म. टा. प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी झालेल्या निवड चाचणीत जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांमधून सुमारे ११० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि व्ही. एन. नाईक महाविद्यालय यांच्यावतीने शिबिर झाले. 'रासेयो'चे जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र अहिरे यांनी निवड चाचणीचे उद्घाटन केले. यावेळी 'रासेयो'चे विविध महाविद्यालयांमधील अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. आशा ठोके, प्रा. भारत शेळके उपस्थित होते. आव्हान शिबिरातील सहभाग, नियम, सहभाग, शिस्तबद्धता आदीहबद्दल डॉ. डी. के. आहेर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी जिल्हाभरातून २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्रा. समीन शेख , अशोका बी. एड. महाविद्यालयातील प्रा. आशा ठोके यांची संघनायक म्णून निवड करण्यात आली. या निवडीसाठी परीक्षक म्हणून प्रा. रवींद्र आहिरे, प्रा. पी. डी. पाडेकर, प्रा. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. समिन शेख आणि प्रा. मिलिंद सोळंकी यांनी काम पाहिले. निवड चाचणीच्या समारोप सत्रात प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. एनआरडी आणि एसआरडीच्या उपक्रमांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिबिरात गौरविण्यात आले. प्रा. स्नेहल कासार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास अधिकारी शरद काकड यांनी आभार व्यक्त केले. असे असेल आव्हान शिबिर यंदांचे राज्यस्तरीय आव्हान शिबिर औरंगाबाद येथे २५ मे ते ३ जून या काळात होणार आहे. पुणे विद्यापीठांतर्गत पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांमधून सुमारे ९० विद्यार्थी व ६ संघनायक तसेच राज्यभरातील इतर जिल्ह्यांमधून ५० विद्यार्थी यात सहभागी होतील. शिबिरात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व कलात्मक विकासावर भर दिला जाईल. हे शिबिर पूर्ण करणारे विद्यार्थी सामाजिक आपत्तीच्या स्थितीत पोलिस मित्र म्हणून कार्यरत राहू शकतील. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना पाच अतिरिक्त गुणही देण्यात येणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट