Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये बुद्धिबळाच्या पटावर नवी संघटना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात बुद्धिबळाच्या पटावर 'दि अमॅच्युअर चेस असोसिएशन' या नावाची नवी संघटना स्थापन झाली असून, संघटनेला ऑल मराठी चेस असोसिएशन (एएमसीए) या राज्य संघटनेने संलग्नता दिली आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या एएमसीएच्या बैठकीत या संघटनेला संलग्नता देण्यावर शिक्कामोर्तब झाले. लवकरच संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अमॅच्युअर संघटनेचे सचिव संदीप नागरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्यात यापूर्वी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना कार्यरत होती. मात्र, धर्मादाय कार्यालयाने गेल्या महिन्यात नऊ जणांचे नवे विश्वस्त मंडळ नियुक्त केल्यानंतर एएमसीएने या संघटनेला संलग्नता दिली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यापासून नाशिकमध्ये राज्य संघटनेची मान्यता असलेली संघटना कार्यरत नव्हती. त्यामुळे संदीप नागरे यांच्यासह काही जणांनी नुकतीच द अमॅच्युअर चेस असोसिएशनची स्थापना केली. या संघटनेला एएमसीएने संलग्नता दिल्याने निवड चाचण्यांसह जिल्हास्तरीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा अधिकृतपणे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संघटनेच्या अध्यक्षपदी भरत वानखेडे, उपाध्यक्षपदी ओंकार जाधव, सचिवपदी नागरे, तर खजिनदारपदी वीरेंद्र गायकवाड आहेत. याशिवाय समीर पानसरे, राम माळवे, किशोर वाकचौरे सदस्य आहेत. खेळाडूंचे हित लक्षात घेता राज्य संघटनेने जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना आपले हक्काचे व्यासपीठ द अमॅच्युअर चेस असोसिएशनच्या रूपाने उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना आता सर्व अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करता येणार असल्याचे संघटनेचे सचिव नागरे यांनी म्हटले आहे. संलग्नता मिळाल्याने खेळाडूंचा शासकीय व निमशासकीय सवलतींचाही मार्ग मोकळा झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

नवी कार्यकारिणी लवकरच

अमॅच्युअर चेस असोसिएशनची सध्या सात जणांची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मात्र, बुद्धिबळप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालकांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर कार्यकारिणीचा विस्तार व पुढील कार्यक्रमांची दिशा स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती एएमसीएचे कोशाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांची सावली उद्या होणार गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना रविवारी (दि. २०) शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी बारा वाजता सूर्य माथ्यावर असतानादेखील सावली पडत नाही, असा अनुभव यानिमित्ताने मिळत असल्याने या दिवसाविषयी विशेष उत्सुकता खगोल अभ्यासकांबरोबरच सामान्यांनाही आहे.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तर किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. त्यामुळे शून्य सावलीचा हा सर्वांसाठीच रोमांचकारी अनुभव आहे. राज्यात ७ मे पासून विविध जिल्ह्यांमध्ये याचा अनुभव येत असून नाशिक व औरंगाबाद येथे २० मे रोजी हा अनुभव मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीला कारवाईचा इशारा

0
0

सीईओ डॉ. गिते यांच्याकडून दूषित पाण्याची दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखतानाच संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे गडावर दूषित पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली निघण्याची चिन्हे आहेत.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे सतत होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नोटीस देऊनही दखल न घेणाऱ्या ग्रामसेवकाची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रसंगी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही डॉ. गिते यांनी दिला आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावास शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायती पाणी नमुने तपासणीसाठी देत नाहीत तसेच टीसीएलची तपासणीही अनेक ठिकाणी करण्यात येत नाही. याबाबत तालुका आढावा बैठकींमध्ये सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पाणी नमुने तपासणीत सप्तशृंग गडावरील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. दूषित पाणी नामुण्याबाबत यापूर्वीही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. बी. जाधव यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, तरीही जबाबदारीने काम न केल्याने सप्तशृंग गडावरील पाणी नमुने दूषित आले आहेत.

नोंद मूळ सेवा पुस्तकातही

सप्तशृंगी गडावर पाणीगळती होत असल्याचे निदर्शनात आले असून ग्रामपंचायतीस सतत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत कळवून देखील ग्रामसेवक आर. बी. जाधव यांनी यावर योग्य ती कार्यवाही केली नाही. जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची एक वेतनवाढ पुढील एका वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा रितीने थांबविणेबाबत डॉ. गिते यांनी कार्यवाही केली असून ग्रामपंचायत विभागामार्गात ग्रामसेवकास याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहे. तसेच याबाबतची नोंद मूळ सेवा पुस्तकातही घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणून लाल कार्ड

जिल्हा पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दरमहा पाणी नमुने गोळा करण्यात येत असून पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत तीव्र जोखमीचे असलेल्या सप्तशृंगी गडास लाल कार्ड देण्यात आले आहे. याबाबत देखील सर्व संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्या असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलासनगर सिग्नलचा खांब पुन्हा वाकला

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबादरोडवरील कैलासनगर परिसरातील चौफुलीवर बसविण्यात आलेल्या सिग्नलच्या खांबाला अज्ञात वाहनाने रात्रीच्या वेळी धडक दिल्याने येथील खांब पुन्हा वाकला आहे.

या अगोदर दुसऱ्या बाजूचा खांब वाहनाच्या धडकेने वाकला होता. सिग्नल सुरू केल्यापासून येथे वारंवार होणाऱ्या अपघातांत सिग्नलच्या खांबालाच धडक बसून खांब वाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या वाकलेल्या खांबाची दुरुस्ती करण्याची काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते.

औरंगाबादला उत्तरेकडून येणारा अमृतधाम रस्ता, विडी कामगार वसाहतीकडून, दक्षिणेकडून जेजूरकर मळ्याकडून येणारा रस्ता या कैलासनगर चौफुलीवर मिळतो. मात्र, येथे सुरू करण्यात आलेल्या सिग्नलच्या नियमांचे पालन फारसे केले जात नाही. लाल सिग्नल असतानाही वाहने सुसाट जात असल्याचे चित्र नित्याचे झालेले आहे. त्यामुळे सिग्नलवर वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. रोज येथे अपघात होत असल्यामुळे येथील हिरवा सिग्नल सुरू असतानादेखील वाहनचालकांना पुढे वाहन नेण्याची भीती वाटत असते.

तीन महिन्यांपूर्वी पहाटेच्या वेळी दोन चारचाकी वाहने एकमेकांना धडकल्यानंतर एक वाहन सिग्नलच्या खांबावर आदळले होते. सिग्नलच्या दक्षिण-पश्चिम बाजूच्या खांबांवर वाहन आदळून झालेल्या अपघातांमुळे येथील खांब व दिवे बदलावे लागले होते. शुक्रवारी पहाटे उत्तर-पश्चिम बाजूच्या खांबावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा खांब वाकला आहे. त्यामुळे हा सिग्नल दिवसभर बंद होता. अत्यंत धोक्याच्या बनलेल्या सिग्नलजवळ औरंगाबादरोडवर, तसेच दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर येथील वाहनांच्या वेगावर मर्यादा येतील. या सिग्नलवर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयातून पिण्याचे पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

स्मार्ट सिटी येाजनेतून चोवीस तास संपूर्ण शहराला पाणी देण्याची घोषणा होत असली तरी सध्या सिडकोत शौचालयातील पाणी पिण्यासाठी किंवा वापरासाठी घ्यावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सिडकोत पाण्याच्या नियोजनाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्‍त केले जात आहे. मनपा आयुक्‍तांनी सिडकोतील पाणी प्रश्नाकडे लक्ष देऊन पुरेसा पाणीपुरवठा केला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये शौचालयातील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचा प्रकार सिडकोत नागरिकांना राजरोसपणे बघायला मिळत आहे. पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असंख्य तक्रारी पडून असतात. नित्याची बाब म्हणून की काय, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असते. काही दिवसांपासून चक्क पिण्याकरिता शौचालयाचे पाणी वापरण्याची वेळ यावी असा प्रकार सिडकातील उत्तम नगर भागात उघडकीस आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्‍तांकडून 'वॉक विथ कमिशनर' हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि दुसरीकडे मात्र नागरिकांना एक नाही तर हजारो समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. सिडको आणि पाणी समस्या हे जणू समीकरणच झाले असून, सिडकोतील पाणी प्रश्नासाठी बऱ्याचदा नगरसेवकांनीसुद्धा आंदोलने केली आहेत. त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नाही. यावरून आश्चर्य व्यक्‍त होत आहे. सिडको परिसरात आजही अनेक ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्याने सिडकोत चोवीस तास पाणी पुरवठा प्रशासन कसे देणार, याबाबत तर्कविर्तक काढले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यापूर्वीच करावी कॅम्पमध्ये नालेसफाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वीच देवळाली कॅम्प शहरातील सर्व नाल्यांची सफाई करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे असून, गतवर्षीसारखे प्रकार घडणार नाहीत, या दृष्टीने कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नियोजन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहरातील आनंदरोड, नागझिरा या महत्त्वाच्या नाल्यांसह लामरोड, देवी मंदिर, शिगवे बहुला, विजयनगर, स्टेशनवाडी, सहा चाळ आदी भागातील छोट्या-मोठ्या नाल्यांमुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढतात. गतवर्षी आनंदरोड नाला प्रचंड प्रमाणात भरून वाहिल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याशिवाय जागोजागी हा नाला बुजविण्यात आल्यानेदेखील समस्या वाढत आहेत.

प्रशासनाकडून दर वर्षी महिनाभर आधीच नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. मात्र, यंदा याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जनतेला समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

रस्तेदुरुस्तीकडेही दुर्लक्ष

शहरासह प्रत्येक वॉर्डातील भुयारी गटारींसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था, ही बाब पावसाळ्यात त्रासदायक ठरणार आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. नालेसफाईसह गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध भागात खोदलेल्या रस्त्यांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जागोजागी अपघातही घडत आहेत. रखडलेल्या रस्तेदुरुस्तीस प्राधान्य देण्याबाबत बोर्डाने विचार करावा, लोकप्रतिनिधींनीदेखील याप्रश्नी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंच्या करवाढीला सत्ताधाऱ्यांचेच अभय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील भरमसाट करवाढीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांसह नाशिककरांच्या पाठीशी राहणारे भाजपचे दोन आमदार आणि महापौरांनी आपली पदे वाचवण्यासाठी नाशिककरांचाच विश्वासघात केला आहे. २३ एप्रिलच्या महासभेत राणा भीमदेवी थाटात आयुक्त तुकाराम मुंढेंच्या करवाढीच्या आदेशाला स्थगिती देणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर घूमजाव करीत करवाढीला स्थगिती दिली नसल्याचा बचाव केला आहे. केवळ चर्चा झाल्याचे सांगत विषय तहकूब ठेवल्याचे इतिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केल्याने भाजपने मुंढेंच्या करवाढीच्या प्रस्तावाला केवळ पदे वाचवण्यासाठी अभय दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महासभेने शहरात सरसकट १८ टक्के करवाढीला मंजुरी दिली असताना आयुक्त मुंढेंनी आपल्या अधिकारात ३१ मार्च रोजी अधिसूचना काढत, नव्या व जुन्या मिळकतींवर भरमसाट करवाढ लादली होती. शेतीसह शाळा, मोकळ्या जमिनींवर लादलेल्या करवाढीने शहरभर असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे करवाढीच्या विरोधात भाजपलाही उतरावे लागले होते. विधान परिषदेची आचारसंहिता असतानाही, महापौर रंजना भानसी यांनी २३ एप्रिल रोजी महासभा बोलवली, तसेच महासभेबाहेर शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे सहभागी झाले होते. त्यामुळे करवाढ टळेल असे चित्र होते. महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तब्बल दहा तास राणा भीमदेवी थाटात करवाढीला एका सुरात विरोध केला होता. त्यामुळे जोशात आलेल्या भाजपने व महापौरांनी एका झटक्यात या करवाढीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. आयुक्त मुंढेंनी आचारसंहितेच्या काळातच करवाढीची अधिसूचना काढल्याने त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्याचे फर्मानही काढले होते. मात्र, नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बचावासाठी थेट महापौरांनाच नोटीस काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह महापौरही बॅकफूटवर आले होते.

नगरसचिव विभागाने २३ एप्रिल रोजी झालेल्या महासभेचे इतिवृत्त गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून, त्यात बचावात्मक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी घूमजाव करत, करवाढीला स्थगिती दिल्याचा ठरावच झाला नसल्याचा दावा केला आहे. केवळ या महासभेत चर्चा झाली असून, आचारसंहिता असल्याची जाणीव आपण नगरसेवकांना करून दिल्याची जाणीव केली आहे. महासभेत स्थगिती दिली नसून, हा विषय तहकूब ठेवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या इतिवृत्तामुळे महापौरांसह नगरसेवकांचे पद वाचणार असले, तरी नाशिककरांचा मात्र विश्वासघात झाला आहे. महापौरांच्या या पवित्र्यामुळे प्रशासन करवाढीच्या अंमलबजावणीला आता मोकळे झाले असून, ज्यांच्यावर भरवसा आहे, त्या भाजपकडूनही नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने आता दत्तक नाशिककरांना करवाढीच्या यातना सोसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

दत्तक नाशिककरांची फसवणूक

महासभेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थगिती देण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनीही करवाढीच्या अधिसूचनेची अमलबजावणी करू नका, असे फर्मान आयुक्तांना काढल्याचा दावा केला होता. मात्र, स्थगितीपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांना दिलेले आश्वासनही फोल ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दत्तक गेलेल्या नाशिककरांची भाजपने थेट फसवणूकच केल्याची भावना अन्याय निवारण कृती समितीने व्यक्त केली आहे. यापुढे भाजपला वगळूनच लढू, असा पवित्रा घेतल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर ऊस उत्पादकांना पैसे मिळवून द्या!

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) चालवित असताना काही असंतुष्ट राजकीय मंडळी शेतकरी, ऊस उत्पादकांना चुकीची माहिती देत कारखान्याला कुलूप लावून आर्थिक नुकसान करीत आहेत. अशा मंडळींनी सर्व नुकसानाची जबाबदारी घेत आणि ऊस उत्पादकांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा पुन्हा कुलूप उघडून वसाका व्यवस्थापनाला सुरळीत कामकाज करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

मागील दोन दिवसांपूर्वी 'वसाका'ला काही उस उत्पादक शेतकऱ्यांनी कुलूप लावल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. आहेर यांनी शुक्रवारी देवळा येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत होते. देशात साखरेचे भाव कमालीचे कोसळलेले असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे देण्यासाठी साखर व्यापाऱ्यांशी समजोता करून अधिकाधिक भाव मिळविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात आपण काही प्रमाणत यशस्वीही झालो; मात्र कारखान्याला काही असंतुष्ट व्यक्तींनी कुलूप लावल्याने पुढील काळात पैसे मिळणे अवघड होणार आहे. सर्व ऊस उत्पादकांच्या पदरात दोन पैसे मिळावेत या उद्देशाने पहिला हप्ता म्हणून एक हजार रुपये देण्याचे वसाका व्यवस्थापनाचे नियोजन आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कारखान्यांना केंद्र सरकार ३० कोटी रुपये देणार आहे. असा निधी 'वसाका'ला लवकरच प्राप्त होणार आहे. उर्वरित साखर कारखान्याच्या तुलनेतील सर्व रक्कमदेखील १५ ऑगस्टपर्यंत देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे डॉ. आहेर यांनी सांगितले.

गुरूवारी होणार बैठक

संपूर्ण 'कसमादे'मधील सहकाराचा आधारस्तंभ असलेल्या 'वसाका'ला उर्जितावस्था आणण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्यांना वैयक्तिक विरोध करायचा असेल त्यांनी इतर ठिकाणी करावा, 'वसाका'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून वसाका व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. आहेर यांनी केले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद, कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वसाका' कार्यस्थळावर गुरूवारी (दि. २४) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी वसाकाचे माजी उपाध्यक्ष रामदास देवरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधुनिक बस टर्मिनल सहा महिन्यांत

0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी बस थांबविण्यासाठी अत्याधुनिक बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तपोवनातील जनार्दन स्वामी लॉन्सलगतच्या मोकळ्या भूखंडावर हा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे ऑटो आणि टॅक्सी स्टँडसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टर्मिनलसाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सहा महिन्यांत तो सज्ज व्हावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतो आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पार्किंग सुविधांअभावी खासगी प्रवासी बस, तसेच ट्रक, ट्रेलर रस्त्यांलगतच उभे केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर कायमचा उपाय शोधताना ट्रक टर्मिनल आणि बस टर्मिनलचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीला महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक स. वि. घुगे, नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, नाना फड, नाशिक बस असोसिएशनचे अध्यक्ष राजू इंदाणी, सचिव दिलीप बेनिवाल, राहुल पारिक, सुभाष जांगडा आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात ट्रक आणि ट्रेलर उभे करण्यासाठी आडगाव, विल्होळी येथे आधुनिक ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर एमआयडीसीमध्येही अशा प्रकारचा टर्मिनल उभारण्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

तपोवनात खासगी प्रवासी बसेससाठी स्वतंत्र टर्मिनल उभारण्यात येणार असून, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. साधुग्रामच्या परिसरात हा आधुनिक स्वरूपाचा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे सुलभ शौचालयासह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंहस्थ काळात वर्षभर ही सुविधा साधूंना उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पर्यटनवाढीसाठी हा टर्मिनल फायदेशीर ठरणार असून, ऑटो आणि टॅक्सी स्टँडमुळे पंचवटी आणि तपोवन परिसर पर्यटकांसाठी सोयीचा होईल, असा विश्वास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महामार्गांवरील जुन्या जकात नाक्यांवरही ट्रकचालकांसाठी टप्प्याटप्प्याने आराम कक्ष, सायबर कॅफेसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रांवर मोबाइलबंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या तयारीचा शुक्रवारी सायंकाळी आढावा घेतला. मतदान केंद्रांवर मतदाराला मोबाइल, डिजिटल कॅमेरा असलेले घड्याळ, पेन नेण्यास प्रतिबंध असून, उमेदवारांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू असेल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार गणेश राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते. उमेदवारांना या वेळी निवडणुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली, तर निवडणूक कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बॅलेट पेपरची विशिष्ट पद्धतीने घडी करण्यासह निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या शाईपेनचाच वापर करून पसंतिक्रम टाकावा, असे आवाहन करण्यात आले. अन्य पेन वापरल्यास मतपत्रिका बाद होईल, असा इशाराही देण्यात आला. जिल्ह्यात ६४४ मतदार असून, १५ ठिकाणी मतदानप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अंध, अपंग आणि अशिक्षित मतदाराला मदत हवी असेल तर त्याने अगोदर तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भरून देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने उमेदवारांना स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाँग मार्चसाठी निर्णयाची प्रतीक्षा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा शासन सेवेत समावेश होत नाही, तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १८) नाशिकला जमले आहेत. नाशिक ते मुंबई (आझाद मैदान) लाँग मार्चसाठी आलेल्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीसाठी बोलावले. यातील निर्णयानंतर या लाँग मार्चची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोणताही निर्णय आला नसल्याने कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी नाशिकला निर्णयाची प्रतीक्षा करीत थांबून होते.

न्यायालयीन आदेशान्वये समान काम समान वेतन या अन्वये शासनासमोर विविध प्रकारे आंदोलनांद्वारे मागण्या मान्य करण्याचा आणि शासनासमोर दाद मागण्यासाठी राज्यभरातील ३३ जिल्ह्यांतून सुमारे ८ हजार अधिकारी व कर्मचारी नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्चला जाण्यासाठी दि. १७ रोजी दुपारपासून तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमात जमले आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी दि. ११ ते २१ एप्रिल २०१८ या कालावधीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यात आरोग्यमंत्री डॉ. दिलीप सावंत यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ या संघटना प्रमुखांना मंत्रालयात बोलावून मागण्या येत्या १० दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित केले होते.

दि. ७ मे २०१८ पर्यंत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे संघटनेने दि. ८ मेपासून पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. तरीही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेत समायोजित करण्यासंदर्भात अभ्यास व शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली. ही समिती कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेत समायोजित करण्यासंदर्भात अभ्यास व शिफारस करील व सद्य:स्थितीत होऊ घातलेल्या आरोग्य व ग्रामविकास विभागातील पदभरती प्रक्रिया लक्षात घेऊन या समितीच्या प्रथम बैठकीत ही भरती प्रक्रियेमध्ये या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देईल, या नुसार समिती विचार करेल.

वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा

संघटनेचे अध्यक्ष नंदू कासार, सचिव विजय सोनवणे, कोषाध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी हे मुबंईला बैठकीसाठी गेलेले आहेत. मंत्रालयातील बैठकीत काय निर्णय झाला याबद्दल ते नाशिकला आल्यानंतर कळेल. त्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आधीकारी व कर्मचारी थांबून आहेत. हे पदाधिकारी रात्री ११ वाजेपर्यंत नाशिकला पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाँग मार्चची दिशा ठरविण्यात येईल. या लाँग मार्चला राज्यभरातील सर्वच वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी रात्र वैऱ्याची

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दोन रात्रच शिल्लक राहिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी 'लक्ष्मीचा प्रसाद' देण्यास सुरुवात केली आहे. भाजपने भूमिका घेण्यासाठी 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू केल्याने भाजपचे नगरसेवक सैरभैर झाले असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट न पाहताच, सोयीने गटाची निवड सुरू केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार परवेझ कोकणींची हवा गूल झाली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच आता प्रतिष्ठेची लढाई होणार आहे.

विधान परिषदेसाठी मतदारांना आता अवघे ४८ तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पडद्यामागून सूत्रे फिरत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवसेनेकडे जास्त संख्याबळ असले तरी भाजपच्या मदतीशिवाय शिवसेनेचा विजय अशक्य आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे शिवसेनेचे डोळे लागून आहे. भाजपची भूमिका मांडण्यासाठी भाजपच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईत मंगळवारी तातडीने पाचारण करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकास्र सोडत, १८ मे रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत भाजपने भूमिका स्पष्ट केली नाही. याबाबत शनिवारी (दि.१९) पक्षाचे आदेश येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आदेश येण्यापूर्वीच पक्षातील काही मतदारांनी राष्ट्रवादीशी, तर काहींनी भाजपशी जवळीक केल्याचे समजते. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परस्पर काही उमेदवारांशी हातमिळवणी करत अंतर्गत बैठकी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी व शिवसेना या पक्षांकडून मतदारांना सहलीसाठी रवाना करण्यात आलेले आहे. तालुका स्तरावरील मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात आहे. यात शिवसेनेने आघाडी घेतलेले चित्र बघावयास मिळत आहे. काही मतदारांनी मात्र सहलीस जाण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते.

'लक्ष्मीदर्शन' सुरू

विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे समीकरणच झाले असून, उमेदवार जोरात असले तरी मतदारांमध्ये शुक्रवारपर्यंत फारसा उत्साह नव्हता. अनेकांना शुक्रवारी लक्ष्मीप्रसादाचा लाभ झाल्याने मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 'लक्ष्मीदर्शन' खुले झाल्याने फोडाफोडीला वेग आला असून, आर्थिक ताकदीवर या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उर्वरित ४८ तासांत होणाऱ्या आर्थिक घडामोडी निवडणुकीचे चित्र पालटणाऱ्या ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकेवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली

0
0

द्वारकेवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली

नाशिक : द्वारका येथील अतिक्रमणधारकांचा वाद कोर्टात प्रलंबित असतांनाच,महापालिकेने द्वारकावरील अतिक्रमणावर हातोडा फिरवण्याची तयारी सुरू केली आहे.द्वारकेवरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने येथील अतिक्रमणांसदर्भात असलेल्या वादाची माहीती आयुक्त कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.येथील अतिक्रमण धारकांच्या कारवाईला स्थगिती नसली तरी,त्यांच्या अर्जावरील सुनावणी ही जूनमध्ये होणार आहे.त्यामुळे त्यापूर्वीच येथील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या तयारीत महापालिका आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच द्वारका येथील अतिक्रमणाचीही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

---

घंटागाड्यांची गर्दी (फोटो)

सातपूर : महापालिकेने अंबडलिंकरोडवरील अनाधिकृत भंगार बाजार हटविला असला, तरी जमा होणारे भंगार घेण्यासाठी शहरी भागात आजही दुकाने सुरू आहेत. सातपूर भागात घरोघरी जावून कचरा संकलन करतांना जमा झालेले भंगार देण्यासाठी घंटागाड्यांची महादेववाडीत एका दुकाना बाहेर नेहमीच गर्दी होत असते. प्लास्टिक बाँटल, काचेच्या बाटल्या, पुठ्ठा व इतर भंगाराचे साहित्य घंटागाडी चालक महादेव वाडीत असलेल्या भंगार व्यावसायिकाकडे देत असल्याने घंटागाड्यांची नेहमीच गर्दी होते. कचरा संकलन करतांना जमा होणारे भंगार देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी अशी मागणी घंटागाडी चालकांकडून केली जात आहे.

--

आज 'अमोरस पॅरॉस'

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र व विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत शनिवार १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध मेक्सीकन सिनेदिग्दर्शक अलेक्झांडर इनारीतु यांचा 'अमोरस पॅरॉस' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे. येथे बॅबेल चित्रपटासारखीच मांडणी आहे. चित्रपटाचे कथानक मेक्सीको सिटी ह्या महानगरात घडते. तीन स्वतंत्र कथानकांचे धागे एका अपघाताने जोडलेले असतात. चित्रपटात माणसाचा सहचर असलेला कुत्रा अत्यंत खुबीने प्रतिकात्मकरीत्या वापरला आहे. कुत्र्यांच्या झुंजीच्या खेळाची काही चित्तथरारक दृष्ये चित्रपटात आहेत.

---

कालव्याच्या पाण्याची गळती (फोटो)

पंचवटी - गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या कालव्यातील पाण्याची नांदूर शिवाराच्या भागात असलेल्या सायपानाच्या ठिकाणापासून गळती होत आहे. कालव्याच्या प्रवाहात नाले असलेल्या भागात कालव्याचा प्रवाह जमिनी खालून काढण्यासाठी सायपणाचे बांधकाम करण्यात येते, त्याच ठिकाणाहून पाण्याची मोठी गळती होत आहे.

--

भगूरदर्शन मोहीम (फोटो)

देवळाली कॅम्प : 'भाग्यवान ते भगूर गाव हो नाशिक शेजारी....जिथे जन्मले प्रभू सावरकर राष्ट्र कैवारी 'अशा या भगूर गावात त्यांच्याच नावाने सुरु करण्यात आलेल्या स्वा.सावरकर फेसबुक समूह व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या स्वा. वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच २८ मे रोजी सकाळी ११ वा.या भगूर दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरासह देशभरातून स्वा.सावरकर प्रेमी या मोहिमेत सहभागी होणार आहे,दर्शन मोहिमेचे नियोजन पुढील प्रमाणे- १) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (सावरकर वाडा) २) पुरातन लक्ष्मी नारायण मंदिर ३) धोपावकर वाडा ४) सावरकर बंधुंनी प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा ५) पुरातन खंडोबा मंदिर (येथेच सावरकर घराण्यातील अष्टभुजा देवी आहे.) ६) पुरातन राम मंदिर ७) पुरातन शितळा देवी मंदिर ८) भृगुऋषी आश्रम ९) दारणा नदी तीर १०) पुरातन शिव मंदिर ११) स्वा.सावरकर अभ्यासिका (अद्ययावत) या मोहिमे अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधित ज्ञात अज्ञात प्रसंगावरील लेख,कविता,नाट्य,वाड़्गमयाचे देखील वाचन होणार आहे.मनोज कुवर,प्रशांत लोया(भगूर),हर्षल देव (वसई),प्रणव जोशी (पुणे),चंद्रकांत शहसाने (पुणे) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------

काहीसा गुंतागुंतीचा पण खिळवून टाकणारा हा चित्रपट इनारीतुच्या चित्रपट कारकीर्दीतील मानाचा तुराच आहे. जगभर ५४ विविध पारीतोषिकांनी गौरविलेला हा चित्रपट मानवी जीवन, त्यातील संघर्ष तसेच कुत्र्यासारखे मरण ह्यावर भेदक भाष्य करतो. मेक्सीको येथे २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमोरस पॅरॉस' या सिनेमाचा कालावधी १५३ मिनीटांचा आहे. 'अमोरस पॅरॉस' हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक बस टर्मिनल सहा महिन्यांत

0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी बस थांबविण्यासाठी अत्याधुनिक बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तपोवनातील जनार्दन स्वामी लॉन्सलगतच्या मोकळ्या भूखंडावर हा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे ऑटो आणि टॅक्सी स्टँडसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टर्मिनलसाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सहा महिन्यांत तो सज्ज व्हावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतो आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पार्किंग सुविधांअभावी खासगी प्रवासी बस, तसेच ट्रक, ट्रेलर रस्त्यांलगतच उभे केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर कायमचा उपाय शोधताना ट्रक टर्मिनल आणि बस टर्मिनलचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीला महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक स. वि. घुगे, नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, नाना फड, नाशिक बस असोसिएशनचे अध्यक्ष राजू इंदाणी, सचिव दिलीप बेनिवाल, राहुल पारिक, सुभाष जांगडा आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात ट्रक आणि ट्रेलर उभे करण्यासाठी आडगाव, विल्होळी येथे आधुनिक ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर एमआयडीसीमध्येही अशा प्रकारचा टर्मिनल उभारण्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

तपोवनात खासगी प्रवासी बसेससाठी स्वतंत्र टर्मिनल उभारण्यात येणार असून, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. साधुग्रामच्या परिसरात हा आधुनिक स्वरूपाचा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे सुलभ शौचालयासह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंहस्थ काळात वर्षभर ही सुविधा साधूंना उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पर्यटनवाढीसाठी हा टर्मिनल फायदेशीर ठरणार असून, ऑटो आणि टॅक्सी स्टँडमुळे पंचवटी आणि तपोवन परिसर पर्यटकांसाठी सोयीचा होईल, असा विश्वास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महामार्गांवरील जुन्या जकात नाक्यांवरही ट्रकचालकांसाठी टप्प्याटप्प्याने आराम कक्ष, सायबर कॅफेसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता लिलावाला प्रतिसाद नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बड्या थकबादाराकडून घरपट्टीच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या १०४ मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव काढण्यात आला. परंतु, महापालिकेने काढलेल्या लिलावाला शून्य प्रतिसाद मिळाला असून कोणीही खरेदीदार या मालमत्ता घेण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे मालमत्तांचा लिलाव गुंडाळण्याची नामुष्की पालिकेवर आली. दरम्यान, या मालमत्तांचा फेरलिलाव काढला जाणार असल्याची माहिती उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी थकबाकीदारांना रडारवर घेतले असून, बड्या थकबाकीदारांच्या जवळपास साडेचारशे मालमत्ता जप्त केल्या होत्या. यातील पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव काढला होता. त्यावेळी जवळपास ७५ लाख रुपये थकबाकी जमा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा १०४ मालमत्तांचा लिलाव काढण्यात आला होता. त्यासाठी दादासाहेब गायकवाड सभागृहात लिलाव घेण्यात आला. परंतु, या लिलावाकडे खरेदीदारांनी पूर्णत: पाठ फिरवली आहे. दिवसभर एकही खरेदीदार या लिलावाच्या बोलीकडे फिरकला नाही. त्यामुळे पालिकेला लिलाव गुडांळावा लागला. त्यामुळे आता १०४ पैकी ८५ मालमत्तांसाठी फेरलिलाव काढले जाणार असून त्यांनतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर थेट मालमत्तांवर पालिकेचे नाव लावले जाईल असा दावा उपायुक्तांकडून करण्यात आला आहे.

१९ लाख वसूल

दरम्यान महापालिकेने लिलाव काढण्यापूर्वीच १०४ पैकी १९ थकबाकीदारांनी आपली थकबाकी जमा केली आहे. त्यामुळे पालिकेला या सर्व १९ थकबाकीदारांकडून तिजोरीत १९ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामध्ये सिल्व्हर ओक कमर्शिअल, व्हिक्टर स्वीचगिअर, दंदणे कॉम्प्लेक्स यांच्यासह बड्या थकबाकीदारांचा समावेश आहे. तिसरा लिलाव लवकरच काढला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडिलांसोबत ईद साजरी करण्याचे स्वप्न राहिले अधूरे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

घरापासून दूर मुंबईत राहणाऱ्या वडिलांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत रमजान ईद साजरी करण्यासाठी फैजाबाद येथून रेल्वेने आपल्या आई अन् काकासोबत निघालेल्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी रात्री मनमाड येथे अकस्तात मृत्यू झाला. अचानक ओढावलेल्या मृत्युमुळे वडिलांसोबत ईद साजरी करण्याचे त्या चिमुकलीचे स्वप्न हवेतच विरले. भुसावळ-मनमाड दरम्यान साकेत एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या घटनेने रेल्वप्रवासीही गहिवरले. चिमुकल्या सायमाच्या मृत्यूने तिचे कुटुंब हादरून गेले. त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकात, उपजिल्हा रुग्णालयात फोडलेला टाहोने अनेकांचे ह्रदय पिळवटून निघाले. सायमाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

फैजाबाद येथून शुक्रवारी साकेत एक्स्प्रेसने तीन वर्षांची चिमुकली आई, भाऊ व काका यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी निघाली. मात्र वडिलांची भेट होण्याआधीच ती जग सोडून गेली. दोन महिने ती वडिलांना भेटली नव्हती. प्रवासादरम्यान सायमाची तब्येत बिघडली. क्षणाक्षणाला तहानेने ती व्याकुळ होत होती. पाणी पिवूनही तिचा त्रास कमी होत नव्हता. त्यातच तिला उलट्या झाल्या. ती अत्यवस्थ झाली. मनमाड रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर तिला उपचारासाठी रेल्वे व उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिच्या आईला मानसिक धक्का बसला. ती सारखी तिच्या नावाने हंबरडा फोडत होती. तिची ही अवस्था पाहून रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही अश्रू अनावर झाले.

उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आपल्या लाडक्या मुलींचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या वडिलांनी मनमाडला धाव घेतली. येथील कब्रस्तानमध्ये सायमाचा दफनविधी करण्यात आला.

रेल्वे लेट झाली आणि...

रेल्वे भुसावळ स्थानकावरून निघाल्यानंतर सायमाची तब्येत बिघडली. तिला आम्ही मनमाडला दवाखान्यात दाखविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गाडी एका ठिकाणी तासभर थांबली. त्यामुळे मनमाडला पोहोचण्यास उशीर झाला. जर गाडी तेथे थांबली नसती तर कदाचीत सायमा वाचली असती, असे तिचे काका सांगत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणथळाच्या बाबतीत नाशिक समृद्ध

0
0

पर्यावरणतज्ज्ञ रूपाली शाईवाले यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हणजे पाणी वाचवण्याचे संदेश द्यायचे, पर्यावरणदिन साजरे करायचे असाच नसून, आपल्याला ज्या छोट्या गोष्टी करता येतील त्या करणे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आहे. नाशिक पाणथळाच्या बाबतीत खूप समृद्ध असल्याचे प्रतिपादन डोंबिवली येथील पर्यावरणतज्ज्ञ रूपाली शाईवाले यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे एकोणिसावे पुष्प शाईवाले यांनी शनिवारी गुंफले. डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या पुष्पात शाईवाले यांनी 'पर्यावरण' या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की सणांमागील मूळ विचार जाऊन भपकेबाजपणा आल्याचा फटकाही पर्यावरणाला बसतो. देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागददेखील लाकडापासून तयार होतो व त्यासाठी वृक्षतोड केली जाते, हे लक्षात घ्यायला हवे. विज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान अवगत झालेले नाही. त्यासाठी झाडेच आवश्यक असतात. अधिकाधिक झाडे लावून पर्यावरण संवर्धन करता येऊ शकते. सध्या सर्वांना शहरांची ओढ लागली असून, मानवकेंद्रित विकास सुरू आहे. त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे. व्यासपीठावर बाळासाहेब आहेर उपस्थित होते. अरुण शेंदुर्णीकर यांनी दौलतराव आहेर यांना आदरांजली अर्पण केली. प्रा. संगीता बाफना यांनी परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : अंजली तापडिया (पुणे)

विषय : जीवन : एक आनंदयात्रा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढल्या पाणीटंचाईच्या झळा

0
0

मालेगाव तालुक्यात ७ गावे, २२ वाड्यांना टँकरने पाणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पंधरा दिवसांपासून शहर व तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होता आहेत. एप्रिलच्या प्रारंभी केवळ एका गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता त्यात वाढ झाली असून, तालुक्यातील एकूण सात गावे व बावीस वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.

शहरात अद्यापदेखील एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन कोलमडले असून, पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यातही दुंधे, चौकटपाडे, वऱ्हाणे या गावांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. करद्वारे पाणी पुरवठा होता असला तरी पाण्यासाठी एकाच झुंबड उडत असल्याचे चित्र आहे .

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने गावागावात असलेले पाझर तलाव, विहिरी, हातपंपचे पाणी आटले असून, पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे जनावरांनाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या तालुक्यातील सात गावे व बावीस पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. एकूण ७ टँकर दिवसभरात २४ फेऱ्यांद्वारे या गावांची तहान भागवित आहेत. पाण्याची टंचाई भीषण असल्याने अजून चार गावांचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नऊ विहिरींचे अधिग्रहण

टंचाई असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहर व तालुक्यातील नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात कळवाडी, टिपे, गरबड, गाळणे, कोठुरे येथील प्रत्येकी एक तर डाबली व संगमेश्वर येथील प्रत्येकी दोन विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवले जात आहे.

पुनदच्या आवर्तनाने दिलासा

गेल्याचा आठवड्यात राज्यमंत्री दादा भुसे यांनी पुनद धरणातून गिरणा नदीसाठी आवर्तन देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने गिरणा काठच्या गावांना एन उन्हाळ्यात नदीत पाणी मिळाले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावे

दुंधे, वऱ्हाणे, टाकळी, मेहुणे, चौकटपाडे, झाडी, कोठरे बु.

एकूण टँकर ७

दिवसातून २४ फेऱ्या

एकूण नऊ विहिरींचे अधिग्रहण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त संख्यावरून सुप्रीम कोर्टात पिटीशन

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर विश्वस्तांची संख्या ९ वरून १३पर्यंत वाढविणे आणि ५० टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळणेसाठी विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे. पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे अध्यक्षपद हे ते लोकांमधून निवडलेल्या प्रतिनिधीलाच मिळायला हवे असे देखील शिंदे यांनी म्हंटले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली.

धर्मदाय आयुक्तांकडून भाविक प्रतिनिधी चार सदस्य नियुक्त होतात. त्यांची संख्या आठ करावी लागणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हे नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या ट्रस्टचा कारभार पाच वर्षांच्या कार्यकालात बहुमताचा वापर करीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

विश्वस्थ संख्या ९ वरुन १३ करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निकालाप्रमाणे ५ सदस्य हे कायम तेथे असतात व ते आपापले हितसंबंध यामध्येच गुंतलेले आहेत. कुठलाही ठराव मांडतांना तो बहुमताने पारीत होतो. भाविकांच्या बाजूने काही करण्याचा प्रयत्न केला तर तो बहुमताने

हाणून पाडला जातो असे त्यांनी न्यायालयाला कळविले आहे. धर्मदाय आयुक्तांकडून निवडलेले चार सदस्य अल्पमतात येतात आणि परंपराने येणारे ५ सदस्य बहुमताने ठराव पारीत करून तो आमलात आणातात. अशा प्रक्रियेमुळे निर्णय चुकतात आणि बेकायदेशीर निर्णय पारीत झाल्यामुळे सकारात्मक विकास कार्यास खिळ बसते. यामुळे पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाराचे आरोप होवून देवस्थानची बदनामी होत असल्याचे त्या म्हणाल्या.

विश्वस्त मंडळाची मुदत दोन आठवड्यावर

४ जून २०१३ रोजी विश्वस्त मंडळाच्या चार भाविक प्रतिनिधींची धर्मदाय आयुक्तांनी नियुक्ती केली होती. त्यांची मुदत पाच वर्षांसाठी असल्याने येत्या दोन आठवड्यात नवीन सदस्य नियुक्त होण्याची शक्यता आहे. पुजारी तुंगार प्रतिनिधी, पुजक प्रतिनिधी आणि पुरोहित प्रतिनिधी यांनी आपल्या नव्या प्रतिनिधींची निवड करून त्यांचे पत्र धर्मदाय आयुक्त यांना सादर केले आहे. अद्यापपर्यंत भाविक प्रतिनिधींसाठी अर्ज प्रकिया धर्मदाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेली नाही. मात्र न्यायालयाने आखून दिलेल्या आराखड्यास शिंदे यांनी हरकत घेतल्याने नियुक्ती प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिशएन (आयमा) या संस्थेच्या दि. २९ मे रोजी २५ पदांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत विरोधी गटातर्फे अध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण आज, रविवारी (दि. २०) नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत.

या निवडणुकीत बिनविरोधाचे प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे निवडणुकीत आता रंगत वाढली आहे. आतापर्यंत या निवडणुकीसाठी ३९ इच्छुकांनी अर्ज नेले असले तरी अद्यापर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. २० मे असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी एकता पॅनलने अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर विरोधी गटानेही तुषार चव्हाण यांना संमती दिली असून, ते नामनिर्देशनपत्र रविवारी दाखल करणार आहेत. उद्योजकांच्या संघटनेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तलवार यांना दोन वर्षे अध्यक्षपद द्यावे व उपाध्यक्षपदी तुषार चव्हाण यांची निवड करावी, दोन वर्षांनंतर होणाऱ्या पुढील निवडणुकीत चव्हाण यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात होता. पण, तो नाकारण्यात आल्यामुळे या निवडणुकीसाठी विरोधी गटानेही तयारी केली आहे. 'आयमा'च्या या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, दोन सेक्रेटरी व खजिनदारबरोबरच २० कमिटी सदस्य निवडले जाणार आहेत. दि. २९ मे रोजी निवडणूक होणार आहे. ३० मे रोजी मतमोजणी, तर ३१ मे रोजी वार्षिक सभेत या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. 'आयमा'चे १५०० उद्योजक सदस्य आहेत.

--

स्ट्रिप : आयमा निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images