म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद शहरातही उमटले असून, सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. या वेळी आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मंगळवारी सायंकाळी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बंदोबस्ताबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की पोलिस प्रशासन संपूर्णपणे सतर्क झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन, सातपूर दोन, सिडको १, तर वडाळा नाका परिसरात १ अशा सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर शहरात दहशत पसरवणाऱ्या २० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळपासून शहरात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे शहरातील गंजमाळ, अंबड, परिसरात किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे होमगार्ड व एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्ल्या जात आहेत.
नाशिकरोडला परिस्थिती नियंत्रणात
नाशिकरोड ः पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दोन गटांत झालेल्या तणावाचे पडसाद मंगळवारी नाशिकरोडमध्येही उमटले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. जेलरोडच्या दसक भागात समाजकंटकांनी दोन बसवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, तातडीने पोलिस कुमक आल्याने वातावरण निवळले.
पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन यांनी सहकाऱ्यांसह कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बंदोबस्तासाठी एसआरपीएफ, होमगार्डसची मदत घेण्यात आली आहे. शांतता कमिटीची बैठकही घेण्यात येत आहे.
जेलरोडचे भीमनगर, देवळाली गाव, बिटको चौक, दसक, पंचक, राजवाडा या भागात सोमवारी रात्रीपासून तणावसदृश परिस्थिती होती. आंबेडकर पुतळा परिसरात काही दुकानदारांनी खबरदारी म्हणून सकाळी दुकाने बंद ठेवली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिटको चौक, सुभाषरोड, दसक, जेलरोड, भीमनगर, गोरेवाडी, देवळाली गाव, विहितगाव या संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महसूल अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांना निवेदन दिले. भीमा कोरेगाव येथील घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, सुनील वाघ, पवन पवार, दिलीप दासवानी, भारत निकम, रामबाबा पठारे, नारायण गायकवाड, फकीरा जगताप, विलास पवार, गुंफाताई भदरंगे, सुरेखा भंडारे, अनिल गांगुर्डे, गोटीराम पवार, सुनील यशवंत, दिनेश जाधव, किशोर खडताळे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. कोरेगाव येथे समाजकंटकांनी दगडफेक करीत वाहनांचे नुकसान केले.
बंदचे आवाहन
नाशिक जिल्ह्यात तीन जानेवारी रोजी बंदची हाक दिली असून, यात सहभागी होण्याचे आवाहन प्रकाश बागूल व शशिकांत उन्हवणे यांनी केले आहे. निवेदनावर सागर जाधव, रवींद्र मोकळ, हरीश भडांगे, नंदकिशोर बागूल, आकाश भालेराव, संजय भालेराव, रवींद्र जाधव, विशाल घेगडमल, प्रतिभा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट