४८ तासात ७ अपघात; चार ठार, नऊ जखमी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात लग्नसराईत वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या ४८ तासात शहराच्या विविध भागात एकूण ७ अपघात झाले. त्यात चार जण ठार झाले आहेत. त्यात दोन पादचारी आहेत. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनांची दखल घेत पोलिस व महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा नागरिक जीवाची पर्वा न करता मिळेल त्या वाहनाने ट्रक अथवा टेम्पोत बसून प्रवास करतात. यामुळेच अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात आडगाव, पंचवटी व गंगापूर भागात प्रत्येकी एक व्यक्ती ठार झाला आहे. औरंगाबाद रोडवरही मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली अपघातांची मालिका पहाता औरंगाबाद रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे. औरंगाबादरोडवर लग्नाला येणारे नागरिक हे लॉन्सबाहेर वाहने उभी करतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांची गौरसोय होत आहे. अनेकदा रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने अपघात घडत आहेत. औंरंगाबाद रोडप्रमाणेच गंगापूर रोड येथे देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
बॅरिकेड्सचा अडथळा
गंगापूर रोडवर चोपडा लॉन्सच्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्सवर आदळून एका शिक्षकाचा मृत्यू झाला. हनुमानवाडीकडून गंगापूर रोडकडे जात असताना मंगळवारी (दि. ८) रात्री चोपडा लॉन्स येथे उभे केलेल्या बॅरिकेड्सवर धडकल्याने सुनील दौलत मटाले (रा. हनुमानवाडी ) याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आपल्यावर दोष येऊ नये म्हणून पोलिसांनी लगेचच तेथील बॅरिकेड़्स हटवल्याचा मटाले यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. एरवी शहराच्या अनेक भागात अस्ताव्यस्त पडलेल्या बॅरिकेड्स उचलण्यासाठी पोलिसांना वेळ नसतो; मात्र हा अपघात घडल्यानंतर तेथील बॅरीकेड्स तातडीने हलवण्यात आले.
द्वारका पुन्हा जॅम
द्वारका परिसरात लग्नसराईमुळे अवैध वाहतुकीला जोर आला असून उड्डाण पुलाच्या खाली अनेक ट्रकचालक सीट भरण्यासाठी येथे उभे रहाता. उभ्या असलेल्या गाडीचा अंदाज न आल्याने येथेही अपघात होत आहेत.
पोलिसांनी कारावाई करावी
गंगापूररोडप्रमाणेच सिडको परिसरातही अपघातांची मालिका थांबलेली नाही. भोळे मंगल कार्यालय ते त्रीमूर्ती चौक येथे सातत्याने अपघात होत असून या ठिकाणी पोलिसानी भरधाव वेगाने जाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागण नागरिक करीत आहेत.
वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वेगाने वाहन चालविण्याचीही फॅशन आहे. अपघात होणे हे वाईटच आहे. आम्ही त्याची दखल घेतच आहोत. पण, वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन करू नये.
- रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त
अपघाताची कारणे
- रस्त्यातच वाहनांचे पार्किंग
- हेल्मेट परिधान न करणे
- रस्त्यावरील विविध अतिक्रमणे
- वाहतूक नियमांचा भंग करणे
- वेगाने वाहन चालविणे
- अवैधरित्या गतिरोधक
- सिग्नल न पाळणे
- पादचाऱ्यांना प्राधान्य न देणे