डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
रामलीला हा उत्तर भारतीयांचा, तर दुर्गापूजा हा बंगाली बांधवांचा वारसा आहे. मात्र, नाशिकचे वैशिष्ट्य असे, की हे दोन्ही उत्सव गांधीनगरमध्ये एकाच वेळी गेल्या साठ वर्षांपासून साजरे होत आहेत. वाल्मीकी आणि तुलसी रामायणाचे एकत्रीकरण करून गेल्या ६२ वर्षांपासून रामलीला सादर होते. त्यात सर्व धर्मांचे कलाकार सहभागी होतात. परिसरातील बंगाली बांधवांच्या दुर्गापूजेत गेल्या ६३ वर्षांपासून फक्त गंगेतील मातीचीच मूर्ती घडविली जात आहे.
नाशिकरोडला प्रतिभूती व नोटांच्या प्रेसनंतर गांधीनगर हा तिसरा सरकारी प्रेस आहे. येथे कामानिमित्त देशभरातून आलेले विविध जातिधर्मांचे कामगार स्थायिक झाले. पूर्वी साडेतीन हजार प्रेस कामगार होते. आता ही संख्या सव्वादोनशेवर आली आहे. सहा दशकांपूर्वी उत्तर भारतीय, गढवाली समाज व मराठी अधिकाऱ्यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे डॉ. मंडल, ए. के. विश्वास एस. एम. राय, सुदिन गुप्ता आदी बंगाली बांधवांनी १९५४ पासून दुर्गापूजा सुरू केली.
--
इको फ्रेंडली दुर्गापूजा
नाशिकमध्ये वीस हजारांवर बंगाली बांधव आहेत. त्यांनी गांधीनगरला सार्बोजनिन दुर्गापूजा महोत्सव सुरू केला. १९५४ मध्ये डॉ. मंडल यांनी आपल्या बंगल्यातील गॅरेजमध्ये देवीची मूर्ती घडवून हा उत्सव सुरू केला. यंदा अध्यक्ष सुजॉय गुप्ता, उपाध्यक्ष दीपक घोष, खजिनदार बीरुदास गुप्ता, शंकर डे, डॉ. रिता कुंडू, श्वेता गुप्ता, रीना घोष आदी पदाधिकारी आहेत. उत्तर महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा दुर्गा उत्सव आहे. बंगाली कलाकार तेथील गंगा नदीतील माती आणून गांधीनगरला देवीची मूर्ती घडवितात. वीस फुटांची ही मूर्ती आकर्षक असते. देवीचे हावभाव दररोज बदलतात व देवी नवस पूर्ण करते, अशी श्रद्धा आहे. दसऱ्याला नदीत विर्सजन न करता अग्निशमन दलाचा बंब बोलावून मूर्तीचे जागेवरच विसर्जन होते. अंध कारागिरानेही काही काळ देवीची मूर्ती घडविली होती. बंगालचे पंडित मुहूर्त पाहून देवीची पूजा करतात. येथील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पाण्यासाठी स्थानिक नागरिक गर्दी करतात. दिवंगत संगीतकार रवींद्र जैन, गायिका कविता कृष्णमूर्ती, प्रमिला दातार, हेमलता आदी दिग्गजांनी येथे कला सादर केली आहे. बॅले कलाकार सचिन शंकर, ऑकेस्ट्रा झपाटा, रागिनी, सेव्हन कलर्सने येथे एक काळ गाजवला होता.
--
वैशिष्ट्यपूर्ण रामलीला
देशाच्या फाळणीनंतर उत्तर भारतातून अनेक जण नाशिकरोडला आले. त्यांनी १९५५ मध्ये रामलीला सुरू केली. सुरुवातीला दोन वर्षे ती उर्दूत होती. प्रारंभी काही वर्षे जसवंतसिंह यांच्या उर्दू रामायणाचा आधार घेत रामलीला झाली. उर्दू समजत नसल्याने १९५७ पासून दिग्दर्शक सुरेंद्रसिंह बिश्त, देवीलाल शर्मा यांनी वाल्मीकी व तुलसी रामायण यांचा मेळ साधत हिंदी अनुवाद लिहिले. दिलबागराय त्रिखा यांनी ४० वर्षे लक्ष्मणाची भूमिका केली. दिवंगत दिग्दर्शक फ्रान्सिस वाझ यांनी इंद्रिजतची, शरीफ शेख यांनी परशुरामची आणि तस्लिम पठाण यांनी रावणाची भूमिका केली. प्रारंभी रामलीलेतील स्त्री भूमिका पुरुष कलावंतच करीत असत. शब्बीर अली, लियाकत अली पठाण, विष्णू गंगतानी, कृष्णा गवांदे, बालमसिंह, हजरीलाल शुक्ला, बिंदरसिंह, सुरिंदरसिंह यांनी केलेल्या स्त्री भूमिका अजरामर ठरल्या. संगमनेरचे जमीर फायर वर्क्स १९५५ पासून या उत्सवासाठी मोफत फटाके पुरवत आहे. १९६५ मध्ये श्यामा हिंदळेकर यांनी प्रथमच शूर्पणखेची भूमिका केली. त्यानंतर स्त्रियांनी रामलीलेत सहभाग सुरू केला. सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात. गुरुदयाल त्रिखा स्टेज व्यवस्था बघतात. रामलीलेत भूमिका केलेले मनोज कदम (न्यूझीलंड), सचिंदर पालसिंग मारवा (दिल्ली), प्रकाश राजानी (इंदूर), मनोज कुलथे (ठाणे) आदी आर्थिक मदत करतात. धीमन यांनी सर्वांत प्रथम फिरता रंगमंच केला होता. रामलीलेत शास्त्रीय गीतरचना सादर केली जाते. सन १९५९ ते १९६५ या काळात वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीला होत असे. लोक कुटुंबीयांसमवेत बैलगाडीत येत असत. गर्दी वाढल्याने रामलीला मोकळ्या मैदानावर होऊ लागली. दसऱ्याला येथे रावणाच्या ६० फुटी पुतळ्याचे दहन केले जाते. याप्रसंगी रामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्या ‘युद्ध’ होते. भव्य आतषबाजीही होते.
--
मानधन न घेता काम
रामलीलेतील कलावंत नाटक, चित्रपटसृष्टीत चमकत आहेत. त्यामध्ये महेश बोराडे, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, सुजाता देशमुख, प्रिया तुळजापूरकर आदींचा समावेश आहे. प्रेस कामगार, हौशी कलावंत मानधन न घेता काम करतात. काही कुटुंबांतील तिसरी-चौथी पिढी आजही रामलीलेत योगदान देते. सध्या दिग्दर्शक हरीश परदेशी, संजय लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश बोराडे (राम), प्रदीप भुजबळ (लक्ष्मण), नीता चौहान (सीता), ज्ञानेश्वर कुंडारिया (रावण), सुभाष वाणी (विभिषण), अरुण पवार (कुंभकर्ण), प्रकाश भालेकर, सुनील साधवानी, सुमित पवार, साहिल शर्मा आदी कलाकार ही अनोखी रामलीला सादर करतात.
--
हे सांभाळताहेत धुरा
गांधीनगर प्रेसमधील अधिकारी हरिलाल यांनी सन १९६० मध्ये रामलीला समितीची स्थापना केली. ‘पीडब्ल्यूडी’चे मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे प्रथम अध्यक्ष होते. गेल्या पंधरा वर्षांपासून या रामलीलेची धुरा कपिल शर्मा, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, प्रकाश भालेकर, अशोक लोळगे, संजय गंगातीरकर, जितेंद्र गवारे, सुनील मोदियानी, आदी सांभाळत आहेत. रामलीलेचा खर्च दर वर्षी चार-पाच लाखांच्या घरात जातो. मुंबईहून ड्रेसेस व अन्य साहित्य आणावे लागते. पूर्वी हौशी कलाकार सहज उपलब्ध होत असत, आता नोकरी-धंद्यामुळे कलाकारांची वानवा जाणवते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट