लोजिमने या व्यवहारापोटी संजय राव याला चेक आणि आरटीजीएसद्वारे २५ लाख ६० हजार रुपये अदा केले. मात्र, या जिमचे साहित्य राव याने पाठविलेच नाही. साहित्य मिळत नसल्याने गिरमे यांनी पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला असता, त्यालाही संशयित रावने प्रतिसाद दिला नाही. ही घटना १ फेब्रुवारी २०१४ ते १९ जुलै २०१५ या काळात घडली. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

हातातील मोबाइल खेचून दुचाकीस्वारांची धूम

रस्त्याने मोबाइलवर बोलत पायी जात असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना जेहान सर्कलकडून नरसिंहनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

अमोल मधुकर पनके (वय ५३, रा. १०, प्रतिबिंब अपार्ट., मते नर्सरी रोड, सावरकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सहा जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास पनके घराकडे पायी निघाले होते. जेहान सर्कलकडून नरसिंहनगरकडे जाणाऱ्या रोडवरील योगेश इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर चोरट्यांनी संधी साधली. दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी पनके यांच्या हातातील तीन हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बागूल तपास करीत आहेत.

घंटा चोरण्याचा प्रयत्न

मंदिरातील घंटा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एकाला अटक केली. योगेश उर्फ मयुरेश क्षत्रिय (वय २४, रा. प्रियदर्शन सोसायटी, फ्लॅट क्रमांक ७, अमृतधाम, आडगाव) असे संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी राहुल रामकिसन चव्हाण (रा. शुभवास्तू अपार्ट. बनकर चौक) यांनी फिर्याद दिली आहे. जाकीर हुसेन हॉस्पिटल परिसरातील शिवनेरी झोपडपट्टी परिसरातील शितळादेवी पाथरीवाली मंदिरात शनिवारी (दि. ७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मंदिरातील पितळेची घंटा योगेश काढत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, हवालदार एस. एल. सातपुते तपास करीत आहेत.

जुगारींना अटक

भगतसिंग झोपडपट्टीत मोकळ्या जागी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून जुगाराचे साहित्य, तसेच रोकड हस्तगत करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. महंमद हनित लतीफ (वय ५३, रा. इंदिरा गांधी वसाहत), अनिरुद्ध मसूकर (५२, रा. शारदा शाळेसमोरील पटांगण), निंबा जाधव (६५, रा. प्रताप चौक, सिडको), तुकाराम जाधव (५६, रा. राजीवनगर झोपडपट्टी), रावसाहेब कांबळे (६७, रा. इंदिरा गांधी वसाहत) आणि भीमराव धरंतर (रा. हरीश शर्मा खडी क्रशरसमोरील झोपडी) अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार निकम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेशिस्तीला टोईंगची मात्रा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये शहरात २३ हजार ७४ वाहनांना टोईंग करण्यात आले. याद्वारे ४६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, याशिवाय तीन हजार ७२ वाहनचालकांनी सात लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड कार्डद्वारे जमा केला. सरासरी महिन्याकाठी चार वाहनांना टोईंग केले जात आहे. मात्र, तरीही शहरात अजूनही वाहतूक शिस्त निर्माण होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बेशिस्त पार्किंगची तीव्रता कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी टोईंग व्हॅन सिस्टिम अद्यावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नियुक्त झालेल्या ठेकेदाराने कामही सुरू केले. यावर्षी फक्त टोईंग झालेल्या वाहनमालकांनी ५३ लाख ८१ हजार रुपयांचा दंड जमा केला. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय तीन हजार ७२ वाहनचालकांनी सात लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून जमा केला. मोटार व्हेइकल अॅक्टमधील तरतुदींनुसार टोईंग केलेल्या दुचाकीसाठी २९९ तर चार चाकी वाहनांसाठी ६४० रुपये दंड आकारला जातो. दुचाकीच्या एकूण दंडापोटी २०० रुपये वाहतूक शाखेस तर ९९ रुपये संबंधित ठेकेदाराकडे जातात. तेच चारचाकी वाहन जमा करण्यात आले तर २०० रुपये वाहतूक शाखेला तर ४४० रुपये ठेकेदारला मिळतात. ही प्रक्रिया सुरळीत वाटत असली तरी टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांबाबत ओरडही होते आहे.

मुख्य भागातच कारवाई

काही दिवसांपूर्वी थत्तेनगरमधील एचडीएफसी बँकेसमोर टोईंग कर्मचाऱ्यांनी एका कारचालकास मारहाण केल्याचे सांगितले जाते. टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्हीही कार्यरत नसल्याची चर्चा असून, जुने पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून अगदीच जवळच्या ठिकाणावरील चार चाकी वाहने सातत्याने टोईंग करण्याकडे कर्मचारी लक्ष देतात, असा आरोप सर्वसामान्याकडून होतो आहे. जागेची आणि वाहनांची उपलब्धता नसल्याने शहराचा मुख्य भाग वगळता इतर ठिकाणी कोठेही टोईंग होत नाही.

वाहतूक विभागाची कामगिरी

महिना...........केसेस.................वसूल दंड (रुपयांमध्ये)

जानेवारी...........१,५९२...........३, २४, ३००

फेब्रुवारी...........३,४९४...........६,९९,४००

मार्च...............५,५६४...........११,१५,२००

एप्रिल.............४,८२०.............९,६९,५००

मे..................४,१८७.............८,३९,१००

जून................३,४१७.............६,८३,४००

एकूण.............२३,०७४.............४६,३०,९००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यालयातील रस्त्याबाबत उद्या अंतिम सुनावणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस मुख्यालयातील रस्त्याबाबत मुंबई हायकोर्ट मंगळवारी (दि. १०) अंतिम निर्णय देणार आहे. या निर्णयाकडे पोलिस, कोर्ट प्रशासनासह वकिलांचे लक्ष लागले आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून याबाबत हायकोर्टात सतत सुनावणी होत राहिली.

पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने जिल्हा कोर्टाला हस्तांतरित करण्यात आली. पोलिस मुख्यालयात एक मुख्य रस्ता असून, जिल्हा कोर्टाच्या लगतपासून या रस्त्यापर्यंतची जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. सदर जागेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिस मुख्यालयातील रस्ता कोर्टासाठी देण्याची मागणी पुढे करण्यात आली. त्यानुसार हायकोर्टात दावा करण्यात आला. पहिल्या प्रकरणात ठेच लागलेल्या पोलिस प्रशासनाने यावेळी मात्र कंबर कसली. सीबीएस येथील रस्त्याचे सुरू असलेले काम आणि इतर काही कारणांमुळे पोलिस मुख्यालयातील रस्ता मिळण्याबाबत वकील आग्रही राहिले. मात्र, पोलिस मुख्यालयातील रस्ता सार्वजनिक नसून, या रस्त्याची महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागाकडे नोंदच नसल्याचा मुद्दा पोलिस प्रशासनाने हायकोर्टात उपस्थित केला. तसेच जिल्हा कोर्टासमोरील रस्ता बंद नसून, त्यावर दररोज शेकडो वाहने प्रवास करीत असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाने हायकोर्टात दाखल केले. पोलिस मुख्यालयातील रस्त्याबाबत माजी पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच येथे वास्तव्यास असलेले पोलिस कुटुंबही एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास तीन महिन्यांच्या रस्सीखेचानंतर मुंबई हायकोर्ट आपला निर्णय १० जुलै रोजी सुनावणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस मुख्यालयातील मैदान महत्त्वाचे असून, उर्वरीत जागेत वेगवेगळी कार्यालये, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या कामासदेखील मंजुरी मिळाली असून, पुढील ५० वर्षांचा विचार करता ही जागा अपुरी पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तसेच पोलिस भरतीसारख्या मोठ्या इव्हेंटचे नियोजन अगदीच कमी जागेत कसे पार पडणार, असा प्रश्नही पोलिस प्रशासनाला सतावत असल्याने पोलिसांनी ही भूमिका घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राईनपाडा घटनेतील मुख्य संशयित अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील सामूहिक हत्याकांडाच्या घटनेत जमावाला चिथावणी देण्यासह पाचही जणांवर मरेपर्यंत वार करणारा मुख्य संशयित आरोपी दशरथ काळग्या पिंपळसे (वय ३५) याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला अखेर यश आले आहे. हे पथक दोन दिवसांपासून वार्सा येथील कळंबबारी जंगलात तळ ठोकून होते. सुमारे ७ किलोमीटरचा परिसर पायी फिरून पोलिसांनी त्याला शोधून काढत अटक केली.

राईनपाडा या गावात दि. १ जुलै रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी डवरी गोसावी समाजातील पाच भिक्षुकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या अमानूष घटनेनंतर ग्रामस्थ गाव सोडून पसार झाले आहेत. अद्यापही गावात तणावपूर्ण शांतता आहे. रविवारी या घटनेला आठ दिवस उलटले असून, रविवारचा आठवडे बाजार असूनही राईनपाड्यात व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने बाजार भरला नव्हता. त्यामुळे परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. हत्याकांडाच्या व्हिडीओ क्लीपवरून मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुख्य संशयितांपैकी महारू वंक्या पवार व हिरालाल उर्फ ढवळू आत्माराम गवळी या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासातून या सामूहिक हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार दशरथ काळग्या पिंपळसे (३५, रा. राईनपाडा ता. साक्री) याचे नाव समोर आले असून, त्याने चिथावणी दिल्यानेच जमाव प्रक्षुब्ध झाला होता. तर घटनेच्या वेळी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दशरथ हा निर्दयीपणे पाचही जणांवर वार करीत असल्याचे क्लीपमध्ये दिसत आहे.

वार्सा गावाजवळ असलेल्या कळंबा गावात त्याची सासरवाडी आहे. त्यामुळे पोलिसांनी कळंबा येथे पाळत ठेवली होती. तो पिंपळनेर-नवापूर रोडवरील कळंबबारी जंगलात दडून बसल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपासून जंगलात थांबून होते. अखेर पोलिसांनी रविवारी सकाळी दशरथला ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीसह इतर कामकाज उशिरापर्यंत सुरू होते. आज त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुलाब रामा पाडवी ( ५५, चौपाडा) यालाही अटक रविवारी उशिरा अटक करण्यात आली. या संशयिताने व्हिडीओमध्ये पांढरी टोपी आणि खांद्यावर रुमाल घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग थांबवावा

0
0

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार राजू शेट्टींवर निशाणा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग थांबवा, अशी सूचना वजा टीका महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जळगाव दौऱ्यावर असताना केली.

आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडत असतो, त्यावेळी शेतकऱ्यांसोबत सामान्यांचेही नुकसान करीत असतो, याचा विचारही खासदार राजू शेट्टी यांनी करायला हवा, असेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. खासदार राजू शेट्टी यांनी अवलंबलेले आंदोलनाचे तंत्र हे देशविरोधी असल्याचेही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत कायदा हातात घेण्याची भाषा सरकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी खासदार शेट्टी यांना दिला.

महाजन, खडसेंनीच घ्यावा युतीचा निर्णय

जळगाव पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतच्या युतीबाबतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पालकमंत्री असलो तरीही वेळेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे मी संघटनात्मक कामांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच घ्यायचा आहे, असेही महसूलमंत्री पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंवर कारवाईचा फास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

''माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महापालिकेची नोटीस अखेर धुडकावली. वैद्यकीय विभागाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास भिडेंनी नकार दिल्यानंतर, भिडेंवरील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. भिडेंनी संततीप्राप्तीचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. आता भिडेंबाबत काय कारवाई होते, याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १३) पीसीपीएनडीटी कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.

संभाजी भिडे सध्या राज्यभर आपल्या बेताल वक्तव्यांनी गाजत आहेत. नाशिकमधील एका कार्यक्रमात भिडेंनी संततीप्राप्तीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर राज्यभर टीका झाली. त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भिडेंच्या या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील तक्रारदार बोऱ्हाडे यांनी भिडेंचा पत्ता लेखी स्वरूपात महापालिकडे पाठवला होता. भिडेंच्या वक्तव्याची वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर १९ जून रोजी त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यांना सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भिडेंना नोटीस देऊन तीन आठवडे झाले तरी त्यांचा खुलासा आला नाही. उलट भिडेंनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. नोटीस परत आल्याने महापालिका पेचात पडली असून, भिडेंचे करायचे काय, असा प्रश्न वैद्यकीय विभागासमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, भिडेंची नोटीस परत आल्यानंतर चिंतेत पडलेल्या वैद्यकीय विभागाने भिडेंबाबत निर्णय घेण्यासाठी आता शुक्रवारी (१३) पीसीपीएनडी कमिटीची बैठक बोलावली आहे. या आठ सदस्यीय समितीसमोर भिडेंचा विषय ठेवला जाणार असून, भिडेंबाबत काय करायचे याचे मंथन या बैठकीत केले जाणार आहे. भिडेंची व्हिडीओ क्लिप वैद्यकीय विभागाने तपासली असून, यात प्राथमिकदृष्ट्या भिडे दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे भिडेंवर न्यायालयीन खटला भरण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात निफाड पाठोपाठ नांदगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५६ झाली आहे.

निफाड तालुक्यातील उगाव येथे दोन दिवसांपूर्वी रामदास बिरार या शेतकऱ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. पाठोपाठ नांदगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. मच्छिंद्र बोरसे (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील रहिवाशी आहेत. याबाबतची माहिती मिळाली असली तरी प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वीराज चव्हाण आज घेणार काँग्रेस कार्यकर्त्यांची शाळा

0
0

पृथ्वीराज चव्हाण आज घेणार

काँग्रेस कार्यकर्त्यांची शाळा

पक्षसंघटनेचा घेणार आढावा; गणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मरगळ आलेल्या शहर व जिल्हा काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन कशा पद्धतीने नव्याने उभे करता येईल यावर, चव्हाण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. चव्हाण रविवार आणि सोमवार असे दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

शहर व जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. विशिष्ट चौकटीच्या पलीकडे पदाधिकारी काम करत नसल्याने कार्यकर्त्यांनामध्येही मरगळ आलेली आहे. महिनाभरापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या दौऱ्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले होते. परंतु चिदंबरम याची पाठ फिरताच, वरिष्ठ नेत्यांच्या 'नरो वा कुंजरो वा' भूमिकेमुळे पुन्हा मरगळ निर्माण झाली आहे. लोकसभा व विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना, पक्षातील ही मरगळ झटकण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीनी वरिष्ठ नेत्यांना जिल्हास्तरावर जाण्याचे फर्मान सोडले आहेत. त्यामुळे रविवारी नाशिकमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत असून, दोन दिवस त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत.

रविवारी दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांच्या एकूण परिस्थितीवर व महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर चव्हाण बोलणार आहेत. तसेच आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे यावर चव्हाण बोलणार आहेत. या कार्यक्रमास सर्व कॉंग्रेस पक्षाच्या व काँग्रेस विचारांच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालिदासचे बुधवारी लोकार्पण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतीक्षित कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन व मध्यवर्ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

जुलै २०१७ मध्ये कालिदास कलामंदिर नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर कालिदास कलामंदिर बंद होते. सद्यस्थितीत अत्यंत सुबक असे कालिदास कलामंदिर उभे राहिले आहे. कालिदास कलामंदिराच्या लोकार्पणाला मुख्यमंत्री येणार म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून काम पूर्ण होऊनही हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. परंतु, कलाकारांची खप्पामर्जी झाल्याने तसेच रोजच कालिदास कलामंदिर बंद असल्याची ओरड होत असल्याने बुधवारी हा लोकार्पण सोहळा होत आहे. यावेळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी यांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता चांगली नसेल तर प्रॉडक्ट यशस्वी होत नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हुशार मुले शक्यतो उद्योगाकडे वळत नाहीत. त्यांचा कल नोकरीकडे असतो. कमी श्रमात पैसे कमावण्याचे त्यांचे स्वप्न असते. ते काहीअंशी पूर्णदेखील होते. जे बुद्धिमत्तेने कमी असतात, परंतु ज्यांच्याकडे कौशल्य असते, तेच उद्योगाकडे वळतात. त्यातही विभाग असतात. गुणवत्ता चांगली नसेल तर प्रॉडक्ट यशस्वी होत नाही, असे प्रतिपादन पीतांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे.

प्रभुदेसाई म्हणाले, की हिंदवी स्वराज्यामध्ये मराठी माणसाने जगभर आपला ठसा उमटवला होता. मराठी माणसाने विचार पक्का केला तर तो काहीही करू शकतो. काही जणांना आर्थिक जोड समजत नाही. ती समजली, की व्यवसायाचे महत्त्व कळू शकेल. पैशांसाठी काही करणे ही प्रतिष्ठेची गोष्ट नव्हती, तेव्हापासून आम्ही काम करीत आहोत. मुळात हा माणूस उद्योग करतोय हेच चांगले मानले जात नव्हते. मात्र, या चांगल्या- वाईटाच्या काळामध्ये संघाने केलेले संस्कार इतके पक्के होते, की पीतांबरीचे शंभर प्रॉडक्ट बनवले, परंतु मी मात्र संघाचे प्रॉडक्ट आहे हे सांगायला अजिबात कचरत नाही, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

वडिलांनी विक्रम ट्रान्स्पोर्ट नावाने व्यवसाय सुरू केला; परंतु त्यात मला रस नव्हता. मला माझे वेगळे काही करायचे होते. त्यातूनच मी टाइल्सचा व्यवसाय सुरू केला. मात्र, मला ६० लाख रुपये तोटा झाला. आता वडील व्यवसायाला विरोध करतील असे वाटले. मात्र, त्यांनी मला रिकामे राहू नको, असा सल्ला दिला. आठ तास वाचन करायला लावले. त्यातून दिशा सापडली व पीतांबरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यासपीठावर राजाभाऊ मोगल, शरयू देशमुख, रवींद्र झेंडे व देवेंद्र बापट उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ महिलेस मिळाले जीवदान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक / म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

---

चित्रपटाच्या कथानकाला शोभवा असा प्रसंग शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोदावरीवरील रामवाडी पुलावर घडला.

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या महिलेने जीव देण्यासाठी पुलावरून उडी मारली. गटांगळ्या घेत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी धाडस दाखवत तिला पाण्यातून बाहेर काढले. अगदी गळ्यातील ओढणी, स्कार्फ काढून महिलांनी दोर तयार केला. जवळपास २० ते २५ मिनिटे हा थरार सुरू होता. बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये महिला, मुली, एक महिला पोलिस कर्मचारी, रिक्षाचालकांसह इतरांचाही सहभाग लक्षणीय ठरला.कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय फक्त समयसूचकतेच्या आधारे सर्वांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले. आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला पंचवटी परिसरात राहते. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला असून, तिने पुलावरून उडी मारली. ही बाब पुलावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तिच्या मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. काय झाले हे पाहण्यासाठी इतरही धावले. यात महिलांची संख्या मोठी होती. या घटनेबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी रोशनी भामरे यांनी सांगितले, की सुटी असल्याने मी कुटुंबीयांसमवेत कारमधून दिंडोरी येथे जात असताना रामवाडी पुलावर गर्दी दिसली. काय झाले म्हणून विचारले असता एक महिला पाण्यात बुडत असल्याचे समजले. कार थांबवून गर्दी असलेल्या ठिकाणी गेले. तेथे एक महिला बुडताना दिसली. यावेळी येथे पोहण्याची माहिती असलेला एक युवक होता. त्याला पोलिस असल्याचे सांगत विश्वास देऊन मदतीसाठी पाण्यात उतरण्याबाबत भामरे यांनी आवाहन केले. मात्र, बुडणारी महिला त्या युवकाच्या हाताबाहेर होती. त्यामुळे अन्य एका युवकाने मदतीसाठी पाण्यात उडी मारली. यामुळे त्या महिलेचे डोके पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान काही महिलांनी आपल्याकडील ओढण्या, स्टोल्स, स्कार्प अशा कपड्यांच्या मदतीने एक रोप तयार करून पाण्यात सोडला. महिलांकडून सुरू असलेली धडपड पाहता परिसरातील एक तरूण नॉयलॉन रोप घेऊन आला. याचवेळी एक बोट नदीच्या किनाऱ्यावर उभी असल्याची भामरे यांनी पाहिले. भामरे यांच्यासह इतर नागरिकांनी मदतीसाठी त्यास आवाज देण्यास सुरूवात केली. काही वेळातच बोट तेथे आली आणि त्या महिलेला घेऊन किनारी आली. महिलेच्या नाकातोंडात पाणी गेले होते. भामरे यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर त्या महिलेला पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

--

आजच पती गावी परतला अन…

२४ वर्षांच्या या विवाहितेचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला. तिचे सासर चोपडा येथे असून, तिचा पती कंपनीत छोटे-मोठे काम करतो. पत्नीला बरे वाटावे म्हणून तिचा पती मागील महिनाभर तिला घेऊन नाशिकला आला होता. माहेरीची आर्थिक स्थिती हातावरील आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी महिलेचे आई-वडील कामधंद्यासाठी घराबाहेर पडले. पतीही चोपड्याला गेले. घरात एक लहान भाऊ आणि आजोबा असताना ही महिला घराबाहेर पडली आणि थेट रामवाडी पुलावर पोहोचली. या महिलेची मानसिक स्थिती लक्षात घेता तिच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही, असे पंचवटी पोलिसांनी स्पष्ट केले.

----

मशिन अंगावर पडून कामगाराचा मृत्यू (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगारांकडून अवजड मशिनच्या सफाईचे काम सुरू असताना अचानक ते मशिन अंगावर पडून आसाम येथील कामगार हरिहर बर्मन (वय २२) याचा मृत्यू झाला.

अवजड मशिन अंगावर पडल्याने जखमी झालेल्या हरिहरला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत. दरम्यान, विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांना वरचे वर अपघातांना सामोरे जावे लागते. याकडे सरकारचा औद्योगिक सुरक्षा विभाग नियमावर बोट ठेवत लक्ष देत नसल्याचा आरोप अपघातग्रस्त कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांनी केला आहे. किमान मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना तरी कंपनी मालकाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

---

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खुलेआम विक्री

राज्यभरात प्लास्टिकबंदी असतानाही शहरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खुलेआम विक्री होत आहे. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा वावर असलेल्या शरणपूर पोलिस चौकी सिग्नल परिसरात अशी विक्री होत असतानादेखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज आरोग्य तपासणी

0
0

आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि श्रीमती सविता देसाई हॉस्पिटल मेडिकल ट्रस्ट व हेल्पिंग ऑपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन (होप)तर्फे आज, रविवारी (दि. १२) शहरातील लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. शालिमार येथील श्रीमती सविता देसाई हॉस्पिटल येथे सकाळी १० ते १२ या कालावधीत हे शिबिर होईल.

--

आज शोकसभा

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पवार यांचे वडील तथा मविप्रचे माजी मुख्याध्यापक नारायणराव पवार यांचे गुरुवारी (दि. ९) निधन झाले. दिवंगत नारायणराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज, रविवारी (दि. १२) दुपारी चार वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे शोकसभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेप ९४१ कोटींचे!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण समितीने केलेल्या महापालिकेच्या २०११ ते २०१५ या पाच आर्थिक वर्षांच्या अहवालात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावल्याचे समोर आले आहे. लेखापरीक्षणात गेल्या पाच वर्षांत विविध कारणांमुळे तब्बल ९४१ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम आक्षेपाधीन असून, अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून ४३ कोटी ७३ लाखांची रक्कम वसूलपात्र असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी माहितीच्या अधिकाराकडून ही बाब उघडकीस आणली आहे.

महापालिकेच्या कारभाराचे महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाबरोबरच राज्य सरकारच्या स्थानिक निधी लेखा समितीमार्फत दरवर्षी लेखापरीक्षण केले जाते. या समितीमार्फत केलेल्या २०११-१२ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षणातील आक्षेपित परिच्छेद संख्या, आक्षेपाधीन थकबाकी रक्कम, वसूलपात्र रक्कम याबाबतची माहिती व महापालिकेने अहवालातील आक्षेपांची पूर्तता केल्याची माहिती जानी यांनी माहितीच्या अधिकारात मागविली होती. महापालिकेचे उपमुख्य लेखापरीक्षण तथा जनमाहिती अधिकारी यांनी उपरोक्त माहिती जानी यांना दिली असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत तब्बल ८०२ परिच्छेद संख्या असून, आक्षेपाधीन रक्कम ९४१ कोटी ८९ लाख रुपये, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसूलपात्र रक्कम ४३ कोटी ७२ लाख असल्याची माहिती महापालिकेकडूनच देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे लेखापरीक्षण अहवालातील पूर्तता न करणे, वसूलपात्र रक्कम मक्तेदाराकडून वेळेत वसूल न करणे, आक्षेपाधीन रकमेबाबत अनुपालन व खुलासा न करणे अत्यंत चुकीचे असून, महापालिकेच्या अर्थतंत्रावर प्रशासनामार्फत घालण्यात आलेला घाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जानी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images