भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकारी सतत पायावर धोंडा पाडून घेत असल्याचा प्रत्यय पदोपदी येत असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच सर्वांसाठी ठाण्यात मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचीच पुन्हा कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अभ्यास दौऱ्याचा काही उपयोग झाला नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले.
शहरात रात्रपाळीची स्वच्छता पालिका कर्मचाऱ्यांकडून बंद करून ते आऊटसोर्सिंगने करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावापासून आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी अंतर राखले. या प्रस्तावावरून मनसे गटनेते सलिम शेख आणि सतीश कुलकर्णी हे आपसातच भिडले. रात्रपाळीच्या स्वच्छतेवरून शेख यांनी आरोप केल्यानंतर रात्रपाळीची स्वच्छता मनपा सफाई कर्मचाऱ्यामार्फत न करण्याच्या विषयाशी आपला काही संबध नसून तो महासभेचा निर्णय असल्याचे सांगत, महापौरासंह पक्षालाच तोंडघशी पाडले आहे. दरम्यान, तीन दिवसीस प्रशिक्षणात काय शिकलेत, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
सत्तेत येऊन कारभाराचा सूर सापडत नसल्याने विरोधक अल्पसंख्याक असतांनाही, ते भाजपवर भारी पडत आहेत. भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेचे गुणगान गातांना विरोधकांकडून स्वतःची खिल्ली ओढावून घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी किल्ला लढवण्यासाठी भाषणे केली असली, तरी त्याच्यामुळे पक्षाला बॅकफुटवरच येण्याची वेळ आली. सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी भाजपचे गुणगान गातांना त्याचा दोष नागरिकांवर टाकून नामनिराळे होण्याचा प्रयत्न केला. तर काही नगरसेवकांनी चुकीची विधाने करून महापौरांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांना सभा तहकूब करण्याची वेळ ओढावली होती. अभ्यास दौऱ्याचा नगरसेवकांना भाजपला कोणता फायदा झाला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
सुवर्णा मटाले संतापल्या
शहरात एकीकडे स्वाइन फ्लू व डेंग्यूने नागरिकांचा बळी जात असतांना भाजप नगरसेवक प्रशासनाची पाठराखण करीत असल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले संतापल्या. भाजपचे नगरसेवक उपाययोजना सूचवण्याऐवजी नगरसेवकांचेच प्रबोधन का करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. अजून बळी जाण्याची वाट बघणार का असा सवाल करत, सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.
डॉ. पाटलांचे चिमटे
डॉ. हेमलता पाटील यांनी शहरात नागरिकांचे बळी जात असतांना, सभागृहात मात्र माझे-तुझे असे केले जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. पक्षांतर केल्यावर माणसे कशी झूल पांघरतात असा टोला पाटील यांनी लगावल्याने भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटवा, अशी मागणी अपक्ष नगरसेवक गुरूमीत बग्गा यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट