म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
भगूर येथील व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत दुकानांतील प्लास्टिक भगूर नगरपालिकेकडे सुपूर्द करीत प्लास्टिकबंदीचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांतील ट्रॅक्टरभर प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंच्या गोण्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्याने परिसरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भगूर शहर परिसर प्लास्टिकमुक्त व्हावा यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात नगराध्यक्षा, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांची एकत्रित बैठक झाली.त्यात परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौकात एकत्रित येत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फुलफगर, उपाध्यक्ष श्याम चांडक,सेक्रेटरी जगदीश कासार आदींसह सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतून बंदी असलेल्या सर्व प्लास्टिक पिशव्या आणि वस्तू गोण्यांत भरून नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या. या ट्रॅक्टरभर प्लास्टिकची नगरपालिकेने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.
यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे, रमेश राठोड, नगरसेवक मोहन करंजकर, संजय शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, नगरसेविका मनीषा कस्तुरे, कविता यादव, संगीता पिंपळे, स्वाती झुटे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम सोनवणे, सोसायटी संचालक श्याम ढगे आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.
या व्यापाऱ्यांनी घेतला पुढाकार (स्वतंत्र चौकट)
मनोहर आंबेकर, द्वारकानाथ झंवर, रमेश बोराडे, प्रकाश बूब, विनोद पमनानी, मोहन नाहटा, संजय लाहोटी, रमेश हेंबाडे, राजू लोया, मयूर शेटे, प्रवीण यादव, उमेश नहार, गणेश जाधव, भूषण कांकरिया, प्रशांत लोया, रामदास गाढवे, चेतन आंबेकर, गणेश निसाळ, बाळासाहेब वाईकर आदी.
------------------------------------------
(स्वतंत्र सिंगल बातमी)
--
प्लास्टिक संकलन केंद्रांची मागणी
म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प शहरात आधीच प्लास्टिकबंदी असताना आता राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मात्र, देवळाली परिसरात आजही अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आहे. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी देवळाली परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाशिक महापालिकेप्रमाणे प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला.त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला गेल्या शनिवारपासून जोमाने सुरुवात झाली. बंदीचे पडसाद जागोजागी पाहायला मिळत आहेत. त्यासाठी नाशिक महापालिकेने महापालिका विभागीय कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
त्याच धर्तीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन प्लास्टिकबंदीची कारवाई करीत असताना प्लास्टिक संकलन केंद्रे का सुरू करीत नाही, असा प्रश्न नागरिक आणिपर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कार्यवाहीची मागणीही करण्यात येत आहे.