तुषार देसले, मालेगाव
शहरातील बहुतांशी रस्ते हे वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहेत. कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका दरम्यान असलेल्या कॉलेज रोडवरून होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे. प्रशस्त रस्ता असला तरी रस्त्यालगत फूटपाथ, भुयारी मार्ग नसणे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवूनच शाळेची वाट धरावी लागत आहे.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती रहदारी, अतिक्रमण या समस्या शहरवासीयांना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र कॉलेज रोडवरील वाहतूक समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक शैक्षणिक संस्था तसेच कॅम्प परिसरात जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. साक्री, नामपूरसह अनेक गावांतून होणारी प्रवासी वाहतूक याच रस्त्याने होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी खूप वाढली आहे. या रस्त्यालगत आर. बी. एच. कन्या विद्यालय, भारत विद्यालय, महिला कॉलेज, आदिनाथ स्कूल, एलव्हीएच स्कूल, केबीएच व मसगा महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक याच रस्त्याने प्रवास करतात.
बाईकरायडर्सला आवरा
बरेच दिवस खड्डेमय असलेला हा रस्ता अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला असला तरी त्यावरील समस्या संपलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ नाहीत. दुभाजक, पथदिवे नाहीत. रस्त्यावर कोठेही ‘पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक नाहीत. शाळांजवळ गतिरोधक नावालाच आहेत. त्यात अनेक कॉलेजतरुण धूमस्टाइलने दुचाकी चालवित असल्यामुळे त्यांना पायबंद घालण्यासाठी या रस्त्यावर कोठेही पोलसि यंत्रणा तैनात नसते. या समस्याबाबत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने उपयोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून होत आहे.
भुयारी मार्ग होणे गरजेचे
शाळा व महाविद्यालयाच्या सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. अशा वेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. याचवेळी भरधाव वेगाने येणारे दुचाकी, रिक्षाचालक यांच्यामुळे अपघात होण्याची भीती कायम असते. अनेकदा अपघात झालेलेही आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांसमोर अंडरपास (भुयारी मार्ग) होणे भविष्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट