समाजाच्या कार्यात बऱ्याचदा काही ठराविक लोकच कायम पुढे दिसतात. मात्र, समाजाचा होत चाललेला वटवृक्ष पाहता प्रत्येक समाजबांधवाने आता समाजकार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश सुरते यांनी केले.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगीत ते बोलत होते. या अधिवेशनातून मिळालेला संदेश आत्मसात करून समाजाच्या उत्कर्षासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. समाजाने सर्वच क्षेत्रात आघाडी घेण्याची गरज आहे, असेही अॅड. सुरते यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्रात सकाळपासून विविध ठरावांवर चर्चा करून त्यांना समाजबांधवांनी संमती दिली. यात प्रामुख्याने समाजाच्या वतीने करावयाची कामे त्यात वधूवर मेळावे, आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शिबिर, समाजाच्या संस्थेचे कार्य करण्यासाठी आर्थिक नियोजन या सारख्या अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. सिडकोतील लक्ष्मी धवल मंगल कार्यालयापासून अधिवेशनानिमित्त भव्य पालखी काढण्यात आली. या पालखीत समाज बांधव व विविध वेशभूषा केलेले अबालवृद्ध सहभागी झाले.
अधिवेशनात संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून सुनील निकुंभ यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विजय बिरारी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर निकुंभ यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. समाजातील प्रत्येकाच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडणे शक्य होणार आहे. तळागळापर्यंत समाजाचे कार्य नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निकुंभ यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट