म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातून वाहने चोरी करणाऱ्या आणि धुळे जिल्ह्यात त्यांची विक्री करणाऱ्या चौघांना शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने शिताफीने अटक केली. हे चौघे सुशिक्षित असून, यातील एक संशयित बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. या टोळीचा मुख्य सूत्रधार फरार असून, संशयितांकडून पोलिसांनी १५ दुचाकी जप्त केल्या.
आकाश अशोक मराठे (मूळ रा. धुळे, हल्ली सिद्धेश्वर मंदिरासमोर, महाराणा प्रताप चौक, सिडको), उमेश उर्फ पप्पू युवराज मोरे (रा. मोहाडी, उपनगर, दंडेवाले बाबानगर, तिखी रोड, धुळे), शरद भरत बुवा (रा. शिरपूर, वाडीगाव, धुळे) आणि राहुल सुभाष वाघ (रा. फुलेनगर, शिंगावे गाव, ता. शिरपूर, धुळे) अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार भुसावळ येथील असून, तो सध्या फरार आहे. यातील मराठे आणि बुवा हे डीएमएलटी झालेले, तर उमेश मोरे याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. राहुल वाघ हा बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिकतो आहे.
मूळचा धुळ्याचा असलेला आकाश काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये नातेवाइकांकडे राहायला आला होता. त्याची ओळख भुसावळ येथील फरार आरोपीबरोबर होती. त्याने वाहनचोरी कशी करायची आणि त्यातून कसा पैसा मिळतो, याची माहिती मराठेला दिली. यानंतर या दोघांनी रमेश मोरे याला सोबत घेऊन शहरात ठिकठिकाणी तसेच धुळे, चाळीसगाव आणि गुजरात राज्यातही वाहनांची चोरी केली. चोरलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राहुल आणी शरद पाहत होते. यातील आकाशबाबात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने त्यास काठेगल्ली येथून दोन दिवसांपूर्वी अटक केली. यानंतर उर्वरित टोळीचा छडा लागला. ही मुले सराईत नाहीत. मात्र, वाहनचोरीनंतर मिळणाऱ्या पैशांमुळे एकामागून एक गुन्हे करीत गेले.
याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की संशयितांकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पाचव्या संशयितास अटक झाल्यानंतर आणखी काही वाहने जप्त होतील. मागील महिन्याभरात शहर पोलिसांनी या १५ वाहनांसह ६३ पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. पत्रकार परिषदेला उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, युनिटचे निरीक्षक दिनेश बर्डेकर उपस्थित होते. ही कारवाई सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे, पीएसआय रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, एएसआय राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, रमेश घडवजे, शामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सैय्यद, पोलिस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, ललिता आहेर, योगेश सानप, बाळा नांद्रे, महेंद्र सांळुखे, याद डंबाळे, पोलिस शिपाई जयंत शिंदे, विजय पगारे, संतोष ठाकुर, मधुकर साबळे आदींनी केली.
लॉक सिस्टिम महत्त्वाची
शहरातील बहुतांश वाहनचोरीच्या घटना पार्किंगमध्ये घडतात. सुरक्षित वाटणारे ठिकाणच दगा देते. मुळात नवीन अथवा जुन्या कोणत्याही वाहनांचे हँडललॉक तितके मजबूत नसते. एक जोराचा झटका दिल्यानंतर हँडललॉक उघडते. त्यानंतर चोरटे वाहन स्टार्ट करण्यासाठी वायरी जोडून ते डायरेक्ट करतात व पसार होतात. यासाठी वाहनाला फ्रंट लॉक अथवा इतर मजबूत लॉक सिस्टिमची गरज असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्वत:च्या नंबर प्लेटचा वापर
यातील संशयित आरोपी आपल्याकडील वाहन क्रमाकांचा रजिस्ट्रेशन क्रमाकांची प्लेट चोरी केलेल्या वाहनास वापरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची बाब पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितली. वाहनचोरीनंतर नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या हाती लागले तर फसायला नको म्हणून ही तजवीज करण्यात आली होती. चौघा संशयितांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.