Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘व्हॅलेंटाइन डे’ फीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेब्रुवारी महिना सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते १४ तारखेच्या व्हॅलेंटाइन डेचे. आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट्स, गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस तरुणाईसाठी मोठ्या आकर्षणाचा असल्याने त्यादृष्टीने बाजारपेठाही सज्ज होत असतात. यंदाही तरुणाईला आकर्षित करतील असे गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, की-चेन्स, चॉकलेट्स, चॉकलेट बुके आदींनी बाजारपेठ सजली असून, हटके गिफ्ट्स घेण्याला तरुणाईकडून पसंती दिली जात आहे.

व्हॅलेंटाइन वीकचा प्रारंभ रोझ डेपासून झाला असून, व्हॅलेंटाइन डेपर्यंत हा वीक सेलिब्रेट केला जाणार आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे असे मानले जाते. अनेक जण प्रेम व्यक्त करण्यासाठी या स्पेशल डेची वाट बघत असतात. या दिवसाच्या आठवडाभरापूर्वीपासूनच व्हॅलेंटाइन वीकच्या माध्यमातून प्रेमाचा रंग तरुणाईवर चढत असतो. यंदादेखील हा उत्साह दिसून येत असून, कॉलेजियन्समध्ये याचा उत्साह अधिक आहे. रोझ डेने या वीकला सुरुवात झाल्यानंतर शहरातील तरुणांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबपुष्प देत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवारी प्रपोज डे सेलिब्रेट करताना अनेक दिवसांपासून मनात ठेवलेल्या भावनांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून देण्यात आली.

वीक डेज् असे...

शुक्रवार (दि. ९) चॉकलेट डे, शनिवार (दि. १०) टेडी डे, रविवार (दि. ११) प्रॉमिस डे, सोमवार (दि. १२) हग डे, मंगळवार (दि. १३) किस डे आणि बुधवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे याप्रमाणे हा वीक सेलिब्रेट केला जाणार आहे.

चॉकलेट बुकेंची चलती

व्हॅलेंटाइन वीकअंतर्गत आज, शुक्रवारी (दि. ९) चॉकलेट डे सेलिब्रेट केला जाणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच आकर्षक पॅकिंगमधील चॉकलेटत्ची तरुणांकडून खरेदी केली जात होती. यात विशेषत: चॉकलेट बुके या प्रकाराला चांगली मागणी असल्याचे दिसून आले. हार्ट, टेडी शेपमधील चॉकलेट्सचा बुके विकत घेण्याला पसंती दिली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे मनपाच्या आवारात हाणामारी

$
0
0

वॉर्डातील समस्या मांडणाऱ्यास मारहाण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेत आपल्या वॉर्डातील नळ गळतीची तक्रार करणाऱ्या एका तरुणाला गुरुवारी (दि. ८) काँग्रेसचे नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलिसांकडून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणून नगरसेवक पुत्रांना ताब्यात घेतल आहे.

धुळे महापालिकेच्या आवारात गुरुवारी (दि. ८) ही हाणामारी झाल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील देवपूरातील प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसचे नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या भागातील रहिवासी तौसिफ खाटीक या तरुणाने आपल्या घराजवळील एका नादुरुस्त नळाच्या आणि पाणी गळतीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून इतर नागरिकांपर्यत पसरविला. तसेच गुरुवारी (दि. ८) तो व्हिडीओ नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या मोबाइलवर टाकण्यात आला. याबाबत तक्रारदार तौसिफ खाटीक यांनी पाणी गळतीवरून संताप व्यक्त करून पठाणांसोबत वाद घातला. त्याचवेळी पठाण यांच्या मुलांना हा प्रकार समजताच त्यांनी तौसिफ खाटीक यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी तत्काळ इतरांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला मात्र त्याचवेळी शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी तक्रारदार तौसिफ खाटीक व नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या तीनही मुलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी वाद घालणाऱ्यांना तंबी देऊन सोडून दिले.

कोट००
माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुविधांबाबत मी सदैव तत्पर असतो, मात्र नागरिकांनी तक्रारी थेट मला सांगायला हव्या. परंतु, त्यांनी सोशल मीडियावर समस्या मांडणे योग्य नाही, ती प्रत्यक्ष सांगितली तर मी लगेच समस्या मार्गी लावेल.
-इस्माइल पठाण, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिसरातील पाण्यावरच भागवा तहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि बागलाण तालुक्याच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या आतापासूनच जाणवत असून, स्थानिकांनी टँकरची मागणी केली आहे. त्यांची कैफियत समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रथम परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाकडून दिला जाऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

येवला तालुक्यातील पूर्वभाग आणि बागलाण तालुक्यातील दुर्गम भागामध्ये नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. गतवर्षी चांगला पाऊस होऊनही खडकाळ व मुरूमयुक्त जमिनीमुळे काही भागात पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकलेले नाही. त्यामुळे अशा भागात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विशेषत: येवला तालुक्यातील कोळम, कुसूमाडी, भारम, खैरगव्हाण, अहेरवाडी यांसारख्या काही गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केला. त्या अनुषंगाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री केली. त्याबाबतचे प्रस्ताव गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले. टँकरची मागणी नोंदविण्यात आली. परंतु जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यामुळे टँकर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांत त्रुटी काढून तो परत पाठविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. टॅँकर देण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील पाणी असलेल्या विहिरी शोधण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असून त्यामुळे ग्रामस्थांसह तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनाही अशा विहिरींची शोध घ्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्शवत शिवजन्मोत्सव सोहळ्याचा निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवजन्मोत्सव आदर्शवत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवजन्मोत्सवात मद्य पिणार नाही आणि कुणाला पाजणार नाही, अशी शपथच पंचवटी शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांना ही शपथ घ्यायला लावली.

बर्डेकर म्हणाले, की यावर्षीचा शिवजन्मोत्सव ज्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, त्यातून चांगला संदेश पोहोचणार आहे. ज्या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे, त्यातून खरा इतिहास वाचला जाऊ लागला आहे, याची जाणीव होत आहे.

सचिन पवार म्हणाले, की शिवजन्मोत्सव साजरा करताना कोणत्याही यंत्रणेवर ताण पडणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. देवांग जानी म्हणाले, की यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा करताना ज्या गोष्टी करण्यात येणार आहेत, त्या केवळ तोंडी न सांगता त्या प्रसिद्ध केल्या आहेत, ही खरोखर गौरवास्पद बाब आहे.

कोणताही उत्सव साजरा करताना त्यात मद्य पिणाऱ्यांची संख्या जास्त असते. आदर्शवत शिवजन्मोत्सव साजरा करताना त्यात दारूला कुठेही थारा दिला जाणार नाही, याची दक्षता पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी. त्यासाठी कुणीही मद्य पिणार नाही आणि कुणालाही पाजणार नाही, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. सचिन डोंगरे, नंदूभाऊ पवार, पद्माकर पाटील, माधवी पाटील, किरण पानकर, डॉ. गिरीश मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाभरात प्रबोधन

शिवजन्मोत्सवात या वर्षापासून वेगळा पायंडा पाडण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाभरात प्रबोधन करण्यात आले असून, शिवजन्मोत्सवासाठी कुणीही कुणाकडेही वर्गणी मागणार नाही. वर्गणीसाठी पावती पुस्तक छापण्यात येणार नाही, तसेच मिरवणुकीत डीजेही लावण्यात येणार नाही. रस्त्यावर स्टेज किंवा मंडप उभारण्यात येणार नूसन, सर्वांना सोबत घेऊन हा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती तुषार जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचा दणका, अधिकाऱ्याला घरी पाठवले

$
0
0

नाशिक:

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत साध्या ड्रेसवर आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला मुंढे यांनी बैठकीतून बाहेर काढले आणि त्यांना युनिफॉर्म घालून यायला सांगितले. मुंढे यांनी पहिल्याच दिवशी दिलेल्या या दणक्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिकेच्या सर्व प्रमुख अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजनही उपस्थित होते. मात्र महाजन हे अग्निशमन दलाचा ड्रेस परिधान न करता फॉर्मल ड्रेसवर आले होते. महाजन यांचं साध्या ड्रेसवर येणं मुंढे यांना खटकलं. त्यांनी महाजन यांना ड्रेस घालूनच बैठकीला यायला सांगितलं. त्यामुळे महाजन घरी गेले आणि अग्निशमन दलाचा ड्रेस परिधान करून आले.

मुंढे यानी सकाळीच महापालिकेत प्रवेश केला. बरोबर दहा वाजता तुकाराम मुंढे त्यांच्या दालनात हजर झाले होते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. आपल्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण पालिका इमारतीची पाहणी केली. पालिकेतील विविध खात्यांच्या कार्यालयांची पाहणी करत असताना त्यांना नळातून पाणी टपकत असल्याचा आवाज आला आणि त्यांनी मगे वळत नळ तातडीने बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आज झालेल्या बैठकीत मुंढे यांनी शहरातील समस्या आणि प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
62847761

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा बाजारभावाचा आलेख उंचावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लाल रांगडा कांदा बाजारभावात बुधवारी अचानक झालेल्या सातशे रुपयांच्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.९) लाल कांद्याच्या किमान, कमाल दरात दोनशे, तर सरासरी दरात पावणेदोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यापासून लाल रांगडा कांदा बाजारभावात पडझड होत होती. बुधवारी येवला बाजार समितीत अचानक तब्बल सातशे रुपयांची मोठी घसरण झाली होती. अचानक पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. काही संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोरील राज्य महामार्गावर अचानक 'रास्ता रोको'चा पवित्रा घेतला होता. बुधवारी येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ६२५ ते कमाल १८७५ (सरासरी १६७५) असा दर मिळाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील कांदा बाजारभावाने जवळपास बुधवारचेच पाढे गिरवल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निराशा होती. गुरुवारी येवल्यात कांद्याला किमान ८०० ते कमाल १७९५ (सरासरी १६७५) असा दर मिळाला होता. शुक्रवारी मात्र कांदा बाजारभावाने उचल खाल्ल्याने शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होण्यास मदत झाली. येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी साडेचारशे ट्रॅक्टरमधून सुमारे १९ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कांद्याला किमान १ हजार ते कमाल २ हजार (सरासरी १८५०) असा दर मिळाला. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शुक्रवारी कांद्याला किमान १ हजार ते कमाल २ हजार ९० (सरासरी १८००) असा दर मिळाला. याठिकाणी जवळपास चारशे पिकअप रिक्षामधून ५ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी येवल्यात कांद्याला मिळालेला दर हा बुधवार व गुरुवारच्या तुलनेत सरासरी दोनशे रुपयांनी अधिक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकाराने चे स्नॅचरचा डाव उधळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नवीन आडगाव नाका परिसरातून रिक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्याला नादात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली. मात्र, त्या ज्येष्ठ नागरिकाने प्रतिकार करीत चैनस्नॅचरला काठीने मारल्याने त्याच्या हातून चैन खाली पडली. ते बघून त्या चैनस्नॅचरने पळ काढला. शुक्रवारी (दि. ९) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ज्येष्ठ नागरिकाने दाखविल्या धैर्य आणि प्रतिकाराचे परिसरात कौतुक होत आहे.

नवीन आडगाव नाका परिसरातील स्वामी नारायण नगर येथे राहणारे विश्वनाथ शंकरराव घुगे (वय ८१) हे शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घरून निघाले. त्यांना काळाराम मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. ते घरासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांना त्या परिसरात दुचाकीवर दोन तरुण चकरा मारीत असल्याचे दिसले. दोन-तीन चकरा मारल्यानंतर ते दोघे घुगे यांच्याजवळ आले, त्यांनी आम्ही फायनान्स कंपनीकडून आलो असून, शिंदे कुठे राहतात अशी विचारणा केली. त्यावर घुगे यांनी शिंदे याठिकाणी राहत असल्याची खूण सांगितली. त्यानंतर त्या तरुणांनी मागचा बंगला कुणाचा असे विचारले. यासाठी घुगे यांनी मागे वळून बघताच त्या संधीचा फायदा घेत दुचाकीवरच्या एकाने घुगे यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची चैन ओढली. घुगे यांच्या लक्षात येताच त्यांच्या हातात असलेल्या काठीने त्याला मारण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या हाताने दुचाकीचा हॅण्ड धरला, त्या झटापटीत संशयितांनी चोरलेली चैन खाली पडली. त्या संशयितांनी लगेच तेथून पळ काढला. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पूजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ण गणवेशात या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढें यांच्या शिस्तबद्ध व काटेकोर स्वभावाचा पहिलाच झटका अग्निशमन दल विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांना बसला आहे. खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत उशिरा पोहोचलेल्या आणि अग्निशमन विभागाच्या गणवेशावर शोल्डर रँक कॅप नसलेल्या महाजन यांना मुंढे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. बैठकीला पूर्ण गणवेशात येण्याचे फर्मान काढले. महाजन यांनी धावतपळत बाहेर येऊन आपल्या गाडीतून शोल्डर रँक कॅप व टोपी घालत पुन्हा बैठक गाठली. त्यामुळे महाजन यांना पहिल्याच दिवशी शिकवलेला शिस्तीचा धडा इतरांसाठी आता इशारा ठरला आहे.

आपल्या नेहमीच्या शैलीत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे वेळेत येणार नाहीत, अशी खात्री होती. परंतु, मुंढे यांनी दहाच्या ठोक्याला मुख्यालयात गाठत व पदभाराचे सोपस्कार गाठत खातेप्रमुखांच्या बैठकीचे फर्मान सोडले. त्यामुळे सवय नसलेल्या अधिकाऱ्यांनी धावत पळत आयुक्त कार्यालय गाठत बैठकीला पोहचण्याचा प्रयत्न केला. मुंढे पदभार घेत असतानाच काही अधिकाऱ्यांची प्रवेशाची तयारी सुरू होती. मुंढेंनी बैठक सुरू केली तरी काही अधिकारी येतच होते. पहिलाच दिवस असल्याने मुंढे यांनीही आस्तेकदम घेतले. परिचय सुरू असताना मुंढे यांनी महाजन यांना पहिला दणका दिला. महाजन अगोदरच उशीरा आल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. महाजन यांनी अग्निशमन विभागाचा गणवेश परिधान केला असला तरी त्यांच्या खांद्यावर शोल्डर रँक कॅप व डोक्यावर विभागाची टोपी नव्हती. त्यामुळे मुंढेंनी त्यांना झापत पूर्ण गणवेशाबाबत विचारणा केली. त्यांना बैठकीतून बाहेर जाण्याचे सांगत, पूर्ण गणवेश परिधान करून येण्याची सूचना केली. धास्तावलेल्या महाजन यांनीही धावतपळत आपले वाहन गाठत, त्यातून शोल्डरँक कॅप आणि टोपी काढत पूर्ण गणवेश परिधान केला. त्यानंतर पुन्हा बैठकीकडे धाव घेत आतमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे महाजन यांना शिकवलेला शिस्तीचा धडा हा पहिल्याच दिवशी इतरांसाठी इशाराच ठरला आहे.

पदाधिकारी परतले

आयुक्त महापालिकेत दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी धावपळ सुरू केली होती. परंतु आयुक्त मुंढे यांनी प्रथम कामाला प्राधान्य देत, भेटीगाठी टाळल्या. मुंढे यांच्या स्वागतासाठी उपमहापौर प्रथमेश गिते आयुक्त कार्यालयात आले होते. परंतु तोपर्यंत आयुक्तांनी खातेप्रमुखांची बैठक सुरू केली. त्यामुळे गितेंना ताटकळत बसावे लागले. ही बैठक तब्बल अडीच तास चालल्याने उपमहापौरांना माघारी फिरावे लागले. स्वागतासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांना परतीचा रस्ता धरावा लागला. बैठकीनंतर आयुक्तांनी पदाधिकारी तसेच नगरसेवकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैशांच्या वादातून चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपीने तरुणावर चाकू हल्ला केला. ही घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिंबाजी रामभाऊ गोरनर (वय ३०, रा. श्रीकृष्णनगर, डीजीपीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. ८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोरनर कामटवाडा येथील मीनाताई ठाकरे शाळेजवळून जात होते. यावेळी तिथे आलेल्या संशयित शाहरूख शेख तसेच त्याच्या एका साथीदाराने गोरनर यांना थांबवून पैशांची मागणी केली. गोरनर यांनी पैसे देण्यास नकार देताच संतप्त झालेल्या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शाहरूखने आपल्या खिशातील छोटा धारदार चाकू काढून गोरनर यांच्या पोटावर वार केला. यात गोरनर जखमी झाले असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

पर्समधून मंगळसूत्र चोरी

कारमध्ये ठेवलेल्या पर्समधील मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील बिग बाझारजवळ घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण सत्यनारायणसिंग कुमार (रा. आईएसपी इस्टेट नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. प्रवीणकुमार आपल्या कुटुंबासह गुरुवारी (दि. ८) बिग बाझार येथे गेले होते. कुमार यांच्या पत्नी दिव्यासिंग यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र प्रवासात तुटल्याने त्यांनी ते काढून आपल्या पर्समध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून पर्समधील तुटलेले मंगळसूत्र चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

घरगुती गॅसचा वाहनासाठी वापर

घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून वाहनासाठी वापर करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. संजय किसन पुरकर (रा. शिवनेरी बंगला, श्रमनगर) आणि संदीप दत्तात्रेय जोशी (रा.माधव अपार्ट. लोखंडे मळा) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शिवनेरी बंगल्याच्या आवारात एका कारमध्ये (एमएच. १५ बीएन ९१२४) बेकायदा घरगुती सिलेंडरमधील गॅस पाईपद्वारे भरताना मिळून आले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

संशयास्पद हालचालींवरून महिलेस अटक

महामार्ग बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका ५२ वर्षाच्या महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्या ताब्यातून सुमारे १४ हजार रूपये किंमतीचे विविध कपडे पोलिसांनी हस्ततगत केले. यात साड्या ब्लाऊज पिस आणि परकर यांचा समावेश असून, हे नवीन कपडे चोरीचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुगंधाबाई सूर्यभान मोकळ (५२, रा. मनमाड, ता. नांदगाव) असे संशयित महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. ८) सकाळी ही महिला महामार्ग बस स्थानकात असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ संशयास्पद हालचाल करताना मिळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन झडती घेतली असता २१ साड्या, ६६ ब्लाऊजपीस, ७ परकर असा १४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर महिलेने एखाद्या दुकानात चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून, तिची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर कारवाई

पंचवटी कारंजावरील एका हॉटेलच्या तळमजल्यावर जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक शंकर देशमुख (५६ रा. जाधव संकुल), मंगल रामा बोरसे (४८ रा. फुलेनगर, पेठ रोड), दिलीप हिरामण वानखेडे (३५ रा. येवलेकर चाळ, पंचवटी कारंजा) व वसंत रघुनाथ ससाणे (५२ रा.वाल्मीकनगर, पंचवटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. पंचवटी कारंजा येथील साहेबा हॉटेल इमारतीच्या तळमजल्यावर गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. घटनेचा अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.

मोर्चा आयोजकांवर गुन्हा

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांसाठी विना परवानगी मोर्चा काढून जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सीआयटीयू संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर देशपांडे, डॉ. डी. एल. कराड, संतोष काकडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे आदीं प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विद्यान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सीआयटीयू या कामगार संघटनेच्यावतीने शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी आयोजकांनी मोर्चाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती, तसेच पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश जारी केलेली असतांना हा मोर्चा काढण्यात आल्याने या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांमध्ये आता जलसेवक

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक: 'जल है तो कल है' असे म्हटले जात असले तरी आपल्याकडे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होते. पाण्याचा अवाजवी वापर टाळता यावा आणि प्रत्येक थेंबाचा परिणामकारक उपयोग केला जावा, या जनजागृतीसाठी खेड्यापाड्यांत जलसेवक आणि जलकर्मींची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असून, पाणी बचतीचा मूलमंत्र लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

'पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचविण्याचे करा प्रामाणिक प्रयत्न' यांसारख्या घोषवाक्यांद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्याचे काम आजवर सातत्याने होत आले आहे. तरीही पाण्याची उधळपट्टी, जलप्रदूषणाचे प्रकार सातत्याने नजरेस पडतात. सर्वांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून जलसाक्षरतेवर भर दिला. त्यास जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला. याच अनुषंगाने पाणी बचतीवर यशदामध्ये जलसाक्षरता केंद्र तयार करण्यात आले असून, विभाग स्तरावर जलयोध्दांची निवडप्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात तालुकास्तरावर जलनायक जलदूत निवड समिती गठीत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे कृषी अधीक्षक, विभागीय जल साक्षरता केंद्रांचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत. जलसाक्षरतेच्या कामाला गती देण्यासाठी नुकतेच या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये तालुका आणि ग्रामीण स्तरावरही स्थानिकांच्या मदतीने जलसेवक आणि जलकर्मींचे पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडील सर्व्हेक्षणानुसार शोषित, अतिशोषित झोनमध्ये येणारी गावे, टँकरग्रस्त तसेच जलयुक्त शिवार योजनेत निवडण्यात आलेल्या गावांना जलसाक्षरतेच्या मोहिमेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाच्या कामात सक्रीय सहभाग देऊ शकतील, अशा सजग नागरिकांची यादी बनविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

जलनायक, जलकर्मींचीही नियुक्ती

तालुका स्तरावर जलनायक, गाव स्तरावर जलसेवक आणि जलकर्मींच्या नियुक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सरकारी सेवेत कार्यरत तसेच निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची जलकर्मी म्हणून निवड केली जाणार आहे. सरकारी यंत्रणेशी समन्वय साधणे, जलसेवक आणि तालुका स्तरावरील जलनायकांशी सुसंवाद ठेवणे आणि या मोहिमेचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम जलकर्मी करणार आहेत. ग्रामसभेच्या सदस्याची जलसेवक म्हणून निवड केली जाणार असून, सिंचन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविणे, ग्रामस्थांना जलसाक्षरतेबाबत जागृत करणे, विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीबाबत प्रबोधनाचे काम जलसेवक करणार आहेत. ठरवून दिलेल्या निकषांनुसार तालुका आणि गावपातळीवर जलनायक, जलसेवक आणि जलकर्मी नेमण्याबाबतची कार्यवाही करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले असून, त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा अर्थसंकल्प अर्थकारणाचे पुढचे पाऊल

$
0
0

एनएसडीएलचे चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रगतीच्या दिशेने जाणारा पण काहीसा मध्येच थांबलेला, असा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजेच गेली ४ वर्षे आपल्या देशात सुरू असलेल्या मोदी अर्थकारणाचे पुढचे पाऊल आहे, असे प्रतिपादन एनएसडीएलचे व्हाइस प्रेसिडेन्ट चंद्रशेखर टिळक यांनी केले. विस्डम एक्स्ट्रातर्फे नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पेक्ट्रम इन्फ्रास्टकचे संचालक मेहुल देसाई हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर हे उपस्थित होते. या वेळी दीडशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते.

वादळी चढउतार झालेले नाहीत

सर्व महत्त्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पाच्या बाहेर होण्याची परंपरा, याही अर्थसंकल्पाने कायम ठेवली आहे. ज्याप्रमाणे डिमोनोटायझेशन व जीएसटीचे निर्णय, आर्थिक वर्ष बदलण्याच्या घोषणेसहित इतर काही महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा पंतप्रधान मोदी जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता टिळक यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून, आपल्या शेअर बाजाराच्या शंका फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शेअर बाजाराच्या घसरणीचेसुद्धा संपूर्ण खापर या अर्थसंकल्पावर फोडणे योग्य होणार नाही. मुळातच देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणतेही वादळी चढउतार झालेले नाहीत हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

अंमलबजावणी योग्य व्हावी

कल्चर इकॉनॉमीकडून क्लस्टर इकॉनॉमीकडे अतिशय रास्त वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही म्हणायला हरकत नाही. मात्र या तरतुदीचे नियोजन करताना कृषीविषयक धोरणाची तयारी जरी केंद्र सरकारने केली तरी त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावयाची असते, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. 'ऑपरेशन ग्रीन'प्रमाणे 'मेस्मे'ला देण्यात आलेली २५० कोटी रुपयांची सवलत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भव' योजना होय, असे सांगत टिळक यांनी शेवटी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत दीपाली चांडक यांनी केले तर सूत्रसंचालन मयूर भणगे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी-मनमाडसाठी तिसरा लोहमार्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड इगतपुरी दरम्यान तिसरा लोहमार्ग तयार करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात तब्बल १८६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा तिसरा लोहमार्ग आस्तित्त्वात आल्यास मनमाड-नाशिक हे अंतर सुपरफास्ट गाड्या अवघ्या ४५ मिनिटांत पार करतील. तसेच रेल्वे मालवाहतूक देखील जलद होणार आहे. भुसावळ रेल्वेचे प्रबंधक राम यादव यांनी ही माहिती दिली आहे. तिसरा लोहमार्ग निर्माण झाल्यास रेल्वे प्रवाशांना इगतपुरी-मनमाड दरम्यानच्या प्रवासाला कमी वेळ लागणार आहे.

मनमाड-इगतपुरी दरम्यान तिसरा लोहमार्गाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद होते का? याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष होते. मात्र आता प्रवाशांची प्रतिक्षा संपली असून, यंदा प्रवासी वर्गाला दिलासा देणारा निर्णय केंद्रीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मनमाड-इगतपुरी तिसऱ्या लोहमार्गाला ग्रीन सिग्नल देत हा लोहमार्ग आकाराला यावा यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात घसघशीत कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनमाड-इगतपुरी दरम्यान हा लोहमार्ग आस्तित्वात येवून माल वाहतुकीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रबंधक राम यादव यांनी सदर विभागातील ५४ समपार फाटकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी यासाठी ११.९२ कोटी पुलांच्या दुरुस्ती व नवनिर्माणासाठी

५७.१० कोटी लोहमार्गाखालील स्लीपर्स व रूळ बदलणे या कामांसाठी ९१.५ कोटी आदी तरतुद करण्यात आल्याची माहिती दिली. मनमाड-इगतपुरी या १२४ कि.मी. अंतराच्या मार्गावर तिसरा लोहमार्ग तयार करण्याचे काम अल्पावधीतच सुरू होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला असून ही न्युज प्रवासी वर्गाला समाधान देणारी आहे.

मनमाड स्थानकात सरकते जिने

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात नवा रेल्वे फूट ओव्हर ब्रीजचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, या नव्या ओव्हरब्रिजला प्रथमच सरकते जिने बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या सरकत्या जिन्यांसाठी देखील मोठी आर्थिक तरतूद केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली असून, मनमाड रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलून स्थानक आधुनिक होत असल्याची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभेतून संचालकाला हाकलले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गैरव्यवहार, बेहिशोबी कारभार आदी कारणांनी बरखास्त झालेल्या आणि वारंवार मुदतवाढ मिळत असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोंधळ अजूनही कमी झालेला नाही. बाजार समितीच्या संचालकांची शुक्रवारी (दि. ९) सभा घेण्यात आली. या सभेत शंकर धनवटे यांनी मागील इतिवृत्ताची मागणी केली असता त्यांना समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी सभेच्या बाहेर काढले. त्यांना शिवीगाळ करून दमबाजी केली. या प्रकरणाची पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभा बोलावण्यात आली होती. या सभेत संचालक शंकर धनवटे यांनी सचिव अरुण काळे यांना बाजार समितीच्या संचालकांनी काढून टाकले होते. त्यांना परत कसे रुजू करून घेतले, त्यांना साधा अजेंडा लिहिता येत नाही. आज शुक्रवार असताना अजेंड्यावर शनिवार लिहिलेला आहे. पहिली सभा तहकूब केली असताना ती सभा रेग्युलर झाली असे दाखविण्यात आले आहे. त्या सभेचे इतिवृत्त द्यावे अशी मागणी केली. मात्र, यावर सभापती चुंभळे यांनी शिवीगाळ करीत दमबाजी करीत धनवटे यांना सभागृहाच्या बाहेर काढले. या प्रकरणी धनवटे यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चुंभळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यात म्हटले आहे की, बदनामी करतो. घरापर्यंत जाऊ देणार नाही.

त्यांची नियुक्ती उपनिबंधकांकडून

या प्रकरणाविषयी सभापती चुंभळे यांनी सभा संपल्यानंतर विचारले असता त्यांनी इतिवृत्त या अगोदरच दिलेले असल्याचे सांगितले. सचिव अरुण काळे यांना संचालकांनी जरी पदावरून काढण्यास सांगितले असले तरी त्यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांकडून झालेली आहे. बाजार समितीला त्यांनी सचिव पदावर बसण्यास जिल्हा उपनिबंधकांनी आदेश काढलेले असल्यामुळे समितीच्या संचालकांना त्यांना काढण्याचे काहीच अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. बाजार समितीच्या बरखास्तीला १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर ही समिती बरखास्त करायची की नाही यावर निर्णय होणार आहे. याविषयी सभापती चुंभळे यांना विचारले असता, जिल्हा उपनिबंधक काय निर्णय घेतील ते काही सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये रोखला बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर शहरामध्ये एका धर्मशाळेत सुरू असलेला बालविवाह चाइल्ड लाइनच्या मध्यस्थीने रोखण्यात आला. बालविवाह कायद्याबाबत, तसेच त्यामुळे होणाऱ्या कारवाईबाबत मुलीच्या पालकांना, तसेच उपस्थित वऱ्हाडींना समजावण्यात आल्यानंतर हा विवाह आता पुढील वर्षी निश्चित करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरमधील एका आदिवासी कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील मुलाशी ठरले होते. विशेष म्हणजे हा आंतरजातीय विवाह होता! मात्र, हा बालविवाह असल्याची माहिती चाइल्ड लाइनपर्यंत पोहोचली. यात मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. घटत्या संख्येमुळे योग्य उपवर नसल्याने अनेक विवाहेच्छू तरुण मिळेल ते स्थळ स्वीकारत आहेत. त्याचाच हा एक भाग असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्र्यंबकेश्वरमधील एका धर्मशाळेत शुक्रवारी हा विवाह होणार होता. मात्र, चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी विवाह होण्यापूर्वीच मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांना बालविवाह, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, कायदा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याची माहिती दिली. चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांना त्यांची चूक उमगली. मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय आता लग्न होणार नाही, असा ठाम निश्चिय पालकांनी बोलून दाखवत दोन पावले माघार घेतली.

त्र्यंबकेश्वर येथील घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले असून, त्यांनी सर्वांचे म्हणणे रेकॉर्ड करून घेतले आहे. मुलांचे हक्क, समस्या तसेच बालविवाहाबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- मच्छिंद्र विंचूरकर, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, पुन्हा पाऊस येतोय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात सातत्याने चढ-उतार अनुभवास येत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणही पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. नाशिकमध्ये ७ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १५ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. हेच तापमान पुढील दोन दिवसांत म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. कमाल तापमानही २८.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे नाशिककरांना कधी उकाडा, तर कधी गारठ्याचा सामना करावा लागत आहे.

गारपिटीची शक्यता नाही!

राज्यातील सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये शनिवारी नोंदविले गेले. वातावरणात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्या तरी गारपीट होणार नाही, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे होणारे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनावश्यक औषध फवारणी टाळावी. द्राक्षघड, डाळिंब झाकण्यासाठी पेपरचा वापर करावा, असे आवाहनही जोहरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू बंद; बांधकामे ठप्प

$
0
0

महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा त्रास; व्यावसायिक त्रस्त

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी नवनवीन घरकुलांची बांधकामे हाती घेतली आहेत. परंतु, त्यासाठी लागणारी वाळूच बंद असल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यात दुसऱ्या जिल्ह्यातून वाळू खरेदी केल्यावर महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा मोठा त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत असल्याने नाशिक जिल्ह्यातील वाळू लिलाव सूरू करावेत, अशी मागणी ठेकदारांसह वाहतूकदारांनी केली आहे.

विशेष म्हणजे, दुसऱ्या जिल्ह्यात वाळू लिलाव घेणाऱ्यांकडून रितसर सरकारची पावती वाहतूकदार घेत असताना केवळ त्रास देण्यासाठी शासकीय विभाग आडकाठी आणत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या नाशिक शहरात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. यासाठी नवीन घरकुलांचे योजना शहराच्या चारही भागात सुरू केल्या आहेत. गंगापूररोड भागात टूमदार घर घेण्यासाठी अनेकांची पसंती असते. यामुळे सहाजिकच ग्राहकांना पाहिजे तसे घरकुल उपलब्ध करून देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून केले जाते. परंतु, बांधकामासाठी लागणारी वाळूच बंद असल्याने बांधकाम व्यावसायिकांची कामेच ठप्प झालेली पहायला मिळतात.

नाहक त्रासाला कंटाळून निर्णय

महसूल विभागाकडे वाळू ठेकेदार व वाहतूकदारांकडून जिल्ह्यातील ठिय्ये सुरू करण्याची मागणी केली जाते. आर्थिक देवाणघेवाणीतून महसूल विभागाचे वाळूचे ठिय्ये सुरू करत नसल्याचा आरोप केला जातो. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून वाळू बांधकाम व्यावसायिकांना खरेदी करावी लागते. यातदेखील वाळूची घेऊन येणाऱ्या वाहतूकदारांना महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नियमानुसार वाळूची वाहतूक केली जात असतानादेखील नाहक त्रास दिला जात असल्याने अखेर वाळू वाहतूक बंद करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे.

मजुरांवर बेरोजगारीची गदा

शहरातील मोठी बांधकामे वाळू येत नसल्याने बंद पडली आहेत. ती बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची गदा आली आहे. याकडे सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली. केवळ आर्थिक आकसापोटी नाशिक जिल्ह्यातील वाळूचे लिलाव केले जात नसल्याचा आरोपही वाहतूकदारांनी केला आहे. यात सरकारचादेखील कोट्यवधींचा महसूल वाया जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाखोंची वाहने दारात उभी

बांधकामासाठी अति महत्वाची लागणारी वस्तू म्हणून वाळूची गरज असते. परंतू वाळूच बंद असल्याने वाहतूकदारांची लाखोंची वाहने दारात उभी करून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यातच वाहनांवर काम करणा-या मजूरांना देखील घरबसून वेतन द्यावा लागत असल्याने वाहनमालक हैराण झाले आहेत. दहा लाखांपासून ते ५० लाखांपर्यत वाळू वाहतूकीसाठी खरेदी केलेल्या वाहनांचे बँकेचे हफ्ते भरण्यासाठी पैसाच उपलब्ध होत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात वाहतूकदार अडकले आहेत. याबाबत शासनाच्या वरिष्ठ विभागाने योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात लहान, मोठे ५ हजारांहून अधिक बांधकामाला साहित्य पुरविणारी वाहने आहेत. यावर हजारो कुटुंब अवलंबून असतात. परंतु, अनेक जाचक अटींमुळे वाळूच बंद असल्याने अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

-लक्ष्मण रोकडे, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यात रंगला वाइन फेस्टिवल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मोहाडी येथील सह्याद्री फॉर्म येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. शनिवारी विंचूर वाइन पार्क येथे ग्रेप स्टेम्पिंग, वाइन टेस्टिंग यासह साहसी क्रीडाप्रकार, हेलिकॉप्टर राइड, आदिवासी नृत्याने फेस्टिवलमध्ये रंगत आणली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाइन व पर्यटनाचे ब्रँडिंग करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील १४ ठिकाणी हा फेस्टिवल ११ मार्चपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस होणार आहे. नाशिक व्हॅली वाइन क्लस्टरने आयोजित केलेल्या या फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर विंचूरच्या कार्यक्रमातही पर्यटकांनी भेटी देत या फेस्टिवलचा आनंद लुटला. नाशिक जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योग विनियार्ड्स आणि वेगवेगळ्या वायनरीजमध्ये हा फेस्टिवल होणार आहे. या फेस्टिवलमध्ये नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉलही आकर्षणाचे केंद्र आहे.

असा असेल फेस्टिवल

विंचूर येथील दोन दिवसांच्या कार्यक्रमानंतर १६ फेब्रुवारी यॉर्क वाइन यार्ड नाशिक, १७ फेब्रुवारी व्हॅलनवाईन यार्ड, १८ फेब्रुवारी रीनासन्स वायनरी, २३ रोजी विंटेज वायनरी, २४ रोजी रोजी ग्रोवर झाम्पा, २५ रोजी सोमा वायनरी, २ मार्चला व्यंकटेशनगर, ३ मार्च रोजी चंदन इंडिया, ४ मार्चला निफा वाइनरी, ९ रोजी ग्रेप कंट्री, १० रोजी सुला वायनरी येथे तर ११ मार्च रोजी ग्रेप कार्निव्हल येथे समारोप होणार आहे.

वाइनला पर्यटनाचा दर्जा

द्राक्ष पंढरीतल्या वाइनला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशितोष राठोड यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये आयोजित 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट'च्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. वाइनची दर्जात्मक गुणवत्ता आणि समुद्रापार तिने रोवलेली पसंती, यामुळे नाशिकला वाइन कॅपिटल दर्जा मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटनाला मान्यवरांची उपस्थिती

ग्रेप हार्वस्टच्या शुभारंभ सोहळ्यात आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, भारतीय वाइन असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, प्रसाद हिरे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, सह्याद्री फार्मचे एमडी विलास शिंदे, वाइन उद्योजक राजेश जाधव, जेलर पल्लवी कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीला नकारघंटा

$
0
0

मुंढेंच्या आगमनामुळे अर्थकारण, राजकारण बदलले; पक्षांसमोर नवी डोकेदुखी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेतील राजकारणालाही कलाटणी मिळणार आहे. त्याचा पहिला फटका स्थायी समितीवर जाऊ इच्छिणाऱ्या सदस्यांसह अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या नगरसेवकांना बसला आहे. मुंढेंच्या कामकाजाचा अनेकांनी धसका घेतला असून, आतापर्यंत स्थायीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी तूर्ततरी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. एवढे वर्ष जाऊ द्या, असा पवित्रा सर्वपक्षीय इच्छुकांनी घेतल्याने पक्षाच्या नेत्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीतून दरवर्षी फेब्रुवारीत आठ सदस्य निवृत्त होतात. तशी लघीनघाई सध्या पालिकेत सुरू असून, आठ सदस्यांची निवृत्ती करण्यासाठी चिठ्ठी सोडत काढली जाणार आहे. सर्वच पक्षांनी स्थायीचे सदस्यपद एक वर्षासाठी ठेवल्याने यावर्षी आठ नव्हे, तर १६ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षाचे अध्यक्षपद आणि स्थायीचे सदस्यपद मिळविण्यासाठी सध्या सर्वच पक्षातील नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. फेब्रुवारीनंतर २५७ कोटींचे रस्ते विकास योजना, स्मार्ट लायटनिंग प्रकल्प, सिटी बससेवा असे कोटींचे उड्डाण असलेले विषय स्थायीवर येणार आहेत. त्यामुळे अर्थकारण जोरात राहणार असल्याने स्थायीवर जाण्यासाठी नगरसेवकांचे आपल्या पक्षाकडे लॉबिंग सुरू आहे. तर, विद्यमान सदस्यांकडून एक महिन्याची मुदत वाढवून घेण्यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. परंतु, आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच महापालिकेतील अर्थकारणासह राजकारणाची दिशा बदलली आहे. मुंढे यांनी पहिल्याच दिवशी गरजेच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत इच्छुकांच्या मनसुब्यांना ब्रेक लावला आहे. कोणत्याही कामाची आवश्यकता तपासूनच ती फाइल पुढे ठेवण्याचा आदेशच मुंढे यांनी पहिल्या दिवशी दिला आहे. त्यामुळे स्थायीकडे येणाऱ्या प्रस्तावांचा ओढा कमी होणार आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांच्याप्रमाणेच मुंढेंची शिस्तबद्ध कार्यपद्धती व पारदर्शक कारभारामुळे स्थायीतील अर्थकारणाला बऱ्यापैकी चाप लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीसाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या तलवारी तूर्तास तरी म्यान केल्या आहेत. वर्षभर महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास केल्यानंतरच पुढच्या वर्षी स्थायीसाठी लॉबिंग करू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली असून, कोणाला स्थायीवर पाठवायचे असे संकट उभे राहिले आहे.

अध्यक्षपदही नको

स्थायी समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद भाजपकडे पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे विद्यमान स्थायी समितीमधील दोन सदस्यांनी अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती. यासाठी नेत्यांनाही साकडे घालत स्थायीचा बारकाईने वर्षभर अभ्यास केला. आता या अभ्यासाचाही उपयोग होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे वर्षभर तरी थांबण्याचा निर्णय या सदस्यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणजाई तीर्थक्षेत्रावर वाढणार पर्यटन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचुर ते नैताळे दरम्यान डोंगरावर असलेले लोणजाई मातेचे भव्य मंदिर आपले लक्ष वेधून घेते. ३०० वर्षांपूर्वीच्या असलेल्या या मंदिर परिसराचा समावेश आता शासनाच्या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात करण्यात आला आहे. या मंदिरासह परिसराला शासकीय निधीतून विविध कामे करून सजविण्यात येणार आहे. यामुळे या लोणजाई गडावर धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे मंदिर परिसर विकासकामी कोट्यावधींचा निधी मिळण्यासह विकासकामांना चालणा मिळणार आहे. निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर विंचूर नजीक नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून पाच ते सहा किमी अंतरावर सुभाषनगर गावाजवळ आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. समुद्र सपाटीपासून अतिशय़ उंचावर असलेला लोणजाई डोंगर हिरवाईने नटलेला असल्याने येथे पर्यटनासाठी तालुक्यातील नागरिकांची कायम वर्दळ असते. श्रीमंत बाजीराव पेशवांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी अतिशय सुंदर असे मंदिर ३०० वर्षांपूर्वी बांधले आहे. तीर्थक्षेत्र डोंगरावर असल्याने कायम हिरवेगार व थंड वातावरणामुळे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथील माजी सरपंच मधुकर दरेकर यांच्यासह स्थानिकांनी लोकसहभागातून, वै. नाना महाराज भक्त परिवार, छोट्याशा मंदिरास भव्य स्वरुप देऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. सद्य स्थितीत १८ फूट उंचीचा १०८९ चौ. फुटाचा मंदिराचा गाभारा व प्रशस्त सभामंडप पूर्ण झाला आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी वर्गाने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात हे ठिकाण अधिकच बहरले आहे.

धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोणातून महत्त्व असलेल्या लोणजाई डोंगरावर शासनाच्या निधीअभावी अद्ययावत सुविधांची वाणवा जाणवत होती. लोणजाई गडास 'ब' वर्ग दर्जा मिळावा यासाठी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरु ठेवला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, कैलास सोनवणे, पं. स. सदस्य संजय शेवाळे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना या तीर्थक्षेत्रास भेट देण्यास विनंती केल्याने त्यांनी लोणजाईला भेट देऊन तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे प्रस्तावित करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कामाचे प्लॅन व अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत कामांची अंदाजपत्रके सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला. वनविभाग, स्थानिक ग्रामपालिका ठराव, पोलिस स्टेशनकडून शिफारस प्रमाणपत्रे सादर करण्यात आली. श्री क्षेत्र लोणजाई माता येथील विकास कामांची अंदाजपत्रके पर्यटन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली. शासनाकडून जिल्ह्यात तीन तीर्थक्षेत्रास ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असून, कायम पाठपुरावा असल्य़ाने त्यात लोणजाई मंदिराचा समावेश झाला आहे. यामुळे 'लोणजाई'च्या विकासकामांना चालना मिळणार आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही नोव्हेंबर महिन्यात लोणजाई गडास 'ब' वर्ग दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत तुरुंगातून अर्ज केला होता.

ही कामे होणार प्राधान्याने

या पर्यटन स्थळासाठी दोन टप्यात सुमारे पाच कोटींचा निधी मिळणार आहे. पहिल्या टप्यात प्रवेशद्वार, मनोरे, लेझर शोसहीत प्रेक्षकगृह, पार ओटे, अंतर्गत रस्ते, वाहनांकरिता पार्किंग सुविधा, गार्डन, बगीच्यातील खेळणी, कारंजे, संरक्षण भिंत आदी कामे नियोजीत असून, दुसऱ्या टप्यात भक्तनिवास, संतनिवास, व्यापारी गाळे, प्रसाधनगहे, कुंड विस्तारीकरण व सुधारणा आदी प्रस्तावीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णायक लढा उभारणार

$
0
0

गुरव समाजाच्या मेळाव्यात निर्णय

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अखिल गुरव समाज संघटनेतर्फे समाज मेळावा तसेच संत काशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नुकताच जेलरोड येथील ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. या वेळी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरव समाजाच्या मागण्यांसाठी निर्णायक लढा उभारण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

या मेळाव्यात भास्कर भागवत, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, रमेश पवार, मनीषा पांडे, भास्कर नवगिरे, काशीनाथ भदे, रेखा सोनवणे, सुभाष शिंदे, आप्पा बावीसकर, संजय गुरव, निशीगंधा बामणोदकर, स्मिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. जेलरोडच्या छत्रपती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी दत्ता मसूरकर, वसंत बंदावणे, कल्पना पांडे, वंदना बंदावणे यांनी मार्गदर्शन केले.

भेदभाव विसरून एकत्र यावे

समाजातील पोट जातींनी भेदभाव विसरून अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे. शासनदरबारी शिष्टमंडळ नेऊन मागण्या मान्य करून घ्याव्या, असे आवाहन मसूरकर यांनी व्यक्त केले. समाजाचे शैक्षणिक, इनामवर्ग जमिनी, रोजगार, राखीव जागा आदी प्रश्न सोडविण्यासाठी निर्णायक लढा उभारावा. समाजाचे मोठे अधिवेशन होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. विठ्ठल गुरव यांनी स्वागत तर भाऊसाहेब पवार यांनी प्रास्तविक केले. भास्कर गुरव यांनी आभार मानले. नीलेश शिंदे, सुनील कहाळे, आप्पा शिंदे, सुरेश नवगिरे, तुकाराम शिंदे, विकास आचार्य, धनाजी पवार, हर्षल पांडे, वैभव शिंदे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images