म. टा. वृत्तसेवा, सिडको
सिडकोतील शिवाजी चौक भाजी मार्केटमध्ये साचणारे खराब भाजीपाल्याचे ढीग आणि येथे हॉकर्स झोन न केल्याने उद्भवलेल्या समस्येचा तिढा अखेर सुटला आहे. सिडकोच्या प्रभाग सभापती आणि प्रशासनाने आठ दिवसांत येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन शुक्रवारी प्रभाग सभेत दिले. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून, तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
येथील समस्यांबाबतचे वृत्त शुक्रवारी 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच याप्रश्नी प्रभागाच्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभेत ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभापतींनी येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने नगरसेविका पांडे यांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली. सिडको प्रभाग समितीची सभा सभापती हर्षा बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नगरसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचला. सर्वच समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्याम साबळे, सुदाम डेमसे, मुकेश शहाणे, डी. जी. सूर्यवंशी, नगरसेविका रत्नमाला राणे, कल्पना पांडे, संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, किरण गामणे, प्रतिभा पवार, कल्पना चुंभळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या विषयपत्रिकेवर केवळ इतिवृत्ताचा विषय असल्याने त्यास मंजुरी देण्यात आली. नगरसेविका कल्पना पांडे यांनी यावेळी शिवाजी चौक भाजी मार्केटचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली. ही समस्या सुटत नसेल, तर सभागृहात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला. त्यावर सभापती हर्षा बडगुजर, विभागीय अधिकारी डॉ. कुमावत यांनी त्यांना आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली. प्रभागात अनेक ठिकाणी सोयीस्कररीत्या नाले बुजविण्यात आल्याने खांडे मळा व खोडे मळा येथे रस्ताच राहिला नसल्याने हे कामे मार्गी लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
अतिक्रमणांप्रश्नी भेदभाव
नगरसेविका रत्नमाला राणे, छाया देवांग यांनी प्रभागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, याप्रश्नी कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर विभागीय अधिकारी डॉ. कुमावत यांनी याबाबतचा करार संपल्याचे व कुत्रे उचलले, तरी ते त्याच ठिकाणी परत सोडावे लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेवक डेमसे यांनी अनेक खातेप्रमुखांच्या बदल्या झाल्या असून, नवीन अधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी ओळखसुद्धा करून घेतली नसल्याचे सांगितले. अतिक्रमणे काढताना भेदभाव होत असल्याचा आरोपही केला. नगरसेवक शहाणे यांनी पवननगर ते उत्तमनगर या रस्त्यावर दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक बसविताना तेथील गटार बुजविण्यात आल्याने येथे पाणी साचत असल्याचे सांगून या ठिकाणचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. पेलिकन पार्कला संरक्षक भिंत उभारण्याची सूचना करून प्रभागातील नाल्यांची सफाई आरोग्य विभागही करीत नाही व बांधकाम विभागही करीत नाही, प्रभागातून गेलेला नाला कुणासाठी सोयीस्कररीत्या बुजविण्यात आला याचा खुलासा करण्याची मागणी केली.
...तर कचरा पालिकेत
नगरसेवक साबळे यांनी प्रभागातील रस्त्यांवर असलेल्या ड्रेनेजवर डांबर टाकून ते बुजविण्यात आल्याने पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. नगरसेवक सूर्यवंशी यांनी स्वच्छता या विषयावर सूचना करून सिडकोच्या विकासासाठी एकत्र होण्याचे आवाहन केले. नगरसेविका गामणे यांनी प्रभागात आठ दिवसांत घंटागाडी सुरळीत न झाल्यास प्रभागातील कचरा महापालिकेत आणणार असल्याचे सांगितले. नगरसेविका पवार यांनी वॉक विथ कमिशनरप्रमाणे वॉक विथ सभापती विथ अधिकारी असे राबविण्यात यावे, अशी मागणी केली.
'ते' अतिक्रमण कसे?
नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, की घंटागाडी ठेकेदाराकडून प्रशासनाने काम करून घ्यावे अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. सिडकोतील घरांवर अतिक्रमणांच्या फुल्या महापालिकेने केलेल्या असल्या, तरी सिडकोच्या घरांची परवानगी महापालिकेने दिली नसल्याने त्यांना तो अधिकार नसल्याचे सांगितले. सिडकोतील सुमारे ९० हजार मिळकती अधिकृत असल्याचे पत्र महापालिकेकडून प्राप्त झाले असल्याने ते अतिक्रमण कसे होऊ शकते, असा प्रश्नही उपस्थित केला.
विकासासाठी एकीचा निर्धार (स्वतंत्र चौकट)
नगरसेवकांनी तक्रारी व सूचना मांडल्यावर सभापती हर्षा बडगुजर यांनी यापुढे प्रभागात सभेत मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांची व समस्यांची नोंद प्रशासनाने करावी. पुढच्या सभेच्या सुरुवातीला मागील विषयांवर चर्चा होईल आणि मगच नवीन काम सुरू होईल, असा नवीन प्रघात सुरू केल्याचे जाहीर केले. नगरसेवक पोडतिडिकीने प्रश्न मांडतात, अधिकाऱ्यांनी ते वेळीच सोडविले पाहिजेत, तसेच अधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी संपर्क साधून समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचनाही केली. सभापतींच्या या निर्णयाचे स्वागत करून सिडकोच्या विकासासाठी वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केला.
----------------------------
(पेज फोटोशेजारी सिंगल)
'विद्यार्थी वाहतूकदारांचे प्रश्न सोडवावेत'
म. टा. वृत्तसेवा, जेलरोड
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आरटीओ आणि पोलिसांनी विनाकारण त्रास देऊ नये, त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष अरफात शेख आणि उपाध्यक्ष शिवाजी भोर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आरटीओ कार्यालयास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शाळा सुरू झाल्यामुळे शहरात विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. अजूनही विद्यार्थ्यांची शालेय प्रवेशाची धावपळ सुरू आहे. वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असताना आरटीओ आणि पोलिस कर्मचारी तपासणीच्या नावाखाली वाहनांचा पाठलाग करून त्रास देतात. वाहन तपासणीला संघटनेचा विरोध नाही. परंतु, अगोदर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांशी संवाद साधावा. ज्या वाहनधारकांनी शालेय वाहतूक नोंदणी केलेली नाही त्यांचे प्रबोधन करावे. आरटीओ कार्यालयात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नोंदणी केली आहे त्यांच्या आरसी बुकवर चुकीची नोंद झाली आहे. ती दुरुस्ती करून शालेय वाहतुकीची नोंद करावी. ज्यांची नोंद झाली आहे, त्यांना विनाकारण त्रास देऊ नये. त्यांच्याकडून बेकायदेशीर दंड वसूल करू नये. पोलिस किंवा आरटीओ अधिकारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करतात. अशा वेळी अपघात झाल्यास त्याला तेच जबाबदार राहतील.