Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इंधन दरवाढीविरोधात चांदवडला निदर्शने

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ चांदवड येथे काँग्रेसतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तहसील प्रवेशद्वारात तब्बल तास ते दीड तास ठिय्या आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

सात दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे पडसाद गुरुवारी चांदवड येथे उमटले. सकाळी साडेदहा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांदवड तहसील कार्यालयाजवळ जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रवेशद्वाराजवळ तास ते दीड तास ठिय्या आंदोलन केले. भाजप सरकारने इंधन किमतीत सलग सातव्या दिवशी वाढ करून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याची भावना व्यक्त करून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, मजूर वर्गाला भाजप सरकारच्या दरवाढ धोरणांचा फटका बसत असून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात त्वरित सुधारणा करण्यात यावी, दरवाढ रोखावी अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शिरीष कोतवाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, पदाधिकारी समाधान जामदार, शिवाजी कासव, उत्तम ठोंबरे, पंकज दखने, भीमराव जेजुरे, सर्जेराव शिंदे, प्रकाश कुरणे, अशोक शिंदे, साहेबराव गवळी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार शरद मंडलीक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

...तर जर्मन स्टाइलने आंदोलन

जर्मनीत सरकारच्या अशा धोरणांचा निषेध करतांना नागरिक आपली वाहने रस्त्यात उभी करून असंतोष व्यक्त करतात. भारतात देखील

या पुढील काळात केंद्र सरकारच्या निषेधार्थ वाहने रस्त्यात उभी करून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे मत शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धूरविरहित चुलींची आदिवासींसाठी भेट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी कुटुंबीयांचे स्वास्थ्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारतर्फे त्र्यंबकेश्वर येथील पहिने गावात स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटमधील स्वामी कंठानंद यांच्याकडे तीन धूरविरहित चुली सुपूर्द करण्यात आल्या.

सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. लायन अभय बाग यांनी अध्यक्षीय भाषण केले. चुलीवर स्वयंपाक करताना धुरापासून होणाऱ्या त्रासामुळे मानवी जीवनावर घातक परिणाम होतात. या प्रकारातील चुली पर्यावरणपूरक असून, धुरापासून रक्षण होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी परिसरातील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सेक्रेटरी संतोष कलंत्री, कोशाध्यक्ष अनिल दक्षिणी, महेश भरबत, अश्विनी बाग आदी यावेळी उपस्थित होते. गोपाळ बिरार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोपखान्याचे ब्रीद बुलंद ठेवा

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

 भारतीय तोपखान्याच्या जवानांनी आजपर्यंतच्या सर्व युद्धांत प्राणाची पर्वा न करता 'सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल' हे  तोपखाना विभागाचे ब्रीदवाक्य बुलंद ठेवले आहे. आपणदेखील देशसेवेत सहभागी होताना हे ब्रीद बुलंद ठेवावे. जगात भारतीय  सैन्याची प्रतिमा उंचावण्यासाठी  प्रशिक्षणादरम्यान मिळालेली  शिस्त कायम ठेवत भविष्यात आणखी उंच शिखर गाठाल, असा विश्वास  स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया यांनी  प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

 नाशिकरोड येथील तोपखाना विभागातील ५०७ प्रशिक्षणार्थींची तुकडी  अकरा महिन्यांच्या अतिशय खडतर  प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. त्यांचा शपथविधी सोहळा  गुरुवारी येथील उमराव परेड मैदानावर  विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी कमांडर सलारिया बोलत होत.

या सोहळ्याच्या प्रारंभी मैदानावर लष्करी बँडने 'कदम कदम बढाये  जा'ची धून वाजवून  प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या सशस्त्र संचालनादरम्यान उपस्थितांनादेखील सलामी दिल्यामुळे मैदानावरील वातावरण स्फूर्तिदायी बनले होते. त्यानंतर  लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया, आर्टिलरी सेंटरचे कमाडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा या दोन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींच्या सहाही तुकड्यांचे  अभिनंदन केले. वेगवेगळ्या राज्यांतून निवड झालेल्या या ५०७ प्रक्षिक्षणार्थींना नाशिकरोड येथील तोफखाना विभागातर्फे ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले. त्यात फिजिकल, ड्रील, वेपन ट्रेनिंगसह असॉल्ट व ट्रेडमधील अत्याधुनिक प्रशिक्षणाचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर आता हे जवान सैन्य दलाच्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये दाखल होणार आहेत.

हे प्रशिक्षणार्थी ठरले 'बेस्ट'

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अरविंद यादव (बेस्ट इन ड्रील), शुभम (बेस्ट इन फिजिकल ट्रेनिंग), उग्रसेन (बेस्ट इन वेपन ट्रेनिंग), इंद्रवीर सिंग (बेस्ट इन गनर्स), गगन (बेस्ट इन टीए), मनीष कुमार (बेस्ट इन ऑपरेशन), आशिष कुमार (बेस्ट इन ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्स्पोर्ट), महादेव माळी व हेमंत कुमार (बेस्ट इन स्टीवर्ड), यांच्यासह इंद्रवीर सिंग यांना ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मर म्हणून सन्मानित करण्यात आले.     

पालकांचाही झाला सन्मान

या शपथविधी सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थींच्या पालकांनादेखील निमंत्रित करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यानंतर आपला मुलगा देशसेवेसाठी पाठविल्याबद्दल त्यांच्या माता-पित्यांचादेखील पदक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान होत असताना  त्यांच्या  डोळ्यात आनंदाश्रू  दाटून आले होते. खडतर प्रशिक्षण संपल्यावर मोठ्या कालावधीनंतर भेटलेल्या आपल्या पालकांना आपल्या हाताने घास भरविण्याचा मोह यावेळी प्रशिक्षणार्थींना आवरता आला नाही.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात तंरगतेय निर्माल्य

0
0

रामकुंडात तंरगतेय निर्माल्य

अधिकमासानिमित्त गर्दी; स्वच्छतेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अधिकमासामुळे सध्या रामकुंडात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अधिकमासात पवित्र तीर्थस्थानावर स्नानाचे महत्त्व असल्याने अधिकमासाच्या सुरुवातीपासूनच रामकुंडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. भाविकांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत असून, स्नानाबरोबरच गोदावरीची पूजा आणि दीपदान करण्यात येत असल्यामुळे रामकुंडात फूले आणि दिवे सोडण्यात येत आहेत. येथे ठेवण्यात आलेले दीपदानाच्या पात्र कमी पडू लागल्याने परिसरात इतरत्र निर्माल्य साचत असून, रामकुंडातही निर्माल्य तरंगताना दिसत आहे.

स्नानासाठी येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त असते. या महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी अडचण होते. वस्त्रांतरगृह असले तरी त्याच्यावर फलक नसल्यामुळे ते कळत नाही. वस्त्रांतरगृहाविषयी बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांना माहिती दिली जात नाही. गांधी ज्योतीच्या खालच्या बाजूला असलेल्या भागात साड्या बांधून आडोसा करून त्याच्याआड कपडे बदलण्यात येत आहेत.

शेवाळाने पडण्याची भीती

सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात आलेले नसल्यामुळे रामकुंडातील पाणी स्थिर आहे. दिवसभरात हजारोंच्या संख्येने भाविक रामकुंडात स्नान करीत आणि पूजा करीत असतात. हे पाणी स्थिर असल्यामुळे या पाण्याला दुर्गंधी पसरलेली आहे. रामकुंडातील दगडी पायऱ्यांवर स्थिर पाण्यामुळे शेवाळ साचले असल्याने त्यावरून पाय घसरून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकमासात नदीपात्रात दीपदान करण्यात येते. त्यासाठी लागणारे दिवे रामकुंड परिसरात द्रोणात फुले, बत्तासे, तेलात भिजविलेली वात, दुर्वा, तळशीपत्र ठेवण्यात येते. दहा रुपये किमतीचे हे दिवे स्नान करण्यासाठी येणारे भाविक स्नान झाल्यानंतर आवर्जुन पाण्यात सोडतात. काही येथे असलेल्या दीपदान पात्रात ठेवतात तर काही दिवे पात्रात वाहत जातात.

दिवे पाण्यात सोडू नका असे सांगण्यासाठी येथे सुरक्षारक्षक असले तरी सध्या वाढलेली भाविकांच्या गर्दीत ही सूचना कुणाकुणाला द्यायची हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पूजा करताना फुलेही पात्रात टाकली जात आहेत. पात्रातील कडेला असलेली फुले काढण्याचा प्रयत्न होतो. मात्र, मध्यभागी असलेली फुले काढणे मुश्किल होत असल्याने ते पाण्यावर तरंगत राहतात. तर बाहेर काढलेले निर्माल्याचे ढिगारे तयार होत आहेत. ते त्वरित उचलून घेण्याची व्यवस्था नसल्यामुळे रामकुंडाच्या बाहेरच्या भागात सर्वत्र निर्माल्य नजरेस पडत आहे.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात ‘न्यूड’ सर्वोत्कृष्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात 'न्यूड' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले असून, नाशिकची कल्याणी मुळे ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

अठरावा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या व्हिलेज इस्ट सिनेमा येथे ७ ते १२ मेदरम्यान पार पडला. त्यात रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या चित्रपटाने अनेक चित्रपटांना बाजूला सारत बाजी मारली. त्याचबरोबर मूळच्या नाशिकच्या असलेल्या कल्याणी मुळे या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन 'न्यूड' या चित्रपटानेच करण्यात आले होते. महोत्सवाचा समारोप राजकुमार रावच्या ओमेर्ता या चित्रपटाने झाला.

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी सिनेमांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात 'न्यूड'ला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर बराच वादही निर्माण झाला. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध करण्यात आला होता. मात्र, अशातही या चित्रपटाने महत्त्व पटवून दिले आहे. नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कल्याणी मुळे, छाया कदम आणि मदन देवधर यांच्या यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

नावावरून आणि त्यातील काही दृश्यांवरून हा सिनेमा तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या कचाट्यात सापडला होता. पण, आता सिनेमाला मिळालेल्या यशाने त्यावर घेतलेले आक्षेप आणि आरोपातील फोलपणा लक्षात उघड होत आहे. कारण, चित्रकलेचे शिक्षण घेताना नग्न देहाचे रेखाटन हा एक विषयच असतो आणि त्याचे शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिले जाते. तो देह पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा, तो रेखाटताना विद्यार्थ्यांची मनावर ताबा ठेवण्याची कसोटी असते. ज्यांना ते जमते ते या सिनेमात दाखवलेल्या जयरामप्रमाणे (ओम भुतकर)मोठे चित्रकार होतात.

--

दोन नामांकनांत बाजी

'न्यूड'ला मिळालेल्या या सन्मानामुळे पुन्हा एकदा मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. बेलेकम्पा, ज्यूझ, लाइट इन द रूम, टेक ऑफ या विदेशी चित्रपटांना धोबीपछाड देत मराठीच्या 'न्यूड'ने बाजी मारली. या महोत्सवात 'न्यूड'ला दोन नामांकने होती. त्या दोन्ही नामांकनामध्ये चित्रपटाने पुरस्कार मिळविले आहेत. या चित्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात बाजी मारल्यानंतर मराठी सिनेसृष्टीत आनंद व्यक्त होत आहे.

--

या चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले हा खूप मोठा सन्मान आहे. माझ्याबरोबर ज्या अभिनेत्रींना नामांकने मिळाली होती, त्याही दिग्गज होत्या. या सन्मानाने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.

-कल्याणी मुळे, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वर पक्षांची लॉन्ससाठी भटकंती

0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : नवीन विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा थेट फटका लॉन्स आणि मंगल कार्यालयमालकांना बसला आहे. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी विवाह सोहळ्यांचे बुकिंग घेणे थांबविले असून, शुभकार्य योजलेल्या वधू-वरांकडील मंडळींना हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आता चांगलीच कसरत करावी लागत असून, मंगल कार्यालयांची शोधाशोध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

अधिक महिना संपला, की शहरात पुन्हा लग्नांचा बार उडणार आहे. जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांमध्ये लग्नाच्या अनेक तिथी आहेत. या तिथींवर लग्नकार्य उरकता यावे, याकरिता वधू-वरांकडील मंडळींची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. परंतु, हा हंगाम पावसाचा असतो. त्यामुळे शुभकार्यात विघ्न नको म्हणून लग्नकार्य योजलेल्या मंडळींनी मंगल कार्यालय अथवा लॉन्स बुकिंगला प्राधान्य दिले आहे. एकीकडे वधू-वर पक्षांकडून मंगल कार्यालयांकडे बुकिंगबाबत विचारणा होत असताना लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या मालकांना मात्र तारखा बुक कराव्यात की नाहीत याची चिंता सतावू लागली आहे. अनेकांनी तर बुकिंग घेणेही थांबविले आहे.

महापालिकेने शहरातील तब्बल १६६ लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर अनधिकृत असल्याचा ठपका ठेवला आहे. या लॉन्सवर हातोडा पडण्यास सुरुवात झाली असून, काहींनी महापालिकेला सहकार्य करीत स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ही कारवाई रोखण्यासाठीचा समर्थ पर्याय व्यावसायिकांना उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी लॉन्समालकांचा जीव टांगणीला लागला असून, कारवाईच्या अनिश्चिततेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. कोणत्याही क्षणी कारवाईची शक्यता असल्याने विवाह सोहळ्यांच्या तारखा बुक कराव्यात की नाही, अशी त्यांची द्विधा स्थिती झाली आहे. परिणामी 'वेट अँड वॉच'चे धोरण अवलंबित अनेकांनी तूर्तास बुकिंग घेणे टाळले आहे. बुकिंग घेऊन प्रसंगी वधू-वर पक्षाला अडचणीत आणण्यापेक्षा काही गोष्टी वेळेवर सोडून देणे त्यांनी पसंत केले आहे. या प्रकारामुळे अनेकांना लग्नकार्यासाठी हव्या परिसरात योग्य लॉन्स किंवा मंगल कार्यालय उपलब्ध होत नसल्याने त्यांना वणवण करावी लागत आहे.

--

'त्यांचे' बुकिंग मात्र फुल्ल!

लॉन्स अथवा मंगल कार्यालयांवर अनधिकृत असा शिक्का नसलेल्या मालकांनी मात्र बिनदिक्कतपणे विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू केले आहे. जून महिन्यात १८, २१, २३, २५, २७ आणि २८ या तारखांना लग्नतिथी आहे. जुलै महिन्यात ५, १०, ११ तारखांना विवाहाचे मुहूर्त आहेत. अनधिकृत असा ठपका नसलेल्या बहुतांश लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये एव्हाना अनेक तारखांचे बुकिंग फुल्ल झाले असल्याची स्थिती आहे.

--

मटा मालिका

शुभमंगल 'सावधान'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची व्हॉट्सअॅप कन्क्टेव्हिटी!

0
0

पोलिसांची व्हॉट्सअॅप कन्क्टेव्हिटी!

सुरत, एमपीसह नाशिक पोलिसांचा गुन्ह्यांच्या माहिती अदानप्रदानासाठी व्हॉट्सग्रुप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याची हद्द असलेल्या गुजरातमधील सुरत, मध्यप्रदेशातील खारगाणे आणि नाशिक परिक्षेत्राशी संलग्न असलेल्या ठाणे व बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी पार पडली. यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून माहितीचे अदानप्रदान जलदगतीने करून आंतरराज्यीय गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विचारविनमय करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या गडकरी चौकातील कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीला सुरत परिक्षेत्राचे महानिरीक्षक ग्यानेंद्रसिंग मल्लिक, खारगोणे परिक्षेत्राचे डीआयजी ए. के. पांडे, नाशिक शहराचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह गुजरात राज्यातील डांग, वलसाड, तापी, नवसारी, नर्मदा, मध्यप्रदेशातील निर्मन, वाडवाणी, नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्याचे तसेच बुलढाणा आणि ठाणेचे पोलिस अधीक्षक किंवा अपर पोलिस अधीक्षक हजर होते. दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाचे पोलिस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून आंतरराज्यीत टोळींचे प्रस्थ वाढले असून, देशी कट्टे, मद्य, मानवी तस्करी यात त्यांचा सहभाग आढळून येतो. अगदी घरफोडी वा चेन स्नॅचिंग करणाऱ्या अशा टोळ्या कार्यरत असल्याचे यापूर्वी निष्पण्ण झाले आहे. दळणवळण आणि संपर्क साधनांची उपलब्धता गतीने झाली असून, त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो आहे. तुलनेत पोलिस यात मागे असून, एका जिल्ह्यातून अथवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गुन्हेगार सहजतेने जातात. या पार्श्वभूमीवर आयजी चौबे यांनी बॉर्डर मिटिंगचे आयोजन केले. बैठकीत सर्वांनीच आपल्याकडील पाहिजे असलेले, फरार गुन्हेगारांची, गुन्ह्यांची, तसेच मोडस ऑपरेडींबाबतची यादी एकमेकांना हस्तांतरीत केली. दुसरीकडे अनेक वर्षांपासून मिसिंग असलेल्या तसेच अनोळखी मृतदेहांबाबतच्या माहितीचे अदानप्रदान करण्यात आली.

चौबे म्हणाले,'दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही बैठक पार पडली. यापुढे बॉर्डर मिटिंग दरवर्षी आयोजित होणार असून, पोलिस स्टेशन पातळीवर दर तीन महिन्यांनी तर सहायक पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी तर सहा महिन्यांनी भेटून एकमेकांना माहिती देतील. माहितीचे अदानप्रदान अथवा इंटेलिजेन्स गुन्हेगारांइतकेच वेगवान होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्यात आला असून, याआधारे गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती वेगाने शेअर करणे शक्य होणार आहे.' मद्य, अंमली पदार्थ, हत्यारे, जनावरे तस्करी याकडे विशेष लक्ष याद्वारे पुरविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक परिक्षेत्रात अनधिकृत हत्यारांबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. यात ६० कट्टे पकडण्यात आले असून, यातील काहींची निर्मिती मध्यप्रदेशात झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून भिन्न राज्यातील दोन जिल्ह्यांचे पोलिस मिळून गुन्हेगारांना वठणीवर आणू शकतील, असा विश्वास चौबे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ दाम्पत्यांकडून श्रीविष्णू, श्रीकृष्णपूजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच अधिकमासाचे औचित्य साधून श्रीविष्णू व श्रीकृष्णाची महापूजा झाली. साठ दाम्पत्यांनी या पूजेचे यजमानपद भूषविले.

या पूजेप्रसंगी अष्टभुजा देवीसमोर महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राणी भवन संस्थेच्या कार्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. लक्ष्मीनारायण जोडपी, स्वतंत्र नारायण आणि एकेका लक्ष्मीनेही स्वतंत्रपणे पूजा केली. या पूजेचे पौरोहित्य राणी भवन संस्थेच्या महिला पौरोहित्य वर्गाने केले. या संस्थेचे वसतिगृह सर्वाधिक विश्वसनीय मानले जाते. या वसतिगृहाच्या नियोजित बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. शोभा गोसावी, विद्या चिपळूणकर, मंगल सौंदणकर, सुमित्रा गायधनी, भाग्यश्री पाटील आणि सर्व कार्यकारिणी मंडळातील सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वसाकाचे कुलूप काढले

0
0

१५ ऑगस्टपर्यंत सर्व देणी देणार; आमदार डॉ. आहेर यांचे उत्पादकांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व ऊस उत्पादकांची थकित देणी दिली जातील, असे ठोस आश्वासन 'वसाका'चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शुक्रवारी

त्यांच्या आश्वासनानंतर दहा दिवसांपासून कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकलेले टाळे काढण्यात आले. गुरुवारी 'वसाका'चे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत हे टाळे उघडण्यात आले. पुन्हा वसाका बंद करण्याची वेळ येऊ देवू नका, असे भावनिक आवाहन शेतकऱ्यांनी यावेळी केले.

सन २०१७- १८ च्या गाळप हंगामात वसाकाला ऊस उत्पादकांनी पुरवठा केला होता. मात्र साखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणींमुळे व्यवस्थापनाकडून वेळेवर ऊस देणे शक्य न झाले नाही. त्यामुळे १५ मे रोजी ऊस उत्पादकांच्या वतीने वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार आहेर यांनी गुरुवारी वसाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक, सभासद, पुरवठादार व कामगार यांच्या संयुक्त बैठक बोलावली होती.

आमदार डॉ. आहेर म्हणाले, वसाकाची सर्वस्वी जबाबदारी आपण घेतली आहे. अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीत वसाका चालू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दिवंगत आरोग्यमंत्री तथा वसाकाचे माजी चेअरमन दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देवून वसाकाचा कोणताही रुपया खर्च न करता रात्रंदिवस मी व माझे कुटुंब झटत आहे. सभासदांना दिलेल्या शब्दाला आपण बांधील आहोत. इतर कारखान्याच्या तुलनेत वसाकाही चांगला भाव देईन. त्यासाठी सभासदांनी निश्चिंत रहावे. साखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणी यामुळे उत्पादकांचे पैसे देण्यासाठी उशीर झाला. साखर विक्रीतून येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व देणी देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोसळत्या साखर भावामुळे आगामी हंगाम सुरू करणे 'वसाका'पुढे एक आव्हान आहे. सर्व ऊसत्पादक सभासद, कामगार व शेतकरी यांनी वसाका व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. आहेर यांनी केले. यावेळी नितीन पाटील, गौतम जैन, बापूसाहेब राजपूत, कारभारी पवार, गोविंद पगार, सुनील देवरे, पंडितराव निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेस माजी आमदार शांताराम आहेर, जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, सहाय्यक निबंधक संजय गीते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद-कामगार उपस्थित होते. वसाकाचे कार्यकारी संचालक बी. डी. देसले यावेळी अनुपस्थित होते.

नुकसानीस जबाबदार कोण?

कारखान्याला गेल्या १० दिवसांपासून कुलूप लावल्याने सुमारे ४० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल डॉ. आहेर यांनी केला. केंद्र सरकारकडून आजारी व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वसाका कारखान्यास सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, त्यातून प्राधान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे देणे, कामगार, ऊसतोडणी व इतरांचे देणे दिले जाईल.

आम्ही झळ सोसली

कसमादेसह नवापूर, शहादा, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव आदी भागातील शेतकरी सकाळपासून हजर होते. वसाका चालू ठेवा, बंद कारखान्याची झळ आम्ही सोसली आहे, कृपया वसाका बंद ठेवू नका असे भावनिक साकडे उत्पादकांनी आहेर यांना घातले.

पवारांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

वसाका कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठक असतानाही कार्यकारी संचालक बी. डी. देसले गैरहजर असल्याने उपस्थितीतांपैकी अनेकांनी त्याच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच वसाकाचे माजी चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या कार्यकाळातील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरणाने पावसाची चाहूल...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्याच्या तप्त उन्हाच्या चटक्यांमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. दुपारी बारा वाजेपर्यंत सूर्याचे दर्शनही न झाल्याने पाऊस पडणार की काय, अशी चर्चा नाशिककरांमध्ये सुरू झाली होती. परंतु, बारा वाजेनंतर मात्र सूर्यदर्शनाने कडाका वाढला. या विरोधाभासी वातावरणामुळे उकाड्यात पुन्हा वाढ झाली. मात्र, या प्रकारामुळे पावसाची चाहूल लागल्याची चर्चा नागरिकांत रंगली होती.

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने नाशिकमधील ढगाळ वातावरण पाहता पाऊस पडणार असल्याच्या चर्चा सामान्यजनांमध्ये रंगतात. गुरुवारीही असेच चित्र शहरात होते. उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळी नऊ वाजेपासूनच बाहेर पडताना एरवी टोपी, रुमालाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गुरुवारी नाशिककर निर्धास्तपणे शहरात फिरू शकत होते. गेल्या आठवडाभरापासून नाशिकमधील तापमानात तीन ते चार अंशांची घट झाली आहे, तसेच दि. २३ मे रोजी ३३ टक्के असलेली हवेतील आर्द्रता गुरुवारी (दि. २४) ६१ टक्के म्हणजे जवळपास दुपटीने वाढली होती.

--

\Bछत्र्या, रेनकोट बाहेर!

\Bउन्हाळा, हिवाळ्यात ठेवून दिलेले रेनकोट, छत्र्या ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी बाहेर काढून ठेवल्या. ऐन पावसात फजिती नको या उद्देशाने या वस्तू सोबत बाळगण्यास अनेक जण प्राधान्य देऊ लागले आहेत. तसेच, पावसाळ्यात छत्र्या, रेनकोटचे दर वाढतील, या विचाराने अनेक जण आताच पावसाळ्याच्या खरेदीला प्राधान्य देऊ लागले आहेत.

- - -

\Bआठवडाभरातील तापमान

\Bदिनांक कमाल किमान आर्द्रता

१९ मे ३९.० २२.६ ५५ टक्के

२० मे ३९.३ २२.६ ५१ टक्के

२१ मे ३७.८ २२.२ ६८ टक्के

२२ मे ३६.३ २२.४ ४६ टक्के

२३ मे ३६.८ २४.४ ३३ टक्के

२४ मे ३६.३ २४.४ ६१ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मायबाप’ने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

0
0

वसंत व्याख्यानमालेत कवितांचा एकत्रीत कार्यक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसे पोटार्थी होऊन खेड्याकडून शहराकडे लोंढे घेऊन निघालीत. त्यांना आपल्या गावाचे संस्कार, एकत्र कुटुंबपध्दती, आचार-विचार या बंद फ्लॅटच्या अरूंद खोलीत अडगळ वाटू लागली. त्यामुळे त्यांनी ते गावाकडेच सोडून देणे पसंत केले. काहींनी सोबत आणले पण, त्यांना ते झेपवेनासे झाले. आई-वडील कामाला आणि मुले पाळणाघरात, अशी नवी संस्कृती उदयास येऊ लागली. त्यातून अरूणराज ग्रुपने मायबाप हा कार्यक्रम निर्माण केला. या कार्यक्रमात आई आणि वडील यांच्याबद्दल ज्या-ज्या कवींनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या त्यातल्या काही काळजाला हात घालणाऱ्या कवितांचा एकत्रीत कार्यक्रम म्हणजे मायबाप होय.

वसंत व्याख्यानमालेत चोविसावे पुष्प राजेंद्र उगले व अरूण इंगळे यांनी गुंफले. 'माय बाप : एक कृतज्ञता' हा आई-वडिलांबद्दल संगीतावर आधारित कार्यक्रम गुरूवारी सादर झाला. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर हे व्याख्यान सुरू आहे. गुरूवारचे व्याख्यान शांतारामबापू वावरे यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते.

'मह्या मायमुळे थिटं, समदं देऊळ राऊळ... तिच्या पायाच्या चिऱ्यात, माहे अजिंठा वेरूळ' ही कविता मनाचा ठाव घेऊन गेली. 'काय देऊ पोरी तुला, नाही माझ्यापाशी काही...दिल्या घेतल्याचं जग, कुणी कुणाचं गं नाही' या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. यात प्रशांत असनारे, अशोक बुरबुरे, विजयकुमार मिठे, कमलाकर देसले, गौरवकुमार आठवले, राजेंद्र उगले, अरूण इंगळे, प्रशांत मोरे यांच्या कवितांचा समावेश होता. सूत्रसंचालन दत्ता अलगट यांनी केले. सिंथेसायझरवर नरेंद्र जाधव तर तबल्यावर प्रणव कोंटूरवार यांनी साथसंगत केली.

आजचे व्याख्यान

वक्ते : ब्रह्मकुमार सुरजभाई

विषय : जीवनविषयक शंका समाधान

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या दौऱ्यासाठी मैदान झाले चकाचक!

0
0

आयुक्तांच्या दौऱ्यासाठी मैदान झाले चकाचक! (फोटो)

जेलरोड : वॉक विथ कमिशनर या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी (दि.२६) नाशिकरोडला येणार आहेत. मुक्तिधाममागील आनंदनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर ते नागरिकांशी संवाद साधतील. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी या मैदानाची साफसफाई करण्यात आली. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी मैदानाचा प्रत्येक कोपरा साफ केला. स्वच्छतेपासून व्यवस्थापनापर्यंत काहीही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी वरिष्ठ अधिकारी घेत आहेत.

कालव्यात मृतदेह

पंचवटी : गंगापूर डाव्या कालव्यास सध्या आवर्तन सुरू असून, गुरुवारी (दि. २४) औरंगाबादरोडवरील नीलगिरी बागेलगत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशिष पांडुरंग बांडे (वय २१, रा. हनुमानवाडी) याचा मृतदेह सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. तपासात पंचवटी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २३) आशिष हरविल्याची तक्रार दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

वृक्षांवर कुऱ्हाड (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील लोखंडे मळ्यात गुरुवारी सकाळी रहिवाशाने अंगणातील झाडे तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. टाकळी रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी सव्वाशे झाडे तोडण्यात आल्यानंतर जागामालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडे मळ्याच्या शेवटच्या टोकाला अशोका व आंब्याची हिरवीगार झाडे आहेत. या झाडांमुळे लोखंडे मळ्याला शोभा आली असताना त्यातील काही झाडांवर संबंधिताने कुऱ्हाड चालवली. नागरिकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

७८ विद्यार्थ्यांना रोजगार

सातपूर : आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सातपूरच्या आयटीआयमध्ये रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील लघु उद्योजकांनी आयटीआय उत्तीर्ण ७८ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. रोजगार मेळाव्यात आयटीआयचे प्राचार्य व शिक्षकही सहभागी झाले होते. दि. २८ मे रोजी पुण्यातील बड्या कंपन्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

अफवांवर उतारा -२

रामकुंडात तरंगतेय निर्माल्य -३

ब्रीद ठेवा बुलंद… -४

नंदनवनातील अनामिक -५

भाषेपेक्षा भूमिका महत्त्वाची -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनक्षोभापुढे माघार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर कोणत्याही दिवशी बुलडोझर चालवू, असा इशारा देणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील अतिक्रमणांबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यानी मुंढेंना सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्याने, तसेच वाढता जनक्षोभ लक्षात घेत आयुक्तांनी तूर्तास सिडकोतील घरांवरील रेखांकनाची कारवाई थांबविली आहे.

सिडकोतील वाढता जनक्षोभ लक्षात घेत आमदार सीमा हिरे यांनी गुरुवारी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासमोर सिडकोतील अस्वस्थतेची कहाणी विशद केली. त्यानंतर आयुक्तांशी कारवाई थांबविली आहे. दरम्यान, सिडकोत टीडीआर लोड होत नसतानाही महापालिकेने येथील नागरिकांना कंपाउंडिंग धोरणात अर्ज करण्याचे आवाहन केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार घेतल्यापासून शहरातील अतिक्रमणे रडारवर घेतली आहेत. त्यातच आयुक्तांनी सिडकोतील अतिक्रमणांसंदर्भातील एका तक्रारीचा आधार घेत संपूर्ण सिडकोतल्या २५ हजार घरांवर बुलडोझर फिरवण्याचा तयारी सुरू केली होती. नगररचना विभागाच्या वतीने सिडकोतील घरांवर रेखाकंनाचे काम सुरू केल्याने सिडकोतील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. सिडकोतील रहिवाशांमध्ये या कारवाईविरोधात असंतोष निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्याच्या प्रश्न निर्माण झाला होता. सिडकोतील कारवाईबाबत आयुक्तांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही मुंढेंनी हुसकावून लावले होते. कोणत्याही दिवशी बुलडोझऱ् चालवू, असा इशाराही दिला होता. नगरसेवकांशीही वाद घातला होता. त्यामुळे सिडकोतील कारवाई अटळ समजून नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू केली होती. परिणामी भाजपच्याच अडचणी वाढल्या होत्या.

मुंढेंच्या कार्यपद्धतीचा अनुभ‌व असलेल्या भाजप आमदार सीमा हिरेंनी वाढता जनक्षोभ लक्षात घेत तातडीने गुरुवारी जव्हारमध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुंढेंच्या या कारवाईमुळे होणाऱ्या संभावित परिणांमाची जाणीव त्यांनी करून दिली. या कारवाईने सिडकोतील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, अशी जाणीव हिरेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी मुंढेंना फोन करून तूर्तास ही कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरेंनी दिली. यावेळी नगरसेविका छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, शोभा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, दिलीप देवांग, एकनाथ नवले, मुन्ना हिरे, मयूर लवटे, सुशील नाईक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सिडकोतील नागरिक उपस्थित होते.

रेखांकनाचे काम थांबले

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्त मुंढेंनीही वाढता जनक्षोभ लक्षात घेत रेखांकनाची कारवाई तूर्तास थांबविण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. जनक्षोभ वाढत असल्याने ही कारवाई थांबवत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी सिडकोत गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेतर्फे सुरू असलेले रेखांकनाचे गुरुवारी थांबल्याचे दिसून आले. संपूर्ण सिडकोत कोठेही रेखांकनाचे काम करण्यात आले नसल्याने तूर्तास तरी सिडकोतील नागरिकांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला असला, तरी अतिक्रमणांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

टीडीआर अशक्यच

दरम्यान, महापालिकेने या नागरिकांना अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रशमन धोरणांतर्गत कंपाउंडिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, महापालिकेची ही फसवेगिरी असल्याचा दावा येथील नगरसेवकांनी केला आहे. सिडकोत एकच एफएसआय असून, येथे टीडीआर लोड करून बांधकामे नियमित करणे शक्य नाही. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत होत नसतानाही महापालिकेने केलेले आवाहन चुकीचे असल्याचा दावा केला जात आहे. अतिक्रमणांची कारवाई करण्यापूर्वी महापालिकेला सिडकोची परवानगीही आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला आस्ते कदमचा पर्याय स्वीकारावा लागला आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे सिडकोतील सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सिडकोतील नागरिक वर्षानुवर्षे येथे राहत असून, सिडकोतील अधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा नागरिकांना देण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट घेतली असून, त्यांनी महापालिकेला कारवाई थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

-सीमा हिरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही तर राष्ट्रवादी-भाजप युतीला चपराक

0
0

शैलेन्द्र तनपुरे

shailendra.tanpure@timesgroup.com

नाशिक : पुरेसे संख्याबळ नसताना शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत घडवून आणलेला विजयाचा चमत्कार हा पक्षाला बळ देणारा तर ठरणार आहेच, पण जिल्ह्यातील राजकारणालाही नवा आयाम देणारा ठरणार आहे. राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांची लढत अत्यंत काट्याची होईल, अशीच सार्वत्रिक भावना असताना प्रत्यक्षात दराडेंनी अभूतपूर्व मते घेत मिळविलेला विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस- आघाडीच्या भाजपबरोबरच्या अभद्र युतीलाही चपराक म्हणावी लागेल.

विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना सुरुवातीपासून आत्मविश्वासात वावरत होती. उमेदवारी जाहीर करण्यापासूनच त्यांनी ही आक्रमकता दाखवून दिली होती. वास्तविक भाजपबरोबर त्यांची युती ही सर्वांनीच गृहीत धरली होती. त्यानुसार राज्यातील सहापैकी निम्या जागांवर दोघांनीही उमेदवार जाहीर करून अप्रत्यक्ष युती झाल्याचे संकेत दिले होते. मात्र, पालघरचे नाट्य घडले अन् युतीचे मुसळ केरात गेले. त्यानंतर शिवसेनेला इशारा देण्यात भाजपने बराच काळ घालविला. पावणेदोनशेहून अधिक मतसंख्या असताना भाजपला ना स्वत:ची ताकद ओळखता आली ना काळाची पाऊलेही. साहजिकच प्रारंभी परवेझ कोकणी या अपक्षाला पाठिंबा असल्याचे वातावरण निर्माण केले गेले. नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला गेला. खरे तर तोपर्यंत दराडेंनी या मतांवर दरोडा टाकला होता. कोकणींच्या फसवणुकीमुळे शंभरावर असलेला मुस्लिम मतदारही शिवसेनेला आयताच मिळाला. भाजपला त्याची साधी भुणभुणही लागू नये हे धक्कादायक होते. राजकारणातील वास्तवाच्या अज्ञानाचे प्रदर्शनही त्यात घडले. शिवसेनेतून आयात केलेला उमेदवार राष्ट्रवादीत फीट बसलाच नाही. त्यामुळे पराभवाची तीव्रता वाढली. या निकालातून शिवसेनेचा एकजिनसीपणा, भाजपचा कमालीचा वेंधळेपणा, पाहुण्यांच्या हातून साप मारण्याचे राष्ट्रवादीचे धोरण आणि काँग्रेस व मनसे यांना अजूनही न गवसलेला शहाणपणा अशा विविध छटा पाहायला मिळाल्या आहेत. सर्वच पक्ष विरोधात असताना मोठ्या मताधिक्याने मिळविलेला हा विजय जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यात मदतगार ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाचे क्राइम

0
0

गिरणा बंधाऱ्यात

बुडून मुलाचा मृत्यू

मालेगाव : शहरातील सनाउल्ला नगर भागातील उजैफा मलिक अब्दुल रहेमान (वय १३) या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा गिरणा नदी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२२) ही घटना घडली. उजैफ दुपारी घराबाहेर पडला होता. सायंकाळी उशिरापर्यंत रोजा सोडण्यासाठी तो घरी न आल्याने कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. तो दुपारी गिरणा बंधाऱ्यावर पोहण्यास गेला असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. रात्री उशिरा कुटुंबाने त्याचा शोध घेतला. बंधाऱ्यावर त्याची सायकल आढळून आली. रात्री अग्निशमन दलाने त्याचा शोधून काढला .

0000

टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

पिंपळगाव बसवंत : येथील पी. एन. जी. टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलन बुधवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आगामी दीड महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही टोल व्यवस्थापक प्रताप भोईटे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यामुळे चार दिवसांपासून वाहनधारकांचा 'टोल फ्री' प्रवास आता थांबला असून या दिवसात सहकार ग्लोबल कंपनीचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आंदोलनाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दाखल घेत बुधवारी सांयकाळी टोल प्लाझावरच टोल प्रशासन व कामगार संघटनेच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत टोल प्रशासनाने मागण्याबाबत विचार करण्यासाठी महिना दीड महिन्यांची मुदत मिळावी तो पर्यंत कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन काम सुरू करावे अशी भूमिका मांडली. उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे, कामगार युनियनचे नेते पांडुरंग भडांगे, डॉ. अजय लोढा, रामेश्वर भावसार, सुधीर डांगळे आदी उपस्थित होते.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाईचे आदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा,कळवण

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी कळवण तालुक्यातील आढावा बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. बदली होऊनही अद्यात दप्तर न देणाऱ्या दोन तत्कालिन ग्रामसेवकांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. विविध विकासकामांचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून देत त्यानंतर आपण सविस्तर आढावा घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. डॉ. गिते यांच्या 'कडक' आढाव्यामुळे ग्रामीण भागातील अपूर्ण असलेल्या विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. गिते यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक येथील हरी ओम लॉन्समध्ये घेण्यात आली. महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती दिली. ग्रामसेवकांनी ग्रामविकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश गिते यांनी दिले.

डॉ. गिते यांनी ग्राम बालविकास केंद्र अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांबाबतची माहिती वस्तुस्थितीनुसार नसल्याचे सांगत पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणाची खोटी माहिती दिल्यास कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे गिते यांनी सांगितले. पाणी गुणवत्ता तपासणीचे काम आरोग्य कर्मचारी व ग्रामसेवकांचे आहे. त्यात गैर आढळल्यास दोघांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोसवन व सप्तशृंगगड येथील तत्कालीन ग्रामसेवकांनी अद्याप नवीन ग्रामसेवकास दप्तर उपलब्ध करून दिले नसल्यामुळे तत्कालीन ग्रामसेवकांवर तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याच्या व ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्याला नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले. धार्डेदिगर ग्रामपंचायत ग्रामसेवकांचीही तपासणी करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

कसबेवणी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची डॉ. गिते यांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेश्वरीतर्फे क्रीडा स्पर्धा

0
0

सोशल कनेक्ट

माहेश्वरीच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड माहेश्वरी कुमार मंच आणि जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे नाशिकरोड येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव झाला. विविध क्रीडाप्रकारात मालेगावने वर्चवस्व मिळवले. माहेश्वर युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन भुतडा, नाशिकरोड अध्यक्ष अच्युत राठी, विष्णु तापडिया, ओकांर राठी, पुष्पक कलंत्री, संकेत लोहिया, संदेश लोहिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

संकेत राठी, नीतेश बूब, नीतेश तापडिया, आशिष कलंत्री, विनय केला, समीर भट्टड, नीतेश नावंदर, मनोज भुतडा, ऋतिक कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते. क्रिकेटमध्ये मालेगाव टायगर्सने विजेतेपद तर नाशिकरोड इमेजने उपविजेतेपद मिळवले. व्हॉलीबालमध्ये नाशिकरोड इमेजने विजेतपद व इगतपुरी माहेश्वरी युवक मंडळाने उपविजेतेपद मिळवले. बुद्धीबळात तेजल लढ्ढा विजेता तर हार्दिक कलंत्री उपविजेता ठरला. बॅडमिंटन एकेरीत वेदांत सोनीने प्रतीक मालपाणीला हरवून विजेतेपद मिळवले. दुहेरीत प्रतीक मालपाणी-सिद्धार्थ काबरा जोडीने प्रथमेश जाजू-अनिरुद्ध काबरा जोडीला हरवले. टेबल टेनिस एकेरीत शुभम राठीने अंकित करवाला हरवून विजेतेपद मिळवले. दुहेरीत विष्णु तापडिया-नितीश बूबने अच्युत राठी-नितीश तापडीयाला नमवले. कॅरम एकेरीत अंकत करवा जेता तर मुकूंद राठी उपविजेता ठरला. दुहेरीत अंकित करव-दर्शन जाजू या जोडीने मुकुंद राठी-चेतन माहेश्वरीवर विजय मिळवला. जलतरण स्पर्धेत सिद्धार्थ काबरा प्रथम तर राघवेंद्र जाजू द्वितीय आला. धावण्यामध्ये जालज बिहानी प्रथम तर जयेश झंवर द्वितीय आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत क्रेनद्वारे फांद्यांची छाटणी

0
0

देवळाली कॅम्प : येथील लामरोडसह शहरांतर्गतच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांची छाटणी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने थेट क्रेनची मदत घेतली आहे. शहराच्या लामरोडसह अन्य मुख्य रस्त्यांवर जास्त प्रमाणात वड, पिंपळ, नारळ यांसारखी उंच झाडे आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा झाडांच्या वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची मान्सूनपूर्व छाटणी करण्यात येत आहे. यापूर्वी उंच झाडांच्या फांद्यांची झाडावर जाऊन छाटणी केली जात असे. मात्र, आता तशी माणसे उपलब्ध होत नसल्याने क्रेनचा आधार घ्यावा लागत आहे.

--

पवार यांची निवड (फोटो)

जेलरोड : मविप्रच्या गांधीनगर येथील जनता विद्यालयाच्या शालेय समितीवर साहेबराव पवार यांची सदस्यपदी निवड झाली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षक मंडळाचे सदस्य, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या पतसंस्थेचे ते माजी सचिव आहेत. या निवडीचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक नाना महाले, नाशिक एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे आदींनी स्वागत केले आहे.

--

वाढदिवस वृद्धाश्रमात (फोटो)

देवळाली कॅम्प : शहरातील मानवसेवा वृद्धाश्रमात भोजनवाटप करीत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी सरचिटणीस प्रीतम आढाव यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थी दत्तक योजना आदींच्या माध्यमातून अलीकडे आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आढाव यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून समाजभान दाखविले असल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, एकनाथ शेटे, उपमहापौर प्रथमेश गिते, अजय बोरस्ते, सचिन मराठे, विक्रांत चांदवडकर, बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, तानाजी करंजकर, प्रेरणा बलकवडे आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात शिवसेनेचा जल्लोष

0
0

टीम मटा

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लक्षवेधी निवडणुकीत शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळविल्याने येवला, मालेगाव, मनमाड, निफाडसह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

येवल्यात आतषबाजी

येवला : नरेंद्र दराडे विजयी झाल्याचे वृत्त येवल्यात धडकताच दराडेंचे 'होमपीच' असलेल्या येवल्यात मोठा जल्लोष सुरू झाला. भगवे झेंडे नाचवीत शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व दराडे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहरात एकच जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजीसह गुलालाची उधळण करीत विंचूर चौफुलीवर सर्वांनीच फेर धरला. 'शिवसेनेचा विजय असो', 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', आदी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

0000

निफाडमध्ये आनंदोत्सव

निफाड : शहरातील शिवाजी चौकात निफाड शहर शिवसेनेच्या वतीने फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर कराड, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक जावेद शेख, संदीप जेऊघाले, उपतालुकाप्रमुख इरफान सैय्यद, युवासेनेचे तालुकाप्रमुख बापू कापसे, संजय धारराव, योगेश कुंदे, गौतम ललवाणी व शिवसैनिक उपस्थित होते.

0000

मनमाडला मिठाई वाटप

मनमाड : दराडे विजयी झाल्याचे कळताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनमाड येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजीसह जल्लोष केला. शिवसेनेनेविरोधात सगळ्यांनी एकजूट करूनही दराडे यांनी बाजी मारल्याने संपूर्ण शहरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेतर्फे गुरुवारी दुपारी एकात्मता चौकात विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवसेना नेते अल्ताफ खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहर उपप्रमुख जाफर मिर्झा, सोनू पोहाल, परेश राऊत, प्रवीण धाकराव, पंडीत सानप, वाल्मिक दराडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. नांदगाव शहर व तालुक्यातही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विजयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.

0000

मालेगावात उधळला गुलाल

मालेगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी बाजी मारल्याचे कळताच मालेगावी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शिवसैनिकानी उत्सव वाजंत्री वाजवून, फटाके उडवून जल्लोष केला.

संपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, युवासेना विस्तारक अविष्कार भुसे, अजिंक्य भुसे, संजय दुसाने, श्रीराम मिस्तरी, सखाराम घोडके, दादाजी शेजवळ, जे. पी. बच्छाव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळ यांना तूर्त दिलासा नाही

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना गुरुवारीही जामिनाविषयी दिलासा मिळू शकला नाही. सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी समीर यांना कोणताही अंतरिम दिलासा न देता जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ५ जूनला ठेवली.

'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५ अन्वये मनी लाँडरिंगमध्ये सहभाग नसल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवरच टाकण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे कलम जुलमी स्वरूपाचे असल्याचे सांगत घटनाबाह्य ठरवले होते. यासह अन्य काही मुद्द्यांच्या आधारावर मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी ४ मे रोजी जामीन मंजूर केला आहे. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने कलम ४५ अन्वये घटनाबाह्य ठरवल्यानंतर संपूर्ण देशात अशा प्रकरणांत आरोपी असलेल्यांना त्या-त्या न्यायालयांकडून जामीन मंजूर झालेले आहेत. केवळ समीर यांनाच अद्याप जामीन मिळालेला नाही', असा युक्तिवाद समीर यांच्यातर्फे अॅड. विक्रम चौधरी यांनी मांडला. मात्र, 'ईडी'तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला.

'या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले असले तरी अद्याप तपास यंत्रणेचा तपास पूर्ण झालेला नाही. समीर अनेक बनावट कंपन्यांवर संचालक होते आणि या कंपन्यांमार्फत काळा पैसा अन्यत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. परदेशी कंपन्यांशीही याचा संबंध असून या साऱ्याशी समीर यांचा थेट संबंध आहे', असे म्हणणे सिंग यांनी मांडले. त्याच वेळी कलम ४५ रद्दबातल ठरलेले असले तरी केंद्र सरकारने या कायद्यात १९ एप्रिलला अधिसूचनेद्वारे दुरुस्ती केलेली असल्याने त्याआधारे समीर यांना दिलासा दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाही त्यांनी मांडला. मात्र, या संदर्भात न्या. गडकरी यांनी वारंवार उपस्थित केलेल्या काही कायदेशीर प्रश्नांविषयी सिंग यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. अखेर सिंग यांनी पुढील सुनावणी सुटीनंतरच्या नियमित न्यायालयात ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायमूर्तींनी ती ५ जूनला ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images