म. टा. प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात दिसू लागला आहे. जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्यासह भाजीपाल्याची आवक घटली. जिल्ह्यात सुमारे २३ ते ३० टक्के आवक घटल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शेतकऱ्यांनी सोमवारी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणावा. त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असल्याने राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी संपाची हाक दिली आहे. १ जूनपासून या शेतकरी संपाला सुरुवात झाली असून, त्याचे परिणाम जिल्ह्यात जाणवू लागले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी कांद्यासह भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. पिंपळगाव बसवंत येथे दररोज साधारणत: १८०० ट्रॉली ट्रॅक्टरची आवक होते. परंतु आज केवळ २२ ट्रॉली ट्रॅक्टरची आवक झाली. लासलगाव बाजार समितीमध्ये तर याहूनही कमी आवक झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शेतमालाची आवक घटत चालल्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह पोलिस अधीक्षक संजय दराडे आणि सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. फळे, भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीला अडथळा झाल्यास तो रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक बाजार समित्यांमध्ये बैठका घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून, आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरविण्याची तयारी देखील पोलिसांनी ठेवली आहे. मुंबईकरांची कोंडी या आंदोलनाचा परिणाम मालवाहतुकीवरही होऊ लागला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला जातो. मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना होणाऱ्या पालेभाज्यांची निर्यात ५० टक्क्यांनी घटली आहे. बाजारसमितीमधील व्यवहार बंद असल्याची अफवा शनिवारी पसरली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातून आज शेतमालाची विशेष आवक होऊ शकली नाही. ..कोट.. शेतमालाची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी कुणी विरोध करीत असेल तर त्यांनी जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या १०७७ किंवा ०२५३२३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिस बंदोबस्तात शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणला जाईल.- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट