म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत ७५ कोटींच्या वसुलीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने कर संकलन व मूल्य निर्धारण विभागाचे कर्मचारीच बीएलओसाठी पळवले आहेत. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत वसुलीचे उद्दिष्ट कसे गाठायचे असा सवाल करीत आयुक्तांनी कर्मचारी परत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांना पुन्हा डिवचत घरपट्टी विभागातील उर्वरित १९ कर्मचारीही पळवले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेतील शीतयुद्धाची चर्चा असून, दोघांच्या भानगडीत पालिकेच्या वसुलीचा गाडा रुतला आहे.
महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १०५ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टे ठरवले असून, नऊ महिन्यांत ६२ कोटी ६३ लाख रुपये वसुली झाली आहे. अजूनही ४३ कोटी वसुली होणे बाकी आहे. पाणीपट्टीचे उद्दिष्टे ४२ कोटी असून, त्यापैकी २७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचीही शिल्लक दहा कोटींची वसुली करायची आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत जवळपास ७५ कोटींची वसुली करण्याचे आव्हान विविध कर संकलन विभागासमोर आहे. त्यासाठी महापालिकेने दोन हजार रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या ८८ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.
पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ग्राहकांना नोटिसा काढून थकबाकी वसुलीचे काम सुरू करण्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. परंतु, या प्लॅनला जिल्हाधिकारी कार्यालयाने दृष्ट लावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या घरपट्टी विभागातील १२२ कर्मचाऱ्यांपैकी १०३ कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी महापालिकेची परवानगी न घेताच परस्पर त्यांच्यावर निवडणूक मोहिमेची जबाबदारी टाकली आहे. घरपट्टी विभागाकडे अगोदरच कर्मचाऱ्याचा तुटवडा असताना उर्वरित कर्मचारीही पळविल्याने आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून घरपट्टी विभागाचे कर्मचारी परत देण्याची मागणी केली होती. इतर विभागाचे कर्मचारी घ्या, पण घरपट्टीचे घेऊ नका अशी विनंती पत्राद्वारे केली होती. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने कर्मचारी परत करणे तर सोडाच या विभागात उरलेल्या १९ कर्मऱ्यांची पुन्हा बीएलओ म्हणून ऑर्डर काढून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
आयुक्तांपुढे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान
कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिने त्यांच्याकडे निवडणुकीचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे या काळात वसुली ठप्प होणार आहे. तीन महिन्यांत ७५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्टे गाठायचे कसे असा प्रश्न विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.
अडचणीत आणण्याचा प्रयत्न
राज्य सरकारने अगोदरच घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुलीचे फर्मान काढले असून, वसुलीत अपयश आल्यास थेट आयुक्तांच्या सर्विस बुकमध्ये त्याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे वसुलीची थेट जबाबदारी असल्याने आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु, दोघा अधिकाऱ्यांमध्ये अगोदरच कशावरून तरी वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात मुद्दाम आयुक्तांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट