शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या मध्यवर्ती तक्रार दिनात १४० तक्रारदारांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी सर्व प्रकाराच्या मिळून ४०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. २०१२ पासून सुरू असलेल्या एका वादावर पोलिस आयुक्तांनीच तोडगा काढून तक्रारदारासह समोरील पक्षाचे समाधान केले.
शहर पोलिसांनी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी पोलिस स्टेशननिहाय तक्रार दिनाचे आयोजन सुरू केले आहे. परंतु, शनिवारी पोलिस आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, राजू भुजबळ, सचिन गोरे, मोहन ठाकूर, अशोक नकाते, तसेच सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर होते. कार्यक्रमास १४० तक्रारदार तसेच गैरअर्जदरांनी हजेरी लावली. कार्यक्रमास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही हजर राहत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये २०१२ पासून एक किरकोळ वाद प्रलंबित होता. अनेकदा प्रयत्न करूनही तो मिटलेला नव्हता. मात्र, सदरच्या वादावर पोलिस आयुक्तांनी सुनावणी घेत दोन्ही बाजूच्या तक्रारदारांची समजूत घातली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट