Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्टील उत्पादनात नाशिकचा वरचष्मा

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bदेशामध्ये पहिल्यांदाच कोल्ड रोलिंगपासून कोल्ड ग्रेन ओरिएंटेड (सीआरजीओ) इलेक्ट्रीकल स्टीलचे उत्पादन नाशिकमधून करण्यात येणार आहे. देशात वर्षाकाठी सुमारे ४ लाख टन सीआरजीओ स्टीलची मागणी आहे; पण या ग्रेडचे स्टील भारतामध्ये अद्याप उत्पादित होत नव्हते. आता थिसेनक्रुपच्या नाशिकमधील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने सीआरजीओ स्टीलनिर्मितीचा श्रीगणेशा झाला आहे. ही कंपनी आता वर्षाकाठी सुमारे ३५ हजार टन सीआरजीओ स्टील निर्माण करणार आहे. सीआरजीओ इलेक्ट्रीकल स्टीलनिर्मितीत भारतातील एकमेव असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी झाले.

थिसेनक्रुपच्या वाडीवऱ्हे येथील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने या महत्त्वाकांक्षी स्टील उत्पादनास सुरुवात झाली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा, थिसेनक्रुप इलेक्ट्रीकल स्टीलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. जेन्स ओव्हेरॅथ, मुंबईतील जर्मन दूतावासातील अधिकारी पीटर केर्न आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. व्यंकटेशन उपस्थित होते. या निर्णयामुळे कंपनीच्या नाशिकमधील प्रकल्पाची क्षमता प्रतिवर्षी ३५ हजार एमटीपर्यंत वाढणार आहे. सीआरजीओ स्टीलनिर्मितीत जगात मोजक्या कंपन्या कार्यरत आहेत. भारतात अशा प्रकारचा प्रकल्प अद्याप नव्हता. तो या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.

आमच्या दृष्टीने भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही देशातील एकत्व सीआरजीओ स्टील उत्पादक आहोत. विस्तारामुळे आम्हाला सर्व उत्पादनांचा विचार नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून करणे शक्य होणार आहे. आमच्या सर्व उत्पादनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल.

- डॉ. जेन्स ओव्हेरॅथ, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, थिसेनक्रुप

या उत्पादनाला असणारी मागणी काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. देशातील वीज आणि ट्रान्समिशन क्षेत्रासाठी निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी या अतिरिक्त क्षमतेची मदत होईल.

के. व्यंकटेशन, सीईओ, थिसेनक्रुप स्टील भारत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे ‘उज्जीवन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, तसेच परिणाम फाउंडेशनतर्फे 'छोटे कदम कम्युनिटी कनेक्ट' या कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे रंगरंगोटीसह नूतनीकरण करीत २५ नवीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नूतनीकरण केलेल्या विभागाचे उद्घाटन परिणाम फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मल्लिका घोष, नमिता कोहोक यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. गजानन होले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याबाबत बोलताना 'उज्जीवन'च्या सीईओ सुधा सुरेश यांनी सांगितले, की प्रसूती विभागाचे नूतनीकरण केल्याचा आनंद मोठा आहे. समाजाच्या महत्त्वपूर्ण गरजा भागविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याला उज्जीवन शाखेचे सदस्य स्वेच्छेने पाठबळ देतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून २४ राज्यांमधील कम्युनिटीला विविध दृष्टिकोनांतून लाभ होत असल्याचे सुधा रमेश यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे परिणाम फाउंडेशनच्या मल्लिका घोष यांनी स्पष्ट केले, की हा प्रकल्प राबविण्याची परवानगी देणे हेच महत्त्वाचे होते. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यात रस दाखविला. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला. प्रसूती विभागाध्ये अधिक सोयीचा अनुभव रुग्णांना मिळेल. राष्ट्रीय पातळीवर नागरिकांसाठी प्रभावी, फायदेशीर आणि कायमस्वरूपी राहतील, असे प्रकल्प आम्ही हातात घेणार असून, यात समाजाच्या गरजा भागविण्याकडे आमचा कल असल्याचे घोष यांनी सांगितले. छोटे कदम हा प्रकल्प सार्वजनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रांसाठी असल्याचे घोष म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’साठी टोकन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवी मुंबईच्या धर्तीवर आयुक्त तुकाराम मुंढेंनी नाशिकमध्येही शनिवारी (दि. २१) गोल्फ क्बल मैदानावर 'वॉक विथ कमिनशनर' उपक्रम आयोजित केला असून, त्यासाठी नागरिकांना तक्रारी व सूचना विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडे अगोदर सादर कराव्या लागणार आहेत. या ठिकाणी होणारी संभावित गर्दी पाहता, तक्रार व सूचना करणाऱ्यांना टोकनशिवाय आयुक्ताकडे निवेदन करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी महापालिकेत घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना नाशिक अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन मुंढे करीत असताना मुंढेंकडून घेण्यात येणाऱ्या उपक्रमावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिनशनर' हा उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानतर मुंढेंनीही हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. करवाढीच्या आयुक्तांच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले असून, मुंढेंच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रीत येत आंदोलन उभे केले आहे.आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात येत्या २३ एप्रिलला विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेला कडाडून विरोध होणार आहे. त्यामुळे महासभेआधीच आयुक्तांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. २१ तारखेला सकाळी साडेसहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या उपक्रमाअंतर्गत नागरिक आपल्या तक्रारी, सूचना, संकल्पना आयुक्तांकडे सादर करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना आपल्या तक्रारी सकाळी उपक्रमस्थळी विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लेखी तक्रार व सूचना सादर केल्यानंतर त्यांना टोकन मिळणार असून, टोकन नंतर आयुक्तांकडे निवेदन करता येणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

नगरसेवकांचा आक्षेप

दरम्यान आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमावर पालिकेतील नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांच्या तक्रारी घेऊन आयुक्तांकडे गेल्यावर स्वत: आयुक्त तक्रारी नाशिक अॅपवर करण्याचे सांगतात. नगरसेवकांचा न्याय हा आयुक्तांनाही लागू असून, आयुक्तांनी हा उपक्रम घेण्याऐवजी नागरिकांनाच थेट अॅपवर तक्रारी व सूचना करायला का लावत नाहीत, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. नगरसेवकांना नागरिकांपासून दूर करायचे अन् स्वत: मात्र आयुक्तांनी नगरसेवकांशी चर्चा करायची, हा सरळ नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा भाग असल्याचा दावा नगरसेवक खासगीत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृणधान्यांना पौष्टिक अन्नपदार्थाचा दर्जा

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : ज्वारी, बाजरी, नागली, भगर किंवा वरई या तृणधान्यांना केंद्र सरकारने पौष्टिक अन्नपदार्थाचा दर्जा दिला आहे. या पदार्थांमधील पोषकमूल्यांचे विश्लेषण व निरोगी शरीरासाठी या पदार्थांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दर्जा देऊ केला असून, या पदार्थांविषयी प्रचार व प्रसार होणे, हा त्यामागील उद्देश आहे. महाराष्ट्रात तृणधान्यांचे उत्पादन मोठे असल्याने येथील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून त्यांना चांगला हमीभावही मिळू शकणार आहे.

पूर्वी तृणधान्यांकडे म्हणजे गरिबांचे किंवा ज्यांना गहू, तांदूळ, डाळींसारखे पदार्थ विकत घेणे परवडत नाही, अशा व्यक्तींचे अन्न म्हणून पाहिले जात असे. तृणधान्यांमधील पोषकमूल्यांचा विचार होत नसल्याने गहू, तांदूळ, डाळींनाच आजपर्यंत मोठी मागणी राहिलेली आहे. आजच्या काळात कर्करोग, मधुमेह, ह्रदयरोग अशा आरोग्यविषयक विविध समस्या पाहता डॉक्टरांकडूनदेखील तृणधान्य सेवनाचा सल्ला दिला जात आहे. निरोगी आरोग्यासाठी या पदार्थांची गरज लक्षात घेत हे वर्ष 'जागतिक तृणधान्य वर्ष' जाहीर करावे, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर तृणधान्याचा देशात प्रसार व्हावा, या उद्देशाने तृणधान्यांना पौष्टिक अन्नधान्याचा दर्जा देण्यात आला आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना लाभ

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांमधून भगरीसाठी आवश्यक कच्चा माल मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. भगरीवर होणाऱ्या प्रक्रियांमध्ये देशात नाशिकचा क्रमांक वरचा आहे. तर नागली, ज्वारी, बाजरी या पदार्थांचे उत्पादनदेखील राज्यात मोठे आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे.

भारतात तृणधान्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आदिवासी भागात पिकविल्या जाणाऱ्या तृणधान्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. तृणधान्याच्या प्रचार, प्रसारामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळू शकणार आहे.

-महेंद्र छोरिया, अध्यक्ष, नाशिक भगर मिल असोसिएशन

तृणधान्ये ही आपल्या शरीराची अगदी मूलभूत गरज आहे. शरीराला ताकद देण्याचे काम तृणधान्ये करीत असतात. रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे कार्यही तृणधान्ये करीत असल्याने निरोगी शरीरासाठी तृणधान्ये आवश्यक आहेत.

-मीनल बाकरे-शिंपी, आहारतज्ज्ञ

- - -

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री चक्रधर स्वामींच्या पाऊलखुणा होणार ठळक

$
0
0

मटा विशेष (फोटो आहेत)

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : भारतभ्रमंती करताना अनेक साधू-महंतांचे पाय नाशिक क्षेत्री लागले, त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारातून नाशिक भूमीला घडवले. याच संतांमध्ये प्राधान्याने नाव घ्यावे लागते ते ते महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे. वैशाख शुद्ध पंचमी ११९२ रोजी नाशिकला अंजनेरी क्षेत्री त्यांचे वास्तव्य झाले होते. या घटनेला आज तब्बल ८२६ वर्षे पूर्ण होत असून पूर्ण गावाने हा दिवस अविस्मरणीय करण्याचा ठराव केला आहे. एखाद्या सिद्धपुरुषाच्या आगमनाला, वास्तव्य झालेल्या दिवसाला पूर्ण गावाने एकत्र येत महोत्सव साजरा करण्याची ही पहिलीच घटना असून यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध महंत अंजनेरीला दाखल झाले आहेत.

११९२ मध्ये भारतभ्रमण करताना त्र्यंबकेश्वरी आलेले श्री चक्रधर स्वामी मजल दरमजल करीत अंजनेरी गावात पोहोचले आणि येथे त्यांनी वास्तव्य केल्याचा उल्लेख नवसंशोधित महानुभाविय बृहत् कालनिर्णय या ग्रंथाच्या कालदर्शक पृष्ठक्रमांक १९ मध्ये आहे. जेथे स्वामींनी वास्तव्य केले, तेथे असलेल्या ऐतिहासिक प्राचीन हेमाडपंती मंदिरात ते थांबले होते. याठिकाणी नंतर ओटा बांधण्यात आला असून, श्री दत्तमहाराजांची मूर्तीदेखील स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंजनेरी नगरीवर चक्रधर स्वामींचे अधिक प्रेम असून, दोन वेळा या प्राचीन मंदिरात त्यांचा निवास झालेला आहे.

सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने मेहकर येथील बाणेश्वराच्या मंदिरातील बोणेबाईंबरोबर श्री चक्रधर स्वामी त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठणला येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली. यानंतर ते भारतभ्रमणाला निघाले आणि त्र्यंबकेश्वरी आले होते. या घटनेला आज ८२६ वर्षे पूर्ण होत आहेत.

मंदिराचा जीर्णेाद्धार प्रस्तावित

साडेआठशे वर्षांपूर्वीचे हे हेमाडपंती मंदिर असून त्याकडे पुरातन खात्याचे दुर्लक्ष आहे. याठिकाणी जाण्यासाठी काहीही सोय नसून ओळखीसाठी साधा बोर्डही तेथे लावलेला नाही. केंद्रसरकारच्या नियमानुसार तेथे दुसरे कुणी बोर्डही लावू शकत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली असून, राज्यभरातून महानुभाव पंथीय भाविक येथे रोजच हजेरी लावतात. परंतु, त्यांना हे मंदिर सापडण्यासाठी खूप कष्ट पडतात, अशी स्थिती आहे.

महोत्सवासाठी सजली अंजनेरी नगरी

परमपूज्य सुकेणेकर बाबा, श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत श्री अशोक महाराज ठाणापती यासारखे मोठे महंत अंजनेरीत दाखल झाले असून श्री चक्रधर स्वामींचा वास्तव्यदिवस साजरा करण्यासाठी अंजनेरी नगरीला सजविण्यात आले आहे. येथे दिवसभर धार्मिक विधी चालणार असून महाराष्ट्रभरातून अनेक भाविक हजेरी लावणार आहेत.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होणार आहे. राज्यातून अनेक संत महंत येथे आले असून अंजनेरी गावाने घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी आहे. यापुढे प्रत्येक वर्षी हा दिवस आम्ही साजरा करणार आहे.

-आकाशमुनी मेहकरकर महानुभाव, आयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ८० टक्के एटीएम सेंटर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात रोख चलनाची टंचाई भासू लागली असून जिल्ह्यातील ८० टक्के एटीएम बंद आहेत. उर्वरित २० टक्के एटीएममध्ये दिवसातून फक्त एकच तास पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाभरात एकूण ७७३ एमटीएम आहेत.

शहरातील रोख चलनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत व कॉर्पोरेट बॅँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नकुतीच झाली. यात ही बाब समोर आली आहे. यावेळी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी सागितले, की एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चलन टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात चलनाची टंचाई जाणवत असून सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यात विविध बॅँकांचे ७७३ एटीएम आहेत. त्यातील बहुतांश एटीएम बंद आहेत. यातील केवळ २० टक्के एटीएम सुरू आहेत. जे एटीएम सुरू आहेत ते देखील नोटांअभावी पूर्ण दिवसभर पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. या एटीएममध्ये एक तास पुरेल इतकीच रोख रक्कम टाकली जात आहे. एटीएम सुरू नसल्याने नागरिकांना भाजी, दूध यासारख्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. बाजारात पैसे नसल्याने खरेदीदार बाहेर पडत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. येत्या काळात पैसे उपलब्ध न झाल्यास एटीएम समोर पुन्हा रांगा लागतील. देशात अनेक ठिकाणी रोख रकमेची टंचाई भासत असून चत्यावर तोडगा काढला जाईल, असे रिर्जव बँकेने कळवले आहे.

रोज ९० कोटींची गरज

शहरात बुधवारपर्यंत (दि. १८) विशेष अडचण येत नव्हती; मात्र गुरुवारपासून परिस्थिती बिकट होत चालली आहे. येत्या काही दिवसात चलन उपलब्ध न झाल्यास नागरिकांचे हाल होणार आहे. जिल्ह्यातील एटीएम केंद्राना ३० कोटी तर शहरात ६० कोटी याप्रमाणे साधारण ९० कोटी रुपयांची दैनंदिन एटीएमसाठीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ्या फिती लावून मारहाणीचा निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथे कर्तव्य बजावताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीच्या घटनांच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) काळ्या फिती लावून कामकाज केले. प्लास्टिकचा वापर विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी गेले असताना ही घटना घडली. नाशिकरोड विभागीय कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर किसन भोसले व सहकारी विजय मोरे, अनिल गांगुर्डे हे मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पाहणी करीत असताना जेलरोडवरील थोरात पेट्रोलपंपालगत असलेला दूधविक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत दूध विक्री करताना आढळल्याने भोसले व त्यांच्या सहकाऱ्याने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यावेळी दूधविक्रेत्याने भोसले यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नाशिकरोड विभागातच मनपा कर्मचाऱ्यांना मारहाणीची दुसरी घटना घडली. त्याचे पडसाद गुरुवारी (दि. १९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात उमटले. कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध नोंदविला. यासंदर्भात संघटनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा प्रदान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लाखांच्या चोरीचे सापडेनात धागेदोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा रुपयांच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत सहा ते सात चोरट्यांनी अगदी नियोजित पद्धतीने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास करून १६ दिवस उलटले आहे. गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. मात्र, पैशांसह बँकेतून बाहेर पडलेले चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असले, तरी ते फारार होण्यात यशस्वी ठरले आहेत.

चोरीची घटना दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉडर्न कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती. कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ या दुकानामधील कर्मचारी प्रशांत भास्कर वाणी (वय ३७) आपल्या सहकाऱ्यांसमवेत बँकेत पैसे जमा करीत असताना बॅग लिफ्टिंगचा प्रकार घडला होता. दहा रुपयांच्या पाच नोटा खाली टाकून चोरट्यांनी कर्मचाऱ्यास तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. नंतर अवघ्या तीन ते चार सेकंदांत चोरटे २८ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वेगवेगळ्या टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मात्र, एखाद्या चित्रपटात शोभावे अशा पद्धतीने सहा ते सात चोरटे कोणताही मागमूस न ठेवता फरार झाले. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की चोरटे सीसीटीव्हीत दिसत असल्याची बाब खरी असली, तरी संशयित आरोपींची ओळख पटविणे हेच महत्त्वाचे असते. 'इजी मनी'च्या लालसेपायी नवनवीन गुन्हेगार असे गुन्हे करण्यास धजावतात. या गुन्ह्याचा तपास विविधागांनी सुरू असून, यावर क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवर तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या संशयितांच्या फोटोग्राफ्सची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी कळविण्यात आली आहे. आरोपींनी अगदी नियोजनपूर्वक गुन्हा केला असून, सराईत गुन्हेगाराच अशा प्रकारे काम करू शकतात. तपास सतत सुरू असून, गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही नखाते यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरी, शादी, प्रॉपर्टीत ‘धोका’

$
0
0

मटा विशेष

फसवणुकीच्या घटनांमध्ये वेगाने वाढ; पोलिस यंत्रणेपुढे तपासाचे आव्हान

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी या अत्यावश्यक पण योगायोगाच्या गोष्टी प्रत्येकालाच मिळणे कठीण असते. पैशांचे वाढते महत्त्व नेमकी याच बाबींतून प्रतिबिंबीत होते. भामटे याचा फायदा उचलण्यासाठी सरसावले असतात. नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी यात फसवणुकीचे प्रमाण वाढते असून, भविष्यात यात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी मिळणे हा योगायोगाचा भाग मानला जातो. मात्र, शहरीकरणात या अत्यावश्यक बाबी म्हणून गणल्या जातात. शहर पोलिसांकडे २०१७ फसवणुकीचे तब्बल २४० गुन्हे दाखल झालेत. यात वरील तीन घटकांच्या गुन्ह्यांचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत होते. चालू वर्षीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा वारू उधळला असून, यंदा मार्च महिन्यापर्यंत तब्बल ७३ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१४ पासून विचार करता फसवणुकीच्या गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसते. याबाबत क्राइम ब्रँचचे पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की नोकरी लावून देतो म्हणून पैसे उकळण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. सरकारी नोकरीसाठी युवकांचे पालक लाखो रुपये मोजून देतात. कोणतीही हमी, खात्री पाहिली जात नाही. मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुला-मुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते. तर तिसरा प्रकार हा प्रॉपर्टीशी संबंधित असून, याची संख्या पहिल्या दोन पेक्षा अधिक असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. शहरी भागात जमिनीसह इतर स्थावर मालमत्तांचे भाव वाढले असून, त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात. बऱ्याचदा परिचित व्यक्ती यात सहभागी असतात. बनावट दस्ताऐवजाच्या आधारे दुसरीच व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला प्लॉट अथवा फ्लॅट विक्री करून मोकळी होते. परशहरातील व्यक्तींनी शहरात घेतलेल्या फ्लॅट अथवा प्लॉटबाबत या तक्रारी जास्त असतात. आता पोलिस अशा तक्रारींची गंभीर दखल घेत असून, अगदी टोळी पद्धतीने होणारे काम हाणून पाडले जाते.

नागरिकांचीही सजगता महत्त्वाची

पोलिस आपले काम करीत असले तरी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही व्यवहार त्रयस्थामार्फत करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपली जमीन, फ्लॅट अथवा प्लॉट भाड्याने देण्याची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडली तर पुढील कटकटी उद्भवणार नाहीत. दुसरीकडे, त्यांचा वापर होत नसल्यास ठराविक कालावधीने आपला सातबारा उतारा घेणे, त्या ठिकाणी भेटी देणे, आजुबाजुच्या नागरिकांशी संपर्क ठेवणे यास प्राधन्य द्यावे. सायबर फसवणुकीचे प्रकारही थोडीशी सावधगिरी बाळगून टाळता येऊ शकतील. पिन क्रमांक सांगणे, एटीएम सेंटरमध्ये कार्ड बदली करणे, परदेशात व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवणे आदी प्रकारांमध्ये आर्थिक फसवणूक होते.

गुन्हेगारीचा आलेख

वर्ष- गुन्हे घडले- गुन्हे उघडकीस

२०१४-१३१-७५

२०१५-१६२-१२१

२०१६-१८२-१३५

२०१७-२४०-१७२

मार्च २०१८ पर्यंत -७३-५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्याची अफलातून कारवाई

$
0
0

प्रसुतीसाठी बोलविल्याने परिचारिकांना केले कामावरून कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या महापालिकेच्या मायको रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या प्रसुतीसाठी मध्यरात्री फोन लावल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांने चार परिचारिकांना कामावरून कमी करण्याचा अफलातून निर्णय घेतला. विशेष म्हणजे वैद्यकीय अधीक्षकांनीही कोणतीही शहानिशा न करताच कारवाई केली. यामुळे संतप्त परिचारिकांनी महापौरांकडे धाव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचीच चुकी निदर्शनास आल्यानंतर या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमधे रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार सुरूच असून वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणेच कारभार करत असल्याचे चित्र आहे. पंचवटीतल्या मायको रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसुती झाली होती. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई सुरू असतानाच, याच रुग्णालयात दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने चार परिचारिकांना अर्ध्या रात्री प्रसुतीसाठी कॉल केल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रताप केला आहे. या रुग्णालयात गेल्या महिन्यात प्रसुतीसाठी एक महिला रुग्णालयात दाखल झाली होती. रात्रीच्या वेळेस ड्युटीवर असलेला संबंधित वैद्यकीय अधिकारी मात्र ड्युटीवरून गायब होता. संबंधित महिलेची प्रकृती क्रिटीकल असल्याने ड्युटीवरील परिचारिकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला कॉल केला. परंतु संबंधित अधिकाऱ्यांने येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पुन्हा कॉल केल्यानंतर संबधित महाशय आले. त्यानंतर मात्र आपल्याला अर्ध्या रात्रीत फोन केल्याचा राग डोक्यात ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या या परिचारिकांची सेवा समाप्तीची शिफारस वैद्यकीय अधीक्षकाकडे केली. वैद्यकीय अधीक्षकांनाही कोणतीही शहानिशा न करताच, त्यांच्या सेवा समाप्तीची प्रक्रिया सुरू केली. परंतु, संबंधित महिलांनी महापौर रंजना भानसीकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न

महापौरांनी वैद्यकीय अधीक्षकांना पाचारण करत, चौकशी न करताच, केलेल्या कारवाईबाबत जाब विचारला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत, परिचारिकांना कामावर पुन्हा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वैद्यकीय रुग्णालयातील हा सगळा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानसेवा रद्द

$
0
0

प्रवाशांच्या पदरी मनस्ताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खंडित झालेली विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, आगामी काही दिवसांची पुणे विमानसेवा रद्द झाल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात कंपनीने तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना संदेश पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे. यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उडान योजनेअंतर्गत एअर डेक्कन कंपनीने नाशिकहून पुणे आणि मुंबईसाठीची सेवा केली असली तरी ती प्रत्यक्षात बेभरवशाची असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर अखेरीस सुरू झालेली विमानसेवा चांगला प्रतिसाद असतानाही मार्च महिन्यातच खंडित झाली. पायलटची अनुपलब्धता आणि तांत्रिक कारण त्यासाठी देण्यात आले. अखेर विमान वाहतूक महासंचालनालयाकडून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने १५ एप्रिलपासून सेवा देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कंपनी त्यात असमर्थ ठरली. २० एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्याचे जाहीर करून कंपनीने वेबसाइटवर बुकिंग सुरू केले. त्यानुसार नाशिककरांनी पुन्हा तिकीट बुकिंग करीत प्रतिसाद दर्शविला. विशेष म्हणजे, बंगळुरू, चेन्नईसह विविध भागातील प्रवाशांनी तिकीट बुक केले. २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होत असलेली पुणे सेवा मात्र रद्द झाल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात येत आहेत. पुण्याहून नाशिकला येणारे २० एप्रिलचे आणि नाशिकहून पुण्याला जाणारे २२ एप्रिलचे विमान तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्याचे संदेश प्रवाशांना आले आहेत. त्यामुळे या सेवेबाबत साशंकता निर्माण होत आहे.

बेभरवशाची सेवा

एअर डेक्कनची सेवा ही अत्यंत बेभरवशाची असल्याचे दिसून येत आहे. जवळपास महिनाभर ही सेवा खंडित राहिली. सेवा १५ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित असताना ती २० पासून सुरू होत असल्याचे जाहीर झाले. त्यातही १६ एप्रिलपासून सेवा दिली जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगितले जात आहे. आता पुणे सेवा रविवारपर्यंत रद्द झाल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कंपनीची सेवा अतिशय बेभरवशाची असल्याने तिकीट बुकिंग कसे करायचे, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

बंगळुरूहून मी पुण्यासाठी येत आहे. तेथून नाशिकला जाण्याचे नियोजन आहे. नाशिकला विमानसेवा असल्याचे कळाल्याने मी तिकीट बुक केले. जाण्याचे आणि येण्याची सेवा रद्द झाली आहे, असा मेसेज कंपनीने पाठविला आहे. मी अत्यंत निराश झालो आहे.

- एक विमान प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनमधूनच मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चोरीचे अनेक फंडे सर्वसामान्यांना चक्रावून टाकतात. असा एक अनोखा फंडा वापरून म्हसरुळ पोलिस स्टेशनमधूनच मोबाईल गायब केलाचा प्रकार घडला. पोलिस निरीक्षकाला मोबाईल दाखविण्याचे सांगून एका गेटने आत घुसून दुसऱ्या गेट बाहेर पडून चोरट्याने मोबाईलधारकाची फसवणूक केली.

काही दिवसांपूर्वी एका मोबाइलधारकाने ओएलएक्सवर जुन्या मोबाइलविक्रीची जाहिरात दिली होती. एकाने या मोबाइलधारकासोबत ओएलएक्सवर चॅटिंग करून भेटण्याचे ठिकाण ठरवले. त्यानुसार आरटीओ कॉर्नरच्या परिसरातील मिठाई दुकानाजवळ तो भेटला. तेथे त्या मोबाइलधारकाकडून त्याने मोबाइल घेऊन तो म्हसरुळ पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना दाखवून येतो असे सांगून तो म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या आरटीओ कॉर्नरकडील गेटमध्ये शिरला. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. त्यामुळे मोबाइलधारकाने पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये चौकशी केली. पोलिस निरीक्षकांना त्याने तुम्हालाच मोबाइल घ्यावयाचा होता का, अशी विचारणा केली. तेव्हा पोलिस निरीक्षकांनी मला कुठलाही ओएलएक्सवरचा मोबाइल घ्यायचा नव्हता, असे सांगितले. हे ऐकल्यावर मोबाइलधारकाला धक्काच बसला. त्याने घडलेला प्रकार पोलिस निरीक्षकाला सांगितला. चोरट्याने पोलिस निरीक्षकांचे नाव घेत पोलिस स्टेशन गाठून आरटीओ कॉर्नरकडील गेटने आत जाऊन गणपती मंदिराच्या गेटने बाहेर पडत मोबाइल लंपास केला. म्हसरुळ पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुसऱ्या गेटमधून चोरटा फरार झाला असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीविक्रेत्यांचे उपोषण मागे

$
0
0

महापौर आमदारांची मध्यस्ती; ओटे काढण्याचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्रालगत असलेली आरक्षित जागा एआरअंतर्गत विकसित करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात भाजीविक्रेत्यांनी सुरू केलेले उपोषण सर्व पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गुरूवारी मागे घण्यात आले.

संबंधित जागेवर ओटे काढून घेण्यात आले असून बायोमेट्रिक हजेरीत नोंद झालेल्या सर्व फेरीवाल्यांना जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अखेर दहाव्या दिवशी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले आहे.

गंगापूर रोड आकाशवाणी केंद्रालगतची आरक्षित जागा सर्वसमावेशक आरक्षण अर्थात एआरअंतर्गत विकसित केली जात आहे. याअंतर्गत याठिकाणी शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात येत असून शॉपिंगी सेंटरच्या तळमजल्यावर भाजी मार्केट उभारण्याची योजना आहे. मात्र, भाजीबाजारातील विक्रेत्यांच्या संख्येच्या तुलनेत भाजीमार्केटमधील ओट्यांची संख्या कमी असल्याने विक्रेत्यांनी या व्यापारी संकुलाच्या बांधकामाविरोधात १० एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते.

विविध स्तरावर प्रयत्न करून भाजी व्यवसायिकांना हवा तसा तोडगा निघत नव्हता. महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, सुनील बागुल आदींनी गुरूवारी या बाबत तोडगा काढण्यासाठी भाजी विक्रेत्यांच्याबरोबर चर्चा केली. आमदार फरांदे यांच्याकडेही अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. तळ मजल्यावरील ओटे काढून घेण्याचा निर्णय झाला. तसेच बायोमेट्रिक झालेल्या फेरीवाल्यांना जागा देण्याचा निर्णय झाला. या आशयाचे लेखी पत्र फेरीवाल्यांना देण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास उपोषणकर्त्या भाजीविक्रेत्यांना ज्युस पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक संतोष गायकवाड, स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षुल्लक कारणावरून धुळ्यात खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोटरसायकलचा कट मारल्याच्या शुल्लक वादातून झालेल्या भांडणाची कुरापत काढीत धुळ्यातील सिद्धेश्‍वर हॉस्पिटलजवळ बुधवारी (दि. १८) रात्री चौघा तरुणांना चॉपर, गुप्ती, तलवार, रॉडने मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे (१५, रा. चंदन नगर, देवपूर) हा तरुण ठार तर इतर तिघे जखमी झाले.

धुळे शहरात बुधवारी, झालेल्या या घटनेनंतर गुरुवारी (दि. १९) जुने धुळे, देवपूर, चंदननगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या वेळी नागरिकांकडून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा सागर राजेंद्र साळवे (२१, रा. चंदननगर, आंबेडकर हायस्कूलजवळ, देवपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी दादा भोई, गुड्या फुलपगारे, जितू फुलपगारे, गणेश फुलपगारे, दिपक फुलपगारे, वैभव गवळे याच्यासोबत १५ ते २० अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत सागर साळवेवर दादा भोई याने हातातील रॉडने तर गणेश फुलपगारे याने हातातील फायटरने पोटावर, कमरेवर वार केले. तर गुड्या फुलपगारे याने चॉपरने सुमीत सूर्यवंशी याच्या दंडावर दोन वार करून जखमी केले. या मारहाणीत सागर राजेंद्र साळवे, सनी उर्फ प्रशांत प्रकाश साळवे, सुमीत अनिल सूर्यवंशी आणि सौरभ वसंत साळवे हे जखमी झाले.

बसस्थानक परिसरात रास्ता रोको!
दरम्यान, यातील गंभीर जखमी सनी उर्फ प्रशांत साळवे याचा मध्यरात्री १ वाजेनंतर खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे चंदन नगरसह जुने धुळ्यात जखमी आणि मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून गुरुवारी, सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी करीत आंदोलन सुरू केले. दुपारी ३ वाजेनंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदय विद्यालयासाठी आज प्रवेश परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी प्रवेश परीक्षा आज (२१ एप्रिल) देशभरात घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २९ केंद्रांवर ११ हजार ७४१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. यावर्षी ही प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीटही समितीकडून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून, आज सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून २९ केंद्रसंचालक तसेच केंद्रस्तर निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी आयोगाच्या भूमिकेमुळे ‘बीसीसीआय’वर नियंत्रण शक्य

$
0
0

जगभरात फुटबॉल लोकप्रिय असताना भारतात क्रिकेट त्यापेक्षाही अधिक लोकप्रिय आहे. मात्र, या महत्त्वाच्या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांसाठी बीसीसीआय या संस्थेला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले आहेत. या स्पर्धांमधून होत असलेली आर्थिक उलाढाल  अब्जावधी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय केंद्राच्या अनेक सवलतीही असतात. त्यामुळे या संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचे काम करीत त्यावर सरकारी नियंत्रण असणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'बीसीसीआय'मध्ये जर काही गैरकारभार होत असतील, तर त्यांना आळा बसण्यास विधी आयोगाच्या पुढाकारामुळे मदत होईल. त्यामुळे विधी आयोगाने केलेल्या मागणीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

आयोगाची मागणी योग्यच 

 क्रिकेटसारख्या खेळाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रियता मिळविली असून, या माध्यमातून 'बीसीसीआय'सारख्या संस्थेला जाहिराती व तिकीट विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मिळत असलेला आर्थिक लाभ अब्जावधी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे विधी आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली मागणी योग्यच आहे.

-अनिल दिवाने 

खेळाकडे दुर्लक्षाची शक्यता

 जगभरात लोकप्रिय होत असलेल्या क्रिकेटमुळे अनेक नवीन खेळाडू या संस्थेमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यास उत्सुक असतात. अशा वेळी निवड होणाऱ्या खेळाडूंमध्ये कधीकधी भ्रष्टाचारदेखील होत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे खऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष होण्याचीदेखील शक्यता आहे, ती या निर्णयाने टळेल.

-सुरेश कदम 

स्वायत्ततेसाठी सोडा व्यात सवलती

जगभरात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर जाहिराती व तिकीट विक्रीच्या माध्यमातून अब्जावधी रुपये बीसीसीआय या स्वायत्तता असलेल्या संस्थेला मिळतात. त्यामुळे स्वायत्तता हवी असेल तर त्यांना मिळणाऱ्या विविध करांच्या सवलतीही केंद्र सरकारने देणे बंद करणे गरजेचे आहे. यासंदर्भातदेखील योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची आवश्यकता आहे.

-दीपक झुटे

सर्व खेळांना समान न्याय 

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हॉकी बाजूला अन् क्रिकेटच राष्ट्रीय खेळ बनू पाहत आहे, इतके क्रिकेटचे वेड पसरले आहे. त्यामुळे सर्व खेळांना समान न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास हॉकी, फुटबॉल, तसेच प्रमुख देशी खेळांसाठीही अशा पद्धतीचे नियामक मंडळ निर्माण करून खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 

-भरत पऱ्हे   

मक्तेदारी आणावी संपुष्टात

विधी आयोगाच्या शिफारशींसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केंद्र सरकारकडे वर्ग केल्यास एकाधिकारशाही संपुष्टात येऊन भ्रष्टाचार करणाऱ्या दालमिया व ललित मोदी यांच्यासारख्यांनादेखील चाप बसू शकेल. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे लोकशाही प्रणाली अस्तित्वात आणली गेल्यास सरकारच्या तिजोरीतदेखील मोठी भर पडू शकेल.

-अनिकेत शिंदे  

(आमचा आवाज)

000000000000

(सिटिझन रिपोर्टर)

--

शहर परिसर

मद्य परवान्यांची 'खुली' विक्री

एकदिवसीय मद्यसेवन परवाना शुल्क आकारून देण्यात येईल, असे उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहे. मात्र, मद्यविक्रीच्या दुकानांत हा परवाना न देता त्यांची सर्रास विक्री होत आहे. विभागाने याची दखल घ्यावी. कारण, अशा प्रकारामुळे बोगस परवान्यांना चालना मिळू शकेल, असे वाटते.

-संदीप देवांग

शालिमार

रिक्षांचा विळखा सोडवा

शालिमार, सपट कॉर्नर, सीबीएस, मेळा स्टँड आदी ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी दिसून येत आहे. या ठिकाणी कायमच वाहतुकीची मोठी कोंडी होत असली, तरी त्याची काहीच दखल पोलिस घेत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक गैरसोय सहन करावी लागते. पोलिसांनी धडक कारवाई करावी.

-विलास भालेराव

सातपूर

भाडेकरूंची नोंद गरजेची

सातपूर व सिडको परिसरात भाडेकरूंची संख्या अधिक आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी असे फलक बघायला मिळतात. मात्र, सर्वच प्रकारच्या भाडेकरूंची नोंद ठेवली जाणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे भविष्यातील गैरप्रकार रोखण्यास निश्चितच मदत होऊ शकेल आणि शासकीय महसूलदेखील वाढेल.

-चंद्रकांत महाले

पंचवटी

डांबरीकरण होणार कधी?

हिरावाडी-तारवालानगर-के. के. वाघ लिंकरोडलगत रस्ता खडीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्याचे डांबरीकरण होणार तरी कधी, असा सवाल वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावरील खडीमुळे वाहनांचे नुकसान होण्यासह पाठदुखीच्या तक्रारीही वाहनचालक करीत आहे.

-दीपक चव्हाण

पंचवटी

पाणपोईबाबत व्हावा निर्णय

शहारतील श्री काळाराम मंदिराजवळील पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी याबाबत तातडीने निर्णय व्हायला हवा. त्यामुळे संबंधित प्रशासाने ती एक तर सुरू करावी, नाही तर हटवावी, जेणेकरून नागरिकांची सोय होऊ शकेल.

-शैलेश सूर्यवंशी

शहर परिसर

पोर्टलमध्ये विविध त्रुटी

सरकारने व्यवसायांची नोंद 'जीईएम पोर्टल'वर करायला सांगितली असली, तरी काही उत्पादनांसाठी तिथे विभागच नसल्याने गैरसोय होत आहे. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी असलेले पॅड इन्सिनरेटर या उत्पादनासाठी पोर्टलवर विभागच नसल्याची स्थिती आहे.

-सीमा भदाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनाही आता जनआंदोलनात

$
0
0

कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेल्या जाचक करवाढी विरोधात अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने येत्या २३ तारखेला महासभेबाहेर जनआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करीत शिवसेनाही या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे आंदोलनाचेही बळ वाढले आहे. दरम्यान, महासभेच्या दिवशी महापालिकेच्या बाहेर होणाऱ्या या आंदोलनाच्या तयारीचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला असून, यात शहरातील सर्व पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन महापालिकेला वेढा घालण्यात येणार आहे.

आयुक्त मुंढेंच्या करवाढी विरोधात सध्या शहरात वातावरण तापले आहे. शेती तसेच नवीन मालमत्तांवर लावलेल्या या जाचक करवाढीमुळे सर्वसामान्य नाशिककर भरडला जाणार असून, भाजपनेही या करवाढीला विरोध केला आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी येत्या २३ तारखेला महासभा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी करवाढी विरोधात लढा देत असलेल्या अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जनआंदोलन करण्यात येणार आहे.

महासभेच्या दिवशी पालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या करवाढी विरोधात गावोगावी मेळावे घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. या आंदोलनाला आता शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. आयुक्तांनी केलेली करवाढ ही अन्यायकारक असून, त्या विरोधात शिवसेना अन्याय निवारण कृती समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे पत्र शिवसेना महानगरप्रमख महेश बडवे आणि सचिन मराठे यांनी जाहीर केले आहे. करवाढी विरोधातील कृती समितीच्या सर्व आंदोलनात शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे पत्र काढण्यात आले आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कृती समितीचे बळ वाढले आहे.

-

महासभेला घालणार घेराव

या करवाढी विरोधातील जनआंदोलनात भाजप, शिवसेनेपाठोपाठ माकप, काँग्रेस, राष्ट्रवादीही उतरण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य करदाते, व्यापारी, औद्योगिक संघटना, कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या जनआंदोलनाची व्याप्ती वाढत असून, या वेळेस महासभेला घेराव घालण्याची तयारी सुरू आहे. यासाठी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या बाहेरील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर १५ तासांनी अॅम्ब्युलन्समध्येच एक प्रसूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात सेवा पुरविणाऱ्या १०८ अॅम्ब्युलन्समध्येच दर १५ तासांनी एक प्रसूती पार पडते. महिला हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच प्रसूती होत असल्याने मातेसह अर्भकाचाही जीव धोक्यात पडतो. विशेष म्हणजे वर्षागणिक हे प्रमाण वाढत असून, जिल्हा प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन सदर सेवेची व्याप्ती, दळणवळण तसेच संपर्काची साधने व्यापक करणे आवश्यक झाले आहे.

जिल्ह्यातील दुर्गम ते अतिदुर्गम भागातील पेशंटला अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम १०८ अॅम्ब्युलन्स सेवेद्वारे केले जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिकमध्ये २०१४ मध्ये १०८ अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. एखाद्या व्यक्तीने लॅण्डलाइन अथवा मोबाइलद्वारे १०८ क्रमांक डायल केला की, विविध सुविधायुक्त तसेच प्रशिक्षित कर्मचारी तैनात असलेली अॅम्ब्युलन्स घरापर्यंत पोहचते. नाशिकमध्ये गरोदर मातांना सिव्हिल अथवा नजीकच्या सरकारी हॉस्पिटलपर्यंत पोहचविण्याचे मोठे काम या सेवेमार्फत केले जाते. मात्र २०१४ पासून २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत प्रवासातच तब्बल एक हजार ३७८ महिला प्रसूत झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०१७ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५७५ इतके राहिले. सन २०१७ मध्ये सरासरी दर १५ तासांनी एक प्रसूती प्रवासादरम्यानच झाली. हे धोकादायक प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला त्वरित उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

याबाबत बोलताना सिव्हिल सर्जन तसेच प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले की, या सेवेबाबत अतिदुर्गम भागातसुध्दा जनजागृती होते आहे. यासाठी आशासेवक सतत कार्यरत असतात. एखाद्या पाड्यावर गर्भवतीचे पोट दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना थेट कॉल करणे शक्य होत नाही. प्रसंगी त्या पाड्यावरील एखादा व्यक्ती शेजारील गावात पोहचून कॉल करतो. यांनतर उपकेंद्र अथवा प्राथमिक केंद्रावरील अॅम्ब्युलन्स घरापर्यंत पोहचणे आणि तेथून हॉस्पिटलपर्यंत येणे यात वेळ महत्त्वाची ठरते. पहिली प्रसूतीची वेळ थोडी अधिक असू शकते. मात्र, दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रसूती दरम्यान हा कालावधी कमी होतो. त्याचा हा परिणाम असू शकतो.

जिल्ह्यातील या प्रसूतींचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ज्या भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे त्या भागांचा सर्व्हे हाती घेण्यात येईल. त्याअनुषंगाने सुविधा पुरवून रस्त्यातच होणाऱ्या प्रसूतीची संख्या आणखी कशी कमी करता येईल, यासाठी उपाययोजना राबवण्यात येतील.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

--

वर्ष - प्रवासात झालेल्या प्रसूतींची संख्या

२०१४-११२

२०१५-२४७

२०१६-४४४

२०१७-५७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सगुण-निर्गुण वृक्षांच्या अभिनव रेखाचित्रांचे प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकतत्त्व वृक्ष : दृष्टी तशी सृष्टी हे वृक्षांच्या अभिनव रेखाचित्रांचे प्रदर्शन छंदोमयी हॉल, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे दि. २२ व २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन रविवारी (दि. २२) सकाळी १० वाजता ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर गुरुजी, संगीत विदुषी डॉ. अलकाताई देव-मारुलकर व रिसर्च फोटोग्राफर प्रसाद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. २१ एप्रिल हा दिवस वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे म्हणून साजरा केला जातो, या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन तरुणपिढीला व मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे.

चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांच्या निसर्गाशी असलेल्या बांधिलकीतून साकारलेली वृक्षांची अनोखी रेखाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सौ. भार्गवे या आर्ट मास्टर (जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स) असून, ३८ वर्षे त्यांनी कलाशिक्षिका म्हणून कार्य केलेले आहे. यापूर्वी त्यांचे 'एकतत्त्व गणेश' हे गणपतीच्या ३६५ रेखाचित्रांचे प्रदर्शन नाशिक व पुणे येथे झालेले आहे.

वृक्षांना चैतन्य आहे, भावना आहे, संवाद साधण्याची कला आहे, त्यांना व्यक्तिमत्त्व आहे, हा विचार धरून सौ. भार्गवे यांनी छत्रधारी वृक्ष, तपस्वी वृक्ष, सगुण-निर्गुण वृक्ष, मंदिर, दीपमाळ, भुईचक्र, प्रकाशछाया इत्यादी सुमारे ६० वृक्षांच्या कलाकृती रेखाटल्या आहेत. रसिकांना त्या सहज मोहवून टाकतील यात शंका नाही. मुख्य म्हणजे हे वृक्ष कृत्रिम वाटत नाहीत, तर आपण बघितलेले वाटतात. निसर्गाकडे बघायची दृष्टी बदलायला लावणारी ही वृक्ष रेखाटने आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवीन पिढीने हे प्रदर्शन जरूर बघावे. कारण, आजच्या 'इन्स्टंट' युगात, एका क्षणात 'कॅप्चर' होणाऱ्या झाडापेक्षा आपल्या मनातले झाड अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने, अत्यंत मेहनतीने वेळ देऊन कॅनव्हासवर उतरविण्यात खूप वेगळा आनंद आहे, हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

नाशिक- रेखाचित्र प्रदर्शन (फोटो आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’ आज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाची सुरुवात आज शनिवारी (दि. २१) सकाळी साडेसहा वाजता गोल्फ क्लब मैदानावर होणार आहे.

प्रशासनाच्या वतीने या उपक्रमाची तयारी करण्यात आली असून, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी छोटेसे स्टेज उभारण्यात आले आहे. ज्या नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार किंवा सूचना करायची आहे, त्यांच्यासाठी टोकन सक्तीचे केले आहे. या कार्यक्रमात करवाढीच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला होता. तो चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानंतर मुंढे यांनी येथेही हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, प्रथम पालिकेला शिस्त लावण्याचे काम सुरू केल्याने हा उपक्रम सुरू होऊ शकला नाही. करवाढीच्या आयुक्तांच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले आहे. आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात येत्या २३ एप्रिलला विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेला कडाडून विरोध होणार आहे. त्यामुळे महासभेआधीच आयुक्तांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. करवाढीवरून निर्माण झालेल्या वादामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images