विषय समित्या गठित होऊनही महापालिकेतील अधिकारी या समित्यांच्या बैठका किंवा त्यांचे कामकाज गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. विधी विषय समितीच्या आयोजित बैठकीत लोकप्रतिनिधींना हा प्रत्यय पुन्हा आला. याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत विधी सभापती शीतल माळोदे यांनी ‘आम्ही भिंतींशी बोलावे का?’ असा सवाल केला. तर मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी सभात्याग केला.
बैठकीला बांधकाम, अतिक्रमण आणि विधी विभागाचे अधिकारी उपस्थित असले तरीही अन्य अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे गतवेळीही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक तहकूब करावी लागली होती. अवघ्या तीन अधिकाऱ्यांवर बैठक कशी चालवायची असा प्रश्न यावेळी निर्माण झाला. बराच वेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा यावेळी उपस्थितांनी केली. यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अधिकारी सोयीनुसार उपस्थित राहणार असतील तर ही समितीच बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनाही एकदा निमंत्रण द्यावे म्हणजे या समितीच्या कामकाजाचा प्रत्यय त्यांनाही येईल, अशा शब्दात शेख यांनी नाराजी मांडली.
विषयपत्रिकेवर प्रस्ताव देऊन महिनाभराचा काळ उलटला आहे. मात्र, त्याबाबतची उत्तरे देण्यासाठी आस्थापना विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नाही, असे सांगत शेख यांनी सभात्याग केला. सभापती शीतल माळोदे यांनीही अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी मांडताना त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले. महापालिकेच्या वतीने नियुक्त वकिलांच्या पॅनलवरील विधीतज्ज्ञांची मासिक सभा विधी समिती व विधी विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट