खड्डेविरहित आणि चांगला रस्ता मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचीच दखल घेत हायकोर्टाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. खराब रस्ते अथवा खड्ड्यांच्या तक्रारी नागरिक थेट प्राधिकरणाकडे करू शकतात. विशेष म्हणजे छोट्या गावातील रस्त्यांचा प्रश्नही थेट हायकोर्टापर्यंत जाणार आहे. नागरिकांनी खड्ड्यांबाबत तक्रार करावी, पुढचे आम्ही पाहू, असे विधी सेवा प्राधिकरणामार्फत आश्वस्त करण्यात आले. या अभिनव चळवळीबाबत मटा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तज्ज्ञांनी केलेले मंथन…
--
तक्रारींसाठी नागरिकांनी यावे पुढे
रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत हायकोर्टात सुनावणी सुरू होती. तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी व्यासपीठच उपलब्ध होत नाही, तसेच केलेल्या तक्रारींची दखलदेखील घेतली जात नाही, ही बाब प्रामुख्याने समोर आली. त्यानुसार हायकोर्टाने राज्यभरातील प्रत्येक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. रस्त्यांची मालकी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद किंवा नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे असू शकते. या रस्त्यावरील खड्डे अथवा रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिक त्रस्त असतील, तर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार करावी. त्याची एक प्रत संबंधित विभागाला द्यावी. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर ती तक्रार पुढे संबंधित विभागाला देण्यात येईल. त्यानंतर आलेली तक्रार, त्यावर कारवाई झाली किंवा नाही याचा सविस्तर अहवाल हायकोर्टाला सादर करण्यात येईल. दर दोन महिन्यांनी हा अहवाल हायकोर्टाला सादर होणार आहे. त्या पुढील कार्यवाही हायकोर्टाकडूनच होणार आहे. रस्त्याबाबत तक्रार करावयाची असल्यास अथवा अन्याय होत असल्यास नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ०२५३-२३१४३०६ या क्रमांकावर किंवा dlsansk@gmail.com या मेलवर संपर्क साधवा. तसेच, जिल्हा कोर्टाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रत्यक्षात हजर राहून नागरिक तक्रार करू शकतील. रस्ते कोणी केले, त्यांचा मेंटेनन्स कोण पाहतो याचा विचार आम्ही करणार नाही. आमचे लक्ष फक्त तक्रारीचे निराकरण झाले किंवा नाही, याकडे असणार आहे. त्रास होत असल्यास नागरिकांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावे.
-एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा कोर्ट
--
दीर्घकालीन विचार नसल्याने ही वेळ
रस्त्यांची समस्या व रस्त्यांवरील खड्डे हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चदेखील होतो. वास्तविक प्रमुख सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दीर्घकालीन योजनांचा विचारच होत नसल्याने ही वेळ उद्भवते. महापालिकेने रस्ता तयार केला, की काही दिवसांतच वीज कंपनी भूमिगत वायरिंगचे काम हाती घेते. त्यानंतर बीएसएनएलला आपली केबल दुरुस्त करायची असते किंवा नवीन टाकायची असते. आता काही महिन्यांनी सीसीटीव्ही केबलचे काम हाती घेतले जाईल. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन आदी कामे रस्ते खोदून दर दिवशी सुरूच असतात. या सर्व घडमोडींचा थेट परिणाम रस्त्यांवर होतो. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने भविष्याचा विचार करून नियोजन आखावे. पण, महापालिकेची दैनंदिन कामांचे नियोजन करताना दमछाक होते. त्यात भविष्यातील नियोजन काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था हा आजमितीचा प्रश्न नाही. तरीही महापालिकेसह इतर विभागांनी आपले नियोजन करून त्याची चोख अंमलबजावणी केली, तर अनेक समस्या सुलभतेने मार्गी लागू शकतील.
-गोपाल अटल, अध्यक्ष, बीएआय, नाशिक
---
आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
खड्डे, स्पीड ब्रेकर्स, तसेच रस्त्यांची दुरवस्था याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. भारतीय खाद्यव्यवस्थेचा एक परिणाम म्हणून आपल्यामध्ये व्हिटॅमीन डी, तसेच कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या हाडांवर होतो. हाडे ठिसूळ होतात. विशेषतः मणक्यावर याचा परिणाम लवकर जाणवू लागतो. त्यात सदर व्यक्ती दुरवस्था झालेल्या, स्पीड ब्रेकर्स असलेल्या रस्त्यांवर वाहन चालवीत असल्यास संबंधितांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. मणक्यांची झीज होऊन असहाय वेदना होतात. चुकीच्या स्पीड ब्रेकर्समुळे तर अनेकदा मोठा हिसका बसून स्पाइनला दुखापत होते. काही वर्षांपूर्वी अहमदनगर-मनमाड रस्ता खूपच खराब होता, त्यावेळी अशा तक्रारींनी त्रस्त झालेले अनेक वाहनचालक शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल होत होते. तुलनेत नाशिक शहरात हे प्रमाण खूप कमी आहे. शहरातील रस्ते चांगले असल्याने ओव्हर स्पीडमुळे अपघात होऊन नागरिक अनेकदा गंभीर जखमी होतात. वाहन चालविताना प्रत्येकाने पुढील धोक्याचा, तसेच आरोग्याचा विचार करावा.
