Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / गंगापूररोड

भरधाव वेगातील टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी गिरणारे मार्गावरील दुगाव चौफुली परिसरात झाली. अपघातानंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसासह अग्निशमन दलाने धाव घेऊन परिस्थिती नियत्रंणात आणली.

बाबुलाल रतन बोबडे (२० रा. वडगाव, ता. जि. नाशिक) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो महावीर तंत्रनिकेतन कॉलेजचा विद्यार्थी असून, गुरूवारी सकाळी तो आपल्या दुचाकीने (एमएच १५ बीएम ७९८६) कॉलेजला जात होता. दुगाव चौफुलीपासून काही अंतरावर मखमलाबादकडून गिरणाऱ्याकडे भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (एमएच १५ एजी १६५१) त्याच्या दुचाकीस धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर टेम्पोचालकाने वाहन सोडून फरार झाला. ही घटना परिसरातील समजताच दुगावसह गिरणारे आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती देऊनही पोलिस वेळेत न पोचल्याने संतप्त जमावाने कटलरी सामान भरलेल्या टेम्पोस आग लावली.

भर रस्त्यावर उभा असलेला टेम्पो आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या प्रकाराची दखल घेत दंगल नियंत्रण पथकासह मुख्यालयातील पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले. जमावाला पांगवत आगीच्या भक्षस्थानी सापडलेला टेम्पो विझविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र यात अपयश आल्याने अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. सातपूर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ पोहचून आग आटोक्यात आणली.

पोलिस कर्मचारी संजय सांगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरुद्ध टेम्पो पेटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर बोबडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पोचालकाविरुद्धही तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुटुंब पद्धतीवर कोरडे ओढणारे ‘सिंगल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत ग्लोबल सीनिअर व्हाइस प्रेसिडेन्ट असलेली मैत्रेयी विवाह करायला तयार नसते. आयुष्यभर एकट्यानेच रहायचे असा तीतिचा निर्धार असतो. त्यात एकल माता होण्याच्या निर्धाराची भर पडते; मात्र तिची आई तिचा विवाह करण्याचा निर्धार करते. त्यात तिला चुलत मावशीची साथ लाभते. योगायोगाने त्याच वेळी अमेयचे स्थळही येते; मग त्या दोघी मैत्रेयीला बोहल्यावर चढवण्यासाठी कोणते दिव्य करता त्यासाठी आत्महत्या करण्याची धमकी देऊन मैत्रेयीच्या एकल राहण्याला तिची आई कशी पाठिंबा देते याची कथा म्हणजे ‘सिंगल’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्य महोत्सव प. सा. नाट्यगृह येथे सुरू आहे. नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘सिंगल’ हे नाटक गुरूवारी सादर झाले. मैत्रेयीच्या मनात विवाह संसार, सासर याबाबत एवढी तिडीक का असते ती ‘सिंगल मॉम’ व्हायचे का ठरवते? आणि तिची आई या निर्णयाला का पाठिंबा देते? या प्रश्नांची उत्तरे या नाटकात मोठ्या रंजकतेने मिळतात. भविष्यातील स्त्री जीवनाचा वेध घेणारे हे नाटक आजच्या पुरुष प्रधान कुटूंब पद्धतीवरही सणसणीत कोरडे ओढणारे आहे. आजची कर्तृत्ववान स्त्री कशी आहे? व भविष्यात कशी असेल याची प्रत्यकारी चुणूक ‘सिंगल’ या नाटकात पहायला मिळते. स्त्रीयांचे पारंपरिक साचेबंध अनुभव आणि त्यात अधुनिक विचारांच्या तरुणीची होणारी घुसमट नाटककार मानसी देशमुख यांनी प्रत्ययकारकने मांडलेली आहे. भारतीय विवाह संस्था, कुटुंब संस्थाही अत्यंत कर्मठ ताठर आहे. हे यातून दाखवण्यात आले.

कामगार कल्याण केंद्र एकलहरे संस्थेच्या या नाटकाचे लेखन मानसी देशमुख यांनी केलेले असून दिग्दर्शक अर्चना नाटकर यांचे होते. शोभा दुसाने, सविता जोशी, सोनाली हवराळे, साक्षी गांगुर्डे, सानिक मेहेत्रे, अमित जाधव यांनी भूमिका केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त

$
0
0

नाशिक
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्याजवळ पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. २५ रायफल्स, १९ बंदुका आणि ४ हजार काडतुसं एवढी शस्त्रास्त्र घेऊन तस्कर मुंबईकडे जात होते. त्याची 'टिप' मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून तिघांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर बोलेरो कारचा चालक पैसे न देता रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पसार झाला. या घटनेची माहिती पंपचालकाने लगेचच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिली. त्यानंतर सगळी सूत्रं वेगानं हलली. प्रमुख नाक्यांवरील पोलिसांना सतर्क करण्यात आलं आणि प्रत्येक गाडीची तपासणी सुरू झाली.

चांदवड टोक नाक्याजवळ पोलिसांनी बोलेरो कारला हात दाखवला, तेव्हा चालकानं गाडी त्यांच्या अंगावरच नेली. तिथेच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कारची कसून तपासणी केली. तेव्हा, रायफल्स, गावठी कट्टे आणि काडतुसांचा मोठा साठा त्यांनी जप्त केला. त्यानंतर, नाशिक-मालेगाव भागातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नेमकी ही शस्त्रं कुठून आली, मुंबईत कशासाठी नेली जात होती, या तस्करीमागे कोण आहे, याची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाची सफाई उघड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत तब्बल ११ हजार १२१ रुपये खर्चून खरेदी केलेल्या डस्टबिनबाबत पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी आता अफलातून जावईशोध लावला आहे. शहर कचराकुंडीमुक्त असताना केवळ स्वच्छतेच्या २२ गुणांसाठी १८९ डस्टबिन खरेदी केल्याचा हास्यास्पद खुलासा बुकाने यांनी केला आहे. विशेष म्हणजे या डस्टबिन एकाच दिवसासाठी खरेदी केल्या असून, सर्वेक्षण आटोपल्यानंतर त्या दुसऱ्याच दिवशी शाळा व वसत‌िगृहांना भेट देण्यात येणार असल्याचा अजब दावा त्यांनी केला. यावरून भाजपच्याच सत्तेतील अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेतून आपले खिसे भरून घेत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नाशिक महापालिकेच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक ४ जानेवारीला नाशिकमध्ये येत आहे. या पथकाच्या पाहणीनंतर देशभरातून नाशिकचा स्वच्छतेतील गुणांकन समजणार आहे. या स्पर्धेत पास होण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी अफलातून शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. या सर्व्हेक्षणात महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी काय उपाययोजना केल्यात, यासाठी २२ गुण आहेत. सदर गुणप्राप्तीसाठी महापालिकेने शहरातील व्यापारीपेठांमध्ये १८९ ठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन नग ५५ लिटर्स क्षमतेच्या डस्टबिनची खरेदी तब्बल ११ हजार १२१ रुपयांत करण्यात आली आहे. या खरेदीवर शिवसेनेने आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांची भेट घेतली.

