जिल्ह्यात साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी यंत्रणेने सज्ज व्हावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या विशेष मोहीमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. बैठकीला आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपककुमार मीना, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की २२ सप्टेंबर रोजी शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यासाठी विभागवार नियोजन करण्यात आले असून डेंगूसारख्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छता उपक्रमाला चालना देणे आणि त्यात जनतेचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. आयुक्त डॉ. कृष्णा यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, की शहरात अधिक कचरा असणारे ४४८ ठिकाणे असून मोहिमेत तेथील स्वच्छतेवर भर असेल. मोहीम यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन सुरू असून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ७० पेक्षा अधिक संस्था या उपक्रमात सहभागी होतील. साडेतीन हजार महापालिका कर्मचारी आणि २०० घंटागाड्यांची मोहिमेत मदत होणार आहे.
त्र्यंबकमधून आज प्रारंभ
जिल्ह्यात सोमवार (दि. १८) जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणार आहे. अस्वच्छता असलेल्या त्र्यंबक शहरातील सात ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरपालिका, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, गजानन महाराज ट्रस्ट, आनंद मठ, सपकाळ कॉलेज, ब्रम्हा व्हॅली या महाविद्यालयाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. दुपारी एकपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट