Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुस्तकांमुळे आम्हाला ऊर्जा मिळाली

$
0
0

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुस्तके, चित्रपट, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियामुळे आमचे कार्य घराघरात पोहचले. त्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी नाशिकचे युवा साहित्यिक किरण सोनार लिखित 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात केले.

नाशिकचे युवा साहित्यिक किरण सोनार यांनी लिहिलेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो' या पुस्तकास हेमलकसात चांगला प्रतिसाद लाभला असून, सहा महिन्यांतच पहिली आवृत्ती संपली. हेमलकसात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पुस्तकाच्या विक्रीच्या माध्यमातून लोकबिरादरी प्रकल्पास मदत केली जात असून, पुस्तकास अनेक साहित्य पुरस्कारही मिळाले आहेत. मंदा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या हस्ते द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी प्रकाश आमटे यांनी सांगितले, की आम्ही आरोग्य, शिक्षण सेवासोबतच गाव विकासासाठी शेततळे बांधणे, आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे आणि व्यसनमुक्ती असे कार्यक्रम हाती घेतले असून, यासाठी लोकसहभागची गरज आहे. किरण सारखे युवक आमचे कार्य पाहून प्रभावित होतात आणि आपल्या क्षेत्रात आदिवासींसाठी काम सुरू करतात याचा आनंद वाटतो, असेही प्रकाश आमटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात दोन दिवसांत तीन घरफोड्या

$
0
0

मालेगाव : शहरातील घरफोडीचे सत्र वाढत असून शहरातील सोयगाव, डिके कॉर्नर, शब्बीरनगर परिसरात तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोयगाव भागातील सरस्वती कॉलनीमध्ये गोदावरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पंचायत समितीचे उपसभापती अनिल शांताराम तेजा (वय ३४) यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे ग्रील व दरवाजेचे कुलूप तोडून १ लाख रक्कम, ७ हजार किमतीचा लॅपटॉप व ७ हजार रुपये किमतीचे फोन असा एकूण १ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. अनिल तेजा यांनी कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

दुसरी घटना डीके कॉर्नर परिसरात झाली. तेजरत्न कॉलनीमध्ये राहणाऱ्या ललिता बळवंत निकम (वय ३३) या महिलेच्या घरात रविवारी रात्री ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ५ हजार रोख रक्कम व २५ हजार किमतीच्या सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून लंपास केला आहे. ललिता निकम यांनी कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

शब्बीरनगर भागातील एका किरण दुकानातदेखील सोमवारी रात्री घरफोडी झाली. सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, तीन संशयितांना अटक केली आहे. अद्याप एक आरोपी फरार आहे.

कॅम्पात दोन गटांत हाणामारी

मालेगाव : पाणी भरत असताना समोर थुंकल्याच्या कारणावरून कॅम्प भागातील पंचशीलनगरजवळ प्रकाश हौसिंग सोसायटीत दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीनंतर परस्परांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे. पूजा आहिरे नळावर पाणी भरत असताना संजय विठ्ठल आहिरे हा तिच्या समोर थुंकला म्हणून पूजा व तिच्या कुटुंबाने जाब विचारला. यानंतर संजय आहिरेसह विमलबाई विठ्ठल, सुनीता संजय, ललिता उर्फ संगीता सुरेश पवार, सपना कपिल सोनवणे व अन्य पाच जणांनी तक्रारदाराच्या घरात घुसून शिवीगाळ दम देत पूजा व तिच्या साथीदारांनी मारहाण केली, अशी तक्रार पूजा आहिरे हिने केली आहे. या प्रकरणी पूजा आहिरे व सपना सोनवणे या दोघींनी परस्पर विरोधात तक्रार केली असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचा सत्ताधाऱ्यांना झटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामांची गरज, तांत्रिकता आणि निधीची उपलब्धता या आयुक्त तुकाराम मुंढेंच्या त्रिसूत्रीचा पहिला फटका भाजपसह नगरसेवकांना बसला आहे. महासभेत विविध विकासकामांचे तब्बल १५ कोटींचे प्रस्ताव माघारी घेण्यात आले. ४४ पैकी तब्बल ३५ प्रस्ताव मागे घेण्याचा प्रकार महासभेत पहिल्यांदाच घडल्याने भाजपसह नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली. बजेटमध्ये तरतूद नसल्याने पडताळणीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नगरेसवक व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भाराभार प्रस्ताव ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचीही यानिमित्ताने कोंडी झाली आहे. २५ लाखांच्या अधिकारावरून आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना सुनावत, २५ लाखांचे आपल्याला खर्चाचे अधिकार असल्याचे ठणकावून सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मंगळवारी नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची पहिलीच महासभा होती. या महासभेत अपेक्षेप्रमाणे नगरसेवकांसह अधिकाऱ्यांना मोठा झटका दिला. महासभेत विकासकामांची आर्थिक तरतूद नसताना भारंभार प्रस्ताव मंजूर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश लावत, महासभेच्या पटलावर ठेवलेले ४४ पैकी ३५ प्रस्ताव माघारी घेण्याचे पत्र दिले. यामध्ये भुयारी गटार योजना, बांधकाम विभाग आणि उद्यान विभागातील प्रस्तावांचा समावेश आहे. विविध विकासकामांचे जवळपास १५ कोटींचे प्रस्ताव माघारी घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची कोंडी झाली असताना विरोधकांनी मात्र पूर्ण सभाच माघे घ्या, असा टोमणा मारला. आयुक्तांनी सभेची सूत्रे हाती घेत, बजेट हेड निगेटिव्ह असल्याने व या प्रस्तावांबाबत आर्थिक तरतूद नसल्याने जास्तीचे प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. या प्रस्तावांची योग्य ती पडताळणी केली जाईल असे सांगत आवश्यक तेथे आपल्या अधिकारात ते मंजूर करू, अशी भूमिका घेतल्याने सत्ताधारी तोंडावर पडले. एलईडी, नगरसेवक निधीच्या प्रस्तावाचे काय, असा प्रश्न हेमलता पाटील यांनी केला. त्यावर आयुक्तांनी एलईडीचे एकच टेंडर होणार असल्याचे सांगत, हा निधी पोलसाठी वापरा अशी सूचना केली. त्यामुळे एलईडीच्या वादावर आता पडदा पडला आहे.

सत्ताधाऱ्यांनाच आव्हान

प्रस्ताव मागे घेतल्याने मुशिर सैय्यद यांनी नगरसेवक निधी घेऊन माझी कामे करा, अशी भूमिका घेतली. त्यावर आयुक्तांनी आवश्यक असेल तर २५ लाखांचे अधिकार माझ्याकडे असून, त्यातून काम करण्याची भूमिका घेतली. यासाठी महासभेवर येण्याची गरज नसल्याचे सांगत, सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. २५ लाखांच्या आत असलेली कामे मी माझ्या अधिकारात मंजूर करू शकतो, असे सांगितल्याने स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी २५ लाखांच्या आतील प्रस्तावही स्थायी समिती व प्रभाग समितीवर आणावे लागतात अशी भूमिका घेतली. या आदेशाबाबत संदिग्धता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी स्पष्टिकरण देत, कायद्यानुसार आपल्याला २५ लाखांच्या आत कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार असल्याचे सांगत, हा आपला अधिकार असल्याचेही ठणकावले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची बोलती बंद झाली. आयुक्तांची पहिलीच सभा असल्याने वाद नको म्हणून सत्ताधाऱ्यांनी आवरते घेतले.

आमचे काम सोपे झाले

नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांचे महासभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही स्वागत करीत, भाजपला कोंडीत पकडले. आयुक्तांची ख्याती चांगली असल्याने काहीजणांवर येथे गंडांतर आले आहे. तुम्ही आल्याने चांगले झाले, असे गजानन शेलार म्हणाले. परंतु, तुम्ही आल्याने चांगले झाले नाही, असे म्हणणारेही येथे असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. आता आमचे काम हलके झाले असा टोमणाही त्यांनी मारला. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.

छिंदमवरून कोंडी

शिवसेनेने महासभेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदम यांच्या निषेधाचा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. त्या प्रस्तावाचे वाचन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. त्यामुळे कोंडीत पकडलेल्या महापौरांनी प्रस्ताव वाचून दाखवण्यास सांगितले. यानंतर निषेधाचा ठराव करीत, विरोधकांनी बाके वाजवून निषेध केला. त्यावर भाजपच्या सदस्यांनी मात्र मौन धरणे पसंत केले. भाजपच्या सदस्यांच्या या मौनावरून विरोधकांनी त्यांची कोंडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रोस्टल स्कूलची सुरक्षा ‘उंची’ वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या किशोर सुधारालयाच्या (ब्रोस्टल स्कूल) संरक्षण भिंतीचे काम वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. जवळपास पाच फूट उंची वाढविण्यात येणार असून, यामुळे तब्बल २१ फूट उंचीची भिंत पार करून पलायन करणे सोपे होणार नाही.

त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटललगत असलेल्या किशोर सुधारालयामधून ११ जानेवारी २०१६च्या मध्यरात्री २६ पैकी १२ विधी संघर्षित बालकांनी मनोरा करून तसेच, चादरींचा वापर करून धूम ठोकली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुरूंग महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव या ब्रोस्टल स्कूलच्या संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्याचे सूतोवाच केले होते. वास्तविक संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव या घटनेपासूनच प्रस्तावित होता. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे प्रस्तावावर अंमलबजावणी होत नव्हती. सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनेमुळे उंची वाढवण्याच्या कामास चालना मिळाली. दोन दिवसांपासून येथे काम सुरू झाले असून, तब्बल पाच फूट उंची वाढविण्यात येणार आहे. सध्या भिंतीची उंची १६ फूट असून, नवीन कामामुळे ती २१ फुटांपर्यंत वाढणार आहे. यासाठी तुरूंग महानिरीक्षक कार्यालयामार्फत निधीची तरतूद करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम हाती घेण्यात आले आहे. साधारणतः सव्वातीन एकर क्षेत्रफळ असलेल्या ब्रोस्टल स्कूलमध्ये १०५ विधी संघर्षित मुले सामावू शकतात. आजमितीस वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाल न्यायालयाच्या आदेशामुळे सात विधी संघर्षित मुले येथे राहतात. या जेलमध्ये ३०, २१ आणि ११ फुटाचे आठ बॅरेक असून, प्रत्येक बॅरेकसमोर ६ वेगळे विभाग आहेत. मुलींचा वेगळा विभाग असून, मुख्यद्वारात तीन कार्यालये आहेत.

संरक्षण भिंतीची उंची पाच फुटांपर्यंत वाढवण्यात येणार असून, लवकरच काम पूर्णत्वास पोहचले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. निधी उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.

- के. बी. भुसारे, प्राचार्य, ब्रोस्टल स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकडो हातांकडून माणुसकीचे दर्शन 

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून येथील विवेकानंद केंद्राचे संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. सुरेश शास्त्री यांनी 'हवे असेल ते घेवून जा...नको असेल ते देऊन जा' असा संदेश देणाऱ्या माणुसकीच्या भिंतीचे नुकतेच लोकार्पण केले. याविषयीचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाली आणि शहरातील शेकडो हातांनी या उपक्रमात भरभरून दान देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

डॉ. सुरेश शास्त्री यांनी कॅम्प रोडवरील टिपरे कॉलनी येथील आपल्या दवाखान्याबाहेर ही माणुसकीची भिंत उभारली आहे. 'शिवभावे जीवसेवा', या श्रद्धेतून कोणताही अनौपचारिक उद्घाटन सोहळा न करता त्यांनी समाजातील वंचितांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे . शिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी या सामाजिक उपक्रमास सुरुवात केली. घराबाहेर असलेल्या जागेवर त्यांनी छोटासा बोर्ड लावून त्या बाजूला एका क्रेट ठेवला आहे.

आपल्या सुस्थितीतील जास्तीच्या वस्तू, गरजूपर्यंत सन्मानाने पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे ही माणुसकीची भिंत असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मालेगावकरांना केले होते. त्यांच्या या माणुसकीची भिंत उपक्रमाची बातमी 'मटा'त मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील दातृत्व असलेल्यांनी अनेक वापरण्याजोगे कपडे तसेच अन्य काही वस्तू येथे जमा केल्या आहेत.

समाजात आजही माणुसकीची भावना शिल्लक आहे. याचा प्रत्यय आम्ही सुरू केलेल्या माणुसकीची भिंत उपक्रमात येत आहे. 'मटा'ने याची दखल घेतल्याने देणाऱ्यांचा ओघ वाढला असून आम्ही भारावलो आहोत. समाजातील वंचिताना याचा लाभ होईल असा विश्वास आहे. - डॉ. सुरेश शास्त्री, मालेगाव



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४७ कोटींना लावला चुना

$
0
0

जादा व्याज, परतावा देण्याचे आमिष पडले महागात

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : पैशाला पैसा जोडून सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मुळावरच घोटाळेबाज घाव घालीत आहेत. सन २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत घोटाळेबाजांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तब्बल १४७ कोटी रुपयांना चुना लावला. जादा व्याज किंवा कमीत कमी वेळेत परतावा देण्याचे आमिष या गुन्ह्यांच्या मुळाशी दडलेले दिसते. गुंतवणूकदार प्रयत्न करून पाहतात आणि त्यातच घोटाळाबाजांचा फायदा होतो.

गुंतवणूकदारांच्या खिशातील पैसा काढून घेण्यासाठी घोटाळेबाज वेगवेगळ्या शक्कल लढवतात. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असेल तसेच फसवणुकीचा आकडा लाखांच्या घरात असल्यास असे गुन्हे तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले जातात. सन २०१६ मध्ये या शाखेकडे अवघे चार गुन्हे होते. त्यात, उपनगर पोलिस स्टेशनला दाखल असलेला एचबीएन कंपनीचा घोटाळा, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेला समृध्दी जीवन मल्टी स्टेट कंपनीचा घोटाळा, फडणीस ग्रुप, तसेच हाऊस ऑफ इन्व्हस्टेमेंटसचा समावेश होतो. यात चार गुन्ह्यातच गुंतवणूकदारांचे ७१ कोटी ७१ लाख ६३ हजार ८७० रुपये गुंतून पडले. सन २०१७ मध्ये आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण आणखी वाढले. या वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे १३ गुन्हे वर्ग झाले. या गुन्ह्यात संशयित घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांना ७५ कोटी २९ लाख १४ हजार ६९ रुपयांना गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होणे, मालमत्तांचा शोध होऊन ती जप्त होणे, तसेच कोर्टाच्या आदेशाने मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणे, ही मोठी आणि किचकट प्रक्रिया ठरते. यात किती वर्ष खर्ची पडतात, हे सांगता येणे शक्य नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी, हेच महत्त्वाचे असल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले. मगर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका संस्थाचालकास ताब्यात घेतले. या संस्थाचालकाने २७ हजार नोकरी देण्याबाबत जाहिरात दिली होती. अर्ज सादर करताना ३९९ रुपये भरावे लागणार होते. नोकरी मिळेल या अपेक्षेने ५० हजार व्यक्तींनी पैसे भरले असते आणि पुढे काहीच झाले नसते तर हा घोटाळा दोन कोटींच्या घरात पोहचला असता. व्यक्तीनिहाय विचार केला तर ३९९ रुपयांची किंमत फार दिसत नाही. तेच मात्र एकत्रित विचार केला तर हा आकडा मोठा दिसतो. प्रत्येक घोटाळ्याची सुरुवात याच पध्दतीने होते. जादा व्याजाचे आमिष किंवा कमी वेळेत मोबादला देण्याच्या बहाण्याने घोटाळ्यास सुरुवात होते. अशा गुन्ह्याचा तपास करणे हे देखील एक आव्हान असते. तांत्रिक दृष्टिकोनातून पुरावे संकलीत करणे आवश्यक असल्याने तपास कामात वेळ जात असल्याचे पोलिस उपायुक्त मगर यांनी स्पष्ट केले.

वर्ष -२०१६

कंपनी वा गुन्ह्याचे नाव - पोलिस स्टेशन - घोटाळ्याची रक्कम

एचबीएन कंपनी - उपनगर - ५०, ३७,०००

समृद्धी जीवन - मुंबई नाका - ३६, ४०, ६५५

फडणीस ग्रुप ऑफ कंपनी - मुंबईनाका - २८,२५,९९,०००

हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट - गंगापूर - ४२,५८,८७,२१५

वर्ष -२०१७

कंपनी वा गुन्ह्याचे नाव - पोलिस स्टेशन - घोटाळ्याची रक्कम

पॅनकार्ड क्लब - पंचवटी - ४,१५,८२,७६२

अन्नपूर्ण फायनान्स - सातपूर -४,००,०००

डीवाईन इम्पेक्स कंपनी - नाशिकरोड-१,२५,०००००

साई पादुका एक्सपोर्टस् - आडगाव - २२,६७,१५०

सुनंदा कन्सलटंट - सरकारवाडा - ४४,०००००

विश्वकर्मा बँक - सरकारवाडा - २,५६,३५,६१०

हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट - उपनगर - ५,३०, ०००

कार्पोरेशन बँक - अंबड - १,१२,११,७६७

महागायत्री मार्केटिंग - सरकारवाडा - ९,११,८०,०००

बँक फसवणूक - गंगापूर - ५१,४३,८३,७८०

बनावट डॉक्युमेंटस - सरकारवाडा -१,७९,२८,०००

स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर - गंगापूर - ९२,०००००

अॅक्सिस बँक कर्जप्रकरण - सरकारवाडा - २,१६,९५,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये चोरी अन् नेपाळमध्ये हॉटेल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,

चोरटे फारतर स्वत:ची उपजिविका भागविण्यासाठी चोरी करीत असावीत असा सर्वसामान्यांचा समज असतो. परंतु, नाशिक शहरात घरफोड्या करून एका अट्टल चोरट्याने नेपाळमध्ये दोन हॉटेल खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अन्य एक रेस्टॉरंट खरेदी करता यावे, यासाठी तो पुन्हा चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये आला. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गणेश भंडारे असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

चोरी करून धंदे थाटणे असे अनेक चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. रिल लाइफमधील या प्रकाराचा रियल लाइफमध्ये अनुभव येत असतो. असाच प्रकार नाशिकमध्येही घडला. गणेश भंडारे याने नाशिकमध्ये चोरी करून नेपाळमध्ये चक्क दोन हॉटेल सुरू केले. मात्र, अतिहव्यासामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात फसला. नाशिकमध्ये झालेल्या घरफोड्यांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. अटक केल्यानंतर त्याच्याकडून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे अर्धा किलोहूनही अधिक वजनाचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

टागोरनगरमधील भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते. ३० ऑक्टोबर २०१६ रोजी ही घटना घडली होती. संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु, तो येथून पसार झाला. तो नेपाळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक नेपाळमध्ये गेले. परंतु, तो हाती लागला नाही.

संशयित भंडारे नाशिकमध्ये आल्याची खबर गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकच्या पथकाने सीबीएस परिसरामध्ये सापळा रचला. या परिसरात आलेल्या भंडारे याला शिताफीने अटक करण्यात आली. उपनगर हद्दीमध्ये दोन, तर गंगापूर हद्दीमध्ये एक अशा तीन घरफोड्या केल्याची माहिती त्याने तपासात दिली आहे.

साने पॉलिश करून देणाऱ्यालाही अटक

चोरीचे सोने पॉलिश करून देणाऱ्या मुंबईतील दीपक देवरुखकर या संशयितालाही पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून या तीनही घटनातील १३ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता निरीक्षक आनंदा वाघ यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याची रवानगी कोठडीत झाली आहे.

रिसॉर्ट खरेदीचा प्लॅन फसला

संशयित भंडारे याने नेपाळमधील एका युवतीशी विवाह केला आहे. नेपाळमधील पोखरा येथे त्याने चोरीच्या पैशातून दोन हॉटेल्स खरेदी केले आहेत. त्याला आणखी एक रिसॉर्ट खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळविला. परंतु, तो नाशिकमध्ये आल्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने त्याचा रिसॉर्ट खरेदीचा प्लॅन फसला आहे. गणेश भंडारे हा मूळचा सांगली येथे राहणारा आहे. सांगली येथील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर चोरीचा पहिला गुन्हा दाखल झाला. नाशिकमध्येही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलमार्फत त्याची माहिती नेपाळला कळविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार प्रकरणाचे पडसाद

$
0
0

चिमुकलीवरील घटनेनंतर दोंडाईचा बंद; आरोपीला अटकेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्ञानोपासक शिक्षण संस्थतील नूतन माध्यमिक विद्यालयात पाचवर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरनाचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोडाईचा कडकडीत बंद पाळला. दरम्यान, बंदला कोणतेही गालबोट न लागता बंद शांततेत पार पडला.

दोंडाईचा शहरात पहिल्यांदाच दुपारी साडेचार वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यास मिळाला. यावरून घटनेच्या प्रती शहराच्या नागरिकांमध्ये असलेली चीड लक्षात येते. पोलिसांनी तातडीने त्या नराधमास अटक करावी अशीच मागणी दुकानदारांनी केली आहे. दुकाने, भाजीपाला, व्यापारी व अन्य सर्व व्यवहार बंद होते. चीड आणणाऱ्या या निंदनीय घटनेचा निषेधार्थ पाळलेला बंद अभूतपूर्व होता.

दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात बालवाडीत शिकणाऱ्या बालिकेवर अज्ञात नराधमाने दि. ८ फेब्रुवारीला अमानूष अत्याचार केला होता. ही घटना चव्हाट्यावर आणू नये , पोलिसांत तक्रार देऊ नका. यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमकविण्यात आले. परंतु, नातेवाईकांचा प्रयत्नाने जळगावात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. अज्ञात अत्याचारीविरोधात व संस्थाचालक माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख , डॉ. रवींद्र देशमुख, महेंद्र पाटील, प्रतीक महाले, नंदू सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शिक्षक महेंद्र पाटील यास अटक केली असून, त्यास तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांच्या मनात आक्रोश

या घटना नोंद होऊन बारा दिवस उलटूनही अद्याप अन्य संशयित फरार आहेत. या मोकाट आरोपींचा शोध घ्यावा. यासाठी बुधवारी (दि. २१) दोंडाईचा बंद पाळण्यात आला. बालिकेवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद दोंडाईचासह अन्यत्र पडत असून, बालिकेचे पालक या घटनेने घाबरून गेले आहेत. याचा नागरिकांच्या मनात मोठा आक्रोश असून, यामुळेच दोंडाईचात पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवारी (दि. २०) दोंडाईचात विशाल मूक मोर्चा काढून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेंदू हा सर्वात रहस्यमय अवयव

$
0
0

डॉ. महेश करंदीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयवांपेक्षा अतिशय रहस्यमय अवयव आहे. मेंदूची रचना सारखी असली तरी प्रत्येकाच्या मेंदूचे कार्य वेगळ आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांची संख्या वाढली असून विसरभोळेपणा हा त्यातील एक आजार समोर येत आहे. मेंदू निरोगी नसण्याचे हे लक्षण असून शरीराचा हा भाग निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेंदू व मज्जारज्जू शल्यविशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी केले.

मेमरी क्लब संस्थेतर्फे 'मानवी मेंदू - रहस्य आणि आरोग्य' या विषयावर डॉ. महेश करंदीकर यांचे शंकराचार्य संकुल येथील नानासाहेब ढोबळे सभागृहात व्याख्यान झाले. मेंदूची रचना ही लहान मेंदू व मोठा मेंदू अशी असते. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक, निर्णय क्षमता या बाबी तर उजवा भाग हा मन, भावनिक, कला, चिंता या बाबी सांभाळत असतो. या दोन भागांमधील असंतुलन आजारांचे मुख्य कारण ठरत असते. अर्धशिशी हा आजारही या असंतुलनामुळे होत असल्याने दोहोंमधील सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहे. आजकाल तरुणांमध्ये अस्थिर मनामुळे अनेक मोठमोठे आजार होत आहेत. अस्थिर मनामुळे प्रतिकार करणाऱ्या पेशींवरही परिणाम होत असून कॅन्सरसारखे गंभीर आजारही अगदी सहजतेने बळावत आहेत, असे डॉ. करंदीकर यांनी सांगितले.

आपली छोटछोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होत असेल, शरिरात सगळीकडे दुखणं, कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही ही भावना, कशातच मन न रमणे, उगाचच थकवा, बैचेनी, उदास वाटत असेल तर हे आजारी मेंदूचे लक्षण आहे. मेंदूला निरोगी बनवण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. यामध्ये मन शांत करणे, योगा, व्यायाम, चांगला आहार, हासणे, छंदांची जोपासणा, वर्तमानात जगणे अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच उलटं चालणे, डाव्या हाताची कामे उजव्या हाताने व उजव्या हाताची कामे डाव्या हाताने करणे, पेपर उलटा धरून वाचण्याचा प्रयत्न करणे अशा मेमरी गेम्सचाही सुदृढ मेंदूसाठी फायदा होत असल्याने या बाबी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिल्या. रागिणी किणीकर यांनी प्रास्ताविक केले. संजिवनी कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् ‘तिची’ झाली बालविवाहातून सुटका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणाच्या हक्काची गरज, बालविवाहाला चाप या बाबी पुढील पिढी सक्षम बनविण्यासाठी आवश्यक असल्या तरी अद्याप समाजातील अनेक घटकांमध्ये याबाबत योग्य जागरुकता नसल्याचे दिसून येते. अशी अनेक उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. बुधवारीही अशीच घटना उघडकीस आली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी येथील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील कुटूंब मुलीकडे लक्ष देण्यास कोणी नसल्याचे कारण पुढे करत तिची लग्नगाठ बांधायला निघाले होते. मुलीच्या सजगतेमुळे व 'चाकं शिक्षणाची' या सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे हा डाव हाणून पाडण्यात यश आले असून, मुलीची सुटका करण्यात आली आहे.

सुनीता (नाव बदलले आहे) इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी. वज्रेश्वरी झोपडपट्टीत तिचे तिच्या कुटुंबियांसमवेत राहते. तिचा विवाह बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील मोतीनगरमध्ये कोळपेवाडी येथे राहणाऱ्या मुकेश नारायण शिंगडे या रिक्षाचालकासोबत ठरवण्यात आला होता. 'चाकं शिक्षणाची' या संस्थेच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दोन वर्षांपूर्वी सुनिता ही शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होती. तिच्याशी चर्चा केली असता सौंदाणे, मालेगाव येथील आश्रमशाळेत भीषण पाणी टंचाईमुळे शाळा अर्धवट सोडून ती नाशिकला आली. तिला पुन्हा शाळेत जाण्यास प्रोत्साहन देत पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे तिला शिक्षणाची गोडी निर्माण झाली;Ḥ परंतु आई-Ḥवडील दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने व पर्यायाने मुलीकडे लक्ष देण्यास घरी कोणी नसल्याने सुनीताचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. परंतु, सुनीताची या विवाहाला मान्यता नव्हती. तिने वेळीच सजगता दाखवत 'चाकं शिक्षणाची' संस्थेच्या फिरत्या शाळेत येऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत भामरे यांना भेटून विवाह थांबवण्याची विनंती केली आणि त्यानुसार प्रक्रिया संस्था व पोलिस यंत्रणेकडून सुरू झाला.

\Bअसा रोखला विवाह

\B'चाकं शिक्षणाची' संस्थेचे हेमंत भामरे व शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सुनीताचा विवाह थांबण्यासाठी आखणी केली. बालविवाह रोखण्यासाठी प्रथम नाशिकमधील महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्वरीत पोलीस उपअधिक्षक अरुंधती राणे यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षक ऑफिसला फॅक्स करण्यात आला. अहमदनगर एसपी ऑफिसने वर पक्षाकडील लोकांना नोटीस देऊन, तसेच प्रत्यक्ष बोलावून लग्न रोखत असल्याचे लेखी लिहून घेतले. त्यामुळे बुधवारी (दि. २१ फेब्रुवारी) होणारा हा बालविवाह रोखण्यात यश आले.

\B

\Bसुनीताचा बालविवाह रोखल्यामुळे ती पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. आमच्या शाळाबाह्य सर्वेक्षणात शाळाबाह्य मुलींचे प्रमाण मोठे आहे व मुली शाळाबाह्य होण्याचे प्रमुख कारण बालविवाह हा आहे. आजही भारतात तेरा दशलक्षांहून अधिक मुलींचे बालविवाह होतात. त्यातील एक मुलगी वाचवण्यात यश आले.

- सचिन जोशी, 'चाकं शिक्षणाची'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’ची धमाल आता नाशिकरोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासून सुटका करून घेण्याची संधी येत्या रविवारी नाशिककरांना 'हॅपी स्ट्रीट' या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा, जेलरोड येथे येत्या रविवारी (दि. २५ फेब्रुवारी) सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिकरोड येथील रहिवाशांची सकाळी हॅपी होणार आहे.

नेहमीच वाहतुकीने गजबजलेले रस्ते आपल्यासाठी खुले होणे, हा विचारच आपल्याला सुखावून जातो. त्यातच या रस्त्यांवर विविध खेळ, उपक्रम, डान्स, गाणी होणार असतील तर त्याची मजाच न्यारी असते. हीच मजा हॅपी स्ट्रीटमधून अनुभवण्यास मिळत असल्याने हा उपक्रम नेहमीच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये कॉलेजरोड व गोविंदनगरमधील हॅपी स्ट्रीटला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता वेळ आहे नाशिकरोड, जेलरोडवासियांना हॅपी करण्याची. येत्या रविवारी ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून झुम्बा, स्केटिंग, मेहंदी, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन असे अनेक कलाप्रकारांचे सादरीकरण यावेळी विविध ग्रुप्सतर्फे सादर केल्या जाणार आहेत. तसेच पहिल्या दोन हॅपी स्ट्रीटला धमाल केलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे नाशिकरोडलाही येणार असून त्याला भेटण्याचीही संधीही यावेळी मिळणार आहे.

जिंका सरप्राइज गिफ्ट

यावेळी महाराष्ट्र टाइम्स हॅप्पी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यासाठी 'स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक' या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरच फोटो तुम्हाला सिटिझन रिपोर्टरच्या अॅपवर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. 'हॅपी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी'या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्यांचे नाव पाठवायचे आहे. विजेत्या सोसायट्या तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे याच्या हस्ते सरप्राइज गिफ्टही मिळू शकते.

इच्छुकांना संधी

हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३ - ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी पेपरला पकडले १४ कॉपीबहाद्दर

$
0
0

बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; संवेदनशील केंद्रावर नजर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नाशिक विभागात १४ कॉपीबहाद्दर भरारी पथकांना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये ८९ केंद्रांवर सुमारे ७४ हजार परीक्षार्थी पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला सामोरे गेले. नाशिक विभागात चार जिल्ह्यांमधून १ लाख ६८ हजार विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. सोलापूरमध्ये व्हॉट्सअॅपवरून इंग्रजीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे वृत्त असले तरीही नाशिक विभागात असा कुठलाही प्रकार आढळला नसल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यंदाच्या परीक्षेत पारदर्शकता वाढविण्यावर बोर्डाने भर दिला आहे. यासाठी वर्गामध्ये मर्यादित आसन व्यवस्थेसह संवेदनशील केंद्रांचे स्थलांतर आणि वर्गातच प्रश्नपत्रिकेचे पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने फोडण्याचा नियम आदी बाबींमुळे पहिल्या पेपरला कॉपीबहाद्दरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात बोर्डाला यश मिळाले आहे. विभागात नाशिक जिल्ह्यात भरारी पथकांनी ३ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली. धुळे जिल्ह्यातून ५, जळगावमधून ६ कॉपीबद्दरांवर कारवाई करण्यात आली. विभागात ही संख्या १४ आहे. विशेष बाब म्हणजे यंदा भरारी पथकांची संख्या वाढूनसुध्दा नंदुरबार या कॉपीबाबत बदनाम जिल्ह्यात पथकांच्या हाती एकही कॉपीबहाद्दर पहिल्या दिवशी लागला नाही.

बारावीच्या पेपरमुळे शहरात सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग दिसून आली. पाल्याच्या परीक्षेसाठी अनेक पालकांनी नोकरी-व्यवसायातून सुटी काढत पाल्यासोबत परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. वेळेच्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाण्याच्या स्पष्ट सूचना बोर्डाने दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. अनेकांनी खासगी वाहनाने पाल्यांना सोडत तर अनेकांनी रिक्षा आणि बससेवेचा पर्याय निवडत परीक्षा केंद्र गाठले. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी मध्यम असल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारास्त्र कायम

बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असली तरीही कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारावर ठाम आहेत. शासनाने लेखी आश्वासने देऊनही कनिष्ठा महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रास्त मागण्याही विचारात घेतलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ प्राध्यापकांचा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सचिव प्रा. संजय शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांना अस्वच्छतेचे ग्रहण

$
0
0

ठेकेदाराकडे वाहने धुण्याची व्यवस्था नाही; कर्मचाऱ्यांसह रहिवासी हैराण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या घंटागाड्यांना अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून या घंटागाड्या धुण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेरून चकाचक दिसणाऱ्या घंटागाड्या आतून अस्वच्छ असल्याने आरोग्य विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची अभिनव योजना सुरू केली. यामुळे रस्त्यांवर घाण, कचराचे प्रमाण कमी झाल्याने सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यातच नव्याने महापालिकेने घंटागाड्या खरेदी करून वाढलेल्या परिसरात योग्य कचरा संकलन करण्याची व्यवस्था केली. मात्र नवीन घंटागाड्यांच्या अस्वच्छतेने नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे.

विकसित होत असलेल्या व स्मार्ट सिटीचे नामांकन मिळालेल्या नाशिक महापालिकेने नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवत नाशिककरांना स्वच्छतेचा संदेश दिला होता, असे असतानादेखील उघड्यावर घाण, कचरा टाकला जात असल्याने दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्याच अस्वच्छ असल्याने परिसरात जातांना दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात रोजच घंटागाडीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडे जाब विचारणार

अगोदरच घंटागाडी ठेकेदाराकडून गमबूट, मास्क व सुरक्षा साधने व्यवस्थित दिली जात नाहीत. यात आता अस्वच्छ घंटागाड्यांचा त्रासही कर्मचाऱ्यांना सहन करण्याची वेळ येते. अनेकदा कर्मचारी आरोग्य विभागाकडे तक्रारी करत असतात. मात्र याकडे आरोग्य अधिकारी कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. काही घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सातपूरच्या सभापती माधूरी बोलकर यांच्याकडेच अस्वच्छ असलेल्या घंटागाड्यांबाबत समस्या मांडल्या. त्यावर सभापती बोलकर यांनी तत्काळ प्रशासनाकडे जाब विचारणार असल्याचे सांगितले. किमान आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा घंटागाडी धुण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

घंटागाडीत काही मिनिटे बसावे

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ काही मिनिटे घंटागाडीत बसून पहावे, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. नागरिकांच्या घरातील घाण, कचरा संकलन करताना अगोदरच अथक अडचणींचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यातच अस्वच्छ असलेल्या घंटागाड्यांमध्ये उभे राहणे जणू शिक्षकाचा असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

गणवेश बदलण्यासाठी जागाच नाही

महापालिकेच्या सातपूर विभागात क्लब हाऊसवर घंटागाड्या लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागातील कर्मचारी रोज या क्लब हाऊसवर येत घंटागाडी नेत असतात. परंतु, या कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी गणवेश बदलण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. ठेकेदाराने वर्षभरापासून दोन शेड क्लब हाऊसवर उभारले आहेत. परंतु, ते आजही बंद स्थितीत पडून असलेले पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांना मिळाला दोन महिन्यांनंतर ‘आधार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आधार कार्ड ही देशातील नागरिकांची महत्त्वाची ओळख झाली असून, देवळालीतील शालेय व कॉलेजियन विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा यांसारख्या कामांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रं. चारच्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याबाबत या वॉर्डच्या नगरसेविका आशा गोडसे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार देवळालीत आधार कार्ड नोंदणी शिबिर सुरू केले आहे.

येथील गुरुद्वारा रोडवर असणाऱ्या कॅन्टोन्मेंट संयुक्त प्राथमिक संकुलात बुधवार (दि. २१) पासून सकाळी ११ ते ५ या वेळेपर्यंत आधार नोंदणी करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या ही बाब नजरेस आणून देऊनदेखील त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोडसे व बोर्डाच्या नगरसेविका आशा गोडसे यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयातून एक आधार नोंदणी मशिन उपलब्ध करून दिले आहे. देवळालीत ५० हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी हे आधार केंद्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने सुरू केले असून, शालेय प्रवेश, वाहन परवाना व इतर आवश्यक परवान्यांसाठी आधार अनिवार्य असल्याने लोकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांसाठी काही मशिन उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र ते न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगाव खरेदी विक्री संघासाठी चौदा जण रिंगणात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीकरिता ११ वैयक्तिक जागांवर १४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर सहा राखीव जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी व दिंडोरीचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी दिली.

संघाच्या सहकारी संस्था मतदार संघात नितीन घोटेकर, स्री राखीव मतदार संघात निर्मला मेमाणे व मथुराबाई दरेकर तर इतर मागास प्रवर्गासाठी किशोर दरेकर , भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात शांताराम नागरे तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघात धोंडीराम धाकराव हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

वैयक्तिक मतदार संघाच्या ११ जागांकरिता नानासाहेब पाटील, प्रकाश कापडी, शंकरराव कुटे, अनिल घोटेकर, विश्वास घोटेकर, जनार्दन जगताप, बळीराम जाधव, शिवाजी जाधव, दत्तात्रेय डुकरे, मधुकर दरेकर, प्रमोद पाटील, लक्ष्मण बडवर, सुरेश रायते व अनिल शिंदे हे चौदा उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहे. लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळास शासनाने दिलेली मुदतवाढ २८ जानेवारी रोजी संपली आहे. निवडणूक प्रक्रिया २९ जानेवारी पासून सुरू झाली आहे. 'नाफेड'चे संचालक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ गेल्या दहा वर्षांपासून सत्तास्थानी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाजनांकडून आत्महत्याग्रस्तांची अवहेलना

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी धर्मा पाटील यांचा बळी गेला. त्यामुळे आता आत्महत्यांचे सत्र थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. यावर मंत्रालयात आत्महत्या केल्याने प्रसिद्धी मिळते, असे विधान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी करीत आत्महत्याग्रस्तांची अवहेलना केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केला. ते बुधवारी (दि. २१) हल्लाबोल यात्रेदरम्यान जळगावला आयोजित पत्रकार परिषदेत बोलता होते. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत हल्लाबोल सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आमदार सुनील तटकरे हे जळगाव दौऱ्यावर होते. हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा असून, चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात यात्रा काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शिवसेनाही सत्तेत सहभागी राहून भाजपवर टीका करीत आहे. त्यामुळे राज्यात भाजप आणि शिवसेनेचा ‘बिन पैशाचा तमाशा’ सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकारला घेरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाकडुन धार्मिक धृवीकरणाचा डाव रचला जात असुन धर्मनिरपेक्ष शक्ती त्यास थोपविल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपसाठी खडसेंचे मोठे योगदान

राज्यात स्व. गोपीनाथ मुंडे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली. मात्र याच भाजपने आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय केल्याने ‘घर के ना घाटके’ अशी त्यांची परिस्थिती केली आहे, असेही तटकरे म्हणाले. आमदार खडसेंबद्दल आमच्याच काय पण इतरही पक्षातील नेत्यांना सहानुभूती असल्याचेही आमदार तटकरे म्हणाले. मंत्रिपद मिळण्यापूर्वी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपविरोधात रान पेटविले होते. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील हे बंदिस्त झाल्याची टीकाही आमदार तटकरे यांनी केली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पक्षातील ज्या सदस्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांच्यावर पक्षीय कारवाई करणारच अशी माहिती तटकरे यांनी दिली.

सत्तेचे ‘तण’ नांगराने उध्वस्त करूया

राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेचे सत्तेच्या रुपाने ‘तण’ निर्माण झाले आहे. ते तण बळीराजाच्या नांगराने पूर्णपणे उद्ध्वस्त करूया, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धरणगावच्या जाहीर सभेत केले. बुधवारी (दि. २१) धरणगावच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बळीराजाचे प्रतीक नांगर देण्यात आला. याच नांगराचा मुद्दा पकडत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. बळीराजाचा नांगर खांद्यावर घेतला आहे. येणाऱ्या काळात बळीचे राज्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवो, अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

सरकारवर आता बोंडअळी आणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून घेत होते. आता या चौकीदाराला बदलण्याची वेळ आहे. देशात चोऱ्या होत असताना अशा चौकीदाराचा काय उपयोग, त्यामुळे आता चौकीदार बदलण्याची नांदी धरणगावातून करूया, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शेतकऱ्यांच्या कापसावर जशी बोंडअळी आली तशी बोंडअळी सेना-भाजप सरकारवर आणा आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आदादार सुनील तटकरे यांनी सभेत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री रावल यांच्याकडून पीडितेची विचारपूस

$
0
0

जळगावात महिला संघटनांसोबत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गेल्या आठवड्यात दोंडाईचा येथील शाळेत पाचवर्षीय बालिकेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील पीडित चिमुकलीची बुधवारी (दि. २१) पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात विचारपूस केली. या वेळी रावल यांनी दोंडाईचा येथील आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट पत्रकाराशी बोलताना केला.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या पाचवर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिला शाळेच्या मागे नेऊन अत्याचार केल्याची घटना दि. ८ फेब्रुवारीला घडली होती. या चिमुकलीला उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर ही घटना उघडकीस आली आली होती. पर्यटन मंत्री जयकुमार रावल बुधवारी (दि. २१) जिल्हा रुग्णालयास सकाळी अकरा वाजता येऊन पीडित मुलीची विचारपूस करून कुटुंबीयांशी चर्चा केली. या वेळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार अमोल निकम, भगत बालाणी, नगरसेवक सुनील माळी आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध महिला संघटना आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांची भेट घेऊन शाळेची मान्यता रद्द करण्याची, शालेय विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे, शाळेतील सुरक्षा वाढविण्याबाबत कठोर नियम करावे, अशा विविध मागण्या यावेळी केल्या.

पीडितांच्या कुटुंबीयांवर दबाव

दोंडाईचा येथील याच शाळेतील एका मुलीवर १५ जानेवारीला बळजबरी पळवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या मुलीच्या पालकांवर दबाब आणण्यात आल्याने ते प्रकरण दडपण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेला जबाब, तिच्या पालकांचे म्हणणे असलेली व्हिडीओ क्लीप मंत्री रावल यांनी दाखवली. धुळे क्राईम ब्रॅन्चचे पथक घटनेची चौकशी करत असून, आरोपींना पकडले जाईल. या घटनेवर माझे लक्ष असून, कुटुंबीयांवर दबाव येत आहे. त्यांना सुरक्षा पुरविली जाईल, असे मंत्री रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसमचे पात्र चकाचक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराच्या मध्यातून जाणारी मोसमनदी कधीकाळी मोक्षगंगा म्हणून ओळखली जात होती. आज मात्र या मोसमला गटारीचे स्वरूप आले आहे. मोसम नदीला आलेली अवकळा दूर व्हावी, नदीचे रूप पालटावे या उद्देशाने 'एक दिवस मोसमनदी साठी' हा उपक्रम बुधवारी हाती घेण्यात आला. या उपक्रमाच्या निमित्ताने मोसम नदी स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविण्यात आली. दिवसभर राबविण्यात आलेल्या या नदी स्वच्छता मोहिमेत सुमारे साठ टन कचरा उचला गेला. यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह महसूल, पालिका व पोलिस प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी थेट नदीपत्रात उतरले. लोकप्रतिनिधी, प्रशासन व मालेगावकर जनतेने ठरवले तर मोसमनदीला तिचे गतवैभव प्राप्त करून दिले जाऊ शकते हा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मोसमनदी पत्रात वाढते शहरीकरण, कारखानदारी या सगळ्यामुळे हजारो टन कचरा, दूषित पाणी, रसायने सर्रास सोडली जात आहेत. त्यात नदीकाठालगत ठिकठिकाणी अतिक्रमणे झाल्याने नदीपात्र एका नाल्यासारखे झाले आहे. नदी पत्रातील अस्वछतेने शहराला आरोग्याच्या समस्या देखील भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील पालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील कॅम्प गणेश कुंड, द्याने फारशी पूल, हॉस्पिटल पूल, मोसमपूल, आंबेडकर पूल ते अल्लामा एकबाल पूल या दरम्यान ठिकठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी पालिका व क्रेषर संघटनेचे ९ जेसीबी मशिन व ८ ट्रॅक्टर वापरण्यात आले.

महसूल प्रशासनाच्या वतीने कॅम्प गणेश कुंड ते द्याने फरशी पुलादरम्यान नदी पत्रातील सुकलेले गवत, प्लास्टिक गोळा करण्यात आले. फरशी पुलानजीक स्वतः तहसीलदार ज्योती देवरे यांनी जेसीबीचा ताबा घेत पानवेलीत अडकलेला मोसमचा प्रवाह मोकळा केला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह ५०० कर्मचारी यात सामील झाले. सामान्य रुगणालय ते मोसम पूलदरम्यान मोसमनदी पात्रातील कचरा मालेगाव पोलिस दलाच्या वतीने उचलण्यात आला. सुमारे २० पोलिस अधिकारी व १५० हून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले. नदी पत्रातील कचरा, झुडपे हटविण्यात आली.

पालिका प्रशासनाकडून देखील मोसमपूल ते आंबेडकर पूलदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते. या मोहिमेत सहभागी झालेल्याना सुरक्षेसाठी हॅण्ड ग्लोज, मास्क देण्यात आले होते. गोळा करण्यात आलेला कचरा जेसीबीच्या सहायाने उचलून ट्रॅक्टरद्वारे बाहेर नेण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार दिवसभरात नदी पात्रातून सुमारे साठ टन कचरा उचलला गेला. या मोहिमेमुळे नदीचे अस्वच्छ रूप पालटण्यास निश्चितच हातभार लागला आहे.

दादा भुसे उतरले नदीपात्रात

या मोहिमेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे स्वतः नदी पात्रात उतरून या मोहिमेत सहभागी झाले. त्यांनी मोसमपूल ते आंबेडकर पुलादरम्यान आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासह पालिका प्रशासनासोबत कचरा उचलला. यावेळी भुसेंसह पालिका, पोलिस व महसूलचे अधिकारी स्वतः नदी पत्रात स्वच्छता करीत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

स्वच्छतेसाठी प्रशासनाची एकजूट

पालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरात मोसम नदी पत्राची व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राउत, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, आयुक्त संगीता धायगुडे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी एकजुटीने मोसमनदी पत्रात स्वच्छतेसाठी उतरले होते.

असे होता लवाजमा

९ जेसीबी, ८ ट्रॅक्टर, २० पोलिस अधिकारी, १५० हून अधिक कर्मचारी, पंचायत समितीचे ५०० कर्मचारी

अशी झाली मोहीम

कॅम्प गणेश कुंड, द्याने फारशी पूल, हॉस्पिटल पूल, मोसमपूल, आंबेडकर पूल ते अल्लामा एकबाल पूल येथे मोहीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर स्विप्ट अपघातात चार जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मुबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवार (दि. २१) रोजी दुपारी चार वाजता कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण जखमी झाले.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदे विक्री करून चांदवडच्या दिशेने जात असलेले ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी वळन घेत असताना चांदवडहून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने येणारी कार (एमएच १५ एएक्स २३५९) ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळली. यात बसलेले भास्कर सोनवणे, सारीका चौधरी, मोतीराम चव्हाण, जयश्री चव्हाण (सर्व रा. रेडगाव ता. निफाड) हे जखमी झाले. त्याच्यावर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपळगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

अपघातात दुचाकीस्वार ठार

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर माळेगाव फाट्याजवळ एल. ऍण्ड टी. कंपनीच्या गोडाऊनसमोर ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने पुढे उभ्या असलेल्या डम्परच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. बाळू पर्वत जोर्वेकर (वय ४३ रा. जोर्वे, ता. संगमनेर)असे मृताचे नाव आहे.

जोर्वेकर हे मोटारसायकलने (एमएच १७ के ८६५४) नाशिकच्या दिशेने जात असताना माळेगाव फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. जोर्वे पुढे उभ्या असलेल्या डम्परखाली फेकले गेले. तर ट्रकने उभ्या डम्परलाही धडक दिल्याने डम्पर जागेवरुन हलला व डम्परचे चाक जोर्वे यांच्या कमरेवरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नाशिकला हलविले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जोर्वेकर यांचे भाऊ अशोक जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात ‘भाविसे’चे आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपने मंगळवारच्या महासभेत भरमसाठ करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेकडून बुधवारी महापौरांच्या रामायण निवासस्थानाबाहेर आंदोलन करीत, भाजपविरोधी घोषणाबाजी केली. या करवाढीचा निषेध म्हणून भारतीय विद्यार्थी सेनेच्या युवकांनी रामायणाबाहेर घरपट्टीच्या बिलांची होळी केली. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी करीत, महासभेने मंजूर केलेली करवाढ मागे घेण्याची मागणी केली. करवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने प्रशासनाच्या भरमसाठ करवाढीच्या प्रस्तावाला बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवासी मालमत्तेत ३३ टक्के, अनिवासी मालमत्तेत ६४ तर औद्योगिक मालमत्तेत ८२ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी, उद्योजकांना त्याचा जबर फटका बसणार आहे. या करवाढीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही विरोध केला असून या पक्षांकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यापूर्वीच भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी महापौरांच्या रामायण या निवास्थानी जाऊन करवाढीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करीत, करवाढीचा निषेध म्हणून घरपट्टीच्या प्रतींची होळी करण्यात आली. विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख योगेश बेलदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. करवाढ मागे घेतली नाही तर भाजपच्या महापौर,आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असे बजावत यापुढे अधिक तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images