December 11, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धांचा मुख्य हेतू संशोधनास प्रोत्साहन देण्याचा आहे. या स्पर्धांमध्ये अलीकडे अतिशय चांगले संशोधन मांडले जाऊ लागले आहे. या संशोधनाचा दर्जा जितका चांगला असेल, तितकी फेलोशिप मिळविण्याची तुम्हाला संधी आहे. या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. जयंत जायभाये यांनी केले.
पुणे विद्यापीठ आणि लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे एकदिवसीय आविष्कार प्रकल्प कार्यशाळा झाली. त्यावेळी जायभाये बोलत होते. उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज अध्यक्षस्थानी होत्या. कार्यशाळेसाठी विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. गंभीर, डॉ. एस. एल. लाव्हरे, डॉ. ए. व्ही बोराडे, डॉ. रूपाली खैरे, डॉ. एस. जी. औटी, डॉ. प्रमोद हिरे, डॉ. एस. के. महाजन, डॉ. एम. ए. भारद्वाज, डॉ. कैलास चंद्रात्रे, डॉ. महेश डी. औटी, महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. विनित रकिबे व शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ. संतोष चोबे उपस्थित होते. उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनित रकिबे यांनी सूत्रसंचालन केले. शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ. संतोष चोबे यांनी आभार मानले. डॉ. एस. बी. शिसोदे, डॉ. टी. बी. पवार, प्रा. एस. पी. व्याळीज, प्रा. ए. बी. पाटील, प्रा. व्ही. व्ही. कदम आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 11, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
राज्यातिल हजारो वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी, १३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार वैद्यकीय प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, आपल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज नाशिक यूनिटने केली आहे. बुधवारी, सकाळी ११ वाजता एमएसएमआर ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
सेल्स प्रमोशन एम्प्लॉइज कायद्यानुसार औषध विक्री प्रतिनिधींना (एमआर) कामगार कायद्यानुसार बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आणि भारतीय कंपन्यांनी फॉर्म (ए)नुसार अधिकृत नेमणूकपत्र देण्यात यावे. ज्या कंपन्या फॉर्म (ए)चे उल्लंघन करते, अशा कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी. कामाची वेळ निश्चित करावी. किमान २० हजार वेतन निश्चित करावे. बोनस, पीएफ, ईएसआएस सुविधा देण्यात यावी. प्रस्तावित कामगारविरोधी कायदे सुधारणा त्वरित रद्द करावी. जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी कायदे बनवावेत, अशा विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधी बुधवारी संप पुकारणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 2:30 pm
नाशिक : मौखिक आरोग्य तपासणीअंतर्गत पहिल्या ९ दिवसांत जिल्हाभरातील एक लाख २७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३३ टक्के व्यक्तींना तंबाखूसह मद्याचे व्यसन असल्याचे समोर आले असून, कॅन्सर आजाराची लक्षणे असू शकतील, अशा ७५१ नागरिकांसाठी पुढील तपासणी हाती घेण्यात आली आहे.
जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुखस्वास्थ्य तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील ३० वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मुखस्वास्थ्य जीवनाचे गमक आहे. भारतात मुख कर्करोग हा प्राधान्याने आढळून येतो. पूर्वावस्थेत मुख कर्करोग ओळखला गेला तर त्यापासून वाचता येते. तंबाखूसह गुटखा, मशेरी सेवन ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच ३० वर्षांवरील व्यक्तींची मुखस्वास्थ्य तपासणी महत्त्वाची ठरते. या मोहिमेंतर्गत पहिल्या नऊ दिवसांत जिल्हाभरात एक लाख २७ हजार १९ नागरिकांची मौखिक तपासणी करण्यात आली. सरकारी हॉस्पिटल्ससह आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. यात मद्याचे व्यसन असलेल्या १४ हजार २११ आणि तंबाखूचे व्यसन असलेल्या २८ हजार २८८ व्यक्ती आढळून आल्या आहेत. तपासणी झालेल्या एकूण व्यक्तींच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे ११ आणि २२ टक्के ठरते. दरम्यान, तोंडात चट्टा असणे, जखम लवकर न भरणे, जखमा असलेल्या ७५१ नागरिकांना आरोग्य विभागाने पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले आहे. मुख कॅन्सर होण्याची सुरुवात अशाच पद्धतीची असते. ७५१ पैकी काही व्यक्ती अशा आढळून आल्या तर त्यांना वेळीच उपचार मिळू शकतो. राज्य पातळीवरील हा महत्त्वाचा उपक्रम असून, यात खासगी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.
मौखिक आरोग्य व्यवस्थित असणे ही महत्त्वाची बाब असून, सरकारच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम सुरू आहे. तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरसारख्या आजारास खतपाणी मिळते. या मोहिमेंतर्गत उपचारासह जनजागृतीवरदेखील भर दिला जातो आहे.
- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सध्याचे वॉटर वेंडिंग मशिन्स बदलण्यात येत असून, त्यांच्या जागी वॉटर पॉइंटच्या रुपाने अत्याधुनिक आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मदतीविना या मशिनमध्ये केवळ नाणे टाकून प्रवाशांना शुद्ध पाणी मिळू शकणार आहे. चोवीस तास ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन्स बसविण्यात आली आहेत. सर्वांत मोठ्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण, तेथे जास्त प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिन्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना याचा लाभ होणार आहे.
---
...असे आहेत दर
तीनशे मिलिलिटर आरओ पाणी स्वतःची बाटली असेल, तर एक रुपयात मिळणार आहे. बाटलीसह तेवढेच पाणी दोन रुपयांना मिळेल. पाचशे मिलिलिटर पाणी तीन व पाच रुपयांना मिळेल. एक लिटर पाणी स्वतःची बाटली असेल, तर पाच व बाटलीसह विकत घेतल्यास आठ रुपयांना मिळेल. दोन लिटर पाणी आठ व बारा रुपयांना मिळेल. पाच लिटर पाणी वीस व पंचवीस रुपयांना मिळेल. खासगी विक्रेते एक लिटर पाण्याच्या बाटलीचे वीस रुपये घेतात. शिवाय हे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. शिवाय बाटलीवर छापील किंमत पंधरा रुपये असतानाही वीस रुपये घेऊन लूट केली जात आहे. त्या तुलनेत संबंधित मशिनवर एक लिटर पाणी पाच रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत आहे.
--
...असे मिळेल पाणी
या मशिनद्वारे स्वतः प्रवासी पैसे टाकून पाणी घेऊ शकतात. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे हे अजून उमगले नसल्याने बहुसंख्य प्रवासी मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफॉर्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहे. संबंधित विक्रेत्याकडे मागणी केल्यासही हे पाणी उपलब्ध होईल.
--
छोट्या स्टेशनची काळजी
नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे ए वन दर्जाचे आहे. नाशिकरोड हद्दीतील ई क्लास दर्जाच्या छोट्या रेल्वे स्टेशनची तृष्णाही भागविण्याची सोय झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना आधुनिक प्युरिफायर्सद्वारे शुद्ध केलेले पाणी पिण्यास मिळूही लागले आहे. तहानेने घसा कोरडा पडलेल्या व तहानेने व्याकुळ झालेल्या रेल्वे प्रवाशांनी या सुविधेबद्दल रेल्वेला धन्यवाद दिले आहेत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे मशिन बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची टाकी जोडण्यात आली आहे.
--
जलकुंभही उपलब्ध
नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. त्यासाठी मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टँड आहेत. ज्यांना मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते. मुंबईला जाताना नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड स्थानकात पाणी भरले जाते. अन्य गाड्यांमध्ये भुसावळ येथे पाणी भरले जाते. मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये इगतपुरी स्थानकात पिण्याचे पाणी भरले जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
खड्ड्यांमुळे ओबडधोबड झालेल्या रेस्ट कॅम्प रोडच्या डागडुजीचे काम अखेर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हाती घेतले आहे. दयनीय अवस्थेमुळे हा रस्ता अनेक अपघातांचे कारण ठरत होता. हा रस्ता दुरुस्त केला जात असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
देवळालीतून भगूरकडे जाणारा रेस्ट कॅम्प रोड हा कॅन्टोन्मेंट प्रशासन व लष्कराचा एमईएस विभाग अशा दोन्ही प्रशासनांच्या अखत्यारीत येतो. गेल्या वर्षी या रस्त्याच्या डांबरीकरणावर ६० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. या रस्त्यावर लष्करी वाहनांसह अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते. मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण होत होते. सव्वा लाख बॅटरीजवळ रोड क्रॉसिंगसाठी हा रस्ता खोदण्यात आल्याने काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू होती. त्यातच १२ ऑक्टोबर रोजी येथे खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे एक महिला मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सव्वा लाख बॅटरी ते आर्मी स्टॅटिक वर्कशॉपदरम्यानचा हा रस्ता एमईएसकडून खडी व डांबर टाकून दुरुस्त करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यात खड्डे बुजून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 11, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मोठे बनण्याचा माणसाचा हव्यास त्याला माणूसपणाकडून पशूकडे घेऊन जातो. आपल्यात व पशूत काही अंतर असते हेच तो माणूस विसरून जातो. मग त्याच्यामुळे कित्येक निरपराध जीव टांगणीला लागतात. कित्येकांच्या आत्महत्या होतात, याची त्याला जाणीवच नसते. या हव्यासाचे क्रूर चित्रण करणारे नाटक म्हणजे ‘रक्तबीज’ होय.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असून नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘रक्तबीज’ हे नाटक सोमवारी सादर झाले. नाटकाचे लेखन प्राची गोडबोले यांनी, तर दिग्दर्शन विक्रम गवांदे यांनी केले होते.
नाटकात दोन वेगवेगळ्या कथानकांचा समावेश होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील महत्त्वाकांक्षी पुरुषाला पैसा मिळविण्याचा हव्यास निर्माण होतो. स्वत:च्या पत्नीचा वापर करून तो बॉसकडून बढती मिळविण्याचे कारस्थान रचतो. मात्र, त्यातून त्याची पत्नी आत्महत्या करते. दुसऱ्या कथेत प्रख्यात वैज्ञानिकाला संशोधन पूर्ण झाल्यावर परदेशात जाऊन काम करण्याची महत्त्वाकांक्षा असते. मात्र, काही प्रसंग घडून या कथेतही एक बळी जातो. कोणतीही आत्महत्या ही हत्याच असते, जी मानवाच्या हव्यासातून घडते, असा संदेश या नाटकातून देण्यात आला.
कामगार कल्याण केंद्र, बुधवार पेठ, नाशिक या संस्थेतर्फे झालेल्या या नाटकाची निर्मिती संतोष सोनवणे, संदीप पवार यांची होती. दिग्दर्शन, नेपथ्य व मुख्य भूमिका विक्रम गवांदे यांनी केली. केतकी कुलकर्णी, श्रीराम गोरे, आशिष गायकवाड यांनी अन्य भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा माणिक कानडे, संगीत गौरव कुलकर्णी यांचे होते, तर केशभूषा व वेशभूषेची जबाबदारी सुमा देसाई यांनी सांभाळली.
आजचे नाटक : एडिपस रेक्स
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 2:51 pm
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या अध्यक्षाची निवड होऊन चोवीस तास होत नाहीत, तोच महाराष्ट्रातील काही तरुण कवी, लेखकांसह कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत बडोदा साहित्य संमेलन होऊच नये यासाठी थेट मराठी वाड्मय परिषद व बडोदा संमेलन आयोजकांना पत्र पाठवलिे आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
नांदगाव महाविद्यालयात कार्यरत असलेले या कृती समितीचे प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित करून साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या व साहित्य मंडळ पदाधिकारी निवडणुकीची घटना बदलून लोकशाहीकरण करण्यात यावे, यासह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, दलित आदिवासी भटके विमुक्त व इतर अल्पसंख्यांक साहित्य प्रवाहांना साहित्य संमेलनात प्रतिनिधित्व मिळावे यासह विविध मागण्या कृती समितीने केला आहे. या कृती समितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लेखक, कवी, कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही कृती समिती मराठी भाषेच्या प्रेमापोटी ही भूमिका घेत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संमेलन घेण्यात येऊ नये. अन्यथा मोर्चे, आंदोलने करण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन या संमेलन विरोधी कृती समिती संयोजकांनी केले आहे. या कृती समितीला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा बडोदा साहित्य संमेलन आयोजकांना दिला असल्याचे कृती समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कृती समितीच्या स्थापनेने मराठी साहित्य वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 2:53 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
म्हाळदे व सायने शिवारात महापालिकेतर्फे उभारण्या आलेल्या घरकुलांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यांची पूर्तता झाल्याशिवाय लाभार्थ्यांचे स्थलांतरण करू नये, अशी मागणी येथील काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांनी केली आहे.
महापालिकेतर्फे म्हाळदे व सायने शिवारात घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना स्थलांतरित करण्याची तयारी देखील पालिकेकडून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यांत १८५ लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पात अद्यापही पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने या सोयी सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय लाभार्थींचे स्थलांतरण करू नये, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
आमदार शेख यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना निवेदन दिले आहे. या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील १९९५ पूर्वीच्या विविध १७ झोपडपट्टीधारकांना ११ हजार घरकुल मिळणार आहेत. यातील सात हजार घरांची निर्मिती जवळपास पूर्ण झाली असून, ४ हजार ३०० घरे पूर्णतः वाटप योग्य झाली आहेत. आत्तापर्यंत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी ९०९ लाभार्थींनी शुल्क भरले असून, चार टप्प्यात घरांचे वाटप केले जाणार आहे. पैकी पहिल्या टप्प्यात १८५ लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत. यासाठी गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त संगीता धायगुडे तसेच आमदार शेख यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी देखील केली होती. पस्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाना शाळा, पाणी, वीज, रुग्णालय, भाजी मार्केट, धार्मिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. या प्राथमिक सोयीसुविधा त्यांना प्राप्त झाल्या नाहीत, तर शासनाच्या हेतूला हरताळ फासला जावू शकतो. सर्व सोयी सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी. अन्यथा यास विरोध केला जाईल, असा इशारा शेख यांनी दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 11, 2017, 3:55 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
एखाद्या गावात शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे हे देखील आदर्श गावाची वैशिष्ट्य आहे. कायदा सु-व्यवस्था व महिला साक्षमीकरण विषयांनादेखील प्रधान्य असावे. पोलसि प्रशासनाचे कर्तव्य कायदा सुव्यवस्था राखणे आहे. परंतु गावांच्या विकासासाठीदेखील पोलसि प्रशासन सोबत असेल, असा विश्वास जिल्हा पोलसि प्रमुख संजय दराडे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील आदर्शगाव ढवळेश्वर येथे गेल्या तीन वर्षांपासून येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हिवाळी शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा देखील हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, ढवळेश्वरला जिल्हा पोलसि प्रमुख संजय दराडे यांनी भेट दिली. या कार्यक्रमातच निर्मल गंगा गोदा बहुद्देशीय संस्थेच्यावतीने दराडे यांनी विद्यार्थ्यांना सायबक क्राईमबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ‘निर्मल गंगा गोदा’च्या अध्यक्षा शीतल गायकवाड, जि. प. सदस्य समाधान हिरे, सरपंच चित्रा हिरे, वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास राऊत, काशिनाथ पवार, दीपक हिरे, कृष्णा निकम, ज्ञानदेव निकम आदींसह उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, प्राध्यापक उपस्थित होते.
जि. प. सदस्य समाधान हिरे, शीतल गायकवाड, ढवळेश्वर ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांतून आदर्श गाव संकल्पनेचे शिल्पकार पोपटराव पवार (हिवरे-बाजार) यांनी ढवळेश्वर गावाची निवड केली. गाभा क्षेत्रातील व बिगर गाभा क्षेत्रातील तसेच गावाच्या विकासासाठीचे सर्व कामे प्रगती पथावर असून, त्यासाठी निधीची उपलब्धतेसाठी शासन स्तरावर होत आहे. म्हणून अशा आदर्श गावाला भेट देण्यासाठी दराडे आले होते. त्यांनी यावेळी संपूर्ण गावाची पाहणी केली. ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना जि. प. सदस्य समाधान हिरे यांनी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे व आदर्श गाव निर्मितीसाठी सहकार्य करण्याची भूमिका विषद केली. यावेळी निर्मल गंगा गोदाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 12, 2017, 9:16 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याएवजी वाहतूक पोलिस जनतेशी अरेरावी करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र सध्या नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. द्वारका सर्कल, औरंगाबाद रोड, गंगापूररोड यांसारख्या ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढत असताना वाहतूक पोलिस जनसामान्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिलीप खैरे यांनी केला आहे.
खैरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. वाहतूक पोलिसांची सर्वसामान्य जनतेबरोबर मुजोरी वाढत असून, रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतूक पोलिस वसुली करीत असल्यामुळे पोलिसच वाहतूक कोंडी वाढवीत आहेत. पकडलेली वाहने बाजूला घेण्याऐवजी भर रस्त्यात उभी केली जात असल्याने वाहनधारक व नागरिकांनी यावर आक्षेप घेतलाच तर त्यांच्यावर अरेरावी केली जाते. वाहतूक पोलिस स्वतः शिस्तभंग करीत असल्याने सर्वसामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उद््भवत आहे. द्वारका, मुंबई नाका, स्वामिनारायण चौकी, रासबिहारी पॉइंट, औरंगाबाद रोड, गंगापूररोड या ठिकाणी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असतानाही वाहतूक कोंडी कमी करण्याएवजी वाहतूक पोलिस शहरातील गल्लीबोळात उभे राहून वसुली करीत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. शहरात वाहनचोरीचे प्रमाण वाढत असताना याकडे मात्र यांचे तीळमात्र लक्ष नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 1:44 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापौरांनी महासभेत घोषित केलेल्या दहा कोटींचा खेडे विकास निधी आणि पदाधिकारी निधीवरून शिवसेनेने भाजपच्या कोंडीस सुरुवात केली आहे. बजेटमध्ये घोषणा होऊनही सहा महिने लोटले तरी खेडे विकास निधी व पदाधिकाऱ्यांचा निधी मिळाला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांवर अंकुश आहे की नाही असा सवाल करत सभागृहातील निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. बजेट मंजूर करतांना महापौर रंजना भानसी यांनी शहरात असलेल्या २० खेड्यांच्या विकासाठी प्रत्येकी ५० लाख या प्रमाणे १० कोटी देण्याची घोषणा केली होती. तसेच महापौर ते विरोधी पक्षनेत्यांनाही पदाधिकारी निधीची घोषणा करत हा निधी १७ कोटींपर्यंत गेला होता. परंतु, प्रशासनाने आर्थिक स्थितीचे कारण देत हा निधी देण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे शिवसेनेने या निधीवरून सत्ताधारी भाजपला जाब विचारत महापौर स्वतःच खेड्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी खेडे विकास निधी मंजुरीसाठी काय केले? असा जाब विचारला आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना अजून एक दमडीही निधी मिळाला नाही. त्यामुळे या निधीबाबत प्रशासन उदासीन का असा सवाल उपस्थित करत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अकुंश नाही, असा टोला लगावला आहे. तसेच महासभेतील घोषणेची महापौरांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 1:47 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला अभूतपुर्व यश मिळाल्यानंतर या विजयाचे शिल्पकार असलेल्या आमदार बाळासाहेब सानप व जिल्हा बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष परवेझ कोकणी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणी आणि सानप यांचे विजयाबद्दल अभिनंदन करीत आगामी विधान परिषदेची तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नाशिक विधानपरिषदेसाठी भाजपकडून परवेझ कोकणी यांची दावेवादी वाढली आहे. त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्षांसह १७ पैकी १४ जागा भाजपने जिंकल्या. या निवडणुकीची जबाबदारी आमदार सानप आणि परवेझ कोकणी यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यामुळे या विजयानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत कोकणी आणि सानप यांनी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यानी त्र्यंबकमध्ये भाजपच्या विजयाबद्दल सानप आणि कोकणी यांचे विशेष अभिनंदन केले. भाजपच्या निवडीत कोकणी यांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राहिलेल्या कोकणी यांनी भाजपच्या विजयासाठी आपले सर्व बळ वापरले. कोकणी यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या विजयानंतर त्यांची दावेदारी वाढली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 1:50 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियावर भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने डल्ला मारला आहे. आपल्याच ‘झिरो गार्बेज’ संकल्पनेला तिलांजली देत महापालिकेने खरेदी केलेल्या १८९ कचराकुंड्यांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्लास्टिक कचराकुंडी जोडीची किंमत बाजारात हजार ते दीड हजार रुपये असताना महापालिकेने चक्क ११ हजार रुपयांना खरेदी केल्या आहेत. महापालिकेने १८९ कचराकुंड्यांसाठी २१ लाख रुपये ठेकेदाराला मोजले असून यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कचऱ्यातूनही सोने शोधण्याची टेकनिक विकसित केल्याचा टोमणा बोरस्ते यांनी भाजपला लगावला आहे. डस्टबीन खरेदीप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात आपल्या झिरो गार्बेज संकल्पनेला तिलांजली देत शहरात पुन्हा कचराकुंड्या उभारण्याचा निर्णय घेतला होता. स्वच्छतेचे गुणांकन सुधारावे यासाठी नाशिक पुन्हा कचराकुंडीयुक्त करण्याचा हा अफलातून निर्णय आता वादात सापडला आहे. महापालिकेने १८९ प्लास्टिकच्या कचराकुंड्यासाठी तब्बल २१ लाख ३१ हजार ५०० रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छता अभियानाअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून ही खरेदी झाली आहे. त्यामुळे कचराकुंडी खरेदी आणि त्याच्या अव्वाच्या सव्वा किंमतीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत, सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. भाजपकडून पुन्हा शहर कचराकुंडीयुक्त केले जात आहे. कचराकुंड्या खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजून शहर कचराकुंडीमुक्त केले असताना भाजपने ठेकेदारांच्या भल्यासाठी शहराला पुन्हा कचराकुंडीयुक्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच १८९ कचराकुंड्याची किंमतही फुगवण्यात आली आहे. बाजारात एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या कचराकुंड्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी ११ हजार १२१ प्रतिनगाप्रमाणे खरेदी केली. ओला व सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात जनजागृती आणि नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक असतांना पंतप्रधानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने डल्ला मारला आहे. महापालिकेला यासाठी अंधारात ठेवण्यात आले. कचऱ्यातून सोने शोधण्याचे तंत्र प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आत्मसात केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. या संपूर्ण खरेदीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान निधीवर डल्ला
स्वच्छ भारत अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांनी या योजनेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परंतु, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेत या योजनेतील निधीवर डल्ला मारला आहे. आरोग्य विभागाने केलेली २१ लाखांची खरेदी ही स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून करण्यात आली आहे. केंद्राने हा निधी शौचालय उभारणी आणि जनजागृतीसाठी दिला असताना आरोग्य विभागाने चक्क या निधीतूनच ठेकेदारांचे भले केले आहे. विशेष म्हणजे या निधी वर्गीकरणासाठी कोणती परवानगीही घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण खरेदीच वादात सापडली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक कसा तयार करावयाचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे.
येत्या रविवारी (दि. १७ डिसेंबर) हे वर्कशॉप होणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरले जातात, तसेच हा केक नेमका कसा बनवितात हे शिकविले जाईल. याच वर्कशॉपमध्ये मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी कशा बनवायच्या हे विवेक सोहनी या डेमो वर्कशॉपच्या माध्यमातून दाखविणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. अधिक माहितीसाठी (०२५३)-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
www.mtcultureclub.com या वेबसाइटमार्फत ऑनलाइन सभासदत्व मिळविता येईल, असे आवाहन करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
नाशिक शहराच्या वाढत्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचाही मोठा सहभाग आहे. यासाठी शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. येत्या २१ ते २५ डिसेंबर रोजी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर शेल्टर प्रदर्शन होणार आहे. यंदा शेल्टर प्रदर्शनात नावीन्यपूर्ण शैलीच्या वास्तू ग्राहकांना मिळणार असल्याचे ‘केड्राई’चे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले. दरम्यान, शेल्टर २०१७ चे भूमिपूजन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते झाले.
तत्पूर्वी शेल्टरच्या सभासदांनी मंत्रघोषात शेल्टर प्रदर्शनाच्या तयारीसाठी पूजा केली. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक उद्धव निमसे, श्याम साबळे, शेल्टर आयोजन समितीचे उदय घुगे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील यांच्यासह शेल्टरचे सभासद उपस्थित होते.
महापौर भानसी यांनी शेल्टर प्रदर्शनामुळे शहरातील ग्राहकांना हव्या त्या प्रमाणात वास्तू मिळत असल्याने आनंद व्यक्त केला. प्रदर्शनात घरातील महिलांना हव्या असलेल्या घरांची पूर्ती होत असल्याचेही महापौर म्हणाल्या, तर केड्राईचे अध्यक्ष कोतवाल यांनी शेल्टर प्रदर्शनात दोनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक, २५ हून अधिक गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या शंभरहून अधिक कंपन्या शेल्टर २०१७ मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. शेल्टर प्रदर्शनाचे समन्वयक घुगे यांनीदेखील वेगाने वाढणाऱ्या शहराला विविधता असलेल्या घरकुलांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रदर्शनाला भेट देण्याचे सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातून जाणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी झापल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. उजव्या कालव्याच्या सरकारी जागेबाबत सिटी सर्वेने हद्द निश्चित करून दिल्यास, कालव्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण महापालिका काढून देईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे. शहरातील अन्य नाल्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, खासगी एजन्सीच्या मदतीने त्यांचेही सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत जाणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होवून पक्की बांधकामे झाली आहेत. त्यामुळे हा कालवाच अतिक्रमणाच्या वेढ्याने वेढला गेला आहे. कालव्यावरील अतिक्रमणाबाबत राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. सरकारच्या जागांवर महापालिकेने कशाच्या आधारे बांधकामाच्या परवानग्या दिल्या, अशी विचारणाही चोक्कलिंगम यांनी केली होती. तसेच ही अतिक्रमणे काढण्याचेही आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त कृष्णा यांनी याबाबत पत्रकार परिषदेत पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. उजव्या काव्याची हद्द सिटी सर्वेने निश्चित करून द्यायला हवी. अनेक ठिकाणी तर सिटीसर्व्हे झालेला नाही. त्यामुळे या जागा प्रथम रेकॉर्डवर आणाव्या लागणार आहेत. सिटीसर्व्हेने या जागांची हद्द निश्चित केल्यानंतर कालव्याच्या जागांवर जर अतिक्रमण झाले असेल तर महापालिकेकडून निश्चितच अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे या उजव्या कालव्यावरील अतिक्रमणे काढली जाण्याची शक्यता आहे.
उजवा कालव्यातून पाणी जात नसल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. परंतु ही सरकारी जागा असून, यावरील अतिक्रमण काढून सरकारचे नाव लावले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील नाल्यांचाही सर्व्हे
उजव्या कालव्याप्रमाणेच शहरातील नाल्यांचीही स्थिती आहे. अनेक नैसर्गिक नाले बुजवून त्याठिकाणी टोलेजंग इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. त्यासंदर्भातील तक्रारी देखील पालिकेकडे नागरिकांनी केल्या आहेत. नाल्यांवरील बांधकामे ही नियमानुसार झाली नसल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी नियमांची एैसीतैसी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा बांधकामाचाही शोध घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. नाल्यांवरील बांधकामांबाबतचाही सर्वे करण्याचे संकेत दिले आहेत. नगररचना विभागाकडे अपुरे मनुष्यबळ पाहता या सर्वेसाठी महापालिका खासगी एजन्सीचीही मदत घेण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणही रडारवर आले आहेत.
अधिकाऱ्यांचा ताफा
सातपूर ः चोक्कलिंगम यांनी दिलेल्या आदेशानंतर सर्वच विभागांतील अधिकाऱ्यांचा ताफा मंगळवारी सकाळीच गंगापूर धरणाच्या पायथ्याशी जमला होता. अगोदर कधीही माहिती न घेणारे महापालिकेचे व भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारीही उजव्या कॅनॉलची माहिती घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून तब्बल २३ किलोमीटर गेलेल्या कॅनॉलची माहिती काही अधिकाऱ्यांनाच नसल्याचेही समोर आले आहे.
अतिक्रमित झोपड्या भाड्याने
गंगापूर धरणाच्या पायथ्याशी एका पुढाऱ्याने भाड्याने झोपड्या दिल्या आहेत. सुरुवातीला एक, दोन असलेल्या झोपड्या शेकडोंच्या घरात पोहचल्या आहेत. दुसरीकडे एका नामांकित शिक्षण संस्थेने कॅनॉल बुजवून तेथे पक्के बांधकाम केले आहे. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्या संस्थेला जलसिंचन विभागाने नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले. मात्र, आता खुद्द जमाबंदी आयुक्तांनी दोन महिन्यांत अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत.
झोपड्यांना सर्व सुविधा
धरणाच्या पायथ्यापासूनच उजव्या कॅनॉलवर झोपड्यांचे अतिक्रमण आहे. गोवर्धन, आनंदवली शिवार, खुडवडनगरच्या शेतकऱ्यांचा पीटीसीमागील भाग, गोविंदनगरकडे जाणारा रस्ता, उपनगरच्या सुरुवातीपासून ते जेलरोडपर्यंत व त्यानंतर पुढे पवारवाडीच्या रेल्वे ट्रॅकपर्यंत झोपड्यांच्या रांगाच रांगा कॅनॉलवर पहायला मिळतात. विशेष म्हणजे सर्वच झोपड्यांना वीज, पाणी, घरपट्टी व विविध सुविधा कशा पुरविण्यात आल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय- ललित गद्य विभागासाठीचा एक लाख रुपयांचा अनंत काणेकर पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. २०१६ साठीच्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे विनायकदादा पाटील यांचा साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्रात लौकिक आहे. नाशिकचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे विनायकदादा पाटील. त्यांच्या या पुस्तकात चार विभागांतून अनेक अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. स्मरणांकित या विभागात विविध आठवणी त्यांनी शब्दांकित केल्या आहेत. त्या व्यक्तिगत जरी असल्या तरी त्यांच्या मांडणीमुळे त्या वाचकाला धरून ठेवतात. त्यानंतर रागदरबारी विभाग आहे, साहित्यपौर्णिमा हाही विभाग विविध अनुभव देणारा आहे. प्रा. पुंडलिक गवांदे यांच्या ‘निसर्ग देतो मानव घेतो’ या पुस्तकाला पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
‘मटा’मधील सदर ‘गेले लिहायचे राहून’
विनायकदादांनी लिहिलेले ‘गेले लिहायचे राहून’ हे पुस्तक ललित प्रकारात मोडणारे आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील मोहर पुरवणीत वर्षभर हे सदर विनायकदादांनी चालवले. त्यात तिकीट, पहिले प्रेम, धडा, गुरूजी, लाडू मेथीचे, ताईत, देवावर भारी, देवाघरची लेकरे, चित्र शोधतो...चित्र शोधतो, शल्य, सन्नाटा, मांडा : एक उत्सव, जामीन, माय सन, पंपा सरोवर, रंगनाथ, जय हो यासह अन्य लेख असून, अतिशय सुंदर शैलीत दादांनी हे सदर चालवले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाचा फज्जा उडण्याची शक्यता बळावली आहे. मतदार नोंदणीसाठी १५ डिसेंबर ही अखेरची मुदत असून, जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार गृहभेटींपैकी केवळ एक लाख ८६ हजार गृहभेटी बीएलओंनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे बीएलओंच्या माध्यमातून तीन दिवसांत पाच लाख गृहभेटी करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण करण्याचे काम बीएलओ करीत आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन बीएलओंनी सर्व्हे करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी गृहभेटी देऊन मतदारांची संपूर्ण माहिती घेण्याचे निर्देश निवडणूक शाखेकडून देण्यात आले आहेत. ही माहिती ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली असून, याकामी जिल्ह्यात ४,२२८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. एक ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, १५ डिसेंबरपर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली. बीएलओंनी काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने ३१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ २२ हजार मतदारांची नोंद होऊ शकली. जिल्ह्यात बीएलओंना सात लाख ५६ हजार कुटुंबांना भेटी द्याव्या लागणार आहेत. निवडणुकींसदर्भातील कामे शिक्षकांना देऊ नये, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतल्याने हे काम रखडले. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर अखेर बीएलओंनी काम सुरू केले. त्यामुळे आजमितीस जिल्ह्यात एक लाख ८६ हजार ८१० कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडून मतदारयादीत नाव नोंदवणे, नाव कमी करणे, पत्ता बदल, मृत व्यक्तीचे नाव काढून टाकणे अशा प्रकारचे अर्ज भरून देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्यात सुमारे पाच लाख कुटुबांच्या गृहभेटीचे आव्हान बीएलओंसमोर आहे.
मतदारनोंदणीत नाशिक जिल्हा सातवा
निवडणूक आयोगाने मंगळवारी आढावा बैठक घेतली. या मोहिमेला मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुदतवाढ देणे शक्य नसून १५ डिसेंबरपर्यंत प्राप्त होणारे सर्व अर्ज ३० डिसेंबरअखेर ऑनलाइन भरण्याची सक्ती आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसांत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान बीएलओंसमोर आहे. मतदार नोंदणीच्या कामात नाशिक जिल्हा सातव्या क्रमाकांवर आहे. राज्यात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, जळगाव आणि पुण्याने या कामात आघाडी घेतली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरालगत असलेल्या वार कुंडाणे गावाजवळ ओली पार्टीसाठी गेलेल्या मित्रांनीच त्यांच्या मित्राला बंदुकीची गोळी मारून ठार केल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. मात्र नजरचुकीने गोळी चालली असल्याची माहिती मित्रांनी दिली आहे. तर तपासणीत मृत मित्राला काही अंतरापर्यंत ओढून आणून तसेच त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे आढळून आले आहे. यामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तविली अाहे.
कुंडाणे गावातील दीपक दगडू वाघ (वय २८) हा सोमवारी (दि. ११) रात्री त्याचे मित्र अभय दिलीप अमृतसागर (रा. कुंडाणे ता. जि. धुळे), पंकज परशुराम जिसेजा (रा. मोगलाई, धुळे), मुकेश नाना अमृतसागर (रा. रेल्वेस्टेशन परिसर, धुळे), पंकज जीवन बागले (रा. रमाईनगर देवपूर धुळे), गोटू दगडूसिंग पावरा (रा. कुंडाणे) यांच्यासोबत कुंडाणे गावाच्या शिवारातील पडिक घराजवळ ही पार्टी सुरू होती. यावेळी पंकज जिसेजा याने त्याच्याकडे असलेली बंदूक काढून मित्रांना दाखवत असताना अचानक गोळी चालून ती मृत दीपक वाघ याच्या उजव्या खांद्याला लागली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या दीपकला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दीपकला मृत घोषित केले. याप्रकरणी दीपकच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन तत्काळ तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच मित्रांवर संशय असल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी मित्रांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 12, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
शहराचे आराध्य दैवत संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. यात्रोत्सवासाठी संपूर्ण सटाणा नगरी सजली असून, मंदिरासह रथ मिरवणूक मार्ग भगवेध्वज, विद्युत रोषणाईसह रांगोळ्यांनी सजला आहे.
बुधवारी पहाटे ३.३० वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, स्नेहा धिवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड यांच्या हस्ते देवमामलेदारांची महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता शहरातून देवमामलेदार यशवंतराव महाराज यांची सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक निघणार आहे.
देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारपासून १७ डिसेंबरपर्यंत देवस्थानच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १८) रोजी आरमनदीपात्रात कुस्तीदंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दहीकाला व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल एक पंधरवाडा सुरू असणाऱ्या या यात्रोत्सवासाठी देवस्थान विश्वस्त अध्यक्ष भालचंद्र बागड, दादाजी सोनवणे, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, सुनील मोरे, अॅड. विजय पाटील, रमेश देवरे, राजेंद्र भांगडीया, कौतीक सोनवणे, रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, प्रवीण पाठक, बाबुराव सोनवणे आदी प्रयत्नशील आहेत.
मिरवणूक मार्ग सजला
रथ मार्गावर भाविकांसह महिलांनी दारापुढे सडा, रांगोळ्या काढल्या आहेत. चौकाचौकात विविध मंडळांनी रथ मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्याचे नियोजन केले आहे. अनेक मंडळाच्या वतीने चहा, केशर दूध, साबुदाणा खिचडीसह महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