म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या पाकिटमारीतील धंद्यात एकच गँग असावी आणि त्या गँगची दहशत शिर्डीत प्रस्थापित व्हावी, यासाठी दोन तरुणांचे अपहरण करून त्यांचा निर्घृन खून करणाऱ्या पाप्या शेख व त्याच्या ११ साथीदारांना विशेष कोर्टाने (मोक्का) गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित १२ जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा यांनी निर्दोष सोडले. प्रत्येक आरोपीस ११ लाख याप्रमाणे एक कोटी ३२ लाख रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठवला आहे.
भाविकांचा राबता आणि त्यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यामुळे राज्यासह देशभरातील अनेकजण रोजगारासाठी शिर्डीकडे आकर्षित होतात. यात चोर भामट्यांचाही समावेश असतो. २०१० मध्ये पाप्या शेख हे नाव शिर्डीच नव्हे तर पंचक्रोशीत माहीत झाले होते. शिर्डीतील पाकिटमारी आणि त्यातून मिळणारा पैसा यावर पाप्याने कब्जा मिळवला होता. स्थानिक व्यावसायिक भीतीमुळेच या भानगडींपासून दूर राहत होते. त्यामुळे पाप्याचे फावले. चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या मुलांना सोबत घेऊन त्याने आपली गँग तयार केली. या गँगचे शिर्डीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने प्रवीण विलास गोंदकर आणि रचित पटणी या दोन तरुणांची २०११ मध्ये निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर दोघांचे मृतदेह शिर्डीत सर्वांना दिसतील अशा ठिकाणी आणून टाकले. विकृतपणाचा कळस गाठणाऱ्या पाप्यासह त्याच्या साथीदारांची यामुळे दहशत निर्माण झाली. अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह पथकाने गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना जेरबंद केले. मात्र, यातील पाच आरोपी कोपरगाव येथील सबजेलचे गज कापून फरार झाले होते. यादरम्यान तब्बल ४३ साक्षीदारांसह सुनील कडासने यांनाही संरक्षण पुरवावे लागले. कोर्टातही सुनावणीदरम्यान साक्षीदार आणि आरोपींमध्ये पडदा लावून साक्षी नोंदविण्यात आल्या. तब्बल २२ गुन्ह्यांची नोंद असलेल्या या टोळीविरोधात मोक्का लावण्यात आला. हायकोर्टाच्या आदेशानुसार, सुटीचे दिवस वगळता दररोज कोर्टाचे कामकाज पार पडले. कोर्टासमोर आलेले मेडिकल रिपोर्ट, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांनी दिलेले जबाब तसेच एका माफीच्या साक्षीदाराने दिलेली कबुली याआधारे कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे मोक्का आणि भादंवि कलमांनुसार सर्वच आरोपींना एकत्रितपणे एक कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यातील प्रत्येकी १० लाख रुपये मृतांच्या वारसांना देण्यात येणार आहेत.
यांना झाली शिक्षा
पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२), विनोद सुभाष जाधव (३१), सागर मोतीराम शिंदे (१९), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६), माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ (२२), गनी मेहबुब सैयद (३०), चिंग्या उर्फ समीर निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण (२३), सागर शिवाजी काळे (२०), नीलेश देवीलाल चिकसे (१९) आणि निसार कादीर शेख (२४)
यांची निर्दोष सुटका
पाप्याची पत्नी बिस्मिल्ला मर्द सलिम शेख (२५), राजेंद्र किसन गुंजाळ (३३), इरफान अब्दुल गनी पठाण (२०), मुबारक उर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (३२), वाल्मिक पावलस जगताप (४२), दत्तात्रय बाबुराव कर्पे (३५), भरत पांडुरंग कुरणकर (४९), संदीप शामराव काकडे (२४), हिराबाई शामराव काकडे (४९), मुन्ना गफूर शेख (२४), राजू शिवाजी काळे (२१), प्रकाश सुरेश अवसरकर (२२)
संशयित आरोपींनी हत्येपूर्वी संबंधित तरुणांचा अतोनात छळ केला होता. हा प्रकार एका शेतात घडला. या टोळीची दहशत असताना एकही साक्षीदार फितूर झाला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. परिस्थितीजन्य पुरावे तसेच एका आरोपीचा कबुली जबाब यामुळे १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली.
- अजय मिसर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील
टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने आरोपींनी हे कृत्य केले होते. आरोपी सराईत असून, त्यांनी दोन हत्यांच्या माध्यमातून शिर्डीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी केलेला तपास, ४३ साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद यामुळे १२ जणांना जन्मठेप मिळाली.
- सुनील कडासने, तत्कालीन तपासाधिकारी
दोन मुलांच्या मारेकऱ्यांना खरेतर फाशीची होणे अपेक्षित होते. तरीही १२ जणांना जन्मठेप मिळाली हे कमी नाही. माथेफिरूंना समाजात जागा मिळूच शकत नाही, हे या निकालाने स्पष्ट केले.
- विलास पंढरीनाथ गोंदकर, मृत प्रवीणचे वडील