Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महात्मा फुले दूरगामी विचारांचे देवदूत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अर्थकारण विषयात महात्मा फुले यांना वेगळे काढता येणार नाही. आर्थिक ताकद सक्षम झाली पाहिजे, असे सांगण्यात त्यांच्याकडे अर्थतज्ज्ञाची दूरदृष्टी होती. भविष्यकाळाची तरतूद करण्याचा विचार मांडणारे महात्मा फुले दूरगामी विचार करणारे प्रभावी देवदूत होते, असे प्रतिपादन विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी समाजसेवा समितीतर्फे आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी महात्मा फुले व आजची आर्थिक परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. दौलतराव गांगुर्डे अध्यक्षस्थानी होते.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, चंद्रकांत बागूल, योगेश थोरात, माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत आदी उपस्थित होते. विश्वास ठाकूर म्हणाले, की श्रम आणि उद्यमशीलता या विषयावर महात्मा फुले बोलत असत. कष्टाने संपत्ती कमवावी, कुणावरही अवलंबून राहू नका, स्वतः काय कमावता यावर विश्वास असावा, त्या काळात त्यांची व्यवसाय विषयावरील मांडणी अद््भुत होती. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत होत्या. त्यांच्या आर्थिक पिळवणुकीवर ते सातत्याने बोलत. पारंपरिक पद्धतीतून शेतीचे होणारे नुकसान ते समजून देत. उत्पादन करणाऱ्या श्रमाची किंमत माहिती होती. विनाकष्ट पैशाच्या मागे लागू नका, असे त्यांचे विचार आजही उपयुक्त ठरणारे आहेत. समृद्ध असलेला माळी समाज मागे महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आहे.

मनीष जाधव यांना उद्योगरत्न, चंद्रकांत बागूल यांना समाजरत्न, डॉ. अरुण निकम यांना धन्वंतरी रत्न, राहुल दिवे यांना राजकारण आदी मान्यवरांबरोबरच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जागृती कोलगीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव बडदे यांनी स्वागत केले. विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. हरिश्चंद्र विधाते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांतता, सौहार्दातूनच प्रगती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शांतता आणि सोहदार्यातून प्रगतीचे मार्ग मोठे होतात. परस्पर सहकार्य असल्यास दिशा मिळते. यंदा शहरात गणेशोत्सव डीजेमुक्त तसेच पर्यावरणपूरक पार पडला. राज्यातील आदर्श गणेशोत्सव म्हणून याची पोलिस महासंचालक तसेच शासनस्तरावर नोंद घेण्यात आली. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादचा हा परिणाम होता, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित डीजे व पर्यावरण पूरक तसेच सेल्फी विथ गणेश या पुरस्कारांचे वितरण आणि शांतता कमिटी सदस्यांची बैठक गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवयानी फरांदे होत्या.अध्यक्षीय भाषणात आमदार फरांदे यांनी सार्वजनिक गणेश मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमास महापालिकेच्या पूर्व विभागाच्या सभापती शाईन मिर्झा, पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सहायक आयुक्त आशोक नखाते यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल

सेल्फी विथ गणेश : १) आर्या योगेश गायधनी, २) शिवांग सागर कुंभार, ३) सोहम सुनील जाधव.

विभाग १ : १) छावा ग्रुप गणेश मंडळ (शिलापूर), २) तारवालानगर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, ३) आरटीओ कॉर्नर मित्र मंडळ. उत्तेजनार्थ : नवनिर्माण कलाक्रीडा मंडळ (मखमलाबाद नाका), श्रीमान सत्यवादी मंडळ (पेठरोड), हनुमान मित्र मंडळ (पेठफाटा), पटेल मित्र मंडळ (पेठफाटा), यंगस्टार मित्र मंडळ (पंचवटी), जय बाबाजी गणेश मंडळ (स्वामी समर्थनगर), जिजाऊ मित्र मंडळ, आराध्य गणेश मित्रमंडळ (पेठरोड)

विभाग २ : १) रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, २) महात्मानगर विकास मंडळ, विनयनगर मित्रमंडळ, ३) राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक मंडळ, उत्तेजनार्थ : कॉलेजरोड मित्र मंडळ, स्कॉलरईन मित्रमंडळ, कृषीनगर जॉगिंग ट्रक, महाराष्ट्र पत्रकार महासंघ

विभाग ३ : १) युनिक ग्रुप (इंदिरागनर) २) माऊली टेंभानाका मित्रमंडळ (अंबड), ३) साई रुद्र बहुउद्देशीय संस्था (सातपूर), उत्तेजनार्थ : शिवचौक मित्र मंडळ (अंबड), एकता सेवा मंडळ (अंबड), पेलिकन बहुउद्देशीय संस्था (अंबड), श्री सिद्धी विनायक कॉलनी मित्रमंडळ, श्री प्रतिष्ठान श्रद्धा विहार मंडळ (इंदिरानगर), द्वारकामाई मित्रमंडळ (इंदिरानगर), हुतात्मा अनंत कान्हेरे मित्र मंडळ (सातपूर), श्री रजत नवशा गणपती मित्र मंडळ (सातपूर), हर हर महादेव मित्र मंडळ (सातपूर)

विभाग ४ : १) दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक गणेशोत्सव मंडळ, २) शिवछत्रपती तालीम संघ (भगूर), ३) ईगल स्पोर्टस क्लब (आर्टिलरी सेंटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे

$
0
0

सभापती माणिकराव बोरस्ते यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी नेहमी मानसिकदृष्ट्या अथवा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्यास त्याला जीवनात नेहमी यश प्राप्ती होते. तसेच त्याला महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे यश प्राप्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी अशा उपक्रमांत सहभाग घ्यावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या योजनेत विद्यार्थी हा स्वयंसेवक म्हणून ओळखला जातो. त्याचा सर्वांगीण विकास होण्यास त्याने श्रमसंस्कार शिबिर करावे व समाजात वेगळी ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे स्थानिक समिती सदस्य निवृत्ती जाधव,कैलास चौधरी,प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, खंबाळे ग्रा. प. सदस्य, प्रा. ए. बी. भगत उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.एस.काळे यांनी या शिबिरात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान,व गाव परिसर सर्वांगीण विकास,पर्यावरण स्वच्छतेची जण जागृती, कौटुंबिक सर्वेक्षण, महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम राबविले तसेच या शिबिराचा उद्देश सफल केला त्याबद्दल त्यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

श्रमसंस्कार शिबिरासाठी मविप्र संचालक भाऊसाहेब खातळे, अॅड. जे. एन. शिंदे, योगीता चौधरी, शाम मोगल, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. डॉ. डी. डी. वाळके, प्रा. आर. एम. आंबेकर, प्रा. यु. एन. सांगळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एस. बागूल, प्रा. डॉ. वाय. एच. वाळुंज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी खंबाळे गावातील ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वंयसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिनाथ गिते, आरती लोटे यांनी केले तर आभार प्रा. सी. डी. चौधरी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांचे नियम धाब्यावरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील घंटागाडी ठेकेदाराला राजकीय वरदहस्त असल्याने मनमानी पद्धतीने गाड्या चालविल्या जात असून, या सर्वच गाड्यांची तपासणी केली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी सिडकोतील सर्व घंटागाड्या सिडको विभागीय कार्यालयात बोलविण्यात आल्या व त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दहा गाड्या उशिराने आल्या, सत्तर टक्के गाड्यांवर नव्या नियमाप्रमाणे भोंगे लावले नसल्याचे समोर आले. तीन कोटींहून अधिक रकमेचा दंड झालेला हा ठेकेदार या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने आरोग्य विभागाकडूनच त्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सभापती सुदाम डेमसे यांनी केला. दरम्यान, ठेकेदाराच्या प्रतिनिधीने आठ दिवसांत ही परिस्थिती बदलण्याचे आश्वासन विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

सिडकोतील सहा प्रभागांत एकूण बेचाळीस गाड्या आहेत. त्यापैकी दोन गाड्या लहान, एक गार्डनसाठी, एक डेब्रिससाठी, दोन रात्रपाळीसाठी व एक गाडी खास हॉटेलांसाठी ठेवण्यात आली आहे. उर्वरित घंटागाड्या या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी आहेत. या सर्वच गाड्या मंगळवारी सिडको कार्यालयात आणण्यात आल्या होत्या. सुरुवातीला केवळ बत्तीस आल्या होत्या. दहा गाड्या खत प्रकल्पावर असल्याचे ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले. या गाड्यांची तपासणी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक शाम साबळे, नीलेश ठाकरे, संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. एकाही घंटागाडीवर प्रभागाचा उल्लेख नव्हता. गाड्या तपासणार म्हणून कागदावर प्रिंट काढून चिकटविण्यात आली होती. सुमारे सत्तर टक्के गाड्यांवर भोंगेच नसल्याने या गाड्या कधी येतात व कधी जातात, हेच नागरिकांना समजत नसल्याचा आरोप करण्यात आला. पुरेशा घंटागाड्या नसल्याने व गाड्यांवर प्रभाग क्रमांक व सुपरवायझर यांचे नंबर लिहिणे बंधनकारक असतानाही त्याकडे ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याचे समोर आले. महानगरपालिका व ठेकेदार यांच्यात झालेल्या करारातील अनेक अटी व शर्तींचा भंग झाला असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी संबंधित ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्याची मागणी केली. ठेकेदार व आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने ते दोघेही याठिकाणी अनुपस्थित राहिल्याचा आरोपही सभापतींनी केला.

प्रतिनिधीकडून आश्वासन

संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीने आठ दिवसांत गार्डनसाठी दोन गाड्या देण्याबरोबरच झाडपाल्यांसाठी दोन गाड्या व सगळ्या गाड्यांवर स्पीकर सुरू करण्यात येतील. दोन प्रभागांसाठी एक सुपरवायझर नेमण्यात येऊन प्रत्येक गाडीवर प्रभाग क्रमांक व सुपरवायझरचा क्रमांक टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता आठ दिवसांत करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने या वादावर तात्पुरता पडदा पडला.

जादा गाड्या मिळत नाहीत

सिडको प्रभागात सध्या असलेल्या गाड्यांपेक्षा जादा गाड्या लागल्या तर त्या देण्याची अट करारनाम्यात असतानाही ठेकेदाराकडून पाहिजे तेव्हा गाड्या मिळत नसल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले. गाड्या वाढविण्याबाबत पत्रव्यवहार केला असून, ठेकेदार या पत्राला उत्तरही देत नाही व गाड्याही वाढवित नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर ठेकेदाराला वारंवार सुचना करूनही तो आमचे ऐकत नसल्याचा आरोप विभागीय स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांनी केल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्‍त केले. विभागीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनाच ठेकेदार जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

प्रभाग २९ मध्ये घंटागाडी येत नसल्याने आंदोलन केले होते. त्यावेळी ठेकेदाराने एक गाडी वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ही वाढीव गाडी दिसली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार दिशाभूल करीत आहे.

- रत्नामाला राणे, नगरसेविका

नगरसेवकांच्या घरासमोरून जाणाऱ्या गाड्यांनाच भोंगे लावण्यात आले आहेत. अनेक गाड्यांवर भोंगे नसल्याने घंटागाडी केव्हा येते व केव्हा जाते हे महिलांना समजत नाही. त्यामुळे कचरा टाकला जात नाही व पर्यायाने हा कचरा खुल्या जागेत टाकला जात असतो. यामुळे सिडकोत डेंग्यू सारख्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

- शाम साबळे, नगरसेवक


महापौरांनी आदेशित केल्यानंतर ठेकेदार किंवा प्रशासनाला जाग येत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. डॉ. बुकाणे यांना या कार्यक्रमाची माहिती कालच देण्यात आली होती, मात्र तेच या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.

- सुदाम डेमसे, प्रभाग सभापती

पाला-पाचोळा किंवा गार्डनचे गवत हे घंटागाडीत घेतले जात नाही. कोणी टाकले तर घंटागाडी कर्मचारी यासाठी पैसे मागतात.

- संगीता जाधव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिकांनी केल्या न्यायाधीशांच्या सह्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीशांच्या परस्पर सह्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयात विविध खटल्यांमध्ये सातत्याने वॉरंट काढण्यात येते. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात असलेल्या कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन कनिष्ठ लिपिकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या लिपिकांमध्ये जिल्हा न्यायालय व दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे असलेल्या लिपिकांचा समावेश आहे. न्यायालयात वारंवार वॉरंट काढूनही गैरहजर राहणाऱ्यास गैरजमानती वॉरंटही काढले जाते. जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. व्ही. देढिया यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक संशयित बी. बी. आंधळे यांनी न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे समोर आले, तसेच दिंडोरी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक आर. बी. बलसाणे यांनीही सह्या केल्याचे काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी कनिष्ठ लिपिक आंधळे व बलसाणे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश सोमवारी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाण्याची उपलब्धता आणि खरीप हंगामानंतर काढणी करून लवकर तयार होणाऱ्या पालेभाज्यांच्या लागवडीवर दिलेला भर यामुळे नाशिक मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक प्रचंड वाढली आहे.

राज्यातील इतर भागातून मुंबईला पालेभाज्यांच्या पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्या भावात घसरण झाली आहे. काही महिन्यांपासून दरांचा उच्चांक गाठणाऱ्या पालेभाज्या आता स्वस्त झाल्या आहेत. मात्र, शेपूची आवक कमी असल्याने या पालेभाजीला चांगले दर मिळत आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायंकाळी होणाऱ्या लिलावासाठी अडीच ते तीन लाख पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीस येत आहेत. त्यात एक लाखांपेक्षा जास्त असल्याने मेथीला केवळ ४ ते ८ रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दरांचा उच्चांक गाठणाऱ्या कोथिंबीरीचीही आवक वाढली आहे. तिचेही दर १० ते १५ रुपये प्रति जुडी असे स्थिर आहेत. या मोसमात दर्जेदार कांदापात उपलब्ध होत असून त्याचे दरात फारशी वाढ झालेली नाही १० ते १८ रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे. पालेभाज्यात शेपू अपवाद ठरत आहे, हिवाळ्यात पडणाऱ्या दवामुळे शेपू पिवळी पडत असल्याने या हंगामात शेपूची लागवड करण्याचे शेतकरी टाळतात. त्यामुळे सध्या शेपूची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या पालेभाजीचे दर २५ ते ३२ रुपये प्रति जुडी असे वाढलेले आहेत.

नाशिकहून मुंबईला लहान-मोठी अशी सुमारे ५० वाहनातून पालेभाज्या पाठविल्या जात आहे. गुजरातला ८ ते १० वाहने जातात. मुंबईला पालेभाज्या पाठविण्यात नाशिक बाजाराचा मोठा वाटा असतो. मात्र, सध्या नाशिकला खेड, मंचर, नारायणगाव, मनमाड, चांदवड येथून जाणाऱ्या पालेभाज्यांशी स्पर्धा करण्याची वेळ आली आहे. या भागातूनही मोठ्या प्रमाणात पालेभाज्या मुंबईला रवाना होत असल्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. या भागातील पालेभाज्या अजून साधारणतः पंधरा दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पालेभाज्यांचे दर कमीच राहण्याची शक्यता आहेत.

नाशिक मार्केटमध्ये सध्या पालेभाज्यांची आवक आणि त्याला असणारी मागणी लक्षात घेता शेपूचा अपवाद वगळता दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पालेभाज्यांची लागवड आणि आवक बघता अजून १५ दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- रंजन शिंदे, आडतदार

बाजार समितीतील पालेभाज्यांचे मंगळवारचे दर
- पालेभाज्या .............दर (प्रति जुडी)
- कोथिंबीर...................१० ते १५
- मेथी.........................४ ते ८
- शेपू...........................२५ ते ३२
- कांदापात...................१० ते १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या हत्येचे गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंबेगण शिवारातील (ता. दिंडोरी) पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. १६ ते १८ वयोगटातील मुलीची निघृण हत्या करून आरोपीने तिचे हातपाय बांधले आणि तिचा मृतदेह गोणीत भरून त्यात दगड टाकून पाझर तलावत फेकला होता. अत्यंत थंड डोक्याने खून करण्यात आला असून, २४ तासानंतरही घटनेचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

घटना सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. मृतदेहाची कोणतीही ओळख पटणार नाही, याची आरोपीने काळजी घेतलेली दिसते. मृतदेह तीन ते चार दिवस पाण्यात राहिल्याने खराब झाला. त्यामुळे डॉक्टरांना जागेवरच शवविच्छेदन करावे लागले. डोक्यात गंभीर वार केल्याने हा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की मुलीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे शवविच्छेदन अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हत्या झालेल्या मुलीचे वय अंदाज १६ ते १८ असून, तिच्या अंगात काळी जिन्स पॅन्ट आहे. त्यावर कंबरेला मविप्र संस्थेचा लोगो असलेला बेल्ट आहे. निळसर डिझाईन व त्यावर फुले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे. डाव्या हाताला नेलपॉलिश असून, डाव्या बोटात अंगठी आहे. या वर्णनाची तसेच या वयोगटातील मिसिंग असलेल्या मुलींबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामीणसह शहर पोलिसांकडूनही माहिती घेण्यात येते आहे. मात्र, अद्याप हाती काही लागले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मुलीची ओळख पटल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

फिंगरप्रिंट स्कॅनिंगद्वारे आधारकार्डाचा शोध

हत्या झालेल्या मुलीच्या वयावरून ती शाळेत किंवा अकरावीला असू शकते. या वयातील मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मृतदेहाच्या हाताचे ठसे स्कॅन करून संबंधित मुलीचा आधारकार्ड क्रमांक अथवा इतर माहिती मिळते काय याची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की हा प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही. मृतदेहाची अवस्था बिकटच असून, कोर्टाच्या आदेशाने ही प्रक्रिया बुधवारी पार पडू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावण्यातून होणार समाजकार्यही!

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आरोग्यासाठी तर सगळेच धावतात. पण समाजकार्यासाठी धावता आले तर? हो हे शक्य झाले आहे इम्पॅक्ट या मोबाइल अॅपद्वारे. या अॅपची सध्या चलती असून, आपल्या चालण्यातून तयार झालेल्या पैशांचा वापर सामाजिक कामासाठी केला जातो आहे. त्यामुळे यंगस्टर्ससह स्मार्टफोनधारकांमध्ये या अॅपचा बोलबाला आहे.

फिटनेसच्या दृष्टीने आज सर्वजण जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला दैनंदिन व्यायामाचे महत्व पटू लागले आहे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण आज व्यायाम करतो आहे. काहीजण ज‌मि व अन्य सुविधांच्या आधारे आपले शरीर सुदृढ ठेवत आहेत. असे असताना आता ‘इम्पॅक्ट’ नावाचे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून केलेल्या व्यायामामुळे त्यातून मिळणारे पैसे दान करून त्याचा उपयोग गरीब मुलांच्या उपजीविकेसाठी केला जात आहे.

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फिटनेस आणि सामाजिक बांधिलकी जपण्याविषयी सांगड घालण्यात आली आहे. अँड्रॉइड मोबाइलवर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. पायी चालताना, धावताना किंवा सायकल चालवताना हे अॅप्लिकेशन सुरू केल्यास प्रत्येक किलोमीटरमागे युजर्सच्या नावावर संबंधित रुपये जमा होतात. हा जमा झालेला संपूर्ण निधी सामाजिक संस्थांना देण्यात येतो. अशा प्रकारच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्किल डेव्हलपमेंट आणि अन्य समाजोपयोगी कामांसाठी वापरला जातो.

या अॅप्लिकेशनमध्ये सेन्सरची सुविधा असल्याने आपण किती किलोमीटर चालतो अथवा पळतो, ते लगेच समजते. सेन्सरच्या मदतीने किलोमीटर आणि त्याचे रुपयांमध्ये झालेले रुपांतर आपल्याला लगेच दिसते. हे अॅप्लिकेशन पारदर्शी असल्याने किती प्रमाणात आपण दान करत आहोत, ते तत्काळ समजते. रनिंग, वॉकिंग किंवा सायकलिंग करतानाच हे अॅप्लिकेशन वापरता येईल. यात कोणताही खर्च येत नाही. शरीराची किती कॅलरी बर्न झाली व आपण चाललेले अंतर याची पूर्ण माहिती मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाची मागणी घातल्याने प्राध्यापकाविरुध्द तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एका नामवंत कॉलेजमधील प्राध्यापकाने आपल्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्या‌र्थिनीला लग्नाची मागणी घातली. ही बाब विद्यार्थिनीच्या पालकांना समजल्याने त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका नामवंत कॉलेजमधील प्राध्यापकाने एका विद्यार्थ‌िनीशी बोलाचाली वाढवून त‌िला लग्नाची मागणी घातली. वेळोवेळी आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढून सोशल मीड‌ियाद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून प्राध्यापकाचे असे वागणे सुरूच होते. ही बाब विद्यार्थिनीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाला जाब विचारला. यामुळे कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या पालकांनी यासंदर्भात सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे म्हणाले की, तक्रार अर्ज दाखल झाला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगर रस्त्यावर चारचाकी पलटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर ते सिटी सेंटर मॉलपर्यंतच्या रस्त्याने गाड्या कायमच भरधाव वेगाने जात असतात. बुधवारी (दि. २९) अशाच पद्धतीने भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यावरून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

मनोहर नगर ते सिटी सेंटर मॉलपर्यंतच्या रस्त्यात कोठेही गतिरोधक टाकलेले नसल्याने प्रत्येक वाहन हे वेगाने जात असते. बुधवारी, दुपारी चार वाजेच्या सुमारास (एमएच १५ सीएम ८७८१) ही गाडी भरधाव वेगाने सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात होती. याचवेळी या गाडीचे टायर फुटले असावे म्हणून ही गाडी लगतच्या दुभाजकावर जावून आदळली. या गाडीत वाहन चालकासह एक महिला असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यावर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर घटनास्थळी मुंबईनाका पोलिस ठाण्याचे कर्मचारी आले होते. त्यांनी पंचनामा करून ही गाडी याठिकाणाहून हटविली. तसेच गाडीतील एअर बॅग उघडल्याने या दोघांचा जीव वाचल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.

रॅश ड्रायव्हिंग पडली महागात फोटो-प्रशांत देसले

नाशिक : पोलिस व्हॅन दिसताच कारसह पळ काढणाऱ्या तरुणांना वाहतूक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. बुधवारी (दि. २९) शहरातील बॉइज टाऊन स्कूलकडून त्र्यंबकरोडकडे वेगात कार चालविणाऱ्या दोघांनी पोलिस गाडी दिसताच कारचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणांचा पाठलाग केला. या तरुणांनी त्र्यंबकरोडवरील पत्रकार कॉलनीत गाडी सोडून तेथून पळ काढला. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पत्रकार कॉलनीतून कार (एमएच ०१ व्ही ७०८७) ताब्यात घेतली. त्यानंतर काही वेळात संशयित तरुणांपैकी एकाला संभाजी चौकातून ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघा तरुणांवर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहन चालव‌िल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत कारवाई करण्यात आली. पत्रकार कॉलनीतील रहिवाशांनी संशयिताचे हुबेहुब वर्णन केल्यामुळे पोलिसांना मदत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी भगूरने कसली कंबर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर शहरातील दैनंदिन कचऱ्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना शहरामध्ये या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. दैनंदिन शेकडो टन कचरा निर्माण होत होता. मात्र, भगूर नगरपालिकेने लोकशिक्षण व जनजागृतीपर उपक्रम हाती घेत स्वच्छ भारत अभियानात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली आहे. खतनिर्मितीस प्रारंभ झाला असून, नगराध्यक्षा अनिता करंजकर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत उत्पादित खतापैकी काही खत शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

भगूर शहरातील घनकचऱ्याच्या समस्यांच्या अभ्यासानंतर सरसकट कचरा नव्हे तर ओला आणि सुका कचरा एकत्र असणे, ही खरी समस्या असल्याचे लक्षात आले. कचऱ्याचे विलगीकरण केल्यास त्यापासून सेंद्रिय खत निर्माण करून नगरपालिकेस उत्पन्न मिळविण्याचे साधन उपलब्ध झाले आहे. वॉर्डांमध्ये जागेवर ओला कचरा, सुका कचरा, प्लास्ट‌िक, काच व धातू अशा चार प्रकारांमध्ये विलगीकरण करण्याचे ध्येय आरोग्य विभागामार्फत ठेवले. घरातूनच कचऱ्याचे विलगीकरण होण्यासाठी महिलांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. इथवरच न थांबता कचराकुंडीमुक्त भगूर हा उपक्रम राबवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरिकांना कचरा देण्यासाठी दिवसातून दोनवेळा जीपीएस यंत्रणा असलेल्या दोन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवण्यासाठी येथील प्रतिष्ठित नागरिक दादासाहेब देशमुख, संदीप गोरे, श्रीकांत कापसे यांची ‘स्वच्छता दूत’ म्हणून, तर धार्मिक नेता म्हणून येथील ह. भ. प. गणेश महाराज करंजकर यांना प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेने शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या संस्था, शाळा व बचत गटांचा आधार घेत त्यांच्यावर जनजागृतीची जबाबदारीदेखील सोपवली आहे. यांच्यामधून स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्यासाठी निबंध, चित्रकला, रांगोळी व नाट्य स्पर्धा घेण्यात येतात. त्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पारितोष‌िके दिली जातात.

स्वच्छता कक्ष

शहर स्वच्छतेसाठी दिवसातून दोनदा रस्ते सफाईसाठी २० स्वच्छता कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्हज, मास्क, गमबूट यासारखे सुरक्षा साहित्य पुरवत नेमणूक करण्यात आली आहे. आगामी काळात नगर परिषदेच्या कार्यालयात स्वच्छता कक्ष स्‍थापन करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांच्या स्वच्छताविषयक समस्यांचे निरसन केले जाईल. याशिवाय शहरात फ्लेक्स बोर्ड, मुख्य चौकामध्ये चित्रमय रंगीत बोलक्या भिंती, नगरसेवकांच्या बैठका आदी माध्यमांतून स्वच्छताविषयक जागृती केली जाणार आहे. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदुरीकर यांनी दिली.

नागरिकांना आवाहन

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नोंदणी करून सहभागी होत नागरिकांसाठी स्वच्छता अॅप हे नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील आरोग्य विभागाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगूर नगरपालितील नागरिकांनी स्वच्छता अॅपमार्फत समस्या पाठविण्याचे आवाहनदेखील नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागाशिवाय ‘स्मार्ट’शहर अशक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला निसर्गाच मोठ वरदान असून शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे शहर स्मार्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न तसेच सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभागही महत्त्वाचा असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री तथा वैद्यकीय व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिक हे परिपूर्ण असल्याने राज्यातील पहिले स्मार्ट शहर म्हणून नाशिकला उदयास आणू, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. भविष्यात ‘स्मार्ट शहर’ अशी ओळख प्रस्थापित करण्यात नाशिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिक म्युनिस‌िपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाजन बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नॉर्वेच्या काऊन्सुलेट जनरल अॅन ओलेस्टड, विभागीय आयुक्त महेश झगडे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, स्मार्ट सिटी एलेट्सचे जोसेफ मॅक्व‌िल, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थव‌िल, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, रमेश पवार, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.

यावेळी महाजन यांनी स्मार्ट सिटीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. देशात एकूण ९८ शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकचा समावेश झाल्याने विकासाला चालना मिळणार आहे. नाशिकला निसर्गाचे वरदान लाभले असून, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या साऱ्या दृष्टीने नाशिक परिपूर्ण शहर आहे. त्यामुळे या शहरात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. केवळ चांगले कपडे घातले म्हणजे माणूस स्मार्ट होत नाही, तर त्याचे बौद्धिक, शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शहराचेही असून, स्मार्ट शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन, सृदृढ आरोग्य, शुद्ध पाणी, उत्तम वाहतूक व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था गरजेची असते, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

महाजन यांनी सध्याच्या शहराच्या स्थितीवरही टीका करत, आरोग्याच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या नाशिक महापालिकेला आरसाही दाखवला. शहरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत. राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये असल्याने आरोग्यविषयक चांगल्या प्रकल्पांवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. स्मार्ट नाशिकअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. १६ कोटी रुपये खर्चून कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पूरक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे. शहर बदलासाठी प्रत्येकाने आपली मानसिकताही बदलली पाहिजे. प्रकल्प राबविताना अडचणी येतील; परंतु, लोकसहभागाशिवाय शहर स्मार्ट होणे अशक्य असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी जोसेफ, आयटीडीपीचे हर्षद अभ्यंकर, यूएसटी ग्लोबचे कार्तिक हरिहरन यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विविध पैलूंबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

गोदाप्रकल्पावर भर

गोदावरी ही नाशिकची जीवनदाय‌िनी आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत गोदा प्रकल्प राबविला जात असून, त्याकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष असल्याचे गिरीश महाजन यांनी सांग‌ितले. या प्रकल्पासाठीची सर्व तरतूद करण्यात आली असून, त्यातून गोदावरीचे प्रदूषणही रोखले जाणार आहे. गोदा प्रकल्पाद्वारे शहराच्या पर्यटनाला तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले. नागरिकांनादेखील मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

काँक्रिट‌ीकरणाबाबत अभ्यास

गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीपात्रातील काँक्र‌िट‌ीकरण काढण्याची मागणी केली जात आहे. काँक्रिटीकरण काढल्यास गोदावरीतील नैसर्गिक स्रोत मोकळे होतील असा दावा केला जात आहे. परंतु, हे स्रोत मोकळे झाले तरी, चिखलामुळे गोदावरीचे प्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी पात्रातील कॉँक्रिटीकरण काढावे की नाही, याबाबत अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट रोडवर भर-महापौर

महापौर भानसी यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रोड’ तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. अशोकस्तंभ ते मॉडर्न सर्कलदरम्यान पहिल्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची मांडलेली संकल्पना तडीस नेण्यासाठी सर्वांचा पुढाकार असणे आवश्यक असल्याचे सांगत, कुंभनगरीत विकासाच्या योजना राबविण्याबरोबरच गावठाणाचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले.

तरच शहर स्मार्ट- झगडे

महेश झगडे म्हणाले, गेल्या दोनशे वर्षांत शहाराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरीकरण वेगाने होत असताना शहर विस्ताराचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तेवढाच महत्त्वाचा आहे. नियोजनाद्वारे रोजगार आणि संपत्तीची निर्मिती, उत्तम मानव विकास निर्देशांक आणि शाश्वत पर्यावरण संवर्धन या बाबी स्मार्ट शहरासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील मुलभूत समस्या दूर करूनच

शहर स्मार्ट करता येणे शक्य असल्याचे सांगून शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, रोजगार, वाहतूक, आवास अशा विविध पैलूंचा विचार या संदर्भात होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लवकरच ई प्रमाणपत्र - कृष्णा

कृष्णा म्हणाले, नागरिकांना शहराचे आकर्षण वाटावे अशा सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी नदीघाट विकास, सीसीटीव्ही आणि इतरही प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून, लवकरच ई-प्रमाणपत्र सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शाळेकडून व्हॅनचालकावर दबाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जेलरोडच्या होली फ्लॉवर इंग्लिश मीड‌ियम स्कूलच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या पालकाच्या मुलींना शाळेत आणू नये, यासाठी या शाळेने संबंधित व्हॅन चालकावर दबाब आणला. त्यामुळे व्हॅनचालकाने या मुलींना व्हॅनमध्ये बसण्यास मनाई करुन त्यांना न घेताच गेल्याचा आरोप वैभव एकनाथ ताकटे या पालकाने केला आहे. व्हॅनचालकाने मुलींना शाळेत न नेल्यामुळे या मुलींना पालकांनीच शाळेत पोहच केले. मात्र, या पालकाला शाळेत मुख्याध्यापकांना भेटण्यास येण्याचाच निरोप व्हॅनचालकामार्फत दिला होता, असा खुलासा या शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला असून, या पालकाने केलेले आरोप धादांत खोटे असल्याचा दावाही केला आहे.

या पालकाच्या म्हणण्यानुसार या शाळेने रोखीने शालेय फी भरण्याची सक्ती करत चेकद्वारे शालेय फी स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु, वैभव एकनाथ ताकटे (रा. जगताप मळा) या पालकाने चेकद्वारेच शालेय फी भरण्याचा आग्रह केल्याने या शाळेने त्यांच्या दोन मुलींना दुसऱ्या वर्गात बसविल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची वैभव ताकटे या पालकाने उपनगर पोलिसांत तक्रारही नोंदवली आहे. परंतु, या शाळेने या पालकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

व्हॅनचालकानेकडून मनाई

वैभव ताकटे यांच्या मुलींना दररोज सकाळी घेण्यासाठी येणाऱ्या व्हॅनचालकाने बुधवारी सकाळी आपल्या व्हॅनमधून शाळेत नेण्यास मनाई केली व या मुलींना रस्त्यावर सोडून निघून गेल्याचा आरोप या पालकाने केला. शाळेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणल्याच्या रागातूनच या शाळेने व्हॅनचालकावर दबादव टाकून आपल्या मुलींना या व्हॅनचालकाने शाळेत नेण्यास मनाई केल्याचा आरोप या पालकाने केला. काल सकाळी या मुलींना पालकांनी शाळेत पोहच केले.

शाळेला नोटीस

होली फ्लॉवर इंग्लिश स्कुल या शाळेने फी वसुलीच्या कारणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात कोंडल्याचा कथित प्रकार उजेडात येताच मनपाच्या शिक्षणाधिका-यांनी बुधवारी दुस-याच दिवशी या शाळेच्या मुख्याध्यापिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या नोट‌िशीचा या शाळेकडून खुलासा झाल्यावरच खरा प्रकार स्पष्ट होणार आहे.

माझ्या मुलींना व्हॅनचालकाने शाळेत नेण्यास नकार देत रस्त्यावर सोडून निघून गेला. शाळेनेच आपल्याला तसे सांगितल्याचे संबंधित व्हॅनचालकाने सांगितले. त्यामुळे मुलींना शाळेत आम्हीच पोहच केले. या प्रकरातून या शाळेची मनमानी उघड झाली आहे. आजपासून या शाळेच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर कुटूंबियांसोबत धरणे आंदोलन करणार आहे.

- वैभव ताकटे, पालक, होली फ्लॉवर स्कूल

होली फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. शालेय फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिल्याचे निदर्शनास आल्यास या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित वर्गशिक्षकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, मनपा


संबंधित पालकाशी शाळेने संपर्क केला असता होऊ शकला नाही. त्यामुळे व्हॅनचालकामार्फत त्यांना शाळेशी संपर्क साधण्याचा निरोप दिला. विद्यार्थ्यांना शाळेत आणू नये यासाठी व्हॅनचालकावर शाळेने दबाव आणल्याचा या पालकाचा आरोप खोटा आहे.

- सुदीप देव, संस्थापक, होली फ्लॉवर स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर अवतरले यमराज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘टू-व्हिलर चालवताना हेल्मेटचा वापर करा’, ‘फोर व्हिलर चालवताना सीटबेल्ट वापरा’, अशा सूचना खरे तर पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, बुधवारी या सूचना चक्क यमराजांनी रस्त्यावर येत वाहनचालकांना दिल्या. एडल्वाइज टोकियो लाइफ इन्शुरन्सच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने चालवताना अनेक लोक सुरक्षा साधनांचा वापर करीत नाहीत. पोलिसांनी मोहीम उघडल्यानंतर तेवढ्यापुरती सुरक्षा साधने वापरतात. शहरात हेल्मेट न वापरता गाडी चालवून झालेल्या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. त्याचप्रमाणे हेल्मेट वापरल्याने अनेकांना जीवदानदेखील मिळाले आहे. हेल्मेट वापरले नाही तर माझ्या दारात यावे लागेल, असा संदेश देत बुधवारी यमराजांनी नागरिकांशी संवाद साधला. जेहान सर्कल, गंगापूर नाका, शरणपूर पोलिस चौकी याठिकाणी अवतरलेले यमराज पाहून वाहनधारकही चकीत झाले होते. यमराजांच्या माध्यमातून जनजागृतीचा हा प्रयोग चर्चेचा राहिल्याचे दिसून आले. यासंदर्भात वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. शहर वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या सकारात्मक पुढाकारांचे स्वागत केले आहे. विविध संस्थासंघटनांनी असा पुढाकार घ्यावा, त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. रस्ते वाहतूक आणि अपघात ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. दिवसागणिक रस्त्यावर वाहने वाढत असल्याने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागरुकता आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

आज येथे अवतरणार यमराज

यमराजांच्या माध्यमातून गुरूवारीही शहरातील काही ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. गुरुवारी (३० नोव्हेबर) सकाळी आणि दुपारच्या सुमारास सीबीएस, मालेगाव स्टॅँड आणि द्वारका या तीन ठिकाणी यमराज वाहनधारकांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब सदस्य व्हा, गेट टुगेदरची मजा लुटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी सरत्या वर्षाचा डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. म्युझिक, डान्स, स्नॅक्स अशी धम्माल कल्चर क्लब सदस्यांना करण्यास मिळणार आहे. येत्या रविवारी, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. ज्या व्यक्ती अद्याप कल्चर क्लब सदस्य नाही अशा व्यक्तींनाही कल्चर क्लब सदस्यत्व घेऊन कार्यक्रमाची मजा लुटता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विविध पाककृतींबाबत मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे शो अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असतो. यातील गेट टुगेदर सर्वच सदस्यांसाठी आकर्षणाचा भाग असतो. दरवर्षी वर्षाच्या अखेरीस या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.

या कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रॅमने होणार आहे. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटातील गाणे तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वेगवेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासाठी आधीच नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. फक्त कल्चर क्लब सदस्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे आजच कल्चर क्लब चे सभासद व्हा. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. तसेच कल्चर क्लब ऑनलाईन सभासदत्व www.mtcultureclub.com या वेबसाइटवरही मिळवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन जलकुंभाजवळ पाण्याचा अपव्यय

$
0
0

निशांत गार्डनजवळील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसरातील निशांत गार्डनशेजारील नवीन जलकुंभाजवळ आठ दिवसांपासून पाणीगळती होत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने पाणीगळती रोखण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नाही. त्यामुळे ही पाणीगळती थांबवण्यासाठी मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

आडगाव नवीन जलकुंभ येथील निशांत गार्डनजवळ आठ दिवसांपासून पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे पाणी वाया जात असून, पाण्याचा अपव्यय सुरू आहे. याशिवाय जमा झालेल्या पाण्यामुळे मोटरसायकल चालकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो. तरी ही पाणीगळती रोखण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असून, गळती रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत टाकले विषारी औषधे!

$
0
0

धोंडबारला मोठा अनर्थ टळला; विहिरीतील मासे मृत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

धोंडबार (ता. सिन्नर) गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत अज्ञात माथेफिरुने विषारी औषधे टाकल्याने विहिरीतील सर्व मासे मृत झाले असून, सदरचा प्रकार वेळीच ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असता.

धोंडबार ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी या सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असून, या पाण्यावरच गावासह परिसरातील वाडी-वस्त्यांवरील ग्रामस्थांची तहान भागवली जाते. अज्ञात व्यक्तीने या विहिरीत पिकांवर फवारणी करावयाच्या कीटकनाशकांची पावडर व बाटल्या टाकल्याने मासे मृत झाले. बुधवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्‍थांनी तत्काळ ग्रामसेवक हेमंत पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामसेवक पवार यांनी सरपंच साबळे यांच्यासह सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. विहिरीच्या काठावर कीटकनाशकांच्या रिकाव्या पावडरच्या पिशव्या व बाटल्या आढळून आल्या. पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून दूषित पाण्याचे नमुने घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केल्या.

पाणीपुरवठा तत्काळ बंद

दरम्यान, सदर ‌विहिरीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या प्रकरणी ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी पगार यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषित पाणी गोदापात्रात

$
0
0

रामवाडी नाल्याचे पाणी थेट रामकुंडात; प्रशासनाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा विषय हा हायकोर्टापर्यंत गेला असून प्रदुषण होऊ नये यासाठी महापालिकेला हायकोर्टाने आदेश देऊनही अजूनही गोदापात्रात प्रदूषित पाणी सर्रासपणे सोडले जाण्याचे प्रकार घडत आहेत. रामवाडीकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी थेट गोदावरी पात्रात सोडले जात आहे. हे पाणी पुढे होळकर पुलाखालून पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडात येते, याकडे का दुर्लक्ष केले जात आहे? असा प्रश्न नागरिक आता करू लागले आहेत.

रामवाडी, हनुमान वाडी, मोरे मळा परिसरातून वाहत येणाऱ्या नाल्याचे पाणी रामवाडीजवळील रस्त्यावरील पुलाखालून गोदापात्रात येते. येथे तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रकच्या लोखंडी पुलाखालून वाहत असलेले हे घाण, दुर्गंधीयुक्त पाणी गोदापात्र मिसळते. हा भाग रामकुंडाच्या उत्तरेला आहे. येथून वाहत जाणारे पाणी हे होळकर पुलाच्या खालून पुढे रामकुंडाकडेच जाते. त्यामुळे आता हे पाणी सोडले कसे जाते, असा प्रश्नही निर्माण होत आहे.

आरोग्याचा प्रश्न गंभीर

या पवित्र रामकुंडावर विविध ठिकाणाहून रोज हजारोंच्या संख्ये भाविक येत असतात. पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून येथे स्नान करतात. तीर्थ म्हणून मोठ्या श्रद्धेने येथील पाणी प्राशन करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. असे असताना रामकुंडात येणाऱ्या प्रवाहात जर असे प्रदूषित पाणी येत असेल तर या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे याचा विचार क्रमप्राप्तच असून, ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

भाविकांच्या श्रद्धेला ठेच

नाशिक स्मार्ट सिटी करताना गोदावरीच्या सुशोभीकरणावर भर देण्याचे मोठ-मोठे प्लॅनिंग करण्याची स्वप्ने दाखविली जात आहेत. मात्र, अजूनही गोदापात्रात तेही पवित्र तीर्थस्थानाच्या पाण्याच्या प्रवाहात जर अशा प्रकारचे प्रदूषित पाणी मिसळत असेल तर भाविकांच्या श्रद्धेला किती मोठी ठेच पोहचत आहे, याचा विचार महापालिका प्रशासन करीत नाही, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

कोट००

गोदावरीच्या पाण्याचे प्रदुषण होऊ नये, यासाठी फक्त कागदावरच प्रयत्न केल्याचे दिसते. प्रत्यक्षात कृती होत नाही. सर्वसामान्य नागरिकांकडून चूक झाल्यास त्याच्याकडून दंड आकारणारी महापालिका प्रशासन पवित्र तिर्थस्थानावर प्रदूषित पाणी जात असताना डोळेझाकपणा का करीत आहे ? हे कळत नाही.

सुनील महंकाळे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनवर होमगार्डची मदत?

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी होमगार्डसची मदत घेण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. मुंबईत त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबईतील एलफिन्सटनरोड येथे २९ सप्टेंबरला सकाळी गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक नागरिकांचे बळी गेले होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील रेल्वेस्टेशनला भेट दिऊन पादचारी पुलाची पाहणी केल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांना रेल्वेस्टेशन व परिसरात होमगार्ड नियुक्त करण्याची सूचना केली होती. त्या दृष्टीने भुसावळ परिमंडळातील नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला येथे होमगार्डची मदत घेण्याचा प्रस्ताव आहे. मध्य रेल्वेला तो पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिकला प्रशिक्षण

मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कार्पोरेशन अधिकाऱ्यांचे (एमएसएससी) दोन दिवसांचे प्रशिक्षण नाशिकरोडच्या सामनगाव आरपीएफच्या केंद्रात नुकतेच झाले. एमएसएससी ही होमगार्डच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तयार केलेली यंत्रणा आहे. चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊन नये म्हणून या संस्थेचे अधिकारी रेल्वे स्टेशनवर, खासकरून पादचारी पुलांवर देखरेख ठेवणार आहेत. २५९ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

याचे दिले प्रशिक्षण

मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे हे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण केंद्राचे संचालक रामभाऊ पवार, निरीक्षक राजपूत, निरीक्षक नायक, पीटर गार्विन, निरीक्षक पाल व अन्य अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले. मुंबईतील रेल्वेस्थानकांमध्ये खासगी व सरकारी कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दी असते. गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, रेल्वेगाड्यांना तांत्रिक कारणांमुळे उश‌िर झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी कशी वागणूक ठेवावी, कसा सुसंवाद करावा, याची माहितीही या प्रशिक्षण वर्गात अधिकाऱ्यांना देण्यात आली.

प्रशासन झाले जागे

एलफिन्स्टन रोडच्या दुर्घटनेनंतर भारतीय रेल्वेने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला सक्त निर्देश देऊन मुंबईतील पादचारी पुलांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम रेल्वेने एमएसएससीच्या सातशे अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. रेल्वे आणि एमएसएससी यांनी रेल्वेस्थानकांचा संयुक्त सर्वे करुन प्रवाशांची हालचाल कशी असावी, त्यांचा रेल्वेस्थानकात येण्या-जाण्याचा मार्ग कोणता असावा, याबाबत चर्चा करण्यात आली.

होमगार्डना फायदा

राज्य सरकारने होमगार्डवरील खर्च कमी केला आहे. त्यांचे सराव सत्रही कमी केले आहेत. इस्त्री दुकान, रिक्षा, गवंडीकाम यांसारखी कामे करणाऱ्या होमगार्डमध्ये चार पैशांच्या आशेने भरती होत होती. सरकारच्या बचतीच्या धोरणामुळे त्यांच्यावर संक्रात आली आहे. नवरात्र, गणेशोत्सव आदींवरच होमगार्डची भिस्त आहे. नाशिकरोड कारागृहात होमगार्डची मदत घेतली जात होती. आता रेल्वे स्टेशनवर त्यांची मदत घेतली जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिकरोड स्थानकात रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस गस्त घालत असतात. मात्र, त्यांनाही मनुष्यबळाची टंचाई जाणवत असते. त्यामुळे भुरट्या चोऱ्या, गुंडगिरीच्या घटना येथे होतात. होमगार्डची मदत मिळाल्यास ते अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतील.

नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला येथे रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान दक्ष असतातच. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या स्थानकांवर होमगार्ड नियुक्त करण्याच प्रस्ताव आहे. लवकरच कृती अपेक्षित आहे.

- जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक, आरपीएफ, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण संस्थेचा कॅनॉलवर कब्जा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर धरणातून जाणाऱ्या उजव्या कालव्यावर एका मोठ्या खासगी शिक्षणसंस्थेने कब्जा केल्याचे उघड झाले आहे. या संस्थेने चक्क कॅनॉलच बुजवून टाकला असून, त्या जागेचा वापर सुरू केला आहे. धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या या संस्थेचा हा प्रताप अद्याप जलसिंचन विभागाच्या निदर्शनास आला नाही, हे विशेष!

शहरातील मुख्य भागातून गेलेल्या कॅनॉलरोडवर आधीच अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यात भर म्हणून अनेक बांधकाम

व्यावसायिकांनीदेखील कॅनॉलरोडवरच इमारतींच्या पार्किंगची व्यवस्था केली असल्याचे जलसिंचन विभागाने दिलेल्या नोट‌िशींद्वारे समोर आले होते. परंतु, आता एका नामांकित खासगी शिक्षण संस्थेनेच गंगापूर धरणातून जाणाऱ्या उजव्या

कॅनॉलवर कब्जा केल्याचे चित्र आहे. संबंधित शिक्षण संस्थेने कॅनॉलचे सपाटीकरण करुन जागा वापरण्यासाठी घेतल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने यावर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात नागरी लोकवस्ती स्थापन होण्याअगोदर मध्यवर्ती भागातून शेतजमिनींसाठी पाण्याची व्यवस्था या कॅनॉलद्वारे करण्यात आली होती. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर शेतजमिनींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ लागला. महापालिकेची स्थापना झाल्यावर कॅनॉलच्या बाजूलाच नागरी वस्ती उभी राहिल्याने पर्यायाने

कॅनॉल बंद करण्यात आला होता. यात महापालिकेला शहरात पिण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी जागेची गरज होती. जलसिंचन विभागाच्या पडून असलेल्या कॅनॉलमधूनच महापालिकेने परवानगी घेत पिण्याची पाइपलाइन टाकली होती. परंतु, दिवसेंदिवस महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आजमितीस कॅनॉल रोडवर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील कॅनॉलच्या लगत अतिक्रमण केले होते. अतिक्रमण केलेल्या बांधकाम व्यावसायिकांना जलसिंचन विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, तरीही कॅनॉलरोडलगतचे अतिक्रमण कायम आहे.

धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या एका नामांकित खासगी शिक्षण संस्थेने गोवर्धन शिवारात असलेल्या कॅनॉलवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित शिक्षणसंस्थेच्या समोरील कॅनॉल गायब झालेला असूनही यावर महापालिका व

जलसिंचन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ठिकठिकाणी अतिक्रमणे वाढतच चालली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणालगत अतिक्रमण

महापालिका व जलसिंचन विभागाच्या असलेल्या कॅनॉलवर धरणापासूनच झोपड्यांचे अतिक्रमण सुरू झाले. ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्या कॅनाालवर झोपड्यांचे रोजच अतिक्रमण होत असताना याकडे देखील महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने कॅनॉलची दयनीय अवस्था झाली आहे.

शेतकऱ्यांना जागा परत द्या

कॅनॉलसाठी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. कालांतराने कॅनॉलच बंद झाल्याने अखेर महापालिकेची पिण्याच्या पाण्याची थेट पाइपलाइन टाकण्यात आली होती. कॅनॉल बंद झाल्याने जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ही मागणी शासनदरबारी प्रलंब‌ित पडून असल्याचे जलसिंचन विभागाच्या

अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने तब्बल २३ किलोमीटर कॅनॉल ताब्यात घेतले असून, जलसिंचन विभाग व महापालिकेचे मालकी हक्क असल्याचेही जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images