यावेळी डॉ. बुकाने यांनी आपली खरेदी योग्य ठरविण्यासाठी अजबच तर्कट मांडल्याने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही हसू आवरले नाही. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जानेवारीत परीक्षा होणार असून २२ गुण मिळविण्यासाठी या डस्टबिन बसविल्याचा दावा डॉ. बुकाने यांनी केला. एका दिवसाची परीक्षा झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी काढून घेऊन शाळा, महिला वसतिगृहे यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ २२ गुणांसाठी शहराला पुन्हा कचराकुंडीयुक्त शहर करून पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’चीही फसवणूक आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

..म्हणे ६०० डस्टबिनची गरज!

आरोग्य विभागाने स्वच्छ भारत अभियानंतर्गत २२ गुण मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी केल्या आहे. परंतु शहरात अशा प्रकारच्या एकूण ६०० डस्टबिन खरेदी करण्यात येणार असल्याचेही अजब उत्तर आरोग्याधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे ही कचऱ्यातील हात की सफाई करण्याच्या आरोग्याच्या प्रकाराने स्वच्छतेच्या निधीतही बनवेगिरी केली जात असल्याचे चित्र आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या अजब उत्तराने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनीही डोक्यावर हात मारून घेतला आहे. त्यामुळे एकूण आरोग्याचा कारभाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक जाणिवांचे व्रतस्थ व्यासपीठ

$
0
0

सामाजिक जाणिवांचे व्रतस्थ व्यासपीठ

---

सक्रिय नेटिझन्स आणि अन्य समाजघटकांना सकारात्मक सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या सोशल नेटवर्किंग फोरम या व्यासपीठाचा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १५ डिसेंबर) साजरा झाला. त्यानिमित्त समाजसेवेप्रति व्रतस्थ अशा सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांच्याशी केलेली बातचीत...

---

-सोशल नेटवर्किंग फोरमची प्रेरणास्थाने कोणती?

-छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा व्यक्ती सोशल नेटवर्किंग फोरम (सोनेफो)च्या सदस्यांचे प्रेरणास्थान आहेत. देशासाठी ज्यांनी आपले सर्वस्व वाहिले अशा व्यक्तींना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. त्यामुळे अशा महान व्यक्तींच्या जयंतीला मिरवणुकांमध्ये नाचण्याऐवजी एखादा सामाजिक उपक्रम राबविण्याचा पायंडा फोरमने पाडला आहे.

---

-सामाजिक विषयात काम करताना लोकांकडून कसा अनुभव येतो?

-सामाजिक विषयात दोन प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. पहिला म्हणजे ज्यांच्यासाठी काम करायचे आहे ते आणि दुसरा ज्यांच्या मदतीने करायचे आहेत ते. यातील पहिला घटक साधारणपणे ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोक असतात. आमच्याकडे येण्यापूर्वी पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांसाठीसुद्धा त्यांना वर्षानुवषे झगडावे लागते. या संघर्षानंतरही पदरी काही पडत नाही, तेव्हा हे असहाय्य लोक मदतीसाठी येतात आणि त्यांच्या समस्या मांडतात. यावेळी कोणत्याही सूज्ञ व्यक्तीच्या पोटात कालवाकालव होते. त्यामुळे अशा लोकांच्या समस्या सोडवून त्यांच्या चेहेऱ्यांवरील आनंद बघण्यासाठीच फोरम हे काम करीत आहे. ज्यांच्या मदतीने हे उपक्रम राबविले जातात, ते सर्व सामाजिक भान असलेले लोक असतात. पण, त्यांना नेमके कसे योगदान द्यायचे, हे सुचत नाही. जेव्हा सोशल मीडियावर आम्ही आमच्या उपक्रमाची माहिती पोस्ट करतो, तेव्हा अशा लोकांना आपल्याला हेच तर करायचे होते, असे वाटते आणि ते मनापासून सहभागी होतात. श्रमदान, एक्स्पर्टरीज किंवा निधी अशा शक्य असेल त्या माध्यमातून उपक्रमात सहभागी होता येत असल्याने विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या आजोंबापर्यंत आमचे सदस्य आहेत. उपक्रम पूर्ण झाल्यावर त्यासंबंधीची माहिती जेव्हा आम्ही मदतकर्त्यांना सोशल मीडियावरून कळवितो तेव्हा त्यांना होणारा आनंद शब्दातीत असतो.

--

-‘सोनेफो’ची नेमकी उद्दिष्टे काय?

-सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तरुणांना देशाप्रति आपल्या जबाबदारीचे भान करवून देणे आणि ज्यांच्यापर्यंत स्वतंत्र भारताच्या विकासाची फळे पोहोचली नाहीत अशा लोकांना विकासगंगेत सहभागी करून घेणे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना, अनाथालयांना, वृद्धाश्रमांना मदत करणे आणि आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देणे. सोशल साइट्सचा जातीय, धार्मिक आणि वांशिक विद्वेषासाठी होणारा चुकीचा वापर थांबविणे, ही ‘सोनेफो’ची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

--

-‘सोनेफो’चे काम कसे चालते?

-फोरमच्या कामाची सुरुवात आणि काम करण्याचे माध्यमच सोशल मीडिया असल्याने कोणताही नवा उपक्रम सुरू करायचा झाल्यास सर्वप्रथम फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अपडेट केले जाते. फोरमच्या काही उपक्रमांत श्रमदानाची, काहींमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शनाची, तर काहींमध्ये निधीची आवश्यकता असते. उपक्रमाला अनुसरून सोशल मीडियावर सर्व सदस्यांना मदतीचे आवाहन जाते. या वाहनाला सर्व सोशल नेटवर्कर्सकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. कॉलेजचे विद्यार्थी श्रमदान करतात, डॉक्टर्स-इंजिनीअर्स आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात, तर हे व अन्य लोक निधीच्या माध्यमातून मदत करतात. ज्यांना समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असेल, अशी कोणतीही व्यक्ती सोशल नेटवर्किंग फोरमचे सदस्यत्व घेऊ शकते. या सदस्यांच्या मदतीने उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात.

--

-‘सोनेफो’चे सदस्य कोण असतात?

-फोरममध्ये राज्यातील विविध शहरांतीलच नव्हे, तर विदेशांतीलही शेकडो सदस्य कार्यरत आहेत. डॉ. पंकज भदाणे, इंजिनीअर प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, डॉ. उत्तम फरतळे, डॉ. जयदीप निकम, प्रा. आशिष चौरसिया, अॅड. गुलाब आहेर, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, डॉ. विशाल पवार, डॉ. योगेश जोशी, डॉ. समीर पवार, जीवन सोनवणे, राजेश बक्शी (कतार), लक्ष्मीकांत पोवनीकर (इराक) आदी असंख्य सदस्य कोणतीही योजना कार्यन्वित करण्यात मोलाचे योगदान देतात.

--

-वाड्यापाड्यांत काम करताना आलेले काही अनुभव शेअर कराल...

-एकदा एका खेड्यात पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गेलो होतो. पाहणीनंतर गावप्रमुखाने चहासाठी घरी नेले. थोड्या वेळात घरातून विनादुधाच्या कोऱ्या चहाचे कप आले. शहरातील लोकांना असा चहा पाजावा लागत असल्याची सल संबंधिताच्या चेहेऱ्यावर दिसली. त्यातूनच ते म्हणाले, की गावात बऱ्याच गायी-म्हशी आहेत. पण, माणसांनाच प्यायला पाणी नसल्याने जनावरांची जास्तच आबाळ होते. त्यामुळे दूधही कमी येते. जे थोडेफार येते त्यावर पहिला हक्क त्यांच्या पिलांचा मानून आम्ही जनावरांचे दूधच काढत नाही, म्हणून हाच चहा गोड मानून घ्या! एका बाजूला जनावरांना हार्मोन्सची इंजेक्शन्स देणारे किंवा केमिकल्स वापरून नकली दूध बनविणारे शहरी महाभाग कुठे आणि प्रतिकूल परिस्थितीतही जनावरांच्या दुधावर पिलांचा हक्क मानणारे हे श्रीमंत लोक कुठे, यावर विचार करीत द्यायला म्हणून गेलेलो आम्ही सदस्य बरेच काही घेऊन आलो...

--

-‘सोनेफो’चे भविष्यातील नियोजन कसे राहणार आहे?

-फोरमने सोशल नेटवर्कर्सच्या मदतीने आजवर आठ आदिवासी गावे टँकरमुक्त केली आहेत. त्यानंतर बरीच गावे आमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. साधारण २० गावांची यादीही आमच्याकडे आहे. त्यांचा पाणीप्रश्न आम्ही सोडवू शकतो. मात्र, त्यासाठी आम्हाला निधीची गरज असून, भविष्यात मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर स्कीममधून निधी उपलब्ध करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना यश मिळाल्यास येत्या वर्षभरातच ‘सोनेफो’ या वीस गावांना टँकरमुक्त करण्यात नक्कीच यशस्वी होईल.

--

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:ची बलस्थाने ओळखून नैराश्यावर करा मात

$
0
0

मटा डिबेट

-----

स्वत:ची बलस्थाने ओळखून नैराश्यावर करा मात

आजचे युवकच उद्याचे आशास्थान आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्राला नवी उभारी मिळणार आहे. अशा स्थितीत त्यांनीच उदासीन राहून चालणार नाही. त्यामुळे जीवनातील आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहा आणि नैराश्यावर मात करताना स्वत:तील बलस्थाने ओळखा, असा सूर ‘मेंटल वेलनेस : मना सज्जना’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’ चर्चासत्रातून उमटला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि मविप्रच्या केटीएचएम कॉलेजतर्फे हा उपक्रम झाला. कॉलेजियन्सने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वृत्तमालिकेच्या माध्यमातून विषयाची मांडणी झाल्यानंतर आता ‘मटा डिबेट’च्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधला जात आहे. या डिबेटमध्ये कॉलेजियन्सने ‘ताणतणाव आणि युवक’ या विषयावर व्यक्त केलेली संवेदनशील मते...

--

(संकलन : सीसीआर कल्पेश उघडे, योगेंद्र देवरे)

--


जीवनातील उत्स्फूर्तता महत्त्वाची

युवकांचे नैराश्याकडे ओढले जाण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. बहुतांश युवक फक्त आपले वैयक्तिक जीवन न जगता विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्ततेने सहभागी होत आहेत. परिणामी ते नैराश्यमुक्त जीवन जगत आहेत.

-सौरभ भावसार

--

पुरेशा संवादाचा अभाव

बऱ्याचहा कौटुंबिक संवाद न झाल्यामुळे नैराश्य येत आहे. अनेक युवक हे मोबाइल व सोशल मीडियाच्या आहारी जाऊन नैराश्याला बळी पडताना दिसून येत आहेत. दैनंदिन जीवनात पुरेसा संवादच होत नसल्यामुळे युवकांचे मन मोकळे होत नाही. त्यामुळे मुक्त संवाद गरजेचा आहे.

-मयूर गावित

_ _

सोशल मीडियाबाबत व्हावे प्रबोधन

मोबाइल व सोशल मीडियाचा नको तितका वापर हे युवकांचे नैराश्याचे प्रमुख कारण बनत चाललेले दिसते. विविध व्हर्च्युअल सोशल साइट्सपर्यंतच त्यांचे आयुष्य सीमित राहत चालले आहे. त्यामुळे या प्रभावी माध्यमांच्या योग्य वापराबद्दल युवकांमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.

-श्रुती पाटील

_ _ _

सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर

आजचा सजग तरुण हा विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होताना दिसून येतो. त्याच्या मनातील सुप्त भावना तो या माध्यमाद्वारे मोकळ्या करताना दिसत आहे. त्याद्वारे मनमोकळे करीत असल्याने अशी तरुणाई निश्चितच पॉझिटिव्ह आहे. ती नैराश्यात ओढला जात नाही.

-तेजस्विनी ठाकूर

_ _

शिक्षण पद्धतीचादेखील प्रभाव

फक्त युवकच नाहीत, तर इतर वयोगटातील अनेक जणही नैराश्यात ओढले जात आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. युवकांना योग्य संधी प्राप्त होत नाही, त्यामुळे ते नैराश्यात ओढले जाताता. संवादातला दुरावा व शिक्षण पद्धतीचादेखील यावर प्रभाव पडताना दिसतो.

-पार्थ बागुल

_ _ _

सकारात्मकतने करावी वाटचाल

अनेक युवक नैराश्याला बळी पडताना दिसत नाहीत. योगा, व्यक्तिमत्त्व विकास व अनेक समाजोपयोगी उपक्रमांतून युवक आपले आयुष्य सार्थकी लावताना दिसून येत आहेत. त्यामुळे नैराश्यमुक्त जीवनाकडे युवक वाटचाल करीत आहेत. हे केवळ सकारात्मकतेनेच होताना दिसते.

-सौरभ वडजे

_ _ _ _

चांगले करण्याची इच्छाशक्ती

आजची युवापिढी प्रेम, विश्वासाच्या आधारे नैराशातून बाहेर पडताना दिसून येते. कुटुंब, जोडीदार आदी प्रियजनांसाठी काही तरी चांगले करण्याची इच्छा युवकांना नैराश्यातून बाहेर काढताना दिसते. या सर्व गोष्टींमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्ह अॅटिट्यूड तयार होत आहे.

-योगेश पातळपुरे

_ _

राजकारण घटकही महत्त्वाचा

तरुणांना नैराश्य येण्यामागे काही प्रमाणात राजकारणही कारणीभूत आहे, असे मला वाटते. अनेक गोष्टींमधून ते पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, अनेक जण आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी विविध प्रकारची तेढ निर्माण करतात आणि त्यांच्यामुळे काही प्रमाणात नैराश्य येते.

-शंतनू बिरारी

_ _ _

कुटुंब संस्थेचा मोठा प्रभाव

आजच्या तरुणांच्या नैराश्याला कुटुंब संस्थाही मोठ्या प्रमाणात जबाबदार दिसते. कारण, बरेच आई-वडील मुलांवर अनेक गोष्टी लादत असतात. परिणामी मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येत नाही. त्यामुळे तरुणांना कामाचा ताण निर्माण होतो आणि ते नैराश्याला बळी पडतात.

-गोदावरी देवकाते

_ _

स्पर्धेसह नानाविध कारणे

वाढलेली स्पर्धा, कुटुंब व मित्रांमध्ये घटलेला संवाद, इंटरनेट, सोशल मीडिया, कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या या सर्वांमुळे आजचा युवक नैराश्याकडे ओढला जात आहे. जोपर्यंत नैराश्य दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर पावले उचलले जात नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही, असे वाटते.

-प्रशांत लाटे

_ _ _

स्वार्थी घटकांचाही हात

अनक जण राजकीय जीवनातून नैराश्याकडे ओढले जातात. बरेच युवक निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीसाठी दिवस-रात्र प्रचाराला लागतात. पण, संबंधिताचा हेतू साध्य झाल्यानंतर तो या युवकांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेदेखील काही युवक नैराश्याला बळी पडतात.

-विशाल खानकरी

_ _

आपले जगणे आपल्या हाती

खरे तर या जगात कोणीही काहीही घेऊन आलेले नसते. त्यामुळे आपण कोणत्या भूमिकेतून जगायचे हे आपल्या हातात असते. आपण सकारात्मक राहायचे, की नकारात्मक राहून नैराश्याला बळी पडायचे, हे ज्याने त्याने ठरवावे. त्यामुळे नैराश्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो.

-शुभम जाधव

_ _ _


वाढते नैराश्य चिंतेची बाब

आजच्या युवापिढीतील वाढते नैराश्य ही चिंतेची बाब आहे. आजचा युवक नैराश्यात अडकताना दिसतो, त्याचे कारण म्हणजे त्याची वैचारिक पातळी. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी बरेच युवक आपली तत्त्वेही वेळेवर सोडतात. त्यामुळे नैराश्य वाढत आहे.

-नयन कल्पना जाधव, कवी,गीतकार,लेखक, वक्ता

_ _ _


डोळस दृष्टिकाेन भावणारा

नैराश्य या विषयावर तरुणांना बोलते करीत आजची तणावग्रस्त परिस्थिती, बेरोजगारी, गरिबी, कौटुंबिक स्थिती, शैक्षणिक अपयश, प्रेम-स्वप्नभंग आदीतून आलेल्या नैराश्यावर मुक्त बोलणारी मुले समाजाकडे किती डोळसपणे पाहतात याचा प्रत्यय ‘मटा डिबेट’मुळे आला.

-प्रा. डॉ. डी. पी. पवार, मराठी विभागप्रमुख

----


एकजुटीने करावा सामना

चला, जगू या नैराश्याशिवाय... युवकांनी विपरित परिस्थितीशी दोन हात करून, संघर्षातून नैराश्य आपल्या जीवनातून काढून टाकण्यासाठी संवादी राहायला हवे. समाजाला गृहित न धरता एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करीत एकजुटीने नैराश्याचा सामना केला पाहिजे.

-प्रा. डॉ. एस. सी. पाटील, उपप्राचार्य केटीएचएम, कॉलेज

_ _ _


सक्रिय मदत ठरेल उपयुक्त

नैराश्य ही समाजापुढील गंभीर समस्या आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी प्राध्यापकवर्ग अनेक प्रकारे प्रयत्न करतात. नैराश्यग्रस्त व्यक्तींकडे आपुलकीने पाहणेदेखील महत्त्वाचे ठरते. त्यांना नैराश्यामधून बाहेर पडण्यासाठी आजूबाजूच्यांनी सक्रिय मदत केली पाहिजे.

-प्रा. डॉ. पी. व्ही. कोटमे, उपप्राचार्य, केटीएचएम कॉलेज

-------------

चर्चेतील लक्षवेधी मुद्दे

----

-नैराश्याविरोधात लढण्यासाठी आजूबाजूच्यांनी करावी सक्रिय मदत

-समाजाला गृहित न धरता करावी एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण

-समाजाकडे डोळसपणे पाहणे ठरू शकेल उपयुक्त

-सकारात्मक राहायचे, की नकारात्मक हे प्रत्येकाच्या हाती

-नैराश्य दूर करण्यासाठी व्हावेत सर्व स्तरांवर प्रयत्न

- कुटुंब संस्थेची भूमिका प्रभाव टाकणारी

- काही तरी चांगले करण्याची इच्छा युवकांसाठी उपयुक्त

- दैनंदिन जीवनात राखावी पुरेशी सकारात्मकता

- सोशल मीडियाचा करावा प्रभावी वापर

-पुरेशा संवादाने होईल नैराश्यावर मात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी डिफेंडर्सचा निसटता विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोमहर्षक लढतीत दिंडोरी डिफेंडर्सने कन्हैया चॅलेंजर्सवर अवघ्या तीन गुणांनी निसटता विजय मिळवला, तर एबीसी रॉयल फायटर्स व सिन्नर सायलेंट किलर्स यांच्यातील बरोबरीमुळे चुरस टिपेला पोहोचली आहे. नाशिक महापालिका व केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेतर्फे नाशिक कबड्डी प्रीमियर लीग सिझन २ स्पर्धेच्या पाचव्या दिवशी उत्कंठावर्धक सामन्यांचा अनुभव प्रेक्षकांना पाहयला मिळाला.

आजच्या झालेल्या पहिल्या सामन्यात एबीसी रॉयल फायटर्स व सिन्नर सायलेंट किलर्स यांच्यातील सामना ३३-३३ असा बरोबरीत सुटला. सामन्याच्या पहिल्या सत्रात एबीसी रॉयल फायटर्सने २१-१६ अशी पाच गुणांची आघाडी आपल्याकडे ठेवली होती; परंतु दुसऱ्या सत्रात आदिनाथ गवळी, शंकर गदई, सुरजा दुंदले, ओंकार जाधव, मियाज शेख यांच्या सुंदर खेळाच्या जोरावर सिन्नर सायलेंट किलर्सने सामन्यात पुनरागमन केले. त्याचवेळेस एबीसी रॉयल फायटर्सचे राकेश खैरनार, दादा आव्हाड, परेश म्हात्रे यांच्या दमदार खेळामुळे सामना उतरोत्तर रंगत गेला व दोन्ही संघांना योग्य न्याय मिळत सामना बरोबरीत सुटला. एबीसी रॉयल फायटर्सने स्पर्धेतील अपराजित राहण्याचा सिलसिला कायम राखला. या सामन्यात सिन्नर सायलेंट किलर्सचा ओंकार जाधव याला उत्कृष्ट चढाईपटूचा, आदिनाथ गवळी याला उत्कृष्ट बचावपटूचा, तर एबीसी रॉयल फायटर्सच्या राकेश खैरनार याने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला.

दुसऱ्या सामन्यातही कबड्डीचा थरार पाहायला मिळाला. कन्हैया चॅलेंजर्स व दिंडोरी डिफेंडर्स यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात दिंडोरी डिफेंडर्सने ३०- २४ अशी सहा गुणांची आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवली व हा सामना ५७-५४ असा ३ गुणांनी जिंकला. सामन्यात दिंडोरी डिफेंडर्सच्या मयूर शिवतरकर, रोहित जाधव, सुरेश बोडके, सागर काळे यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. कन्हैया चॅलेंजर्सतर्फे मोमीन शेख, बबलू गिरी, सौरभ पाटील, योगेश लोखंडे यांनी पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ते त्यात अपयशी ठरले. या सामन्यातील कन्हैया चॅलेंजर्सच्या प्रमोद घुले याला उत्कृष्ट चढाईपटूचा, दिंडोरी डिफेंडर्सच्या सुरेश बोडके याला उत्कृष्ट बचावपटूचा, तर सागर काळे याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दिवसातील शेवटचा सामना सर्वज्ञ रायडर्स व नाशिक लॉयन्स यांच्यात सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोमध्ये आज संताजी पालखी सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ आणि श्री संताजी युवक मंडळाच्या वतीने संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. १६) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात शनिवारी दुपारी दोन ते पाच यावेळेत हा कार्यक्रम होईल. आकर्षक रथामधून संताजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात भजनी मंडळ, ढोल व लेझीम पथक, वारकऱ्यांच्या वेशभूषेत मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्याच्या समाप्तीनंतर सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. त्यामध्ये पहिली ते पदवीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रावीण्य सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन शेलार, डॉ. भूषण कर्डिले, व्ही. डी. पाटील, बी.जी. चौधरी, माजी पोलिस अध‌िकारी रमेश चौधरी आदी उपस्थ‌ित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थ‌ितांना मिळणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ चौधरी, शिवाजी चौधरी, रवींद्र चौधरी, सतिश काळे, प्रदीप कोते, नितीन पवार आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची दोघा टवाळखोरांनी छेडछाड काढत तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा येथे घडली.

मळ्यात राहणारी अवघ्या तेरा वर्षांची मुलगी घराजवळच असलेल्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. दुकानातून घराकडे माघारी येत असताना या मुलीला रस्त्यात अडवुन गुड्ड्या नरवडे आणि वैभव (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांनी तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला. ‌तिने नकार दिल्याने या दोघा टवाळखोरांनी तिला पकडत मिठी मारली व लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने दोघा टवाळखोरांनी पळ काढला. या मुलीने घरी आल्यावर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुड्ड्या नरवडे आणि वैभव या दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा दुकानातील दारूअड्डा उद्‍ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

किराणा दुकानात बेकायदेशिररित्या देशी व विदेशी मद्य विक्री सुरू असलेला अड्डा नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून नुकताच उद्‍ध्वस्त केला. या प्रकरणी मद्य विक्री करणाऱ्या शिवाजी तुकाराम अरिंगळे (४१, रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड, नाशिकरोड) याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड पोलिसांनी बुधवारी (दि. १३) पहाटे साडेपाचच्या सुमारास एकलहरे रोडवरील अरिंगळे मळ्यातील ऋषिकेश किराणा दुकानावर कारवाई केली. यात देशी व विदेशी कंपन्यांच्या ७ हजार आठशे अकरा रुपयांच्या ११३ मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या आदेशानुसार सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार पारदर्शी व्हावा

$
0
0

अॅडम कमांडंट राहुल मिश्रा यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरी सुविधा देताना अधिकाधिक लोकाभिमुख होत पारदर्शक व्यवहार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे अॅडम कमांडंट कर्नल राहुल मिश्रा यांनी केले.

देशात १६ डिसेंबर हा दिवस देशभरात रक्षा संपदा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने शनिवारी (दि. १६) देवळालीच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नल आर. एन. सिंग, नगरसेविका कावेरी कासार, आशा गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दि. १ ते १५ डिसेंबर देवळालीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चमन गेहलोत, हिरामण राऊत, दिलीप कांबळे यांच्यासह कॅन्टोन्मेंट शाळेत आयोजित स्वच्छता विषयावर आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धांतील विजेत्यांचे पारितोषिक देत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधिकारी सायमन भंडारे यांनी केले, तर आभार कर अधीक्षक दीपक पारकर यांनी मानले. कार्यक्रमास श्रीनिवास सहस्रभोजने, निशांत औथनकर, अतुल पोतदार, जयमाला पाटोळे आदींसह कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

कॅन्टोन्मेन्ट हॉस्पिटलमध्ये पॅपस्मियर तपासणी

रक्षा दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि. १६) कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नामको हॉस्पिटलच्या सिसोदिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या गर्भपिशवीच्या कॅन्सरचे निदान करणारी पॅपस्मियर तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. जयश्री नटेश यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी, धावपळीच्या जीवनात महिलांमध्ये गर्भपिशवीच्या कॅन्सर वाढण्याची भीती निर्माण झाली असून, त्याच्या निदानासाठी पॅपस्मियर तपासणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवी लखमीयानी, अनिता साळवे, वैष्णवी पवार, प्रिया पवार, शशीकांत वाघ आदींसह रुग्णालयाचे कर्मचारी प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत दुमदुमला संताजींचा जयजयकार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून शनिवारी संताजींच्या मूर्तीची घोटी शहरातून अश्वरथातून शोभायात्रा काढण्यात आली. अभंगवाणी व संताजींच्या जयजयकाराने संपूर्ण घोटीनगरी दुमदुमली. शहरात विविध संस्थांच्या वतीने संताजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संताजी नगर येथून संताजी महाराज सवाद्य मिरवणूक व शोभायात्रेला सुरुवात झाली. संताजींचा जयजयकार करीत शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती. शहरात ग्रामपलिका, बँका, पतसंस्था आदी विविध संस्था व मान्यवरांनी ठिकठिकाणी संताजींच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन केले. जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संताजी महाराज यांच्या अभंगांवर अनेक भाविक चिंब झाले.

वाहतूक विस्कळीत

या रथयात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. संताजी नगर येथे संताजींच्या जीवनावर पांडुरंग महाराज साकुरे यांचे प्रवचन होऊन महाआरती करण्यात आली. संताजींनी दिलेल्या संदेशावर वाटचाल करुन तेली समाजबांधवांनी विकासाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो एंट्रीमध्ये वाहन घालून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या पतीविरोधात कारवाई करताना अडथळा आणून पोलिस आयुक्तालयातच महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा पोलिसांनी या महिलेविरुद्ध दाखल केला आहे. सोनाली शरद बोडके (रा. हिरावाडी, पंचवटी) असे या महिलेचे नाव आहे.

शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शुक्रवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास वकीलवाडी भागात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत होते. नो एंट्रीसह विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करीत असताना पोलिसांनी अशोकस्तंभाकडून दुचाकीवर (एमएच १५/सीव्ही ७८४८) वकीलवाडीत आलेला शरद बोडके याला थांबवले. पोलिसांनी कारवाई सुरू केली असता शरद बोडके यांनी आरडाओरड करीत गर्दी जमा केली. पोलिसांनी व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, बोडके यांनी धक्काबुक्की करीत त्याला विरोध केला. तसेच दुचाकीसह पोबारा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर बोडके यांना पोलिस आयुक्तालयात हजर करण्यात आले. या वेळी तिथे आलेली त्यांची पत्नी सोनाली बोडके यांनीही पोलिसांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली. तुम्हाला कामाला लावते, असे म्हणत सोनाली बोडके यांनी आत्महत्येची धमकी दिली. यानंतरही पोलिस ऐकत नसल्याचे पाहून तिने आयुक्तालयाच्या पहिल्या मजल्याच्या रोलिंगवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक नम्रता देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून या दाम्पत्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारिजातनगरला चेन स्नॅचिंग

मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून पोबारा केला. ही घटना पारिजातनगर परिसरात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शोभा मुकुंद सोनजे (वय ५४, रा. आदर्श अपार्टमेंट, शेके हॉस्पिटलमागे, एम. जे. नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी मॉर्निंग वॉक करण्यासाठी सोनजे दाम्पत्य भोसला हॉर्स रायडिंग परिसरात गेले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास फेरफटका मारून रायडिंग ग्राऊंडजवळील कॅनॉल रोडने सोनजे दाम्पत्य घराकडे परतत होते. या वेळी मागून आलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन चोरट्यांनी शोभा सोनजे यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकली. उपनिरीक्षक कोल्हे तपास करीत आहेत.

गर्दीत मंगळसूत्र लंपास

कपडे खरेदी करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. ही घटना शालिमार चौकात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. वर्षा उत्तम मगर (रा. साईनाथ कॉलनी, मराठानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मगर दाम्पत्य शुक्रवारी कपडे खरेदीसाठी शालिमार परिसरात आले होते. नेपाळी कॉर्नर येथे खरेदी सुरू असताना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी वर्षा मगर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

बनावट फेसबुकद्वारे बदनामी

बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील राहुल नवनाथ घोडेकर या तरुणाविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पखाल रोडवरील विधातेनगर भागातील ३३ वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयिताने २०१५ ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान बनावट फेसबुक अकाउंट सुरू करून बदनामीकारक मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध केले होते. याची माहिती मिळाल्याने महिलेने उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली. यामुळे महिलेच्या मोबाइलवर निनावी फोन येणे सुरू झाले, तसेच या बदनामीमुळे तिची नोकरीही गेली. अखेर तिने मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

गांजा विक्रेत्याला अटक

जुन्या नाशिकमधील बागवानपुरा भागात गांजा विक्री करणाऱ्या अनेक गगनदेव महाशेठ (सध्या नानावली, मूळ रा. सैदपूर, बिहार) या परप्रांतीयास पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून पल्सरसह सुमारे ५,६८० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करयणात आला. संशयिताचा जोडीदार मात्र पसार झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरारी झालेला वसीम अनिस शेख याचा पोलिस शोध घेत आहेत. संशयितांनी बागावानपुरातील शिवनेरीनगर भागात गांजा विक्रीचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या पोलिसांनी सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. सहाय्यक निरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

दोन जुगाऱ्यांना अटक

दिंडोरी रोडवरील म्हसरूळ बस स्टॉपसमोरील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले. मधुकर अशोक खराटे (रा. वडनगर) आणि ज्ञानेश्वर पांडुरंग पठाडे (रा. वडवाडी, म्हसरूळ) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. छापा टाकून शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, हवालदार महाले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड बनला डम्पिंग ग्राऊंड

$
0
0

एसटी महामंडळाच्या खुल्या भूखंडांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहराच्या वाढत्या लोकवस्तीत ठिकठिकाणी एस महामंडळाच्या भूखंडांचे आरक्षणे टाकण्यात आली होती. त्यामध्ये सातपूरलादेखील दोन ठिकाणी एसटी बस स्थानकांचे आरक्षण टाकले होते. यात सातपूर बस स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. तर दुसरा अंबड-लिंकरोडवरील भूखंड हा पूर्णपणे डम्पिंग ग्राऊंड बनले असल्याचे चित्र आहे.

याकडे एसटी महामंडळाचे तसेच महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे याच भूखंडांवर असलेल्या पडिक विहिरीत दोन जणांनी आत्महत्या केल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे आता तरी याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नाशिक शहरातील सरकारच्या आरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. अगोदरच शंभरहून अधिक झोपडपट्ट्या शहरात स्थापन झाल्याने भविष्यात महापालिकेला त्या हटविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे सरकारच्या मालकीची पडून असलेली भूखंड कचऱ्याची आगार बनली आहेत. सातपूरलाही एसटी महामंडळास दोन भूखंड देण्यात आली होती. यात एमआयडीसीत असलेल्या एसटी महामंडळाच्या भूखंडांवर बस स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

कचरा टाकण्याची जागा

यातील दुसरा भूखंड हा अंबड-लिंकरोडवर असून, तो भूखंड डम्पिंग ग्राऊंड बनला आहे. याठिकाणी कोणीही येतो आणि कचरा टाकून जातो, अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे २००२ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात भूखंडाला दगडांची संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, मात्र तिचाही काही उपयोग झालेला दिसत नाही. एकाने म्हशीचा गोठ्याचे अतिक्रमण केले होते. एसटी महामंडळाने कारवाई करीत गोठा हटवला होता. परंतु, सध्यातरी पडून असलेल्या मुख्य रस्त्यावरील या भूखंडाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कचरा टाकण्याची जागा बनली आहे. तरी एसटी महामंडळाने संबंधित भूखंडाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियतीच्या हातातले बाहुले ः ‘पुनरपि उ:शाप’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुष्य शाप-उ:शापाच्या भोवऱ्यात अडकलेले असते. आपल्या क्षेत्रात भव्य, अद्वितीय काही करावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्या इच्छेला खतपाणी आणि पाठबळ मिळाले, की तनमन विसरून मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी माणूस धडपडतो. मात्र, नियतीने त्याच्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवलेले असते. अशा आशयाचे ‘पुनरपि उ:शाप’ हे नाटक होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत नितीन गगे लिखित ‘पुनरपि उ:शाप’ हे नाटक शनिवारी सादर झाले. ‘पुनरप‌ि उ:शाप’ ही देवदत्त नावाच्या शिल्पकाराची कथा आहे. राजा धनदत्त, राणी विलासिनी, पंडित विश्वंभर यांचे आयुष्य व्यतित होत असताना राजा-राणीच्या पाठबळावर रक्ताक्षीदेवीच्या मंदिराच्या निर्माणाच्या संकल्पपूर्तीसाठी सगळे जण झटत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने धडपडत असतो. मंदिर उभारणे खरे तर हा क्षणिक आनंद, परंतु विश्वंभरचा अहंकार त्यात भयंकर उलथापालथ घडवतो. मग त्यातून सुटण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. मात्र, मंदिराची उभारणी, संकल्पपूर्ती हाच उ:शाप असल्याने त्यातून पुन्हा उभे राहण्याचे सर्व जण प्रयत्न करतात, अशा आशयाची नाटकाची कथा होती.

हे नाटक कामगार कल्याण केंद्र, दीपनगर, भुसावळ या संस्थेतर्फे सादर करण्यात आले. नाटकात नितीन देवरे, चंद्रकांत सपकाळे, पंकज सनेर, अमोल बऱ्हाटे, संतोष वारुंगसे, भारती शर्मा, श्रद्धा कदम, जितेंद्र पाटील, रोशन वाघ, चंद्रकांत जाडका, चिन्मयी पाटील, अनुष्का पाटील यांनी भूमिका केल्या. नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांचे होते. प्रकाशयोजना तोहित शेख, संजय वाणी यांची होती. संगीत अतुल बऱ्हाटे यांचे, तर वेशभूषा व रंगभूषा श्रद्धा कदम यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत जाडकर यांनी केले होते. निर्मिती राजेंद्र बावस्कर यांची होती. सहनिर्माते लक्ष्मण चौधरी होते. नृत्य श्रद्धा लोहार, सोनल चौधरी, गौरी राऊत यांचे होते. विशेष सहकार्य भालचंद्र गायकवाड, अरुण सूर्यवंशी, अमोल काबरा, विकास चौधरी, रमाकांत केळगंद्रे यांनी केले होते.

सोमवारी पारितोषिक वितरण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६५ व्या नाट्यमहोत्सवाच्या नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेचा रविवारी समारोप होत आहे. सोमवारी, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कामगार कल्याणभवन, सातपूर कॉलनी येथे पारितोषिक वितरण होणार आहे. सुनील देशपांडे प्रमुख पाहुणे असतील. अध्यक्ष म्हणून प्रा. विलास औरंगाबादकर उपस्थित राहतील. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे सहाय्यक महाप्रबंधक शिवाजी धुमाळ यांची विशेष उपस्थिती राहील.

आजचे नाटक : प्रयास

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम ऑटो-डीसीआरनेच

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीत दोनसे चौरस मीटर क्षेत्रापर्यंतचे बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे अधिकार नगररचनाने वास्तुविशारदांना दिले असून, त्याची अमलबजावणी पालिकेकडून सुरू केली जाणार आहे. एवढ्या क्षेत्रासाठी आता वास्तुविशारदांना पालिकेत येण्याची गरज नसून, त्यांसदर्भातील आदेश पुढील आठवड्यात काढला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. दरम्यान ऑटो-डीसीआर प्रमाणेच बांधकाम परवानग्या मंजुरीचे काम सुरू राहील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑफलाइन परवानग्यांचा मार्ग बंद होणार आहे.

नगररचना विभागाने पारंपरिक पद्धतीने बांधकाम परवानग्या देण्याचे धोरण बदलून ऑटो-डीसीआर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परवानगी देण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेत आतापर्यंत ऑटो-डीसीआरनुसार पाचशे प्रकरणे दाखल झाली. तर त्यातील १०७ प्रकरणे मंजुर झाली आहेत. ऑटो-डीसीआरनुसार प्रकरणे मंजूर होत असताना त्यासाठी ठराविक मुदत आहे. परंतु नगररचना विभागातून पांरपरिक पध्दतीनेच नकाशे मंजुर केले जात असल्याची बाब निर्दशनास आल्यानंतर आयुक्तांनी ऑटो-डीसीआर नुसारच परवानगी देण्याचे पुन्हा निर्देश दिले आहेत. त्यांसदर्भात शनिवारी दि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, रसिक बोथरा, सचिन गुळवे, योगेश महाजन, चारुदत्त नेरकर, अविनाश कोठावदे, जयवंत पवार आदींनी आयुक्तांची भेट घेवून आपल्या मागण्या सादर केल्या असून, आयुक्तांनी त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

ऑटो-डीसीआरसाठी समिती स्थापन

वास्तु विशारदांच्या तक्रारीनंतर ऑटो-डीसीआरची अंमलबजावणी काटेकोर करणे तसेच त्याच्या कार्यप्रणालीत सुलभता येण्यासाठी आयुक्तांनी पुन्हा नवी समिती स्थापन केली आहे. त्यात आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, ऑटो-डीसीआर सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कमी किमतीत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे, अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याचे याबाबत समितीकडून मार्गदर्शन केले जाईल.

वास्तुविशारदांना अधिकार

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकामाच्या परवानग्या दिल्या जातात. वास्तुविशारद हे बांधकामाची फाइल पालिकेचे इंजिनिअरमार्फत नगररचनाला सादर करतात. परंतु आता हा भारही कमी होणार आहे. नगरविकास विभागाने नगररचना विभागावरचा भार कमी करण्यासाठी दोनशे चौरस मीटरपर्यंत नकाशे मंजुरीचे अधिकार वास्तुविशारदांनाच बहाल केले आहेत. परंतु महापालिकेत त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. आर्किटेक्चर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आयुक्तांची भेट घेवून विविध मागण्यांबाबत चर्चा केली. त्या चर्चेतून परवानग्यांचा विषय निकाली काढण्यात आला आहे. नगररचना विभागाला दोनशे चौरस मीटर पर्यंतचे आराखडे वास्तुविशारदांकडूनचं मंजुर करून घेण्याचे आदेश पुढील आठवड्यात काढणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठच्या स्वच्छंदींचे ‘तो’ पालटणार रुपडे

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

मनमाड परिसरात भिकारी आणि वेडे यांना गाठून त्यांचे मोफत केशकर्तन करणाऱ्या मनमाडच्या मनोज बोरसे या ध्येयवेड्या तरुणाने आता नाशिकमध्ये पंचवटी व गोदाकाठी जाऊन नववर्षाच्या आधी तेथील भिकारी, वेडे आदी स्वच्छंदींचे केशकर्तन करून त्यांना स्वच्छ, सुंदर करण्याचा संकल्प सोडला आहे.

केवळ रस्ते स्वच्छ असून, चालणार नाही तर रस्त्यांवरून जाणारी-येणारी माणसेदेखील स्वच्छ दिसायला हवीत या उद्देशाने झपाटलेल्या या तरुणाने नाशिकसह जिल्ह्यात हे अभियान राबविण्याचा जणू विडाच उचलला आहे. २०१८ या नव्या वर्षात नाशिकमधील रस्त्यांवर अजागळ, अस्वच्छ माणसे दिसू नयेत, यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोज नाशिकमध्ये जाऊन भिकारी, वेडे यांना गाठून त्यांना नवे रूप बहाल करण्याच्या तयारीला लागला आहे. २७ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये एका दिवसात किमान ५० भिकाऱ्यांचा चेहेरामोहरा बदलण्याचा निर्धार त्याने केला आहे.

मनमाडमधील भिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून वेळप्रसंगी त्यांच्या संतापाचा फटका सहन करून मनोज त्यांची विनामोबदला दाढी-कटिंग करीत असल्याची बाब परिसरात परिचित आहे. मात्र, आता हातावर पोट असलेल्या पण मोठ्या दिलाच्या या तरुणाने आपल्या गावानंतर आपला मोर्चा नाशिककडे वळवून पंचवटी व गोदावरी नदी परिसरातील भिकारी व वेड्यांना चकाचक करण्याचा निर्धार केला आहे. मनमाडमध्ये छोटे सलून चालविणाऱ्या मनोजच्या तेथील उपक्रमाची ‘मटा’ने यापूर्वीच दखल घेतलेली आहे. आता त्याने नाशिक शहर व जिल्ह्याकडे आपल्या सामाजिक उपक्रमाचा मोर्चा वळविल्याने आता वर्षानुवर्षे दाढी-जटा वाढविणाऱ्यांचे केशकर्तन करून वेळप्रसंगी त्यांच्या शिव्या खात त्यांच्या संतापाचा धनी होण्याचा हा प्रयोग गोदाकाठी रंगणार आहे.

मनमाडचा माणूस जिल्ह्याच्या गावी जाऊन समाजसेवा करणार असल्याने मनोजचे परिसरातून कौतुक केले जात आहे. ‘नाशिकच्या गोदा परिसरातील भिकारी व वेड्यांनो, होशियार.. तुमचे रुपडे बदलायला मनमाडहून एक स्वच्छताप्रेमी येतोय..

परिस्थिती बिकट असतानाही एक दिवसाचा धंदा बुडवून! स्वच्छ व्हा सुंदर व्हा आपले नाशिक नववर्षात टवटवीत दिसू द्या’, अशी अव्यक्त भावनाच यानिमित्ताने मनमाडकरांची झाल्याचे दिसत आहे.

--

मनमाड परिसरात या आधी काम केले. आता नाशिकचा गोदाकाठ सुंदर करण्याची इच्छा आहे. या महिनाअखेरीस वर्षाच्या शेवटी हे छोटेसे काम करून नववर्षाचे स्वागत करणार आहे. जिल्ह्यातदेखील हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. एका दिवसात किमान ५० जणांना स्वच्छ, सुंदर करणार आहे.

-मनोज बोरसे, सलूनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई दल परीक्षा ऑनलाइन

$
0
0

नाशिक ः देशाच्या संरक्षणार्थ सज्ज असलेल्या अन् जगभरात दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संरक्षण विभागातील तीन प्रमुख दलांपैकी एक असलेल्या हवाई दलाने अधिकारी पदावरील भरतीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने घ्यायचा निर्णय घेतला आहे.

हवाई दलाच्या इतिहासात ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी २०१८ मध्ये ही प्रवेश परीक्षा देशातील प्रमुख परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. या केंद्रांमध्ये महाराष्ट्रात नाशिकमधील ओझरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या पाच शहरांचाही समावेश आहे.

हवाई दलामध्ये अधिकारी पदावर किंवा एअरमॅन कडरमधील तांत्रिक व अतांत्रिक पदांवरील भरतीसाठी भारतीय हवाई दल ‘एएफसीटी’ ही संयुक्त प्रवेश परीक्षा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) च्या वतीने घेण्यात येते. ही परीक्षा सी-डॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) यांच्या सहकार्याने ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्यात आला असला, तरीही त्याचा अभ्यासक्रम ‘जैसे थे’ राहील. मात्र, २०१९ पासून या अभ्यासक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेसाठी देशभरात सुमारे शंभरावर केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एअरमन केडरसाठी देशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा होईल. या नियोजनात ज्या शहरांच्या वाट्याला परीक्षा केंद्र आले नाही, मात्र तेथील विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची इच्छा आहे, अशा परिसरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र असलेल्या इतर शहरांमध्ये धावपळ करावी लागणार आहे.

निगेटिव्ह मार्किंग लागूच

या परीक्षेसाठी १६ डिसेंबरपासून नोंदणीस सुरुवात झाली असून, १४ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. परीक्षा फेब्रुवारी २०१८ मध्ये होईल. परीक्षार्थींसाठी २५० रुपये फी आकारण्यात येणार आहे. जे उमेदवार एनसीसी स्पेशल किंवा मेटिओरॉलॉजी हे विषय घेऊन नोंदणी करतील त्यांना नोंदणीसाठी फी भरावी लागणार नाही. या परीक्षेचा पॅटर्न मात्र पूर्वीसारखा कायम ठेवण्यात आला आहे. यामध्ये शंभर बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नासाठी ३ गुण देण्यात येतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारांना दोन तासांचा कालावधी दिला जाईल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तीन गुण, तर प्रत्येकी चुकीच्या उत्तरामागे एक गुणाची वजावट निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार होणार आहे. परीक्षेसाठी सामान्यज्ञान, रिजनिंग अँड मिलिटरी अॅप्टिट्यूड टेस्ट इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागेल.

--

देशातील राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. या यादीत आता हवाई दलाच्या प्रवेश परीक्षेचाही समावेश झाला आहे, ही बाब जास्त स्वागतार्ह आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. ऑनलाइन पद्धतीत अपडेट करण्यात हवाई दलाने बाजी मारली आहे.

-प्रदीप ब्राह्मणकर, डिफेन्स करिअर मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तव्यात कसूरप्रकरणी दोन पीएसआय निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भावा-बहिणीच्या मालमत्तेच्या वादात संशयास्पद काम केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना शनिवारी तडकाफडकी निलंबित केले. या प्रकरणी सेंट्रल जेलमधून तक्रार आल्यानंतर आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

अजीनाथ मोरे आणि सुमित सोनवणे अशी निलंबित करण्यात आलेल्या उपनिरीक्षकांची नावे आहेत. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये १० ऑक्टोबर २०१७ रोजी कलम ४४८ म्हणजे गृह आगळकीचा गुन्हा दाखल झाला होता. यात राजेश्री प्रताप शिंदे (रा. सिडको) या महिलेने नितीन वसंत पाटील (रा. गंगापूररोड) यांच्याविरोधात तक्रार दिली होती. हे दोघे नात्याने भाऊ-बहीण असून, त्यांच्यात जुने पोलिस आयुक्तालाजवळील निवासी रेसिडेन्सी या इमारतीतील फ्लॅट क्रमांक सातच्या मालकीहक्कावरून वाद सुरू होता. या गुन्ह्याचा तपास पीएसआय सुमित सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांचा तपास सुरू असताना काही दिवसांनी शिंदे या पाटील यांच्या घरी पोहोचल्या. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. या प्रकरणीदेखील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दोघा अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या प्रकरणात तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल,

पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरीब रुग्णांवर कागदपत्राविनाही होणार उपचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गरीब, अनाथ, बेघर व भटका असलेल्या रुग्णांकडे कागदपत्रे नसली तरी त्यांना उपचारापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश धर्मादाय आयुक्त शि. ग. डिगे यांनी राज्यातील सर्व सहधर्मादाय आयुक्तांसह संबंधित यंत्रणेला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या योजनेप्रमाणे उपचार करण्यास पात्र असतील तर अशा रुग्णांवर त्वरित मोफत अथवा सवलतीच्या दराने उपचार केले जावेत. त्यामुळे कागदपत्रे नसलेल्या अशा सर्व रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

या रुग्णांवर उपचार करताना धर्मादाय रुग्णालयांच्या सोशल वर्कर्सनी त्या गरीब रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीबाबत खात्री करावी व त्यांना काही अडचण असेल तर त्या जिल्ह्याच्या धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही धर्मादाय आयुक्तांनी निर्देश देताना म्हंटले आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत पात्र गरीब रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवले जाणार नाही अथवा उपचार नाकारले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी तंबी दिली आहे.

धर्मादाय रुग्णालयात उच्च न्यायालयाच्या योजनेनुसार उपचारासाठी पात्र असणाऱ्या गरीब, निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकडे तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, दारिद्र्यरेषेखालील पत्रिका असणे आवश्यक आहे. मात्र, गरीब, बेघर, अनाथ, भटक्या रुग्णांकडे आवश्यक कागदपत्रे आढळून येत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे उपचाराबाबत काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत.

नाशिकमधील अनाथ मुलीमुळे परिपत्रक!

नाशिक येथील २७ वर्षीय अनाथ सुलक्षणा नानाजी आहेर या तरुणीने धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवून आपली कैफियत मांडली होती. या पत्रात तिने नमूद केले होते, की १२ दिवसांची असतानाच मी अनाथ झाले. त्यानंतर नाशिक येथील अनाथाश्रमामध्ये मला दाखल करण्यात आले. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमामध्ये राहता येत नसल्यामुळे मला निरोप देण्यात आला. त्यानंतर दोन दिवस सीबीएसवर रस्त्यावर काढले व नंतर बेघर असलेल्या मुलांकरिता मी काम सुरू केले. राज्य सरकारकडून अनाथ मुलांसाठी एक प्रमाणपत्र मिळते. मात्र, त्यातून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आमच्याकडे रेशनकार्ड नाही व त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. अतिगरिबांसाठी असलेल्या सुविधा धर्मादाय रुग्णालयात प्रमाणपत्र दाखवून मिळाल्या तर त्यांचा उपचारासाठी लाभ होईल, अशी विनंती केली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांचे हे परिपत्रक आले असून, त्यातून सर्वांना लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images