डॉ. रामकृष्ण लहवीतकर यांचे प्रतिपादन म. टा. वृत्तसेवा, सिडको मनुष्याला कोणताही आजार झाल्यावर तो डॉक्टरांकडे जात असतो. डॉक्टरांकडून शरीरावरील आजार बरा केला जात असला तरी मानसिक आजारातून मुक्तता मिळण्यासाठी कीर्तन, प्रवचन या गोष्टींचीच गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी व्यक्त केले. सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यातंर्गत आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी बोलताना लहवितकर महाराज यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे ही आपलीच गरज आहे. धर्म, परंपरा, संप्रदाय, अस्मिता याची जपणूक करण्यासाठी कीर्तन व प्रवचन सोहळे झाले पाहिजे. अनेकदा कीर्तन किंवा प्रवचन हे वयस्कर व्यक्तींचे काम असल्याची भावना निर्माण केली जाते. मात्र याची गरज ही अबालवृद्धांना असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी आपल्या व्यस्त दिनशैलीतून थोडा वेळा किर्तन व प्रवचनासाठी काढलाच पाहिजे. धार्मिकता जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही अडचणीवर कशी मात करता येईल याची माहिती प्रत्येक संताने दिली असून, ते आत्मसात केले पाहिजे. जगत्गुरू तुकोबा महाराजांनी तर जीवन कसे जगता येते याचे विविध दाखले देऊन माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या कीर्तन महोत्सवात दररोज सकाळी दोन तास योगाचार्यांच्यावतीने योग शिबिर घेण्यात येत असून, याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवकांना मोबाइलपासून दूर करण्याची गरज आजची तरुण पिढी ही मोबाइलमध्ये व्यस्त झाली असून, तिला त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. माणूसच माणसाला ओळखत नसल्याने कीर्तनासारखे उत्सव आता कमी होऊ लागले आहेत. तरुणांनी एकत्र येऊन कीर्तनासारखे महोत्सवाचे आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी केले. या वेळी त्यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीमध्ये अध्यात्माची जाण निर्माण होण्याची गरज आहे. तरुण पिढी ही नकारात्मक भावनेकडे जात असून, त्यांना सकारात्मक भावनेकडे नेण्याची समाजाची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट