Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवरायांना मानाचा मुजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

'राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या', 'शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला', 'आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान' यासारख्या गीतांसह छत्रपतींच्या पराक्रमी अलौकिक कीर्तीचे गुणगान गाणारी अनेक उत्साहवर्धक गीते...अश्वारूढ शिवराय अन् मावळे, जागोजागी मर्दानी कसरतींचे प्रदर्शन आणि शिवरायांचा जयघोष करत शिवप्रेमी उत्साहात रविवारी (दि. ४) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तरुणाईसह मान्यवर,जागोजागी डौलाने फडकणारे भगवे ध्वज...अशा उत्साहपूर्ण भगवेमय वातावरणात शानदार मिरवणुकीने येवलेकरांनी रविवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला. शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (दि. ४) अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. येवला शहरातून दिमाखदार मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन झाले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नीलेश चव्हाण, वाल्मिक गोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे, संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,उ पनगराध्यक्ष सुरज पटणी, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते. शनी पटांगणाजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवसेनेच्या वतीने पहाटे सहा वाजेच्या सुमारास टिळक मैदानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला.

अन् आजीबाईंनी धरला ठेका

शिवजयंती निमित्त रविवारी येवल्यात निघालेली मिरवणूक अनेकांना आकर्षून जातानाच या मिरवणुकीने एका वयोवृद्ध आजीबाईंनादेखील भुरळ घातली. शिवरायांचे गुणगान गाणारे हे गीत ऐकून जवळून जाणाऱ्या वयाची पंच्याऐंशी ओलांडलेल्या आजीबाईंनी ठेका धरला. आजीबाईंचा हा मूड मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतानाच दाददेखील मिळवून गेला.

निफाडलाही शिवजयंती

निफाड : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (दि. ४) निफाड येथे शिवसेनेच्या वतीने तिथीनुसार साजरी करण्यात आली. शांतीनगर चौफुली येथे शिवाजी महारांजाची प्रतिमा व भव्य डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता. या निमित्ताने दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून पुष्पहार घातला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, सोमनाथ पानगव्हाणे, इरफानभाई सैयद, संजय कुंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये ‘बिगेस्ट होली फेस्टिवल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमीचा सण उद्यावर येऊन ठेपला असून, महाराष्ट्र टाइम्सनेही यानिमित्त यंदा विशेष फेस्टिवलचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि रुद्र इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा 'नाशिक्स बिगेस्ट होली फेस्टिवल' उद्या (दि. ६ मार्च) होत असून, प्रसिद्ध मॉडेल आणि हिंदी अभिनेता प्रियंक शर्मासमवेत रंगपंचमी खेळता येणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध डीजे शेरीलची साथ आणि 'रोडीझ एक्स ५'ची स्पर्धक अंकिता मेहरा यांचीदेखील या फेस्टिवलला उपस्थिती असल्याने सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

रंगपंचमी म्हणजे विविध रंगांमध्ये रंगून जाण्याचा उत्सव. रंगाची मनसोक्त उधळण करीत प्रेम आणि स्नेहाचे नाते अधिक दृढ करण्याचा हा उत्सव. मंगळवारी (दि. ६) रंगपंचमी साजरी होत असून अबालवृद्ध त्यासाठी आतुर झाले आहेत. या उत्साहाला उधाण आणण्यासाठी यंदा महाराष्ट्र टाइम्सही सरसावले आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि रुद्र इव्हेंटने यंदा 'रंगपंचमी विथ सेलिब्रेटी' ही अनोखी संकल्पना नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजिली आहे. एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे उद्या मंगळवार (दि. ६ मार्च) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होली फेस्टिवल होणार आहे. त्यामध्ये विविध कोरड्या रंगांची मनसोक्त उधळण करावयास मिळणार असून हा फेस्टिवल म्हणजे धम्माल मस्तीची पर्वणी ठरणार आहे.

सवलतीत मिळणार तिकिटे

कल्चर क्लबच्या सदस्यांना या फेस्टिवलमध्ये सहभागी होता यावे यासाठी सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात आहेत. ७०० रुपये किमतीची दोन तिकिटे सदस्यांना ३०० रुपयांत मिळणार आहेत. विशेष म्हणजे नव्याने सदस्य होणाऱ्यांना दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. या फेस्टिवलमध्ये नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत असून, सवलतीच्या दरातील ही तिकिटे मिळावीत यासाठी आजच महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या कार्यालयात तर अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता टिकली, पण संख्या घटली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांत गेल्या चौदा वर्षांच्या कालावधीत मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमीच राहिलेले असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी गेल्या मुलांपेक्षा सातत्याने अधिक राहिली आहे. गुणवत्तेत मुली मुलांपेक्षा सरस असल्या तरी संख्येच्या बाबतीत मुली गेल्या दीड दशकात मुलांच्या संख्येची बरोबरी करू शकलेल्या नाहीत. यावरून स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात कमालीची तफावत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

मार्च २००४ ते मार्च २०१७ या चौदा वर्षांच्या कालावधीत बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांत मुलांची संख्या मुलींपेक्षा दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. तुलनेने मुलींच्या संख्येत वाढ होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेला मुलांपेक्षा मुलींची संख्या तब्बल २० ते २५ हजारांनी कमी राहिली आहे. असे असले तरी गुणवत्तेत मुली सरस ठरल्या असून, मार्च २०१७ चा अपवाद वगळता त्यानंतरची सलग तेरा वर्षे गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. परिणामी, उच्च शिक्षणात मुलींचा टक्काही वाढला आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गेल्या चौदा वर्षांत एकदाही मुला-मुलींच्या संख्येतील तफावत कमी झालेली नाही. उलट वर्षानुवर्षे दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या मुला- मुलींच्या संख्येतील तफावत वाढतच आहे. लिंग गुणोत्तराचे प्रमाण डळमळीत झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

लिंग गुणोत्तर चिंताजनक

विभागात मुलींचा जन्मदर घटत असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परिणामी, शाळांतील मुला-मुलींचे प्रमाणही असंतुलित झाले आहे. याचा परिणाम दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या मुलींच्या संख्येवरही होत आहे. 'बेटी बचाव'साठी शासन स्तरावर आणि सेवाभावी संस्थांकडून जनजागृती सुरू असली तरी त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. प्रसूतिपूर्व लिंग गुणोत्तर चाचणीला सरकारने बंदी आणलेली असली तरी विभागात अद्याप या प्रकारांना शंभर टक्के आळा बसलेला नसल्याने मुला-मुलींच्या संख्येच्या प्रमाणातील तफावत कायम आहे.

विभागातील दहावी परीक्षेतील प्रविष्ट विद्यार्थिसंख्या

वर्ष-प्रविष्ठ मुले-प्रविष्ठ मुली- उत्तीर्ण मुले- उत्तीर्ण मुली

२००४-८१२७३- ५९१०८- ५८५२४- ४५५१२

२००५- ८४५१७- ६३६६३- ४९९६९- ४१५२४

२००६- ८८३००- ६७८५२- ६३२५६- ५१५४२

२००७- १०९९२२- ७५३३६- ७५९८९- ५७७६५

२००८- ९०७४८- ७००८९- ७८७२९- ६२९२६

२००९- ९४८२४- ७३७७१- ८२४१७- ६५८२७

२०१०- १०५२५१- ७९५८९- ८६९२१- ७००१५

२०११- १०७३७४- ८२००४- ८२५२१- ६७६५८

२०१२- ११२४७४- ८४७८९- ७८७९८- ६५५४५

२०१३- ११७५३५- ८८३९८- ८९२६८- ७३३५१

२०१४- १०४६६०- ८१८५०- ९१३११- ७४९५८

२०१५- १०६९७५- ८५०८८- ९७०२१- ७९९७७

२०१६- १०८४९९- ९०१०५- ८८७६१- ८९२१७

२०१७- ११७४४०- ९५५८९- १०७१५०- ८२९६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दरोडेखोरांना अटक

$
0
0

दोन दरोडेखोरांना अटक

चांदवड दरोड्यातील संशयित; एलसीबीची कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड येथील डावखर नगर परिसरात प्रा. सुयोग गवारे यांना लाकडी बांबूने मारहाण करून त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये पावणे दोन लाख लुटून नेले होते. याप्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन दरोडेखोरांना शिताफीने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी (दि. ४) या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून मुंबई, पुणे, नगर या जिल्ह्यातील आणखी काही दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे. चांदवड येथील प्रा. सुयोग गवारे यांच्या बंगल्यात दि. २४ फेब्रुवारीला दरोडेखोरांनी १ लाख ७३ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. यानंतर पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे फिरवत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून कमालपुरा येथून मुकेश गायकवाड (वय २९, रा. नेवरगाव, जि. औरंगाबाद) व गोरख पिंपळे (वय २९ रा. उरळीकांचन, जि. पुणे) यांना अटक केली. या दोघांनीही चांदवड येथे दरोडा टाकल्याची कबूली दिली असून, त्यांचे अन्य साथीदार सागर चव्हाण ,योगेश काळे, व बबलू यांचा पोलिस आता शोध घेत आहे. पकडलेल्या संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३७०० रुपये रोख व दरोड्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. चांदवड येथील या दरोड्याचा सहा ते सात दिवसांत तपास लावून दरोडेखोरांना अटक करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस बॅटऱ्या लांबविल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील दत्तचौकात इमारतीवर असलेल्या मोबाइल टॉवरच्या ३६ हजार रुपये किमतीच्या २४ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. प्रदीप सदाशिव कोळी (रा. भानोसे वाडा, जुने नाशिक) यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सिडकोतील दत्त चौकात आर. जे. बागुल यांच्या घरावर मोबाइलचे टॉवर बसविण्यात आले असून, या टॉवरसाठी २४ बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी २६ हजार रुपये किमतीच्या या बॅटऱ्या गुरुवारी (दि. १) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चोरून नेल्या.

नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक

भारतीय रेल्वेमध्ये उच्च पदावर नोकरीला असल्याचे भासवून एकाने रेल्वेसाठी काम करण्याची संधी आमिष दाखवत युवकास तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातला. ई-मेलच्या माध्यमातून भामट्याने युवकाचा संपादन केला होता. धीरज कुमार सिंह (रा. ओम साईनाथ रो-हाऊस, अंबड) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित साईकेत मुखर्जी (पूर्ण माहिती नाही) या संशयिताबरोबर धीरजची ओळख झाली होती. संशयित आरोपीने आपण भारतीय रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन येथे उच्च पदावर नोकरीला असल्याचे सांगून धीरजचा विश्वास संपादन केला. यादरम्यान धीरज कुमार याच्या ई-मेलचा वापर करून त्याने रेल्वेसाठी रुफ वेंटिलेटरची मागणी केली. याकामासाठी आगाऊ रक्कम म्हणून एक लाख ६१ हजार १९० रुपये संशयिताने उकळले. मात्र, कामही मिळाले नाही आणि पैसेही देण्यास संशयित टाळाटाळ करीत असल्याने फिर्यादीने पोलिस स्टेशन गाठले. फसवणुकीचा प्रकार २६ ऑक्टोबर २०१७ ते ३ मार्च २०१८ दरम्यान घडला असून, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दुचाकींची चोरी

शहरातून तीन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. दुचाकी चोरीची एक घटना पंचवटीतील कालिकानगर येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झाली. याठिकाणी प्रवीण देविदास काळे (रा. गिरणारे, ता. नाशिक) यांनी उभी केलेली दुचाकी (एमएच १५ सीएल ८५०९) ३० जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी दुचाकी डॉन बॉस्को शाळेसमोरील पार्किंगमधून चोरीला गेली. संजय सुकदेव घोडके यांच्या फिर्यादीनुसार, २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत डॉन बॉस्को शाळेसमोरील पार्किंगमध्ये त्यांनी आपली मोपेड पार्क केली होती. चोरट्याने या कालावधीत कधीतरी दुचाकी लंपास केली. या प्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हेमंत छबुलाल सोनारे (रा. पवनननगर सिडको) यांची दुचाकी (एमएच १५ टीए १४४७) चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या विकासाला चालना

$
0
0

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेसहा कोटी मंजुरी; आमदार वाजे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी रविवारी (दि. ४) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यातील ३७ शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन 'निरी' या संस्थेने प्रकल्पाचे मुल्यांकन केले. ते प्रस्ताव सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली असून, त्या ३७ शहरांच्या १८३ कोटी रुपयांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली. यामध्ये सिन्नर नगरपालिकेचा समावेश असून, ६ कोटी ५६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या नागरी घनकचरा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्राकडून दोन कोटींचे अनुदान

या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आकृतीबंधानुसार केंद्र सरकारमार्फत प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के म्हणजेच २ कोटी २९ लाख ६३ हजार एवढे अनुदान मिळणार आहे. तर ६०:४० च्या प्रमाणात राज्य सरकारमार्फत १ कोटी ५३ लाख ९ हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल. या अनुदानाव्यतिरिक्त नगरपालिकेचा सहभाग म्हणून २ कोटी ७३ लाख ३९ हजार रुपये याप्रमाणे हिस्सा असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. मात्र पालिकेचा हिस्सा चौदाव्या वित्त आयोगातून भागविण्याची तरतूद करण्यात आल्याने यापूर्वी नगरपालिका फंडातून घनकचरा व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चापासून पालिकेला दिलासा मिळणार असल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी सांगितले.

शहर स्वच्छता, घंटागाडीसाठीही तरतूद

केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र व राज्य सरकारच्या हिश्श्याचा निधी दोन टप्प्यात प्रत्येकी ५० टक्केप्रमाणे पालिकेला वितरित केला जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही उपकरणे, मशीन खरेदी करण्याची तरतूददेखील प्रकल्प अहवालात करण्यात आलेली आहे. त्यात नगरपालिकेला १२ घंटागाड्यांसाठी ७५ लाख रुपये खर्च करता येणार आहेत. नागरिकांकडून स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ५९ लाख ६४ हजार ६५८ रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. या वेळी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक विजय जाधव, गोविंद लोखंडे, शैलेंद्र नाईक, पाणीपुरवठा समितीचे सभापती पंकज मोरे, सोमनाथ पावसे, रुपेश मुठे, मंगलाताई शिंदे, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, सुजाता तेलंग, विजया बर्डे, गौरव घरटे, रामचंद्र नरोटे आदी उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो हॉकिंगची आज स्पर्धा

$
0
0

'नो हॉकिंग'ची आज स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरी भागात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. यात वाहनांचे हॉर्न भार घालीत असून, ध्वनी प्रदूषणबाबत जनजागृतीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारी (दि. ५) सकाळी 'नो हॉकिंग' स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात २०० दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक सहभागी होणार आहेत.

नाशिक पोलिस आयुक्तालयाने मागील वर्षापासून 'नो हॉकिंग डे' सुरू केला. दर सोमवारी याबाबत जनजागृती करण्यात येते. शहर पोलिसांच्या या कार्यक्रमाची दखल राज्य सरकारने घेत, असा प्रयोग राज्यभर राबवण्याचे आदेश दिले. याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने स्पर्धेची कल्पना पुढे आणली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून सकाळी नऊ वाजता स्पर्धेस सुरुवात होईल. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते तर प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ होईल.

स्पर्धेबाबत कळसकर यांनी सांगितले, की प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विभागाच्या अटी, नियमांची पूर्तता करणाऱ्या जवळपास २०० वाहनधारकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून तिची सुरुवात आणि समारोप प्रादेशिक परिवहन कार्यालयात होईल. स्पर्धेसाठी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर बंधनकारक राहणार आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्रथमच या स्वरूपाची स्पर्धा होत आहे.

वर्दळीच्या रस्त्यांचे आव्हान

आरटीओ कार्यालयातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांना १५ किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे. पेठफाटा (भक्तीधाम) येथून डाव्याकडे वळून निमाणी, पंचवटी कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएस, शरणपूररोड, गंगापूररोड (डोंगरे वसतिगृह), अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठा फाटा आणि पुन्हा आरटीओ कार्यालय असा स्पर्धेचा मार्ग असेल. वाहतुकीचे सर्व नियम पाळीत स्पर्धकांना हे अंतर कापावे लागणार आहे.

प्रत्येक गटातून तीन विजेते

स्पर्धेत परिवहन अधिकारी, कर्मचारी तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी नियंत्रक म्हणून काम पाहतील. स्पर्धेदरम्यान किती वेळा हॉर्न वाजविला, नियम मोडले याची नोंद ठेवली जाईल. त्याआधारे दुचाकी, चारचाकी गटातून प्रथम तीन क्रमांक निवडले जाणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिक तर सहभागी स्पर्धकांना 'नो हॉर्न'चे चिन्ह असलेली टोपी आणि स्टिकर भेट देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या संघटकासह दोघांचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

नाशिक- पुणे रस्त्यावर मंचर शिवारात झालेल्या कार अपघातात खेडगाव येथील शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश नामदेव सोनवणे (वय ५८) यांच्यासह पोलिस कर्मचारी बबन तिडके ठार झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे येथील कामे उरकून आय-२० कारमधून (एमएच १५/५१५१) खेडगाव येथील रमेश नामदेव सोनवणे (वय ५८) त्यांचे नातेवाईक पोलिस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके (५२, रा. कसबे सुकेणे, ता. निफाड), निवृत्ती बाबूराव काश्मिरे (५४, रा. सातपूर), ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (५२, रा. आंबेदिंडोरी) नाशिककडे येत होते. पुणे-नाशिक रस्त्यावर पहाटे सव्वापाचच्या सुमारास तांबडेमळा-भोरवाडी येथे कार आली असता, रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनचालक रमेश सोनवणे यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगतचा डिव्हायडर आणि लोखंडी बोर्ड तोडून खड्ड्यात कोसळली. ही कार एका झाडाला अडकली.

अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी मदतीला धावले. यांनी मोबाइलच्या प्रकाशात कारमध्ये अडकलेल्या चौघांना कसेबसे बाहेर काढले. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच रमेश सोनवणे, बबन तिडके यांचे निधन झाले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ गंभीर जखमी झाले.

खेडगावात शोककळा

रमेश सोनवणे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी बबन तिडके यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सोनवणे यांच्या पार्थिवावर सायंकाळी खेडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जखमींवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, दिंडोरी तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सोनवणे परिचित होते. दिंडोरी खरेदी-विक्री संघाचे संचालक, खेडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, काशी माळी समाज संघटनेचे ते कार्यकर्ते होते.

ट्रेलरच्या धडकेत पादचारी ठार

सिन्नर : येथील गावठा भागात घोटीकडे जाणाऱ्या ट्रेलरने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत मृत पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. औरंगाबाद येथून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रेलर (एमएच ०४/डीएस ०६३६) सिन्नरमार्गे घोटी रस्त्याने मुंबईकडे जात होता. या ट्रेलरने गावठा भागात शेळके गल्लीजवळील वळणावर पादचाऱ्याला धडक दिली. ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडून पादचारी जागीच ठार झाला. ट्रेलरचालक इजहार अहमद हुसेन याने सिन्नर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर. एम. धुमाळ, योगेश माळवे, हवालदार राहुल निरगुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका रुग्णालयात पाठविला.

बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर : हरसूललगतच्या सारस्ते येथे घरात लहान बाळासाठी नायलॉन दोरीने बांधलेला झोका खेळत असताना फास बसल्याने उमेश मनोहर कुवर या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. उमेश दुपारी अडीचच्या सुमारास घरातील झोक्यावर खेळत असताना अचानक नायलॉन दोराचा फास बसल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर उमेशला त्याचा चुलतभाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात पावणेचारच्या सुमारास दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोंडाईचा प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत

$
0
0

'एसआयटी'च्या पथकाचे यश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे गेल्या महिन्यात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रविवारी (दि. ४) या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) ला मुख्य संशयितास अटक करण्यात यश आले. रविवारी (दि. ४) दुपारी दोन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने रविवारी (दि. ४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुख्य संशयित रेवनाथ रामसिंग भगत (भिल, वय ३५, रा. म्हाळसानगर, दोंडाईचा) याला दोंडाईच्यातून अटक केली. एसआयटीने जेव्हा महिलांच्या छेडखानीसह तत्सम स्वरूपाच्या गुन्ह्यातील किंवा प्रकारातील व्यक्तींची माहिती संकलित केली जेव्हा या नराधमाचा सुगावा लागला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या संशयिताने पीडितेवर अत्याचार केल्याचे मान्य केले. तो अविवाहित असून, त्याने एकदा मुलीचा हात धरल्याने त्याला जमावाने मारहाण केल्याचीही घटना घडलेली आहे.

दोंडाईचा येथे झालेल्या या प्रकारानंतर जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातही विविध सामाजिक संघटनांकडून तसेच तेली समाजाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेतील दोषींना अटक करा, त्यांना शिक्षा देण्याचीही मागणी या संघटनांनी केली होती. यानंतर गेल्या आठवड्यात नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी दोंडाईचा येथे भेट दिली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करणार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणातील एका संशयितास शनिवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता, त्यास पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाला धमकी देऊन शैक्षणिक संस्थेची बदनामी टाळण्याचा दबाव टाकल्याप्रकरणी शिक्षक व पालिकेचा माजी बांधकाम सभापती महेंद्र पाटील यांच्या जामीन अर्जावर शनिवारी कामकाज झाले. या वेळी जिल्हा न्यायालयात शिक्षक पाटील यांनी जामीन अर्ज सादर केला होता मात्र तो फेटाळण्यात आला. दरम्यान, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी दोंडाईचा येथे गेल्या आठवड्यात भेट देऊन बालिकेवर झालेल्या अत्याचाराची चौकशीसाठी नेमलेल्या पथकांमध्ये अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे हे प्रमुख आहेत. तर शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे सहायक तपासाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. उर्वरित पाच अधिकारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथील आहेत. पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारीशक्तीचा ‘प्रवाहो’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नऊवारी साडीवर घातलेला भरजरी फेटा, ट्रॅकसूट टी-शर्ट घातलेले, तर काहींनी विविध पारंपरिक पोशाखांत सामाजिक संदेशांचे फलक लावलेले...अशा विविध वेशभूषांमधून विविध संदेश देत शेकडो महिला रविवारी एकत्र आल्या. निमित्त होते 'वुमेन्स वॉकेथॉन २०१८'चे. आरोग्य, नारी शक्तीचे संघटन, वृक्षसंवर्धन, बेटी बचाओ, ट्रॅफिक सेफ्टी या विषयांवर प्रबोधनपर फलक उंचावत मोठ्या उत्साहात महिलांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स वॉकेथॉनचे आयोजन रविवार (४ मार्च) रोजी करण्यात आले होते. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महिला बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, अभिनेत्री सायली देवधर आणि नक्षत्रा मेढेकर तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या नाशिकच्या खेळाडू श्रद्धा नालमवार, शरयू पाटील, अस्मिता दुधारे यांनी झेंडा दाखवून वॉकेथॉनचे उद्घाटन केले. सकाळी ७ वाजता वेस्टविंड मिडोजपासून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनचे काही बाइकर्णी बुलेट चालवत नेतृत्व करत होत्या. यापाठोपाठ हजारो महिला वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत समाज प्रबोधन करणारे फलक घेऊन 'वॉक' करीत होत्या. खास बाब म्हणजे, या वॉकेथॉनमध्ये महिलांचे स्वस्थ आरोग्य, स्वच्छता आणि वुमन्स सेफ्टी या विषयांवर भर देण्यात आला. यावेळी एकवटलेली नारी शक्ती अन् त्यांचा उत्साह उल्लेखनीय होता.

रविजा सिंगल 'प्राइड ऑफ नाशिक'

नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची कन्या रविजा सिंगल हिला वॉकेथॉनच्या निमित्ताने 'प्राइड ऑफ नाशिक' पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. विविध खेळांत विशेष प्राविण्य मिळवत शंभरहून अधिक पदके रविजाने पटकावली आहेत. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत यंगेस्ट आयर्न लेडीचा पुरस्कार रविजाने पटकावला. यामुळे तिला हा विशेष पुरस्कार यावेळी देण्यात आला. यासोबतच छत्रपती पुरस्कार विजेत्या नाशिकच्या खेळाडू श्रद्धा नालमवार, शरयू पाटील, अस्मिता दुधारे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रबोधन 'आरोग्यापासून वसुंधरेपर्यंत'

मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या महिला डॉक्टर्सनी 'रेड डॉट करून सादर करू स्त्री शक्तीचा आदर', 'झाला अनियंत्रित रक्तस्त्राव फॅमिली डॉक्टरकडे घ्या धाव' असे फलक हाती घेत वॉकेथॉनमध्ये समाजप्रबोधन केले. तसेच 'वंशाच्या दिव्यासोबत पणतीचा प्रकाश पसरू द्या, स्त्री-जन्माचे स्वागत करा', 'संघर्ष करा मनापासून अंधश्रद्धा घालवा मुळापासून', 'जरी आहेत भिन्न संस्कृती अन् भाषा पण मानवता हीच खरी परिभाषा', 'हेल्मेट वापरा जीवन सावरा', 'वसुंधरेला चढवू हिरवा साज', 'व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री' असे फलक हाती घेत महिलांनी वॉकेथॉनमध्ये आरोग्यापासून तर वसुंधरा संवर्धनापर्यंत अनेक विषयांवर प्रबोधन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनचा ‘उद्योग’ जाचकच!

$
0
0


bhavesh.brahmankar@timesgroup.com

Tweet - @BhaveshBMT

नाशिक : 'मेक इन महाराष्ट्र', 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', 'डिजिटल महाराष्ट्र' यांसारख्या संकल्पना राज्यात राबविल्या जात असल्या, तरी उद्योगांसाठी सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात सरकार आणि विविध यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. साधे पाणी बील भरण्यासाठी उद्योगांना कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागतात. तर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्यांची 'सिंगल विंडो' कधी उघडणार, असा प्रश्न उद्योजकांना सतावत आहे. उद्योगांशी संबंधित सर्व विभागांमध्ये एजंटांचा सुळसुळाट असल्याने आर्थिक लुटीसह मानसिक त्रासानेही उद्योजक वैतागले आहेत.

देशात आणि राज्यात उद्योगस्नेही वातावरण असून, उद्योजकांनी मोठी गुंतवणूक करावी, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविल्या जातील, असे केंद्र व राज्य सरकारकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे असल्याचे दिसून येत आहे. 'डिजिटल' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्रात उद्योजकांना ऑनलाइन सेवेचा जाच आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक सुरक्षा संचलनालय अशा विविध विभागांशी उद्योगांचा संबंध येतो. पण, या सर्व विभागांकडून उद्योजकांची निराशाच केली जात आहे.

उद्योगाचे पाण्याचे बील भरणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शुल्क, नवीन उद्योग स्थापण्यासाठीचा अर्ज अशा कुठल्याही प्रकारची सेवा पूर्णत: ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्योजकांना त्या-त्या विभागात जावेच लागते. याठिकाणी एजंटांचाही सुळसुळाट आहेच. सरकारी विभागांनी त्यांचे कामकाज ऑनलाइन आणि कम्प्युटराइज्ड केले असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ उद्योजकांना मिळत नाही. त्यामुळेच ठराविक शुल्क भरण्यासाठी त्या विभागात जाणे आवश्यकच ठरते. विहित वेळेतही संबंधित परवाने आणि कामे होत नसल्यानेही उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्याची मागणी उद्योजकांकडून अद्यापही होत आहे.

जिल्हा उद्योग केंद्राचा कारभार अतिशय ढिसाळ आहे. सिंगल विंडो सिस्टिम आणली जाईल, असे अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. उद्योग सुरक्षेचा परवाना आणि अन्य सुविधाही ऑनलाइन नाहीत. याचा मोठा परिणाम उद्योग विकासावर होत आहे.

- सुरेश माळी, माजी अध्यक्ष आयमा

प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि अन्यही सरकारी विभागांचे कामकाज अद्यापही ऑनलाइन झालेले नाही. अगदी थोड्या प्रमाणात सेवा ऑनलाइन आहेत. पण, उद्योग विस्तारण्यासाठी ते पुरेसे नाही.

- धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी वर्षांची चपळ जलपरी!

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : आयुष्याच्या ज्या वळणावर वार्धक्यामुळे अनेकांची उमेद खच्ची होऊ लागते, त्या वळणालाच प्रेरणादायी कसं बनवावं, याचा वस्तूपाठच नाशिकच्या ऐंशी वर्षांच्या निर्मला भिडे यांनी जलतरणावरील प्रेमातून समाजाला घालून दिला आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षातही त्या २५ मीटरच्या २० लेंग्थ सहजपणे पोहू शकतात. निर्मला भिडे या जन्माने डहाणूकर. डहाणूमधील केळकर हे त्यांचे माहेरचे नाव. लहानपणापासून त्यांना घरात जे वातावरण लाभले ते निसर्गाच्या सान्निध्यातले. आपल्या बरोबरीच्या किंवा वयाने जरा मोठ्या असणाऱ्या मैत्रिणींसोबत अवघ्या चार ते पाच वर्षे वयापासून त्यांना जलतरणाची गोडी लागत गेली. पोहण्याची गोडी कशी लागली याची आठवण सांगताना त्या म्हणतात, 'विहिरीच्या काठावरून आम्हाला पोहणे शिकण्यासाठी विहिरीत लोटून दिले जायचे. मग पाण्यावर तरंगण्यासाठी ताकदीने धडपड सुरू व्हायची. अशा खेळात आम्ही पोहणे कसे शिकलो हे समजलेच नाही. यानंतर कॉलेजला आल्यानंतर मुंबईमध्ये काकांकडे आल्यानंतर या पोहण्यातली गोडी वाढतच गेली. दरम्यान, मुंबईतल्या रूईया कॉलेजमध्ये शिक्षण घेताना मी नॅशनल कबड्डी चॅम्पियन झाले. टेबल टेनिस, टेनी क्विट आदी क्रीडाप्रकारांमध्येही मी निपुण होते.

मुंबईत मफतलाल क्लबच्या तरण तलावात बहिणींसोबत पहिल्यांदाच पोहल्यानंतर थेट पोहणे आणि प्रशिक्षण घेऊन पोहणे यातील अंतर समजले आणि केवळ निरीक्षणातून माझे पोहणे सुधारत गेले. लग्नानंतरही पोहण्याचा छंद कायम राहिला. पुढे-पुढे मुलालाही पोहण्यास शिकवून रोज त्याला सोबत घेऊन शिवाजी पार्कला जायची. त्याला वेळेवर जेऊ घालून पोहणे कधीही चुकवायचे नाही, असाही शिरस्ता मी गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळताना जपला. पती विनायक भिडे हे टाटा कंपनीत अभियंते होते. तेव्हा अनेकदा त्यांची बदली देशाच्या विविध भागात झाली. एकदा ही बदली इराकमध्येही झाली पण या बदल्यांच्या कालावधीतही पोहण्याच्या नियमात खंड पडू दिला नाही. पोहण्यावरच्या या प्रेमाने निर्मलाताईंना आजही तंदुरूस्त ठेवले आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी त्या गुजरातेत सोमनाथ येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. तिथे एका ठिकाणी मागाहून आलेल्या गायीने त्यांना जोरदार धडक दिली. परिणामी, शरिराला मुका मारही बराच लागला होता. दैनंदिन हालचाली करणेही कठीण बनले होते. विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घेण्याशिवाय इतर पर्याय नाही, असे घरातील मंडळींना वाटू लागले, पण पोहण्यावर विश्वास असणाऱ्या निर्मलाताईंनी इच्छाशक्तीच्या बळावर पाण्यात प्रवेश केला अन् कुठल्याही विशेष उपचारांशिवाय पूर्वीइतक्याच त्या तंदुरुस्त झाल्या. आजही कडाक्याची थंडी वगळता त्यांचा पोहण्याचा नित्यक्रम सुरू आहे.

नव्या पिढीसाठी प्रयत्न

आपल्या नातवंडांच्या वयाच्या पोहण्यासाठी इच्छुक लहानग्यांनाही त्या पाण्याची गोडी निर्माण करतात. कुठेही अधिकृत प्रशिक्षक म्हणून राहण्याऐवजी आपल्याकडून पोहणे शिकणाऱ्या नातवाएवढ्या शिष्यासोबत गोड जेवण इतकीच त्यांची गुरुदक्षिणा! नवीन पिढीत पोहण्याची आवड रुजावी यासाठी वयाच्या आठव्या दशकातही निर्मलाताई प्रेरणा देत उभ्या आहेत. प्रपंचापासून तर करिअरपर्यंत अनेक आघाड्यांवर कसरत करताना आज महिलांसाठी आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ती जपण्यासाठी तुम्ही तुम्हाला रूचेल तो व्यायाम नक्की करा, एवढा कानमंत्रही निर्मलाताई नव्या पिढीतील महिलांना महिला दिनानिमित्त द्यायला विसरत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदोबस्त, गस्त, शिस्त, तपास यात सतत गुंतून पडलेल्या पोलिसांनी रविवारी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. पोलिस आयुक्तांसह उपस्थित सर्वांनी विविध गाण्यांवर ठेका धरला आणि एकमेकांना रंग लावत आंनद लुटला.

सण, उत्सवादरम्यान बंदोबस्तात आयुष्य खर्ची घालणाऱ्या पोलिसांना निवांतपणा मिळतच नाही. कुटुंबासह एखादा कार्यक्रम साजरा करणे दुरापास्त होणे हे पोलिसांसाठी नवीन नाही. जीवनातील छोट्या-छोट्या आनंदाला मुकलेला माणूस शेवटी दडपणाखाली येतो. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. नाटक-सिनेमे पाहणे, ट्रेकिंग, वाढदिवस साजरे करणे हा त्यातीलच भाग! प्रत्येक कार्यक्रमादरम्यान पोलिसांचे कुटुंब हजर असावे, याकडेही लक्ष पुरविले जाते. मंगळवारी रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाईल. पण, खाकीवर्दीतील पोलिसांना बंदोबस्ताच्या कामातच न्हाऊन जावे लागेल. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी रविवारी पोलिस व त्यांच्या कुटुंबीयासाठी रंगपंचमीचा कार्यक्रम ठेवला. हा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात झाला. पाण्याने भरलेले पिंप, बादल्या, रंगाने भरलेली ताटे, पोलिस बँड, साउंड सिस्टीम असा माहोल जमून आला. पोलिस आयुक्तांसह सर्वांनीच विविध गाण्यांवर ठेका धरला. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षक यावेळी हजर होते. अगदी छोट्या आनंदातून आपल्याला उर्मी मिळते. सतत काम करणाऱ्या पोलिसांना अशी उर्मी मिळावी, त्यातून समाजाप्रती त्यांचे काम आणखी उजवे ठरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलात सॅनिटरी नॅपकिन मशिन

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : मासिक पाळी काळात महिला खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भातील समस्यांवर 'मटा'ने प्रकाश टाकताच त्याची दखल घेण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहभागातून राज्यात आदर्श ठरावे, असे कार्य घडत आहे. मुंबई-आग्रा हायवेवरील विभागीय क्रीडा संकुलात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवले जात असून, राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज, सोमवारी होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सने 'वाट स्वच्छ आरोग्याची' हा उपक्रम हाती घेतला असून, त्या अंर्तगत या विषयावर विविध क्षेत्रात जनजागृती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना मासिक पाळीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी, 'अडचणींचा सामना' या फोकसमध्ये मांडण्यात आल्या होत्या. या समस्या नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या निर्दशनास आल्यानंतर आपणही या उपक्रमात सहभागी होऊन महिलांच्या अडचणी सोडवाव्यात, असा त्यांनी निर्धार केला. या उपक्रमासाठी सरकारी पातळीवर कोणत्याही स्वरुपाची आर्थिक तरतूद नसताना त्यांनी लोकसहभागातून हे मशिन विभागीय क्रीडा संकुलात बसवले आहे. या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचे उद्घाटन आज (सोमवार) विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी विभागीय आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या 'चला खेळूया' या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनदेखील करण्यात येणार आहे.

शिवाजी स्टेडियममध्येही लवकरच सुविधा

हा उपक्रम सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, विभागीय क्रीडा संकुलानंतर दुसऱ्या टप्प्यात हे मशिन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे बसविण्यात येणार आहे. या मशिनसाठी नाशिक जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आर्थिक सहकार्य केले आहे. या ठिकाणी अनेक महिला खेळाडू सरावासाठी येत असतात. त्यांना हे फायद्याचे ठरणार आहे.

अनेक महिला खेळाडूंना स्पर्धेच्यावेळी मासिक पाळी आली, तर त्याबाबत वाच्यता होत नव्हती. परंतु, त्याबाबत आता चांगली जनजागृती झाली आहे. महिला खेळाडू बोलू लागल्या आहेत. 'मटा'ने या विषयाला वाचा फोडली. महिलांच्या सामन्यावेळी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठीच हे मशिन उपलब्ध होत आहे.

- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये अपहार झाला असून, संचालक व मोठ्या कर्जदारांसह ४७० जणांवर सहकार विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील एकूण पतसंस्थांपैकी २७ पतसंस्था अडचणीत सापडल्या असून, त्यांच्याकडे तब्बल १४७७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.

पतसंस्थांमध्ये संचालक मंडळाकडून झालेले गैरव्यवहार आणि बड्या थकबाकीदारांनी कर्ज बुडविल्यामुळे जिल्ह्यातील २७ पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या एकूण २१९९ कोटी ४५ लाख रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. सहकार विभागाने आतापर्यंत कलम ८८ अन्वये १९ पतसंस्थांची चौकशी केली आहे. दहा संस्थांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अन्य दोन पतसंस्थांची चौकशी बाकी आहे. फेब्रुवारी २०१८ पर्यंत बुडीत निघालेल्या पतसंस्थांकडून सहकार विभागाने ७२१ कोटी ८३ लाख रुपयांची वसुली केली. जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये तब्बल १,८०१ कोटींचा अपहार झाला असून, अशा प्रकरणांमध्ये पतसंस्थांच्या संचालकांसह थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गुंतलेल्या एकूण आरोपींची संख्या ४७० पर्यंत पोहोचली असून, त्यापैकी २०५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चार मोठ्या बँका अवसायनात

जिल्ह्यातील चार मोठ्या बँका अवसायनात निघाल्या आहेत. या बँकांवर पाच वर्षांपासून अवसायक नेमण्यात आले आहेत. यापैकी श्रीराम बँकेकडे सर्वाधिक ३० कोटींची रक्कम वसुली बाकी आहे. बालाजी बँकेकडून चार कोटी, तर सिन्नर नागरी बँकेतून ५० लाखांची वसुली बाकी आहे. डबघाईस आलेल्या काही पतसंस्थांना सरकारने बिनव्याजी दोन कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सरकारकडून प्राप्त मदत आणि पतसंस्थांकडील निधी यांमधून ठेवीदारांना दोन कोटी ६३ लाख १७ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. पतसंस्थांकडून करण्यात आलेल्या वसुलीपैकी दोन कोटी ४२ लाख ७४ हजार रुपये सरकारला परत करण्यात आले आहेत; परंतु अद्याप २० लाख ३३ हजार रुपये वसुली बाकी असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा परिसरातील दामोधरनगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सौरिना शोमीन धोष (रा. सुकून सी. दामोधरनगर) असे या युवतीचे नाव आहे. अज्ञात कारणातून सौरीनाने शनिवारी (दि. ३) मध्यरात्री आपल्या रूममध्ये गळफास लावून घेतला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सौरीना नोकरी करून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करीत होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूक वेदनांवर मायेची फुंकर

$
0
0


pravin.bidve@timesgroup.com

tweet : BidvepravinMT

नाशिक : जेथे माणसे एकमेकांचा तिटकारा करतात तेथे भूतदया दाखविण्याच्या फंदात कोणी का पडावे? स्वार्थाने बरबटलेल्या अन् आत्मप्रौढी मिरविण्यातच मग्न असलेल्या दुनियेत त्या मुक्या जीवांचा सहारा बनल्या. जायबंदी, आजारी आणि खंगलेल्या मुक्या जीवांना त्यांनी प्रेमाची अन् ममतेची ऊब दिली. शेकडो मुक्या जीवांच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर घालणाऱ्या अन् हृदयामध्ये त्यांच्याप्रती आपुलकीची भावना जपण्याचे काम 'शरण फॉर अॅनिमल'च्या शरण्या शेट्टी करीत आहेत.

शरण्या यांचा जन्म मंगरुळला झाला. पण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्या नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत. शालेय शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बीवायके महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यामुळे 'मी नाशिककर आहे' असे त्या अभिमानाने सांगतात. शरण्या यांच्या वडिलांना मुक्या जीवांचा प्रचंड लळा. त्यामुळे अशा मुक्या जीवांसमवेत खेळत अन् त्यांच्या सानिध्यातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शरण्या यांनाही या मुक्या दोस्तांप्रति स्नेह निर्माण होणे स्वाभाविकच होते. विशेष म्हणजे विवाहानंतरही सासरी शेतीप्रधान कुटुंबामध्ये अशा जिवाच्या जीवलगांची त्यांना साथ मिळाली. सासरीदेखील श्वान पाळले असल्यामुळे त्यांची मुक्या जीवांप्रतीची आवड आपसूकच जोपासली गेली.

१९९८ मध्ये घडलेली एक घटना शरण्या यांच्या मनामध्ये खोलवर रुतली. या घटनेने त्यांच्या संवेदनशील मनाला साद घातली. फेब्रुवारी महिन्यातील ही घटना आहे. शिंगाडा तलाव परिसरातील अग्निशमन केंद्रासमोर रस्त्यावरील दुभाजकाला एक श्वान दोरीने बांधून ठेवण्यात आला होता. आजुबाजूने भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे हा श्वान सैरभैर झाला. त्याला अशा पद्धतीने बांधले होते की कोणत्याही क्षणी त्याचा अपघाती मृत्यू झाला असता. त्याची ही अवस्था पाहूनही लोक पुढे निघून जात होते. परंतु, शरण्या यांनी हा प्रकार पाहिला. त्या थांबल्या. या श्वानाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. वाहनांच्या गोंगाटामुळे हा श्वान आक्रमक झाला होता. तो जवळही येऊ देत नव्हता. प्रयत्नांची पराकाष्टा करून शरण्या यांनी त्याला वाचविले. हा श्वान संबंधित मालकाला नकोसा झाल्याचा एव्हाना त्यांच्या लक्षात आले. मालक या मुक्या जीवाशी बेईमान झाला असला तरी शरण्या यांनी मात्र त्याला जीव लावला. या घटनेनंतर शरण्या यांनी अशा नकोशा झालेल्या जीवांसाठी ठोस काही करण्याचा निर्धार केला. अशा मुक्या जीवांचा सांभाळ करण्याची इच्छा त्यांनी एका मित्राजवळ बोलून दाखविली. त्यानेही शरण्या यांना याकामी प्रोत्साहन देत जागा उपलब्ध करून दिली. आजारी, अपघातात जायबंदी झालेली, किंवा अगदीच बेवारस सोडलेल्या श्वानांना हक्काचा निवारा देतानाच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी शरण्या यांनी उचलली. त्यासाठी 'शरण फॉर अॅनिमल' ही स्वयंसेवी संस्था त्यांनी सुरू केली. त्यांच्या या कार्याला पती, मुले आणि अन्य कुटुंबियांनीदेखील पाठबळ दिले. गेली अनेक वर्ष त्यांनी हजारो मुक्या जिवांची सेवासुश्रुषा केली अन् संगोपनही केले. कुटुंबातील सदस्य या नात्याने शरण्या यांनी या मुक्या जीवांचा सांभाळ करण्याचे व्रत जोपासले आहे. सुरुवातीला त्यांना लोकांकडून तुसडेपणाची वागणूक मिळाली. परंतु, त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या या कामाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. महापालिका केवळ श्वानांच्या निर्बीजीकरणाचे काम करते. जखमी अवस्थेत आढळणाऱ्या श्वानांबाबत महापालिकेलाही अनेक तक्रारी प्राप्त होत असत. अशा तक्रारीची दखल घेऊन शरण फॉर अनिमल या संस्थेने उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने या संस्थेला विल्होळी येथील कचरा डेपोसमोर जागा दिली असून शरण्या यांनी तेथे या मुक्या जीवांचा संसार थाटला आहे. डॉक्टरांच्या मदतीने येथे जखमी, आजारी, जायबंदी आणि खंगलेल्या मुक्या जीवांवर उपचार केले जातात. त्यांचे संगोपन केले जात. या जीवांवर येथेच एक्सरे, सोनोग्राफी व तत्सम उपचार व्हावेत याकरीता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कुठेही श्वान व तत्सम जीव संकटात असले तरी शरण फॉर अॅनिमलची टीम तेथे जाऊन या जीवाला विल्होळी येथे घेऊन येते.

