Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुंबई दुर्घटनेतील मृतांना आज श्रद्धांजली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी रविवारी (१ ऑक्टोबर) हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. एलफिस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील फ्लायओव्हरवर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मूलभूत हक्क आंदोलन व नाशिकमधील इतर संस्था संघटनांतर्फे स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा होणार आहे.

मुंबईतील दुर्घटना ही आजवर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. नाशिक शहरामधील शहर बस वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थांचे हाल होत आहेत. एकीकडे नाशिक शहर स्मार्टसिटी करण्याची वल्गना केली जात आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरामधील बस प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित व धोकादायक होत आहे. या विषयावर या बैठकीत चर्चा करून कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. नाशिक शहरातील नागरी समस्यांवर व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था संघटनाच्या कार्यकर्त्यानी व सिटी बसेसच्या समस्येमुळे त्रस्त नागरिक व विद्यार्थ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिर्डी विमानसेवेचा नाशिकला तोटा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिर्डी येथून रविवार, एक ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू झाल्याने या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाशिकला फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहे. अवघ्या दीड तासाच्या अंतरावर असलेल्या या विमानतळाचा नाशिक-मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ९०० हून अधिक पिक-अप व्हॅनचा रोजगार संकटात सापडला आहे.
नाशिक येथील विमानसेवा तूर्त सुरू होणार नसल्याने नाशिककरांसाठी मंबईपेक्षा जवळचे विमानतळ म्हणून शिर्डीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शिर्डी येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने भविष्यात देशभर आणि जगभर पोचण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही. मात्र, या विमानसेवेला प्रवाशांकडून कितपत प्रतिसाद मिळतो हेही महत्त्वाचे आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी शिर्डीतील विमानतळाचे उद्‍घाटन झाले. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. शिर्डीच्या या विमानतळावरून सुरुवातीला दररोज सुमारे ५०० प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. शिर्डी-मुंबई हे अंतर विमानाने ३५ मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबई-शिर्डी ही विमानसेवा अलायन्स एअरलाइनने, शिर्डी-हैदराबाद सेवा जेट एअरवेजने, तर भोपाळ-नागपूर-शिर्डी सेवा इंडिगोने सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे शिर्डीतील विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. ‘एमएडीसी’ने तब्बल ३०० कोटी रुपये खर्चून हे विमानतळ उभारले आहे.

नाशिकची सेवा सहा महिन्यात
कोल्हापूर, नांदेड आणि नाशिकहून मुंबईसाठीची विमानसेवा येत्या सहा महिन्यात सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गुरुद्वारामुळे देशात प्रसिद्ध असलेल्या नांदेड येथून पुढील महिन्यापासून विमानसेवा सुरू होणार आहे. त्या पाठोपाठ नाशिकची सेवा सुरू होणार आहे.

पर्यटकांचा वाढणार ओघ
शिर्डीला विमानाने येणाऱ्या पर्यटकांचा ओघ नाशिककडे वळण्याची शक्यता आहे. देशभरातून त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिर्डी विमानतळावरून त्यांना या ठिकाणी येणे सोपे व वेळेची बचत करणारे ठरणार आहे.

उद्योजकांना फायदा
देशभरातील उद्योजकांना नाशिकला येण्यासाठी यापूर्वी मुंबई गाठावे लागत होते. मात्र, आता हवाईमार्गे शिर्डीला पोहचून नाशिकला येणे या उद्योजकांना शक्य होणार आहे. तसेच नाशिकच्या उद्योजकांना सुद्धा विमानाने जाण्यासाठी मुंबईच्या तुलनेत शिर्डी हे जवळचे डेस्टिनेशन ठरू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सभेला वाटाण्याच्या अक्षता

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य सरकारने महिलांमध्ये जागृती करण्याच्या‌ हेतूने गावांमध्ये एक ऑक्टोबर रोजी सभा घेण्याचे निर्देश दिले. मात्र, अशा निर्देशाचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचे समोर आले आहे.

निफाडमधील प्रशासनाला याचा गंधही नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या आदेशाबाबत निफाड तालुक्यातील गावांमध्ये महिलांची जनजागृती करण्याबाबत कोणत्या गावात बैठकी झाल्या, किती महिला सहभागी झाल्या, ठराव मंजूर करण्यात आले का, निवडणूक असणाऱ्या गावात सभा झाल्या का, याबाबत निफाड प्रशासनाला विचारणा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडे अशी माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक‌ बाब समोर आली. सध्या तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. मात्र, तहसीलच्या निवडणूक विभागातर्फे कोणतीही माहिती अद्ययावत व वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक, सदस्य, सरपंच बिनविरोध झाले, याची माहिती मिळत नाही. यामुळे तहसीलच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंस कल्याण धाममध्ये युवा जागृती शिबिर

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

मानव उत्थान सेवा समितीतर्फे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत युवा जागृती आध्यात्मिक शिबिर होणार आहे. नाशिक- पुणे रोडवरील शिवाजीनगर येथील श्री हंस कल्याण धाममध्ये हे शिबिर होईल.

देशात सर्वाधिक लोकसंख्या युवा असून, तरुणांमध्ये अद््भुत सामर्थ्य आणि क्षमता आहे. स्वत:मध्ये असणाऱ्या या क्षमतांची जाणीव करून देणे आणि या क्षमतांचा वापर कोठे आणि कसा करावा, याबाबत मॉरिशसमधून आलेल्या साध्वी हरिशाजी मार्गदर्शन करणार आहेत. भक्तिगीतांनी सायंकाळी सहाला शिबिराला सुरुवात होईल. अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या युवाशक्तीवर सायंकाळी साडेसहाला नाट्य सादर केले जाईल. त्यानंतर अध्यात्माबाबत मनात असलेले प्रश्न उपस्थ‌ित करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. त्यानंतर अध्यात्मावर आधारित सारगर्भित विचार तरुणांना श्रवण करता येतील. रात्री नऊला महाप‍्रसादाने शिबिराची सांगता होईल. तत्पूर्वी सकाळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त नाशिक-पुणे महामार्गालगत परिमंडळ दोन पोलिस उपायुक्त कार्यालयाजवळील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहरमच्या मिरवणुकीत ऐक्याचे दर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

करबला येथील युद्धात हजरत इमाम हुसेन हे यज‌िद यांच्याशी लढतांना शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इस्लाम धर्माच्या कालगणनेप्रमाणे असलेल्या ‘मुहर्रम’ या पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ‘यौमे आशुरा’ म्हणजे ‘मोहरम’च्या निमित्ताने नाशिकसह देवळालीमध्ये पारंपरिक व गेल्या सात पिढ्यांपासून जोपासना करण्यात येणाऱ्या ताबूत व सावरींची मिरवणूक काढण्यात आली. शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून दूध व सरबताचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची दर्शन घडून आले.

तत्पूर्वी सकाळी मस्जिदींमध्ये नमाज-ए-अशुरा अदा करण्यात येऊन ‘शहिद-ए-करबला’ च्या लढाईविषयीच्या इमामांनी प्रवचने केली. सकाळी झालेल्या नमाजमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा पठण करण्यात आले. जुन्या नाशिकच्या आशूरखाना येथे मानाचा ‘हालोका ताजिया’ची मिरवणूक काढण्यात आली. हा ताबूत हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन स्थापन करत असल्याने त्याच्या मिरवणुकीला खांदा देण्याचा मान मुस्लिम बांधवांप्रमाणे हिंदू खांदेकऱ्यांना देखील देण्यात येतो. मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनीदेखील या मिरवणुकीत सहभागी होत ऐक्याचा संदेश दिला. यावेळी नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी चांदीचे घोडे किंवा पाळणा यांसह इतरही वस्तू वाहण्याची प्रथा असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळाली. याशिवाय इमामशाही येथे यात्राही भरत असल्याने बच्चे कंपनीसह नागरिक येथे दाखल झाले होते.

बारा सवाऱ्यांची मिरवणूक

देवळालीत गेले पाच दिवस स्थापन केलेल्या हैदरखान उस्मानखान तर रईसखान उस्मानखान यांची चांदीची ताजिया, शेख अब्दुल सत्तार यांची गेल्या सात पिढ्यांपासून परंपरा असलेल्या लाकडी ताजिया, नवाज आबिद खान यांसह शहरातील इतर १२ सवाऱ्यांची सायंकाळी मिरवणूक काढण्यात येऊन येथे निश्चित केलेल्या ‘करबला’च्या विहिरीवर विसर्जन करण्यात येऊन दुवा पठण करण्यात आली. फारुख सैय्यद, रमजान सैय्यद, नहीम शेख, जफ्फर खान, इमरान शेख, जावेद खान, सुलतान शेख, शकील शेख आदींसह एसएस सरकार समूहाच्या वतीने मशिदीबाहेर दिवसभर दूध -सरबत वाटप करण्यात आले. दहा दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. महिलांनी घरोघरी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. ताजियाच्या मिरवणुकीची सांगता संसरी येथील दारणा नदीतटावर तर इतर ११ सवारींच्या मिरवणुकीची सांगता करबलाच्या विहिरींवर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांसाठी पोलिसांकडून नियमावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकाच ठिकाणी ५० पेक्षा जास्त फटाका स्टॉल्सना फटाके विक्री करण्यास परवानगी देऊ नये, यापेक्षा जास्त स्टॉलधारक असल्यास त्यांचा स्वतंत्र गट करून दोन्ही गटांमध्ये ५० मीटरचे अंतर ठेवावे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी राहील, अशी बंधने पोलिसांनी घातली आहेत.

पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हे नियम लागू राहतील. त्यानुसार फटाके स्टॉल परिसरात फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या आवाजातील फटाके मोकळ्या मैदानात उडवावे लागतील. प्रत्येक फटाका दुकानात शंभर किलोग्रॅम फटाके आणि ५०० किलोपर्यंत शोभेचे चायनिज क्रॅकर्स यापेक्षा जास्त साठा असू नये. फटाका दुकानात जाण्या-येण्याचा मार्ग विनाअडथळा, योग्य प्रकारे विद्युत वायरिंग केलेला असावा. फटाके हाताळण्यासाठी ग्राहकांना पुरेशी जागा ठेवून अग्निशमन व्यवस्था उभारावी. खराब फटाक्यांची विक्री करू नये, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

या फटाक्यांना बंदीच

२५ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आणि ३.८ सेमी पेक्षा जास्त आकाराचे अ‍ॅटमबॉम्ब व अशा प्रकारचे फटाके, फुटफुटी, तडतडी, मल्ट‌िम‌िक्स चिडचिड‌िया आदी नावाने ओळखले जाणारे विषारी फटाके विकता व उडविता येणार नाहीत. शाळा, न्यायालय व शांतता क्षेत्रापासून १०० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे फटाके उडविता येणार नाहीत. दहा हजारांपेक्षा जास्त फटाक्यांची माळ उडविता येणार नाही, आदी अनेक नियमांचा त्यात समावेश आहे.

तर गुन्हा दाखल होणार

या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गत वर्षी औरंगाबाद शहरात फटाक्यांच्या दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. शहरातही फटाके विक्रेते आणि पोलिस आमने-सामने उभे ठाकले होते. यंदा, जीएसटीसह इतर काही घटकांचा फटाक्यांच्या किमतीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनच्या धडकेत दोन प्रवासी जखमी

0
0

येवला : शिडीवरून मनमाडकडे चाललेल्या एका प्रवाशीवाहू काळ्या रंगाच्या मारुती व्हॅनने एका अज्ञात वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात व्हॅन चालकासह इतर दोघे जखमी झाले. मनमाड-नगर राज्य महामार्गावर येवला शहरानजीक शासकीय विश्रामगृहासमोर रविवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

मारुती व्हॅन मनमाड येथील असून, तिच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. मारुती व्हॅनचा चालक मद्दशीर शेख तंजुमल (वय २६, रा. मनमाड) याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो गंभीर जखमी आहे. तर याच व्हॅनमधील प्रवाशी भाऊसाहेब निवृत्ती कदम (६७, रा. येसगाव, ता. कोपरगाव) हे डोक्याला मार लागून गंभीर, तर गोपीनाथ कचरू ठोंबरे (६०, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकुमार जाधव यांनी प्राथमिक उपचार

केले. दोघा गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीपेक्षा जास्त दर देणार

0
0

‘रासाका’च्या गाळपप्रसंगी अध्यक्ष लथ यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रानवड साखर कारखाना केवळ नफा कमावणे या उद्देशाने चालवायला घेतला नसून, ही ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्यासाठी करण्यात येत असलेली लढाई आहे, असे एमकेपी सेल्स कंपनीचे अध्यक्ष रॉनिटन लथ यांनी सांगितले. तसेच येत्या हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देऊ असेही आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रासाका) चे ३८ व्या ऊस गाळप हंगामाचे बॉयलर प्रतिपादन शनिवारी (दि. ३०) विजयादशमीला झाले. त्यावेळी लथ बोलत होते. हा कारखाना २०१२ ते २०१८ दरम्यान छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, औरंगाबाद यांना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यात आला होता. मात्र या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एमकेपी सेल्स कंपनीस कारखाना एका हंगामासाठी चालवायला दिला आहे. याप्रसंगी मुख्य अभियंता बाळासाहेब डेर्ले व कर्मचारी भाऊसाहेब जेउघाले यांच्या हस्ते सपत्नीक पूजा झाली.

‘बँकेची स्थिती सुधारेल’

समारंभात शेतकरी अण्णा आरोटे यांनी ऊसाला भाव किती देणार हे जाहीर करा व पेमेंट करताना ते जिल्हा बँकेमार्फत करू नका, अशी मागणी केली. त्यावर बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांनी जिल्हा बँक शेतकऱ्यांची असून, बँकेची परिस्थिती निश्चित सुधारेल, असे सांगितले. कर्जवसुलीसाठी सिक्युटिरायझेशन अॅक्टखाली निसाका व नासाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला असून, येत्या तीन ते चार दिवसांत निविदा बँकेतर्फे प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही दराडेंनी दिली. समारंभाला इंडियन शुगर कंपनीचे अरुण खडके, दिगंबर बदडे, सुरेश जाधव, भास्कर डेर्ले, पी. आर. जाधव, कार्यकारी संचालक भरत वाबळे, व्यापारी खिमजीभाई, विलास वाघ, लक्ष्मण ढोमसे, आर. आर. वाघ, भय्यासाहेब देशमुख, संपतराव कडलग उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम क्षेत्राला मंदीचा फेरा

0
0

हक्काच्या घरासाठी प्रत्येक व्यक्ती आपली आयुष्याची जमापुंजी लावून चांगले घर घेण्याचे स्वप्न बघत असते. त्यासाठी सुरक्षितता व मूलभूत सोयी-सुविधांचा विचार केला जातो. पण, नाशिक शहरात गेल्या तीन वर्षांपासून कपाट, कम्प्लिशन आदींमुळे बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट कायम असतानाच नोटाबंदी, रेरा आणि जीएसटी असे एकामागाेमाग एक धक्के बांधकाम व्यावसायिकांना बसले. त्यामुळे मंदीचे सावट गडद झाले आहे. जीएसटीचा व्यवसायावर परिणाम झालेला नाही, असे अनेक व्यासायिक सांगतात. मात्र, नवीन कायदा अन् कर प्रणालीमुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांत संभ्रम असल्याने बांधकाम क्षेत्रावरील मंदीचा फेरा कायम आहे. थोड्या काळाने परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा आशावादही व्यक्त होत आहे.


खरेदीदारावर थेट भार

जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादित वस्तू आणि सेवांवरील केंद्रीय अबकारी कर, सेवा कर आणि राज्यांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) तसेच अन्य अप्रत्यक्ष करांऐवजी एकच कर भरावा लागत आहे. जमिनीची तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या वस्तूची विक्री मात्र वस्तू पुरवठा किंवा सेवा पुरवठा म्हणून गणली जाणार नसल्याने त्यावर जीएसटी लागणार नाही.

बांधकाम सुरू असलेल्या वास्तूची विक्री मात्र सेवा पुरवठा म्हणून गणली जाणार असल्याने त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत फ्लॅट खरेदी करताना सेवाकर भरावा लागतो. पूर्वी घर घेताना विकसकाकडून सेवाकर, व्हॅट व मुद्रांक शुल्क अशा करांची आकारणी करण्यात येत असे. हे तीनही कर एकत्रित करून ग्राहकाला एकूण रकमेच्या ९ ते १० टक्के इतका कर भरावा लागत होता. मात्र, जीएसटीनंतर हे सर्व कर बाद होऊन मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त एकच करप्रणाली अाली आहे. जीएसटीअंतर्गत स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी १२ टक्के कर आहे. जीएसटीनंतर राज्यांकडून लावले जाणारे मुद्रांक शुल्क ५ ते ७ टक्के आहे, ज्याचा थेट भार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकावर पडत असून, कुठलाही व्यवहार करताना प्रत्येकावर कर द्यावा लागणार असल्याने स्थावर मालमत्तांच्या किमतीही वाढल्या असल्याची चर्चा बाजारात ऐकायला मिळत आहे.

--

कागदोपत्री व्यवहारांअभावी अडचण

कोणतेही नवीन धोरण किंवा नवीन कायदे अंमलात आणल्यानंतर काहीशा अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने बदल स्वीकारण्यासाठी थोडा वेळ नक्की लागेल, हे खरे आहे. पण, ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कागदोपत्री व्यवहार केलेले नसतील त्यांना मात्र आज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. १ जुलैपासून महाराष्ट्रासह देशभरात वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी लागू करण्यात आला असून, त्यातील तरतुदींनुसार बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर खरेदी केल्यास, तसेच जमीन आणि वस्तू व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिल्यास जीएसटी भरावा लागणार आहे. जमीन, तसेच वस्तूची विक्री करताना मात्र जीएसटी भरावा लागणार नाही.

--

रेती, विटा, सिमेंटला लाभ

बांधकाम साहित्याचा बहुतेक भाग १८ टक्के आणि २८ जीएसटी स्लॅबच्या खाली आहे. पण, असे असताना मात्र बांधकाम करताना अत्यावश्यक असलेल्या वाळू, विटा यांना साधारणपणे ५ टक्के जीएसटी कर लागतो, पूर्वी तो ६ टक्क्यांच्या आसपास लागत होता. त्यामुळे त्यांचा दरांमध्ये थोडा फरक पडला आहे. पण, एकंदरीत नव्या कर प्रणालीत फक्त रेती, विटा आणि सिमेंट यांच्या किमतीत घट झालेली दिसून येते. मात्र, इतर बांधकाम साहित्याचे कर मात्र वाढलेले आहे. याशिवाय सिमेंटला पूर्वी सर्व कर मिळून एकत्रित ३० टक्के कर आकारणी केली जात असे. पण, जीएसटीनंतर २८ टक्के कर आकारणी केली जाते, म्हणजेच २ टक्के घट झाली आहे.

--

फिनिशिंगच्या कामांना फटका

बांधकाम झाल्यानंतर फिनिशिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेंट आणि वॉर्निश, पुट्टी व वॉल फिटिंग्ज, प्लास्टर यांच्यावर पूर्वी २६ टक्के कर आकारणी केली जात असे. पण, जीएसटीनंतर त्यांमध्ये वाढ होऊन २८ टक्के कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे पेटिंग मटेरियलच्या किमतीतदेखील २ टक्के वाढ झाली. वॉलपेपरसाठी पूर्वी १८.५ टक्के कर लागत असे. त्यामध्ये वाढ होऊन तब्बल २८ टक्के जीएसटी लागत आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत जवळपास १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली दिसून येते .

--

टाइल्स, स्टीलची दरवाढ

सिरॅमिक टाइल्स, ग्रॅनाइट, मार्बल या वस्तूंवर पूर्वी १३.५ व्हॅट आणि इतर कर मिळून १८ ते २२ टक्के कर आकारणी केली जात असे. जीएसटीनंतर त्यामध्ये वाढ होऊन २८ टक्के कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे ५ ते ६ टक्के अधिक वाढ झाली आहे. स्टीलच्या विक्रीवर पूर्वी व्हॅट, एक्साइज मिळून १७.५ टक्के कर आकारणी केली जात असे. त्यामध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाली असून, १८ टक्के जीएसटी आकारणी केली जात आहे.

--

अडचणी मर्यादित काळासाठी...

‘जीएसटी’मुळे अनेक छोटे-मोठे कर बंद होऊन एकच लागू केल्याने व्यावसायिकांसाठी चांगले आहे. नवीन प्रणाली असल्यामुळे समजण्यासाठी सुरुवातील अवघड जाईल. पण, त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. ‘जीएसटी’ची माहिती देण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून सहकार्यदेखील सुरू आहे. शिवाय आकारणी केल्या जाणाऱ्या किमतीचे रिबेटदेखील त्यांना प्राप्त होणार आहे. पण, ज्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय पारदर्शक नसतील त्यांच्या अडचणी मात्र वाढल्या असल्याचे जाणकार सांगतात.

--

‘जीएसटी’च्या नावाखाली फसवणूक

जीएसटी कर प्रणालीमुळे वस्तूंच्या किमती काही प्रमाणात वाढल्या किंवा घटल्या आहेत. पण, बांधकाम साहित्य घेणाऱ्या सर्वसामान्यांची मात्र ‘जीएसटी’च्या नावाखाली फसवूक केली जात आहे. वस्तूंच्या किमती कर आकारणी करून लावलेल्या असल्या, तरी ग्राहकांनी पक्के बिल घेऊन नये म्हणून वस्तूंच्या किमती फुगवून सांगितल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकदेखील जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून पक्के बिल घेणे टाळतात. बांधकाम साहित्याची ‘एमआरपी’ नसते, त्यामुळे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळे दर आकारले जाऊन फसवणूक केली जाते. अशा व्यावसायिकांवर कारवाई होण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दरम्यान, नवरात्री आणि दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या जाहिराती केल्या जात असल्या, तरी यावर्षी अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ‘जीएसटी’वर ५० टक्के सवलतीच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

--

जमिनींच्या दरात घसरण

जमिनींचे खरेदी-विक्रीचे दर विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेवर अवलंबून असतात हे मान्य असले, प्लॉट आणि जागांचे दर चार ते पाच वर्षांपूर्वी गगनाला भिडायला सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर मात्र मंदीची सुरुवात झाली. नोटाबंदीनंतर जमिनींचे दर २० ते २५ टक्के कोसळले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जमिनींची किंमत बरीच कमी झाल्याची चर्चा बाजारात ऐकायला मिळत आहे.

---

नाशिक शहरात तीन वर्षांपासून महापालिकेच्या धोरणांमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत होताच. पण, जीएसटीचा मात्र व्यवसायावर फारसा परिणाम दिसत नाही. नवीन करप्रणाली सर्वांसाठी चांगली आहे. या कर प्रणालीसंदर्भात पुरेशी जनजागृती करणे गरजेचे आहे.

-मनीष राठोड, मार्बल व्यावसायिक

--

सध्या बाजारात मंदीचे सावट कायम असले, तरी कोणतीही नवीन प्रणाली आल्यानंतर अडचणी येतच असतात. जीएसटीचा व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नसून, सध्या थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील.

-कैलास धूत, स्टील व्यावसायिक

--

जीएसटीमुळे बाजारात मंदी नसून, रेरा, नोटाबंदी आदींमुळे बाजारात मंदीचे सावट आहे. जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किमती थोड्या अधिक प्रमाणात वाढल्या आणि घटल्या आहेत. त्यामुळे इतर छोट्या करांच्या आकारणीपेक्षा जीएसटी कर आकारणी चांगली आहे.

-तुषार शेवाळे, प्लंबिंग मटेरियल सप्लायर

--

(संकलन ः अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोनशे डेंटिस्ट नियुक्तीच्या प्रतीक्षेत

0
0

एमपीएससीची संथ प्रक्रिया; १८९ उमेदवारांची घालमेल

नाशिक : दंत शल्यचिकित्सक या पदासाठी एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर होऊन ११ महिने उलटले आहेत. मात्र आयोगाच्या संथ प्रकियेमुळे या परीक्षेत यश मिळविणाऱ्या राज्यभरातील सुमारे १८९ उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही उमेदवारांच्या पदरी निराशाच पडली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दंत शल्यचिकित्सक या पदासाठी सरळ सेवा भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानंतर आयोगातर्फे पात्र उमेदवारांची यादी आरोग्य विभागाकडे कार्यवाहीसाठी तसेच, उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यासाठी देण्यात आली होती. मात्र ११ महिन्यांच्या कालावधी उलटूनही या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्याचे मुख्यमंत्र्यांनीही आदेशही दिले होते. मात्र पुढील प्रक्रिया ढिम्म असल्याचीच अनुभव उमेदवारांना येत आहे. अनेक मंत्र्यांनी आरोग्य विभाग व प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करूनही या अधिकाऱ्यांना या विषयात रस दाखवलेला नाही. आरोग्य विभागात कार्यरत अस्थायी दंत शल्यचिकित्सक आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत दंत शल्यचिकित्सक यांना शासन सेवेत हवे असलेले कायमस्वरूपी समावेशनाचे कारणा व या विभागाशी त्यांचे असलेले साटेलोटे यामुळे या पात्र उमदेवारांच्या नियुक्त्यांना उशीर होत असल्याचाही आरोप या प्रक्रियेतील काही उमेदवारांकडून होत आहे.

गांभीर्याचा अभाव

राज्यात आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले जाते. शिवाय डॉक्टरांच्या रिक्त पदांची समस्या गंभीर आहे. शासनात कार्यरत डॉक्टरांचे शासनाची नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. या स्थितीत नवे उमेदवार नियुक्तीसाठी उत्सुक असूनही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही. मौखिक आजारांची समस्या गंभीर असतानाही राज्यात आरोग्य विभागाच्या ५१२ मंजूर पदांपैकी केवळ ४१ स्थायी दंत शल्यचिकित्क कार्यरत आहेत. आयोग आणि शासनाने या प्रलंबित भरती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्याची अफरातफर करणारे भामटे गजाआड

0
0

सिन्नर फाटा : ऑनलाईन शॉपिंग साईटवर बनावट ग्राहकांची नोंदणी करून त्यांच्या नावे आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची अफरातफर करून कंपनीचा फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रवीण शिवाजी घोलप (वय २०, रा. चेहेडी) व गणेश भिमा तळपाडे (वय २३, रा. सिंहस्थ नगर, सिडको) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार ५५० रुपये किमतीचे १० कॅमेरे, ३ लॅपटॉप व एक प्ले स्टेशन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात अटक केलेले दोघेजण जयभवानी रोडवरील एन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग केलेल्या वस्तुंची डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीस होते. या दोघांनी फ्लिपकार्ट व मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग साइटवर बनावट ग्राहकांची नावे, पत्ते व इमेल आयडी पाठवून कॅमेरे, लॅपटॉप, प्ले स्टेशनची खरेदी करत होते. त्या ताब्यात मिळाल्यावर त्यातील वस्तू हे दोघेजण स्व:तच्या फायद्यासाठी काढून घेत व त्याजागी त्याच वजनाच्या दुसऱ्या काहीतरी भरून सदरच्या वस्तू ग्राहकांनी परत केल्याचे कारण दाखवून दुकानात परत करीत होते. ही बाब कंपनी मॅनेजरच्या लक्षात आल्याने दोघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, नारायण न्याहळदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भिमराज गायकवाड यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिंग सिटीला चालना

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे (एमटीडीसी) पर्यटकांमध्ये सायकल संस्कृती रुजविण्यासाठी नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्डवर सायकल स्टॅण्ड उभारले जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत केली आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनमंत्री रावल यांनी याबाबत राज्यातील सहा ते सात ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार असून, त्यात पहिला प्रयोग नाशिकला करण्यात येणार आहे. पर्यटकांना शहरात व इतरत्र सर्व स्थळे सायकलिंग करून बघता यावीत, यासाठी ही संकल्पना पुढे आल्यानंतर त्यात नाशिकची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये सायकलद्वारे पर्यटन ब्रँडिंगसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण, तो का पंक्चर झाला हे पुढे आले नाही. आता मात्र पर्यटनमंत्री रावल यांनी यावर पुन्हा जोर दिला असून, सायकलिंगद्वारे पर्यटन ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत रोड, हायब्रिड, माउंटेनिंग, टुरिंग यासाठी सायकलिंग करण्याचे प्रकार लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्येही असे सायकलिंग सुरू झाल्यास ते कोणत्या प्रकारचे असेल याबाबतही उत्सुकता राहणार आहे. परदेशात सायकलवरून पर्यटन लोकप्रिय असून, ते महाराष्ट्रात सुरू केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा उपक्रम पर्यटकांना आवडला, तर भविष्यात काही मार्गांवर सायकल ट्रॅकही होऊ शकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

...

सायकलद्वारे ब्रँडिंग

पर्यटनाचे ब्रँडिंग आणि पर्यावरणाचे हित या दोन्ही गोष्टी साधून सायकल भाडेतत्त्वाने देण्याची संकल्पना पुढे आली आहे. विशिष्ट स्वरूपाची आणि एमटीडीसीचा लोगो असलेली सायकल पर्यटनस्थळी उपलब्ध करून देण्याचीही चर्चा सुरू आहे. एका स्टॅण्डवरून घेतलेली सायकल दुसऱ्या स्टॅण्डवर जमा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथाबंदीची काटेकोर अंमलबजावणीच नाही!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगगड देवी ट्रस्ट आणि प्रशासनाने घेतलेल्या बोकडबळी प्रथाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नसल्याबाबत खंत व्यक्त केली आहे. अशा निर्णयाच्या पाठीशी उभे राहताना प्रशासनाने प्रबोधनावरही भर द्यावा. याशिवाय राज्यभरात इतरत्रही यात्रांच्या आयोजनामध्ये या निर्णयाचा आदर्श घेतला जावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.

यंदा नवरात्रात सप्तशृंग गडावर बोकडबळीची प्रथा प्रशासन आणि ट्रस्टने निर्णय घेत बंद केली. देवाच्या नावाखाली उघड्यावर पशुहत्येस प्रतिबंध करण्याचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रशासनास २३ जुलै १९९८ रोजीच दिलेला आहे. या आदेशावर सरकार पक्षाच्या वतीने देवाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांचे बळी बंद करण्याबाबत योग्य ती सर्व पावले उचलून मूक प्राण्यांच्या कत्तली रोखण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, उशिराने का होईना, प्रशासनाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांच्या रूपाने यंदा असा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या वेळी मात्र निर्दिष्ट ठिकाणावर पशुहत्याबंदी दिसली असली तरीही परिसरात या प्रथेवर चाप लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला बळ देण्यासाठी जनप्रबोधनासह कायद्याचेही प्रबोधन करायला हवे, अशी अपेक्षा अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.

विकासकामांवर भर द्यावा

सप्तशृंगगडाचा भौगोलिक परिसर हा निसर्गाने समृद्ध आहे. यात्रेतील पशुबळींच्या निमित्ताने येथे लाखो रुपयांच्या अर्थकारणास चालना मिळते. जनप्रबोधनाच्या माध्यमातून पशुहत्याबंदीविषयक मुद्द्याला प्रोत्साहन देऊन त्यापोटी वाया जाणारे लाखो रुपये गड विकासाच्या कामासाठी उपयोगात आणले जातील, अशी संकल्पनाही समितीच्या वतीने डॉ. गोराणे यांनी मांडली आहे. येथील दुर्मिळ व औषधी वनस्पतींच्या संगोपन, संवर्धनासाठी केंद्र उभारणी, या आदिवासी पट्ट्यातील महिला व बालकांचे आरोग्य सांभाळणे, गर्भवती महिला व मुलींसाठी सकस आहाराचा पुरवठा आदी सामाजिक आयामांवर या प्रथांपोटी होणारा खर्च वळविता येऊ शकतो, असा मुद्दाही अंनिसने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मांडला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानदाराची पोलिसाला दमदाटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील तिवंधा चौकात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहने हटवण्यासंबंधी आदेश देणाऱ्या भद्रकाली पोलिस स्टेशनच्या सहाय्यक उपनिरीक्षकास बुधा हलवाई दुकान चालकांनी दमबाजी करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबकगिरी डी. गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. ३०) दसरा असल्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिवंधा चौकात मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पार्क झालेली वाहने हटवण्यासाठी भद्रकाली पोलिस त्याठिकाणी पोहचले. यावेळी गोसावी यांनी वाहने हटवण्यासंदर्भांत सूचना केली असता दिलीप बुधा वाघ (४८), ललीत चंद्रकांत वाघ (२८), वसंत बुधा वाघ (५३) आणि दिलीप बापू राठोड (२७, सर्व रा. तिवंधा चौक) यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. संशयितांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे गोसावी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल अधिक तपास करीत आहेत.

काच फोडून चोरी

कारची काच फोडून चोरट्याने कारमधील मोबाइल चोरी केला. ही घटना मुंबई नाका परिसरात घडली. याप्रकरणी रामचंद्र बी. पाटील (५१) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कारची (एमएच १५ ईपी ०१२०) काच फोडून १० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. ही घटना चांडक सर्कलकडून मुंबई नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा विनयभंग

0
0


नाशिकरोड : परिसरातील आगर टाकळी येथील महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताविरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली. रोशन सुनील पगारे (२५, रा. आगार टाकळी) असे या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पगारेने घराबाहेर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या बहिणीस धक्काबुक्की केली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या पीडित महिलेच्या बहिणीलाही पगारेने शिवीगाळ करून धमक्या दिल्या. याप्रकरणी पीडित महिलेने संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली असून, उपनिरीक्षक पी. बी. बाकले हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीजींच्या पुतळ्याला अस्वच्छतेचा विळखा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आज, सोमवारी (दि. २) साजऱ्या होत असलेल्या महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा अभियान राबविले जात असतानाच देवळालीगावातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला मात्र कचऱ्याचा विळखा पडल्याचे दृश्य रविवारी दिसून आले. येथे फुले, आपट्याच्या पानांसह कचरा पडलेला असूनही साफसफाई केली न गेल्याने परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रपित्याचा नाशिकरोड परिसरातील हा एकमेव पुतळा आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज नाशिकरोडला विविध कार्यक्रम, उपक्रम होणार असून, देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळ्याचे विविध पक्ष व संस्थांतर्फे पूजन केले जाणार आहे. मात्र, या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या टाइल्स तुटलेल्या असून, पुतळ्याची अनेक वर्षांपासून रंगरंगोटीही झालेली नाही. पुतळ्याभोवती काही व्यावसायिक अस्वच्छता करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. यासंदर्भात त्वरित कार्यवाही केली जावी, अशी मागणी नाशिकरोड काँग्रेसने केली आहे. देवळालीगावातील हा पुतळा तत्कालीन नाशिकरोड देवळाली नगरपालिकेने १४ जून १९६४ रोजी उभारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानाला जंगलाचे स्वरूप

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आजूबाजूच्या परिसरासह आवारात फोफावलेले रानगवत, चिखल अन् दलदल, कचऱ्याचे ढीग, प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था अशी अवस्था आहे म्हसरूळ येथील सावरकरनगर कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाची.

येथील मध्यवस्तीतील उद्यानाची अशी जंगलसदृश अवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी संबंधित घटकांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील म्हसरूळ परिसरातील सावरकरनगर कॉलनीत छत्रपती शिवाजी उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य पसलेले असून, गवत व दाट झाडी वाढल्यामुळे उद्यानाला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील खेळण्यांची मोडतोड झालेली असून, तीदेखील गवतात हरवून गेल्याची स्थिती आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारीच नसल्यामुळे येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

--

तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष

या उद्यानाला जंगलासारखे स्वरूप प्राप्त झालेले असल्यामुळे या उद्यानात जाणेदेखील परिसरातील नागरिकांना दुरापास्त झाले आहे. त्यामुळे हे उद्यान पूर्ववत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. मात्र, या उद्यानाच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर तरी हे उद्यान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

--

येथील उद्यानाची देखभालच होत नसल्याने उद्यानात गवत फोफावले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा आणि दलदल आहे. उद्यानाच्या दुरवस्थेमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिलेली नाही. त्यामुळे याबाबत त्वरित उपाययोजना करावी.

-योगेश पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकाली पोलिसांतर्फे ज्येष्ठांचा सन्मान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या अनुभवांची शिदोरी घेऊनच समाज मार्गक्रमण करीत आहे. त्यांच्या याच मोठेपणाचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करीत असल्याची भावना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केली.

जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्था आणि भद्रकाली पोलिस स्टेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. हा कार्यक्रम द्वारका परिसरातील संस्थेच्या कार्यालयात झाला. या वेळी काठे गल्लीसह इंदिरानगर, भद्रकाली परिसरातील तीनशेपेक्षा जास्त ज्येष्ठ महिला व पुरुष हजर होते. रोपट्यापासून वटवृक्षाचे रूपांतरण होत असताना ते झाड वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांची मदत करते. त्यामुळे या वटवृक्षाच्या सावलीत जाताना एक आदरयुक्त भीती असते. ज्येष्ठ नागरिकांचा सहवास हीच भीती दर्शवत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांविषयी असलेल्या आदराप्रीत्यर्थ, तसेच त्यांनाही एक आधार असावा म्हणून नाशिक शहर पोलिस दलातर्फे काठी, टोपी व गुलाबाचे फूल ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले. या वेळी पाटील यांनी पोलिस दलाची ज्येष्ठ नागरिकांबाबतची भूमिका, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायची काळजी यासह कायदे व सुरक्षिततेसंबंधी माहिती दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव, भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा वाढदिवसदेखील कार्यक्रमावेळी साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून धावणार शिवशाही बस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या चार शिवशाही बस रविवारी सकाळी दाखल झाल्यानंतर सोमवारी त्या नाशिक-पुणे महामार्गावर धावणार आहेत. सोमवारी पहिली बस सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, त्यानंतर तासाभराच्या अंतराने तीनही बस सोडण्यात येणार आहेत. या वातानुकूलित बसचे भाडे ३३८ रुपये असून, ते नॉन एसी सेमी लक्झरी बसपेक्षा २२ रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे या बसला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी ४ बसेस आता कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता पहिली बस असेल. त्यानंतर दुसरी बस १२.१५, तिसरी बस १.१५ व चौथी बस २.१५ वाजता सुटणार आहे. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. शिवनेरी बसचे भाडे नाशिक-पुणेसाठी ६०५ रुपये आहे. तर सेमी लक्झरीचे भाडे ३१६ रुपये आहे. त्यामुळे ही बस सर्वांना परवडणारी ठरणार आहे.

नाशिकला या बस दाखल झाल्यानंतर या बस कशा आहेत, हे पाहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोत बस बघण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून या बसची चर्चा असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा त्याबाबत उत्सुकता होती. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने २० बसेस मिळणार असून, त्यात स्ल‌िपर कोचसुद्धा असणार आहे. त्या अहमदाबाद, इंदूर, बडोदा येथे सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या बसेसला कसा प्रतिसाद मिळतो, हे बघून त्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. राज्यात येत्या काही दिवसांत ५०० बसेस धावणार आहेत. त्यासाठी आता प्रत्येक डेपोत या बस येत आहेत. खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी या बसेस एसटीकडे पुन्हा प्रवाशी वळवण्यात उपयोगी ठरणार आहेत. तोट्यात चाललेल्या एसटीला या बसेसमुळे नवीन संजीवनी मिळणार असून, त्यामुळे त्याकडे एसटी महामंडळाने विशेष लक्ष दिले आहे. या बसेसची ऑनलाइन बुकिंग सुरू झाली असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


नाशिकसाठी चार शिवशाही बस रविवारी दाखल झाल्या आहेत. सोमवारी पहिली बस ११.१५ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर तासाभराच्या अंतराने तीन बसेस सोडण्यात येतील. या बसेसचे भाडे कमी असून, ती वातानुकूलित असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-आर. डी. जगताप, वाहतूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुपटासाठी वर्तमानातील साध्या भाषेचा वापर हवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लघुपटनिर्मिती करताना व त्यात गतिमानता येण्यासाठी रोजच्या जगण्यातील गोष्टींना प्राधान्य देण्याबरोबरच वर्तमानातील सहज साध्या भाषेचा वापर करावा. घडणाऱ्या घटनेकडे कृती म्हणून बघावे, तसेच कथेचे बीज हे दर्जेदार आणि आविष्कारासाठी पुरेपूर शक्यता असणारे हवे. दृश्य माध्यम असले तरी शब्दांचा नेमका वापर करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असावे. त्यातून कलात्मक आणि उत्तम लघुपट समोर येतो, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट समीक्षक, लेखक अशोक राणे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग मालाड, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स यांच्या संयक्त विद्यमाने लघुपटनिर्मिती कार्यशाळा झाली. विश्वास क्लब हाऊस येथे ही कार्यशाळा झाली. त्या वेळी राणे बोलत होते. ते म्हणाले, की लघुपटनिर्मिती करताना दिग्दर्शकाने आपल्यातील दृश्य माध्यमाच्या शक्यता तपासाव्यात आणि त्यातून मला काही तरी आणि नेमके सांगायचे आहे, याची जाणीव अधोरेखित करावी. सिनेमाची भाषा, तिचा वापर करण्याची शैली विकसित करणे आवश्यक आहे. दृश्यातील व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्यातून खूप काही व्यक्त होत असते. त्याचा पुरेपूर वापर करावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. भारतीय व जागतिक सिनेमाचे वेगळेपण, पटकथा, कॅमेरा आणि कथा मांडण्याची तांत्रिक शैली यांवरदेखील भाष्य केले. भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिन्गो इंटरनॅशनल लघुपट महोत्सवात जगप्रसिद्ध कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू होता.

दिग्दर्शक शिव कदम यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की दिग्दर्शकाने पात्राच्या भूमिकेनुसार कथेची मांडणी करावी. पात्राचा प्रवास, पात्राच्या भूमिकेनुसार लघुपटातील कथेत जिवंतपणा निर्माण करणे, सरळ-साधी गोष्टी सांगण्याची पद्धत यात वेगळेपण असायला हवे. उत्तम चित्रपटनिर्मितीसाठी सर्व कलांचा व्यासंग आणि जाण असणे महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की नाशिकमधील अनेक कलावंत लघुपट, चित्रपट क्षेत्रात जगभर नाव कमवत आहेत. त्यांना अशा कार्यशाळांमधून मार्गदर्शन, व्यासपीठ मिळण्यास निश्चितच मदत होईल. सिनेमा, लघुपटातून अनेक विषय प्रभावीपणे तरुण दिग्दर्शक मांडत आहेत. हे चित्रपटसृष्टीला बळ देणारे आहे.

कार्यशाळेत लघुपट म्हणजे काय? पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शंभराहून अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदविला. भूषण काळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images