राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील युवकांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती राजाराम महाराज अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे नवीन तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेच्या नियम व अटींनुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे राज्यातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँक व नागरी बँक ज्या सिबिल प्रणाली सदस्य आहेत, अशा बँकांनी आपल्या नियम आणि अटींना अनुसरून करावीत, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सुचिता भिकाणे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत बँकेचे हप्ते वेळेवर अदा केल्यास लाभार्थ्यांना, गटांना व्याज परतावा त्यांच्या आधार लिंक खात्यावर महामंडळातर्फे दिला जाणार आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आहेत.
www.mahaswayam.in या संकेतस्थळावरून लाभार्थ्यांचे मंजुरी पत्र पाहून गरजू व्यक्तींना बँकेने आपल्या नियमानुसार कर्ज देऊन सहकार्य करावे, महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सहाय्यक संचालक (रोजगार व कौशल्य विकास) कार्यरत आहेत. तसेच महामंडळाने जिल्हा समन्वयकही नियुक्त केलेले असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट