बागलाण, निफाडमध्ये पाऊस; शेतकरी हवालदिल टीम मटा गत दोन दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर उकाडा आणि सायंकाळी पावसाचे वातावरण होत आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह सटाणा, निफाड भागात काही ठिकाणी पाऊस झाला. येवला, सिन्नर तालुक्यातही पावसाचे वातारण होते बागलाणला पुन्हा फटका सटाणा : बागलाण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वातावरणात आलेल्या गारव्याने सुखद धक्का दिला. थोड्याच वेळात सोसाट्याच्या वारा सुटल्याने ज्यांच्या शेतमाल बाहेर होता त्या शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, दोधेश्वर, कोटबेल जोरण, किकवारी, तळवाडे दिगर आदी भागात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा खांडणीला मोठा पटका बसला आहे. मात्र पावसानंतर काही मिनिटातच ताबडतोब कडकडीत उन्हाचे चटके बसू लागले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सटाणा शहरात सोसाट्याचा वारा व ढगांचा गडगडाट होवून वातावरणात बदल झाला. दुपारी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर तालुक्यातील काही भागात हलक्या व तुरळक सरी पडल्या. मात्र अर्धा तासांच वातावरणात पुन्हा पूर्ववत होवून कडकडीत ऊन पडले. तालुक्यातील जोरण, किकवारी, तळवाडे दिगर, नामपूर, दोधेश्वर, कोटबेल या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सोमोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी सावरत असतांनाच मंगळवारी पुन्हा अवकाळी सरींनी कोसळल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गोदाकाठावर हलक्या सरी निफाड : मंगळवारी वातावरणात प्रचंड उष्मा होता. दुपारी चारच्या दरम्यान ढगाळ वातावरण झाले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसर, पश्चिम भागात वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चितेगाव ते पिंपळस या नाशिक महामार्गावर मात्र जोरदार पाऊस झाला. वादळवारा असल्यामुळे महामार्गावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तालुक्यात दुपारी चारच्या दरम्यान खेरवाडी, चांदोरी, सोनगाव, भेंडाळी, सायखेडा या गावांच्या परिसरात हलका तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला. तर नैताळे, उगाव, निफाड, विंचुर, पिंपळगाव, ओझर या गावांच्या परिसरात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी वादळवारा सुरू होता. बहुतांश द्राक्ष बागांचे खुडे आटोपले असून, अपवादात्मक ठिकाणी द्राक्षाचे खुडे सुरू आहेत. तर काही भागात गहू काढण्याचे कामही शेतांमध्ये सुरू आहे. उन्हाळ कांदा काढणीचे कामेही यामुळे खोळंबली. पावसाचा संभाव्य अंदाज घेऊन कांदे झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिक कागद टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. येवल्यात ढगाळ वातावरण येवला : तोंडचे पाणी पळविणाऱ्या यंदाच्या कडक उन्हाळ्याने सर्वांनाच हैराण केले असताना गेल्या दोन दिवसांतील अवकाळीसदृश्य ढगाळी वातावरणाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. सोमवारी सायंकाळी तालुक्यात अवकाळीचे काहीसे थेंब पडतानाच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी तालुक्यात ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा निर्माण होताना घामाघूम करणाऱ्या दमट वातावरणाने तालुकावासीयांना असह्य केले होते. दुपारी चार नंतर तळपता सूर्य अधूनमधून ढगाआड लपला गेल्याने तालुक्यात अवकाळी पावसाच्या छटा दिसत होत्या. मात्र, दोन तासानंतर हे वातावरण निवळले. दरम्यान, गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या या पावसाळी वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा काढणीला आला आहे. काही शेतकऱ्यांकडून शेतातील उन्हाळ कांदा काढून तो चाळीत साठविण्याचे काम सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट