तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला लवकर पिकू लागला आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मागणी स्थिर असल्यामुळे दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवक ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्याच प्रमाणात दरांमध्ये घसरण झाली आहे.
थंडी सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मर्यादित होती. थंडीच्या मोसमात रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचा दर्जाही चांगला होता. मात्र, ढगाळ हवामान येताच भाजीपाला पिकण्याचे प्रमाण वाढले. भाजीपाल्याची मागणी आणि त्याचा पुरवठा यांच्यात तफावत होऊ लागल्यामुळे त्याच्या दरात घसरण सुरू झाली. वांगी पिकाचे दोन दिवसांपूर्वीचे दर ४० ते ७५ रुपये प्रतिकिलो होते, ते सोमवारी २० ते ४० रुपये असे कमी झाले. दुधी भोपळ्याचीही परिस्थिती अशीच झाली असून, दर ३ ते ७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
--
उत्पादन खर्च वाढणार
भाजीपाला पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले होते. त्यानंतर पिकांची वाढ चांगली होऊ लागली असतानाच ढगाळ वातावरणाने उत्पादनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रोग-किडींची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक व कीडनाशकांच्या फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत.
---
सोमवारची आवक आणि दर
--
भाजीपाला...........आवक (क्विंटलमध्ये)............मिळालेला दर (प्रतिकिलो)
टोमॅटो.................१६९२...............................१२ ते ४१
वांगी..................११७..................................२० ते ४०
फ्लॉवर...............२९७...................................७ ते १२
कोबी..................४५०...................................८ ते १६
शिमला मिरची.....२५८...................................३१ ते ५६
दुधी भोपळा.........७६८....................................३ ते ७
कारले ................३७८...................................१६ ते २८
दोडका.................१९३ ..................................१६ ते २९
गिलके................२२ .....................................१२ ते २०
भेंडी...................१५.......................................१६ ते ३३
गवार.................४० .....................................३० ते ६०
काकडी...............७३४.....................................७ ते १५
-------------------
पालेभाज्या ...............आवक (जुडी).............दर (प्रतिजुडी)
कोथिंबीर...................५५,६००......................११ ते ३०
मेथी.........................८२,३००.......................६ ते १४
शेपू...........................१०,२००.......................१४ ते २०
कांदापात.....................२५,८००......................१० ते २५
---
वातावरणाने धास्तावले शेतकरी
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर सावरत असलेले शेतकरी आता ढगाळ वातावरणामुळे धास्तावले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश द्राक्षपीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. पाऊस झाल्यास द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
द्राक्षबागेच्या ऑक्टोबर छाटणीच्या वेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. खरिपाच्या सोयबीन, भुईमूग, मका आदी पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीला तोंड देत त्यातून सावरत रब्बीच्या हंगामाच्या पेरण्यांची कामे उरकण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. रब्बीच्या ज्या काही पेरण्या झालेल्या आहेत, ती पिके डोकावत असताना पाऊस आल्यास त्यांचे नुकसान होईल, या विचाराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रतीक्षेत असलेली कर्जमाफी, जिल्हा सहकारी बँकेत अडकलेले पैसे, कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी लागलेला तगादा यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलेला असताना आता बदलत्या वातावरणामुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे.
द्राक्षबागांवर संकट
जिल्ह्यातील नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षासारख्या नाजूक पिकावर बदलत्या वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. थंडीनंतर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे द्राक्षांच्या वाढीवर विपरित परिणाम आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यापासून वाचविण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. परतीच्या पावसाच्या वेळीही अतिरिक्त फवारण्यांच्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडला होता. आता आणखी फवारण्या कराव्या लागत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे.
ग्रामीण भागातही फटका
घोटी ः इगतपुरी व घोटी परिसरातही ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी दुपारी दोनपर्यंत तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता वाढली होती. साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक पावसाचा शिडकावा झाल्याने जोराचा पाऊस येतो की काय, अशी चिंता शेतकरीवर्गात पसरली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट