म. टा. वृत्तसेवा, जेलरोड नाशिककर रेल्वे प्रवाशांना प्रतीक्षा असलेली संपूर्ण नव्या कोऱ्या 'आदर्श पंचवटी एक्स्प्रेस'च्या २१ बोगी येवला येथे दाखल झाल्या आहेत. या आठवड्यात ही नवी गाडी 'मनमाड ते मुंबई'दरम्यान प्रवाशांच्या सेवेत धावण्याची शक्यता असून, त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुकर होणार आहे. या सर्व २१ सुसज्ज बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे. नाशिककरांच्या कुटुंबाचा भाग झालेली पंचवटी एक्स्प्रेस दि. १ नोव्हेंबर १९७५ पासून धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटरचे अंतर ती वेगात पार करते. नाशिक हे औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक केंद्र असल्याने हजारो नाशिककर रेल्वेने रोज प्रवास करतात. मनमाड ते मुंबई प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी सोयीची आहे. त्यामुळे ही गाडी, रेल्वेला भरघोस महसूल मिळवून देते. पासधारकांसाठी 'पंचवटी एक्स्प्रेस' दुसरे घरच आहे. या प्रवाशांमध्ये कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. रेल परिषदेने 'आदर्श कोच सी-३'च्या माध्यमातून पंचवटी एक्स्प्रेसला पाच वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिलेले आहे. सुविधांयुक्त गाडी धावत नाही तोपर्यंत रेल परिषेदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी रेल्वे प्रवासादरम्यान अन्नत्याग केला आहे. नवीन बोगींसाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा, डी. वाय. नाईक, सुनील जोशी, रुपेश कोहली, एल. सी. त्रिवेदी, डॉ. अब्दुल्लाह, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव, रेल परिषदेचे गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी आदींनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्स या एक्स्प्रेसला ४२ वर्षांनंतर नवे रंगरूप मिळाले आहे. नव्या गाडीत प्रवाशांची बैठक व्यवस्था अधिक आरामदायक असून, बोगींची अंर्तबाह्य रंग-रचना व कार्य नावीन्यपूर्ण आहे. सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्स आहेत. या गाडीच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार घेणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी येवला येथे जाऊन २१ नवीन बोगींची पाहणी केली. या बोगींसाठी रेल परिषदेच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी झाली आहे. 'आदर्श ट्रेन'चा संकल्प महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर २०१७ )पासून रेल्वे प्रशासन व प्रवाशांच्या सहकार्याने पंचवटी एक्स्प्रेसला 'आदर्श ट्रेन' करण्याचा संकल्प रेल परिषदेने केला आहे. इंटरसिटीचा दर्जा असलेली मध्य रेल्वेची प्रतिष्ठेची पंचवटी एक्स्प्रेस वेळेवर पोहोचावी, प्रवाशांना चांगली सोय मिळावी, प्रवास सुकर व्हावा, कोच स्वच्छ असावेत, कोणीही विनातिकीट प्रवास करू नये, अनधिकृत खाद्यविक्रेते नसावेत, पाकीटमार नसावेत, भिकारी नसावेत, तसेच अन्य समस्या दूर करून गाडीला आत्मसन्मान मिळवून द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे. रेल प्रशासनाशी या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे. (अँकर, लोगो शुभवार्ता)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट