Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तक्रारींचा पाऊस अन् उत्तरांचे समाधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या मध्यवर्ती तक्रार दिनात १४० तक्रारदारांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी सर्व प्रकाराच्या मिळून ४०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. २०१२ पासून सुरू असलेल्या एका वादावर पोलिस आयुक्तांनीच तोडगा काढून तक्रारदारासह समोरील पक्षाचे समाधान केले.

शहर पोलिसांनी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी पोलिस स्टेशननिहाय तक्रार दिनाचे आयोजन सुरू केले आहे. परंतु, शनिवारी पोलिस आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, राजू भुजबळ, सचिन गोरे, मोहन ठाकूर, अशोक नकाते, तसेच सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर होते. कार्यक्रमास १४० तक्रारदार तसेच गैरअर्जदरांनी हजेरी लावली. कार्यक्रमास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही हजर राहत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये २०१२ पासून एक किरकोळ वाद प्रलंबित होता. अनेकदा प्रयत्न करूनही तो मिटलेला नव्हता. मात्र, सदरच्या वादावर पोलिस आयुक्तांनी सुनावणी घेत दोन्ही बाजूच्या तक्रारदारांची समजूत घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका घरकुलांत पोटभाडेकरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गरिबांना मोफत घरे देण्यासाठी सुरू केलेल्या ‘जेएनयूआरएम’ योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये मालकांनी थेट भाडेकरू व पोटभाडेकरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवकांनी पुराव्यानिशी हा प्रकार समोर आणला आहे. त्यामुळे विधी समिती सभापती शीतल माळोदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

विधी समिती सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत घरकुल योजनेच्या दुरुपयोगावर चर्चा झाली. दरम्यान, जागामालकांनी आरक्षित जागेवर झोपडपट्ट्या हटविण्यापूर्वीच महापालिकेने मालकांना टीडीआर देण्याची घाई केल्याचा आरोप सदस्य सलिम शेख यांनी केला. ‘जेएनयूआरएम’ योजनेंतर्गत शहरात सात हजार ४६० घरांचे लक्ष्य निश्चित करून सध्या पाच हजार ४५७ घरांचे वाटप करण्यात आले आहे. कालांतराने ही योजना वादात सापडली. काही भागात लाभार्थीच मिळाले नाहीत. शहराचा मध्यवर्ती भाग सोडून चुंचाळे येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये कोणी जाण्यास तयार नव्हते. कोर्ट-कचेऱ्या आदी कारणांमुळे योजनेला घरघर लागली. काही ठिकाणी नागरिकांनी घरे ताब्यात घेतली असली, तरी त्यांच्यात राहण्यास नकार दिला. नीलगिरी बाग येथेही महापालिका निवडणुकीपूर्वी घरकुलांचे वाटप करण्यात आले. परंतु, सध्या त्या घरांमध्ये मूळ लाभार्थ्यांऐवजी भाडेकरू ठेवण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. त्याचे पुरावेच समितीत सादर झाल्यानंतर माळोदे यांनी नोटीस काढून चौकशीचे आदेश दिले आहेत.

---

‘ताबा न घेताच टीडीआर’

महापालिकेने शहरात आरक्षित केलेल्या जागांवर अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत. या आरक्षित जागा ताब्यात घ्यायच्या असतील, तर त्यासाठी महापालिका जागामालकाला टीडीआर देते. परंतु, या आरक्षित जागांवर अतिक्रमण असेल, तर ते काढून देण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची असते. मात्र, शहरात अनेक भागात झोपडपट्ट्या न हटविता जागामालकांना टीडीआर देण्यात आल्याचा आरोप मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी केली आहे. या जागांवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटविण्याची जबाबदारी महापालिकेवर ढकलण्यात आल्याचा दावा करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. अधिकृत झोपडपट्ट्यांना घरपट्टी लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

--

रेडीरेकनरचा दर लावू नका

महापालिका उत्पन्न कमावणारी संस्था नाही, त्यामुळे बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अभ्यासिका नाममात्र दरात द्याव्यात, अशी मागणी सलीम शेख यांनी विधी समितीच्या बैठकीत केली. मनसेच्या सत्ताकाळातच रेडीरेकनरप्रमाणे कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता मनसेने आपली भूमिका बदलत त्यातून सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अभ्यासिका यांना वगळण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीव कपूर देणार रेसिपींचा कानमंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्री संजीव कपूर खजानाच्या वतीने खमंग, चटपटीत पदार्थ बनविण्याचे तंत्र नामांकित शेफ संजीव कपूर यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या सोमवारी (दि. ९) दुपारी ३ वाजता नभांगण लॉन्स, इंदिरानगर येथे आयोजित लाइव्ह कुकरी शोमधून ही संधी महिलावर्गाला उपलब्ध होणार आहे. संजीव कपूर स्वतः या कार्यक्रमात विविध पाककृती करून दाखवणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वर्षभरातील महत्त्वाचे सण उत्सव स्पेशल करण्यासाठी तर अशा कार्यक्रमांची रीघ लागलेली असते. सध्या दिवाळीचे वातावरण सर्वत्र आहे. शहर रंगीबेरंगी दिव्यांनी सजण्यासाठी सज्ज झाले आहे. या सणात फराळ व चटकदार पदार्थ मुख्य वैशिष्ट्य व आकर्षण असतात. यंदाच्या दिवाळीत काही तरी वेगळे पदार्थ करण्याची संधी मिळावी, यासाठी मटा कल्चर क्लबतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या व्यसनाधीनतेत वाढ

$
0
0

प्रफुल्ला मोहिते यांनी व्यक्त केली खंत

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संपूर्ण समाजाला व्यसनापासून मुक्त करण्याचे मोठे आव्हान आहे. आव्हान मोठे आहे म्हणून हार मानून चालणार नाही. व्यसनाधीनतेच्या प्रभावापासून आज कुठलाच घटक अलिप्त राहू शकलेला नाही. टीनएजर्सच नव्हे तर महिलाही याला अपवाद राहिलेल्या नाहीत. महिलांमध्ये तर व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे, अशी खंत पुण्यातील ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रफुल्ला मोहिते यांनी व्यक्त केली.

नीलवंसत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. सेंटरच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार’ त्यांना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मोहिते पुढे म्हणाल्या, की व्यसनाधिनतेकडे समाज झुकण्यामागे अनेक कारणी दडली आहेत. व्यसनांपासून समाजाला परावृत्त करणे आव्हानात्मक असले तरीही अशक्य नाही. त्यासाठी व्यसनास बळी पडलेल्या लोकांशी सातत्याने संवाद साधून समुपदेशनाची मात्रा त्यांना पुरेशा प्रमाणात द्यावी लागते. त्यांचा हरविलेला आत्मविश्वास जागृत करावा लागतो, असे मोहिते यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, मुक्तांगणचे संस्थापक डॉ. अनिल अवचट, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, नीलवसंत फाउंडेशनच्या डॉ. प्राची पवार, रंजना पाटील, वसंत खैरणार आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात विनायकदादा पाटील म्हणाले, की सामाजिक क्षेत्र हे संवेदना असणाऱ्या माणसांसाठी अतिशय व्यापक आव्हान असते. कारण, येथे नजर पडेल त्या घटकांसाठी सेवेची संधी उपलब्ध असते, हे दुर्दैव असले तरीही वास्तव आहे. या क्षेत्रात झोकून देऊन काम उभारण्यासाठी सेवा हीच तुमची मूळ प्रेरणा असायला हवी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत डॉ. प्राची पवार यांनी केले. अविनाश आंधळे यांनी प्रास्तविक केले. डॉ. अनिल अवचट यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सन्मानपत्राचे वाचन नीलिमा पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. डेकाटे रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना घंटागाडी ठेकेदारांवरील मेहेरबानी प्रकरण भोवले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाला सादर केला आहे.

घंटागाडी कामगारांचे वेतन अदा करण्यापूर्वीच त्यांनी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीची अनामत रक्कम काढून दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. डेकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. घंटागाडी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या डॉ. डेकाटे यांना यापूर्वी पाच वेळा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे डॉ. डेकाटे यांची ५ ऑगस्टला पदोन्नतीने राज्य कुटुंबकल्याण ब्युरो विभागाच्या सहसंचालकपदी बदली झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दि. १६ मे २०१५ मध्ये प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी बदली झाल्यापासून डॉ. डेकाटे यांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्वच्छतेच्या ठेक्यापासून ते घंटागाडी, पेस्ट कंट्रोल आदी विविध प्रकारच्या ठेक्यांप्रकरणी डॉ. डेकाटे यांच्यावर आरोप झाले. प्रशासकीय पातळीवर त्यांना वारंवार नोटिसाही बजावण्यात आल्या. महासभा-स्थायी समितीवर डॉ. डेकाटे हे नेहमीच सदस्यांचे लक्ष्य बनले. त्यांच्याबद्दल वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वीच आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी डेकाटे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून तो डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडे सोपविला होता, तर डेकाटे यांना वैद्यकीय विभागाच्या रिक्त असलेल्या अधीक्षकपदी बसविण्यात आले होते.

नवीन घंटागाडी ठेका दिल्यानंतर डॉ. डेकाटे यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यापूर्वीच ठाणे स्थित मे. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीची अनामत रक्कम काढून दिली होती. त्यामुळे महापालिकेला या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे लागले होते. या प्रकरणातही महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यांना नोटीस काढली होती. परंतु, त्याचा समाधानकारक खुलासा ते करू शकले नाहीत. त्यामुळे अखेर त्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. शनिवारी डॉ. डेकाटे यांच्या विभागीय चौकशीच्या फाइलवर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले असून, शासनाला चौकशी करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. डेकाटे हे प्रतिनियुक्तीवर असल्याने त्यांच्या चौकशीचे अधिकार आरोग्य विभागाकडे आहेत. त्यामुळे आता डॉ. डेकाटेंच्या अडचणींत भर पडली आहे. डेकाटे यांची दि. ५ ऑगस्टला पदोन्नतीने राज्य कुटुंबकल्याण ब्युरो विभागाच्या सहसंचालकपदी बदली झाली आहे. त्यामुळे आता त्यांची बदलीही संकटात सापडली आहे.

----

ब्रेन डेड प्रकरणात घाई

डॉ. जया जमादार यांच्या ब्रेन डेड प्रकरणात महापालिकेला कोणतेही लेखी आदेश नसतानाही डॉ. डेकाटे यांनी परस्पर दोन हॉस्पिटल्सला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी त्यांना आलेल्या लेखी पत्रांची माहिती मागितली. परंतु, केवळ तोंडी आदेश आल्यानंतर नोटीस दिल्याचा खुलासा डॉ. डेकाटे यांनी केला. त्यावर आयुक्तांनी संवेदनशील प्रकरणात लेखी आदेश नसतानाही दाखवलेल्या तत्परतेवर त्यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे डेकाटे यांनी वाद ओढवून घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घातपाताच्या भीतीने पोलिसांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी सहा कमर्शियल गॅस सिलिंडर आढळून आले. विशेष म्हणजे आगीचा कोठेही लवलेश नव्हता. त्यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाला याचा अंदाज पोलिसांना बांधता येईना. सदर गाळ्यात काही आक्षेपार्ह झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानुसार शहर पोलिसांनी श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञासह बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण केले. दुसरीकडे दहशतवादी विरोधी पथक, पुण्याच्या एनडीआरएफ पथक व इतर काही संस्थांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे ठाण मांडून होते.

स्फोटामागे गॅस व कॉम्प्रेसरचे कनेक्शन

सदर गाळा चांगदेव पालवे (रा. शिवाजीरोड) यांच्या मालकीचा असून, त्यात चायनीज स्टॉलसाठी लागणारे साहित्य, गॅसटाक्या ठेवल्या जातात. शनिवारी पहाटे गाळ्यातील एका टाकीतील गॅस लिक झाला. गाळा पूर्णतः बंद असल्याने गाळ्याचे रूपांतर मोठ्या गॅस सिलिंडरमध्ये झाली. या ठिकाणी असलेला फ्रिज मात्र सुरू होता. कॉम्प्रेसर आपले काम करीत होता. कॉम्प्रेसरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस गेला. त्यामुळे पहिला छोटा स्फोट कॉम्प्रेसरमध्ये झाला. त्यानंतर गाळ्यात मोठा दबाव निर्माण झाला. यामुळे गाळ्याचे शटर व छत उडाले. े आजूबाजूच्या गाळ्यांना तसेच वाहनांना हानी पोहचली. या घटनाक्रमावर फॉरेन्सिक विभागाने शिक्कामोर्तब केले असले तरी इतर तज्ज्ञांच्या मतांचा विचार घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, गाळे मालकाविरुध्द स्फोटक पदार्थांबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

स्फोटाची तीव्रता मोठी

हा स्फोट इतका मोठा होता की शेजारील दोन गाळ्यांचे शटर उडून समोरील गाळ्यांवर आदळले. तसेच, दहा गाळ्यांचे वरील छते कोसळली. तसेच भिंतींचीही पडझड झाली. रस्त्याच्या बाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. या घटनेप्रसंगी शेजारील गाळ्यात झोपलेले काही कामगार छत कोसळूनही कसेबसे गाळ्या बाहेर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये नितेश बेलापुरकर, दत्तू चौधरी यासह इतर तिघांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा खडतर प्रवास तर वाहनचालकांची कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीतील सिएटसमोर रस्ता महापालिकेने नव्याने मंजूर करूनदेखील करण्यात आलेला नाही. यामुळे दररोज कारखान्यांमध्ये कामावर जाणाऱ्यांना सिएट कंपनीच्या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास होत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महिला कामगारांना कामावर जाताना व कामावरून घरी परतताना अरुंद रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. महापालिकेकडे अनेकदा समस्या मांडूनदेखील रस्त्यांचे रुंदीकरण होत नसल्याने महिला कामगारांसह वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता रुंदीकरणाचा निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. परंतु, मंजूर करण्यात आलेला निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने अरुंद रस्त्याचा खडतर प्रवास कधी थांबणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सातपूर एमआयडीसीत श्रमिक नगर, शिवाजी नगर व ध्रुव नगर भागातील सर्वाधिक कामगार कार्बन कंपनीकडून सिएटमार्गे कारखान्यांमध्ये कामासाठी जात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सिएटसमोरील रस्ता रुंदीकरण करण्यात यावा याकरीता नगरसेवकांसह कामगारांनी महापालिकेकडे मागणी केली होती. परंतु, आजतागायत सिएट रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले नसल्याने पायी चालणाऱ्या महिला कामगारांना खडतर प्रवास करण्याची वेळ आली आहे.

कंटेनर्सचा विळखा

सिएट समोरून जाणाऱ्या रस्त्यावर रोजच कंटेनरचा विळखा असल्याने कामावर जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करण्याची वेळ येत असते. रस्त्यातच कंटेनर उभे केले जात असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करण्याची वेळ येते. सिएट कंपनीच्या समोर असलेल्या रस्त्यावरील पुलही गेल्या अनेक वर्षांपासून खचला आहे. यासाठी नवीन पुलाची मंजुरीही महापालिकेने दिली होती. परंतु, मंजूर पुलाचा निधीही गेला कुठे, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी शिवसेनेची सज्जता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेत, पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, या बैठकीत दोन गटांनी वेगवेगळी नावे पुढे केल्याने गटबाजीचे दर्शन घडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकत्रितपणे व वैयक्तिकपणे पदाधिकाऱ्यांचा अंदाज घेत, सर्वांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील वर्षी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. गेल्या वेळेस ताकद नसतानाही शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना अवघ्या चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी पडून सहाणे यांची मते बाद केल्याने त्यांचा पराभव झाल्याचा आरोप होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, शहर व जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधान परिषेदतील मतांचे गणित भाजपपेक्षा शिवसेनेकडे जास्त आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी सोपी दिसत असल्याने त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ‘मातोश्री’वरून शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत दोन गटांनी वेगवेगळी नावे पुढे केल्याने उमेदवार निश्चितीचा तिढा कायम राहिला.

सहाणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची नावे या वेळी पुढे आली आहेत. सहाणे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. एका गटाने त्यांना आपला पाठिंबाही दर्शवला. मात्र, दुसऱ्या गटाकडून त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दराडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असली तरी दराडेंच्या विश्वासार्हतेवर पहिल्या गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जिल्हा बँकेतील त्यांच्या गैरकारभाराचे पाढे वाचण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोणताही निर्णय न घेता, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असल्याने या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार अपघातात चालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना नाशिक-पेठ मार्गावर घडली. कारचालकासह त्याचा मित्र देवदर्शन आटोपून सुरत येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास करीत असताना ही घटना घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय चौधरी (४१ रा. हजीरारोड, सुरत) असे मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. विजय व त्याचा मित्र राकेश सिताराम मंडलिक (रा. परवतगाव, सुरत) कंपनीस सुट्टी असल्याने गुरुवारी देवदर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. देवदर्शन आटोपून ते शुक्रवारी सकाळी नाशिक येथील मुंबईनाका भागात राहणाऱ्या एका नातेवाइकास भेटण्यास गेले. दुपारच्या सुमारास त्यांनी सुरतच्या दिशेने प्रवास सुरू केला. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पेठरोडवरील जकातनाका परिसरातील के. के. वाघ फार्महाऊस समोर अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांची स्विफ्ट कार (जी. जे. ५ सीएस ६२९०) उलटली. विजयसह त्याचा मित्र राकेश गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी तत्काळ दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना विजयचा रात्री मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संजय बेडवाल करीत आहेत.

तरुण कामगाराचा मृत्यू

सिमेंटची पाटी डोक्यात पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैलास शंकर जाधव (१७ रा. नांदगाव कोहळी-खरवळ, ता. त्र्यंबकेश्वर) असे मयताचे नाव आहे. शिवाजीनगर येथील जिजामाता कॉलनी येथे जुन्या घराचे वाढीव बांधकाम करीत असताना ही घटना घडली. पहिल्या मजल्यावर काम करणाऱ्या गवंडीसाठी सिमेंटची पाटी भरून ठेवलेली होती. पहाडीस अचानक धक्का लागल्याने सिमेंटनी भरलेली पाटी खाली कोसळली. यावेळी खाली कैलास हा सिमेंट आणि रेती मिक्स करीत होता. जड पाटी थेट त्याच्या डोक्यात पडली. अतिरक्तश्रावाने कैलासचा जागीच मृत्यू झाला.

डॉक्टर महिलेचा विनयभंग

जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या डॉक्टर महिलेची छेड काढण्याचा प्रकार कमोदनगर भागात घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमोदनगर भागात राहणारी २६ वर्षीय डॉक्टर महिला शुक्रवारी रात्री घराबाहेर पडली होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या घराकडे परतत असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या २७ ते २८ वर्षीय तरुणाने महिलेची छेड काढीत विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना-नानी पार्क कधी?

$
0
0

महापालिकेची करोडोंची जागा नर्सरीचालकाच्या खिशात

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या शहरात असलेल्या अनेक आरक्षित जागा खासगी विकसकांच्या जाळ्यात अडकून पडल्या आहेत. यामधील सातपूर भागातील २० वर्षांहून अधिक काळापासून आरक्षित असलेली करोडो रुपयांची जागा नर्सरी चालकाच्या खिशात अडकली आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेकडून सर्व सुविधा मिळवूनदेखील या नर्सरी चालकाने आजही महापालिकेची करोडो रुपयांची जागा आपल्याकडेच ठेवल्याने मेहरबानी करणारे कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असताना माजी स्थायी समिती सभापती तथा गटनेते सलिम शेख यांनी नाना-नानी पार्क संबधित जागेवर करणार, असे जाहीर केले होते. परंतु, नाना-नानी पार्क होणार कधी, असा सवाल आता या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तरी याबाबत महापालिका प्रशासनाने तत्काळ आरक्षित असलेली जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणीही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. येत्या काळात संबंधितावर तातडीने कारवाई व्हावी आणि या नर्सरीची जागा नाना-नानी पार्कसाठी वापरून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.


स्वतःच्या व्यवसायाकरीता वापर

दरम्यान, महापालिकेचे गटनेते सलिम शेख यांनी मनसेची सत्ता असतांना पपया नर्सरी येथे आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नाना-नानी पार्क उभारणार असल्याचे जा‌हीर केले होते. याबाबत महापालिकेकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, राजाश्रय असलेल्या पपया नर्सरीच्या मालकाकडून महापालिकेने आजही आरक्षित असलेले जागा ताब्यात घेतलेली नाही. विशेष म्हणजे २० वर्षांहून अधिक काळापासून नर्सरी मालक महापालिकेची जागा स्वतःच्या व्यवसायाकरीता बिनदिक्कतपणे वापरत आहे. महापालिकेने नर्सरी चालकाला सर्व सुविधा देऊनदेखील करोडो रुपयांची जागा आजही नर्सरीकडे अडकली असल्याने तिची सुटका करणार कोण, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

हक्काची जागाच नाही

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात निवृत्त कामगारांची संख्या लक्षणीय आहे. गावाकडून कामानिमित्ताने सातपूर शहरात आलेल्या निवृत्त कामगारांना हक्काची बसण्याची जागाच उपलब्ध नाही. परिणामी त्यांना विरंगुळा करण्याची जागाच नाही. आपल्या गावासोबत नाड तुटली असल्याने मुलांचा संसार उभा करण्यातच कामगारांचे आयुष्य शेवटच्या क्षणाला आले आहे. त्यातच लहान घरात मुलांसह नातवंडे यांनाच घरात जागा कमी पडत असल्याने सहाजिकच विरंगुळा मिळविण्यासाठी मंदिर, बस थांबे व महापालिकेच्या वाहतूक बेटांवर ज्येष्ठ नागरिकांना वेळ घालवावा लागतो. हजारोंच्या संख्येने असलेल्या निवृत्त कामगारांसाठी हक्काची जागाच मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

आरक्षित असलेली महापालिकेची जागा त्र्यंबकरोडला लागून असलेल्या नर्सरी चालकाच्या खिशात अडकली आहे. प्रशासनाने नर्सरी चालकाला जागा मोकळी करून देण्यासाठी सर्व सुविधा दिल्या असतानादेखील करोडोंची जागा नर्सरीच्या कामाकरीता वापरली जाते. याकडे आयुक्तांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

-दिगंबर बोरसे, जेष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीवरून राजकारण तापले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडी येथील स्मशानभूमीच्या विषयावरून राजकारण सुरू झाले असून, हे काम झालेच पाहिजे, यासाठी शनिवारी नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र, या वेळी स्मशानभूमीच्या कामाला विरोध करणारे व समर्थन करणारे समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. या वेळी प्रचंड घोषणबाजी झाली. या प्रकरणी वीरशैव लिंगायत समाज व उंटवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्मशानभूमीचा विकास होण्यासाठी निवेदन देण्यात आले.

उंटवाडी येथील स्मशानभूमीचा विकास करावा की नाही, यावरून तीन दिवसांपासून वादंग पेटले आहे. काही नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी ही स्मशानभूमी होऊ नये म्हणून आंदोलन केले होते. या स्मशानभूमीचा विकास झालाच पाहिजे, यासाठी शेकडो नागरिकांनी शनिवारी आंदोलन केले. या वेळी विरोध करणारे व समर्थन करणारे दोघेही समोरासमोर आल्याने काही काळ घोषणाबाजी झाली. यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. स्मशानभूमी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका हर्षा बडगुजर, आर. एल. लगरे, जयराम बोंबले, भाऊसाहेब लगरे, संतोष चहाळे, विजय मुंजे, मुरली बेंडकुळे, संतोष पारधी, अरुण लहाने, अनिल खराटे, दीपक बडगुजर, पवन मटाले, राम सूर्यवंशी, मयूर बच्छाव, दिनकर घुले, कारभारी गुंबाडे, भरती वाघमारे, अलका शेजवळ, सोनाली चव्हाण, राणी लहांगे, सुनीता लगरे, पंकज भोईर आदींसह नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर वीरशैव लिंगायत समाज व उंटवाडी ग्रामस्थांच्या वतीने या स्मशानभूमीचा विकास झालाच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर सिडकोची स्थापना होण्यापूर्वी उंटवाडी ग्रामस्थांची ही स्मशानभूमी असून, अत्यंत कमी दरात या जमिनी दिल्या आहेत. आता आमच्या स्मशानभूमीला विरोध करणे चुकीचे आहे. केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा विरोध करणे चुकीचे असून, स्मशानभूमीचा विकास झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

या प्रकारानंतर नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह नागरिकांनी राजीव गांधी भवन येथे आंदोलन केले. या स्मशानभूमीला आमचा विरोध असल्याचे सांगून आम्ही बांधकाम व्यावसायिकाच्या बाजूने असल्याचे खोटे वृत्त पसरविले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकाराला राजकीय वळण मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीला मुहूर्त दिवाळीनंतरच!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी सर्वच बाजूने सरकारला घेरले जात असले तरी दिवाळीपर्यंतही कर्जमाफी मिळू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चावडीवाचन पुढे ढकलण्यात आले असून, त्यामुळे अर्जांच्या बँकेतील खात्यासोबतच्या पडताळणीलाही विलंब होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

राज्यात कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारकडून सांगितले जात होते. मात्र, राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. निवडणुका संपल्यानंतरच १० ऑक्टोबरला चावडीवाचन पूर्ण केले जाणार आहे, तसेच प्राप्त अर्जांची बँकांमधील खात्यांसोबत पडताळणी होणार असल्याने त्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता मावळली आहे.

कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अर्जांची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे. दोन ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात चावडीवाचन झाले. तेथे प्राप्त झालेल्या लेखी व तोंडी हरकती एकत्रित करण्याचे काम सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका असल्याने तेथील चावडीवाचन आचारसंहिता संपल्यावर होणार आहे. ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सदस्यांना तातडीने बैठक घेऊन चावडीवाचनासाठी ग्रामसभेचे आयोजन करावे लागेल. दहा ऑक्टोबर रोजी हे चावडीवाचन होण्याची शक्यता आहे. चावडीवाचन झालेल्या गावांपैकी काही ठिकाणी याद्यांमधील माहितीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यादीत नावे नाहीत, आकडेवारी चुकीची असणे यांसारख्या तक्रारींवर शेतकरी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात अस्वच्छता; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असली तरी अजूनही गोदापात्र स्वच्छ ठेवण्यास महापालिकेला यश आलेले नाही. गेल्या आठवड्यात विजयादशमीच्या दिवशी देवी विसर्जनानंतर गोदापात्रात प्रचंड कचरा साचला होता. तो कचरा दोन दिवस तसाच पडून होता. त्यातील काही कचरा उचलण्यात आला असला तरी अजूनही गोदापात्रात कचऱ्यामुळे अस्वच्छता दिसत आहे.

विजयादशमीच्या दिवशी शहर परिसरातून देवी मूर्ती विसर्जनासाठी गोदापात्रात आणण्यात आल्या होत्या. या विसर्जनानंतर गोदापात्रात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. या विसर्जनाच्यावेळी टाकलेला कचरा सध्या गोदापात्रात अजून पडलेला दिसत आहे. गेली आठ दिवस या भागाची स्वच्छताच झालेली नसल्याचे यावरून लक्षात येत आहे. रामसेतू पुलाच्या पुढे दक्षिणेला गोदापात्राच्या दोन्ही बाजूला म्हसोबा पटांगण, खंडेराव मंदिराजवळील परिसर, मुक्तेश्वराजवळचा परिसर, गौरी पटांगण येथील पायऱ्यांवर हा कचरा अजूनही तसाच पडून आहे.

घाण करणाऱ्यांवर कारवाई केव्हा?

गोदापात्रात प्रदुषण होऊ नये यासाठी गोदाप्रेमी नागरिकांना थेट न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर मोठा गाजावाजा करून महापालिकेने गोदा संवर्धन कक्षाची स्थापना केली. काही दिवस गोदापात्रात कचरा, घाण टाकणाऱ्यांवर तसेच कपडे धुणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाईनंतर बंद झाली. गोदावरी संवर्धन कक्षाचे कार्यालय वस्त्रांतरगृहात सुरू करण्यात आले आणि ते बंदही पडले. मात्र, गेली आठ दिवस गोदापात्रात पडलेला हा कचरा महापालिकेच्या प्रशासनाच्या नजरेतून कसा काय सुटला. हा कचरा उचलला गेलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेंडी रांगोळ्यांची यंदा चलती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध सण-उत्सवांप्रमाणेच दीपोत्सवातदेखील रांगोळीचे मोठे महत्त्व असल्याने रांगोळीचे मार्केट सध्या जोरात आहे. पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळीला आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, वेगळा प्रकार म्हणून मोत्याच्या, प्लास्टिकच्या, तसेच स्टिकरच्या रांगोळ्यांची सध्या चलती असल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

शहरातील बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसाठी गजबजण्यास सुरुवात झाली असून, शोभेच्या वस्तू खरेदीलाही मोठी पसंती मिळत आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा ट्रेंड सध्या जोरात असल्याने अनेक वस्तूंमध्येही तो दिसून येत आहे. अगदी पारंपरिक रांगोळीदेखील विविध प्रकारांत उपलब्ध झाली आहे. मांगल्याचे प्रतीक म्हणून घराघरांत, दारासमोर मुली, महिला सणासुदीच्या काळात रांगोळी काढतात. पांढऱ्या रांगोळीपासून ठिपक्यांची आकृती तयार करून व त्यात रंग भरून सजावट केली जाते. दिवाळीच्या दिवसात तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याकडे कल असतो. मात्र, बदलत्या काळानुसार रांगोळ्यांमधील ट्रेंडदेखील बदलला आहे.

सजावटीच्या साहित्यापासून रेडीमेड रांगोळ्यांची चलती सध्या आहे. रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड, कॉलेजरोड, दहीपूल, शालिमार अशा अनेक परिसरांमध्ये या आर्टिफिशियल रांगोळ्यांची दुकाने थाटलेली आहेत. या रांगोळ्या खरेदीला महिलावर्गाचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याने रांगोळ्यांचे विविध प्रकार बाजारात आणले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

--

या प्रकारांना वाढती पसंती

--

मोत्यांची रांगोळी

दारासमोर मांडण्यासाठी सुरेख दिसत असल्याने मोत्यांच्या रांगोळ्यांना महिलावर्गाकडून मोठी मागणी आहे. अनेक महिला घरगुती स्वरूपात या रांगोळ्या तयार करून दुकानांमध्ये विक्रीस देतात. दिवाळीनिमित्त स्वतःदेखील या रांगोळ्यांच्या ऑर्डर्स घेऊन त्या विक्रीस उपलब्ध करून देत आहेत. डिझाइन व मोत्यांच्या प्रमाणानुसार या रांगोळ्यांची किंमत ठरते. सोनेरी तार, नायलॉन दोरा, रंगीबेरंगी मोत्यांचा वापर करून सुबकतेने मोती गुंफून या रांगोळ्यांची निर्मिती केली जाते. मोत्याच्या रांगोळ्या पुन्हा पॅक करून ठेवून देत वर्षानुवर्षे वापरता येत असल्याने या रांगोळीचे मोठे आकर्षण सध्या आहे.

--

प्लास्टिकची रांगोळी

प्लास्टिकच्या रांगोळ्यांमधील प्लेन डिझाइन्स बाजारात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. कानडे मारुती लेन येथे या प्रकारातील मोठी व्हरायटी बघण्यास मिळते. अगदी दहा रुपयांना पाच ते सहा प्लास्टिकच्या छोट्या स्वरूपातील रांगोळ्यांचे प्लेन आकार मिळतात. या रांगोळ्या दिवाळीत भेट देण्यासाठी, तसेच लक्ष्मीपूजनाला देवीच्या मूर्तीसमोर सजावटीसाठी खरेदी केल्या जात आहेत. या प्लेन रांगोळ्यांवर कुंदन, मोती, ग्लिटर यांचा वापर करून त्या सजविल्या जातात. मोत्यांच्या रांगोळ्यांप्रमाणेच प्लास्टिक रांगोळ्याही पुन्हा पॅक करून ठेवून देत वर्षानुवर्षे वापरता येत असल्याने या रांगोळी किंवा सजावट प्रकाराला चांगली मागणी आहे.

--

स्टिकरची रांगोळी

दारासमोर, उंबऱ्यावर, देवघरासमोर, अंगणात, बैठक खोलीच्या मधोमध अशा सर्व ठिकाणी सणासुदीच्या पूर्ण कालावधीत टिकतील म्हणून स्टिकर रांगोळ्यांचा ट्रेंडही जोरात आहे. शहरातील कोणत्याही मुख्य बाजारपेठेमध्ये पाऊल ठेवताच या रांगोळ्यांचे अनेक विक्रेते दिसून येत आहेत. स्टिकर रांगोळीच्या आकारानुसार दहा रुपयांपासून पुढे या रांगोळ्यांच्या किमती आहेत.

--

स्टिकर रांगोळ्यांसारख्या आर्टिफिशियल रांगोळीच्या प्रकारांना चांगली मागणी आहे. दिवाळी जसजशी जवळ येईल, तसतशी मागणी वाढेल. या रांगोळ्या वर्षानुवर्षे टिकत असल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो.

-संजू लोंढे, आर्टिफिशियल रांगोळीविक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिबेटीयनमध्ये स्फोट

$
0
0

गॅसगळतीने धमाका झाल्याचा अहवाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या तिबेटियन मार्केट परिसर शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भयंकर स्फोटाने हादरला. प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट होत नसल्याने विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, तपासाअंती सिलिंडरमधून लिक झालेला गॅस फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये गेला आणि मोठ्या क्षमतेचा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गाळामालकाविरोधात स्फोटक वस्तूंचा निष्काळजीपणे वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना तिबेटीयन मार्केटजवळील सबस्टेशनजवळील दुसऱ्या रोमधील पहिल्या तीन गाळ्यांमध्ये झाली. स्फोटामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील आठ ते दहा दुकाने आणि पार्क असलेल्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की स्फोटाने परिसरातील इमारतींना हादरा बसून खिडक्यांच्या काचा फुटल्या. पहाटेच्या निरव शांततेत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने सर्वांची झोप उडाली. आवाजाने नागरिकांमध्ये घबराट उडाली. घटनेचा केंद्रबिंदू स्पष्ट झाल्यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये बघ्यांची एकच गर्दी झाली. सरकारवाडा पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरावे संकलनाचे काम सुरू केले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी स्फोट झालेल्या गाळ्यामंधील सामान बाहेर काढले. दरम्यान, दुपारच्या सुमारास काही चायनीज स्टॉलधारकांनी येथे गुंडागर्दी केल्याने तणाव वाढला होता. पोलिसांनी लागलीच संशयितांना अटक केली.

मोठी हानी टळली

सदर स्फोट झाला ते गाळे महावितरणाच्या सबस्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे येथील प्रत्येक गाळ्यात व्यवसायानिमित्त गॅस सिलिंडरचा मोठा साठा केला जातो. सुदैवाने आजच्या घटनेत सिलिंडरचे स्फोट झाले नाहीत. तसेच झालेल्या स्फोटाचा थेट परिणाम सबस्टेशनवर जाणवला नाही. पहाटेच्या सुमारास आग लागली असती तर मोठी जीवित तसेच, आर्थिक हानी झाली असती.

या गुन्ह्याचा विविध अंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार गॅस गळतीमुळे झालेला दिसतो. पुणे येथील एनडीआरएफची टीम आली असून, तीही स्फोटाच्या कारणाचा शोध घेत आहे.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूतबाधा उतरवण्यासाठी नरबळीचा प्रयत्न?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी भागातील एका शाळकरी मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून तंत्रमंत्र करीत अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी रफिकबाबा उर्फ सांडू नामक बाबाला ताब्यात घेतले. अंधश्रद्धेतून गुप्तधन काढण्यासाठीच आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी संबंधितांनी अघोरी पूजा चालविल्याचा संशय पीडित मुलाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र, मुलाचे जायखेडा येथील मामाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी शनिवारी मालेगाव येथे धाव घेतली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलाचे वडील शेख ऐनुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा अजहरुद्दीन ऐनुद्दीन शेख (वय १८) गेल्या दोन वर्षांपासून त्याचे मामा मसूद लियाकत पठाण यांच्याकडे जायखेडा येथे कामकाजानिमित्त राहत होता. मोहरमनिमित्त तो २८ सप्टेंबर रोजी मालेगावकडे निघाला. मात्र, थेट घरी न जाता तो काका शहाबुद्दीन शेख ऊर्फ अलाउन्सर यांच्याकडे आला. त्या वेळी तेथे असलेल्या रफिकबाबाने त्याच्यावर भूतबाधा झाली असल्याची बतावणी करत उपचारासाठी म्हाळदे शिवारातील हाज्जीन सुलेमानी मशीनजवळील आपल्या पत्र्याच्या घरात नेले. ही माहिती शहाबुद्दीनने ऐनुद्दीन यांना दिली. ऐनुद्दीन मुलाला पाहण्यासाठी दोन-तीन दिवसांनंतर गेले असता, बेशुद्धावस्थेतील मुलाला अमानुषपणे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. मुलाला मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसल्याने त्यांनी मुलाला तातडीने सटाणा रोडवरील द्वारकामणी दवाखान्यात दाखल केले. या घटनेविषयी मुलाच्या मामाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मालेगाव गाठत पाहणी केली. भयभीत अवस्थेतील अजहरुद्दीनने शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची पुसटशी कल्पना दिली. विचित्र वास असलेले औषध पाजून मारहाण करण्यात आल्याने त्यानी सांगितले. तत्काळ पालकांनी पवारवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने रफिकबाबाच्या घरात छापा टाकून त्याला पत्नीसह ताब्यात घेतले. घरातील संशयास्पद साहित्यदेखील जप्त करण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरही रात्री साडेसात वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीचा धाक दाखविण्याऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये औरंगाबाद-मनमाड दरम्यान तलवारी उपसत दहशत निर्माण करणाऱ्या दोन शीख तरुणांविरोधात शनिवारी मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. तलवारीच्या धाकामुळे डब्यातील शौचालयात काही प्रवाशी लपले होते. तेथून एका प्रवाशाने रेल्वे पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एक्स्प्रेस मनमाडला येताच आरपीएफ, रेल्वे पोल‌िसांनी तलवारीच्या जोरावर दहशत माजविणाऱ्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. सदर घटना औरंगाबाद रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीसह हा गुन्हा औरंगाबाद रेल्वे पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अर्जुन पगारे, सतीश सराक या प्रवाशांचे नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या डी-२ या बोगीत सीट आरक्षित होते. गाडी औरंगाबादला आल्यानंतर ते डब्यात चढले. मात्र त्यांच्या जागेवर दोन शीख तरुण बसले होते. त्यांना दोघा प्रवाशांनी आरक्षणाबद्दल सांगितले. मात्र त्यांनी बाचाबाची सुरू केली व दोघांनी म्यानेतून तलवारी काढून दहशत निर्माण केली. तलवारी पाहून डब्यातील सर्वच प्रवाशांमध्ये भीती पसरली. भीतीपोटी प्रवासी डब्यात इकडे-तिकडे धावू लागले. महिला मुले शौचालयात जाऊन लपले. एका प्रवाशाने धावत्या ट्रेन मधील या तलवारनाट्याचे मोबाइलवर चित्रण केले. ही गाडी मनमाड स्थानकात शुक्रवारी सायंकाळी येताच पोल‌िस निरीक्षक के. डी. मोरे, रेल्वे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, एएसआय देवरे यांनी जसपालसिंग व हरजितसिंग या दोघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'छात्र भारती'चे मुरलीधर शहा यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

'छात्र भारती' या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सहकारी डॉ. मुरलीधर शहा यांचं आज पहाटे निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहा यांच्या नेतृत्वाखाली नव्वदच्या दशकात 'छात्र भारती'नं महाराष्ट्रात आंदोलनाचा झंझावात निर्माण केला होता. अनेक प्रश्नांवर आंदोलन केली. शहा यांचं प्रभावी वक्तृत्व आणि कुशल संघटना कौशल्याच्या बळावर छात्र भारतीने अनेक लढे यशस्वी केले. यदुनाथ थत्ते यांच्या साथीनं बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते. छात्र भारतीची संपूर्ण ताकदही त्यांनी या आंदोलनात उतरवली होती. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी कथामाला, आंतर भारतीचेही काम ते करत होते. बाबा आमटे यांच्या 'आनंदवन'चे काम साप्ताहिक 'साधना' व शिबिरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम त्यांनी केलं. सुट्टीच्या काळात ते आनंदवनात जात.

शहा यांनी धुळे येथील जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधक मंडळाचे ते ट्रस्टी होते. महाराष्ट्र हिंदी राष्ट्र भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. धुळ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक 'स्वतंत्र भारत'चे काही काळ संपादक होते. त्यांचे त्या काळातील अग्रलेख चांगलेच गाजले होते. अमृता प्रीतम यांच्या ' रसीदी तिकिट ' या पुस्तकाचं अनुवाद त्यांनी केला होता. राष्ट्र सेवा दलाचा इतिहास, डॉ. राम मनोहर लोहिया यांचं चरित्र, साने गुरुजीचं चरित्र आदी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींना मिळणार टॅबद्वारे शिक्षण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींना संगणक व तंत्रस्नेही पद्धतीने शिक्षण देता यावे यासाठी मनपा शाळा क्र ३३ आनंदवलीमध्ये डिजिटल शाळा निगडीत अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले. नन्हीकली उपक्रमांतर्गत या अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले असून नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळानुसार विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. टॅबद्वारे विद्यार्थिनींना आता शिक्षण मिळू शकणार आहे. मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थिनींना बक्षिस वितरण करण्यात आले. वीणा देशमुख यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींचे आरोग्य व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. तर नंदिनी घुमरे यांनी शालेय शिस्त व वेळेचे महत्त्व या विषयावर प्रबोधन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास शिंदे, नगरसेविका राधा बेंडकोळी, नगरसेविका राधा गांगुर्डे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला उपशिक्षिका सुरेखा घुमरे यांच्या माध्यमातून इनर क्लबकडून शाळेस मिळालेल्या सॅनिटरी सुविधेची पाहणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत बेंडकोळी, संजय जाधव, भरत गांगुर्डे, बन्सी वाघ, केंद्रप्रमुख कैलास ठाकरे, नन्हीकली उपक्रमाच्या प्रोजेक्टर सविता पवार व श्रद्धा दाभाडे उपस्थित होत्या. शाळेतील उपशिक्षक व उपशिक्षका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तनुजा देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुंदा बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिशू तज्ज्ञांचे मानधन वाढवणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवजात शिशू तज्ज्ञांचे मानधन वाढवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी (दि. ८) जिल्हा आरोग्य विभागाला दिले. आरोग्य मंत्र्यांनी अचानक भेट देत सिव्हिल हॉस्पिटलमधील नवजात शिशू विभागाची माहिती जाणून घेतली.

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात प्रमाणापेक्षा जास्त बालकांवर होणारा उपचार तसेच इनक्युबिटरची कमी संख्येमुळे होणारे बाल मृत्यू यामुळे सिव्हिल हॉस्पिटल टीकेचे धनी ठरले. याबाबत प्रसार माध्यमात ओरड झाल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. सावंत यांनी सलग दोन दिवस भेट दिल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर सीएसआरमधून सहा इन्क्युबिटर मिळाले. त्यांनाही लागलीच जागा उपलब्ध करून देत सिव्हिल प्रशासनाने यंत्रणा कार्यन्वित केली. रविवारी आरोग्य मंत्री सावंत मालेगाव दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी अचानक सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी कोणालाही माहिती न देता ते थेट सिव्हिल हॉस्पिटलच्या एसएनसीयू कक्षात गेले. कक्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या इन्क्युबिटर व्यवस्थेची पाहणी करीत त्यांनी कक्षाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या महिन्यात येणाऱ्या नवीन सात इन्क्युबिटरसाठी सुरू व्यवस्थेचीही पाहणी केली. यासाठी नवजात शिशू तज्ज्ञाची आवश्यकता असून, त्यांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव तयार करून सादर करा, असे आदेश सावंत यांनी दिले. मानधन वाढल्यास असे तज्ज्ञ सिव्हिल हॉस्पिटलसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images