वसतिगृहांसंदर्भातील असुविधांविरोधात एल्गार म. टा. प्रतिनिधी, नाशिक आदिवासी विकास विभागाच्या राज्यभरातील वसतिगृहात आश्रयास राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाशी संबंधित काही निर्णयांविरोधात एल्गार पुकारला आहे. कुठल्याही संघटनेचा आश्रय न घेता विद्यार्थ्यांचे संघटन करून भर पावसाळ्यात १३ ते १८ जुलै दरम्यान, पुणे-नाशिक मार्गावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा नाशिकमधील आदिवासी विकास भवनवर १८ जुलै रोजी धडकणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदिवासी विकास विभागाचे राज्यभरात ४९१ वसतिगृह कार्यरत आहेत. त्यामध्ये ३५ हजार ४४४ मुले आणि २२ हजार ८५१ मुली असे एकूण ५८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहातील या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून सातत्याने तेथील असुविधांबाबत वाचा फोडावी लागत होती. यावर उपाय म्हणून शासनाने वसतिगृहात देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य, जेवण या सुविधा बंद करून त्यापोटी येणाऱ्या खर्चाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला याप्रकारे जेवण उपलब्ध होणे शक्य नाही किंवा विद्यार्थिनी जेवणासाठी सायंकाळी वसतिगृहाबाहेर कशा जाऊ शकतील, असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत मेससाठी प्रतिविद्यार्थी दिला जाणारा निधी अपूर्ण असल्याने ही योजना बंद व्हावी यासह विविध मागण्यांसाठी हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत भरत तळपाडे, प्रवीण धांडे, मदन पथवे, स्वप्नील धांडे, उद्धव येंगटे, दीपक बहिरम आदी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. असा असेल मोर्चाचा मार्ग पहिला टप्पा : शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह मांजरी फार्म, पुणे-हडपसर-मुंढवा चौक-कोरेगांव पार्क-खडकी-दापोडी-कासारवाडी (नाशिक फाटा)-भोसरी-मोशी-चाकण-राजगुरूनगर (खेड) मुक्काम. दुसरा टप्पा : मंचर-नारायणगाव-आळेफाटा तिसरा टप्पा : संगमनेर-नांदूरशिंगोटे-मुक्काम चौथा टप्पा : सिन्नर-नाशिकरोड-नासर्डी पूल-द्वारका-गडकरी चौक-नाशिक आदिवासी आयुक्तालय अशा आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने वसतिगृहांमध्येच खानावळ सुरू करावी पेसा अंतर्गत सरकारी दफ्तरी जागा भरण्यात याव्यात 'एसआयटी'च्या वतीने विद्यार्थ्यांकडून केली जाणारी वसुली थांबवावी समांतर पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी वसतिगृह प्रवेशासाठी जात पडताळणी सक्तीची करावी जातपडताळीसाठी सहा महिन्यांचा अवधी मिळावा गृहपालांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करावे त्यांचे निवासस्थान वसतिगृहाजवळच असणे बंधनकारक करावे असुविधांना कारणीभूत अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई करावी प्रधानमंत्री कौशल्य योजना वसतिगृहांमध्ये राबवावी वसतिगृहातील महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ करावी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची निर्मिती करावी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट