म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'अवयवदानाविषयी चर्चा खूप होत असली तरी प्रत्यक्षात काम त्या तुलनेत कमी होते. सामान्य माणसांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून, नागरिक म्हणून आपली जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. अवयवदानाची गरज ओळखत ही चळवळ म्हणून रुजवली गेली पाहिजे,' असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी केले. नाशिकमध्ये पुण्यातील रि-बर्थ या संस्थेच्या शाखेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. आयुक्त सिंघल म्हणाले, 'समाजात डोळे, किडनी अशा काही अवयवांच्या दानाविषयीच जनजागृती झाली आहे. इतर अवयवांबाबतही जागरुकता व्हावी, यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. अवयवदानाबाबत आपल्या मनात खूप संभ्रम असतो. परंपरा, रुढी यांचे कारण त्यामागे आहे. परंतु, आजच्या काळानुसार विचारांमध्ये बदल करत अवयवदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सोशल मिडियासारख्या व्यासपीठांचादेखील लाभ आपल्याला करुन घेता येईल.' गणेश बाकले यांनी अवयवदानाविषयी प्रेझेंटेशन सादर केले. रि-बर्थ संस्थेची माहिती, अवयवदानासाठी होत असलेले कार्य, ग्रीन कॉरिडॉर आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी अवयवदान ही चळवळ होण्याची गरज व्यक्त करत घराघरात या विषयावर बोलले गेले पाहिजे, असे मत मांडले. सूत्रसंचालन सुनंदा जरांडे यांनी केले. यावेळी गुरु गोबिंदसिंग संस्थेचे सीईओ परमिंदर सिंग, अमरजित सिंग, संजय पठाडे, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट