Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धोंडीरोड डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक ७ मधील धोंडी रोड मार्गाचे ३० लाख रुपये खर्चाचे रस्ता डांबरीकरणाचे काम बुधवारी (दि. १०) बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकरराव आढाव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्डातील नागरिकांमधून हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी होत होती. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनास निवेदनदेखील दिली होती. मात्र त्याबाबत कोणतीही हालचाल होत नव्हती. शिंगवे बहुला गावाकडे जाणारा धोंडीरोड हा एकमेव मार्ग असल्याने त्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते, असे मत या वेळी बोलताना नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी व्यक्त केले. खंडोबा टेकडी ते लष्करी हद्दीपर्यंतचा रस्ता होत आहे. यासोबतच या भागातील इतरही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. शुभारंभप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष संतोष मेढे, विठ्ठल मेढे, गेनू मोजाड, सोमनाथ निसाळ, संपत निसाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात बँकेतून १० लाखांची लूट

$
0
0

पाच भामट्यांकडून पैशांचे बंडल लंपास

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पंजाब नॅशनल बँकेत बुधवारी (दि. १०) भरदिवसा ग्राहक बनून आलेल्या चार ते पाच भामट्यांनी बँकेच्या कॅशियरसोबत हुज्जत घालण्याचे नाटक करीत सुमारे १० लाखांच्या रकमेचे बंडल चोरून लंपास केल्याची घटना घडली. या चोरीच्या घटनेने बँक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सहाव्या गल्लीत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य शाखेत दुपारी १ वाजेच्या सुमारास ही नाट्यमय लूट झाली. बँकेत चार ते पाच अनोळखी तरुण आले. त्यातील दोन जण बँकेतील कॅश काऊंटरजवळ गेले आणि कॅशियर वाघ यांना आपल्याला बँकेत खाते उघडायचे आहे असे म्हणून फॉर्म मागू लागले. त्याचवेळी एक जण आपणास एटीएममधून १ लाख रुपये काढायचे आहेत, असे म्हणत जवळच उभ्या सोनवणे नामक शिपायास बाहेर बोलावू लागला. त्या अनोळखीने शिपाई सोनवणे यांना संमोहित केल्याचे सांगण्यात येत आहे. याच सर्व गोंधळात लुटारूंपैकी एकजण थेट बँकेच्या काऊंटरमध्ये शिरत कॅशियरजवळील ड्रॉवरमधून पैशाचे बंडल काढून पळ काढला.

हे पैशाचे बंडल सुमारे १० लाखाचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पैशाचे बंडल उचलून एक पळताच इतर चार जणही क्षणात पळाले. काही मिनिटात हा सर्व थरार झाला असून, कॅशियर यांनी आरडाओरड करीत लक्ष वेधले. बँकेतील ग्राहक, कर्मचाऱ्यांनी चोरांना शोधण्याचा प्रयत्नही केला मात्र ते पसार झाले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्ससाठी ट्रेनिंग, ग्रुमिंग अन् मेकअपही!

$
0
0

नाशिक : हौसेला मोल नसते हे श्वान आणि तत्सम प्राणी पाळण्याच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरू लागले आहे. त्यांना शाम्पूने स्नान घालण्यापासून, नखे काढणे, कान साफ करणे आणि मेकअपचाही व्यवसाय सध्या तेजीत आहे. इतकेच नव्हे तर पाळीव प्राण्यांची फिजिओथेरपीदेखील शहरामध्ये येऊ घातली असून, या व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळते आहे.
शहरात श्वान आणि तत्सम प्राणी पाळण्याचे प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षांत दुपटीने वाढले आहे. जे केवळ वातानुकूलित वातावरणातच राहू शकतात, अशा बर्फाळ प्रदेशातील देखण्या श्वानांचाही नाशिककरांना लळा लागला आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक महागडे हे श्वान आहेत. सायबेरियन हस्की, नेपोलियन मॅस्टीफ, तिबेटियन मॅस्टीफ यांसारख्या काही जातीच्या श्वानांना वातानुकूलित जागेत ठेवले जाते. काही त्यापासून उपेक्षित राहतात. श्वान, मांजर किंवा तत्सम प्राणी केवळ लळाच लावत नाहीत, तर मानवाच्या मनावरील ताणही हलका करतात असे मनोविकार तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच ते पाळण्याचे प्रमाण वाढले असून, पेट शॉप व अन्य सेवा सुविधाही वाढू लागल्या आहेत. श्वानांना शाम्पूने स्नान घालणे, त्यांची नखे काढून देणे, मेकअप करण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. दोन वर्षांत अशा व्यावसायिकांची संख्या दुपटीने वाढली आहे.
शहरात सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टर्सची संख्याही वाढते आहे. आठवड्यात एक किंवा दोनवेळा शाम्पूने श्वानांना अंघोळ घातली जाते. त्यासाठी दरमहा तीन हजार रुपये आकारले जातात. श्वानांना प्रशिक्षण देणाऱ्या तीन तरुणी आणि दोन तरुणही नाशिकमध्ये सक्रिय आहेत. आठवड्यातून दोन वेळा असे किमान सहा महिने प्रशिक्षण दिले जाते. एका दिवसासाठी किमान ५०० रुपये आकारले जातात. पाळीव प्राण्यांना फिजिओथेरपी देण्याकडेही आता नाशिकची वाटचाल सुरू झाली आहे. घरातील कुत्र्याच्या स्वच्छतेपासून त्याला शिस्त लावण्यापर्यंत आणि त्याच्या मेकअपपासून आहारापर्यंत सर्वच बाबतीत प्राणीमित्र दक्ष झाले असून, त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत.

शहरात १५ हून अधिक केनल
कुटुंबासह बाहेरगावी निघताना श्वानप्रेमींना त्यांच्या पाळीव श्वानांचीही व्यवस्था लावावी लागते. त्यासाठी शहरात केनलची (डॉग होस्टेल) संख्या दुपटीने वाढली आहे. त्यासाठी प्रतिदिन किमान ५०० रुपये घेतले जातात. त्याला वेळेवर खाद्य देणे आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडून पार पाडली जाते. पूर्वी शहरात सात कॅनल होते. गेल्या दोन वर्षांत त्यांची संख्या १५ झाली आहे. तरीही सुटीच्या हंगामात तेथे हाऊस फुल्लचा बोर्ड लागतो.

नाशिकमधील महागडे श्वान
सेंट बर्नाड - ३००
सायबेरीयन हस्की - ९०
नेपोलियन मस्टीफ - १२
तिबेटियन मस्टीफ - २

हल्ली एकटेपणा वाढला असून तो कमी करण्यास पाळीव प्राण्यांची खूप मदत होते. ते लळा लावतात. खूप विश्वासू असतात. मानवाला प्रेम देतात. त्यांच्यासमवेत वेळही मजेत जातो आणि त्यामुळे मनावरील ताणही कमी होतो. म्हणूनच हल्ली कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ
(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजभान बाळगून करा समाजसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येक नागरिक हा सिटिझन रिपोर्टर असणे गरजेचे आहे. आपली बाजू सशक्तपणे मांडण्यासाठी प्रत्येक सिटिझन रिपोर्टरने बातमी करण्याचे कौशल्य जाणून घेतले पाहिजे. हे कौशल्य अवगत करून देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने सिटिझन रिपोर्टर्ससाठी मंगळवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दीड वर्षापूर्वी ‘मटा’ने ही संकल्पना सुरू केल्यानंतर त्यास नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत त्याचाच पुढचा अध्याय म्हणून या सिटिझन रिपोर्टर्सना माध्यमे, त्यांची कार्यपद्धती, बातमीची प्रक्रिया आदींबाबत माध्यमतज्ज्ञ अनंत येवलेकर व नितीन शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. बातमी कशी सादर करायची व बातमीमूल्य कसे ओळखायचे, याचे ओघवत्या शैलीत विवेचन केले. कॉलेजरोडवर असलेल्या बिल्डर असोसिएशनच्या कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पत्रकारितेला नवा आयाम देण्याची किमया ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपने साध्य केली आहे. या अॅपद्वारे मटाचे वाचक सार्वजनिक समस्या, तसेच अडी-अडचणी सहजपणे पाठवतात. त्या प्रसिद्ध होताच त्याची तत्काळ दखल घेतली जाते. त्यामुळेच हे अॅप अतिशय लोकप्रिय झाले आहे. दररोज शेकडो समस्या, अडी-अडचणी या अॅपद्वारे पाठविल्या जातात. निवडक सिटिझन रिपोर्टर्सला दर आठवड्याला सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांना गौरविण्यात येते. याच अनुषंगाने सिटिझन रिपोर्टर्सला योग्य ते मार्गदर्शन लाभावे, यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केले. चीफ रिपोर्टर भावेश ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचलन केले. मार्गदर्शन झाल्यानंतर सिटिझन रिपोर्टर्सनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली.

अत्यंत प्रभावी अॅप
मटाचे सिटिझन रिपोर्टर हे अॅप अत्यंत प्रभावी असून, यात छापून आलेल्या बातम्यांची प्रशासन गंभीरपणे दखल घेत असते. त्याचप्रमाणे विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे व नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मटाने उपलब्ध करून दिले असल्याची भावना यावेळी उपस्थित सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केली.

कायम नियोजन व्हावे
मटाने केवळ अॅप तयार करुन आपले काम संपवले नाही; तर समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेकदा बातमी तयार करताना अडचणी येतात. बातमी माहीत असूनही ती प्रभावीपणे मांडता येत नाही. ही अडचण ओळखून मटाने आयोजित केलेली ही कार्यशाळा निश्चित कौतुकास्पद आहे, असेही सिटिझन रिपोर्टर्सनी सांगितले.

मोठ्या संख्येने उपस्थिती
मटाचे सिटीझन रिपोर्टर अॅप हे दहा हजारांवर लोकांनी प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात सिटिझन रिपोर्टर्स उपस्थित होते.

बातमी देताना जबाबदारीचे भान बाळगा
महाराष्ट्र टाइम्सने सिटिझन रिपोर्टर हे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून, त्याचा उपयोग सर्वांनी करावा. बातमी देताना आपण या लोकशाहीचे घटक आहोत. ती बळकट करणे आपले काम आहे, असे समजून जबाबदारीने बातमी द्यावी, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, माध्यमतज्ज्ञ प्रा. अनंत येवलेकर यांनी केले. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने सिटिझन रिपोर्टरसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, तंत्रज्ञानाने आज रिपोर्टर्ससाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नागरिकाला क्षणार्धात बातमी पाठवणे सोयीचे झाले आहे. सिटिझन रिपोर्टर्सने बातमी देताना वैयक्तिक हेतू बाजूला ठेवून बातमी द्यायला हवी. त्याचप्रमाणे पत्रकारितेचे संकेत पाळायला हवेत. आपण दिलेली बातमी तंतोतंत खरी आहे, याची खात्री करूनच ती द्यावी. आपण बातमी दिल्यानंतर ती विश्वासार्ह आहे याची खात्री वाचकाला झाली पाहिजे, तरच ते आपल्या पत्रकारितेचे यश आहे. आपल्या जबाबदारीकडे सूक्ष्मतेने पहायला हवे. बातमी देणे ही जबाबदारी मोठी आहे. ती देत असताना आपल्याला जगात काय चालले आहे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. आपली भाषा सुधारण्यासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. बातमी देताना पत्रकाराचा स्वार्थ असता कामा नये. बातमी जास्त पाल्हाळीक असता कामा नये. बातमीचे तंत्र समजावून घेणे गरजेचे आहे. बातमीत थिल्लरपणा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणती बातमी द्यायची, कोणती द्यायची नाही, याचे भान असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सोशल मीडीया हे प्रभावी अस्त्र
सोशल मीडिया हे अत्याधुनिक माध्यम आहे. त्याच्या वापराला कुठलेही बंधन नसले, तरी आपण ते कसे वापरायचे हे निश्चित करायला हवे. सोशल मीडियामध्ये अनेक पोस्ट व्हायरल होतात. पण, त्या खऱ्याच असतात का, याची शहानिशा आपण करतो का? असे प्रश्न उपस्थित करतानाच हे माध्यम प्रभावी शस्त्र असून, ते अधिक जबाबदारीपूर्वक वापरा, असा सल्ला आयटी उद्योजक आणि सोशल मीडिया अभ्यासक नितीन शुक्ल यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप सोशल मीडियाचाच एक भाग आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखी माध्यमे प्रभावशाली झाली आहेत. प्रत्येक माध्यमाचे वापरकर्ते प्रचंड आहेत. सोशल मीडियाला काळ, वेळेचे बंधन नाही. हे सशक्त माध्यम आहे. पण, हे माध्यम वापरताना आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. पोस्ट टाकताना ती पुन्हा एकदा वाचायला हवी. आपण बातमी केव्हा टाकतो, तेसुद्धा महत्त्वाचे आहे. आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच येण्याची किंवा उतरण्याची गरज नाही. आपण ऑनलाइनही ते करू शकतो. नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी यासाठी ट्विटरवर हॅशटॅगद्वारे मोहीम राबविली गेली. त्याची दखल घेतली गेली. आपण ज्या काही समस्या मांडतो त्याची कागदपत्रे मिळवणे योग्य असते. त्यामुळे त्यास वजन प्राप्त होते. गंगापूर धरणावरील बोट क्लबसंदर्भात पर्यावरण कार्यकर्त्यांनी विविध परवानग्यांची कागदपत्रे मिळवली. त्या आधारेच तेथे बोटींग करणे अशक्य असल्याचे सिद्ध झाले, असेही त्यांनी सांगितले.


अधिकार व कर्तव्ये समजून घ्या
सिटिझन रिपोर्टरने आपले अधिकार आणि कर्तव्ये समजून घ्यायला हवीत. समाजातल्या काही समस्यांना वाचा फोडताना त्या निष्पक्ष आणि कोणताही गैरहेतू न ठेवता काम करायला हवे. आपण समाजातले एक सजग नागरिक म्हणून समस्या मांडण्याचे काम करत आहोत, हे कर्तव्य लक्षात घ्यावे. तसेच सिटिझन रिपोर्टर्सनी समस्या मांडताना योग्यता व खात्रीपूर्वक त्या मांडायला हव्यात.

चौफेर अभ्यास हवा
सिटिझन रिपोर्टर म्हणून भूमिका मांडताना प्रत्येकाने चौफेर अभ्यास करायला हवा. प्रत्येक क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करायला हवे. कोणत्याही क्षेत्राची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट हे सोपे माध्यम आहे. अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाइटचा फायदा सिटिझन रिपोर्टरने करून घ्यायला हवा.

लिहिताना भाषा महत्त्वाची
सिटिझन रिपोर्टर अॅपच्या माध्यमातून समस्या पाठवत असताना त्यातील माहिती ही शुद्ध भाषेत असायला हवी. मुख्यत्वे बोलीभाषा, प्रचलित शब्द आणि सहजसोप्या मराठीचा वापर करायला हवा. आपले म्हणणे योग्यरित्या समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहज-सोपी मराठी वापरणे योग्य आहे.

ऑनलाइन आंदोलने
सध्या सोशल मीडिया हा आंदोलनाचा भाग झाला आहे. नव्याने सोशल मीडियावर हॅशटॅग मोहिमा राबविल्या जातात. या माध्यमातून समस्यांना वाचा फोडणे शक्य होत आहे. हा सिटिझन जर्नालिझमचा एक भाग झाला आहे. मात्र, यात कोणतीही माहिती पोस्ट करताना त्याची खात्रीशीर पडताळणी करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. हे सिटिझन रिपोर्टसनी लक्षात घ्यावे.


आम्हाला बातमीच्या बाबतीत पडलेले प्रश्न या कार्यशाळेतून सुटले. सिटिझन रिपोर्टरचे स्थान नेमके काय असते, याबाबत विस्तृत मार्गदर्शन कार्यशाळेतून मिळाले. असेच कार्यक्रम नियमित राबवावेत.
- अंजली धामणे

कार्यशाळा खूप छान झाली. येवलेकर आणि शुक्ल यांचे मार्गदर्शन उत्तम झाले. प्रिंट मीडियातील बातमीबरोबरच सोशल मीडिया कशा पद्धतीने हाताळला पाहिजे, याची माहिती मिळाली. मुळात सिटिझन रिपोर्टर हे ‘मटा’ने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले फार मोठे व्यासपीठ आहे.
- संजय निकम

बातमीसंदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेच्या माध्यमातून सिटिझन रिपोर्टर या नात्याने काम करण्यासाठी नवीन दृष्टी मिळाली. सिटिझन रिपोर्टरच्या मर्यादा समजल्या. त्यासोबतच पत्रकारीतेतील चांगले अनुभव ऐकायला मिळाले.
- अनिल जगताप

पत्रकारितेतील बारकावे या कार्यशाळेतून समजले. शब्द कसे वापरावेत, बातमी कशी द्यावी, याची संपूर्ण माहिती मिळाली. बातमीचे टायमिंग काय असले पाहिजे, याचादेखील धडा यातून मिळाला.
- शशीकांत खडताळे

मटा सिटिझन रिपोर्टरसाठी चांगले मार्गदर्शन मिळाले. सिटिझन रिपोर्टर नाशिकला एक चांगले शहर बनवू शकतो, हे कळाले. प्रेरक शब्दांचा वापर आणि माहिती नसलेल्या गोष्टींचे बारकावे समजले. यासाठी ‘मटा’चे धन्यवाद.
- राजेंद्र राजधर

हा कार्यक्रम आम्हा सर्वांना उत्तम मार्गदर्शन देणारा ठरला आहे. याद्वारे सिटिझन रिपोर्टरकडून होणाऱ्या चुका कळाल्या. त्रास न होणारी भाषा वापरणे व इम्पॅक्टफुल बातमी कशी द्यावी, हे समजले. सोशल मीडियाचा पण कसा वापर करावा, हे लक्षात आले. यासाठी मटाचे विशेष धन्यवाद.
- जय जोशी

कार्यक्रम अत्यंत छान व महत्त्वाचा होता. यातून आम्हाला एक चांगल्या रिपोर्टरने कसे काम करावे, याचे सखोल ज्ञान मिळाले व यापुढे काय काळजी घ्यावी आणि कशा प्रकारच्या बातम्यांवर भर द्यावा, याची ही माहिती मिळाली, यासाठी मटाचे आभार.
- चंद्रकांत महाले

मटा सिटिझन रिपोर्टर मार्गदर्शनासाठीचा हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त होता. यातून आम्हाला एका चांगल्या रिपोर्टरच्या जबाबदारीचे भान आले. आणखी चांगली बातमी देत नाशिकला स्वच्छता यादीत अव्वल स्थान मिळण्यासाठी कार्यरत राहण्याची स्फूर्ती मिळाली.
- विनायक येवले

मटा सिटिझन रिपोर्टर्ससाठीच्या या कार्यक्रमाद्वारे आम्हाला अतिशय उत्तम माहिती मिळाली. बातम्यांचे स्वरूप काय, कसे लिहावे, शब्दांचा वापर आणि सामाजिक भान ठेवत बातमी कशी लिहावी, याची महत्त्वाची माहिती मिळाली.
-चंद्रशेखर साठे

महाराष्ट्र टाइम्सने सिटिझन रिपोर्टरसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा आम्हाला फार फायदा झाला. प्राध्यापक अनंत येवलेकर यांनी अतिशय सोप्या भाषेत पत्रकारिता आम्हाला समजावली. निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. हा उपक्रम वेळोवेळी राबवला जावा अशी आमची इच्छा आहे.
- भारत भुरे

शहरात अनेक समस्या आहेत. त्या निर्भीडपणे मांडण्याचे बळ आम्हाला सिटिझन रिपोर्टर होऊन मिळाले. असे काम आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने कसे करावे याचे मार्गदर्शन मिळाले. एक रिपोर्टर म्हणून कसं काम करावं याचं मार्गदर्शन मिळाले. लोकोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा दोन्ही मान्यवरांच्या बोलण्यातून मिळाली.
- सुनीता ससाणे

महाराष्ट्र टाइम्सची टीम वेळोवेळी उत्तम कार्यक्रम आयोजित करत असते. त्यातून समाज जागृती हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. दीड वर्षांपूर्वी सिटिझन रिपोर्टर त्यांनी नुसते नेमले नाहीत, तर एक उत्तम रिपोर्टर घडवण्याचेदेखील ते करत आहेत. आज झालेला कार्यक्रम हे त्याचंच उदाहरण आहे.
- सागर शेवाळे

कार्यक्रम अतिशय छान झाला. ही कार्यशाळा असूनही कंटाळवाणी झाली नाही. अनंत येवलेकर यांनी आलेल्या अनुभवातील उदाहरण देऊन कार्यक्रम खुमासदार केला. पत्रकारिता हे जबाबदारीचे काम आहे, हे समजावले. आपले व्याप सांभाळून रिपोर्टिंग कसे करावे, ते या कार्यशाळेतून समजले. असे कार्यक्रम नेहमी होत रहावेत, आणि आम्हाला मार्गदर्शन मिळावे अशी आमची इच्छा आहे.
- विदुला अष्टेकर

मी एक गृहिणी आहे. एक वर्षापासून सिटिझन रिपोर्टर म्हणून काम करत आहे. या कामामुळे मला आपण समाजासाठी काही तरी चांगले करीत असल्याची प्रेरणा मिळते. या कार्यशाळेतून बातमी कशी असावी, ते मला समजले. पत्रकारितेबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. मी सिटिझन रिपोर्टर असल्याचा आज अभिमान वाटतो.
- संगीता सोनवणे

वृत्तपत्र वाचकाला आपला एक भाग बनवून महाराष्ट्र टाइम्सने फार मोठा मान दिला आहे. तरुण मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला ही संधी उपलब्ध करुन दिली. एवढेच नाही, तर पत्रकार म्हणून काम कसे करायचे हेदेखील सांगितले. मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देणारे होते. यापुढेदेखील आम्ही एक जबाबदार पत्रकार म्हणून काम करू.
- समीर भडांगे

पहिल्यांदा अॅप डाउनलोड केले तेव्हा वाटले होते, आपल्याला बातमी जमेल का? पण आता एकदम सहज जमते. आम्हाला नुसते रेपोर्टिंग कसे करायचे हेच नाही तर भाषा, बातमीचे स्वरुप आणि बातमी करतानाची दक्षता याबद्दलही या कार्यक्रमातून कळाले. आता आम्ही अजून जोमाने आमचे काम करू. या कार्यशाळेमुळे आम्ही सगळे रिपोर्टर एकमेकांना भेटू शकलो आणि येणाऱ्या अडचणींना उत्तरही मिळाले.
- सौरभ अमृतकर
(संकलन : सौरभ बेंडाळे, लखन सावंत, योगेंद्र देवरे, पीयू शिरवाडकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बॉश (मायको) कंपनीत कोट्यावधींच्या चोरी प्रकरणी अफवांचे पेव पसरले आहे. कंपनीतील कॉमन रेल इंजेक्टर (सीआरआय) या प्रकल्पातीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याने तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.

कामगार युनियनने कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापनाकडे संबंधित चोरी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच रोजच युनियनची कंपनी व्यवस्थापनासोबत चोरी प्रकरणी बैठकाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरीसाठी मुख्य संशयित चौधरीला कंपनीतून मदत करणारे नेमके कोण, याचा तपास मात्र लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ज्या सीआरआय प्रकल्पातील स्क्रॉपमधून चांगला माल चोरीला गेला होता. त्याच प्रकल्पातील तीन अधिकारी निलंबित केल्याची चर्चा दिवसभर कामगारांमध्ये रंगली होती. यात मात्र नेमके कोणाला निलंबित केले याची माहिती मिळू शकली नाही. तर पुढील काही दिवसात चोरी प्रकरणाची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. यासाठी लवकरच जर्मनीचे अधिकारी कंपनीत येणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरी बंधुंच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर एमआयडीसीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयिताला बुधवारी (दि. १०) अटक केली. त्यामुळे गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यापैकी संशयित चौधरी बंधू या दोघांच्या पोलिस कोठडीत १५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इदरीस चौधरी उर्फ छोटू व त्याचा भाऊ परवेजअली इदरीस चौधरी यांची पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. परवेझला (२४, रा. संजीवनगर, केवलपार्क, अंबड लिंक रोड) यास अजमेरानगर येथून अटक करण्यात आली. तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता बळावली आहे.

छोटू चौधरी याच्याकडे बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका आहे. कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून डिफेक्टिव्ह पार्टच्या दुरुस्तीसाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये कारखानाच सुरू केला होता. कंपनीचे हे स्पेअरपार्ट विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अंबडच्या एका पोल‌िस उपनिरीक्षकासह दोन पोल‌िस कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले केल्याच्या चर्चेने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हे प्रकरण उघड होऊ नये, यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चाही रंगली आहे.

कोणालाही पाठिशी घालणार नाही
या प्रकरणातील सर्व संशयितांची चौकशी केली जाणार आहे. राजकारणी, पोल‌िस कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कंपनीतून माल चोरताना चौधरी याला कंपनीत कोणाची साथ होती, बनावट माल कुठे विक्री केला जात होता अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरावाडीत तरुणांचे मोबाइल लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाइल व रोख रक्कम वाघाडी येथील चौघा संशयितांनी लुटून नेल्याची घटना शनिवारी (दि. ६) घडली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

या प्रकरणी वैभव पांडुरंग घोडे (रा. चेहडी पंपिंग, नाशिकरोड) याच्यासह त्याचे मित्र अमोल घुगे, आकाश भोये, शुभम आंबेकर हे शनिवारी (दि. ६) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस गेले होते. तेथे संशयित मोहन सुभाष निसाळ (२०, रा. वाघाडी पंचवटी) व त्याचे तीन साथीदार यांनी त्यांना अडविले आणि त्यांच्या खिशातील मोबाइल व रोख रक्कम असा ३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज संशयीतांनी बळजबरीने लूटून नेला. त्यात अमोल घुगे याच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल व पाच हजार रुपयांचा मोबाइल, आकाश भोये याच्या खिशातील पाच हजार रुपयांचा मोबाइल, शुभम आंबेकर याच्या खिशातील आठ हजार रुपयांचा मोबाइल व चार हजार ६०० रुपये रोकड यांच्या समावेश आहे.

पंचवटी परिसरात पेठनाका येथे व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयांची लूट, त्यानंतर दिंडोरी नाका दोन व्यक्तींकडून मोबाइल व रोख रकमेची लूट असे प्रकार घडल्यानंतर हिरावाडीतही लुटीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक धुरळा उडणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आता उमेदवारांचा कस लागणार आहे.

राज्य सरकारने निवडणूक नियमात बदल केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रथमच नव्या अधिनियमानुसार पहिली सार्वत्रिक निवडणूक सटाणा व नामपूर बाजार समितीची होत आहे. या निवडणुकीविषयी संपूर्ण जिल्ह्यात उत्साह शिगेला पोहचला आहे. पूर्वी ग्रामपंचायत, सोसायटी गटांतून होणाऱ्या निवडणुकीत बोटावर मोजण्याइतके मतदार असल्याने एका ठराव‌कि गटाची व पक्षांची सत्ता बाजार समितींवर असायची. या बाबीला शह देण्यासाठी शासनाने कसेल त्याची जमीन या धर्तीवर सातबारा असेल तो शेतकरी मतदार, हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून निवडणूक अधिनियमात बदल केले. त्यामुळे या दोन्ही बाजार समितींच्या निवडणुकीत प्रथमच दहा गुंठेधारक शेतकरीही मतदानास पात्र ठरणार आहे. परिणामी वर्षानुवर्षे बाजार समितीत ठाण मांडून बसलेल्या संचालकांना यामुळे धक्का बसणार आहे.

याद्या तयार करणे सुरू

शासनाने बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांना सभासद करण्याचा निर्णय घेतल्याने ते शेतकरीही मतदानात सहभागी होतील. सध्या सटाणा व नामपूर बाजार समितीसह जिल्हा निवडणूक विभाग मतदार याद्या करण्याचे काम करीत आहे. बागलाण तहसीलदार यांच्या दालनात देखील या संदर्भातील कामांनी वेग घेतला आहे. येत्या १२ जानेवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी निश्चित होईल. सटाणा तालुक्यात सध्या १ लाख ७० हजार शेतकरी खातेदार आहेत. त

्यातील दहा गुंठे शेतजमीन ज्यांच्या नावावर आहे ते यावेळी मतदान करू

शकणार आहेत.

सध्या प्रशासकीय मंडळ

आघाडी सरकारच्या कार्यकाळात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर बाजार समिती अस्त‌त्त्विात आली. सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ७५ गावांचा समावेश आहे. तर नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ९६ गावांचा समावेश आहे. विभाजनानंतर ३० एप्रिल २०१५ पासून १८ जुलै २०१६ पर्यंत सटाणा व दिंडोरी येथील सहाय्यक निबंधक कामकाज बघत होते.

भारतीय जनता पक्षांची सत्ता आल्यानंतर १९ जुलै २०१६ रोजी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची प्रशासकीय मंडळात वर्णी लावण्यात आली. ते प्रशासकीय मंडळ आजही कार्यरत आहे. नव्या अधिनियमानुसार बाजार समितीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राध‌किरणाच्या माध्यमातून होत आहे. यात गावनिहाय खातेदारांची संख्या विचारात घेऊन गावांचे एकुण १५ गणांमध्ये विभाजन होणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचे गणांमध्ये विभाजन करतांना प्रत्येक गणात साणारण समान खातेदार संख्या विभागण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोण होणार सभापती?

$
0
0

मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापत‌पिदासाठी येत्या १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. सध्यस्थितीत शिवसेना-भाजपमधील ताणलेले संबंध व माजी सभापती प्रसाद हिरे यांची भूमिका यामुळे सभापत‌पिदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे हे कामकाज पाहणार आहेत. १८ जानेवारी रोजी दुपारी बारापासून निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. यात नामनिर्देशनपत्र दाखल करणे, त्याची छाननी, अर्ज माघारी आणि गरज असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाईल. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीत कुडकुडत होते नवजात अर्भक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील कर्हे-देवळाणे रस्त्यावर बुधवारी पहाटे पुरूष जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर कडाक्याच्या थंडीत त्याला शेतात टाकून त्याच्या आईने पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्या नवजात शिशूच्या आईचा शोध घेण्याचे आव्हान जायखेडा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

तालुक्यातील कर्हे-देवळाणे रस्त्यावर इच्छामणी गणपती मंदिराजवळ युवराज श्रावण काकुळते राहतात. ते नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता उठून गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना पुरूष जातीचे जिवंत अर्भक दिसले. प्रचंड थंडीत कोणत्याही कापडाविना अर्भक कुडकुडत होते. साधारण तीन ते चार तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असावा. काकुळते यांनी ताबडतोब आपल्या पत्नीला बोलावून अर्भकाला पांघरून घातले. तसेच पोलिसपाटील अशोक अहिरे यांना माहिती दिली.

थोड्याच वेळात या अर्भकाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्या अर्भकाची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी घेतली ‘मांजा हटवा, पक्षी वाचवा’ची शपथ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

मकरसंक्रांतीचा सण जवळ आला की पतंगप्रेमींना पतंगोत्सवाचे वेध लागतात. मात्र निरनिराळ्या आकराचे पतंग उडविण्यासाठी पक्ष्यांसाठी घातक असलेला मांजा वापरजा जातो. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर करू नये, असे आवाहन शहरातील वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

‘मांजा हटवा, पक्षी वाचवा’ असा संदेश प्राथमिक शाळेतील मुलांनी दिला आहे. पतंग उडवण्यासाठी मांजाचा उपयोग केला जातो. मांजावर नियमाने बंदी असली तरीही पतंगाने आभाळात उंच भरारी घेण्यासाठी मांजाचा सर्रास वापर केला जातो. अशा पतंगप्रेमींना या चिमुरड्यानी केलेले आवाहन विचार करायला लावणारे आहे.

या आनंदाच्या उत्सवात नायलॉन व काचेच्या तसेच धातूमिश्रित मांजामुळे पक्ष्यांच्या पंखांना दुखापत होते. अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. तसेच या मांजामुळे दुचाकीस्वारांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी मांजामुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी शिक्षक गोरख सानप यांनी मांजामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. मांजामुळे घडलेल्या अपघातांची तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांची वृत्तपत्रातील कात्रणे दाखवली. शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी विद्यार्थ्यांना मांजामुक्तीची शपथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांदेपालटाचा इशारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या कारभारात एकच आमदाराची सुरू असलेली चलती, पदाधिकाऱ्यांची गटबाजी अन् सैराट कारभारामुळे शहरात भाजपची बदनामी होत असल्याचे इनपूट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. खासदार आणि आमदारांच्या एका गटाने पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या एकूणच कंट्रोलची कहानी मुख्यमंत्र्यांकडे विशद केल्यानंतर त्यांनी दोन्ही गटांना गटबाजी थांबवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर खांदेपालटाची तयारी करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांना भाजपला पूर्ण बहुमत दिले. परंतु महापालिकेत नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सैराट कारभारामुळे मुख्यमंत्र्यांवर आता तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. शहरात तीन आमदार असतांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत फक्त पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहराध्यक्ष सानप यांच्याच आदेशाने कारभार सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे अन्य आमदार आणि खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे. महाजन यांनी पालकत्वाचे अधिकार सानप यांच्याकडे हस्तांतरीत केल्याने महापालिकेत निर्णय घेतांना अन्य आमदारांना तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पालिकेतील कारभारावर विश‌ष्टि गटाचाच दबदबा असल्याने भाजपच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या आहेत. तर महापालिकेतील महापौरांसह, पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली गटबाजी, अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीमुळे पालिकेचा कारभार भरकटला आहे. त्यातच पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पालिकेची बदनामी होत असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचल्या आहेत. आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.

यापार्श्वभूमीवर खासदारांच्या नेतृत्वाखालील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उश‌रिापर्यंत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांनी टाळी एका हाताने वाजत नसल्याचे सांगत, तक्रारकर्त्यांनाही फटकारले. तर विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भरकटलेल्या कारभारावरही बोट ठेवत यापुढे तक्रारी खपवून घेणार नसल्याचा दम भरला. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.

त्यामुळे कारभारात सुधारणा करा, अन्यथा कठोर निर्णय घेवून अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केली. पदाधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचा सल्ला देत, वाद टाळण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच विकासकामांना प्राधान्य देण्याचा सल्ला देत, परिस्थिती सुधारली नाही तर खांदेपालटाची तयारी करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.


आमदार सानपांना दिला सबुरीचा सल्ला

महापालिकेच्या कारभारात सध्या आमदार बाळासाहेब सानप यांचा शब्द प्रमाण मानला जातो. सानपांकडून आलेला शब्द हा पालकमंत्र्यांकडून तर पालकमंत्र्यांचा शब्द मुख्यमंत्र्याकडून आल्याचे प्रमाण मानले जाते. परंतु अशी स्थिती भासवली जात असल्याचा दावा दोन आमदारांनी केला असून, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावाने नको ते विषय मार्गी लावले जात असल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या आहेत. महाजन, सानप यांना आवरा असा सूर तक्रारींमध्ये आल्याने मुख्यमंत्र्यांनी सानपांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असून, निर्णयात सर्वांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनोधैर्य’ची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला अथवा मुलींना मनोधैर्य योजनेतंर्गत आर्थिक मदत वाढवण्यात आली आहे. ही योजना राबवण्याचे काम आता राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत केले जाणार आहे.

पीडितांच्या पुर्नसनासाठी २०१३ मध्ये मनोधैर्य योजना सुरू केली. तसेच ही योजना राबवण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवण्यात आले. या योजनेतंर्गत तीन लाख रुपयांपर्यंतची मदत करण्यात येत होते. मात्र, ३० डिसेंबर रोजी सरकारने मनोधैर्य योजनेत महत्त्वाचा बदल केला. आता या योजनेला सुधारित मनोधैर्य योजना म्हटले जाते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राज्य सरकारने हा बदल केला आहे. यापूर्वी पीडितांना गुन्हा दाखल झाल्यानंतर किमान दोन लाख तर विशेष प्रकरणात ३ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जात होती. ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुन्हेगारी क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळामार्फत प्रत्येक प्रकरणाची शाहनिशा करून मदत दिली जात होती. यात बराच कालपव्यप होत होता. तसेच रक्कमही पुरेशी नसल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंत्रालय समितीच्या सूचनानंतर नवी योजना विकसित केली आहे.

असे आहेत सुधारित बदल
सुधारित मनोधैर्य योजनेनुसार, बलात्काराच्या गुन्ह्यातील विविध कलम, बालकांवरील लैंगिक आत्याचार, अॅसिड हल्ला, अनैतिक व्यापर प्रतिबंधक अधिनियमानुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १८ वर्षाखालीला मुलींना याचा लाभ मिळणार आहे. पीडितेने अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत तिला ३० हजार रुपये रक्कम मिळेल. तर उर्वरित रक्कम १२० दिवसात टप्याटप्याने दिली जाईल. सदर योजनेसाठी मागणीचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावा लागेल. अर्थसाहय्य मंजुरीपासून पूर्ण रक्कम देण्याचे अधिकार विधी सेवा प्राधिकरणास दिले आहेत. दरम्यान, जबानी फिरवणे, खोटी तक्रार अथवा गुन्हा सिद्ध न झाल्यास अर्थसाह्य वसूल करण्याचेही अधिकार प्राधिकरणास आहेत.

सुधारित मनोधैर्य योजना विधी प्राधिकरणामार्फत राबविली जाणार आहे. याबाबतचा आदेश प्राप्त झाला असून, अर्थसहाय्य तीन लाखांवरून १० लाख रुपये करण्यात आले. यामुळे जलद तसेच पारदर्शक काम होण्यास मदत मिळेल.
- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापट खोटे बोलत नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या ‘वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे,’ या टिपणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. नाशिक येथे त्यांनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. ‘बापट अस्सल पुणेकर आहेत. जुने नेते आहेत. ते कधीही खोटे बोलत नाहीत. त्यांच्या जे पोटात होते, ते ओठावर आले आहे. सरकारबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी खरी आहे,' असे सांगत राऊत यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या कारभारावर त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. वर्षभरानंतर हे सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे मागायच ते आताच मागून घ्या, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना केले. या वक्तव्याचा आधार घेत राऊत यांनी बापट यांना जोरदार टोला लगावला. बापट अस्सल पुणेकर आहेत. ते जुने नेते आहेत. कधीही खोटे बोलत नाहीत. त्यांच्या पोटात होते, ते ओठांवर आले आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आणि मुंबईतील आगीच्या घटनांवरही भाष्य केले. पुण्यातील एल्गार सभेला उमर खालिदला का बोलावलं? त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणं चुकीचे आहे. महाराष्ट्र जातीपातीत विभागला जात आहे. हे धोकादायक आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी विशेष सत्र बोलवा

देशभरातील शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र आयोजनाची ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची मागणी रास्त असल्याचे राऊत यांनी सांग‌तिले. जर तीन तलाकच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्राचे आयोजन का केले जाऊ नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार खोटे बोलून लोकांना फसवून सत्तेत आले आहे. गुजरातमध्ये मोदींचा मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. भाजपचे मंत्र गिरीश बापट याच्या तोंडूनच एका वर्षात सरकार बदलणार, असे सत्य बाहेर पडले आहे. तेव्हा राज्यात कधीही निवडणुका लागतील अशी परिस्थिती आहे. तसेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत त्यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना संपर्क प्रमुख सुहास सामंत, रवींद्र पाटील, श्रीकांत पाटील, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, नरेंद्र दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांनी प्रास्ताविकातून शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा मांडला. राऊत म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजप केवळ जाहिरातबाजी व मार्केटिंग करून सत्तेत आले आहे. गेल्यावेळी त्यांनी लोकांना फसवले.येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना फसव‌ल्यिासशिवाय राहणार नाही. राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘प्रेरणा’त साकारणार गणेशाची १२५ रुपे

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या महिला विभागाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १९ ते २१ जानेवारीपर्यंत सिटी सेंटर मॉल जवळीत लक्षिका मंगल कार्यालयात प्रेरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाशिकचे प्रसिद्ध रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी राज्यातील विविध शहरात प्रेरणा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे असून, त्यात ५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यात महिला उद्योजकांचे बचतगट सदस्यांना आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सर्वांनी सहभाग घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, शुभांगी तिरोडकर, योगिनी देशपांडे, दिपा चांगराणी, रोहिणी नायडू, डॉ. गायत्री फडे यांनी केले.
एकाच छताखाली

विविध प्रकराचे वस्त्रे, खाद्यपदार्थ, अलंकार, गृह सजावट, सौंदर्य प्रसाधने असणार आहेत. या प्रदर्शनातच चित्रकला, मोदक बनवणे, माझा बाप्पा, अथर्वशीर्ष पठण, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी, फॅशन डिझाईन, मेंदी, मेकअप, सुलेखन व वारली पेटिंगवरही कार्यशाळा होणार आहे. त्याचप्रमाणे पतंग महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीसह महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

असा असेल विश्वविक्रम

नाशिकचे रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर गणेश गीत व गणपती अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आगळा वेगळा ठरणार आहे. प्रत्येक रांगोळी ही दीड बाय दीड फुटाची असणार आहे. १९ तारखेला पहाटे पाचपासून या रांगोळीला सुरुवात होणार असून, ११ तासात १२५ रुपे रांगोळीत साकारले जाणार आहे.

रौप्यमहोत्सवानिमित्त रेकॉर्ड

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवानिमित्त गणेश जयंतीचे औचित्य साधून हा विश्वविक्रम केला जाणार आहे. त्याची नोंद जिनीयस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअगोदर १११ रुपे साकारण्याचे रेकॉर्ड असून त्यासाठी वेळ मात्र जास्त लागला होता. यावेळेस देशपांडे कमी वेळात ही कलाकृती सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षणाकडे ‘पाटबंधारे’चे दुर्लक्ष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेली ५० वर्षे पाण्यावाचून होरपळणाऱ्या मनमाडकरांनी शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल न घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत मनमाड बचाव कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनमाड नगरपालिकेने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनमाड बचाव कृती समितीने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्याकडे केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वात गंभीर पाणीटंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी करंजवन-मनमाड जलयोजना प्रस्तावित केली आहे. मनमाड बचाव कृती समितीने नगरपालिकेकडे करंजवनच्या पाण्यासाठी पाठपुरावा चालविलेला आहे. याबाबत पालिकेनेही सातत्याने पालखेड पाटबंधारे विभागाकडे मागणीचा पाठपुरावा करूनही पालखेड विभागाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे उघड झाले आहे. पलिकेने करंजवन पाण्यावर आणि तेथे उभारल्या जाणाऱ्या जलकुंभाच्या जागेसाठी तातडीने आरक्षण मागावे, ५० वर्षांच्या पाणीटंचाईच्या होरपळीतून मनमाडकरांना वाचवावे, अशा अर्थाचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांना दिले आहे. पाणी आरक्षण तातडीने मिळवण्यासाठी मनमाड बचाव कृती समिती पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे धाव घेणार असल्याचे समितीतर्फे पुंडलिक कचरे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेरेस हॉटेलांवर नजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईतल्या कमला मिल कंम्पाउंडमधील इमारतीतल्या रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर नगररचना विभागाने शहरात टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल्सचे सर्वेक्षण केले आहे. यातून शहरात तब्बल ३८ अनधिकृत हॉटेल आढळून आल्या आहेत. त्यामध्ये शहरातील बड्या हॉटेल्सचा समावेश असून, त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे टेरेसवर पब चालविला जात असल्याचे समोर आले आहे. नगररचना विभागाने कारवाईसाठी हॉटेल्सची यादी अतिक्रमण विभागाकडे सुपूर्द केली असून, विभागाने या हॉटेलचालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिकमध्ये टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल्स व रेस्टांरटवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली होती. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी यासंदर्भात नगररचना विभागाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाच्या पथकाने गेल्या आठवड्यात पथकाद्वारे सर्वेक्षण मोहीम राबवली होती.
तब्बल ३८ हॉटेलचालकांनी टेरेसवर अनधिकृतपणे रेस्टांरट व बार सुरू केल्याचे समोर आले. यासंदर्भातील कोणतीही परवानगी महापालिका तसेच अग्निशमन विभागाकडून घेतलेली नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या हॉटेलचालकांनी नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे टेरेसवरच व्यवसाय सुरू केले आहेत. काही हॉटेलचालकांनी टेरेसवर बेकायदेशीरपणे हॉटेल्स सुरू केले आहेत. त्यामध्ये शहरातील प्रतिष्ठितांचाही समावेश आहे. अतिक्रमण विभागाने या सर्व हॉटेल्सचालकाना नोटिसा बजावल्या आहेत. काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.

हॉटेल संख्या
पश्चिम विभाग- १६
पंचवटी- ६
सिडको - ६
नाशिकरोड- ४
नाशिक पूर्व - १
सातपूर- ६

या हॉटेलांना नोटीस
पंचवटी विभागातील हॉटेल न्यू पंजाब, हॉटेल प्रेस्टिज पॉइंट, हॉटेल मजा, हॉटेल कारवा आणि हॉटेल राऊ, नाशिक पश्चिम विभागातील हॉटेल प्लेअर अ‍ॅण्ड बार, एम. डी. सफायर, रूफ टेक हॉटेल, व्हायटेक्स हॉटेल अ‍ॅण्ड बार, एन्टर द ड्रॅगन, फर्माइश हॉटेल, हॉटेल पतंग, हॉटेल याहू, कोपा कबाना हॉटेल, हॉटेल मनोरथ, हॉटेल २१ सेंच्युरी, बार्बीक्यू बिस्ट्रो, हॅप्पी नाशिक टाइम्स, टॉक ऑॅफ द टाऊन, डी सेलर टेरेस हॉटेल, टेरेस हॉटेल सम्राट, सिडको विभागातील शिवसागर, सुयोग हॉटेल, साई राज दरबार, साई विजय, न्यू पद्मा हॉटेल, पाथर्डी परिसरातील हॉटेल पोर्टिको, हॉटेल हेमराज व बार रेस्टॉरंट, हॉटेल द पाल्म, हॉटेल सेलिब्रेशन, हॉटेल ग्रॅण्ड अश्विन, नाशिकरोड विभागातील हॉटेल श्रद्धा, हॉटेल नालंदा, स्कायबार आणि गायकवाड क्वालिटी फूडस्, नाशिक पूर्व विभागातील हॉटेल कामतचा यात समावेश आहे.

मटा भूमिका
मुंबईतील कमला मिलमधील हॉटेल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या नाशिक महापालिकेने आता शहरातील टेरेसवरील हॉटेलांकडे मोर्चा वळविला हे चांगलेच झाले; पण कोणतीही सुरक्षा मानके न पाळणारी ही हॉटेल्स इतक्या दिवस चालू कशी राहिली, याचीही चौकशी व्हावी. नियमबाह्य आस्थापने चालू असताना डोळेझाक करणाऱ्यांनाही जबाबदार धरायला हवे. नाशिकमध्ये मध्यंतरी टेरेसवरील काही हॉटेलांवर कारवाई झाली होती. पण नंतर सगळं शांत झालं. आता तरी कारवाई करताना पुढे अशा बेकायदा आस्थापनांना थारा मिळणार नाही, याची काळजी घेतली तरच या कारवाईला काही अर्थ राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसची धाव १५ वर्षे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरासह जिल्ह्यात धावणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनांचे आयुर्मान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नुकतेच निश्चित केले. त्यासंदर्भातील नियमावली लागू झाली असून, दि. १ जुलै २०१८ नंतर रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. स्कूल बससाठी १५ वर्षे, तर रिक्षांसाठी २० वर्षे आर्युमान निश्चित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस वा स्कूल व्हॅनसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने काही नवीन नियम आखले आहेत. या नियमांमुळे स्कूल बस वा व्हॅनसाठी १५ वर्षांपर्यंतच परवाना दिला जाणार आहे. दुसरीकडे एक वर्ष वयोमान असलेल्या वाहनांचे रुपांतर स्कूल व्हॅनमध्ये होणार आहे.

शहरासह जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांची वाहतूक करण्याची जबाबदारी स्कूल बसेससह स्कूल व्हॅनवर आहे. मात्र, यासाठी सर्रास जुन्या वाहनांचा वापर होत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. मागील वर्षी अशाच एका व्हॅनला नाशिकरोड परिसरात आग लागली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वाहनांची, तसेच परमिटची कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित, तसेच आरमदायी वाहतूक शक्य होईल, अशी अपेक्षा ‘आरटीओ’स आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात काही वर्षांपूर्वी अवघ्या ३०० स्कूल बसेसची नोंद होती. आता हा आकडा एक हजार ८००च्या घरात पोहोचला असून, नवीन वाहने खरेदी करण्याकडे व्यावसायिकांचा कल वाढलेला दिसत आहे.

एक वर्ष वापरापर्यंतच दर्जा
यापूर्वी चार ते पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ वापरण्यात आलेल्या वाहनांना स्कूल बसमध्ये रुपांतरित करण्यात येत होते. परमिट मिळाले, की वाहनावर पिळवे पट्टे मारले जातात. मात्र, आता यापुढे जे वाहन स्कूल बस अथवा व्हॅन म्हणून वापरले जाणार आहे ते रुपांतरित करताना त्याचा वापर फार तर एक वर्ष झालेला असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा अधिक काळ वापरलेल्या वाहनांना स्कूल बसचा दर्जा मिळणार नाही. दुसरीकडे या वाहनांना १५ वर्षांची कालमर्यादा असून, त्यानंतर स्कूल बसचे परमिट रद्द केले जाणार आहे.
रिक्षा, टॅक्सी, स्कूल बसेस किंवा व्हॅन आदी प्रवासी वाहतूक करणारी वाहने ही प्रवासीकेंद्रित असतात. अशा वाहनांसाठी परवाना असतो. मात्र, हा परवाना वाहने अगदीच निर्जीव होईपर्यंत वापरता येत नाही. एका ठराविक मर्यादेनंतर सदर वाहनांचा सार्वजनिक हा दर्जा रद्द होतो, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीने ही वयोमर्यादा निश्चित केली आहे. वाहनांची निश्चित कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. ही मर्यादा संपल्यानंतर वाहनचालकाने नवीन वाहन घेतल्यास प्रवाशांच्या जीविताचा किंवा प्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार नाही. राज्य सरकार, राज्य परिवहन प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे स्थानिक पातळीवरील काही गरजा लक्षात घेऊन यात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. ऑटो रिक्षांना ही कालमर्यादा २० वर्षे घालून देण्यात आली आहे. स्कूल बससाठी १५ वर्षे असून, त्यानंतर सदर वाहनास विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार नाही, तसेच कूल कॅब वाहने १२ वर्षांनंतर प्रवाशांची वाहतूक करू शकणार नाहीत. ही कालमर्यादा निश्चित करताना प्रवासी आणि प्रदूषण याकडे लक्ष पुरविण्यात आले आहे.

परमिट करावे सरेंडर
नवीन वाहनांच्या सेवेसाठी प्रवासी जितके पैसे देतील तितकेच पैसे जुन्या वाहनांसाठी देणे उचित ठरत नाही. त्यामुळे परवान्याची मुदत ठरविण्याऐवजी वाहनाची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने नवीन वाहन खरेदी करावे किंवा आपले परमिट सरेंडर करावे. आजमितीस अशी वाहने रस्त्यावर असून, संबंधितांनी ३० जून २०१८ पर्यंत वाहनांच्या भवितव्याबाबत विचार करावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी स्पष्ट केले आहे.

--

परिवहन प्राधिकरणाचे महत्त्वाचे निर्णय

-टुरिस्ट कॅबसाठी परवाने देणे अथवा नूतनीकरणाचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना

-मोटार कॅब संवर्गातील वाहनांवरील जाहिरात करणे

- बॅटरीवर चालणाऱ्या इ रिक्षा, तसेच इतर वाहनांची सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये नोंदणी करणे

- रिक्षा परवानाधारक इतर परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात स्थलांतरित झाल्यास नोंद करण्याबाबत कार्यालयांना अधिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मायको’चे डॉक्टर्स धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर येथील मायको रुग्णालयातील सावळागोंधळ अचानक पाहणी दौऱ्यावेळी उघड झाल्याने महापालिकेचे आरोग्य विभागाचे सभापती सतीश कुलकर्णी, उपसभापती योगेश शेवरे व सदस्यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
गुरुवारी अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यात रुग्णालय परिसरात पसरलेले सांडपाणी, वाढलेल्या वेली, महिलांसाठी असलेल्या शौचालयांची झालेली दुरवस्था आदी बाबी उघड झाल्याने आरोग्य सभापती कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी मायको रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. रुग्णालय परिसरात पुरेशी स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप यावेळी महिला रुग्णांकडूनच करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात बॉश (मायको) कंपनीने छोटेसे रुग्णालय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केले. कालांतराने महापालिकेने मायको रुग्णालयात डॉक्टरांची नेमणूक करीत गरजू महिला रुग्णांसाठी उपचारांची व्यवस्था केली. परंतु, मायको रुग्णालयात स्वच्छता राखली जात नसल्याचा आरोप अलीकडे केला जात आहे. सातपूर पंचक्रोशीतील गरजू महिलांची मायको रुग्णालयात रोजच गर्दी होत असते. परंतु, रुग्णांकडूनच मायको रुग्णालयात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला जात होता. या पार्शभूमीवर महापालिकेचे आरोग्य सभापती कुलकर्णी, उपसभापती शेवरे व सदस्यांनी अचानक मायको रुग्णालयाच दौरा केला. त्यात अनेक त्रुटी आढळल्याने त्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

--

रुग्णांनीच मांडल्या तक्रारी
या दौऱ्याप्रसंगी महिलांसाठी शौचालयाची स्वच्छता करण्यात येत नसल्याची बाब समोर आली. उपचारांसाठी दाखल असलेल्या महिला रुग्णांनीच सभापती कुलकर्णी यांच्याकडे रुग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याबाबत तक्रारी मांडल्या. त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर उघड्यावर वाहणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याचे आदेश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला दिले.

--

मायको रुग्णालयाचा अचानक पाहणी दौरा केला. यावेळी महिला रुग्णांनीच असुविधांसंदर्भात तक्रारी केल्या. याबाबत महापालिका प्रशासनाला आदेशित करीत स्वच्छता राखण्याचे सांगितले आहे. परिसरात वाढलेल्या वेली व उघड्यावर वाहणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
-सतीश कुलकर्णी, आरोग्य सभापती महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images