-डॉ. राहुल मोदगी, न्यूरो सर्जन
---
पाण्याच्या निचऱ्याचा करावा विचार
रस्त्याचे काम करताना त्या भागात पडणारे पाणी व त्याचा होणारा निचरा या गोष्टी विचारात घेतल्या, तर रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी खड्डा होणारच. ज्या ठिकाणी क्रॉसिंगचे काम केले आहे, अशा ठिकाणीही खड्डे पडत असतात. त्याकरिता रस्ते तयार करताना सर्व्हिस पाइप्स टाकणे व प्रॉपर ड्रेनेज सिस्टिम असणे गरजेचे आहे. सर्व्हिस पाइप टाकल्यानंतर रस्त्यावर खड्डे होण्याचा प्रश्नच येणार नाही. प्रत्येक रस्त्याचे लाइफ हे साधरणतः तीन वर्षांचे असते. त्यानंतर त्याची थोड्याफार प्रमाणात दुरुस्ती करावी लागते. शहरातील खड्ड्यांचा विषय वेगळा आहे व ग्रामीण भागातील खड्ड्यांचा विषय वेगळा आहे. दोन वर्षांपूर्वीच नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होऊन गेला. त्यानिमित्त सर्वच ठिकाणचे रस्ते चांगले तयार झाले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात फारसे खड्डे नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांना कमी पैशात जास्त लांबीचे रस्ते हवे असतात, त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो व खड्ड्यांची मालिका सुरू होते. शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ड्रेनेज व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी पाणी जायला मार्ग नसल्याने खड्डे तयार होतात व त्याचे खापर रस्ते तयार करणाऱ्यांवर फोडले जाते. अनेक मार्गांवर स्पीड ब्रेकर्स टाकलेले आहेत. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त होण्याकरिता ड्रेनेज सिस्टिमबाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
-अविनाश पाटील, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, बीएआय
--
भौगोलिक स्थितीचा करावा अभ्यास
कुढल्याही भागात रस्ता तयार करताना त्याला लागणारे रिमिक्स चांगल्या प्रतीचे असेल, तर खड्डे पडण्याचा संबंधच येत नाही. रस्ता तयार होण्याआधी त्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो भाग जास्त पावसाळी आहे त्या भागासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरावे व जो भाग जास्त उन्हाळी आहे त्यासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरावे. पावसाळी भागातील रस्ते जास्त लवकर खराब होतात, त्या तुलनेत उन्हाळी भागातील रस्ते कमी प्रमाणात खराब होतात. अनेक रस्त्यांची जॉमेट्री व्यवस्थित होत नाही, त्यामुळेदेखील खड्ड्यांचे प्रमाण वाढते. नाशिक शहरात जे रस्ते तयार झाले आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारचे झाले आहेत. बहुतांश रस्त्यांची गेल्या तीन वर्षांत डागडुजी करण्याची फारशी वेळच आलेली नाही. इगतपुरी भागाचा विचार केल्यास त्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था फार लवकर होते. परंतु, नांदगावसारख्या भागात पावासाचे प्रमाण कमी असल्याने रस्ते चांगले राहतात. रस्त्यावर वाहतूक कोणत्या प्रकारची होणार आहे, याचादेखील रस्ता तयार करताना विचार व्हायला हवा. शहरी भागातील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव रस्ता खोदतात, काम झाल्यानंतर वरच्या वर माती ढकलून दिली जाते. वरतून खड्डा बुजलेला दिसतो, मात्र आतमध्ये तो भाग अत्यंत कमजोर होतो. याकरिता विशिष्ट नियमावली असणे गरजेचे आहे.
-हरिभाऊ गाभणे, कंत्राटदार
--
रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका आग्रही
नाशिक महापालिका शहरात असलेल्या भागांची अत्यंत व्यवस्थित काळजी घेते. डांबरी रस्ता साधरणतः तीन वर्षे टिकतो, त्यांनतर महापालिकेतर्फे सर्फेसिंग करण्याचे काम हाती घेतले जाते. सिंहस्थात रस्ते तयार करताना पडणारे पाणी साचू न देता चांगल्या रीतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल, अशा पद्धतीने ड्रेनेज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची व्यवस्था आजही चांगली आहे. काही रस्त्यांच्या खालून जुनी पाइपलाइन गेली आहे. ती अनेकदा फुटते, त्यामुळे पाणी वर येउन खड्डा पडतो. तो कितीही वेळा बुजवला, तरीही तसाच राहतो. नाशिक-पुणे महामार्गावर शिवाजीनगर भागात जुन्या फेम टॉकिजसमोर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डा पडलेला आहे. तोदेखील तातडीने बुजविण्यात आला. महापालिकेने मुख्य रस्त्यांबरोबरच कॉलनीरस्तेदेखील व्यवस्थित तयार केले आहेत. ज्यांच्या रस्त्यांबात तक्रारी आहेत, असे नागरिक स्मार्ट सिटी अॅपवरून तक्रार दाखल करू शकतात, त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेच्या सहाही विभागांत खास तक्रार निवारण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. स्पीड ब्रेकर्समुळेदेखील अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तातडीने असे स्पीड ब्रेकर्स काढून टाकण्यात आले आहेत.
-आर. जी. खैरनार, डेप्युटी इंजिनीअर, महापालिका
--
शब्दांकन ः अरविंद जाधव, फणिंद्र मंडलिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट