एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम;Ḥ खासगी वाहतूक सुसाट
टीम मटा
वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारपासून संपावर गेलेले कर्मचारी शनिवारी देखील संपावर असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांची अडवणूक करीत खासगी वाहतूकदारांनी मात्र भाडेवाढ करून दोन दिवसात चांगलीच कमाई करून घेतली.
निमाणी बस स्थानकावर प्रवासी प्रतीक्षेत
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले. निमाणी बस स्थानकावरून शहर परिसरात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या घटल्याने प्रवाशांना तासन् तास ताटकळत बसावे लागले. त्यात कामगार आणि महिलांची संख्या अधिक होती. रिक्षा, काळी पिवळी अशा खासगी वाहतूक करणाऱ्यांनी संपामुळे भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांची अडवणूक झाली.
वेतनवाढीच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि. ८) संप पुकारला आहे. या संपात कामगार सेनेने सहभाग घेतला नाही. या संघटनेचे कर्मचारी सेवेत हजर होते. संपात सहभागी झालेले कर्मचारी पंचवटी डेपोच्या प्रवेशद्वारावर सकाळपासून बसून होते. दुपारी येथे ठिय्या देणाऱ्यांची संख्या कमी झाली. सकाळपासून ३५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यांच्या ३५१ फेऱ्या झाल्या. सकाळच्या सत्रात १०८९ फेऱ्या होत असतात, त्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
पंचवटी डेपोतून सुटणाऱ्या बसेस निमाणी बस स्थानकात जावून तेथून त्या शहराच्या विविध भागात सोडण्यात येतात. त्यामुळे प्रवासी बस स्थानकावर येऊन थांबतात. शनिवारी (दि. ९) रोजीही प्रवासी बसच्या प्रतीक्षेत थांबून होते. मात्र तासन् तास थांबूनही बस येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते निराश झाले. काही नाईलाजास्तव रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी यांचा आधार घेत होते. संपाच्या काळात प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणी केली जात असली तरी नियोजित ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी जास्त भाडे देण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.
000
घोटीत कडकडीत बंद
म. टा. वृत्तसेवा, घोटी
एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी इगतपुरी आगारात भेट देऊन अघोषित संपाला पाठिंबा जाहीर केला. शनिवारी घोटीत आठवडे बाजार असल्याने घोटी बाजाराकडे आलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इगतपुरी तालुक्यात या संपामुळे ५० पेक्षा जास्त बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सेवा विस्कळीत झाली. शाळा सुरू होण्याच्या दिवसात व आठवडे बाजारासाठी आलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. हा संप सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसणार आहे.
परिवहन मंत्र्यांनी ४८९४ कोटी रुपयांचा करार केला आहे. मात्र या महागाईच्या काळात ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शेजारी असणाऱ्या कर्नाटकात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला १९५०० रुपये इतके बेसिक मिळतेय. तेथील कर्मचाऱ्याचा सर्व पगार ३५ ते ४० हजारांवर मिळतोय. याऊलट महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला सर्व मिळून १९५०० रुपये इतकीही पगार मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आहे.---भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस(इंटक) इगतपुरी
0000
निफाड, लासलगावातही शुकशुकाट
म. टा. वृत्तसेवा, निफाड
एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे निफाड, लासलगाव, विंचूर भागातील बस स्थानकात शनिवारी दिवसभर शुकशुकाट होता. शनिवारी निफाड येथून तीन तर लासलगाव येथून केवळ एकच बस बाहेर प्रवासी घेवून निघाल्याची माहिती बस डेपोतून मिळाली.
निफाड येथे शनिवारी बस स्थानकात बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभरात केवळ तीन बस आल्याचे कंट्रोलर गावित यांनी सांगितले. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना नाशिक, येवला, औरंगाबाद, पिंपळगाव जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल झाले. नाशिकला जाण्यासाठी शांतीनगर चौफुलीवर खासगी वाहनांच्या फेऱ्या सुरू होत्या. औरंगाबाद व येवला जाण्यासाठी मात्र प्रवाशांचे हाल झाले. काहींना प्रवास रद्द करून घरी परतावे लागले.
लासलगाव डेपोतील २०० कर्मचारी संपात असल्यामुळे येथून शनिवारी नाशिककडे जाणारी फक्त एक बस बाहेर पडू शकली. त्यानंतर मात्र एकही बस बाहेर पडली नाही.
लासलगाव बस डेपोतून रोज ५० बस बाहेर पडतात. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी २०० कर्मचारी कामावर आले नाहीत. त्यामुळे लासलगाव डेपोचे गेल्या दोन दिवसात ९ लाख रुपये उत्पन्न बुडाल्याचे डेपो मॅनेजर पी. बी. पद्मने यांनी सांगितले. लासलगाव येथील बाहेरगावी नोकरीनिमित्त जाणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थ्यांचेही हाल झाले. काहींनी रेल्वे आणि खासगी वाहनांच्या उपयोग केला.
0000
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, शनिवारी मनमाडसह नांदगाव व चांदवड बस स्थानकात या संपाचा मोठा परिणाम दिसून आला. संपात कर्मचारी सहभागी झाल्याने मनमाड, नांदगाव, चांदवड बसस्थानकात वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. तसेच बसस्थानकात आलेल्या प्रवाशांचे बाहेर गावी जाण्यासाठी अतोनात हाल झाले. मनमाडहून नांदगाव, चांदवड, मालेगाव येथे जाण्यासाठी तसेच नांदगाव येथून मालेगाव, औरंगाबाद येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध नसल्याने खासगी वाहतुकीवर अवलंबून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली. काही ठिकाणी प्रवाशांच्या अडचणींचा लाभ उठवत नेहमीच्या दरा पेक्षा १० ते २० रुपये जास्त भाडे आकारले गेल्याची ओरड प्रवासी करताना दिसत होते. मनमाड, चांदवड व नांदगाव डेपोतून शनिवारी कोणत्याच गाड्या सुटल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बसेस बंद असल्याने काळी, पिवळी व्हॅन, टॅक्सी, सिक्स सीटर गाड्या, जि. प. यांची चलती असल्याचे दिसून आले. बसेस बंद असल्याने नाशिक, औरंगाबाद, शिर्डी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात जाण्याची वेळ मनमाड येथील प्रवाशांवर आली. बसस्थानकात प्रवासी वाहतूक ठप्प होती. शनिवारी सकाळी बसेस सुरू होतील या आशेवर प्रवासी बसस्थानकात थांबले होते.
बस ही ग्रामीण भागातील जीवन वाहिनी आहे. पण बससेवा बंद असेल तर ग्रामीण जीवनच ठप्प होऊन जाते, असा अनुभव येत आहे. ग्रामीण भागातील लोकांनी बस संपाच्या काळात बाहेर गावी जायचेच नाही का? असा प्रश्न पडतो.---देवीदास आहिरे, प्रवासी.
0000
ग्रामीण जनजीवन विस्कळीत
कळवण : तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतुकीचे मुख्य साधन असलेली एसटी दोन दिवसांपासून डेपोतच असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कळव ण-नाशिक रोज अपडाऊन करणाऱ्या व्यापारी प्रवाशांना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागत आहे. कळवण परिवहन आगारातील सर्वच संघटना या संपात सहभागी झाल्या असून, शासनाने केलेल्या एकतर्फी वेतनवाढीला सर्वच संघटनांनी विरोध केला आहे. जर ही ऐतिहासीक वेतनवाढ आहे तर ती घेण्यासाठी सक्ती का? व ती न स्वीकारल्यास राजीनामा देण्याची धमकी कशासाठी?असे प्रश्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचारले आहेत. कळवण आगारातील सर्वच संघटनांनी या संपात सहभागी होऊन बंदला प्रतिसाद दिला आहे.
00000
खासगी वाहतूकदरांची चांदी
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी देखील कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत. येथील बसस्थानकातून जवळपास ९० टक्के फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. शनिवारी येथील आगारातून जाणाऱ्या २६० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. तर दोन दिवसात आगाराचे सुमारे १० लाखांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आघार प्रमुख किरण धनवटे यांनी दिली.
शनिवारी संपाचा दुसरा दिवस असल्याने सकाळी तरी बस सुरू होतील या आशेने सकाळी प्रवाशांची तुरळक गर्दी होती. सकाळच्या सत्रात येथील आगारातून केवळ १८ गाड्या धावल्या. नाशिक, शिर्डी तसेच चाळीसगाव जाणाऱ्या प्रवासी या गाड्यांनी मार्गस्थ झाले. मात्र त्यानंतर एकही बस बाहेर पडली नाही. अन्य डेपोमधून देखील बसेस येत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला आहे. एसटी संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिकांना बसला आहे. संपामुळे केवळ १२५ कर्मचारी हजर असून, त्यांच्याद्वारेच तुरळक बससेवा पुरवली जात असल्याचे धनवटे यांनी सांगितले.
१० लाखांचा आर्थिक फटका
एस टी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाचा आर्थिक फटका मालेगाव आगारास बसला आहे. येथून दिवसभरात सरासरी ३५० बस फेऱ्या होतात. मात्र दोन दिवसाच्या संपाने ५०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे १० लाखाहून अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.
00000