म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्या वेळी शंकास्पद मतपत्रिकांवरूनच वाद निर्माण झाला होता. या शंकास्पद मतदानामुळे अटीतटीची निवडणूक होऊन वाद शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. त्यामुळे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम शंकास्पद मते बाजूला काढण्याचा निर्णय दोन्ही उमेदवारांच्या संमतीने घेतला गेला. १३ मते शंकास्पद आढळली. मात्र, या मतांमध्येही दराडे यांची आघाडी होती. दोन मतपत्रिकांवर दराडे यांना प्रथम क्रमांकाचा पसंतीक्रम देत त्याभोवती बॉक्स करण्यात आला होता, तर आठ मतपत्रिकांवर खाली-वर पसंतीक्रमांक टाकण्यात आला होता. एक मतपत्रिका कोरी आढळली. एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या नावासमोर एक क्रमांक टाकून पुढे रेषा आखण्यात आल्या होत्या. अन्य एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या फोटोखाली पसंतीक्रम टाकण्यात आला होता. १३ पैकी १२ मतपत्रिकांवर दराडे यांनाच पसंतीक्रम दर्शविण्यात आला होता, तर एक मतपत्रिका कोरी होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्व मतपत्रिका बाद केल्या. उमेदवारांसमोर स्ट्राँग रूममधून सकाळी साडेसहाला मतपेट्या केंद्रावर आणण्यात आल्या. मतांची खातरजमा केल्यानंतर सकाळी आठला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दोन टेबलांवर मतमोजणी झाली. एका टेबलवर उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तर दुसऱ्या टेबलवर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला २५ मतपत्रिकांचे २५ गठ्ठे आणि १९ मतपत्रिकांचा एक असे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते दोन टेबलांवर समसमान वाटण्यात आले. मतमोजणी सकाळी दहा वाजता पूर्ण झाली असली तरी आयोगाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत निकाल घोषित करण्यात आला नाही. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अधिकृत निकाल जाहीर करीत दराडे यांना प्रमाणपत्र दिले. दराडे-सहाणे-कोकणी एकत्र मतमोजणीला सुरुवात होताच दराडे आणि सहाणे यांनी एकमेकांजवळ बसून मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत हितगूज केले. दोघांनी बराच वेळ चर्चा करीत हास्यविनोद केले. त्यानंतर अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनीही मतमोजणी केंद्रात हजेरी लावली. नंतर तिघेही हास्यविनोद रंगले. या निवडणुकीत झालेल्या 'लक्ष्मीदर्शना'ची आणि मतदारांकडून आलेल्या कटूगोड अनुभवांच्या शिदोरीची एकमेकांनी देवाण-घेवाण केली. -- कोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मी विजयी होऊ शकलो. सर्वच पक्षांतील मतदारांनी मला मते दिली आहेत. सर्वांशी माझे चांगले संबंध असल्याचा फायदा झाला. त्यामुळे पक्षीय समीकरणातून विजय सोपा झाला. जातीपातीचा विचार न करता सर्वच जण पाठीशी राहिले. - नरेंद्र दराडे, विजयी उमेदवार, शिवसेना भाजपने धोका देत माझी फसवणूक केली. मी अपक्ष असलो तरी भाजपने मला पाठिंबा दिला असता तर नक्कीच माझा विजय झाला असता. मात्र, आज निकालाकडे नजर टाकली असता भाजपच्या पदरी काय पडले, हा प्रश्नच आहे. त्यामुळे भाजपने स्वत:सह राष्ट्रवादीचा पराभव ओढवून घेतला आहे. - परवेझ कोकणी, अपक्ष उमेदवार - पराभव मी मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. मतदार धनशक्तीच्या मागे उभे राहिले हे स्पष्टच झाले. चांगला सुसंस्कृत, सभ्य आणि निष्कलंक उमेदवार मतदारांना नको होता. दराडे यांना मतदान करणाऱ्यांनी जिल्ह्यातील ४५ लाख जनतेचा अपमान केला आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही माझ्या विरोधात काम केल्याने त्याचाही फटका बसला. -अॅड. शिवाजी सहाणे, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट