ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत शहर पोलिसांनी तब्बल ४३ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक शाखेच्या इतिहासात प्रथमच कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे.
शहर वाहतूक शाखेने जानेवारी ते ६ ऑगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन कोटी सात लाख ७२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यासाठी ८४,४७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत शहर पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती अभियान राबवले. मात्र, बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळे ऑगस्ट, तसेच सप्टेंबरमध्ये शहर पोलिसांनी कारवाईला जोर दिला. आजमितीस कारवाई झालेल्या वाहनांची संख्या एक लाख २८ हजार ९१ इतकी झाली असून, दंडाची रक्कम तीन कोटी २२ लाख ८१ हजार ६०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. २०१६ मध्ये याच कालावधीत शहर वाहतूक शाखेने एक लाख ६३ हजार ७३७ वाहनांवर कारवाई करून एक कोटी ७२ लाख ९९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता.
शहरात वाहनांची संख्या लक्षणीय वाढली असून, शॉर्टकट मारणाऱ्या अथवा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांमुळे वाताहत होते आहे. वन वे अथवा नो एंट्री नियमांकडे दुर्लक्ष करणे, ओव्हर स्पीड, फ्रंटसीट प्रवासी, ड्रंक अँड ड्रायव्हिंग, पार्किंग नियमाकडे दुर्लक्ष, सिग्नल जम्पिंग, सीटबेल्ट अथवा हेल्मेट न लावणे अशा अनेक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. झेब्रा क्रॉसिंग वा लेन कटिंगसारख्या नियमांची माहितीही वाहनचालकांना नसते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली. मोठा आर्थिक भुर्दंड लावण्याची मात्रा पोलिसांनी शोधून काढली. मोठा भुर्दंड बसल्यानंतर तरी वाहनचालक पुन्हा असे प्रकार करणार नाही, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. दुर्दैवाने दंडाचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहोचूनही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट