म. टा. वृत्तसेवा, सातपूर शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत दोन हजार सातशेहून अधिक कारखान्यांचे जाळे आहे. एमआयडीसीची स्थापना झाल्यावर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लघु उद्योजकांसाठी प्लॉटेड गाळ्यांची संकल्पना सन १९७८ मध्ये राबविण्यात आली. एमआयडीसीने तरुण अभियंत्यांकरिता अगदी नाममात्र दराने २६ फ्लॉटेड गाळे लघु उद्योग सुरू करण्यासाठी दिले. परंतु, आता या गाळ्यांमध्ये काम करताना उद्योजकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जीर्ण झालेल्या फ्लॉटेड गाळ्यांच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी लघु उद्योजकांसह कामगारांनी केली आहे. विशेष म्हणजे गाळ्यांच्या बाजूला एमआयडीसीची चारपट जागा पडून आहे. त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी, असे मत गरजू उद्योजकांनी व्यक्त केले आहे. तरुण अभियंत्यांनी उद्योगांकडे वळावे या हेतूने एमआयडीसीने स्वतःखर्चातून २६ फ्लॉटेड गाळ्यांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. केवळ उद्योगांच्या वाढीसाठी नाममात्र दराने तरुण उद्योजकांना गाळ्यांची विक्री करण्यात आली होती. कालांतराने उद्योगांची संख्या वाढल्यावर एमआयडीसीतील प्लॉटचे भाव सोन्यापेक्षाही अधिक झाले आहेत. दिवसगणिक एमआयडीसीकडे जागा अथवा गाळे मिळावेत, अशी मागणी वाढत आहे. दरम्यान, एमआयडीसीने उभारलेले जुन्या प्लॉटेड इमारतीतील गाळेधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. इमारतीला गाजरगवत व काटेरी झाडाझुडपांनी वेढले असून, एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जीर्ण झालेल्या प्लॉटेड इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न कामगारांना पडतो. शौचालयांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. इमारत परिसरात स्वच्छता केली जात नसल्याने बकाल रूप आले आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालत जुन्या इमारतीच्या बाजूला पडून असलेल्या जागेवर नवीन इमारत उभारावी, तसेच जुनी इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून टाकावी, असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले. याबाबत एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. गाळे उभारल्यापासूनचेच रस्ते! तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता उभारण्यात आलेल्या गाळ्यांसाठी केवळ एकदाच रस्ते करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांच्या काळ लोटला गेला असताना नव्याने रस्तेच करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. खेडेगावातील रस्ते कदाचित चांगले असतील, परंतु एमआयडीसीच्या जुन्या गाळे इमारतीचे रस्तेच दिसेनासे झाले आहेत. पायवाटेसारख्या रस्त्यांची अवस्था प्रत्यक्ष गेल्यावर निदर्शनास येते. त्यामुळे येथील असुविधा दूर करण्याची मागणी जोर धरत आहे. एमआयडीसीने तरुण अभियंत्यांसाठी फ्लॉटेड गाळ्यांची इमारत उभारली होती. आजही अनेक लघु उद्योजक तेथे माल उत्पादित करीत आहेत. परंतु, जुन्या इमारतीत एखादी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे एमआयडीसीने काळजी घेतली पाहिजे. -सुनील गायकवाड, कामगार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट