दिव्यांगांच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या राड्यानंतर महापालिकेचे दिव्यांग धोरण चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे महापालिकेने दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी २० कोटींचा आराखडा तयार करतानाच दिव्यांगांचे सर्वेक्षणही केले. या सर्वेक्षणात शहरात ६,३७१ दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पावणेपाच लाख घरांना भेटी दिल्यानंतर हा आकडा समोर आला आहे. यातील चार हजार अधू असून, महापालिकेला आता त्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर केलेल्या आराखड्याला अंतिम रूप देता येणार आहे. सिडको परिसरात सर्वाधिक अपंग आढळून आले आहेत.
महापालिकेला शहरातील अपंगांवर तीन टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक असताना ते खर्च न केल्यामुळे गेल्या महिन्यात आयुक्त अभिषेक कृष्णा आणि प्रहार संघटनेचे आमदार कडू यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर महापालिकेने दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. वैद्यकीय विभागाने पंधरा दिवस मोहीम राबवून हे सर्वेक्षण पूर्ण केले होते. पालिकेने शहरातील ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्या. त्यात ६,३७१ दिव्यांग नागरिक आढळून आले. यात विकलांगांची संख्या ९०९, तर अंधांची संख्या ७५६ आहे. मूक-बधिरांची संख्या ८१४, तर हात व पाय अधू असलेल्या दिव्यांगांची संख्या ३,८९२ एवढी आहे.
४,४३२ दिव्यांग प्रमाणपत्राविना
महापालिका हद्दीतील सर्वेक्षणात आढळलेल्या दिव्यांगांमध्ये केवळ १९३९ नागरिकांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. त्यामुळे शहरात तब्बल ४,४३२ जणांना अपंगत्वाचे प्रमाणपत्रच नसल्याचे वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे या दिव्यांगांना अपंग योजनेचा लाभ मिळत नसून, त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आव्हान आहे.
विभागनिहाय दिव्यांग
सिडको ः १२७३, कथडा ः १२५७, नाशिकरोड ः १२३५, पंचवटी ः १२२३, सातपूर ः १०८०, पूर्व विभाग ः ३०३.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट