Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

देवळालीत आज जुलूस-ए-मोहम्मदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

​मुस्लिम धर्माचे संस्थापक असणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद इस्लामी कालगणनेप्रमाणे शनिवारी (दि. २) साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त शहरात हिरव्या पताकांसह हिरवे-लाल-पिवळे व नारंगी झेंडे ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत.

शहरातील मुख्य जामा मशिदीपासून मिलाद पार्टीच्या गायन-वादनात जुलूस-ए मोहम्मदी मिरवणुकीला सायंकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे. या प्रसंगी शहरातील राजकीय मान्यवरांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत. जुन्या बस स्थानक परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आकर्षक देखावा सादर करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहर रोषणाईने उजळून निघाले आहे. मुस्लिम ​समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रस्त्यांच्या दुतर्फा सजावटीसह चौकाचौकांमध्ये स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. सुन्नी इस्लामिक फाउंडेशन, चिश्तिया ग्रुप, शहंशाह-ए-सरकार ग्रुप, शेख फ्रेंड्स सर्कल, बज-मे-नमाज ग्रुप, फैजानी सोशल ग्रुप, गुलाम-ए-हुसेन आदी मंडळांच्या वतीने चौकाचौकात आकर्षक देखावे सादर करण्यात येणार आहे.

जामा मशिदीचा देखावा

शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने फत्तेपूर लखनऊ येथील ऐतिहासिक जामा मशिदीचा देखावा सादर करण्यात आला आहे. दिवसभर मुस्लिम युवकांकडून शहराच्या विविध भागात दुचाकीवरून रॅली काढण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी मिठाई व सरबत वाटपाचा कार्यक्रम होईल. केजीएन ग्रुपच्या वतीने नियाज-ए-मोहम्मदी (महाप्रसाद) वाटप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईदची आज रौनक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबरांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण शनिवारी (दि. २) साजरा होणार आहे. जुने नाशिक, वडाळागाव आणि शहरातील अनेक भागांमधील मशिदी रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. दिवसभर सामूहिक कुराण पठण, जुलूस, विविध धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदानासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ईदन‌िमित्त सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजेसला शुक्रवारी सुटी असली तरी चंद्रदर्शन न झाल्याने हा सण शनिवारी साजरा होणार आहे. दरवर्षी इस्लामी कालगणनेतील रबीऊल अव्वल या उर्दू महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. यंदाही यानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रवचन आणि स्तुतीपर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सणानिमित्त मुस्ल‌िमांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरे, मशिदी, व्यावसायिक आस्थापनांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून घरोघरी बच्चेमंडळींनी सजावटी पूर्ण केली आहे.

जुने नाशिकमध्ये दुपारी मिरवणूक
पैगंबर जयंतीनिमित्त जुन्या नाश‌िक परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. खतीब यांनी जाहीर केलेल्या मिरवणुकीच्या नियमावलीचे पालन करून शांततामय वातावरणात पैगंबर जयंती साजरी करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.

नाशिकरोडला वाहतूक मार्गात बदल
नाशिकरोड परिसरातह‌ी मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. गोसावीवाडी, सुभाष रोडने आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक, महात्मा गांधी रोड, सत्कार पॉईंट, देवळाली गाव पोलिस चौकी समोरून विहितगाव येथून पुन्हा देवळालीगाव गांधी पुतळा, साने गुरूजी रोडने गाडेकर मळ्यात या मिरवणुकीचा समारोप होणार आहे. त्यामुळे अनुराधा चौक ते आर्टिलरी सेंटर आणि पुढे रोकडोबावाडी पुलावरून विहितगाव बागूलनगर या मार्गाचा वाहनचालकांनी अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देवळाली कॅम्पकडे नाशिकरोड जाणारी वाहतूक ही बागूल नगर, विहीतगाव रोकडोबावाडी पूल ते आर्टिलरी सेंटर रोडने दत्त मंदिरला जाऊन वाहने इतरत्र जाऊ शकणार आहेत. शनिवारी सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत हे निर्बंध राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पॅसेंजरमध्ये आढळला मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या मनमाड-नांदेड पॅसेंजरमध्ये शुक्रवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मनमाड रेल्वे जंक्शनहून मध्यरात्री नांदेडकडे निघालेली पॅसेंजर (गाडी क्रमांक ५७५९०) दक्षिण-मध्य रेल्वेच्या नगरसूल स्टेशनवर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आली. तिच्या एका बोगीत सफाई कामगाराला सुमारे ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत सफाई कामगाराने स्टेशन मास्तर हरीभाऊ महाले यांना तात्काळ माहिती दिली. महाले यांनी मनमाड रेल्वे पोलिसांना सदर घटनेची माहिती दिी. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून रेल्वे स्टेशनवर आणण्यात आला. रंगाने सावळा व सडपातळ बांधा, लांबट चेहरा असलेल्या या व्यक्तीच्या डोक्याचे केस व मिशी बारीक आहे. त्याच्या उजव्या हातात लाल दोरा व गळ्यात मण्याची माळ आहे. त्याने अंगात निळा, पांढरा चौकटीचा शर्ट व भुरकट रंगाची फुलपॅन्ट परिधान केलेली आहे. मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक पी. टी. सुरनार यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अधिक तपास सुरनार हे करीत आहे. संबंधित व्यक्तीविषयी कुणाला माहिती असल्यास त्यांनी ८००७३४८६०४ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबचे आज गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी सरत्या वर्षाचा डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. म्युझिक, डान्स, स्नॅक्स अशी धम्माल कल्चर क्लब सदस्यांना आज, रविवारी (दि. ३) आयोजित केलेल्या गेट टुगेदरमधून करण्यास मिळणार आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विविध पाककृतींबाबत मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे शो अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असतो. यातील गेट टुगेदर सर्वच सदस्यांसाठी आकर्षणाचा भाग असतो. दर वर्षी वर्षअखेरीस या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमाची सुरुवात रागिणी कामतीकर यांच्या म्युझिकल प्रोग्रामने होणार आहे. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटांतील गाणी, तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वेगवेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी २९९ रुपये भरून कल्चर क्लब सदस्य होता होणार आहे. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क करता येणार असून, कल्चर क्लबचे ऑनलाइन सभासदत्व www.mtcultureclub.com या वेबसाइटवरही मिळविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीट नंबर नवा, विषय मात्र जुनाच!

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत उत्तरपत्रिकेवर लावण्यात येणाऱ्या पांढऱ्या बारकोड स्टिकरवर विद्यार्थ्यांचा सीट नंबर, विषयाचे नाव व स्टिकर नंबर दिलेला असतो. मात्र, या बारकोड स्टिकरवर नवा सीट नंबर येताना जुनेच विषय येत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून काही नवीन विषयांचा समावेश करून जुने विषय वगळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात नवीन विषयाचा पेपर आणि त्यावर जुन्याच विषयाचे बारकोड स्टिकर लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे जे विषय बदलले आहेत, त्या सर्वच विषयांच्या बाबतीत असा प्रकार घडत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

--

प्रश्नपत्रिका-वेळापत्रकात विसंगती

विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत अजून एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागते आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून आधीच विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले होते. त्यात परीक्षेसाठीची वेळ २००८ कोर्ससाठी तीन तासांची, तर २०१२ कोर्ससाठी अडीच तासांची नमूद करण्यात आली आहे. परंतु, २०१२ कोर्सच्या काही प्रश्नपत्रिकांत परीक्षेची वेळ तीन तास दिलेली आहे. त्यामुळे पेपर नेमका अडीच तासांचा की तीन तासांचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र, कॉलेज प्रशासन वेळापत्रकातील वेळेनुसारच पेपर घेत असल्याने पेपरवरची वेळ नेमकी कुणासाठी हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी मात्र, प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या वेळेनुसारच पेपर घ्यावा, असा आग्रह धरत आहेत. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सतत घडत आहे. मात्र, विद्यापीठाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्याच-त्याच चुका दर वर्षी घडत असल्याने पुणे विद्यापीठाच्या अशा भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

--

विद्यापीठाकडून याबाबतीत कॉलेजला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीदेखील काळजी कॉलेजमार्फत घेतली जात आहे.

-डॉ. एम. व्ही. भटकर, प्राचार्य

--

या चुकांमुळे गोंधळ उडत असून, विद्यापीठाने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सीट नंबर बरोबर असला, तरी विषय मात्र जुनाच येत आहे. त्यामुळे पेपरव्यतिरिक्त दुसऱ्याच विषयाला तोंड द्यावे लागत आहे.

-यश खटोड, विद्यार्थी

--

वेळापत्रकातील वेळ आणि प्रश्नपत्रिकेतील वेळेत फरक असल्याने पेपर नेमका किती तासांचा असा प्रश्न पडत आहे. प्रश्नपत्रिकेतील वेळेनुसार पेपर घ्यायला हवा. पण, तसे होताना दिसत नाही.

-शिवकांत मिश्रा, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी विनंती, नंतर सात दिवसांची मुदत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत मराठी पाट्यांसाठी टोकाची भूमिका घेणाऱ्या मनसेने नाशिकमध्ये मात्र दुकानदार व आस्थापनांना हात जोडून मराठी पाट्या लावण्याची विनंती केल्यामुळे व्यापाऱ्यांना हायसे वाटले. कॉलेजरोड परिसरातील दुकानदार व आस्थापनांना हे कार्यकर्ते हात जोडून मराठी पाट्या लावण्याची विनंती करीत असल्यामुळे मनसेची नवीन स्टाइल बघून अनेकांना आश्चर्य वाटले. पण, दुसऱ्याच क्षणी सात दिवसांत या पाट्या न लावल्यास परिणामाचा दमही भरला गेल्याने प्रसंगी खळ्ळखट्याक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मराठी राज्यभाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व दुकानांत मराठीत फलक लावले पाहिजेत, यासाठी मनसेने अनेक वेळा आंदोलन केले. त्यानंतर अनेकांनी आपल्या पाट्या मराठीत केल्या. पण, काही ठिकाणी या पाट्या मराठीत नसल्यामुळे मनसेने हात जोडून ही गांधीगिरी केली. पण, यावेळी त्यांनी या दुकानदारांना दमही भरला. सात दिवसांच्या आत संचालक व व्यावसायिकांनी आपली दुकाने, संस्थांचे फलक मराठीत लावले नाहीत, तर पुढे जे काही होईल त्याला संबंधित व्यवस्थापकच जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात इशाराही दिला. मनसेने हे आंदोलन शहरात विविध भागात सुरू केले असून, त्यात मनसेचे पदाधिकारी अक्षय भोसले, आदित्य पगारे, कुणाल भंडारे, अतिश काळे, तेजस नेरकर, रुपेश दूरढोळे, अक्षय व्यवहारे यांनी सहभाग घेतला आहे.

--

कामगार उपायुक्तांचाही इशारा

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम १९६१ च्या नियम २०-ए नुसार प्रत्येक आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत देवनागरी लिपीत असली पाहिजे आणि ही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजेत. देवनागरी लिपीतल्या मराठी नावाखेरीज इतर भाषेतली आणि लिपीतली नावाची पाटी लावताना मराठीतील आणि देवनागरी लिपीतली नावाची पाटी कमी उठावदार असणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिनियमात वरीलप्रमाणे तरतूद असतानादेखील दुकाने व आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. दुकाने, आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत लावण्यासंदर्भात संबंधित मालकांनी त्वरित कार्यवाही करावी. जे आस्थापनाधारक या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या जागांवर वाहनतळ

$
0
0

धार्मिक स्थळे काढल्यानंतर अतिक्रमणांचा त्रास; कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक महापालिकेने मागील महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविले. तरी या धार्मिक स्थळांच्या मोकळ्या झालेल्या जागांवर आता हळूहळू अतिक्रमण होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. आता महापालिकेने तातडीने या जागांचा योग्य वापर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केल्यानंतर महापालिकेने शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे मागील महिन्यांतच हटविली आहेत. यामधील काही ठिकाणी तुरळक विरोध वगळता ही मोहीम शांततेत पार पडली होती. मात्र आता धार्मिक स्थळे हटविल्यानंतर त्या जागेवर करायचे काय, याचा निर्णय महापालिकेने तातडीने घेणे आवश्यक बनले आहे. कारण त्याठिकाणी चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.


बांधकाम साहित्य पडूनच

इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकलगत असलेले धार्मिक स्थळ महापालिकेने हटविले. यावेळी स्थानिक नागरिकांनी याचा विरोध केला होता. नंतर याठिकाणी काळ्या फिती लावून प्रशासनाचा विरोध करणारे आंदोलनही केले. हे धार्मिक स्थळ हटविल्यानंतर येथील रस्ता मोठा करण्यात येईल, असे काही नागरिकांना वाटले होते. परंतु, या मोकळ्या जागेवर वाहनतळ बनले आहे. या मंदिरालगत काही व्यावसायिक असून, त्यांच्याकडे येणाऱ्या गाड्या या धार्मिक स्थळाच्या खुल्या जागेत उभ्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर याठिकाणी महापालिकेने कोणत्याही प्रकारची स्वच्छतासुद्धा केलेली नाही. आजही पाडलेले बांधकाम साहित्य तसेच पडून असून, काही दिवसांनी याठिकाणी वाहनतळ किंवा कचरा टाकण्याचे ठिकाण होणार तर नाही ना, अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे.


धार्मिक स्थळ हटविल्यानंतर येथील बोगदा व रस्ता मोठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. मात्र आता याठिकाणी वाहनतळ होऊ लागल्याने तातडीने बोगदा व रस्ता मोठा करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- हर्षद गोखले, शिवसेना ग्राहक कक्ष

जॉगिंग ट्रॅकजवळील धार्मिक स्थळ हटविले ही दुःखद घटना असून, न्यायव्यवस्थेचा मान ठेवून आम्ही विरोध केला नाही. मात्र आता तातडीने या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करून येथील दोन्ही रस्ते रुंदीकरण केले पाहिजे. त्यासाठी मनपा प्रशासनाने लवकर कारवाई केली पाहिजे.

-चंद्रकांत खोडे, नगरसेवक

तातडीने उपाय योजण्याची गरज

वडाळा पाथर्डी रोडवरील धार्मिक स्थळ हटविण्यात आल्यानंतर याठिकाणची वाहतूक सुरळीत होईल, असे वाटले होते. मात्र याठिकाणी असलेले वृक्ष अडथळा ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने हटविलेल्या धार्मिक स्थळांच्या जागांचा तातडीने योग्य तो वापर करणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी लागणार हे मात्र निश्चित असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने शहरातील सर्वच भागात ही मोहीम राबविली असली तरी आता या खुल्या झालेल्या जागांचा योग्य पद्धतीने वापर किंवा रस्ता रुंदीकरण करणे या गोष्टीही तातडीने करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रोशन!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडमध्ये ईद-ए-मिलाद सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात, ईद-ए-मिलादनिमित्त शहरातून शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात शहरातील ३५ मोठ्या चित्ररथांसह मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील चित्ररथ मिरवणुकीत जेलरोड, विहितगाव, चेहेडी, सिन्नर फाटा, सुभाषरोड, देवळालीगाव आदी ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मुख्य चौकांत मिठाई, गुलाबपुष्प देऊन स्वागत करूत बंधुभावाची शिकवण दिली.

गोसावीवाडी येथून शनिवारी सकाळी मौलानांच्या हस्ते मिरवणूक सुरू झाली. डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक, सत्कार पॉइंट, अनुराधा चौक, विहितगाव व देवळालीगाव अशा मार्गाने आलेल्या मिरवणुकीची सांगता गाडेकर मळ्यातील महापालिकेच्या मैदानावर मौलाना अकबर कादरी व इतर धर्मगुरूंच्या प्रवचनाने झाली. या कार्यक्रमास मौलाना मुफ्ती रहेमान रजा मिसवाही, मौलाना हाफिज मुस्ताक, मौलाना जफर खान, मौलाना अब्दुल अजीज, मौलाना हारुन रशीद आदी उपस्थित होते.

--

सामाजिक मंडळांचा सहभाग

मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी सामाजिक मंडळांतर्फे चित्ररथांचे स्वागत व अन्नदान करण्यात आले. टिपू सुलतान फ्रेंड सर्कल, हिंद सोशल वेल्फेअर, अजमेरी ग्रुप, सरकार फाऊंडेशन, हजरत सादिका शाह हुसैन ग्रुप, अलहुसेनी वेल्फेअर ट्रस्ट, हनफिया नौजवान कमिटी, आझाद हिंद सेना आदी मंडळांचा मिरवणुकीत समावेश होता.

--

ठिकठिकाणी स्वागत

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर मिरवणुकीत सहभागी चित्ररथांचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी अनुराधा चौकात चित्ररथांचे स्वागत केले. माजी नगरसेवक अस्लम मणियार यांच्यासह निजाम मास्टर, वसीम शेख, इम्तियाज सय्यद, जेलरोडच्या अंजुमन फैजाने हनफिया नुरीयाचे अध्यक्ष हाजी अब्दुल गनी, हाजी गनी चाँद, हाजी उमर पटेल आदींसह शेकडो मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

--

भाजपतर्फे मिठाईवाटप

नाशिकरोड ः येथील मिरवणुकीत सहभागी झालेला चित्ररथांचे भारतीय जनता पक्ष आणि मित्रमेळा परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मिठाईवाटप करण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप, प्रभाग समितीच्या सभापती सुमन सातभाई, मित्रमेळा परिवाराचे राजेंद्र ताजणे, नगरसेवक बाजीराव भागवत, युवा मोर्चाचे नाशिकरोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थायी समिती सदस्या सीमा ताजणे, नगरसेविका संगीता गायकवाड, मीरा हांडगे, सुनंदा मोरे, नगरसेवक पंडित आवारे, अंबादास पगारे, सुभाष घिया, नय्युम खान, मंदा फड, रोहिणी नायडू आदी उपस्थित होते.

--

पोलिसांचे चोख नियोजन

या मिरवणुकीदरम्यान पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन, सहाय्यक निरीक्षक (गुन्हे) सुरज बिजली आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.

-----------


देवळाली कॅम्पमध्ये मिरवणूक

--

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजेच ईद-ए-मिलादचा सण देवळाली कॅम्पसह भगूर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात विविध चौकांमध्ये जगभरातील प्रसिद्ध मशिदींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. शहरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-मोहम्मदी मिरवणुकीत मिलाद पार्टीच्या गाण्यांनी रंगत भरली.

देवळाली कॅम्प शहरात जुन्या बसस्थानक परिसरात सुन्नी इस्लामिक फाउंडेशनतर्फे साकारण्यात आलेल्या मुख्य सजावटीत व शहेनशहा-ए-सरकार ग्रुपतर्फे मक्का मदिना, अजमेर शरीफ व बगदाद शरीफ, चिश्तिया फ्रेंड सर्कलतर्फे अबुधाबी येथील जामा मशीद, अर्क वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे मस्जिद-ए-नबी, लब्बीक फ्रेंड सर्कल व सुल्ताने हिंद ग्रुपतर्फे मस्जिद-ए-अबुधाबी, फत्ते स्टार ग्रुपतर्फे मलेशियातील मशीद, केजीएन ग्रुपतर्फे मक्का-मदिना, बज्मे गरीब नवाज बेडर जमततर्फे अबुधाबी येथील मशीद, शेख फ्रेंड सर्कलतर्फे फत्तेपूर लखनऊ येथील ऐतिहासिक जामा मशिदीचा देखावा, तर फैजान-ए-मदिना काबा शरीफ मशिदीची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

शहरातील मुख्य जामा मशिदीपासून दुपारी ४ ​वाजेला मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यात मौलाना सादिक अख्तर, नगरसेवक सचिन ठाकरे, सुरेश कदम, संजय गोडसे, निसार खान, फारूक खान, अफजल खान​, रफिक शेख, रईस शेख, जहाँगीर शेख, वाजीद सय्यद, अजीज शेख, राशीद सय्यद, इब्राहिम शेख, शाहिद सय्यद, झिशान खान आदी सहभागी झाले होते.​

--

मिठाई, सरबत बाटप

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यासह शेख फ्रेंड सर्कल, ब्लू वॉरियर्सतर्फे मिरवणुकीदरम्यान नानकटाई, मिठाई व दूध-सरबताचे वाटप करण्यात आले. शहराच्या विविध भागात दुचाकीवरून रॅली काढण्यात येऊन हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. टांगा लाइन येथे नियाजचे वाटप करण्यात आले.

--

भगूरला देखावे, मिरवणूक

येथील मौलाना आझादरोडवर मक्का-मदिना येथील आकर्षक रोषणाईचा देखावा सादर करण्यात आला होता. चौकाचौकांत मुस्लिम युवा सोशल ग्रुप, मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी, बज्मे गौसिया ग्रुप आदींतर्फे देखावे सादर करण्यात आले. लहान मुले-मुली, युवक यांच्या उपस्थितीत निघालेला जुलूस टाकी चौक, तेली गल्ली, राम मंदिररोड, आठवडेबाजार, मारवाडी गल्ली, शिवाजी चौकात दाखल होताच शिवसेना जिल्हाप्रमुख करंजकर, नगरसेवक भाऊसाहेब गायकवाड, फरीद शेख आदींनी इमाम-ए-खतीफ मौलाना मोहम्मद अफाक रझा यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

--

पोलिसांतर्फे स्वागत

जुलूसमध्ये सहभागी बांधवांचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह पोलिसांतर्फेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परिसरात मसूर पुलाव व गोड नियाजचे वाटप करण्यात आले. अस्लम मणियार, फिरोझ पटेल, अमजद पटेल, मुन्नाभाई अन्सारी, आरिफ मणियार, यासिर शेख, इम्रान पटेल आदींसह मुस्लिम बांधव या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

--

बच्चेकंपनीचा उत्साह

मिरवणुकीसह दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत बच्चेकंपनीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ईदनिमित्त नवीन कपडे परिधान करण्यासह धार्मिक टॅटू रंगवून धमाल केली. सेल्फी काढण्यासाठीही चिमुकल्यांचा उत्साह दिसून आला. एक दिवस आधी लहान खास चिमुकल्यांसाठी आजोयित करण्यात आलेल्या तकरीर मुकाबल्यातदेखील बच्चेकंपनीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठा निरीक्षकाचे निलंबन

$
0
0

रेशन दुकानदारांकडे मागितले होते पैसे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याकरीता रेशन दुकानदारांकडे पैसे मागणाऱ्या सोशल मीडियावरील व्हिडिओची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. संबंधित पुरवठा निरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून, या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदविणे अनिवार्य आहे. शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक मिळवून त्याची डाटा एंट्री करवून घेण्याची जबाबदारी जिल्हयातील रेशन दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे. नाशिक धान्य वितरण कार्यालयात ‍आधारच्या एंट्रीचे काम सुरू आहे. परंतु, त्यासाठी तेथील एका पुरवठा निरीक्षकाकडून रेशन दुकानदारांकडे प्रति कार्ड पैसे मागितले जात असल्याची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पैसे न दिल्यास डाटा फ्रिज करतो असेही रेशन दुकानदारांना धमकावले जात होते. व्हिडिओ चित्रफितीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्याने खळबळ उडाली असून, पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित निरीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्डमुळे विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

$
0
0

आधार नसल्यास हमीपत्र देणे आवश्यक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, विद्यार्थ्यांना आवेदनपत्रात आधारकार्ड क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे. खासगीरित्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असून, आधारकार्ड क्रमांक नसल्यास विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना हमीपत्र भरून देणे अनिवार्य असल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले..

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवेदनपत्रातच आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे. आधारकार्ड नसल्यास नोंदणी क्रमांकदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल, असे हमीपत्र प्राचार्यांना देणे आवश्यक आहे. आधारकार्ड क्रमांक नाही म्हणून आवेदनपत्र भरणे नाकारता येणार नाही याची कॉलेजांनी नोंद घ्यावी, अशा सूचनाही राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

अर्ज प्रक्रिया सुरू

खासगीरित्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने दाखल करणे गरजेचे असून, त्यासाठी तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत. ज्युनिअर कॉलेजांकडून ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्कासह २ ते ११ डिसेंबर २०१७पर्यंत आणि विलंब शुल्कासह १२ ते १६ डिसेंबरपर्यंत आवेदनपत्रे दाखल करायची आहेत. ज्युनिअर कॉलेजांकडून बँकेमध्ये २ ते १८ डिसेंबरअखेर चलनाद्वारे शुल्क भरायचे आहे. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी आपल्या निर्धारित कॉलेजांशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्था सावरताहेत

$
0
0

ठेवी अडकल्याने होतेय अडचण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटांबदीनंतर राज्यात सहकार चळवळीला मोठा फटका बसला. सर्वसामान्यांचा पैसा असलेल्या पतसंस्थांची अवस्था तर अधिकच बिकट झाली. पण, आता या पतससंस्था सावरत आहेत. मात्र या संस्थांच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकल्याने त्याचाही फटका त्यांना बसला आहे. चांगले कर्जदार मिळत नसल्याने पतसंस्थांच्या अडचणींत भर पडते आहे.

जिल्ह्यातील ५४५ पैकी ३७३ पतसंस्था गावपातळीच्या आहेत. त्यामुळे या पतसंस्थांच्या ठेवींना सरकारने संरक्षण दिल्यास त्याचा फायदा या संस्थांवर विश्वास वाढवण्यासाठी होणार आहे. पतसंस्थेचे फेडरेशन सरकारकडे ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून सतत मांडत असले तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका येथून कर्ज घेणे सर्वसामान्यांना सहज शक्य नसते, तर सहकारी बँकाही सर्व ठिकाणी नाहीत. त्यामुळे पतसंस्था याच बहुतांश आधार आहेत. त्यात ठेवींवरील व्याजही राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जास्त मिळत असल्याने लोकांचा कलही आहे. पण, या ठेवी सुरक्षितता हाच मोठा विषय पतसंस्थेपुढे आहे. जिल्ह्यात या पतसंस्थांच्या ठेवीवर नजर टाकली तरी त्यांचे महत्त्व समोर येते. पतसंस्था अवसायनात येण्याचे तसेच गैरव्यवहार असलेल्या पतसंस्थांही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात कमी आहेत. पतसंस्थांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ठेवी सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.

कोट्यवधींच्या ठेवी

राज्यभर या पतसंस्थांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवीकडे नजर टाकली तरी आकडे मार्च अखेर समाधानकारक असेच आहेत. २६२ पतसंस्थांकडे एक कोटीपर्यंत ठेवी होत्या. त्याचप्रमाणे १५३ पतसंस्थांकडे १ ते ५ कोटीपर्यंत ठेवी आहेत. ५ ते २५ कोटीपर्यंतच्या ठेवी २६ , ५० ते १०० कोटीपर्यंतच्या ठेवी असणा-या दोन पतसंस्था आहेत. त्याचप्रमाणे ५० ते १०० कोटींच्या ठेवी असणा-या तीन पतसंस्था जिल्ह्यात आहेत.

ग्रामीण भागाची आर्थिक नाडी

जिल्ह्यात एकूण ५४५ पतसंस्था असून, त्यांची मार्चअखेर सभासद संख्या ४ लाख ७१ हजार ३३९ आहे, तर कर्जदारांची संख्याही २ लाख १७ हजार ९७२ होती. विशेष म्हणजे या पतसंस्थांतील ठेवी तब्बल ३ हजार १०८ कोटी होत्या. त्यामुळे गावपातळीवर या पतसंस्थांचे महत्त्व असून, ती आर्थिक नाडी असल्यामुळे त्या टिकवणे सुद्धा पुढील काळात महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामप्रश्नी चिंता दंडाची...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असली, तरी दंडाच्या रकमेबाबत चिंता कायम आहे. या दंडाच्या रकमेची कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे महापालिका ती कशी आकारते याबाबत बांधकाम व्यावसायिक अंदाज बांधत आहेत.

राज्य सरकाने अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे अधिकृत होणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या कपाटांचा प्रश्नही मार्गी लागणार असून, त्यातून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. पण, या दंडाची रक्कम जास्त असल्यास त्याचा फटकाही बसणार आहे.

--

या बांधकामांनाच लाभ

राज्यभरातील शहरी भागांतील सर्व बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन ती नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेने अधिसूचना जारी करून काही नियम व निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ४५०० हून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे दंड भरून अधिकृत करून घेता येणार आहेत. मात्र, ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत असून, त्यात हे बांधकाम नियमित न केल्यास पुन्हा संधी मिळणार नाही. महापालिकेला त्यातून १५० कोटींहून अधिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीत असलेल्या महापालिकेलाही त्यातून दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला टळली रेल्वे दुर्घटना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या इंजिन नजीकच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने मनमाड रेल्वे स्थानकात इंजिनपासून काही डबे वेगळे झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र रेल्वे लोहमार्ग पोल‌िस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासन आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व मोठा अपघात टळला.

इंजिनपासून दूर गेलेले डबे थोड्या वेळात जोडले गेल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मनमाड रेल्वे स्थानकातील शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडलेला हा प्रसंग काही काळासाठी प्रवाशांचा थरकाप उडविणारा ठरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी न्यू दिल्ली-बंगलोर कर्नाटक एक्स्प्रेस दुपारी सव्वा चारच्या सुमारास थांबा घेण्यासाठी स्थानकात प्रवेश करीत होती. मनमाडला थांबा असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. मनमाड रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असताना इंजिनपासून पावचा डब्याजळची कपलिंग तुटली.

प्रवाशांनी टाकल्या उड्या

कपलिंग तुटल्यामुळे इंजिनपासूनच चार डबे पुढे आणि मागील सर्व डबे मागे राहिले. कपलिंग तुटल्यामुळे गाडीला थोडा झटका बसला. मनमाड स्थानकावर उतरण्यासाठी दरवाजात आलेले प्रवाशी मात्र यामुळे प्रचंड घाबरले. काही जणांनी भीतीपोटी गाडीतून खाली उड्या टाकल्या. फलाट काहीसा दूर असल्यामुळे प्रवाशांनी खाली खडीवरच उड्या सोडल्या.

दुसऱ्यांदा तुटली कपलिंग

मनमाड स्थानकात रेल्वे डब्यांचे कपलिंग तुटल्याची दुसरी घटना आहे. सहा महिन्यांपूर्वी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसचेही डबे वेगळे झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलवरच सुलभ शौचालये

$
0
0

गंगापूररोडवरील उजव्या कॅनॉलची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरात शेतजमिनी असताना जलसिंचन विभागाने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे याकरीता हजारो एकर शेतजमिनी आरक्षित केल्या. यामधील गंगापूर धरणातून उजव्या कॅनॉलची उभारणी करण्यात आली होती. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या कॅनॉलवर चक्क महापालिकेने सुलभ शौचालये उभारल्याचे चित्र आहे.

काही राजकारण्यांच्या हट्टापोटी कॅनॉलची दुरवस्था होत आहे, असे सुज्ञ नाशिककरांचे मत आहे. त्यात या कॅनॉलबाबत महापालिका व जलसिंचन विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.


सांडपाणी थेट पाइपलाइनीत

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने शहरात गंगापूर धरणातून उजव्या कॅनॉलची उभारणी करण्यात आली होती. कालांतराने शहराची वाढत्या लोकसंख्येत कॅनॉलच्या बाजूला असलेली शेतीच गायब झाली. यानंतर कॅनॉल बंद करण्यात आल्याने नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा करणारी थेट पाइपलाइन टाकण्यात आली. परिणामी, दिवसेंदिवस महापालिका व जलसिंचन विभागाने गंगापूर धरणातून निघणाऱ्या उजव्या कॅनॉलकडे दुर्लक्ष केल्याने आजमितीस दिसेनासा झाला असून, केवळ ब्रिटिशकालीन कॅनॉलचे अस्तित्व पहायला मिळत आहे. यामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांच्या हट्टापायी कॅनॉलरोडलाच शौचालयांची उभारणी करण्यात आल्याने थेट पाइपलाइनीत सांडपाणी जात असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करण्याची वेळ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूर-ए-खुदा जमींपर...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना शुभेच्छा देत आणि घरोघरी खीर-पुरीचा आस्वाद घेतानाच एकात्मतेचा संदेश देत ईद-ए-मिलादचा सण शहरात हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. जुने नाशिक परिसरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-मिलाद मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अबालवृद्धांमध्ये यंदा अभूतपूर्व उत्साह पाहावयास म‌िळाला.

मानवता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त शहरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. शनिवारी पहाटे या कार्यक्रमांची सांगता झाली. बडी दर्गाह शरीफ आणि जहाँगीर मशीद येथे बांधवांनी दर्शन घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या सणाचे आकर्षण ठरली ती शहरातून काढण्यात आलेली जुलूस-ए-मिलादची मिरवणूक. दुपारी साडेतीनच्या सुमारास चौक मंडई येथील जहाँगीर चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये धर्मगुरू स्थानापन्न झाले होते.

बागवानपुरा, मरहूम सलीम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदमशाह चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, दखनीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाट या मार्गावरून ही मिरवणूक पुढे सरकत बडी दर्गाह शरीफ येथे पोहोचली. या लाल आणि हिरव्या पताका लावण्यात आलेल्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस आणि सामाज‌िक संघटनांच्या वतीने कमानी उभारून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

--

देखावे अन् अन्नदान

ईद-ए-मिलादनिमित्त ठिकठिकाणी मशिदींच्या प्रतीकात्मक रूपातील धार्मिक देखावे साकारले होते. चौक मंडईतील तरुणांनी २० बाय २० च्या आकारात पवित्र मदिना शरीफची प्रतिकृती उभारली होती. रोषणाईने उजळून निघालेली ही प्रत‌िकृती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली. सकाळी बागवानपुरा चौकात सर्वधर्मीयांना अन्नदान करण्यात आले.

--

तरुणाईची उत्स्फूर्तता

दर वर्षीप्रमाणे चिमुकल्यांसह अबालवृद्ध यंंदाच्या मिरवणुकीत उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, त्याचबरोबर तरुणाईचा मोठ्या प्रमाणावरील उत्स्फूर्त सहभाग ही यंदाच्या मिरवणुकीचे वेगळेपण अधोरेखित करणारी बाब ठरली. पंचविशीतील तरुणाई आणि टीनएजर्स दुचाकींना ध्वज लावून दिवसभर शहरभर फिरताना दिसून आली. त्यांची वेशभूषा अन् उत्साह चर्चेचा विषय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीस धमकी देऊन पळविले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मायलेकीस ठार मारण्याची धमकी देत एका १५ वर्षीय अल्पवयीन युवतीस संशयित आरोपीने पळवून नेले. ही घटना वडाळागावातील मदिनानगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल नोंदवला आहे.

मदिना लॉन्स पाठीमागे राहणारी १५ वर्षांची युवती २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या घरी एकटी असतांना हा प्रकार घडला. घरात आलेल्या अन्सार पठाण (रा.खडकाळी) व त्याच्या एका मित्राने युवतीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने संशयितास असे करण्यास नकार दिला. यावेळी संशयितांनी मुलीसह तिच्या आईचा खून करण्याची धमकी देत तिला बळजबरी पळवून नेले.

भाजल्याने महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करीत असतांना स्टोव्हचा भडका होवून भाजलेल्या विवाहीतेचा मृत्यू झाला. आनंदवलीतील काळेनगर भागात हा प्रकार घडला. गंभीर जखमी असलेल्या महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात १३ पासून यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव येत्या १३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दीप‌िका चव्हाण यांनी केले.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवमामलेदार यशवंतराव महाराज मंद‌िर सभागृहात आमदार दीप‌िका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी चव्हाण बोलत होत्या. व्यासपीठावर तहसीलदार सुनील सैंदाणे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलिस निरीक्षक बुवा, नगराध्यक्ष सुनील मोरे, माजी आमदार संजय चव्हाण उपस्थित होते. नगरसेवक राहुल पाटील, नितीन सोनवणे व मनसेचे पंकज सोनवणे यांनी यात्रेतील पाळण्यांच्या वाढत्या दराबाबत नाराजी व्यक्त केली. हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. तर यात्रेकरू व व्यापाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या फीवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. नगरसेवक दिनकर सोनवणे कुस्ती स्पर्धेतील मल्लांना दिला जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करावी, अशी सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईद-ए-मिलाद उत्साहात

$
0
0


टीम मटा

जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलाद सण साजरा केला. या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

कमानींनी सजले मालेगाव

मालेगाव ः शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा केला. या निमित्ताने शहरातून सुन्नी जमेतूल उलेमातर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मिरवणूक मार्गांची पालिकेकडून डागडुजी करण्यात आली होती. चोख पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील डॉ. सैय्यद मुशिरूद्दीन कादरी बरकती याच्या नेतृत्त्वाखाली लल्ले चौक येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. आझादनगर, नुरानी मश‌िद, किदवाई रोडमार्गे शहरातील ए. टी. टी. हायस्कूलच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत घोडेस्वार, वाहने सहभागी झाली होती. समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमास रझा अकादमीचे मुंबई येथील प्रमुख मोहम्मद सईद नुरी, अब्दुला नासिमुल कादरी, मुफ्ती वाजीद अली यार अल्वी, मौलाना अब्दुल्ला रझा, मौलाना इरफान रझा मिसबा यांच्यासह अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी अजय मोरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते.

येवल्यात मिरवणूक

येवला ः येवला शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात हजरत मोहंमद पैगंबर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिमबहुल भागात ठिकठिकाणी हिरवे झेंडे, पताका व आकर्षक कमानी लावण्यात आल्या होत्या. सकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील कचेरी रोडवरील आयना मस्जिद येथून सकाळी ९ वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला.

येवला शहरात सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्राच्या वतीने वलीबाबा दर्गा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लासलगावी जुलूस

निफाड ः लासलगाव येथे जुलूस काढण्यात आला. सकाळी ९ वाजता जामा मश‌िद येथून जुलूस निघाला. लासलगाव व परिसारातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचाही सहभाग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने १० ते १२ सुशिक्ष‌ति बेरोजगारांना गंडा घातल्याचे पुरावे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. या प्रकरणात विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असावा, अशी शक्यता असून, चौकशी करण्याकामी पोलिसांनी विभागास पत्र दिले आहे.

सोमनाथ विठ्ठल डाबल (३७ रा. शांतीनगर, मखमलाबादरोड), राजेश राम रोहिडा (४२ रा. दत्तनगर, पेठरोड), राजेंद्र सहदेव मोरे (४५ रा.लक्ष्मीनगर, नांदगाव) आणि हेमंचंद्र विष्णू आहिरे (६२ रा. क्रांतीनगर,मखमलाबाद) या संशयित आरोपींनी साहेबराव रामभाऊ शेवाळे (रा. सौंदाणे, ता. नांदगाव) या फरार साथिदारासह बनावट कागदपत्रांआधारे बेरोजगारांना आर्थिक गंडा घालण्याचे रॅकेट सुरू केले होते. आदिवासी विकास विभागातील सुरक्षारक्षकास हाताशी धरून या टोळीने संदीप बाळू सानप (रा. कासारी, ता. नांदगाव) या तरुणास तब्बल तीन लाख रुपयांना चूना लावला. फसवणुकीचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सानपने पोलिसांकडे धाव घेतली. संशयित आरोपीने अधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर बनावट स्टॅम्पही बनवून सानपची विभागातच मुलाखत देखील घेतली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे सानप यांनी तक्रार केल्यानंतर संशयितांची धरपकड करण्यात आली.

मास्टरमाईंडचा हात

संशयित आरोपींनी आणखी १० ते १२ जणांची फसवणूक केली असावी. तसे पुरावे व नावांची यादी पुढे आली असून, आम्ही तक्रारीच्या प्रतिक्षेत आहोत. यातील एक संशयित आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यात सराईत असून, तोच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असू शकतो, असे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून एकच अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी शनिवारी गटनेत्यांनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव राजेश धसे यांच्याकडे अर्ज दाखल केले. एकूण ५ जागांसाठी अर्ज दाखल होणे अपेक्षित असताना चारज जागांसाठी अर्ज आले. काँग्रेसच्या गोटातून दोनपैकी एकच अर्ज आल्याने एक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी काँग्रेस व महागठबंधन आघाडीस प्रत्येकी दोन तर शिवसेनेस एक स्वीकृत सदस्य पद मिळणार आहे.

शनिवारी काँग्रेस गटनेत्या ताहेरा शेख यांच्यातर्फे एमआयएमचे नेते अब्दूल मलिक युनुस इसा यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेसकडून दोन पैकी एकाच जागी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यातही ही एक जागा मित्रपक्ष असलेल्या एमआयएमला देण्यात आली आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच एक जागा रिक्त ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर महागठबंधन आघाडीतर्फे गिरीश बोरसे व मोह. अमीन मोह. फारुख यांचे अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना गटनेते नीलेश आहेर यांनी भिका भडांगे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी संजय दुसाने, मनोहर बच्छाव उपस्थित होते. या अर्जांची छाननी होवून आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर महासभेत या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

भाजपचाही अर्ज?

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शनिवारी पक्षीय बलाबालानुसार चार अर्ज दाखल झाले. पाच स्वीकृत सदस्यांपैकी भाजपला एक ही पद नाही. मात्र या निवड प्रक्रीयेस भाजप गटनेते सुनील

गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. शनिवारी गुलाब पगारे यांचा अर्ज दाखल केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तर नगरसचिव धसे यांनी असा कोणताही अर्ज प्रशासनास प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी पक्षीय बलाबलनुसारच अर्ज स्वीकारण्यात आले. भाजपाच्या वतीने कुठलाही अर्ज प्राप्त झालेला नाही. पक्षीय बलाबलनुसार कार्यालायास चारच अर्ज दाखल झाले आहेत.

- राजेश धसे, नगरसचिव, मनपा, मालेगाव

महागटबंधन आघाडी तीन घटकांपासून बनली असून, संख्या बळानुसार राष्ट्रवादी वगळता इतर पक्षाचे संख्याबळ भाजपपेक्षा कमी असल्याने कायद्याने भाजपचा सदस्य असणे अपेक्षित आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे.

- सुनील गायकवाड, गटनेता, भाजपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images