म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या ताणतणावाला कंटाळून जीवन संपवीत असल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठी ठेवून शनिवारी बेपत्ता झालेल्या महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक अभियंत्याचा रविवारी दुसऱ्या दिवशीदेखील थांगपत्ता लागलेला नाही. संबंधित अभियंत्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
रवींद्र प्रेमनाथ पाटील (वय ४२, रा. डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड) हे शनिवारी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके पाटील यांना शोधण्यासाठी तैनात केली आहेत. मात्र, ठिकठिकाणी तपास करूनही रविवारी सायंकाळपर्यंत त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील आपला मोबाइल वाहनातच ठेवून निघून गेलेले आहेत. शनिवारपासून त्यांचा शोध घेतला जात असून, त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे.
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जाण्यासाठी म्हणून रवींद्र पाटील शनिवारी पहाटे घराबाहेर पडले होते. काही वेळाने कामानिमित्त त्यांच्या पत्नी घराबाहेर आल्या असता पाटील यांची कार घराजवळच असल्याचे आढळून आले. त्यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही कारमध्ये असल्याचे दिसून आले. कारचे दरवाजे उघडले असता मोबाइलसह कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. या चिठ्ठीमध्ये आपण जात आहोत, कोणाचे वाईट केलेले नाही, तसेच आपला शोध घेऊ नये, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.
--
शहरासह अन्यत्रही शोध
पोलिसांच्या एका पथकाने रविवारी पुन्हा एकदा गोदावरी नदीवरील धरण ते रामकुंड या परिसरात शोध घेतला. दुसऱ्या पथकाने शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके, तेथील सीसीटीव्ही, शहरानजीक असलेली पर्यटनस्थळे अशा ठिकाणी पाटील आढळतात का, या दृष्टीने तपास केला. पोलिसांनी धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, मुंबई, तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांचे छायाचित्र पाठवून शोध घेण्याची विनंती केली आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंतही पाटील यांचा पत्ता लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
--
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पाटील हे सर्वांत शेवटी नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे शनिवारी सकाळी दिसले होते. तेथील, तसेच शहरातील बस स्थानकांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यानंतर यादरम्यान आलेल्या व गेलेल्या सर्व रेल्वे गाड्यांबाबत पोलिसांनी माहिती घेतली. पोलिसांनी लागलीच मुंबई येथेही पाटील यांच्याबाबत कळविले आहे.
--
सर्व बाबी घेणार रॅकार्डवर
याबाबत सूत्रांनी बोलताना सांगितले, की कार्यालयीन त्रासामुळे पाटील यांनी घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हायकोर्टाने नुकताच महापालिकेविरोधात निकाल दिला. या सर्व घटना-घडामोडी या केसशी संबंधित असून, तपासाच्या दृष्टीने त्या रेकार्डवर घेतल्या जाणार आहेत. पाटील सापडणे महत्त्वाचे असून, त्यांचे धागेदोरे सापडण्याबाबत अद्याप एकही क्लू समोर आला नसल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.