प्राण्यांसाठी शेल्टर उभारणार

अपघातग्रस्त मुक्या जीवांसाठी शरणने हायड्रोथेरपी पूल विकसित केला आहे. पाळीव अथवा बेवारस मृत श्वांनाना संस्थेच्या आवारातच दफन करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नव्हे तर या जिवलगांच्या स्मृती वृक्षारोपनाच्या माध्यमातूनही जपल्या जातात. जायबंदी मुक्या जिवांना जपणे हे लोकांना किळसवाणे काम वाटते. परंतु शरण्या यांना सहकार्य करणाऱ्या हातांची संख्या वाढू लागली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, इको फ्रेंडली वातावरणात प्राण्यांना येथे राहता यावे यासाठी नैसर्गिक वातावरणातील शेल्टर उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ममदापूर येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

येवला तालुक्यातील ममदापूर येथे साईनाथ भागिनाथ शिंदे (वय २९) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्री घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे यंदा जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे.

साईनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. शिंदे यांच्या नावावर ममदापूर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्यांच्या नावे काही कर्ज होते का, याची माहिती महसूल विभागाकडून घेतली जात आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १३ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबत मृत्यूला कवटाळले आहे. मार्च महिन्यातील ही पहिली आत्महत्येची घटना असून, गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिखाव्यापुरताच 'सहकार' ऑनलाइन

$
0
0


ashok.suryavanshi@timesgroup.com

tweet- @ashoksuryaMT

नाशिक : डिजिटलच्या जमान्यात प्रत्येकजण ऑनलाइन सुविधांचा लाभ घेत असताना सहकार खाते मात्र यापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. नाही म्हणायला काही सुविधा नावापुरत्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या दिखाव्यापुरत्याच उरल्या आहेत. गृहनिर्माण सोसायट्या, सहकारी बँका, कारखाने, सहकारी उद्योग संस्था, पतसंस्था अशा ग्राहकाशी थेट जोडल्या गेलेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सहकार विभागाने एकही ग्राहकाभिमुख सुविधा सुरू केलेली नाही. ज्या सुविधा सुरू करण्यात आल्या, त्या पुढे अपडेटच करण्यात न आल्याने त्यांचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य संकेतस्थळावर सहकार खात्याच्या वेबसाइटची लिंक आहे. या वेबसाइटवर राज्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांची यादी, अधिकाऱ्यांची नावे, भरावयाचे रिटर्न्स आदी माहिती आहे. राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षकांचीही यादी देण्यात आली आहे. सहकार आयुक्तांच्या वेबसाइटचीही लिंक यातच दिलेली आहे. या वेबसाइटवर ऑनलाइन सोसायटी प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टिम, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जीडीसी अँड ए व सीएचएम परीक्षेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, यातही अनेक त्रुटी आहेत. शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन अर्ज सादर करताना किती अडचणी आल्या हे सर्वज्ञात आहे. सध्या जीडीसी अँड ए परीक्षेचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. मात्र, हे लॉगिन करतानाही उमेदवारांना असंख्य अडचणी येत आहेत. उमेदवारांनी नोंदणी करूनही यूजर नेम आणि पासवर्ड चुकीचा असल्याचे मेसेज झळकत असल्याने या परीक्षेचे फॉर्म भरणाऱ्यांना मनस्ताप होत आहे.

...ही माहिती उपलब्धच नाही

राज्य सरकारने डीम्ड कन्व्हेयन्ससाठी अनेक वर्षांपासून मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप ऑनलाइन डीम्ड कन्व्हेयन्स सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. सोसायटी नोंदणीची सुविधाही ऑनलाइन असल्याचे भासविण्यात येत असले तरी कागदपत्रांची जंत्री इतकी मोठी आहे की, ते ऑनलाइन भरणे 'एजंट' आणि वकिलांनाच शक्य होते. एखाद्याने तसा प्रयत्न केला तरी सहकार कार्यालयातून त्याला एखाद्या एजंटकडे धाडण्यात येते. यात मोठे अर्थकारण दडलेले आहे. डीम्ड कन्व्हेयन्सच्या बाबतीतही हीच बोंब आहे. ऑनलाइन तपासणी प्रणाली, सोसायटी प्रमाणिकरण मोड्यूल, सोसायटी प्रमाणिकरण रिटर्न मोड्यूल आदी सर्व गोष्टी वेबसाइटवर दिसत असल्या तरी त्याची माहिती उपलब्ध नाही. विभागाच्या अखत्यारीतील सर्व सहकारी संस्थांची माहिती आणि संपूर्ण पत्तेही या विभागाकडे उपलब्ध नाहीत, हे विशेष.

सहकार विभागाकडून ऑडिटरची जी अॅलॉटमेंट केली जाते, ती रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर आणि रँकिंगनुसार करावी. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक झाल्यास ऑडिटरचे स्वातंत्र्य अबाधित राहील.

- महेश कोकाटे, सी. ए.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दोन अधिकारी रडारवर

$
0
0

अवैध धंदे कारवाईकडे पोलिस दलाचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अवैध धंद्याचे प्रस्थ कायम असून, कारवाईनंतरही यात फरक पडत नसल्याचा मुद्दा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीरतेने घेतला आहे. पोलिस आयुक्तांच्या रडारवर आणखी दोन पोलिस अधिकारी असून, ते काय कारवाई करतात, याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

अवैध धंद्यावर छापे पडतात आणि दोन दिवसात ते पुन्हा सुरू होतात, याबाबत संबंध शहरात ओरड सुरू आहे. अवैध धंद्याचे पीक जोमात वाढले की पाठोपाठ गुन्हेगारीही वाढते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षकही हजर होते. या बैठकीनंतर उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांची बदली करण्यात आली. या बैठकीला फक्त पोलिस निरीक्षकच उपस्थित होते. काय चुकते, कोणाचा दबाव असतो याबाबत पोलिस आयुक्तांनी थेट निरीक्षकांकडून माहिती घेतली. या बैठकीत बोलण्याची इच्छा असलेल्या अधिकाऱ्यांना काही कारणास्तव व्यक्त होता आले नसेल म्हणून पोलिस आयुक्तांनी सर्वच निरीक्षकांशी वैयक्तीकरित्या बंद दरवाज्याआड चर्चा केली.

ते अधिकारी कोण?

पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारी घटना, अवैध धंद्यांचे प्रमाण तसेच कारवाईनंतर पुन्हा सुरू होणारे धंदे याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी जाणून घेतली. पोलिस निरीक्षकांकडून संकलित झालेल्या माहितीनुसार दोन अधिकारी आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. ते अधिकारी कोण, याबाबत मात्र पोलिस आयुक्तांनी चुप्पी साधली आहे.

सर्वसामान्य व्यक्ती तक्रार करतात, यातच सर्व आले. काहीतरी चुकते म्हणून सर्वांची मते जाणून घेतली. शेवटी सर्वसामान्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, यात कोणी हयगय करीत असेल तर कारवाई करावीच लागणार. पोलिस दलाचा सन्मान कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images